*******पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती*******

Submitted by अस्मिता. on 22 May, 2020 - 20:27

पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती

*********************************************************
images.jpeg.jpg

**********************************************************
दैवजात दुःखें भरतां
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

****************************************************************************
गीत रामायण

ग. दि. माडगूळकर
गायक सुधीर फडके

ह्या दोन गाण्यांमध्ये सुधीर फडके यांचा आवाज फक्त गात नाही तर तो स्पष्ट लाघवी आर्जवं ह्रदयात नेऊन पोहोंचवतो. मी त्यांना व्यक्तिशः ओळखायचे नाही, पण ही गाणी ऐकल्यावर यांतील माधुर्य, आर्तता आणि अनेक हालअपेष्टांनंतरही टिकून असलेली परमेश्वराप्रती अवर्णनीय निष्ठा जाणवून तेच स्वतः साधूतुल्य असल्याचा विश्वास वाटायचा!!
गीत रामायणात 'राम' आहेच. तो गदिमा व बाबुजींच्या अतुलनीय प्रतिभा आणि निष्ठा यांच्या अवीट संगमाने आलाय. ही निर्मिती हेच श्रोत्यांसाठी अमर्त्य वरदान आहे. गीत रामायण रामासारखेच शांतवन करते. आमच्याकडे ही गाणी मन लावून ऐकणाऱ्या व्यक्ती म्हणजे वडील /पपा व आजोबा/ बाबा. त्यामुळे की काय ही गाणी मनातही लागोपाठच येतात. एक ऐकले की दुसरे ही आवर्जून ऐकल्या जाते. बाबा कळतं नकळत ऐकू जाईल न जाईल इतक्या आवाजात गुणगुणंत. पपा त्यांच्या व्यवस्थित ऐकू जाईल अशा चार पदरी आवाजात गुणगुणंत किंवा घरघरंत जास्त योग्य होईल Wink ! नियमितपणे ही गाणी कानावर पडंत गेली.
मी अगदी वरवर हुशार, ठीकठाक, तुमच्यात रसं असलेले, संसारी ते जसजसे अंतरंगात डोकवायला जालं तसे विचित्र, गूढ , तूटक, वैरक्त्य आलेले यात हिंदोळे घेणाऱ्या स्वभावाचे लोक जवळून पाहिले आहेत !! मीही याच हिंदोळ्यावर बसते कधीकधी, वंशपरंपरेने मिळालायं तो कुठला चूकायला .बरं फक्त वडिलांकडून नाही आईकडून सुद्धा. या डबल जेनेटिक माऱ्यामुळे मोठा होऊन माझ्या मुलानं किंवा मुलीनं मुक्तीचा मार्ग निवडला तर मला आश्चर्यापेक्षा obviously वगैरे वाटून आनंदच होईल.
वैराग्याचे झटके नियमितपणे येणाऱ्या लोकांसोबत शरीराने आणि मनाने लहानाची मोठी झाले. छोट्या शहरात राहून हे विश्वची माझे घर होत गेले. अशा रुजवलेल्या संस्कारात मनाचा वृक्ष मोठ्ठा होत गेला. जुनी उत्तरं मिळतं गेली, नवे प्रश्न पडत गेले. माझा दातं दुखतो आहे म्हणून स्वतः जेवण न जाणारे पपा कधीही मला तुझे रूप चित्ती राहो मधल्या गोरा कुंभारासारखे विसरून जातील वाटायचं . कधी कधी काही असं सांगायचे आई काय किंवा पपा काय की ते "आपल्याच नादात" बोलले असतील असे वाटून घ्यावे म्हणावं तर खूप मोठा अध्यात्मिक दृष्टीकोन असायचा. त्यामुळे एकेका माणसाच्या स्वभावाची खूप मोठी रेंज असू शकते हे कळलं. हे त्या त्या क्षणी त्या त्या परिस्थितीत तितकेच खरे असते हे ही हळूहळू लक्षात यायला लागले.
