कोरोनासोबत कसे जगावे आणि माझी कोरोना मुक्ती!!

Submitted by गणेश शंकर चव्हाण on 20 September, 2020 - 11:45

कोरोनासोबत कसे जगावे !!

प्रथम माझ्याविषयी थोडसं,मी 40 वर्षांचा असून नुकताच कोरोनामुक्त झालो आहे.
यापूर्वी मी मे महिन्यातच "कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ?" असा लेख लिहून मोकळा झालो होतो आणि जुलैमध्ये Unlock च्या पार्श्वभूमीवर "पुनःश्च हरीओम" या नावाचे तीन भाग लिहिले होते. काही कारणाने ते सगळे पोस्ट झाले नाहीत.

"मी कोरोनाला हरवणारच" ही घोषणा केव्हाच बाद ठरवण्यात आली हे चांगलच पण "आता आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे" ही नवीन संकल्पनाही आपल्याला तितकीशी स्पष्ट करून सांगितली गेली नाही." हे आपल्या परंपरेला साजेसंही आहे आणि गोंधळ वाढवणारेही आहे.तेव्हा जे मला उमगलं ते तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न...

सर्वप्रथम तुमच्या भेटीगाठीचे क्षेत्र मर्यादित ठेवा.असं केल्याने कोरोना होण्याचे chances कमी होतील असं कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं ठरण्याची शक्यता जास्त आहे.कोरोना उंबरठ्यावर केव्हाच येऊन ठेपला आहे.तो होऊ न देणे हा choice इथून पुढे फार कमी जणांकडे असेल.एव्हाना बऱ्याच जणांना कोरोना होऊनही गेला असेल.तरी सुद्धा भेटीगाठीचे क्षेत्र मर्यादित ठेवावे की जेणेकरून कधी बाधित झालात तर किमान मानसिक त्रास तरी कमी प्रमाणात होईल. शारीरिक त्रास हा प्रत्येक बधिताला होईलच असे नाही पण मानसिक त्रास हा कमी अधिक प्रमाणात जवळपास सर्वांनाच होतो असा माझा निष्कर्ष आहे. कारण भारतीय समाजव्यवस्था ही "रंग बदलणारी" आहे ( पण बदनाम मात्र मुक्या सरड्याला केलं जातं ).आज जरी बऱ्यापैकी Unlock असलं,लोकं एकमेकांना भेटत असली तरी ते त्यांनी नाईलाजाने व नाखुशीने स्वीकारले आहे आणि हा नाईलाज जोपर्यंत कोरोनाचं बालंट अंगावर येत नाही तोपर्यंतच टिकतो.म्हणून आपल्याला साथ देणारी,धीर देणारी माणसे ओळखा आणि संकट टळेपर्यंत इतरांशी संपर्क टाळाच ( अपवाद - नोकरी,उद्योगधंदे इ. ) "कोरोनामुळे आपली माणसे कोण ते समजलं" असले रडगाणे गाण्यापेक्षा ते केव्हाही चांगलं. समोर कुणीही असलं तरी बाधितांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तशी कल्पना नक्की द्यावी.पुढील निर्णय त्यांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वा अनुभवाने घेऊन द्यावा आणि स्वतःच्या तब्बेतीवर लक्ष केंद्रित करावे.

