उलट तपासणी (भाग २)

Submitted by हर्षल वैद्य on 25 March, 2020 - 00:40

मागील कथासूत्र
https://www.maayboli.com/node/73840

यथावकाश सर्वजण प्रथमेशची घटना विसरून गेले आणि पार्थसारथींची प्रयोगशाळा पुन्हा एकदा त्याच जोमाने सुरू झाली. प्रथमेशच्या जागी एक अनिमेष सिन्हा नावाचा नवीन मदतनीस नेमण्यात आला. अनिमेष बी. एच. यू. चा एमएससी होता आणि प्रचंड उत्साही होता. बंगलोरमध्ये तो तसा नवीनच असल्याने संस्थेने त्यास अतिथिगृह उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे फार उशीरापर्यंत तो काम करत बसे. पीएचडीच्या विद्यार्थ्यांशी त्याची साहजिकच चांगलीच गट्टी होती. प्रथमेशची कहाणी त्यामुळे त्यास माहीत होती. पण कोणत्याही गोष्टीची फिकीर करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. बंगलोरमध्ये त्याच्या परिचयाचे तसे कोणी नसल्याने आणि इतर कसली आकर्षणे नसल्याने अनिमेषने कामात स्वतःला झोकून दिले होते. रजा घेणे सोडाच, तो शनिवार रविवारीही बराच वेळ प्रयोगशाळेतच घालवी.

त्यामुळे एक दिवस अनिमेषने जेव्हा आजारपणासाठी रजा घेतली तेव्हा पार्थसारथींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यापूर्वी एकदा अनिमेषला हा त्रास झाला होता, पण तेव्हा त्याने रजा घेतली नव्हती. जमेल तसे काम केले होते. त्यामुळे 'आज अनिमेषने रजा घेतली आहे' हे कळताच तडक पार्थसारथी त्याला भेटायला अतिथिगृहावर गेले. एकंदरीत परिस्थिती पाहून त्याला लगेच रुग्णालयात न्यायला हवे हे त्यांच्या लक्षात आले. इतर सर्व व्यवस्था ताबडतोब करून पार्थसारथी स्वतः त्यास रुग्णालयात घेऊन गेले. तातडीच्या उपचारांनी अनिमेष बरा होईल अशी चिन्हे वाटू लागली पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची तब्येत चांगलीच खालावली. त्याच्या कुटुंबियांना तातडीचे बोलावणे पाठवण्यात आले. सुदैव एवढेच की त्यांची अनिमेषशी भेट तरी झाली. ते बंगलोरात पोहोचले त्या संध्याकाळीच अनिमेषचा खेळ आटोपला.

अनिमेषच्या मृत्यूनंतर पार्थसारथींचा संशय अधिक बळावला आणि आजारी पडण्यापूर्वी अनिमेष व प्रथमेश कोणत्या प्रकारचे प्रयोग करत होते त्याची स्वतः पडताळणी करण्याचे त्यांनी ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी मीराला त्यांच्या खोलीमध्ये बोलावले. मीरा चांद ही त्यांची एक आवडती विद्यार्थिनी होती आणि चुंबकीय बलाचा जनुकीय संरचनेवर होणारा परिणाम या विषयावर संशोधन करीत होती. हे दोघे शेवटच्या आठवड्यात कोणते प्रयोग करत होते ते शोधण्याची जबाबदारी त्यांनी तिच्यावर सोपवली. पार्थसारथींच्या शिस्तीचा एक भाग म्हणजे त्यांच्या प्रयोगशाळांमधल्या नोंदवह्या नियमित भरल्या जात. त्यातील नोंदींवरून या प्रश्नाचा छडा लावणे सोपे होते. मीराला पार्थसारथींनी हे काम तातडीने करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मीरा आवश्यक त्या नोंदी घेऊन पार्थसारथींच्या खोलीमध्ये हजर झाली. तिच्या निरीक्षणांवरून असे दिसत होते की प्रथमेश व अनिमेष दोघेही शेवटच्या काही दिवसात सर्वोच्च क्षमतेच्या चुंबकीय क्षेत्रासंबंधी काही प्रयोग करत होते. पार्थसारथींनी मीराला त्या प्रयोगांतील विषाणूंचे नमुने उपलब्ध आहेत का ते शोधण्यास सांगितले आणि असल्यास त्यांचे जनुकीय गुणधर्म पुन्हा एकदा नीट तपासण्यास सांगितले.

