माझं नाव भैरप्पा - एस. एल. भैरप्पा / अनुवाद : उमा कुलकर्णी

Submitted by चिनूक्स on 1 December, 2009 - 13:12
लेखकाच्या, किंवा कुठल्याही कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि त्याने घडवलेल्या कलाकृतीचा संबंध असतो का? बहुतेक असावा. सृजनशील कलावंताचं आयुष्य आणि त्याच्या कलाकृती यांतील नातं तसं अगम्य असतंच. पण त्या कलावंताच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे थोडेफार समजले की मग ती कलाकृती अधिकच भावते. पिकासोचं आयुष्य, त्याच्या बायका, त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया यांच्याबद्दल कळलं की त्याची चित्रं सोपी होतात. त्याच्या चित्रातले रंग, त्याने वापरलेली प्रतिकं त्याचे मनोव्यापार कळले की लगेच उलगडतात. वुडहाऊसच्या पुस्तकांत इन्कमटॅक्स ऑफिसरांची खिल्ली का उडवलेली असते, हे त्याने इंग्लंडातल्या प्राप्तिकराला कंटाळून अमेरिकेत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला, हे समजलं की कळतं. यहुदी मेन्युहिनचं आत्मचरित्र वाचलं की त्याचं संगीत उलगडत जातं. अ‍ॅगाथा ख्रिस्तीला स्फुरलेल्या रहस्यकथांतलं वातावरण, व्यक्तिरेखा तिच्या अफलातून आत्मचरित्रातून अधिक स्पष्ट होतात. आणि म्हणूनच कलाकारांची, लेखकांची आत्मचरित्रं वाचायला मजा येते.

कलाकृती वाचून वाचकांनी लेखकाच्या जीवनाविषयी ठोकताळे मांडत बसू नये म्हणूनही ही आत्मचरित्रं महत्त्वाची ठरतात. केवळ जीवनात घडलेल्या घटनांचाच त्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी उपयोग होत नसतो, तर या आधाराशिवायही सकस कलाकृतींचा जन्म होणं ही त्या कलाकाराच्या अस्सलपणाची खूण असते. आत्मचरित्र हे अस्सलपण वाचकांपर्यंत पोहोचवतात.

एस. एल. भैरप्पा हे प्रख्यात कानडी कादंबरीकार. ज्ञानपीठ पारितोषिकानं गौरवले गेलेले. राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले. 'माझं नाव भैरप्पा' हे या विलक्षण प्रतिभावान लेखकाचं आत्मचरित्र. मूळ कन्नड आत्मचरित्राचा सौ. उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केला आहे. भैरप्पांच्या अकरा कादंबर्‍या मराठीत आल्या आहेत. म्हणून त्यांचं हे आत्मचरित्र मराठीत येणं जसं स्वाभाविक आहे, तसंच वाचकांच्या साहित्यव्यवहारांच्या दृष्टीनं अत्यावश्यकही आहे.

भैरप्पांचं हे आत्मचरित्र अतिशय आरस्पानी आहे. जे घडलं ते सांगितलं आहे. घरची प्रचंड गरिबी, वडिलांचा बेजबाबदार स्वभाव आणि त्यामुळे आयुष्यभर त्यांच्याबद्दल असलेली अढी, लहानपणीच दोन भावांचा झालेला मृत्यू, मामानं केलेला छळ, आईचा अकाली मृत्यू, बहिणीची जबाबदारी, अर्धपोटी राहून घेतलेलं शिक्षण, लोकांकडून झालेली मानहानी, रात्री उपाशी पोटाला चुरमुरे खायला मिळावेत म्हणून केलेल्या असंख्य नोकर्‍या, साहित्याच्या प्रेमापोटी रस्त्यावर, बागेतल्या बाकड्यावर काढलेले दिवस आणि रात्री, गुजरातेतल्या, मैसूरच्या कॉलेजांतले अनुभव, प्राध्यापकी, संशोधन, तत्त्वज्ञानाचा अफाट अभ्यास, संगीताबद्दलचं प्रेम, रात्ररात्री जागवून ऐकलेल्या भीमसेनांच्या, गंगुबाई हनगळांच्या मैफिली, हितशत्रुंनी या सत्प्रवृत्त माणसाला दिलेला त्रास, लिहिलेल्या कादंबर्‍या, दिलेली व्याख्यानं.. एवढे पराकोटीचे भोग सोसूनही एखादं माणूस किती आलिप्तपणे, प्रागल्भ्याने आपल्या आयुष्याकडे बघतो, आणि हे खडतर, हलाखीचं जीवन जगत एकसे एक सुंदर साहित्यकृती निर्माण करतो, हे खरोखर विलक्षण आहे.

भैरप्पांचं हे आत्मचरित्र आणि त्यांच्या कादंबर्‍या मराठीत सौ. उमा कुलकर्णी यांनी आणल्या आहेत. त्यांनी केलेले सुंदर, सशक्त अनुवाद मराठी वाचकांनी उचलून धरले आहेत. भैरप्पा आणि त्यांच्या आत्मचरित्राविषयी बोलत आहेत सुप्रसिद्ध लेखिका सौ. उमा कुलकर्णी..



bhairappa.jpg


एस. एल. भैरप्पा यांच्या 'माझं नाव भैरप्पा' या आत्मचरित्रातली ही काही पानं...

