आवाज बंद सोसायटी - भाग १

Submitted by पाषाणभेद on 10 April, 2021 - 10:11

या पुढील भाग:
https://www.maayboli.com/node/78548 :: आवाज बंद सोसायटी - भाग १
https://www.maayboli.com/node/78553 :: आवाज बंद सोसायटी - भाग २
https://www.maayboli.com/node/78559 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३
https://www.maayboli.com/node/78583 :: आवाज बंद सोसायटी - भाग ४

लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्लीप क्रृपया प्रथम 'ऐका'.

ध्वनी प्रदूषण

तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते.

माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता. शेजारी एखादा जण गायन करत असेल त्यात अन दररोज आठ, नऊ तास अनेक विद्यार्थ्यांनी गायन, वादन करणे यात फार फरक आहे. एकतर रहिवासी भागात गायन क्लास, तो सुद्धा ध्वनीरोधक - साऊंडप्रूफ नसलेल्या घरात चालू असल्याने माझ्या उद्वेगात भर पडत गेली. तेथील वाद्य, गायन आदींचा केवळ मलाच त्रास होत होता असे नाही, तर आजूबाजूच्या रहिवाशांनादेखील तो त्रास होत होता पण कुणीही त्याबद्दल संकोचाने आक्षेप घेतला नाही. त्यांचा हा एकप्रकारे निष्काळजीपणाच होता. क्लासच्या संचालक आणि घरमालक यांना या आवाजाच्या प्रदूषणाचे, त्याच्या परिणामांचे काहीच सोयर सुतक नव्हते. त्यांच्या मते त्यांनी चालविलेला हा क्लास त्यांच्या उच्च अभिरूचीचे लक्षण होते.

मला ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि कायदे माहित होते, त्यात मित्र श्री. संतोष भोई वकील साहेब यांनी भर घातली. सरतेशेवटी, श्री. वकील साहेब यांच्या सल्याने मी पोलीसांत तक्रार दाखल करण्याची कल्पना गायन क्लासच्या संचालक, त्यांच्या घरमालकाला दिली. अर्थातच पोलीसस्टेशनमध्ये जाण्याची गरज पडली नाही आणि गायन क्लासच्या संचालकाशी, त्याच्या घरमालकाशी बोलल्यानंतर त्यांनी ती जागा रिकामी केली आणि कॉलनीत शांतता प्रस्थापित झाली.

आजकाल आपल्याकडे जल आणि वायू प्रदूषणाबद्दल बरीचशी जागरूकता झालेली आहे. कमीतकमी त्याची चर्चा तरी होते. पण आपल्या समाजात ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता कमी आहे. मोबाईलवरील स्पिकरवर गाण्याचा आवाज वाढवला आणि दुसर्‍याने त्यावर आक्षेप घेतला तर आवाज वाढवणार्‍याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते. हे दुर्दैवी आहे.

सततच्या आवाजाच्या गोंधळाने आपली चिडचिड होते. आजूबाजूचे आवाज नकोसे होतात. शांततेची आवश्यकता भासते. अवाजवी, गरजेचा नसलेला आवाज हा देखील प्रदूषणात मोडतो आणि मानवी स्वास्थ्यावर त्याचे परिणाम होतात.

ध्वनी प्रदूषणाबद्दल इतरांचे प्रबोधन करणे आपले कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये याबाबत जागरूकता लहान वयातच आणली असता ते मोठे झाल्यानंतर सभ्य नागरीक बनू शकतील. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला जागरूक करणे या हेतूने हे सादरीकरण बनवले आहे. हे लिखाण मुक्त स्रोत परवान्यासारखे लिहीले आहे असे समजून आपण त्यात भर टाकाल व हे लिखाण जास्तीत जास्त व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचण्याकामी आपण सहकार्य कराल ही मला आशा आहे. येत्या काळात आवाजाचा भस्मासूर आपल्या कानांना गिळंकृत करण्याच्या आधी आपण सजग राहून त्याचा नायनाट करूया.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