माझ्यापुरते बोलायचं झालं तर, मला कसलीच लक्षणे नव्हती पण संपर्कात आल्याने माझीही तपासणी झाली आणि जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असं समजलं तेव्हा कुठे मला थोडासा ताप आला आणि थकवा जाणवू लागला.दोन तीन दिवसात ते ही निवळलं.होम आयसोलेशन मध्ये मला काय हवं नको ते विचारायला रोज न चुकता फोन यायचे.सुरक्षिततेचे नियम पाळून अखंडित पुरवठा सुरू होता. ओळखीच्या डॉक्टरांनी औषधे आणि दिनचर्या याबाबतीत मार्गदर्शन केले.मी ज्यांच्या संपर्कात आलो होतो त्यांनीही प्रथम धीर दिला आणि आम्ही स्वतःला मॉनिटर करू,काही लक्षणे आढळली तर तपासणी करून घेऊ,तू स्वतःच्या तब्बेतीवर लक्ष दे असं सांगितलं.थोडक्यात काय,तर माझं काहीही अडलं नाही आणि हे आजवर फार कमी जणांच्या बाबतीत घडलं आहे. आपल्या बाबतीतही असं घडावं असं ज्यांना वाटत असेल,त्यांनी आत्तापासूनच वातावरण मोकळं करण्यास सुरुवात करावी.प्रथम कोरोनाची अवास्तव भीती मनातून काढून टाका.जे बाधित झाले आहेत त्यांच्याबद्दल भीती,घृणा बाळगू नका आणि त्यांची अति प्रमाणात काळजीही करू नका.मला किंवा आपल्यापैकी कुणाला कोरोना झाला तर ? या विषयावर खुलेआम चर्चा होऊ द्यात आणि होम आयसोलेशनसाठी एकमेकांना मदत करता येईल का याची चाचपणी करा. कारण
गोळ्या,औषधे,इंजेक्शने,बेड आणि व्हेंटिलेटरची गरज सर्वांनाच नसते.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून आभाळ कोसळल्या सारखा चेहरा करू नका.बरेच जण म्हणतात की कोरोना झाला की मग सगळं डिस्टर्ब होतं,पण आता अजून काय डिस्टर्ब व्हायचं राहिलं आहे ? गेली 6 महिने मानसिक तणावाखाली,दहशतीखाली Lock/Unlock,आत/बाहेर सुरू आहेच की.मग होम आयसोलेशन किंवा कोविड सेंटरमधील 14 दिवसांनी असा काय मोठा फरक पडणार आहे ? ज्यांना आपल्याला कोरोना होऊ नये असं वाटतं त्यांच्यासाठी "घराबाहेर न पडणे" हा पर्याय सुध्दा आता उरला नाही.किती दिवस घरात बसून राहणार ? आणि कोरोनाची साथ आहे म्हणजे कोरोना होऊही शकतो इतकं साधं गणित आहे ते.आपली व कुटुंबियांची काळजी घेणं इतकच तर आपल्या हातात आहे आणि त्यात कुणी हलगर्जीपणा करू नये,बाकी पुढचं पुढं.....

अधूनमधून व्हाट्सअप्पवर काही अर्थपूर्ण मेसेजेसही येत असतात.
अगदी अलीकडच्या काळातील दोन आवडलेले मेसेज
पहिला - कोरोना कशामुळे होतो ? तर टेस्ट केल्यामुळे....
आणि
दुसरा - कोरोना पॉझिटिव्ह पाच दहा दिवसांत बरे होतात पण न झालेले कायम विवंचनेत असतात.त्यांना दिवसातून एकदा तरी वाटतच की,झालाय बहुतेक !!

