सांजभयीच्या छाया - २

Submitted by रानभुली on 30 April, 2021 - 02:54

(मागील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी ही विनंती).

दुर्गापूरच्या ठाकूरांचा गोतावळा खूप मोठा आहे.
आता नावाचे जमीनदार आहेत.
पूर्वी कधीतरी हजारो एकर जमिनीचे ते मालक होते. मालक कसले इनामी जमिनी या. नबाबाने यांना करवसुलीसाठी दिलेल्या.
ते यांचं इन्कम.

त्या वेळच्या ठाकूरांनी अक्षरश: जुलूम करून कर वसुली केली असं मामा सांगतो. पूर्वीच्या पिढ्यांमधे दया माया नव्हती. बरं एक हवेली पण नाही. जिथे जिथे करवसुली साठी थांबावे लागेल तिथे तिथे एक एक हवेली होती. यांना कष्ट माहीत नाहीत. गरीब कुळांच्या जिवावर शेतसारा/ कर वसुली करायचा. त्यातला काही हिस्सा नबाबाकडे पाठवायचा. या पैशातून मग हवेल्या बांधतील नाही तर काय ?
त्यांच्या तैलगंगातल्या तसविरी पाहिल्या तरी भीती वाटते. कुठल्याच अंगाने हे लोक माणसात जमा नसावेत असे डोळ्यातले भाव. विशेष म्हणजे चित्रासाठी पोझ देतानाही ते तसेच कायम दिसून येतात.

पण ही मंडळी कलेची उपासक होती.
गाणं, नृत्य, चित्र अशा विविध कलांना उत्तेजन मिळायचं. मोठ मोठे गायक, कवी यांच्या दरबारात आपली कला पेश करून इनाम मिळवत असत. मुखोपाध्याय यांचे कुणी पूर्वज सुद्धा इनामाच्या आशेने आले होते. त्यांनी संस्कृत रचना ऐकवल्या होत्या आणि ठाकूरांच्या आग्रहास्तव बंगालीमधे अनुवादीत केल्या होत्या. त्या ही ठाकूरांना आवडल्या होत्या.

मग मुखोपाध्यायांना त्यांनी इथेच राहण्याची विनंती केली.
त्यांना जागा दिली. हवेली बांधण्यासाठी रक्कम दिली. आणि वेतनही सुरू केलं. मात्र त्यांचे आणि ठाकूरांचे संबंध हे गुरू शिष्यासारखे राहीलेले आहेत.
काळ बदलला.

मुखर्जींची मुलं बाळं परदेशी शिक्षणासाठी गेली. ठाकूर सुद्धा अन्य व्यवसायात शिरले. ऎंबॅसिडर कंपनीच्या डीलरशिपमधून पैसा कमावला. रेल्वेशी मोठमोठे कंत्राट केले. वॅगन बनवण्याच्या कारखान्यात गुंतवणूक केली. त्या कारखान्याचा मालक एका केंद्रीय मंत्र्यांचा आप्त असल्याने या कारखान्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. ठाकूरांनी अनेक वाईट कामे केली असतील पण पुण्यं पण कमावलं असणार. त्यांना कधीच कमी पडलं नाही.

वाढत्या परिवाराचा त्यांना फायदाच झाला.
काही काळ दुर्गापूरला मुखर्जींचं घर मोकळं होतं.

द्वारकाप्रसाद मुखर्जी लंडना सेटला झाले होते. पण तिथून पुन्हा भारतात येऊन व्यवसाय करायचा असं त्यांनी ठरवलं. ते आपली दोन मुलं अनामिका आणि विश्वजीत सहीत थेट दुर्गापूरला आपल्या जुन्या घरी परतले.

इथेही त्यांचा व्यवसाय चांगलाच बहरला.
कोलकाता दुर्गापूर अशा फे-यांमुळे मुलांचा मुक्काम ठाकूरांच्याच घरी असायचा.
सुब्रतो आणि अनामिका लहानपणापासून जणू काही एकमेकांसाठीच असल्याप्रमाणे वाढले.
आणि मग मोठे झाल्यानंतर घरचा विरोध डावलून लग्न करून आले.

आता जुना काळ राहिला नसल्याने झाले गेले विसरून सगळे सुरळीत झाले.
विश्वजीतचे लग्न होऊन मुलगीही मोठी झाली.

आशी तिचे नाव
पण आशी जन्मल्यापासून चमत्कारीक घटनां घडू लागल्या होत्या.
तिला आवाज ऐकू यायचे.