(क्रमश:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ध्वनी प्रदूषणा बद्दल सहमत. व्हिडीओ मध्ये दाखवल्या प्रमाणे गाड्यांचे होर्न्स प्रदूषणात मोलाची भर घालतात. कुठल्यातरी संशोधनात असे दिसले होते की भरतीय लोक ट्रॅफीक मधली insecurity चा उपाय म्हणून हॉर्न वाजवतात. म्हणजे रस्त्यावर थोड्या अंतरावर एखादा माणूस रस्ता ओलांडत असतो, तो तुमच्या गाडी समोर येण्याची सुतराम शक्यता नसते पण तरी insecure वाटून तुम्ही हॉर्न वाजवता. एखाद्या नवशिक्या वाहांचालकासोबत बसलो की ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.
बाकी वरील प्रसंग घडला तेंव्हा तुम्ही इतर काही कारणाने मानसिक दडपणात ( Depression हा शब्द वापरायचा नाहीये) होता का? वेगवेगळ्या मानसिक स्थितीत आवाजांबद्दलची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. सर्वसाधारणपणे जे आवाज इतर लोक लीलया दुर्लक्ष करू शकतात तेच मानसिक दडपणात असलेले लोक त्यावर संतप्त प्रतिक्रिय देऊ शकतात. त्यांना असे वाटते की त्यांना त्रास देण्यासाठीच हे सगळे आवाज मुद्दाम सुरू आहेत.
अवांतर : पु ल देशपांडे म्हणतात शेजारचा रेडिओ जर ढणाढणा वाजत असेल तर तो आपल्यासाठीच लावला आहे असे वाटून शांत बसावे.

@झम्पू दामलू
"आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते."

आवाजाविषयी एखाद्याने व्यक्त व्हावे किंवा ना व्हावे याची आपल्या समाजात जडणघडण कशी झाली त्यावरही अवलंबून आहे.
आपल्याकडे एखाद्याने वाद्य गायन इत्यादी वर आक्षेप घेतल्यास त्यालाच वेडे ठरवतात. अगदी मला देखील, जाउद्या सहन करा, असा सल्ला दिला गेला होता.

आवाज सहन न होणे अन बधिरता हा देखील मोठा आजार आहे हे आपला समाज जो पर्यंत स्विकारत नाही, तो पर्यंत आपल्याकडे प्रार्थनास्थळांमधून आवाज येत राहतील, शेजारी जोरात टिव्ही लावतील, मोबाईलची रिंगटोन मोठ्याने वाजेल, विविधभारतीचा रतीब बॅंकेचा क्लार्क हक्काने दिवसभर वाजवत राहील अन शेजारच्याला त्रास होत असला तरी तो हक्काने दुर्लक्ष करेल. हि आपल्या समाजाची शोकांतिका आहे.

एक छोटेखानी पुस्तक आहे हे. सगळे मुद्दे हळू हळू येतील.
आपण सुजाण वाचक त्यात भर घाला.
(ओपन सोर्स पुस्तक आहे ते.)
Happy

पाभे. जिथे गायन वादन असेल अशा घराला साउंडप्रूफ ट्रिटमेंट करुन बराचसा आवाज कमी करता येतो असे मला एका आर्किटेक्ट मित्राने सांगितले. सोसायटीत बॅंडमिंटन हॊलला अशी ट्रिटमेंट करुन सभागृह करता येते. अन्यथा अशा हॊलमधे एको फार येतात.
संगीत लांबुन ऐकायला छान वाटते पण तेच तुमच्या शेजारी सातत्याने मोठ्या आवाजात लागत राहिले तर मात्र वैताग येतो.