आपल्याकडे बधितांच्या बाबतीत कोरोनामुक्त झालेले आणि मृत पावलेले अशी दोन्ही उदाहरणे आहेत. मग बरे झालेल्यांच्या लक्षणीय आकड्यांकडे दुर्लक्ष करून जर कुणी नुसते मृतांचेच आकडे मनात साठवत असेल तर हे कोरोनाच्या जाहीर केल्या गेलेल्या लक्षणाहूनही भयानक लक्षण आहे. एकदा का कोरोना पॉझिटिव्ह असा शिक्का पडला आणि पुढे दुर्दैवाने मृत्यू झाला तर तो कोरोनामुळे झाला अशी त्याची नोंद होते.हा दावा खोडून काढायला "पोस्ट मोर्टम" होत नाही हे एकच कारण पुरेसं आहे पण आपण त्याविषयी न बोललेलच बरं.कारण हा अधिकार तर खुद्द भारत सरकारच्याही अखत्यारीत येत नाही.कितीही झालं तरी जागतिक सत्ता,संघटना यांचा देशोदेशीच्या सरकारांवर प्रभाव आणि दबाव असतोच.
इतर आजारांनी त्रस्त बाधितांना कोरोना घातक आहे असं सांगितलं जातं.पण मग कोरोना झाला आहे असं समजताच त्यांचे जुने आजार कसे बळावतात ? हा विषाणू एका रुग्णाच्या थेट फुफ्फुसातच शिरतो आणि दुसऱ्याला साधा तापही येत नाही,ते कसं काय ?? रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच छातीत कसं दुखू लागतं,श्वास घ्यायला त्रास जाणवतो,ऑक्सिजनची पातळी खालावते या गोष्टींचा सर्वांनीच विचार करायला हवा.
यात थोडं जरी तथ्य आढळलं तर असच म्हणावं लागेल की, पॉझिटिव्ह कोरोना नाही तर निगेटिव्ह मनोवृत्तीच माणसाला मारक ठरत आहे.
आजवरच्या आकडेवारी वरून जर हे पुरेसं स्पष्ट होत असेल की,ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी त्रस्त बाधितांना जास्त धोका असतो तर मग त्याच आकडेवारी वरून हे देखील स्पष्ट होतं ना की,तरुण व पन्नाशीतील धडधाकट जनतेला तुलनेत कमीच धोका आहे.मग त्यांना का मनमोकळेपणाने काम करू दिलं जात नाही ?? सरसकट सर्वांना एकाच तराजूत तोलून कशाची आणि नेमकी कुणाची टक्केवारी वाढणार आहे हे तर येणारा काळच सांगेल. हे जेव्हा व्हायचं तेव्हा होईल,तूर्तास
घरातील कर्त्या स्त्री पुरुषांनी ज्येष्ठांना वा इतर आजारांनी त्रस्त मंडळींना उगाचच घाबरवणं बंद करावे.तुम्हाला जास्त धोका आहे असा जयघोष त्यांच्यासमोर वारंवार करू नये. म्हणजे ते ही तणावमुक्त राहतील आणि जर कोरोना झालाच तर त्यालाही धैर्याने सामोरे जातील. ज्येष्ठांनीही त्यांना सहकार्य करावे. मला बाजारात,बँकेत जायलाच हवं असले बालिश हट्ट करू नयेत.
प्रवासाचा हट्ट धरू नये आणि आमच्या वेळी असं नव्हतं,
कधी जाणार हा कोरोना वैगेरेची जपमाळ एकसारखी ओढू नये.
कर्त्यांनी अगदी चुकूनही घरातील बाळगोपाळांचा कोरोनाबद्द्ल समुपदेशन करण्याचा अतिशहाणपणा करू नये.
त्यांच्याइतका संयम आणि समजूतदारपणा या कोरोनाकाळात दुसऱ्या कुणीच दाखवला नाही. तेव्हा या बाळगोपाळांचं फक्त आणि फक्त कौतुकच व्हायला हवं.
जर कुणी कोरोनाबधित झालं तर बातमी पसरायला वेळ लागत नाही. प्रत्यक्ष भेटून पेशंटची विचारपूस करणे,सल्ले देणे,
झालच तर पेशंटला घाबरवणे ही सोय कोरोनात नाही पण हे कार्य तर Unlimited talktime आणि व्हाट्सअप्प हे सुद्धा करू शकतात.त्याचा नाहक त्रास होऊ शकतो.फोनवर बोलताना घसा दुखतोय वैगेरे कारणे सांगून वेळ मारून नेता येईल पण आपण सोशल मीडिया तर पाहणारच. जर कोणी "कोरोनाबधित माणूस आज चांगला असतो तर उद्या या जगात नसतो" अशा आशयाची पोस्ट बाधित व्यक्तीशीच शेअर केली तर ? किंवा "कोरोनाला lightly घेऊ नका,तो अमका तमका कोरोनाने गेला" असा मेसेज केला तर ?? खरं तर अशा वेळी एखादा लक्षणविरहित बाधितही झटक्यात आडवा होईल,त्याला लक्षणे जाणवायला लागतील.हे असं होऊ पण शकतं म्हणून बाधित झाल्यानंतर फोनवर कमी बोलणे,काही काळासाठी सोशल मीडियावरून exit किंवा स्वतःला काहीही ऐकण्यासाठी निगरगट्ट बनवणे हे तीनच पर्याय उरतात.
हे झालं संभाव्य कोरोना बधितांचं,पण आम्हा कोरोनामुक्त मंडळींनाही जागतिक आरोग्य संघटना,भारत सरकार आणि सोशल मीडिया सुखाने जगू देईल असं वाटत नाही.शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे तीन चार महिनेच टिकतात.मग त्यांना पुन्हा संसर्गाचा धोका इतरांहूनही अधिक असतो,फुफ्फुसावर,
वा शरीराच्या इतर भागांवर दूरगामी परिणाम होतात इत्यादी मेसेजेस काही दिवसांनी शेअर केले जातील.जसजसा लस बाजारात येण्याचा कालावधी जवळ येत जाईल तसतशी त्याची तीव्रताही वाढत जाईल.आज दिवसभरात लाखाच्या आसपास बाधित आढळतात ते त्या काळात अगदी 5 लाखाच्या आसपासही आढळतील,जरी दिवसाला 2 लाख टेस्ट झाल्या तरी.WHO च्या कोरोनाच्या लक्षणांच्या वाढीव यादीची सांगता आजवरच्या सर्वात विनोदी लक्षणाने होईल आणि ते लक्षण म्हणजे "कोणतेही लक्षण नसणे"..