प्रयोगशाळा या दुसऱ्या घटनेनंतर काही दिवस बंद होती. पार्थसारथींनी असा निर्णय घेतला की चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास तात्पुरता कमी क्षमतांच्या क्षेत्रापुरताच मर्यादित ठेवायचा. मीराचा अहवाल येईपर्यंत ते हा प्रयोग पुन्हा सुरू करण्यास तयार नव्हते. इतर प्रयोग जसे हळूहळू सुरू झाले तसे चुंबकाच्या संचालनासाठी माणसाची आवश्यकता भासू लागली. सुहास हिरेमठची निवड त्यामुळे लगेच करण्यात आली आणि अनिमेषच्या जागी सुहास रुजू झाला. सुहास हा प्रथमेशचाच बीएससीचा वर्गमित्र. मात्र त्याने एमएससी पूर्ण न करता जैव-वैद्यक अभियांत्रिकीचा एक वर्षाचा एक कोर्स केला होता. एका रुग्णालयामध्ये तो तंत्रज्ञ म्हणून कामाला होता. त्या रुग्णालयातील अनुभवांच्या आधारावर एखाद्या मोठ्या रुग्णालयात नोकरी मिळेल असे त्याचे गणित होते. इथून चांगली शिफारस मिळेल अशी आशा होतीच. पहिल्याच दिवशी पार्थसारथींनी सुहासला खोलीमध्ये बोलावले. या वेळी ते निवडप्रक्रियेत सहभागी झाले नव्हते. त्यामुळे सुहासची ही त्यांच्याशी पहिलीच भेट होती. त्यांनी सुहासला मागील दोन दुर्घटनांची थोडक्यात कथा सांगितली आणि त्यांच्या त्यासंबधातल्या शंकाही सांगितल्या. नंतर त्यांनी स्वतः सुहासला कंट्रोलरूममध्ये नेऊन नियमित करावयाचे काम दाखवले. चुंबकीय बलाची क्षमता कोणत्याही परिस्थितीमध्ये १०० पृथ्वी या मर्यादेच्या खालीच ठेवण्याचे स्पष्ट निर्बंध असल्याचेही सांगितले. दुसऱ्या दिवसापासून सुहास रुजू झाला. तंत्रज्ञ म्हणून आधी काम केलेले असल्याने त्याने प्रयोगशाळेतील सर्व यंत्रांचे चलनवलन भराभर आत्मसात केले आणि यंत्रांवरील सर्व प्रकारची कामे अतिशय कुशलतेने करू लागला. खोळंबलेले सर्व प्रयोग हळूहळू मार्गी लागू लागले.

मीरा तिच्या तपासण्यांचे काम करत होतीच, पण तिला विशेष काही गवसत नव्हते. विषाणूंचे नमुने इतर कमी चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या विषाणूंपासून फारसे वेगळे नव्हते. त्यांच्या पुनरुत्पादनाचा वेग अपेक्षेएवढाच होता आणि त्यांच्या गुणसूत्रांमध्ये काही बदल झाल्याचे आढळत नव्हते. त्या विषाणूंच्या समूहाचा भौतिक बदलांना, उदा. प्रकाशाची तीव्रता, तापमान अशा घटकांना सर्वसामान्यच प्रतिसाद होता. काही रासायनिक उत्तेजकांना मात्र या विशिष्ट विषाणूंच्या नमुन्याचा मिळणारा प्रतिसाद अधिक तीव्र आहे असे तिच्या लक्षात आले. हे नमुने तसे जुने असल्याने तिचे निष्कर्ष खूप ठोस स्वरूपाचे नव्हते. तरीही तिने पार्थसारथींच्या कानावर आपले निष्कर्ष घालण्याचे ठरवले. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी मीराची भेट होण्यापूर्वीच पार्थसारथींना एका तातडीच्या मीटिंगसाठी दिल्लीला जावे लागले. आता चर्चेसाठी अजून दोन दिवसांचा खोळंबा होणार होता.

मीराच्या मनात या संधीचा फायदा उठवण्याची एक जबरदस्त कल्पना आली. चुंबकीय क्षेत्राचा विषाणूंच्या रासायनिक प्रतिक्रियांवर होणारा परिणाम तिने शोधला होताच. हा परिणाम बहुधा वाढत्या चुंबकीय क्षेत्राबरोबर हळूहळू वाढत जाणारा नसून क्षेत्राची तीव्रता एका विशिष्ट क्षमतेपुढे वाढली की अचानक घडून येणारा होता असा तिचा कयास होता. मात्र या आधीचे दोन्ही नमुने थोडे जुने असल्याने प्रयोगांचा अचूकपणा म्हणावा त्या प्रमाणात नव्हता. मीराने सुहासला भेटून एक नवीन नमुना तयार करण्याची गळ घातली. तिच्यामते जेव्हा नमुने चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर काढले जातात तेव्हा ते सर्वाधिक कार्यशील असतात आणि म्हणून सर्वाधिक धोका हा नमुने बाहेर काढल्यावर करताना करण्याच्या प्राथमिक चाचण्या करताना असतो. तेव्हा या टप्प्यावर काळजी घेतली म्हणजे झाले असे तिचे म्हणणे होते. प्रथमेश आणि अनिमेषच्या मृत्यूचा छडा तर या प्रयोगाने लागेलच पण जीवशास्त्रामध्ये हा शोध एक मैलाचा दगड ठरेल असे तिने सुहासला पटवून दिले. दुसरे म्हणजे तिच्या मते १००० पृथ्वी इतक्या तीव्र क्षेत्राची या प्रयोगास आवश्यकता नव्हती. तिच्या मते ३०० पृथ्वी इतके क्षेत्र जरी पुरेसे असले तरी ५०० पृथ्वी क्षमतेच्या क्षेत्राने प्राथमिक निष्कर्ष निश्चितपणे सिद्ध होतील अशी तिची खात्री होती. मीराच्या म्हणण्यास सुहास राजी झाला आणि त्या रात्री त्यांनी हा प्रयोग पूर्ण केला.

पुढील कथासूत्र
https://www.maayboli.com/node/73853

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults