माणसं बदलत राहतात.. तुम्ही काय किती बदलला आहात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 November, 2019 - 06:21

कॉलेजातला जुना मित्र आपल्याला अचानक बाजारपेठेत दिसतो. शर्ट पॅन्ट ईन खोचून. बायकोचा हात धरून. कडेवर पोरगा. खांद्यावर पिशव्या. आणि आपल्याला प्रश्न पडतो सतरा पोरींच्या भानगडी करणारा आणि त्यातल्या चारचौघींच्या कानाखाली खाणारा परश्या हाच का? पण आता त्याचा परशुराम झाला असतो जे त्याला ईतक्या वर्षांनी पाहिलेल्या आपल्या पचनी पडत नाही.
असंच मग एखादा शिवीगाळ शिवाय एकही पुर्ण वाक्य न बोलणारा पक्या आता रोज टिळा लाऊन सत्संगच्या नादी लागलेला दिसतो. तर एखादा आधीचा गूडबॉय चंदन आता दारूशिवाय आपल्याला जमतच नाही असा झाला असतो.
शाळेतली एखादी काकूबाई नम्रता आता फेसबूक आणि ईन्स्टावर आपले जीव जळवणारे फोटो टाकत असते. तर एकेकाळची रोज क्वीन मात्र सुटलेल्या अंगाची पर्वा न करता आपल्या चिल्यापिल्यांसह मिरवत असते.

माणसाचा स्वभाव बदलत नाही असे म्हणतात. ते खरेही असेल. पण त्याचे विचार, त्याची जीवनशैली, त्याच्या सवयी, त्याच्या आवडीनिवडी. त्याचे बारीकसारीक छंद आमूलाग्र बदलू शकतात. नव्हे बदलतातच. तरच ते जिवंतपणाचे लक्षण समजावे.

आपल्या स्वत:मधील काळाच्या ओघात झालेले असेच बदल टिपूया आणि ईथे लिहून स्वत:लाच चकित करूया.

सुरुवात मी आठवेल तसे करतो...

एक चित्रपटांचे वेड होते. जेव्हा दक्षिण मुंबईत केबल टीव्हीची सुरुवात झाली, ३० रुपयात महिन्याला ४० चित्रपट बघा अशी जाहीरात असायची. तेव्हा आईच्या कुशीत लोळत चाळीसच्या चाळीस चित्रपट बघितले जायचे. शनिवारी आणि रविवारी नवीन प्रदर्शित चित्रपट लागायचे ते कोणते लावणार हे आधीच केबलवाल्याला विचारून त्यानुसार विकेंड प्लान केले जायचे. अमिताभचा हम चित्रपट बघायला अशीच एक फॅमिली पिकनिक ऐनवेळी कॅन्सल केल्याची आठवण अजूनही घरचे सांगतात. आणि मग तेव्हा तो अपेक्षेला उतरला नव्हता तरीही ती खंत कोणाच्या बोलण्यात जाणवत नाही यामागेही चित्रपटप्रेमच.

पुढे ईतके चॅनेल ईतके चित्रपट झाले की एकाच वेळी दहाबारा चॅनेलवर चित्रपट चालू असायचे. मी आणि आई रिमोटचा ताबा घ्यायचो. चॅनेल सर्फ करायचो आणि कोणता बघायचा हे ठरवायचो. वर्षाला साधारण ५०० चित्रपट बघितले जायचे. एक काळ मग असा आला की सगळे चॅनेल सर्फ करूनही हा पाहिलाय, हाही पाहिलाय, असा जप करून अखेर मग पाहिलेल्यांपैकीच एखादा पुन्हा बघितला जायचा.
आईच्या कृपेने देवानंद, शमी कपूर, ऐन तारुण्यातला देखणा धर्मेंद्र यांचे बरेच चित्रपट बघितले गेले. नाहीतर गाडी अमिताभपलीकडे हलली नसती.
पुढे सुदैवाने मी आणि आई दोघांनाही शाहरूख खान आवडू लागल्याने त्याच्या अश्लीलता वा वाह्यातपणा नसलेल्या कैक कौटुंबिक प्रेमपटांची पारायणे घडू लागली. त्याचा "कभी खुशी कभी गम" हा आमच्या घरातील सुर्यवंशम आहे. चॅनेल सर्फ करताना सापडतो तेव्हा किमान पाऊणेक तास बघूनच पुढच्या चॅनेलकडे वळले जाते.

