निसर्गाचा कोकणावर वरदहस्त आहे आणि कोकणच्या पदरात निसर्गाने अनेक रत्न टाकली आहेत. परंतु त्यातील पुष्कळशी उन्हाळ्यातच येत असल्याने आंब्या फणसाच्या प्रभावळी पुढे त्यांची चमक फिकी पडते आणि सामान्य लोकांच्या नजरेला ती पडत नाहीत. ह्या रत्नातल माणिक आहे .... ओळखलंत का ?... नसेल तर सांगते ... हे माणिक म्हणजे कोकम. ह्याचा रंग अगदी माणका सारखा चमकदार लाल असतो म्हणून मी ह्याला कोकणातलं माणिक म्हणते. शहरात हे आमसुलं म्हणून ओळखलं जातं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधी ही आमसुलं म्हणणार नाही. कोकणात कैरीच्या फोडीना मीठ लावून सुकवतात जी शहरात आंबोशी म्हणून ओळखली जाते त्याना जनरली आमसुलं म्हणतात.
कोकमं एका झाडाच्या फळापासून तयार होत असली तरी त्या फळाला कोकम असं न म्हणता रातांबा असं नाव आहे आणि म्हणून ते झाड ही कोकमाचं नसून सहाजिकच रातांब्याचं असत. आमच्याकडे तर अति जवळीकीच्या हक्काने त्याचं "रातांबीण" असं एखाद्या शेजारणी सारखं स्त्रीलिंगी रूपच करून टाकलं आहे. असो. रातांब्यांवर प्रक्रिया केली की मगच त्याची कोकमं बनतात.
रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण खोट्या अशोकाची वाढतात तशी . आमची झाडं खूप जुनी आहेत. ह्याची पान असतात लांबट, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पात्तळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट , आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी आंबटसरच लागते चवीला. कोकणचं सगळ अर्थकारण आंब्यावर अवलंबून असल्याने आंब्याच्या बागांची एकंदरच खूप काळजी घेतली जाते आणि रातांब्याकडे कोणी लक्ष ही देत नाही वर्षभर. पण निसर्ग आपलं काम चोख बजावत असतो. फेब्रुवारी महिन्यात ह्याला मोहोर येतो आणि मे महिन्यात फळं तयार होतात. झाड उंच असल्याने मोहोर नजरेला पडणं कठीण जातं पण हल्ली आम्ही नवीन लागवड म्हणून रातांब्याची काही कलमं लावली आहेत, ती झाड कलमाची असल्याने जास्त उंच वाढत नाहीत त्यामुळे त्यांचा मोहोर मात्र नीट पहाता येतो.
रातांब्याच झाड ( फोटो नेटवरून )
रातांबे तयार झाले की एखाद्या दिवशी त्यांची काढणी केली जाते. काढणी म्हणजे ते सरळ काठीने जमिनीवरच पाडले जातात. आंब्याच्या काढणी सारखे घळ वैगेरे लाड काही रातांब्यांचे केले जात नाहीत. लाले लाल पिकलेल्या रातांब्याचे हारे मागच्या खळ्यात येऊन पडतात. ते आंबट रातांबे खाण्यासाठी पोरांच्या त्यावर उड्या पडतात. रातांब्याची बी दाताला लागली तर दात तात्पुरते पिवळे पडतात म्हणून "बी दाताला लावू नका, जपून खा" असे घरातल्या मोठ्या बायका मुलांना अगदी दरवर्षी नेमाने बजावत असतात.