------------------------------------------------------------------------------------

पावलोपावली आठवणारी 'गृहभंग'


बालपणीच्या आठवणी सांगायच्या म्हटलं की, पावलोपावली 'गृहभंग' आडवी येते. ’गृहभंग’ ही माझी एक कादंबरी. आमचं गाव, आई-वडील, महादेवय्या, अक्कय्या, रामण्णा, मी, आजी, धाकटा काका, बागूरचा मामा, रामपूरचे कल्लेगौडा ही सारी माणसं तिथं कादंबरीतली पात्रं होऊन आली आहेत.

बी. ए. ऑनर्ससाठी प्रवेश घेतल्यानंतर, वयाच्या विसाव्या वर्षी - म्हणजे चौपन्न साली - मी एकदा 'गृहभंग' च्या कथावस्तूवर कादंबरी लिहायचा प्रयत्न करून पाहिला होता. वीस पानं लिहून झाल्यावर पुढचं लेखन आपोआपच थांबलं. जे काही लिहिलं गेलं होतं, ते धड प्रामाणिक आठवणी नाहीत आणि धड कलात्मक लेखनही नव्हे, असं घेडगुजरी लेखन झालं होतं. त्यानंतर साहित्याचा मार्ग सोडून मी शुद्ध तत्त्वशास्त्राच्या अध्ययनात बुडून गेलो. नंतर पुन्हा साहित्याकडे वळून 'धर्मश्री', 'दूर सरिदरू', 'वंशवृक्ष', 'मतदान', 'तब्बलिनीनादे मगने' आणि 'जलपात' या कादंबर्‍या लिहून झाल्यानंतर अडुसष्ट साली, म्हणजे वयाच्या चौतिसाव्या वर्षी मी 'गृहभंग' लिहिली. माझ्या प्रमुख कादंबर्‍यांपैकी ती एक आहे.

आज या कादंबरीकडे वळून बघताना तिच्यातली पात्रं माझ्या वास्तव जीवनातली माणसंच आहेत काय, असा प्रश्न निर्माण होतो. माझ्या अमुक-अमुक कालखंडाचं हे चित्रण आहे, असं मी विधान केलं, तर काय होईल, या प्रश्नानं मला अनेकदा अस्वस्थ केलं आहे. विसाव्या वर्षी मी जसंच्या तसं वास्तव लिहायचा अयशस्वी प्रयत्न केला. रसाचं वंगण असेल, तरच लेखनाची गाडी पुढं जात राहील ना! चौतिसाव्या वर्षी मात्र त्याच घटना आणि व्यक्तींना 'कथावस्तू'मध्ये स्थान देऊन 'कलाकृती' साकार करण्याचं सामर्थ्य आलं होतं. प्रवाहातून वाहत जवळ येणार्‍या वास्तव घटनांपैकी हव्या त्या घटना हव्या त्या क्रमानं उचलून घेतल्या, नको त्या सोडून दिल्या. वास्तव कालखंड मागं-पुढं केला, आवश्यकता भासेल तिथं नवी पात्रं उभी केली... अशा प्रकारे नवं जगच उभं केलं. वास्तवातली सामग्री यथेच्छ वापरली असली, तरी वास्तवतेपासून अलग अशी एक 'ललित साहित्यकृती' झाली. आज त्या कालखंडाचा विचार करायला लागलो की, 'गृहभंग'मधलाच तपशील सामोरा येऊन आठवणींमध्ये आडवा ठाकतो. कितीतरी घटना स्पष्टपणे सर्व सामर्थ्यानिशी आठवत नाहीत. तरीही काही घटना इथं आठवून सांगत असताना कादंबरीतील अनेक प्रसंग कल्पित असल्याचं मला सुचवायचं आहे.

गावालगतच्या चढावर गंगाधरेश्वराचं मूळ-लिंग देवालय आहे. त्याच्या उत्सवमूर्तीचं देऊळ गावात होतं. दुरुस्ती न झाल्यामुळे पन्नास-पंचावन्नच्या सुमारास ते कोसळलं. अलीकडे तिथंच नवं देऊळ बांधायचा प्रयत्न चाललाय, असं कानावर आलंय.

याच देवळाशेजारी, साध्या भिंतीचं आणि देशी कौलांऐवजी नारळीच्या झावळ्या पांघरलेलं आमचं घर होतं. आजोबांच्या काळातली होती-नव्हती ती संपत्ती आजी आणि आमच्या तीर्थरूपांनी संपवल्यावर त्या जागी आईच्या खटपटीनं उभं राहिलेलं ते आमचं घर. शानभोगकी करून पोट भरणं हाच एक मार्ग होता. हिशोब लिहिता लिहिता आई जमेल तेव्हा पत्रावळी लावून आम्हांला सांभाळत होती. समोरच्या देवळाला आम्ही महादेवय्याचं देऊळ म्हणायचो. रोज संध्याकाळी तिथं महादेवय्यांबरोबर आमचे वडीलही गाणं म्हणायचे. मीही त्यात आपला आवाज मिसळायचो.

माझं नाव मी एस. एल. भैरप्पा लावतो. त्यातलं एस. म्हणजे संतेशिवर. एल. म्हणजे माझे तीर्थरूप लिंगण्णय्या. 'गृहभंग'मधील चन्निंगराय म्हणजे आमचे तीर्थरूपच! त्यांच्या संदर्भात 'गृहभंग'मध्ये आलेली एकही घटना काल्पनिक नाही. उलट, ज्यांना कादंबरीत स्थान मिळू शकलं नाही, अशा कितीतरी घटना आज मला आठवतात.