WHO ने आणि सरकारने जरी कोरोनाची सांगड थेट मृत्यूशीच घालून दिली असली तरी किमान मला तरी हा कोरोना अगदीच लेचापेचा वाटला.मी कुणी तज्ञ नाही आणि अगदी Typical असा विश्लेषकही नसल्याने माझं म्हणणं मनापासून आणि आत्ताच मांडू शकलो.सध्या बहुतांश तज्ञ, विश्लेषक मंडळी शांतच आहेत.
कदाचित सारं काही स्थिरस्थावर झाल्यानंतर ते बारीक सारीक तपशीलासह घडून गेलेल्या घटनांचे अर्थ लावतील.अहवाल आणि पुस्तकेही लिहितील.पण मग तो सगळा नेहमीसारखाच "वरातीमागून घोडे" असा प्रकार होईल."कोरोना आणि त्याची हाताळणी" हा विषय मांडण्याची खरी गरज आज आहे.सामान्य माणसाला तर जास्तच.कोरोना पुढचे अजून काही महिने म्हणजे लस बाजारात येईपर्यंत तरी ठाण मांडून असणार आहे हे नक्की.
लस उपलब्ध झाल्यानंतरही तो क्षणार्धात गायब होईल असं ही काही नाही.
तेव्हा जनतेनेही आता "आंतरराष्ट्रीय षडयंत्र,मेडिकल रॅकेट" वैगेरे गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करावे कारण अगदी सगळीकडेच समज,गैरसमज यांचा बराच राडारोडा पडला आहे आणि उपाययोजनांचाही पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे प्रत्येकानेच सर्वप्रथम आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करावा आणि परस्पर सामंजस्याने आपले जीवन अधिक सुकर कसे होईल याकडे लक्ष द्यावे.असं केल्याने जरी " कोरोनाची साखळी " तुटणार नसली तरी कोरोना सोबत असतानाही एका " नवीन जीवनमानाची सुसह्य साखळी " नक्की तयार होईल.

त्यासाठी मी माझ्या परीने केलेले हे विश्लेषण.
बाकी ज्याची त्याची इच्छा !!

धन्यवाद Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Good one

खूप प्रभावी लिहीलं आहे.
तुम्हाला आता सतत ठणठणीत राहण्यासाठी शुभेच्छा.
शेवटचा बोल्ड लिहीलेला कंटेंट अगदी पटला.

छान लेख. कोरोना आता प्रत्येकाला होईलच किंवा झाला तर झाला, कदाचित होऊनही गेला असेल असे मानून बेफिकीर राहणे आणि सगळ्या समाजापासून फटकून अतिस्वछता वगैरेंचा बाऊ करीत माणुसकीला सोडून वागणे या टोकाच्या भूमिका टाळणे यात खरे हित आहे. हा आजार भीती न बाळगता, साध्या सोप्या सवयी बदलून, स्वच्छता पाळून जितका दूर ढकलत (होऊन गेला असेल नसेल अशी खात्री असलेलाही) प्रत्येकजण दिवस ढकलेल त्यातच खरे शहाणपण आहे.