रातांबे
cW
फोडलेली फळं
रातांबे धुवून पुसून ते फोडायला ( आवळ्याहून थोडं मोठं आणि फार कडक ही नाही खर तर हे फळ , त्याला काय फोडायचंय फणस आणि नारळा सारख? पण तरी कोकणात कोकम कापत / चिरत नाहीत तर फोडतातच. ☺ ) घेतले जातात. सालं आणि बिया वेगळ्या करतात. बिया आणि सालं ठेवलेली ताटं कलती ठेवून त्यांचा रस वेगळा गोळा केला जातो. त्यात काम करायला माझे हात शिवशिवतात पण जास्त वेळ आंबटात हात घातले तर माझी बोट दुखायला लागतात म्हणून ह्या कामात माझा सहभाग मात्र शून्य असतो. रातांब्याच्या सालींना त्या वेगळ्या ठेवलेल्या रसाची त्यात थोडं मीठ घालून सात दिवस सात पुटं चढवून ती उन्हात
खडखडीत वाळवली की मग त्याचं कोकम बनत. चांगली वाळलेली कोकमं घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवली तर दोन एक वर्ष सहज टिकतात. आंबटपणासाठी कोकणात ह्याचा भरपूर वापर होतो. कुळथाच पिठलं, रोजची आमटी वैगेरे मध्ये कोकणात कोकमाचाच वापर होतो. चिंचेसारखी भिजत घाला मग कोळ काढा अशी कटकट नसल्याने नसल्याने कोकम वापरणं सोपं जातं. श्राध्द पक्षाच्या सैपाकात मीठ, गूळ, जिरं आणि तिखट घातलेली अतिशय चविष्ट अशी कोकमाची चटणी करावीच लागते कोकणात. मात्र इतकी चविष्ट चटणी फक्त श्राध्दाच्या सैपाकतच करतात . एरवी कधी विशेष केली जात नाही.
सुखवत टाकलेली कोकमं
रातांब्यांची सालं आणि साखर एकत्र मिसळून उन्हात ठेवलं की चार आठ दिवसात साखर विरघळून त्याचा अर्क तयार होतो. हा वर्षभर सहज टिकतो. आयत्या वेळी ह्यात पाणी , मीठ आणि थोडी जिऱ्याची पूड मिसळून अवीट गोडीचे सरबत म्हणजेच अमृत कोकम करता येते. ह्याला इतका सुंदर लाल रंग येतो की पाहणारा प्यायच्या आधीच खुश ! आणि जर चांदीच्या पेल्यात वैगेरे दिलं असेल तर मग बघायलाच नको. कोकणात आमच्याकडे कैरीच्या पन्ह्या पेक्षा हेच सरबत अधिक प्रिय आहे. एखाद्या वर्षी घरी कोणाची मुंज वैगेरे करायचं घाटत असलं की मुंजीत सगळ्याना पेय म्हणून हेच दिलं जात आणि मग त्या वर्षी त्या हिशोबाने जास्त करून ठेवतो सरबत. अमृत कोकम करून झाल्यावर सालं उन्हात वाळवून ठेवतो. आंबट गोड चवीची ती सालं मुलांना खूप आवडतात आणि त्याना येता जाता तोंडात टाकायला लागतं तेव्हा देता ही येतात.
हल्ली कोकम आगळ म्हणून अमृत कोकम सारखाच पण बिन साखरेचा अर्क बाजारात मिळतो. तो वापरून नारळाचं दूध घातलेली सोलकढी अगदी पट्कन आणि मस्त होते. पण सोलकढी प्रिय आहे जास्त करून मालवण सावंतवाडी भागात. आमच्या देवगड भागात ती फार केली जात नाही . कधीतरी आठवण झाली आणि मुद्दाम केली तरच होते. आणि आम्ही त्याला सोलकढी न म्हणता सोलांचं सार म्हणतो.
हे सगळं करून झाल्यावर रातांब्याच्या ज्या बिया उरतात त्या धुवून चांगल्या वाळवतात आणि मग त्यांची वरची सालं काढून आतला भाग पाण्यात घालून चांगला उकळवतात थोड्या वेळाने बियांच तेल वर तरंगू लागतं. थंड झालं की ते थिजतं. ते अलगद काढून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवतात. हेच ते कोकम तेल. तो गोळा थोडा विस्तवावर धरायचा आणि वितळलेला भाग थंडीत पाय , ओठ फुटतात त्यावर चोळायचा. ह्या वितळलेल्या तेलाचा एक मंद मस्त वास येतो जो मला खूप आवडतो. पूर्वी मे महिन्यात कोकणातून येतानाच्या आमच्या सामानात हे कोकम तेलाचे गोळे हमखास असत. तेव्हा घरोघरी हेच तेल वापरत थंडीत पण आता जमाना बदललाय, पाच दहा रुपयात व्हॅसलीन ची डबी मिळते विकत म्हणून ह्याला कोणी विचारत नाही.
उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी बाहेरून आल्यावर हे सरबत प्यायले तर dehydration कमी होत, उन्हामुळे डोकं दुखत असेल तरी ही बरं वाटत. पित्तावर हे रामबाण औषध आहे. कधी कधी अंगावर पित्ताच्या गांधी उठतात त्यावर जर कोकमं पाण्यात भिजवून ते पाणी हलक्या हाताने चोळलं तर लगेच गुण येतो. कधी तोंडाला रुची नसेल तर थोडी साखर घालून एखाद कोकम चोखलं तरी फायदा होतो. असे अनेक गुण आहेत या कोकमाचे.
सालापासून बियांपर्यंत सगळ्यांचा उपयोग असणाऱ्या ह्या बहुगुणी परंतु दुर्लक्षित अशा रातांब्याची आणि कोकमाची ही कहाणी इथे सफल संपूर्ण
ओके ओके अनु किती पट्कन
ओके ओके अनु किती पट्कन सांगितलंस. थँक्यू
छान लेख
छान लेख
फारच सुंदर लेख.....
फारच सुंदर लेख.....
प्रतिसादही मस्त, नवनवीन माहिती देणारे...
______/\_____
फुटी कढी म्हणजे कोकमं
फुटी कढी म्हणजे कोकमं भिजवलेलं मीठ साखर थोडी मिरची लावलेलं तूप जिऱ्याची फोडणी दिलेलं पाणीच असतं अस मला वाटतंय. >> हो, तिवळ म्हणतात त्याला.
मस्त लेख आणि प्रतिसाद.
ममोजी सगळ्यात आवडला सुखवत
ममोजी सगळ्यात आवडला सुखवत टाकलेली कोकमं. खरच सगळी सुखं तुम्हा कोकणवासीयांना निसर्गाने भरभरून दिली आहेत. अर्थात आता बरच encroachment होतंय कोकणावर.
मालवणी भाषेत भिरणा म्हणतात.
मालवणी भाषेत भिरणा म्हणतात. ह्यानचा रस म्हणजे आगळ, आणि त्यात हि सोल ६ ते ७ वेळा भिजवावी लागतात, त्यामुळे जास्त काळ टिकतात. आगळ बनवताना खड्याच्या मिठाचा वापर करतात.
घरचा आगळ आणि सोल आणि
घरचा आगळ आणि सोल आणि बाजारातील मिळणारी ह्यात खुप फरक असतो.
Mandar katre, शशांक, शैलजा,
Mandar katre, शशांक, शैलजा, हिज हायनेस आणि टग्या ... धन्यवाद. मस्त माहिती मिळाली.
ममोजी सगळ्यात आवडला सुखवत टाकलेली कोकमं .. हि हा , हे खूप आवडलं. सुखवण्याचा हा अर्थ कधी लक्षात नव्हता आला.
घरचा आगळ आणि सोल आणि बाजारातील मिळणारी ह्यात खुप फरक असतो. >> अगदी अगदी.
कोकम सरबत आपल्या सर्वाना
कोकम सरबत आपल्या सर्वाना माहितीच आहे
पण कोकमातील पांढरा गर असतो त्याचे तिखट सरबत कसे बनवतात?
१००
१००
पण कोकमातील पांढरा गर असतो
पण कोकमातील पांढरा गर असतो त्याचे तिखट सरबत कसे बनवतात? >> ते कसं करतात नाही हो माहीत मला.
ह्या वर्षी कोकणात गेले असते तर कोकम सरबताचा फोटो देता आला असता इथे पण यंदा गल्ली ओलांडणे शक्य नाहीये कोरोनामुळे तिथे कोकणात काय जाणार ?