या सगळ्यामुळे की काय मी फार चटकन माणसं ओळखायला शिकले. पण असे नुसते ओळखणे म्हणजे समजून घेणे नाही हे कळायला दोन तपं लागली ! आईला मोठी तोऱ्यात म्हणायचे , मलानं लगेच कळतं बघं कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय. नंतरनंतर नियमित ध्यानामुळे तर माणसांची मन आरशासारखी दिसायला लागायची. कुणी आपल्या खऱ्याखुऱ्या भावना लपवत असेल तर तेही कळायचं. काही काळातं ही गम्मत संपली. हळूहळू ह्यात काही अर्थ नाही व मला माणूस म्हणून अध्यात्मिक प्रगती करण्याच्या मार्गात हे
वृथाच नाही तर अडसरकारक आहे हे जाणवले. दुसऱ्यांच्या मनाचे मनात विश्लेषण करण्यासाठी ऊर्जा घालवायची नाही असे ठरविले. ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष केले कारण हेच माझ्या सरोवरासम शांत मनात वारंवार खडे टाकायचे.
मगं स्वतःच स्वतःचे मनं त्रयस्थासारखे पृथक्करण करून पहायला शिकले मी.
या सगळ्यासाठी अशा गाण्यांनी गोष्टींनी मोठेच सहाय्य केले. कसे ते नाही माहिती पण केले .जर माझ्या रामाला पूर्वसंचित चुकले नाही तर मी कोण कःपदार्थ ! रामावर पराकोटीचे प्रेम होते. पुत्रवत् म्हणाले तरी चालेल. पुत्र होईपर्यंत माझी सत्यनिष्ठा मला उघडउघड म्हणू द्यायची नाही हे. मन म्हणायचे ज्याचा अनुभूती नाही त्याशी एवढी मोठी तुलना. एवढे धारिष्ट्य, राम राम. पण आता हे वक्तव्य असत्याचे किंवा अतिशयोक्तीचे वाटतं नाही. कारण आता आयुष्यात पुत्रही आहे आणि पुत्रवत् रामही! हळूहळू रामाकडून कृष्णाकडे कसा प्रवास झाला की रामाने नेऊन सोडले कळले नाही. राम पहिले प्रेम आणि कृष्ण शेवटचे. कुणावर जास्त हा विचारही त्रासदायक वाटतो. तरीही रामाच्या नावाने मन जसे शांत होते तसे सहज शांत मन कुठल्याही नामाने होतं नाही. तसे नामंच नाही या भूतलावर, अगदी माझ्या कृष्णाचे सुद्धा नाही. क्षमा मधुसूदना !
बाबुजींना राम मला जेवढा आवडतो तेवढाच आवडत असावा. कारण त्यांनी गीत रामायणात गायलेला हरेक शब्द स्वयंभू रामरूप आहे. आयुष्यात आलेल्या संघर्षाशी, दारिद्र्याशी अविरत लढूनही त्यांच्या आवाजातले आर्त या दोन्ही गाण्यांमध्ये काकणभर सुद्धा कमी नाही.
ही गाणी माझ्यासारख्या 'राममानसी' मनांना वाचा आणि वैचारिक खाद्य देतात. ही गाणी कधीही ऐकली मन मनातल्या गतकाळातील 'रामराज्यात' जाते व नव्या उमेदीने व निकोप मनाने नित्यनूतन संघर्षाला सामोरं जायला सक्षम होते. रखरखीत जमीनीवर पाणी शिंपडते जणू !
अध्यात्मिक मनाला संसार कधीकधी तुरुंगासारखो जाचतो तेव्हा ही गाणी परोल वर सुटका करतात.
ह्या गाण्यात राम भरताला काय म्हणाला किंवा भरत रामाला काय म्हणाला हे महत्त्वाचे नाहीच खरंतर ! रामासारखा अपरिमित अन्याय होऊनही इतरांशी न्यायाच्या मर्यादेत रहाणे आणि भरतासारखी परिस्थिती आली असता सारासार विवेकाने व तत्वनिष्ठतेने हतबलता दूर करणे हेच ह्या गाण्याचे सार आहे. माझ्या मते ही दोन गाणी अध्यात्मिक मनाचा चिंतनात्मक प्रवास आहेत. जेव्हा आपण जाणून घेऊ की आपण पराधीन आहोत तेव्हाच त्याचे रूप चित्ती राहील! मी रामाविषयी अखंड लिहू शकते पण पुरे करते. कारण एक क्षणही आपण निर्विचार आणि दोषरहीत झालो तेव्हा आपल्यातला रामच उरतो.
तुम्ही ही ऐका राममनातल्या रामनामाला !!
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम

।।रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती।।
।।जय श्रीराम।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अध्यात्मिक पाया असलेल्या संवेदनशील मनाचा आरसा म्हणजे हा लेख. मन भरून आले. हि गाणी हृदयाच्या फार फार जवळची आहेत. लहानपणी सतत कानावर पडलेली. आई सतत गुणगुणत असलेली. समोरच्या देवळात नेहमी लागणारी. तिथल्या भजनाच्या कार्यक्रमात नेहमी गायिली जाणारी. पहाटे पहाटे आकाशवाणीवरून प्रसारित होणारी. लहानपणी या गीतांमुळे जाग येत असे. पुढे पुढे ती कानावर पडणे कमी होत गेले. आयुष्यातली पहाट या गीतांनी जागवली. पवित्र केली.

गीतरामायणाच्या निर्मितीविषयी बाबुजींनी एका कार्यक्रमात फार ह्रिदय आठवणी सांगितल्या आहेत. त्या इथे प्रस्तुत करणे योग्य होईल असे वाटते:

https://youtu.be/SM_RiiCTCao

बाबुजींचा ह्रदयाला भिडणारा आवाज. तो आवाजच तसा होता. त्याविषयी स्वतंत्र चर्चाच हवी. अत्यंत कष्टातून स्वत:ला घडवून निर्माण झालेल्या या विभूती होत्या. बाबूजी गेल्यानंतर कित्येक वर्षे हि गाणी ऐकववली नाहीत. आयुष्यात सुद्धा बरीच स्थित्यंतरे झाली. काळ कुणासाठी थांबतो? आता ते लहानपणीचे घर, ती मोठी माणसे, ते वातावरण, तो काळ. काही काही राहिले नाही. सगळे एकेक मागे पडले. काही वर्षांपूर्वी नात्यातीलच एका आजोबांशी गप्पा मारत होतो. नव्वदीच्या पुढे वय. आयुष्यात खूप चढ उतार बघितलेले. अतिशय कठीण परिस्थितीशी सामना केलेला. त्यातूनही न डगमगता कुटुंबाला तारून नेले होते. ऐकून थक्क होईल असा त्यांच्या आयुष्याचा प्रवास. बोलता बोलता या गीतांचा विषय निघाला. मला म्हणाले, "तुम्ही गाता का? अरे वा! तुझे रूप चित्ती राहो येते का तुम्हाला? म्हणा बघू..." अनेकानेक वर्षांनी गाण्याची कुणीतरी आठवण काढली होती. मी गायला सुरवात केली खरी पण "उडे अंतराळी आत्मा, सोडूनी पसारा" म्हणून थांबलो. कंठ दाटून आला. पुढे गाताच येईना. अगदी एकदोन वर्षांपूर्वी पर्यंत हि गाणी गुणगुणताना कंठ दाटून येत असे. "खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा.." बाबुजींचा आवाज आणि त्या लहानपणीच्या आठवणी सोबत हे सूर खोलवर कुठेतरी रुतून बसले होते. कंठ रुद्ध होई. गायिले जात नसे. पण हेतुपुरस्सर हि सवय मोडून काढली. आणि मागच्या वर्षी दिवाळी पहाट मध्ये बाबूजींचीच एक दोन गाणी गायिली. भर कार्यकमात "कर्तव्याने घडतो माणूस" मधल्या "कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जिवांचा, क्षणभंगुर हि संसृती आहे खेळ ईश्वराचा" या ओळी गाताना सर्वांसमोर अश्रू येतील कि काय अशी भीती वाटत होती. पण तसे झाले नाही. त्या गाण्यातल्याच तत्त्वज्ञानाने अखेर आधार दिला. गाऊन संपले कधी आणि टाळ्यांचा कडकडाट झाला कधी कळले नाही.

>> दुसऱ्यांच्या मनाचे मनात विश्लेषण करण्यासाठी ऊर्जा घालवायची नाही असे ठरविले. ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष केले कारण हेच माझ्या सरोवरासम शांत मनात वारंवार खडे टाकायचे.