अशा नवर्‍याला सांभाळत, गरिबीतही मनाचं संतुलन ढळू न देता कुमार व्यासांच्या आणि जैमिनीच्या महाभारतावर विवेचन करताकरता मधूनच कधीतरी स्वत:ही एखादं गाणं लिहून आनंद मिळ्वणारी माझी आई फार मोठी होती. आम्ही तिला 'अम्मा' म्हणत होतो. अधूनमधून काही गावकरी - त्यांत स्त्रिया आणि पुरुषही असत - तिला भेटून मनातल्या सुखदु:खांच्या गोष्टी सांगत. तीही सारं ऐकून समाधानाच्या गोष्टी सांगे. त्या ऐकून ते शांतपणे आपापल्या घरी जात. अलीकडे कधी गावी गेलो की, तिचे समकालीन लोक आवर्जून भेटतात आणि म्हणतात, "गौरम्माच्या पुण्याईनंच तू एवढा मोठा झालास, बाबा! त्या माउलीची पुण्याई मोठी म्हणून गावात अजूनही वेळच्या वेळी पाऊस येतो, पिकं येतात!"

दु:खी जिवांना शांतवणारा जीव कुठल्याही काळी विरळाच!

दुष्काळ आणि प्लेगाचा हैदोस


गावात फक्त प्राथमिक शाळा होती. तिथलं शिक्षण झाल्यावर रामण्णाला नुग्गेळहळ्ळीला पाठवायला हवं होतं; पण दररोज आठ मैल चालण्याइतका तो सशक्त नव्हता. आईच्या माहेरी बागूरला अप्पर प्रायमरी शाळा होती. तिथून लोअर सेकंडरीची परीक्षा देणं शक्य होतं. के. एल. एस. म्हणजे कन्नड लोअर सेकंडरीची ही परीक्षा दिली की, प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरीही मिळायची.

आईनं रामण्णाला तिथं मामाच्या घरी पाठवलं. अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता की तीन, हे आठवत नाही. मुलगा मास्तर झाला की, दोन वेळच्या उकडीचा प्रश्न कायमचा सुटेल, असं तिला वाटत होतं. नाचणीची उकड हेच आमचं रोजचं अन्न होतं ना!

आईच्या भावाला, गुंडय्याला मुलं नव्हती; नंतरही झाली नाहीत. मामा आणि त्याची बायको सुब्बलक्ष्मी यांची पात्रं अगदी जशीच्या तशी 'गृहभंग'मध्ये आली आहेत. तिथं मामीचं नाव 'कमलू' आहे, एवढंच.

रामण्णा हुशार आणि अत्यंत मऊ स्वभावाचा मुलगा. त्याला मामा मरेस्तोवर बडवून काढायचा म्हणे. मुलांना छळायचा त्याला एखादा मानसिक रोग होता की काय कोण जाणे! बागूरच्या व्यंकम्मा, नुग्गेहळ्ळीच्या नरसिंहदेवाच्या जत्रेमध्ये आईला भेटल्या, तेव्हा म्हणाल्या, "गौरा, तुला मुलगा पोसायचं बळ नसेल, तर त्याच्या गळ्यात दगड बांधून गावाबाहेरच्या तळ्यात बुडवून ये! त्याचा जीव तरी सुखानं जाईल. त्या दुष्ट गुंडय्याची छळ करायची पद्धत बघून आळीतल्या बायाबापड्या टिपं गाळतात! मामाचा मार खाऊन एक दिवस लेकरू मरून जाईल बघ!"

लगेच दुसर्‍या दिवशी आई भाड्याची बैलगाडी घेऊन बगूरला गेली. तिनं आजूबाजूच्या घरांमध्येही चौकशी केली. सगळ्यांनी सांगितलं, "तू तुझ्या लेकराला इथून घेऊन जा. नाहीतर आमच्या आळीत त्याचं रक्त सांडेल."

आई मामाच्या घरी जाऊन म्हणाली, "फक्त के. एल. एस. होऊन काय करायचं? माझ्या मुलाला मी पुढं हायस्कूलमध्ये घालायचं म्हणते. नुग्गेहळ्ळीत वार लावून जेवेल तो."
"का? कुणा बाजारबसवीनं तुझे कान फुंकले काय?"
"माझ्या समजुतीप्रमाणे या आळीत कुणीही बाजारबसवी राहत नाही. मी माझ्या मुलाला इंग्लिश शाळेत घालणार म्हटल्यावर तू लोकांना का शिव्या देतोस?" आईनं लगोलग टी.सी. म्हणजे ट्रान्स्फर सर्टिफिकेट मिळवलं आणि त्याच बैलगाडीनं घरी परतली. वाटेत रामण्णा हुंदके देऊन रडत होता म्हणे.

त्यानंतर सकाळी नाचणीच्या दोन भाकरी खाऊन आणि दोन बरोबर घेऊन रामण्णा नुग्गेहळ्ळीच्या शाळेत पायी जाऊन येऊ लागला. ही सुमारे एक्केचाळीस-बेचाळीसची गोष्ट. दर हळूहळू वाढू लागले होते. अडतीस साली एका रुपयाला आठ शेर बारीक तांदूळ, दहा शेर जाडाभरडा तांदूळ किंवा अठरा ते वीस शेर नाचणी मिळत होती. पुढं एक्केचाळीस साली भारी तांदूळ रुपयाला पाच-सहा शेर मिळू लागला. त्यामुळे नोकरदार माणसं भिक्षा वाढताना किंवा वारानं गरीब विद्यार्थ्यांना जेवू घालताना हात आखडता घेऊ लागली होती. ज्यांची शेती होती, ते मात्र असा विचार मरत नव्हते. नुग्गेहळ्ळीमध्ये रामण्णासाठी माधुकरी म्हणजे वारान्न देणारी घरं शोधणं फारसं सोपं गेलं नाही. शिवाय रामण्णाचा स्वभावही संकोची असल्यामुळे अनोळखी घरात जेवणं त्याच्या स्वभावातही बसत नव्हतं. त्यामुळे दररोज पायी नुग्गेहळ्ळीला जाणं भाग होतं.

