स्वगत

Submitted by प्रकाश घाटपांडे on 23 November, 2021 - 09:35

''दांडेकरांच्या राज्यात होळकरांची फौज आल्यावर कस काय व्हायचं?`` असा प्रश्न एकानं थोडं चिंतातूर होउन विचारल्यावर त्याला दुसरा म्हणाला, ''अरे त्यात काय? इथंच सोय झाल्यावर बाहेर धुंडत बसायला नको. साली पन साहेब लोकांची मज्जा !`` 'हित कशाला चांगल्या घरातल्या पोरीबाळी येताहेत. अहो इथं तसल्याच बाया येणारं. एकीकडं हे बी चालू दुसरीकडे नोकरी बी चालू` पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन.
शिव्यांना ओव्या समजणाऱ्या संस्कृतीत स्त्रिया कशा रुजणार? अशी चिंता काही वर्गाला पडली होती. पुलंच्या रावसाहेब या व्यक्तीचित्रणात रांगड प्रेम व्यक्त करताना शिव्यांचा आधार घेतला नाही तर रावसाहेबांना मोकळ मोकळं वाटतंच नाही. त्यांच कुत्र देखील जिम्या भडव्या म्हणल्याशिवाय ढिम्म हलत नाही. बाईमाणूस असताना शिव्या देउ नये हा संकेत मोडल्यानंतर दिलगिरी व्यक्त करताना देखील शिव्यांचाच आधार. 'च्यायला कितीबी केलं तरी आमच्या तोंडाची गांड होतेच. स्वारी बरं का ताई`. नवीन भरती झालेल्या थोडया आधुनिक मुलींना हे सर्व संकोचदायक वाटतं. एकदा एक वयस्क हवालदार फोनवर आपला राग व्यक्त करताना संभाषणात नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीच्या नावे शिवीगाळ करत होता. जवळ एक आधुनिक स्वरुपाची नवीन महिला पोलीस होती. तिच्या अस्तित्वाचे त्या हवालदाराला भान नव्हते. नंतर या बाबत तक्रार करण्याचा विचार त्या महिला पोलीसाने इतरांशी बोलून दाखवला. ही बाब कायद्यातील लैंगिक छळाच्या व्याखेत बसत होती. कामाच्या ठिकाणी सहकारी महिलेला लज्जा व संकोच निर्माण होईल असे कोणतेही वर्तन. त्याचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी बाई तुम्ही माझ्या मुलीसारख्या असे म्हणून दिलगीरी व्यक्त केली. बाईने ठरवलं असतं तर हवालदाराच्या नोकरीवर गदा आणण्याची परिस्थिती ती निर्माण करु शकत होती. पण हवालदार ही एरवी एक चांगला माणूस होता.
मुंबईत भाउचा धक्का आहे. तिथे समुद्रात पोलीसांची गस्त घालणाऱ्या काही होडया आहेत. तिथे जवळ समुद्रात एक टेकडी पण आहे. तिला स्थानिक लोक छिनाल टेकडी म्हणतात. एक होडी त्या टेकडीजवळ गस्त घालत होती. तेथील झोनच्या प्रमुख एक महिला अधिकारी होत्या. त्यांनी या होडीला बिनतारी यंत्रणेवर आत्ताच्या गस्तीचे ठिकाण विचारले. तेथील पुरुष ऑपरेटरची ततपप झाली. बाईसमोर छिनाल शब्द कसा उच्चारायचा. तो अप्रत्यक्ष रित्या ते ठिकाण सांगायचा प्रयत्न करु लागला. त्यामुळे तो खोटं तर बोलत नाही ना अशी शंका त्या बाईंना आली आणि त्या मला एक्झॅट लोकेशन हवं आहे असा आग्रह धरु लागल्या. शेवटी त्यांच्या एका सुजाण सहकाऱ्याने हळूच वस्तुस्थिती सांगून ऑपरेटरची कुचंबणा दूर केली.