असो, तर एकेकाळी जेव्हा आजूबाजूचे जग एकता कपूरच्या डेलीसोपमध्ये रममाण होते, वा गेला बाजार खिचडी, साराभाई बघत होते तेव्हाही आमच्याकडे चित्रपट एके चित्रपटच चालायचे.
पण मग पुढे आईने सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली. मराठी मालिका बघायला सुरुवात केली. मी सुद्धा ईंजिनिअरींग आणि जॉबमध्ये रममाण झालो ते चित्रपट बघायचे बंद झाले ते झालेच.
एकेकाळी वर्षाला ५०० चित्रपट बघणारी आम्हा मायलेकरांची जोडी. गेल्या सात वर्षात मी मोजून पंधरा चित्रपट बघितले असावेत. आईने कदाचित पाचही नाहीत.
चित्रपट बघायला जो सलग अडीच तासांचा वेळ द्यावा लागतो तो आता नकोसा वाटतो. त्यामुळे या पंधरातील बहुतेक चित्रपट थिएटरातच जाऊन बघायचा योग आला. मराठी प्रेमामुळे दुनियादारी, मुंबईपुणेमुंबई, सैराट, फास्टर फेणे बघितले गेले. तर शाहरूखप्रेमामुळे चेन्नई एक्स्प्रेस, फॅन, रईस, डिअर जिंदगी बघितले गेले.
आज हाताशी यूट्यूब आहे, मायबोलीसारख्या संकेतस्थळावर अकाऊंट आहे त्यामुळे ट्रेलर बघणे, परीक्षणे वाचने, न पाहिलेल्या चित्रपटांवरही जीव तोडून चर्चा करणे हे प्रकार सुटले नाहीत हेच काय ते माझे उरलेसुरले शिल्लक चित्रपटप्रेम Happy

२) एक चित्रपटप्रेम असते तर दुसरे क्रिकेटप्रेम. दोन्ही सिद्ध केलेत तर तुम्हाला भारतीय असल्याचे सिद्ध करायला वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही असे म्हणतात.
जेव्हा मी वर्षाला पाचशे चित्रपट बघायचो तेव्हाही क्रिकेट मॅचचा एकही चेंडू मिस करायचो नाही. तो अपराध समजला जायचा. मग त्यासाठी ऑस्ट्रेलियन वेळेनुसार सकाळी साडेपाचला उठले जायचे किंवा वेस्ट ईंडिज हा आपल्या शेजारचाच देश असल्यासारखे रात्री ३ वाजेपर्यंत जागले जायचे. सामन्यांचे वेळापत्रक हाती लागताच कालनिर्णय भरून जायचे. मला तर क्रिकेटच्या आकड्यांचे वेड ईतके होते की आवडते खेळाडू सचिन दादा द्रविड यांची वैयक्तिक आकडेवारी माझ्या वहीत लिहिलेली असायची आणि प्रत्येक सामन्यानंतर मी ते आकडे अपडेट करायचो. आता जे नेटवर चुटकीसरशी मिळते ते तेव्हा माझ्या वहीत सापडायचे.

ते निवृत्त व्हायची वेळ आली आणि फार टेंशन येऊ लागले. यांच्यानंतर क्रिकेट बघावेसे वाटेल का हा प्रश्न पडू लागला. क्रिकेट बघणेच नाही तर पुढे आपल्या आयुष्यात छंद काय उरणार याची चिंता भेडसावू लागली. माझे आजोबा होते क्रिकेटवेडे. नव्वदीतही दिसायचे स्पष्ट पण ऐकू कमी यायचे. आजी मोठ्याने टीव्ही लाऊ द्यायची नाही. मग मी कॉमेण्टरी सांगायचो अधूनमधून. मी स्वत:चेही म्हातारपण आजोबांसारखेच बघत होतो. पण आता नाही. काळ बदलला, क्रिकेट बदलले, आवड बदलली. एकेकाळी झिम्बाब्वे केनिया सामनाही मी सोडायचो नाही पण आज फक्त भारताच्याच महत्वाच्या मॅचेस देखील एवढ्यासाठीच बघितल्या जातात की व्हॉट्सपग्रूपवर तावातावाने वाद घालता येईल. पण त्या मॅचेस बघायला आपले ईतर रुटीन बदलायचा विचार मनालाही शिवत नाही.

३) थंडा बोले तो कोकाकोला च्या जमान्यात मी कोक, पेप्सी आणि थम्स अप हे पाण्याच्या समप्रमाणात प्यायचो. रोज दिवसातून किमान दोन वेळा साधारण वा किमान ३०० मिली प्रत्येक वेळी. म्हणजे एवरेज काढायचा झाल्यास दिवसाला पाऊण लीटर वा महिन्याला २० ते २५ लीटर फसफसणारे पेय माझ्या शरीरात फेरफटका मारून बाहेर पडायचे.
शाळेला दहावीत छान पॉकेटमनी मिळू लागला. कॉलेजातही कंटिन्यू राहिला. त्यात हे रोजच्या रोज परवडायचे. तसेच घरीही दोन दोन लीटरच्या बाटल्या फ्रिजमध्ये पडून असायच्या.
रोज संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर हातात प्रेयसीचा हात पकडावे तसे पेप्सीचा ग्लास पकडून घराकडे निघायचो. रोज रात्री दारू प्यावे तसे कोकसोबत चकली फरसाण सोबत घेऊन बसायचो. या फिक्स रुटीनच्या अध्येमध्ये व्हायचे ते वेगळेच.