याच वेळी दुष्काळ पडला. खाण्याची कमतरता जाणवू लागली. आमची तर वीतभर आकाराची कुठं जमीनही नव्हती. दररोज सकाळी कुठून नाचणी मिळणार? तरीही रामण्णा शाळा न चुकवता उपासपोटी नुग्गेहळ्ळीला जायचा, मग संध्याकाळी येताना तोल जाऊन पडायचाही.

त्या वेळचा चार वर्षांचा दुष्काळ आणि दर दोन वर्षांनी येणारा प्लेग यांचा तपशील 'गृहभंग'मध्ये दिला आहे. त्यातच झालेलं अक्कय्याचं लग्न, लग्नात तीर्थरूपांनी केलेला हट्टीपणा, त्यांची समजूत काढण्यासाठी आई आणि कल्लेगौडांनी खटाटोप याविषयीही तिथं लिहिलं आहे. लग्न झाल्याझाल्या आमच्या घरात प्लेग शिरल्याचं, अक्कय्या आणि रामण्णा एकाच दिवशी दुपारी तीन तासांच्या अंतरानं मरण पावल्याचं आणि त्यातून मी कसाबसा वाचल्याचंही त्यात आलं आहे.

साधारणत: प्लेग उन्हाळ्यात यायचा. त्या वर्षी आमच्या घरातली वयात येणारी दोन मुलं आणि गावातल्या कितीतरी जिवांचा बळी गेल्यानंतर गावात आणि पंचक्रोशीत पाऊस पडला. इतका पाऊन पडला की, वळवाच्या पावसानंच गावचं तळं भरून वाहू लागलं. खाण्याचा प्रश्न लगोलग सुटला नसला, तरी पुढच्या वर्षी भरघोस पिकं येण्याची चिन्हं दिसू लागली. त्या वेळी मी नऊ वर्षांचा होतो. गावातल्या शाळेतलं शिक्षण संपलं होतं. नुग्गेहळ्ळीला दररोज पायी जायला माझी तयारी होती. आईनं माझं नाव शाळेत दाखल केलं होतं. गेली काही वर्षं मला दुष्काळामुळे पोहायला मिळालं नव्हतं. नव्यानं पाऊस झालेला. सगळी तळी तुडुंब भरलेली. सगळ्यांची नजर चुकवून मी याचनघाट आणि बेळगुलीच्या विहिरीत जमेल तेवढं पोहून घेत होतो.

नुग्गेहळ्ळीच्या शाळेत जायला सुरुवात केल्याच्या दुसर्‍याच दिवशी मी शाळेजवळच्या दगडांनी बांधून काढलेल्या कल्याणीत - छोट्या तळ्यात - उडी मारली आणि बरोबरीनं पोहणार्‍या सोळा-सतरा वर्षांच्या मुलांनाही मागं सारून मी डुंबत राहिलो. एवढ्यानं मन भरलं नाही, म्हणून संध्याकाळी नुग्गेहळ्ळीच्या मोठ्या तळ्यातही निम्म्यापर्यंत पोहून आलो. चार मैल चालून घरी येईपर्यंत डोकं कोरडं झालं होतं. वाटेत बेलगुली गावात एका घरी थोडं तेल मागून घेतलं, केस नीट विंचरले आणि घरी आलो. आईला काही समजणार नाही, अशी माझी अपेक्षा होती.

पण आठवडाभरात आईला सगळं समजलं. कुणीतरी तिच्यापाशी चुगली केली होती. मी वाद घातला, "एवढी का घाबरतेस? जमिनीवर चालताना कुणी घाबरतं का? तसंच हे. "
तिला हे पटलं नाही. ती म्हणाली, "जमिनीवरून चालताना कुणी मरत नाही. पाण्यात कितीतरी माणसं बुडून मरतात."
"त्यांना नीट पोहायला येत नाही, म्हणून ते बुडतात. मला जेवढं चांगलं पोहायला येतं, तेवढं माशांनाही येत नाही!" माझ्या वादाचा काहीही उपयोग झाला नाही. ती माझ्याकडून वचन घेऊ लागली. तिच्या डोक्यावर हात ठेवून घेतलेलं वचन मोडलं तर तिला 'काहीतरी' होणार, असा माझा विश्वास होता. 'काहीतरी' म्हणजे प्लेग! म्हणूनच मी तसं वचन दिलं नाही. ती खूप चिडली. तिला पोहण्यातून मिळणारा आनंद काय असतो, हे कुठून ठाऊक असणार?

'दानशूर कर्णा'चं दर्शन


त्याच वेळी आणखीही एक घटना घडली. नाटक, मेळे, त्यांतली गाणी यांचं केवळ मलाच नव्हे, आईलाही पराकोटीचं वेड होतं. जवळपास कुठल्याही गावात नाटकं असली की, गावातली चार माणसं निघायची, त्यांच्याबरोबर मीही जात असे.

