बाधा

Submitted by बिपिनसांगळे on 2 August, 2020 - 10:36

बाधा
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना .
राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता .
हुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद गारवा . सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा . गुरं आपापल्या घराकडे निघालेली . त्यांचा हंबरण्याचा आणि गळ्यातल्या घंटांचा गोड किणकिणाट . प्रत्येकालाच एक ओढ लागलेली ...
यमुना वहात होती . श्रावणसरींनी नुकतंच एक हलकं शिंपण घातलं होतं . गवतावर पाण्याचे थेंब होते , मोत्यांसारखे . तर काही थेंब हळदुल्या उन्हामुळे सोनेरी भासत होते .
सोनसरींनी न्हायलेलं इतकं निसर्गरम्य वातावरण की भान हरपून जावं !
राधेचंही भान तस्संच हरपलेलं होतं ; पण तो निसर्ग पाहून नव्हे ,तर ते तिच्या प्रियासाठी - कृष्णासाठी ! तिलाही ओढ लागली होती, त्याच्या भेटीची.
ती अभिसारिका लगबगीने एका सुनिश्चित कदंबवृक्षापाशी चालली होती. तिला तो निसर्ग जणू दिसतच नव्हता . तिचा निसर्ग , तिचं विश्व म्हणजे फक्त कृष्णच !
श्रावणसरी बरसून गेल्या तरी राधेच्या तापल्या मनाला त्यामुळे शीतलता लाभणार नव्हतीच .
ती कदंबापाशी पोचली , पण तिथे कुणीही नव्हतं . ती बिचारी एकदम बावरली. तिचे कावरेबावरे नेत्र भिरभिरले . पण तो खरंच आला नव्हता . तिने कदंबामागे , आजूबाजूच्या झाडांमागे डोकावून पाहिलं . कदाचित , तिची फिरकी घेण्यासाठी तो कुठे दडून बसला असेल , तर त्याला शोधण्यासाठी . कान्हाच तो , काही कमी खोडकर नव्हता !
आकाशी सप्तरंगी इंद्रधनू उमटलं होतं . पण त्या चित्तकठोराची पावलं अजून तिथे उमटायची होती .
ती कदंबाच्या झाडाला टेकून उभी राहिली . स्तब्ध , चिंताक्रांत . तिची शांतता भंग पावली ती वर उडालेल्या बगळ्यांच्या पांढऱ्या माळेने . तिने त्रासून वर पाहिलं आणि तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून यमुना खळखळून हसली . त्यावर राधेने तीच त्रासिक नजर तिच्याकडे वळवली .
" यमुने, भारी गं ! अजून आवाज कर . मला तो एरव्हीचा तुझा नादमधुर खळाळसुद्धा नकोसा वाटतोय . तू मला आणखी छळ . हस मला . माझ्या जीवाला अगदी नकोसं झालंय तर तू माझ्या अणिकच खोड्या काढ ," राधा तिला दुःखाने आणि रागाने म्हणाली.
तिच्या त्या बोलण्यावर यमुना अवखळ खळखळली . खोडीलसारखी ती आणिकच लचकत - मुरडत वाहू लागली . ते पाहून राधेचा राग वाढला .
आणि दुरून बासरीचे कर्णमधुर स्वर कानी आले. स्वर्गीय संगीताने आसमंत भरून गेला .
वेडी राधा मनी मोहरली . तिचा राग कुठे पळून गेला. कृष्णमीलनासाठी तिचं मन , तिचा देह रोमांचितपणे थरथरू लागला .
तिकडे त्या स्वरांनी यमुनाही क्षणभर थबकली आणि म्हणाली , " राधे , आलाय गं तो ! ... आता झालं ना समाधान ? त्याच्यामुळे तुझं मन अस्थिर असतं . तुला दुसरं काही सुचत नाही अन काही कळत नाही . मला तर तुझी मनोवस्था पाहून तुला चिडवून द्यावंसं वाटतं . मजा वाटते गं मला . लहान आहेस तू माझ्यापेक्षा . अगं वेडे, त्याची वाट तर मीही पहातच असते . तो येईपर्यंत मलाही काही सुचत नाही . त्याच्या विचारांमध्ये मग मीही वाहवत जाते. वेड्यासारखी ! जसं तुझं नातं त्याच्याशी , तसंच माझंही . तुला झालेली बाधा तर मलाही आहे . अगदी आधीपासून ! “
घनदाट झाडांच्या गर्दीमध्ये कृष्ण नीट दिसत नव्हता . पण पानांमधून, त्याने खोचलेलं मोरपीस मात्र हळूहळू जवळ येताना दिसत होतं .
राधा यमुनेच्या बोलण्याने भय पावली होती . तेव्हा यमुना खळखळून म्हणाली , " अगं राधे , घाबरू नकोस . मी काही तुझ्या प्रेमात वाटेकरी नाही गं . तो जसा तुझा प्रियकर आहे तसा तो माझाही भगवंत आहे ! "
आता कान्हा , त्या दोघींच्या समीप आला होता .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीले आहे.

(पण उगाच) बुलबुल चितपटातले गाणे आठविले.... जे नव्हते आवडले.
अंतरजालावरून...
Mai He Kalankini Radha,
(Oh, my! you ill-reputed Radha.)
Kadam Gashe Uthiya Ache Kanu Haramjada,
(On the Kadam tree, the playful Krishna (Kaanu) awaits you.)
Mai Tui Jole Na Jai’o,
(Don’t go to pick up the water. I beg of you.)... हे बंगाली लोकगीत आहे असे वाचनात आले.

सोनाली
उल्लेख महत्त्वाचा .
राधेला बदनाम केलं आहे . त्या त्या लेखक / कवीचा तो दृष्टिकोन .
राधेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत खरे