जगातल्या सर्व शिव्यांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे लैंगिकता. शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच. रोष, नाराजी, राग, अगतिकता व्यक्त करण्यासाठी या ओव्यांचा वापर करण्याची परंपरा खूप जुनी आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही या अवस्थेतून बेडा पार करण्यासाठी या ओव्यांचा आधार घ्यावा लागतो. खात्यांतर्गत शिस्त म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार या दु:खावर फुंकर घालण्यासाठी या ओव्या सासुरवाशिणीला जात्यावर दळायला हलक्या करणाऱ्या ओव्यांइतक्याच महत्वाची भूमिका पार पाडतात. या ओव्यांना पांढरपेशा साहित्यात स्थान नाही. पण दलितसाहित्यात या ओव्यांच महत्व अनन्य साधारण आहे. तिथं या ओव्यांना प्रतिशब्द नाही. पर्यायी शब्द वापरले तर आशयहानी होते. 'पोटाला नाही आटा अन म्हनं चोटाला उटण वाटा`. इथं तर अश्लीलताही ओशाळून जाते.
एरवी अतिशय बिनधास्त असणारा पुरुष वर्ग बाईनं काही भलतेसलते आरोप केले तर आपली नोकरी धोक्यात यायची म्हणून बाईशी दबकून वागत असतो. उंदराला खेळवणाऱ्या मांजराप्रमाणे एखादी बाई कधी नरडीचा घेाट घेईल काही सांगता येत नाही. जास्त हुशारी करशील तर एका लेखणीच्या फटक्यात खलास करण्याचे स्त्रीत्वाचे अस्त्र राखून ठेवलेले असते. 'कसे पैशे देत नाही भाडया तेच बघते? आंड पिळून पैशे घेईन म्हणावं!` असं म्हणणाऱ्या चतुर्थ श्रेणी वर्गातील बाई देखील बघायला मिळते. अशा बायांसमोर पुरुषच लाजतात आणि त्या बाईची एक दहशत तयार होते.पण अशा बाया अपवादात्मकचं.
बाईचं बाईपण हे पुरुषाच्या माणूसपणाच्या मर्यादेत उघडं पडलं तर प्रश्न निर्माण होत नाहीत. परंतु या मर्यादंाची व्याप्ती आणि संकोच हे इतकं परस्पर सापेक्ष आहे की त्यात अमूक एक चौकट ही योग्य किंवा अयोग्य ठरवणे अवघड असते. माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात.
सायबांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून कधी बी जाउ नये कवा लाथ बसनं हे सांगता येत नाही. आता यात सायबाचा अवमान आहे की गाढवाचा सन्मान आहे हे मात्र मला अद्याप समजले नाही. हे प्रश्न दोघांनाही पडत नसावेत. पण या मानसिकतेत वाढलेला एखादा बुजर्ग आपल्या नवीन सहकाऱ्याला 'साहेबांनी रेडा एका शेर देतो असे म्हणल्यावर आपण सव्वाशेर दूध देतो असे म्हणावे` हा सल्ला मात्र आवर्जून देतो.
सरकारी कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृह ही खरं तर अस्वच्छतागृहच. मुताऱ्यांमध्ये विटकरींचे तुकडे, गुटक्याचे पाउच, तंबाखूचे विडे, सिगारेटची थोटके यामुळे मुताऱ्या तुंबलेल्या असतात. गळक्या नळातून पाणी सतत वहात असणे अथवा अजिबात पाणी नसणे. लाईट कायम जळत असणे अथवा अजिबात लाईट नसणे.संडासचे दरवाजे,कडया व्यवस्थित लागत नसतात. सफाई नियमितपणे होत नाही. सफाई करण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध नसते. उपलब्ध असली तरी उपयुक्त नसते. काही ठिकाणी प्रशासकांचा वचकचं नसतो. सफाई कामगारांना इतर खाजगी कामांसाठी वापरलं जातं. मग ते काय सफाई करणार? अमेरिकेत स्वच्छतागृहांना म्हणे रेस्टरुम म्हणतात. इथे मात्र ही रेस्टलेस रुम असतात. सार्वजनिक स्वच्छतागृह हे तर खरे समाजमनाचे आरसेच. व्यक्तिगत स्वच्छतेबाबत आग्रही असणारी माणसं ही सार्वजनिक स्वच्छतेबाबत मात्र उदासीन असतात.
इथं केवळ शरीरातल्या मलमूत्राचं विसर्जन होत नाही तर मनातल्या कचऱ्याचही विसर्जन होतं. कचरा इथं साहित्यसंपदा बनतो. कधी चित्ररुपाने तर कधी शब्दरुपाने. एखादी अघळपघळ वा पुरुषांना अपील होणारी बाई, तिच्या विषयी लैंगिक कल्पनाविष्कार, कुणाची लफडी, साहेबाविषयी शिव्या इ विषयांचा हा खुला मंचच भिंतींवर चितारलेला असतो. लैंगिक भावनांच दमन वा शमन वा उद्दीपन करण्याच हे ठिकाणंच.
अशाप्रकारचे खुले मंच इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. इथे अभिव्यक्तिला मर्यादाच नसतात.सर्जनशील प्रतिभा इथही बघायला मिळते. सामाजिक बंधन, रुढी परंपरा, संस्कार यात जखडलेल्या विचारांना उसंत घेण्यासाठी खुला मंच दुसरीकडे कुठे मिळणार? त्यात तुम्ही घुसमटल्यावर तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला इथंच येणार. समाजात हे बुरखे काढून तुम्ही जगायला लागलात तर समाज तुम्हाला वाळीत टाकील. दुर्जन, समाजद्रोही, कलंकित ठरवेल. तुमची इच्छा असो वा नसो समाजात तुम्हाला हे बुरखे पांघरावेच लागतात. बुरख्यांच्या पारदर्शकतेच्या घनतेचे प्रमाण फार तर कमी अधिक होईल. पण बुरखे ते बुरखेच. पण या दुनियेत मात्र तुम्हाला अस्तित्व आहे पण चेहरा नाही. कुणी ओळखण्याची भीती नाही, संकोच नाही. नंगेसे तो खुदाभी डरता है ! न जाणो इथ स्वार्थासाठी खुदालाही वेठीस धरणाऱ्या संभवित, प्रतिष्ठित माणसांचा खरा चेहरा पाहण्यासाठी खुदालाही याव लागत असेल. नाहीतरी निर्गुण, निराकार, सर्वव्यापी म्हणून त्याचं अस्तित्व तिथं असेलच की! चेहरा नसला तरी अस्तित्वांचा वर्गकलह येथेही दिसून येतो. इथल्या तंतरलेल्या मैत्रबनात आपल्याला भावनिक, बौद्धिक, लैंगिक तृष्णा ही शमवण्याचे मार्गही उपलब्ध आहेत. शेवटी समाधान ही बाब पुन्हा मानसिकच आहे.
कृष्णानं केल्या तर त्या लीला आणि आम्ही केला तर तो लंपटपणा काय? देव पितात तो सोमरस आणि दानव पितात ती दारु काय? पण मानव तर देव आणि दानव या संकल्पनांच मिश्रण आहे. त्यानं तत्सम काही प्यालं तरी ती दारुच ! आमचं वाङ्मय अश्लील आणि भर्तृहरी आणि कालिदासाचं वाङ्मय मात्र शृंगारिक काय? त्यांनी केली ती कामक्रीडा आणि आम्ही केली तर मात्र ते चाळे. त्यांच्या नजरेत कामविव्हलता आणि आमच्या नजरेत मात्र वखवखलेपणा काय? कुठली प्रकृती अन् कुठली विकृती? खरं तर जी प्रकृती समाजमान्य नाही ती विकृती. पण त्यामागच्या प्रेरणा तर नैसर्गिकच असतात ना! म्हणजेच विकृती ही स्थल,काल,समाज सापेक्ष आहे. बोंबलाच्या वासाने शाकाहारी माणसाची असलेली भूक नाहीशी होणं, मळमळ वाटणे ही देखील प्रकृती आणि त्याच वासाने बोंबील आवडणाऱ्या मांसाहारी व्यक्तीत लाळ गळे पर्यंत भूक निर्माण होणे ही देखील प्रकृतीच. वासं एकचं आहे पण प्रतिसाद भिन्न आहेत. एकासाठी आनंद तर दुसऱ्यासाठी दु:ख. एकाचं अन्न हे दुसऱ्याचं विष असेल तर सहजीवन अशक्य. दोघेही माणसंच आहेत पण संस्कार भिन्न असल्याने रुची देखील भिन्नपणे विकसित होत गेली. चिनी खाद्य हे 'चायनीज् फूड` म्हणून अल्पवधीत लोकप्रिय का झाले? भारतात काय विविध पाककलाकृती संपल्या की काय? एरवी झुरळांच लोणचं, भरल्या वांग्यासारखा भरला साप, बेडकाची तंगडी फ्राय अशा कल्पना असलेलं चायनीज फूड भारतात वेगळचं रुप घेउन आलं आणि रसिक खादाडांच्या पोटाचा कब्जा घेतला. रुचीचा आस्वाद ही सुद्धा एक संपन्न होणारी प्रक्रिया आहे. सुरवातीला गोमूत्रासारखी लागणारी बिअर ही नंतर अमृतासमान वाटायला लागते. कारण तशी ती वाटली नाही तर गाढवाला गुळाची चव काय? हा शिक्का बसायची भीती. त्यामुळे तुमच्या चवीत आपोआप बदल होत असतो. तसं चायनीज फूडला तोंड वेंगाडणारी लोक आपोआप लाळ गाळू लागली आणि चायनीच रेस्टॉरंटची संख्या वाढली. एरवी घरच्या जेवणाची सोय नाही म्हणून अपरिहार्यपणे हॉटेलमध्ये जाणारी माणसं ही रुचीपालट म्हणून हॉटेलमध्ये जाउ लागली. त्याला प्रतिष्ठा मिळाली.
पण लैंगिक भूकेबद्दल काय? लैंगिकतची भूक ही अपरिहार्य आहे काय? अवाजवी आहे काय? ती शमली नाही तरी जगता येते ना? असे कितीतरी प्रश्न उपस्थित होत असले तरी ती नैसर्गिक आहे एवढे तरी आता मान्य करावे लागते. पण तिच्यातला रुची पालट हा मात्र नैतिकतेशी जोडला आहे. त्याला प्रतिष्ठा नाही. त्याला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अनितीमान समजले जाते. हस्तमैथुन हा लैंगिक अविष्कार आत्ताशी कुठं समाजमान्यतेच्या प्रतिक्षायादीत आहे. एकेकाळी याची चर्चा करणं हे शिष्टसंमत मानले जात नसे. लैंगिक शिक्षणामुळे त्याचा अंतर्भाव अपरिहार्य बनला आहे. काही ठिकाणी त्याला अजूनही स्वीकारलेले नाही. मग त्याविषयीच्या अज्ञान व भीतीमुळे भेांदू वैद्यांचे चांगलेच फावते. लैंगिकता ही मानसिकता असल्याने समलिंगी संबंधांना काही देशात कायदेशीर मान्यता द्यावी लागली आहे. एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मग कुणी भूतकाळात रममाण होतं तर कुणी भविष्यकाळातल्या स्वप्नरंजनात. येणारा प्रत्येक क्षण वर्तमान म्हणता म्हणता भूतकाळात जमा होत असतो. निसटणारे तारुण्य मुठीत पकडण्याची धडपड चालूच रहाते. शरीराने नाही तरी मनाने तरुण होण्याचा मार्ग हवाहवासा वाटतो. 'बालपणं उतू गेले, तारुण्यही नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर` असे म्हणणारी माणसंही दिसतात. 'संध्याछाया भिवविती हृदया` कुणाला तरी खुणावणारा काळ कुणाला तरी भिती दाखवत असतो. कुणाला तरी खायला बनलेला काळ कुणाच्या तरी भुईला भार बनत असतो. काळाने आपल्याला ओढून न्यावं म्हणून तिष्ठत बसणाऱ्यांच्या वाटेला न जाता भलत्यालाच नेउन तो अनेकांना अचंबित करतो. काळाच्या उदरात काय दडलयं याची उत्सुकता ही प्रत्येकाला असतेच. त्याचा शोध आपापल्या परीनं प्रत्येक जण करत असतो. 'कालं विघ्नेन योजयेत ।` आणि 'आशां कालवती कुर्यात ।` या द्विसूत्रीवर तर फलज्योतिष टिकून आहे. शास्त्र असो अथवा नसो. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत. काळ हा त्याचं दु:ख हलकं करतो. आशेच्या वारुवर स्वार झाले की काळ किती गेला हे समजतच नाही. कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का?