पण ते कुणालाच ऐकू येत नसत.
तिला काही काही आकार दिसत असत.
ते ही कुणाला दिसत नसत.

आशीची आई , झरना (या नावाला काकू म्हणून कशी हाक मारायची) गोंधळून गेली होती.
विश्वजीत अंकलनी कुणाचे काही न ऐकता कोलकत्याच्या इंद्राणी देब या मानसोपचार तज्ञाकडे आशीचे उपचार सुरू केले होते.
पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता.

काही दिवस ती ठीक झाल्यासारखी वाटायची. पण नंतर उलट प्रकार वाढत जाऊ लागले.
आशीचा अर्थ होतो स्मित.
नावासारखीच गोड मुलगी आहे ती.
डोळे मौशुमी चटर्जीसारखे घडी पडणारे. हसताना गालाला खळी पडायची. गुलाबी रंग आणि सोनेरी केस. एखादी बाहुलीच की.
पण तिच्यावर अशी वेळ यावी ...

खूप जण मुखर्जींना काही न काही सुचवायचे.
पण विश्वजीत मुखर्जींचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. माझ्या मुलीला तशा उपायांनी कधीच बरे वाटणार नाही यावर ते ठाम होते. जे काही करायचे ते वैज्ञानिक उपचार पद्धतींनीच हे त्यांनी निक्षून सांगितले होते.

पण पुढे नेमके काय झाले हे समजले नाही.
संपूर्ण मुखर्जी परिवार शिमल्याला गेला.

डॉक्टरांनी त्यांना हवापालट करायला सांगितले होते असे विश्वजीत अंकल मामाकडे बोलताना म्हणाले होते.
पण लोकांमधे काही वेगळीच कुजबूज होती.

पाच सहा वर्षे होऊन गेली तरी त्यांची काहीच खबर नव्हती.
आणि अचानक एके दिवशी त्यांचा फोन आला.
मामाला त्यांनी मदत मागितली होती.

मुलीच्या जवळ तिची काळजी घेण्यासाठी कुणीतरी बाईमाणूस त्यांना हवं होतं. ते बहुतेक अनामिकासाठीच विचारत होते. पण तसं थेट कसं बोलणार ?
मामाने खोदून खोदून विचारलं तेव्हां समजलं की झरना काकू शिमल्याजवळच्या एका खासगी मनोरूग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. आशीची काळजी घ्यायला कुणीच नाही.
त्यांना तिला सांभाळणं आता जमत नव्हतं.
नक्कीच ते अनामिका म्हणजे आपल्या बहीणीलाच बोलवत होते.

त्या दरम्यानच मी मामाकडे रहायला गेले होते.
दोन तीन दिवस मग ठाकूरहवेलीत खुसूर फुसूर अशी खलबतं चालली होती.
शेवटी अनामिका मामी, तिचा मुलगा देबाशीष आणि मी शिमल्याला जायचं ठरलं.
मला झालेला आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता.

शिमला माझं सर्वात आवडतं ठिकाण.
आणि तिथे ऋतुपर्ण होता.

पण मलाही माहीत नव्हतं की नशिबाने काय वाढून ठेवलंय पुढ्यात.
क्रमश:

(पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी ही विनंती).

( पुढचा भाग मोठा देण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदाच काल्पनिक अशी कथा लिहीत असल्याने टीकेचं स्वागत आहे. चांगल्या सूचना अंमलात आणण्यास मदत होईल ).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे हा भाग..!
ऋतुपर्ण पण आहे कथेत... छान.!!

सर्वांचे मनापासून आभार
@लावण्या - बरोबर. पण मला हे पण पहा मधे सावट नावाची एक कथा दिसली. उगीच गोंधळ नको म्हणून बदललं.

सर्वांचे मनःपूर्वक आभार .
@प्रभुदेसाई सर
ही गोष्ट पूर्णपणे डोक्यात आहे. पण ट्रिकी आहे. त्यामुळे प्रत्येक भाग मला काळजी घेऊन लिहावा लागत आहे. उत्साहाच्या भरात काही डिटेल्स अलिकडच्या भागात येऊ नयेत ही काळजी घेत लिहावे लागतेय. त्यामुळे वेळ लागतोय. दिवे जाणे येणे चालूच आहे. ती एक भर.

हो समजले
चांगल्या गोष्टींसाठी थोडी कळ सोसली पाहिजेच .
स्वतःचे समाधान झाल्यावरच पोस्ट करा.