Corona शरीरावर दीर्घ कालीन परिणाम करतो असे पण संशोधन आहे.
Corona मुक्त होणे हे क्षणिक सुख सुद्धा असू शकते जर कोरोनाचा शरीरावर दीर्घ कालीन परिणाम होतो हे सत्य असेल तर.

खूप प्रभावी लिहीलं आहे.
तुम्हाला आता सतत ठणठणीत राहण्यासाठी शुभेच्छा.
शेवटचा बोल्ड लिहीलेला कंटेंट अगदी पटला.>>>>÷1

चांगले लिहीले आहे.

तुम्हाला आता सतत ठणठणीत राहण्यासाठी शुभेच्छा.>>+१

किमान मला तरी हा कोरोना अगदीच लेचापेचा वाटला. >>>>>>>>>
तुमचा लवकर बरा झाला म्हणजे हा आजार लेचापेचा आहे, सिरीअस नाही असे नाही. प्रत्येकाचे शरीर वेगळे, प्रतिकारक्षमता वेगळी. तुम्हाला symptoms दिसायच्या आधी detect झाला आणि treatment मिळाली , म्हणून तुम्ही सुदैवी आहात. सगळे तसे सुदैवी नसतात. पण म्हणून करोना लेचापेचा आहे असे म्हणणे चूक ठरेल.

यात थोडं जरी तथ्य आढळलं तर असच म्हणावं लागेल की, पॉझिटिव्ह कोरोना नाही तर निगेटिव्ह मनोवृत्तीच माणसाला मारक ठरत आहे.>>>>>>>>>
करोनाने इतके बळी घेतले, इथे मायबोलीवर देखिल उदाहरण आहे, ते सगळे निगेटिव्ह मनोवृत्तीचे होते असे मानणे योग्य नाही.

लेख छान आहे पण वरची वाक्ये पटली नाहीत.

खूप छान लिहिलेय तुम्ही.. वस्तुस्थिती मांडली आहे. लहान मुलांची गोष्ट अगदी 100% खरी आहे. त्यांच्याइतका समजूतदारपणा आणि परिस्थितीनुसार adjust होणे, या काळात आपण मोठी माणसे पण दाखवू शकलेलो नाही.

तुमचा लवकर बरा झाला म्हणजे हा आजार लेचापेचा आहे, सिरीअस नाही असे नाही. प्रत्येकाचे शरीर वेगळे, प्रतिकारक्षमता वेगळी. तुम्हाला symptoms दिसायच्या आधी detect झाला आणि treatment मिळाली , म्हणून तुम्ही सुदैवी आहात. सगळे तसे सुदैवी नसतात. पण म्हणून करोना लेचापेचा आहे असे म्हणणे चूक ठरेल.>> हे अगदी बरोबर.

कदाचित त्याला लेचापेचा म्हणणे हे त्यांना त्यांच्या मनाची पॉझिटिव्हिटी वाढवायला उपयुक्त झाले असेल.

पण दोन टोकं गाठणे लॉंग रन साठी उपयुक्त नाही. अतिरिक्त बाऊ करु नये आजाराचा तसच त्याला गरजेपेक्षा जास्त कमीही लेखू नये. आपली मानसिक आणि शारिरीक ताकद वाढवत रहायचं आणि बाकी बेसिक हायजीन पाळायचं. झालाच तरी वेळेत उपचार करुन आपण बरे होऊ असे मनाला सांगत रहायचे आणि लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता आवश्यक ते उपाय करायचे.

लहान मुलांची गोष्ट अगदी 100% खरी आहे. त्यांच्याइतका समजूतदारपणा आणि परिस्थितीनुसार adjust होणे, या काळात आपण मोठी माणसे पण दाखवू शकलेलो नाही.>>अगदी खरय

लेख आवडला.