आणि मग क्धीतरी हे सारे मोहमाया असल्याचा साक्षात्कार झाला. आणि प्रमाण कमी झाले. ते कमी झालेले प्रमाण वर्षाला २५०-३०० लीटरवरून एक लीटरला आले. एखाद्या ओल्या पार्टीत अगदीच राहावले नाही तर एखादा ग्लास हातात. त्यातही आनंदाने सांगावेसे वाटते की गेल्या दिड दोन वर्षात हा मोह एकदाही झाला नाही. थोडक्यात ही आवड हे व्यसन सुटल्यातच जमा आहे.

४) शिवीगाळ हिच आपली संस्कृती, शिव्या हिच कुठल्याही भाषेची खरी संपत्ती, शिव्या दिल्याने मनाच्या आत साचलेल्या घाणीचा निचरा होतो आणि हलके वाटते. ईत्यादी गोष्टींवर माझा एकेकाळी फार विश्वास होता. वाक्यात किमान एक वा अनेक विरामचिन्हे असावीतच त्या शिवाय वाक्य अर्थपुर्ण होत नाही वा आपल्याला काय म्हणायचे आहे ते समोरच्यापर्यंत परीणामकारक पोहोचवता येत नाही हे मी शिव्यांबाबतही समजायचो.
पण जॉबला लागलो म्हणा, मॅच्युरटी आली म्हणा, गर्लफ्रेण्डला चालणारे नव्हते की आणखी काही, पण शिवी सुटली ती सुटलीच. आज लंचटेबलवर दहा बायकांत एकटा पोरगा असून सहजपणे गप्पा मारत बसू शकतो. कारण तोंडातून अपशब्दाचा भ बाहेर पडणार नाही याची असलेली खात्री. गंमत म्हणजे मी एकेकाळी भ चे भंडार होतो हे त्यांना मी स्वत: सांगूनही पटत नाही ईतकी ईमेज पालटली आहे.

५) ..... आठवेल तशी भर टाकली जाईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. माझ्या डोक्यावर कंगवा जाणार नाही इतके दाट, काळे आणि कुरळे केस होते आता डोक्याला टक्कल पडलंय आणि आहेत ते केस पिकायलेत.
२. मला चित्रपट पहायला अजीबात आवडत नसे; अमिताभ बच्चन आवडत नसे; आता बच्चनचे चित्रपटही पाहतो
३. मला धावायला येत नसे पाय दुखत आता धावू शकतो.
४. मला राग येत असे आता येत नाही
५. मला वाद विवाद खूप आवडायचे आता नाही आवडत
६. सचीन मुळे क्रिकेट टीव्हीवर पहायचो आता बघत नाही
७. मला पुलं देशपांडे लेखक म्हणून आवडत नाहीत हे सांगायचो आता सांगत नाही.
८. दिवस वर्तमानपत्राबरोबर चालू व्ह्यायचा आणि टीव्ही पाहून संपायचा आता दोन्ही बंद
९. मला मोदी आवडत नसत आता आवडतात
आणि सर्वात मोठा बदल म्हणजे
१०. मला खोटे बोलता येत नसे आता दहात एखादवेळा जमते

आठवेल तसतसे यादी वाढविण्यात येईल.

छान लिस्ट हर्पेन
१०. मला खोटे बोलता येत नसे आता दहात एखादवेळा जमते
या दहातले कुठले समजायचे मग ते Happy

आधी उर्दू आणि पंजाबी बोलायचो नाही; पण गफ्रे नामक व्यक्ति जीवनात आल्याने आणि ती पंजाबी असल्याने पंजाबी शिकलो. आता पंजाबी अस्खलीत बोलतो आणि वाचतो. उर्दू बाबतीत सांगायचे झाल्यास एक कुतूहल म्हणून शिकायला घेतलेली भाषा आता नेटिव उर्दू भाषिकासारखा वाचतो.