(पुर्वप्रसिद्धी- 'पुरुषस्पंदन' दिवाळी -२००५)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखाशी सहमत.
**जगातल्या सर्व शिव्यांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे लैंगिकता. शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच
>>+१११

लेख आवडला.

जगातल्या सर्व शिव्यांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे लैंगिकता. >>>>>>>+१.

कुमार1 यांच्या लैंगिक वाङ्मय : स्वानुभव आणि स्थित्यंतरे या लेखावरील प्रतिसाद पाहिल्यावर मला हे स्वगत इथे टाकावेसे वाटले.

पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन.>> माफ करा सर. पण ग्रामीण भागातल्या लेकी आपल्या पायावर उभे रहावे यासाठी धडपताहेत, पोलीसात का असेना पण नोकरी मिळावी म्हणुन कष्ट करताहेत. त्यांचं कौतुक करायचं सोडुन तुमच्या मनात अशी स्पंदन उमटत असतील तर अवघड आहे.

मला वाटतेय ती त्यांची स्पंदने नसून त्यावेळची भोवतालच्या काहीजणांची ऐकलेली आहेत कारण ते स्वतः पोलीस खात्यात होते.

त्यांचं कौतुक करायचं सोडुन तुमच्या मनात अशी स्पंदन उमटत असतील तर अवघड आहे.>>>>> लेख वाचल्यावरही वाचकांपर्यंत स्पंदनचा हा अर्थ पोहोचत असेल तर अवघड आहे. असो. जिद्दू यांचे स्पंदनचे आकलन योग्य आहे

अहो पोलीस खात्यात होते तर फटकवायचे ना त्यांना. पोलीस खात्यातील व्यक्ती मायबोलीसारख्या मंचावर असे लिहित असेल तर मग फारच अवघड आहे.

पोलीसात का असेना पण नोकरी मिळावी म्हणुन कष्ट करताहेत. ........पोलिसातच नोकरी मिळावी म्हणून दहावी नंतर त्या दृष्टीने शिक्षण घेणाऱ्या मुली पाहिल्या आहेत.

पोलिस खात्यात अनेक विभाग आहेत,संवर्ग आहेत. बारा बलुतेदारी सारखा गावगाडा आहे. तिथे याच समाजातील माणसे आलेली असतात. हा लेख "पुरुषस्पंदन" या अंकासाठी लिहिला होता. पुरुषी मानसिकता, लैंगिकता याविषयी असलेली खात्यांतर्गत पुरुषी स्पंदनावर हे ललित आहे.पोलिस, तलाठी, राजकारणी, नट म्हटल्यावर काही लोकांच्या मनात साचेबद्ध सरासरी प्रतिमा तयार झालेल्या असतात. त्याला छेद गेला की वाचक गडबडून जातो. लेखातील आशयमूल्यावर चर्चा होण्या ऐवजी मुद्दे भलतीकडेच भरकटतात. शेवटी लेखकाच्या प्रतिभेच्या मर्यादा असतात तशा वाचकांच्याही आकलनाच्या मर्यादा असतात. पण लेखकाला अभिप्रेत असलेला आशय जर बहुसंख्य व प्रगल्भ वाचकांना तसा पोहोचत नसेल तर ती लेखकाची मर्यादा आहे असे मी मानतो. मतभेद होउ शकतात. वाचकाला न वाचण्याचे, प्रतिक्रिया न देण्याचे ही पर्याय उपलब्ध असतात तसे प्रतिक्रिया देण्याचे ही स्वातंत्र्य असते. सगळ्यांना सगळ आवडेल असे अजिबात नाही. काहींना हा लेख आवडला असेल तर काहींना हा सांस्कृतिक धक्का ही वाटला असेल. असो.