खूप सुंदर लेख...एकदम yum...
खूप सुंदर लेख...एकदम yum...
कोकम सरबत.....in process..
कोकम सरबत.....in process..
पण कोकमातील पांढरा गर असतो
पण कोकमातील पांढरा गर असतो त्याचे तिखट सरबत कसे बनवतात? >>>
https://www.maayboli.com/node/43190
कोकम सरबत.....in process.. >>
कोकम सरबत.....in process.. >>> आहाहा, सुरेख आमसुली रंग आलाय. नजरसुख.
मी चिन्मयी, किती सुरेख दिसतय
मी चिन्मयी, किती सुरेख दिसतय रंग फारच अप्रतिम. थँक्यू इथे फोटो दाखवल्याबद्दल.
माधव, रिक्षेबद्दल धन्यवाद.
तांब्यांची सालं आणि साखर
तांब्यांची सालं आणि साखर एकत्र मिसळून उन्हात ठेवलं की चार आठ दिवसात साखर विरघळून त्याचा अर्क तयार>>>याला काचेचीच बरणी लागते का?यंदा करावं असं वाटतंय पण बरणी पासुन सुरुवात करावी लागेल म्हणून विचारतेय
होय, काचेचीच लागते बरणी /
होय, काचेचीच लागते बरणी / बाटली . म्हणजे उन्हं आत जाऊन साखर विरघळते.
थोडचं करणार असाल तर जॅम ची किंवा कॉफी ची मोठी बाटली वापरता येईल.
मला कित्येक वर्षे चिंच
मला कित्येक वर्षे चिंच सैपाकात वापरतात हे माहितही नव्हते. सांबार घरात शिरले व त्याच्यासोबत चिंच...
>>> अगदी बरोबर साधना, आमच्या मराठवाड्यात कडुलिंबाच्या बरोबरीने दारादारात आणि बांधाबांधावर चिंच उभी आहे आणि आम्ही ती झाडून (चिंचा तोडण्याचा आमचा पर्यायी शब्द ) व्यापाऱ्याला विकतो पण चुकुनही तिला स्वयंपाकघरात शिरू दिलेले नव्हते.
अंजू,
अंजू,
आम्ही लहानपणी पसरट पातेल्यात बनवायचो. वरती झाकण ना ठेवता स्वच्छ सुती कापडाने झाकून ठेवावे म्हणजे धूळ माती आत जात नाही वा ऊन ही सर्व कोकमना व्यवस्थित लागते, कापड दोऱ्याने बांधायचे म्हणजे उडून जात नाही.
चिंच तर आम्ही वापरत होतो कोकम
राजा मनाचा धन्यवाद. मराठवाड्यात ही कोकमं मिळायची का ?
चिंच तर आम्ही वापरत होतो कोकम जास्त वापरत असलो तरी. आमच्या अलिबाग ची चिंच तर प्रसिद्धच आहे.
MeghaSK, बरोबर लिहिलं आहे. स्टील च्या पातेल्याला पांढरं सुती पात्तळ फडकं बांधून ही करता येत अमृत कोकम आगळ. काचेची बरणी लागतेच असं नाहीये.
ममो, तुमचे सगळेच लेख मी
ममो, तुमचे सगळेच लेख मी परतपरत वाचते.. हा पण त्यातलाच.. छान documentation करताय तुम्ही कोकणातील रोजच्या जीवनाचे.
ममो, तुमचे सगळेच लेख मी
ममो, तुमचे सगळेच लेख मी परतपरत वाचते.. हा पण त्यातलाच.. छान documentation करताय तुम्ही कोकणातील रोजच्या जीवनाचे. >> धनवंती , मला माझ्या लेखन सीमा निश्चितच माहित आहेत पण तरी ही मी लिहिलेलं एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचतय कोणी तरी म्हणून इतकं भारी वाटल ... ह्या प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद.
अशी कलम केलेली रोपे मालवण,
अशी कलम केलेली रोपे मालवण, सावंतवाडी, शिरोडा इथे कुठे मिळू शकतील का
Pages