तंतोतंत सहमत. वयानुसार अनुभवांनुसार आपल्याला वैचारिक परिपक्वता येते आणि मग मन:शांती इतकी किमती गोष्ट कोणतीही नाही हे आपण कळून चुकतो. तळ ढवळून निघण्याइतका मनाचा दाह कधीही होऊ देऊ नये इतकीच काळजी घेत राहतो. इतर गोष्टी फार महत्वाच्या राहत नाहीत. ढवळल्या गेलेल्या हेलकावे खाणाऱ्या मनाला योग्य दिशा दिसणे कठीण असते. म्हणून ओढवलेल्या कठीण प्रसंगी बाकीचे काही नाही, तर मनाची शांतता फार महत्वाची असते. योग्य ते निर्णय घ्यायला व त्यानुसार कृती करायला त्याचीच गरज असते.

एक सुंदर लेख दिल्याबद्दल आभार.

मला राम कधीच नाही कळला. एका धोब्याच्या सांगण्यावरून पत्नीचा त्याग करणाऱ्या, अग्नीपरिक्षा द्यायला लावणाऱ्या, एकपत्नी रामापेक्षा मला स्त्रीला माता, प्रेयसी आणि सखी म्हणून समजून घेणारा कृष्ण जवळचा वाटतो. मग भले तो एकपत्नी का नसेना.

मी खूप प्रयत्न केला रामाला समजून घेण्याचा पण नाही कळला. जर कोणाला समजला असेल तर नक्की सांगा प्लीज.

सर्व प्रतिसादांचे धन्यवाद.
नौटंकी मी समजू शकते. मीही या अवस्थेतून गेले आहे. म्हणूनच कदाचित कृष्णावर स्थिरावले आहे. पण जेव्हा जेव्हा ही गाणी ऐकण्यात येतात तेव्हा मन रामाकडे जाते. Happy
atuldpatil प्रतिसाद खूप आवडला. आठवणी ह्रद्य आहेत तुमच्या Sad ! रिलेट करता आले. लिंक नक्कीच बघेल. धन्यवाद Blackcat, आनंद, प्रणवंत, कुमार सर, नौटंकी आणि atuldpatil !
अध्यात्मिक पाया असलेल्या संवेदनशील मनाचा आरसा म्हणजे हा लेख >>> तुमच्या पर्यंत पोहोचले मला काय म्हणायचे होते. माझ्या लेखांना वाचक कमी आहेत. कारण ते "जड" होतात. आभार.
बाबुजींच्या इतर भक्तीपर गाण्यांची चर्चा इथे झाली तर मलाही आवडेल.
धन्यवाद Happy

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
या चार साध्या ओळी, पिता पुत्राचे खरे नाते सहज सांगुन जातात . आपला लेख आवडला. खूप छान.

सगळीच दहाच्या दहा कडवी जीवनाचे सार सांगतात खरंतर पण मलाही 'यथा काष्ठं च काष्ठं च' आवडते. फक्त पिता पुत्रच नाहीतर सगळ्यांंच नात्याबद्दल म्हणू शकतो.
धन्यवाद sanjeev washikar Happy !

खुप छान लिहिलंय, अतुल पाटिल यांचा प्रतिसाद हि सुंदर. गीत रामायण तर आवडिचेच, त्या व्यतिरिक्त मनोहर कविश्वर यांनी लिहिलेली आणि स्वरबद्ध केलेली दोन गीते सुद्धा खुप आवडिची. एकाचा उल्लेख वर अतुल यांनी केलेला आहे. हे दुसरं, मल्हार रागातलं...

माना मानव वा परमेश्वर...

फारचं सुरेख गाणं आहे राज धन्यवाद.
ऐकलं असेलच पण विसरले होते . खरंच आभार.
प्रतिसादासाठी धन्यवाद Happy !

मला अध्यात्मातलं जास्त काही कळत नाही पण देवावर माझी नितांत श्रद्धा आहे. माझी तीन वर्षांची मुलगी रोज तिच्या बोबड्या स्वरात रामरक्षा म्हणते तो क्षण मला राम दर्शना इतकाच आनंद आणि समाधान देऊन जातो.माझी आजी नेहमी म्हणते आयुष्य कसं जगावं हे रामा कडून शिकावं,माझ्या मते अत्यंत बिकट परिस्थितीतही आपण दुसाऱ्यांना दोष न लावता आपण आपले कर्तव्य चोख बजावणे म्हणजेच राम.
खूप सुंदर लेख, गदिमा चे गीतरामायण त्यातल्या त्यात पराधीन आहे जगती हे माझंही आवडत गाणं.

@अस्मिता माझ्या लेखांना वाचक कमी आहेत. कारण ते "जड" होतात अस तुम्ही वरती एका प्रतिसादात लिहिलं मला वाटत तुमचा लेख जड होत नाही तर नेहमीच विचारांना नवीन दिशा देतो.तुम्ही असेच सुंदर सुंदर लेख लिहीत जा.

छान लिहिलय !
माझ्या लहानपणी कॅसेट प्लेयर ही वस्तू मध्यम वर्गीयांच्या ऐपती बाहेरच होती.
रामनवमीला गीत रामयण कॅसेट ऐकणे हा सार्वजनीक कार्यक्रम असे.
आपल्याला नोकरी मिळाली की पहिल्या पगारातून कॅसेट प्लेयर व संपूर्ण गीत रामायण केसेट खरेदी करू असे मित्रा मित्रात ठरायचे !
@नौटंकी व इतर,
इथे कदाचित विषयांतर होईल पण राम अयोध्येतून विजयी होऊन आल्यानंतरचा भाग, ( धोबी, अग्नीपरिक्षा ई ई ) प्रक्षिप्त ( नंतर घुसवलेला) आहे असे बर्‍याच अभ्यासकांचे मत आहे.

इथे कदाचित विषयांतर होईल पण राम अयोध्येतून विजयी होऊन आल्यानंतरचा भाग, ( धोबी, अग्नीपरिक्षा ई ई ) प्रक्षिप्त ( नंतर घुसवलेला) आहे असे बर्‍याच अभ्यासकांचे मत आहे. >> असच असावं Happy

धन्यवाद kashvi, सुंदर प्रतिसाद
माझी तीन वर्षांची मुलगी रोज तिच्या बोबड्या स्वरात रामरक्षा म्हणते तो क्षण मला राम दर्शना इतकाच आनंद आणि समाधान देऊन जातो.....किती गोड !
बरोबरच म्हणते आज्जी !
धन्यवाद Happy
धन्यवाद अवलताई, vijaykulkarni ,नौटंकी Happy !
vijaykulkarni तुम्ही जे उत्तर रामायणाबद्दल सांगताय ते मलाही माहिती नव्हते. धन्यवाद

छान मांडणी आहे. आवडलं.
गीत रामायण ऐकताना खरंच जाणवतं हा नुसता आवाज नाही , ही अनुभूती आहे.

सुधीर फडकेंचं मूळ गीत ऐकल्यावर कदाचित दुसऱ्या कुणाचं ऐकावसं नाही वाटणार .. पण एक फ्रेश आवाज म्हणून ह्या गायकाने गायलेलं मला आवडलं.. खूप वेळा ऐकलं आहे हे मी .

https://youtu.be/_ID6UxMHzx8?si=meBc-cpZPW1XNcth

ओरिजिनल सुद्धा 1 - 2 वेळा ऐकलं आहे . ओरिजिनल मधली 2 - 3 मी रिपीटवर ऐकत असते , राम जन्मला गं सखी , सावळा गं रामचंद्र , ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा , मार ही त्राटिका रामचंद्रा ...

गीतरामायणातलं नाही पण महाभारतातील गीतेच्या प्रसंगावर स्वतंत्रपणे लिहिलं असलेलं विमोह त्यागूनी - सुधीर फडकेंचं निव्वळ अप्रतिम आहे ..
अशी आणखी गाणी हवी होती असं वाटत राहतं . महाभारतातल्या प्रसंगांवर फारशी गाणी नसावीत .. फार फार तर भरजरी गं पितांबर दिला फाडून , चिंधी बांधते द्रौपदी ... बाकी सगळी राधा , गोपी , गवळणी , गोकुळ , वृंदावन - अशी खूप आहेत . पण प्रॉपर महाभारतावरची मराठी गाणी नाहीत .