आमच्या इमारतीच्या दोन बाजूंना ३/४ बैठ्या चाळी आहेत. सदैव वाढदिवस, बारसं, हळद, लग्न, वेगवेगळ्या पूजा/जयंत्या/सण इ. गोष्टींमुळे ध्वनिवर्धक ढणढणत असतात. १० ची डेडलाईन कधीच पाळली जात नाही. १२ वाजता आवाज बंद झाला तर नशिब म्हणायचं. बाळ तान्हं असताना एका वर्षी चिडून रात्री १.३० ला पोलिसांना फोन केला तेव्हा २ वाजता आवाज बंद होता. सुरूवातीची काही वर्ष झेपवून नेलं. शेवटी असह्य झाल्यावर बेडरूमला साऊंडप्रूफ विंडोज बसवल्या. प्रकरण खर्चिक झालं पण मन:शांती मिळाली. कुणाला ही पळवाट वाटेल. पण आमच्यासाठी घरात निवांत बसता येणं जास्त महत्वाचं होतं.

समोर ढिगभर गाड्या थांबल्यात सिग्नलला, तरी बाजूच्याच लेनमधील एक बहाद्दर हॉर्न वाजवत होता.
शेवटी गाडीतून उतरून झापलाच त्याला. तो म्हणे मिंटींगला उशीर होतोय, तुमको क्या तकलीफ है?
मी म्हटले, तुला समोरच्या गाड्या अजून हलणार नाहीत माहितीय तरी, वाजवण्याचे लॉजिक काय?
पढे लिखे दिखते हो, और ये सोच?
चांगल्या सूटात वगैरे होता. पण अकलेने कमीच.

—-
दादरला रहाणार्‍या एका नातीवाईकाच्या घरी, तर रोज कर्णकर्कश गोंधळ एकू येतो रस्त्यावरचा.
आमच्या घरी, पुण्यात आल्यावर करमायचे नाही त्याला. जाग नाही तुमच्या इथे असे म्हणायचा. आमचे घर त्यावेळी आतल्या गल्लीत व तेव्हाच्या शांत असलेल्या पुण्यात होते.

घरात एकांतात गाणे गायले तरी पोलीस पकडून नेतील का ? Proud

मी पहाटे नियमित फिरायला जाते. अर्थात सोसायटीच्या बागेत आणि आवारातच. सोसायटीचं मुख्य प्रवेशद्वार ते मुख्य रस्ता या दरम्यान एक रस्ता सोसायटीसाठी बांधलेला आहे. पहाटे या रस्त्यावर शांतता असते. झाडांवर किंचित उजाडले की पक्षांचे आवाज येऊ लागतात. खरं तर त्यासाठीच ही वेळ निवडलीये. पण या वेळेला काही जण मोबाईलवर भक्तीगीतं / अभंगवाणी मोठ्याने लावून फिरत असतात. मोबाईलच्या कृत्रिम आवाजामुळे डिस्टर्बन्स होतो. पण सांगायचा संकोच वाटतो.

एखादा भक्तीसंगीत आवडत नाही का असंही वळण देऊ शकतो. कसं सांगावं हा प्रश्नच आहे कारण हे सर्व ज्ये ना आहेत. शिवाय ते असल्याने इतक्या पहाटे / सकाळी फिरायला काही वाटत नाही.

मोबाईलच्या कृत्रिम आवाजामुळे डिस्टर्बन्स होतो. >>>अगदी याच कारणाने मी सकाळी सायकलिंग करताना कधीही गाणी रेडिओ वगैरे ऐकत नाही,पक्ष्यांची किलबिल इतकी छान वाटते की बस्स
तुम्ही इतरांना प्रेमाने हेड फोन घालण्याविषयी सुचवू शकता,

पण ते पक्षांना भक्तीगीतं / अभंगवाणी ऐकवीत असतील तर?

लेख आवडला, सहमत आहे. गरज नसताना उगीचच हॉर्न वाजवायची भारतात खूप जणांना सवय आहे. हाक मारून बोलावण्याऐवजी कर्कश्श हॉर्न वाजवून मित्राला बोलावत होता, त्यावरून एकाशी मी पुण्यात भांडलो होतो, ते आठवले. पण दुर्दैवाने कोडग्यांना फरक पडत नाही.

गोंगाटाला उत्तर म्हणून प्रति गोंगाट केला जातो. मग तुम्ही गोंगाटाला ट्युन होता. आणि गोंगाटाची चेन रिअ‍ॅक्शन चालू होते.