जब होवे उमर पुरी
जब छुटेगा हुकुम हुजुरी,
जम के दूत बडे मजबूत जम का बडा झमेला

गुरु की करनी गुरु जायेगा चेले की करनी चेला
ऊड जायेगा हंस अकेला

माणसाची वेळ भरली की मनोवृत्ती कशीही असली तरी तो जातोच.

मग जोवर जगायचे आहे तोवर करोना काय किंवा इतर रोग काय त्यांच्या सोबत जगणे शिकावे हे उत्तम
आपल्या मुळे इतरांना होणार नाही याची काळजी घेत पण मस्तीत जगावे. आनंदात रहावे.

माणसाची वेळ भरली की मनोवृत्ती कशीही असली तरी तो जातोच. >> हे कळतं पण वळत नाही.

मग जोवर जगायचे आहे तोवर करोना काय किंवा इतर रोग काय त्यांच्या सोबत जगणे शिकावे हे उत्तम + 11

चांगले लिहीले आहे. आताचा काळ असा आहे कि प्रत्येक नागरीक एक तर स्वत: किंवा त्यांचे कोणी ना कोणी नातेवाईक/मित्र कोव्हीड१९ आजारातून गेलेले आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. इतक्या प्रमाणात तो पसरला आहे. त्यामुळे, त्यातून बरे झालेल्यांचे विचार जास्तीत जास्त पसरवणे हे आजच्या काळाच्या दृष्टीने सकारात्मक धोरण राहील.

चांगला लेख. मला करोनाच्या बाबतीत नेहमी एक प्रश्न पडतो. डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ, रेबीज वगैरे आजार करोना इतकेच किंवा क्वचित करोनापेक्षाही जास्त घातक ठरतील असे आहेत. मग हे आजार नियंत्रणात आणण्यासाठी/ त्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सरकार/ महानगरपालिका काहीसुद्धा करत नाही. पण मग करोनाच्याच बाबतीत एवढी जागरूकता का ?
लोकसुद्धा डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ, रेबीज पसरू नये म्हणून सांगितले गेलेले उपाय तंतोतंत पाळत होते का? मग आत्ताच कसे पाळायला लागले सगळे सुरक्षेचे उपाय?

काहीसुद्धा करत नाही ? असे नका म्हणू

राज्य आणि केंद्र सरकारचे कार्यक्रम सुरू असतात

डेंग्यू , मलेरिया यासाठी नेशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्रॅम अंतर्गत डि डी टी , धूर फवारतात , साठलेल्या पाण्यावर तेल टाकतात , खड्डे बुजवतात , पाण्यात गप्पी मासे सोडतात , सरकारी सिस्टर तापाची औषधे व क्लोरोकवींन देते , रक्त सॅम्पल तपासतात , विट भट्टी कामगार , परप्रांतीय कामगार ह्यांची टेस्ट करतात

कावीळ - शुद्ध पाणी पुरवठा व शौचालय योजना

रेबीज - कुत्रे चावले तर फुकट इंजेक्शन देतात

आणि करोना हा प्रचंड संसर्गजन्य आहे, नवीन आहे त्यावर औषध, इलाज नाही , त्यामुळे अधिक लक्ष.

ब्लॅक कॅट याना अनुमोदन
याच पावसाळ्यात आमच्या घराच्या आजूबाजूला अनेक डबकी साचून डासांची संख्या खूप वाढली होती
आम्ही हे महानगरपालिकेला कळवताच दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकं येऊन फवारणी करून गेले
डेंग्यू आणि चिकणगुणिया साठी पुणे महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे

कोरोना बद्दल सगळेच अजून संभ्रमात आहेत
त्यामुळे जास्त काळजी घेत असावेत कारण इतका जगभर पसरलेला आजार आपल्या दारात उभा ठाकलेला पाहून कोणालाही भीती वाटणे स्वाभाविक आहे

मलेरियासाठी तर डी डी टी इतकी इतकी इतकी वापरली की

सगळे डास आता त्याला रेसिस्टंट झालेत , डी डी टी चाटून आता माणसेही मरत नाहीत , डास तर त्याच्यावरच बसतात