एके दिवशी नुग्गेहळ्ळीला शाळेत गेलो. त्याच रात्री जवळच हिरेसावे गावात 'दानशूर कर्ण' नावाचं नाटक होतं. गुब्बी कंपनीवाले वीरभद्राचार्य हार्मोनियमवर असल्याचाही जाहिरातीत उल्लेख होता. गावी जाऊन सांगून येण्याइतका वेळ नव्हता. हिरेसावे-नुग्गेहळ्ळी आठ मैलांचं अंतर होतं. संतेशिवरला जाऊन सांगून यायचं म्हणजे आणखी चर मैल. म्हणजे एकूण बारा मैल चालावं लागणार. त्यामुळे नुग्गेहळ्ळीहून सोबत मिळताच मी नाटकाच्या ओढीने तिकडं चालू लागलो. वाटेत ती माणसं कुणाकडे तरी जेवली, मलाही त्यांच्याबरोबर जेवण मिळालं. नाटक पाहताना मन अद्भुत भावनेत रंगून गेलं होतं.

नाटक पाहून त्याच तंद्रीत सकाळी दहाच्या सुमारास गावात जाऊन पोहोचलो, तेव्हा आई घरात नव्हती. गावातला पट्टीच्या पोहणार्‍या नीलगंटी आणि ईरप्पा कोळ्याला सोबत घेऊन ती नुग्गेहळ्ळीचं तळं आणि शाळेजवळच्या कल्याणीमध्ये मला शोधायला गेली होती.

या सार्‍या घटना मी नुग्गेहळ्ळीच्या शाळेत प्रवेश घेतल्याच्या तीन आठवड्यांच्या आत घडल्या. हाताशी आलेली दोन मुलं गमावून नुकतेच कुठे तीन महिने होत असल्यामुळे आई विचारात पडली. ती माझ्यावर मुळीच रागावली नाही. शाळेचे हेडमास्तर आणि मादापूरचे गुंडप्पा यांच्याशी तिनं चर्चा केली. त्यांनी सांगितलं, "गौरम्मा, एक लक्षात घ्या, आई कितीही हुशार आणि सावध असली, तरी वाढत्या मुलावर बापाचा वचक पाहिजे. त्यातही मुलग्यांना, त्यातून हे तर अचाट काम आहे! मीही त्याच्याशी बोलून पाहिलं. 'पोहायला गेलो, म्हणून काय बिघडलं? हिरेसावेला गेलो, म्हणून काय झालं? मार्क्स कमी पडले, तर तुम्ही बोला,' म्हणून माझ्याशीही वाद घालत होता. याला बागूरला त्याच्या मामाकडे ठेवा. तो रामण्णाला मारायचा ना? त्याला तुम्ही सांगा, याला फक्त नजरेच्या धाकात ठेव म्हणावं. मामांनीही एका दिवशी दोन मुलं गेल्याचं पाहिलंय ना? त्यांचंही मन मऊ झालं असेलच. याला के. एल. एस. होऊ द्या. आम्ही नाही का कन्नड शाळेचे मास्तर होऊन जगत? किंवा तो थोडा मोठा आणि समजूतदार झाला की, इंग्लिश मिडल् स्कूललाही पाठवता येईल. के. एल. एस. झालेल्या मुलांना तिकडं एकदम दुसर्‍या वर्षी प्रवेश देतात."

आईनं निर्णय घेतला. मी कितीही हट्ट केला, तरी तिनं दाद दिली नाही. उलट तिनंच डोळ्यात पाणी आणून मला नरम केलं. वर गुंडप्पा मास्तरांचा उपदेश. शांतम्मा, रुद्रम्मा, रामक्का या सार्‍यांचं दडपण. घर सोडून पळून जाणं एवढंच माझ्या हातात राहिलं होतं.

शिवाय मीही विचार केला, बागूरमामाला एवढं घाबरायचं कारण नाही. मी काही मार खाऊन मुळूमुळू रडायला रामण्णा नाही! त्यानं हात उगारला तर.. तर बघून घेता येईल.

चार दिवसांनंतर मी मामाच्या घरी जायला तयार झालो. या वेळी आईनं मला रिकाम्या हातानं धाडलं नाही. दिव्यासाठी गाडगंभर एरंडेल तेल - शिकेकाई, हुलगे, मिरचीचं तिखट - असं जमेल ते सामान तिनं मामासमोर ठेवलं. "गेली चार वर्षं दुष्काळात गेली. यंदा पाऊस-पाणी भरपूर आहे. शाईची फी लोकांकडून मिळाल्यावर मी तुला खंडीभर नाचणी आणि इतर धान्य अर्धं पोतं आणून देईन."
"तुझ्याकडून धान्य घेऊन भाचरं सांभाळण्याइतकं दळिंदर आलं नाही या घराला!" तो जोरात म्हणाला.
"तसं नव्हे. माझी कुवत असताना तुला का सगळाच त्रास द्यायचा? त्याचं पोरवय सरेपर्यंत दोन वर्षं तू आणि वहिनींनी त्याला सांभाळून घेतलं तरी पुरे. तुला तो घाबरतो, पण मी त्याला समजावलंय, मामा काही उगाच मारणार नाही. तू नीट वागलास तर मामा तुला पेपरमिंट देईल. मामी कडबोळी करून देईल."

दुसर्‍या दिवशी आई-वडील आणि ललिता गावी परतले.

आईचं श्राद्ध


आईच्या श्राद्धाच्या तिथीच्या तीन दिवस आधी मी संतेशिवरला गेलो.
घरात पाऊल ताकताच आजीनं फडा काढला, "जन्मदात्रीचं श्राद्ध करणार आहेस की नाहीस?"
"त्यासाठी तर आलोय, आजी!"
"दोन दिवसांवर श्राद्ध आलंय! तू हात हलवत आलास, तर कसं चालेल?"
"गेल्या वर्षी मी आदल्या दिवशीच आलो होतो."
"अरे वा रे वा! म्हणे मुंज झालीय याची! थोबाड तर बघा मेल्याचं."

तिच्या पुढच्या बडबडीतून सगळा खुलासा झाला. तीर्थरूपांनी 'आईचं श्राद्ध ही मुलाची जबाबदारी असते. मी त्यासाठी एक पैही देणार नाही,' असं सांगून हात झटकले होते. मी पंचायत भरवून मुंजीसाठी त्यांच्याकडून पैसे वसूल केल्याचा राग त्यांच्या मनात होता. श्राद्ध होईपर्यंत ते परतणार नाहीत, हे तर स्पष्टच होतं.

माझ्या मनात धार्मिक गोंधळ सुरू झाला. दरवर्षी श्राद्ध करणं हा आईच्या बाबतीतलं कर्तव्य करण्याचा एकमेव मार्ग होता. दरवर्षी श्राद्धाच्या वेळी मंत्र ऐकून ऐकून आपण श्राद्ध केलं नाही, तर तिथं ती अन्नपाण्यावाचून तळमळत राहील, ही भावना भावविश्वात दृढ झाली होती. असेलनसेल ते सगळं मुलांना वाढून उपाशी राहणारी माझी आई! मी एवढा मोठा होऊन माझ्या आईला उपाशी राहावं लागलं तर! या पलीकडे दुसरा रौरव नरक तरी कुठला असणार? नुसत्या विचारांनीही डोळे भिजले. कृष्णमूर्तीही गेला. आणि तिला तीन पिंडांचं दान द्यायला फक्त माझेच हात राहिले आहेत.

कृष्णमूर्तीच्या आठवणींनी मन मृदू झालं. मी आजीला म्हटलं, "श्राद्धाचं सामान सांग. यादी लिहून घेतो." आजीचा हात काय विचारता! सणाच्या किंवा श्राद्धाच्या दिवशीची जेवणं झाल्यानंतर पुढं पंधरा दिवस शिल्लक राहील, एवढं पक्वान्न करायचं! दररोज दोन वेळा तेच शिळं अन्न खात राहायचं. अखेर बोट-बोटभर बुरा आला की, उकिरड्यावर फेकून द्यायचं. एवढं सगळं झालं नाही की, ती स्वत:च मारम्मासारखी धुमसत राहायची!

मी म्हटलं, "आजी, गावोगावी पायपीट करून मैसूरमध्ये शिकण्यासाठी म्हणून मी चार पैसे गोळा केले आहेत. श्राद्ध थोडक्यात आवरलं, तर चालणार नाही काय? सगळ्या नातेवाइकांना जेवायला घालणं मला शक्य नाही. त्याऐवजी फक्त ब्राह्मण-सवाष्णीचं सारं करू. सगळं मिळून दहा-पंधरा रुपयांत उरकू."
यावर आजी म्हणाली, "असं कर, सोमवारच्या जत्रेत जाऊन बोंब मारून सगळ्यांना सांग, माझी आई गौरमा नव्हे, बाजारबसवी होती, म्हणून! मेल्या रांडेच्या! पुन्हा असं बोललास, तर मी काही श्राद्धाचा स्वयंपाक करणार नाही बघ!"

तिच्या आरड्याओरड्याला दाद देण्याचा प्रश्नच नव्हता; पण मुंजीनंतर प्रथमच आईचं श्राद्ध करतोय, ते नीट व्हावं, असं मनात आलं आणि मी गप्प बसलो. बघताबघता पन्नास रुपयांचा खुर्दा उडाला. पंधरा वर्षांचा मुलगा श्राद्ध करतोय, याकडे अजिबात सहानुभूतीनं न पाहता सीताराम जोईस आणि त्यांचे बंधू तम्मा जोईस पोळीवर भरपूर तूप ओतून संतुष्ट झाले. अगदी आमचे तीर्थरूपही पूर्वपंक्तीचे ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळी तळ्यात अंघोळ करून ओली लुंगी लावून हजर झाले. पूर्वपंक्तीच्या ब्राह्मणांना वाढलं त्याच प्रमाणात वाढलेलं. तीन हात लांबीच्या दोन केळीच्या पानांनर गोपुराप्रमाणे ढिगानं वाढलेले वडे, आंबोडे, पाकातल्या पुर्‍या, पोळ्या, मोठा द्रोणभर तूप, वरणभात - देवाच्या नैवेद्यासाठी वाढलेल्या पानावर त्यांचाच हक्क असे. आताही तोच हक्क प्रस्थापित करण्यासाठी ते आले होते. लगेच तम्मा जोईसांनीही त्यांचं स्वागत करत म्हटलं, "ये बाबा, ये! बायकोच्या श्राद्धाच्या दिवशी देवाच्या नैवेद्यावर आणखी कुणाचा हक्क असणार?"

सारं करून मी जेवायला बसलो, तेव्हा अन्नावरची वासना उडाली होती. यानंतर तीन दिवसांत मैसूरला जायला पाहिजे. तेवढ्या अवधीत पन्नास रुपये जमवणं शक्य नाही. अंगावरच्या शर्ट-लुंगीशिवाय दुसरा धड कपडा नाही. आता मैसूरला जाऊन शिकणं शक्य नाही. मुलाच्या शिक्षणावर धोंडा पाडून केलेल्या असल्या श्राद्धामुळे माझ्या आईच्या आत्म्याला तरी शांती मिळेल काय?