सुंदर लिहीले आहे! लेख पूर्वी वाचला आहे असे आठवते.

गीतरामायणातील पहिली काही गाणी मला खूप आवडतात. एकूण गदिमांचे गीतलेखन प्रचंड आवडीचे आहेच.

वरती उल्लेख केलेले "विमोह त्यागूनी कर्मफलांचा" हे माझेही आवडीचे गाणे आहे.

माझी तीन वर्षांची मुलगी रोज तिच्या बोबड्या स्वरात रामरक्षा म्हणते तो क्षण मला राम दर्शना इतकाच आनंद आणि समाधान देऊन जातो >>> यावरून गीतरामायणातल्याच ओळी आठवल्या - "सावळा गं रामचंद्र, करी बोबडे हे घर, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार" Happy

लेख वर आणल्याबद्दल radhanisha थँक्यु ... तेव्हा नव्हता वाचला.
खूप छान लिहिलं आहे, अतुल ह्यांचं प्रतिसाद ही आवडला.

धन्यवाद राधानिशा, फारएन्ड, सामो. Happy

राधानिशा, ऐकलं तेही, छान गायलं आहे. फ्रेश आवाज आहे खरा पण मला फडकेंचीच शैली वाटली.

वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार" >>> Happy

मी फार नवखी होते हे लिहिलं तेव्हा, त्यामुळे मला आता वाचवत नाहीये, चुकाच दिसतात. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी वेगवेगळे(काहीही) लेखन केले व आता इथे स्थिरावले आहे.

असाच लोभ असू द्या. खरंच .... ! Happy

लेख वर आणल्याबद्दल radhanisha थँक्यु ... तेव्हा नव्हता वाचला..... +१.

अस्मिता,खूप सुंदर, आतून लिहिलंय.तुझा आणि अतुल यांचा प्रतिसादही सुरेख आहे.
पण तलावाच्या काठाकडे जाऊनही पाय कोरडे असावेत तसे मला वाटलं कारण शैलपुत्री यांच्या सारखाच मलाही प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे नेमके काय?
आईच्या बाबतीत,मध्यम वयात आल्यावर जाणवले अरे तिने कधीही देवापुढे हात जोडलेले आपण पाहिले नाहीत.ती नास्तिक आहे.पण तीच म्हणते माझा अध्यात्मावर विश्वास आहे.म्हणजे काय विचारल्यास तसे मला नीटसं सांगता येणार नाही असे म्हणाली
केवळ पूजाअर्चा म्हणजे अध्यात्म नाही इतकेच कळते.
जमल्यास सांग.

छान आहे हा लेख. पराधीन आहे जगती - माझ्या आवडत्या गीतांच्या यादीत बर्‍याच वरच्या ठिकाणी आहे. यातले शब्द अलौकिक आहेत आणि विचार प्रसंगातीत/कालातीत आहेत. म्हणजे जरी भरतभेटीच्या प्रसंगी हे गाणं आलं असलं तरी कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात कुठल्याही प्रसंगी हे शब्द लागू होतात, त्यामुळे हे अजरामर आहे. कालिदास म्हटलं की जसं 'नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण' आठवतं किंवा शेक्स्पियर म्हटलं की 'all the world's a stage' आठवतं तसं गदिमांचं 'पराधीन आहे जगती' आहे.

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ | समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागम: ||
वाल्मिकींच्या या एका श्लोकावर आणि त्यात मांडलेल्या विचारावर आधारित गदिमांनी आख्खं गाणं लिहिलं! त्या श्लोकाचा अनुवाद असलेलं एक कडवंही ह्यात आलं आहे. - दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट | एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ | क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा || भगवद्गीतेचं सार त्यातल्या श्लोकागणिक उलगडून सांगण्याचं जे कार्य ज्ञानेश्वरांनी केलं, त्याच कविकुळाचा (स्कूल ऑफ थॉट या अर्थाने) भास गदिमांचं गीतरामायण ऐकताना होतो.

लेख तर छान आहेच पण प्रतिक्रियाही तेवढ्याच ताकदीच्या आहेत. वरची हरचंद पालव ह्यांची‌ प्रतिक्रिया आवडली.

Pages