Proud

डास प्रतिबंधक औषध फवारने , हे बजेट मध्ये एक मुख्य हेडिंग असते

योजना आहेत हे मान्य. पण त्या पाळण्याची वापरण्याची सक्ती महानगरपालिका करताना दिसत नाही.
उदा.: कावीळ - शौचालय योजना >> ही योजना वापरली नाही तर म्हणून पोलिस दंड वसूल करत नाहीत. पण मास्क न लावता फिरलो तर दंड वसूल करतात. मास्क आणि 'शौचालयाचा वापर' दोन्ही चा उद्देश एकच आहे. आजाराचा प्रसार थांबवणे.
रेबीज - कुत्रे चावले तर फुकट इंजेक्शन देतात >> पण मुळात रेबीज होऊच नये यासाठी कुठे काय करते महानगरपालिका?
करोना बद्दल वाटणारी भिती समजू शकतो. पण इतर आजारांची भिती असूनही आपण त्यांच्यासोबत जगतोच. आणि ते आपल्याला होऊ नयेत म्हणून जमेल तेवढी काळजीही घेतोच. तेच धोरण करोनाच्या बाबतीत ठेवावे असे वाटते.

रेबीज होऊच नये म्हणून काय करणार ? कुत्री , मांजरे , कोल्हे लांडगे अनेक प्राण्यांममध्ये हे व्हायरस असतात

पालिका सगळ्यांना पकडू शकत नाही , पकडले तरी मनेका गांधी सोडा म्हणते Proud

म्हणून माणसाला इंजेक्शन फुकट देणे , हे जमू शकते , ते केले जाते

माणसाची वेळ भरली की मनोवृत्ती कशीही असली तरी तो जातोच.
मग जोवर जगायचे आहे तोवर करोना काय किंवा इतर रोग काय त्यांच्या सोबत जगणे शिकावे हे उत्तम
आपल्या मुळे इतरांना होणार नाही याची काळजी घेत पण मस्तीत जगावे. आनंदात रहावे.>> ही एक टोकाची असेल हरी देईल खाटल्यावरी प्रतिक्रिया ह्यापासून चार हात दूर राहावे. कोणी म्हणेल श्रद्धा आणि पॉजीटीव्ह एनर्जी मिळेल तर मिळो बापडो. खरेतर अशा मोघम, मधाळ सुविचारांतून मिळत तर काहीच नाही उलट अशाने बेफिकिरी अधिक वाढीस लागते.

रेबीज बद्दलचाही महानगरपालिकेचा अतिशय सुखद अनुभव
माझ्या मुलाला कुत्र्याशी खेळताना दात लागला
आधी खासगी दवाखान्यात गेलो त्यांनी बरेच टोलावले
हे इंजेक्शन आणून द्या म्हणले, ते कुठं मिळेना
मग शेवटी नायडू रुग्णालयात गेलो, सरकारी असल्याने केवळ आजवर ऐकीव माहिती होती त्यामुळे भीतीच होती मनात
पण रुग्णालय अतिशय स्वच्छ आणि सुसज्ज
तिथला कर्मचारी होता त्याने व्यवस्थित माहिती दिली, फॉर्म भरून कुठं आणि कसा द्यायचा हे नीट समजावून सांगितले
त्यांनतर लगेच तिथल्या नर्स ने ताबा घेतला आणि रेबीज लस बद्दल माहिती दिली
रिएक्शन येऊ शकते त्यामुळे लस दिल्यावर इथेच एक तास थांबावेलागेल देखरेखीखाली
काही खाल्लं नसेल तर खाऊन या आणि तिथं कुठं काय खायला मिळेल हेही सांगितले
नंतर डॉकटर आले त्यांनी लस टोचली आणि तिथल्या च बेड वर पडून राहायला सांगितले
अतिशय स्वच्छता होती, वेगवेगळ्या कचऱ्याचे विल्हेवाट लावणाऱ्या पेट्या होत्या त्यावर वेगळ्या रंगाचे स्टिकर होते
कुठला कचरा कुठल्या डब्यात टाकायचा याचे स्पष्ट मराठीत ठसठशीतपणे लिहिलं होतं

या मुळे सरकारी दवाखाने म्हणजे जी माझ्या मनात इमेज होती ती पार पुसली गेली

Pages