पैशाची जमवाजमव


मनातला गोंधळ व्यक्त करायचा म्हटलं, तर तिथं कोणीच नव्हतं. जोईसांपैकी कुणापुढे तरी बोलणं म्हणजे परंपरेनं चालत आलेल्या धार्मिक विधींना झुकतं माप देणं. दुसर्‍या दिवशी मी राजाशी बोललो. तो म्हणाला, "काही तरी करून तू वीस रुपये जमव. मैसूरला गेल्यावर बाकीचे पैसे कर्जाऊ मिळवून देईन. मैसूरमध्ये तशी व्यवस्था होऊ शकेल."

आणखी चार दिवसांत मैसूरला जाणं भाग होतं. दुसरा मार्ग न सुचल्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो, थोडा श्राद्धाचा प्रसाद घेतला आणि रामपूरची वाट धरली. आईचा प्रसाद देताच कल्लेगौडा, केरगम्मा आणि चिक्कमानं डोळ्यांना लावून त्याचा आदरानं स्वीकार केला. शिक्षणासाठी मैसूरला जायचा विचार व जमवलेल्या पन्नास रुपयांची आजीनं लावलेली वाट यांविषयी सारं ऐकल्यावर ते म्हणाले, "तुझ्या आजीचं हे नेहमीचंच आहे; पण श्राद्धासाठी खर्च झाला, म्हणून मन:स्ताप करून घेऊ नकोस, पोरा! पुढच्या वर्षी आजीच्या तावडीत सापडू नकोस. ज्या गावात असशील, त्या गावात थोडक्यात श्राद्ध करून मोकळा हो."

गावात एकोणीस रुपये जमल्यावर त्यात स्वत:चे दोन रुपये घालून त्यांनी एकवीस रुपये माझ्या हातावर ठेवले. दुपारी त्यांच्या स्वयंपाकघरात जेवून बाहेर पडलो. पश्चिमेकडचं रंगनगुद्ड टेकाड ओलांडून कामनायकनहळ्ळीला गेलो. तिथली सारी वस्ती धनगरांची होती. इथले पुजारी नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना अध्यात्माची आवड होती. ते सतत एकतारी घेऊन तासन् तास देवाची भजनं म्हणत बसायचे. त्यांनी बाजारातून आणलेली भजनाची पुस्तकं वाचायला मी त्यांना मदत केली होती. लहानपणी महादेवय्यांकडून शिकायला मिळाल्यामुळे त्या भजनांमधील पक्षी, घोडा, दोरा यांचे सांकेतिक अर्थ मी त्यांना सांगू शकत होतो.

मला पाहताच पुजार्‍यांना फार आनंद झाला. माझी विचारपूस करताच मी त्यांना सारं सांगितलं. तेही 'या जगात शिवशंकर आहे. काही काळजी करू नका,' असं सांगून पुन्हा एकतारी घेऊन भजनं म्हणू लागले. मी त्यांच्या सुरात सूर मिसळला. तासभर भजन झाल्यावर ते आपल्या घरी जाऊन जेवून आले. नंतरही पहाटेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्यावेळीही ते अध्यात्माविषयीच बोलत होते.

सकाळी उठल्यावर ते मला वस्तीवरच्या प्रत्येक घरी घेऊन गेले आणि प्रत्येकाला 'शिकणारा मुलगा आहे, याला काही तरी मदत करा', म्हणून सांगू लागले. आम्ही संध्याकाळपर्यंत फिरत होतो. कुणी नाही म्हटलं की, ते म्हणायचे, "खोटं नाही म्हणू नये. शिवशंकर खरोखरच तसं करेल. तुमची जीभ जे बोलते, त्याला वास्तुपुरुष अस्तु अस्तु म्हणत असतो."

गोळा झालेले सारे नारळ दुकानात विकून त्यांनी माझ्या हातात बारा रुपये ठेवले. रात्री तिथंच मुक्काम करून मी पहाटे संतेशिवराकडे धाव घेतली.

चन्नरायपट्टणच्या शाळेचे हेडमास्तर कृष्णा ट्रान्स्फर सर्टिफिकेट द्यायला टाळाटाळ करू लागले. ते संतापानं म्हणाले, "का? या शाळेला काय झालं? तुला इथंच राहून शिकलं पाहिजे. मोठ्या शहरात मुलं बिघडण्याची फार शक्यता असते. त्यात तुला तर कुणीच विचारणारं नाही. तू बिघडायला म्हणून मैसूरला जाणार का? तिथं कोण आहे? काय करणार आहेस तिथं? तू तर कधी मैसूर पाहिलंही नाहीस."

मी त्यांना राजाचा संदर्भ सांगितला.
"म्हणजे सगळा पोरासोरांचाच मामला दिसतोय! हे चालायचं नाही. त्याच्या वडिलांना येऊ दे आणि त्यांना तुझी जबाबदारी घेऊ दे." मग त्यांनी आणखी एक मुद्दा काढला, "ठीक आहे. तुझे पालक कोण? वडील कोण? त्या दोघांपैकी कुणीतरी येऊन सही करायला पाहिजे. मी मुलांच्या हातात टी. सी. देणार नाही."
"पण सर, प्रवेश देताना कुणाही पालकाची सही तुम्ही मागितली नव्हती. मला कुणी नाही, हे ठाऊक असून का आता सहीचा आग्रह धरता?"
त्यांना राग आला. "गुरुच्या पुढ्यात उभा राहून वकिली मुद्दे काढतोस? यू गेट आउट!"
मीही धीटपणे म्हटलं, "टी. सी. मिळेपर्यंत जाणार नाही सर."
"अस्सं! कॅरेक्टरच्या कॊलममध्ये नॉट-सॅटिस्फॅक्टरी म्हणून शेरा मारेन. मग काय होईल ठाऊक आहे? कुठल्याही हायस्कूलमध्ये प्रवेश मिळणार नाही. कुठल्याही ऑफिसात चपराशाचीही नोकरी मिळणार नाही", असं म्हणत त्यांनी खादीच्या शर्टाच्या खिशातून पेन काढले.

टी. सी. मिळवण्यासाठी...


मी घाबरलो, रागही आला. आता जास्त काही बोललं, तर सगळंच बिघडून जाईल; तसाच उभा राहिलो, तर आणखी शिव्या खाव्या लागतील, हे जाणलं आणि तिथून बाहेर पडलो. माझी वाट पाहत असलेल्या राजाला सारं सांगितलं. तो म्हणाला, "मलाही टी. सी. देताना असाच त्रास दिला होता. माझ्या वडिलांनी दम दिला, 'तसं लेखी द्या. तुमच्या वरिष्ठांना भेटून काय करायचं ते करेन,' असं सांगितलं, तेव्हा कुठं त्यानं टी. सी. दिलं. तूही कुणातरी मोठ्या माणसाला घेऊन ये, म्हणजे देईल कुले झाकून."

कुणाला घेऊन यायचं? काही सुचेना. नारायणगौडाकडे धाव घेतली. तिथून दोघेही हॉटेलवाल्या भट्टांकडे गेलो. त्यांनी उपाय सुचवला. टाउन-म्युनिसिपल अध्यक्ष असलेल्या शिंगप्पांशी हेडमास्तरांचं हाडवैर होतं. शिंगप्पा हेडमास्तरांवर प्रहार करायची संधीच शोधत असायचे. त्यांच्या करवी हे काम होणं सहज शक्य असल्याचं भट्टांनी सांगितलं.

मी आणि नारायणगौडा शिंगप्पांकडे गेलो. नारायणगौडानं त्यांना सारी हकीकत सांगितली. सारं ऐकल्यावर त्यांनी समोर बसलेल्या आपल्या एका पुढारी-वेशातल्या चेल्याला सांगितलं, "या पोराबरोबर तू जा आणि म्हणावं, शिंगप्पांनी सांगितलंय, 'मुकाट्यानं कुले झाकून टी. सी. दे. शिंगप्पा याचे पालक आहेत म्हणावं! आणि कॅरेक्टरच्या कॊलममध्ये वेडंवाकडं लिहिलं तर लुंगी जाग्यावर ठेवणार नाय म्हणावं."
"तुम्हीही चला शिंगप्पा", तो म्हणाला.
"चल", म्हणत पायांत पंपशू चढवले. त्यांनी हेडमास्तरांच्या ऑफिसात पाय ठेवताच हेडमास्तर स्वत: घाबरे होऊन उठत म्हणाले, "काय हे! स्वत प्रेसिडेंटसाहेब कसे काय आले?"
"हे आमचं पोर आहे. मीच याचा पालक आहे. तू कॅरेक्टर नॉट शाटिस्फाइड म्हणून लिहायला निघालास म्हणं! तेच विचारायला आलोय. आधीच तुमच्या पार्टीच्या लोकांनी शाळेचा सत्यानाश केलाय."
कृष्णासर घाईघाईनं त्यांना आवरत म्हणाले, "त्यासाठी तुम्ही कशाला आलात? निरोप आठवला असता, तरी काम केलं असतं आम्ही!"

शिंगप्पा कुठंही उभे राहून माय-बापांचा उद्धार करू शकतात, हे ठाऊक असल्यामुळे कृष्णामास्तरांनी अजिबात वेळ न घालवता टी. सी. तयार करून घेऊन स्वत: सही केली, आवश्यक तिथं माझी सही घेतली. मी त्यावर नजर फिरवत असताना शिंगप्पांनी सांगितलं, "वाचायचं काय त्यात? तिकडं गेल्यावर काही तक्रार आली, तर आपल्याला एक कार्ड टाकायचं! मी बघून घेईन या शिंदळीच्याला."

मी आणि राजा लगोलग योगानरसिंह मोटार सर्व्हिसची गाडी पकडून तत्परतेनं मैसूरला रवाना झालो.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

माझं नाव भैरप्पा

एस. एल. भैरप्पा
अनुवाद : उमा कुलकर्णी

राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या - ४४६
किंमत - रुपये २५०
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही रे चिन्मय, पुस्तक परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. तो ऑडिओ ऐकायचाय अजून.
रुनीला अनुमोदन. तू प्रस्तावना मस्त लिहिली आहेस. आवडली.

वाचता वाचता कधी संपलं कळलच नाही. आणि संपल्यावर अरे, संपलं सुद्धा? अशी हूरहूर लागली.
आता पुस्तक वाचण्याशिवाय पर्यायच नाही. Happy

पुस्तक सुंदरच आहे.
ओळखही छान करून दिली आहे!

एवढे पराकोटीचे भोग सोसूनही एखादं माणूस किती आलिप्तपणे, प्रागल्भ्याने आपल्या आयुष्याकडे बघतो, आणि हे खडतर, हलाखीचं जीवन जगत एकसे एक सुंदर साहित्यकृती निर्माण करतो, हे खरोखर विलक्षण आहे.
हे मत पटले, खरोखर विलक्षण आहे...
पुस्तक नक्की वाचाच असे म्हणेन!

I have read almost all novels by Bhyrrapa transalted in Marathi and bilieve me all of his works is best. Avaran however is the best. What shall I say. No words, Absolutely no words. I feel that every Indian must read it.

I am not good at marathi typing so I have used English. Excuse me for that. Next I will type in Marathi (Devnagari).