माझ्या बदललेल्या सवयींची यादी
भाग 1:-https://www.maayboli.com/node/63974
भाग 2:-https://www.maayboli.com/node/64003
भाग 3:-https://www.maayboli.com/node/64031
भाग 4:-https://www.maayboli.com/node/64069
भाग 5:-https://www.maayboli.com/node/64316

आधी माझ्या धाग्यावर येणारी प्रत्येक प्रतिक्रिया फार गंभीरपणे घ्यायचे आणि आता..... नाही घेत.

खरं बोलायलाच पाहिजे या वरून आता खरं बोलायला पाहिजे असे मत झाले आहे.

अनेक गोष्टी आहेत. पण सगळे सामायिक केले पाहिजे, या ऐवजी निवडक गोष्टीच सामायिक कराव्यात, असे मत बनले आहे; त्यामुळे पूर्णविराम.

पेहला मै ऐसा था...फिर लाईफमें मोड आ गया. और मैं बदल गया..
बदलवणारा मोड माझ्या आयुष्यात अजुन तरी आला नाहीये म्हणून सध्या तरी मी आहे तसाच आहे..
हा पण काही आवडीनिवडी बदलल्या ..मैत्रीची समीकरणे बदलली..ज्या लोकांना मी आधी शिव्या घालायचो ते आता छान मित्र आहेत..आणि आता आधीच्या मित्रांना शिव्या घालतो..

पूर्वी लव्हस्टोरीज जास्त वाचायचो..त्याच्यावरचे सिनेमे आवर्जून पाहायचो..हल्ली आशयघन आणि गंभीर किंवा वेगळ्या विषयावरचे पुस्तके वाचतो, सिनेमे पाहतो कधी कधी त्यावर स्वतः लिहतो..

तिशी पार झाली नसली तरी खुपच mature वागायला लागलो आहे आणि आता आधी केलेले उद्योग आता बालिश वाटतात .

अनुभवातून जास्त अपेक्षा घेउन जगत नाही आता..आणि इतरांकडूनही कसल्याच अपेक्षा राहील्या नाहीत...

वयपरत्वे हा बदल असू शकतो...पण जे काही आयुष्य आहे माझं..जे काही माझ्या वाटेला येतं..कुरकुर न करता हसत स्विकारतो..चांगल वाईट दोन्हीही..

आगोदर लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील याचा सतत विचार करायचो, आता नाही.
आपल्या मनाला पटलंय ना आणि नैतिकतेच्या चौकटीत बसतेय ना मग दुनिया गेली तेल लावत.
फेसबुक अकाउंट डिलीट केले .

न बदलेली सवय मायबोलीवर रोज हजेरी लावणे Happy

अनेक गोष्टी आहेत. पण सगळे सामायिक केले पाहिजे, या ऐवजी निवडक गोष्टीच सामायिक कराव्यात, असे मत बनले आहे; त्यामुळे पूर्णविराम.
Submitted by मी मधुरा on 7 November, 2019 - 18:29
>>>>

सर्व काही सामाईक करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे.
मग ते सोशल साईटवर सामाईक करणे असो वा प्रत्यक्ष आयुष्यात मित्र्परीवार आणि कुटुंबियांशी सामाईक करणे असो.. कित्येक गोष्टी असतात ज्या आपल्या आपल्यालाच ठाऊक असतात. त्या आतच ठेऊन लोकं वर जातात Happy

अगदी लक्षात यावा असा फारसा काही बदल झाला नाही. तरीही...
पुर्वी खुप वाचायचो आता फारसे वाचत नाही
खुप धाडसी होतो आता निर्भय झालोय
अजिबात टिव्ही पहात नसे, आता रोज किमान दोन तास टिव्ही पहातोच.
खान्यापिण्याच्या फार निवडी होत्या आता पानात पडेल ते खातो
असेच काही किरकोळ.. Happy

@अॅमी, सामाईकचा अर्थ एकत्रीत करणे नाही तर सार्वजनीक असा आहे. म्हणजे मला तोच माहीत आहे. गावाकडे काही गोष्टी सामाईक असतात जसे विहिर, रस्ता वगैरे. कवायत सामुदायीक असते सामाईक नाही.

सामायिक म्हणजे share करणे. अश्या सोशल मिडिया वर विचार सामायिक केले म्हणजे पब्लिक केले असेच म्हणावे लागेल.

सर्व काही सामाईक करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे.
मग ते सोशल साईटवर सामाईक करणे असो वा प्रत्यक्ष आयुष्यात मित्र्परीवार आणि कुटुंबियांशी सामाईक करणे असो.. कित्येक गोष्टी असतात ज्या आपल्या आपल्यालाच ठाऊक असतात. त्या आतच ठेऊन लोकं वर जातात
>>>>>>>>>>>>>खरंय.

आधी खुप अभ्यास करायचे आता नाही करत.
>>>
.हे माझेही झालेय
आधी ९नवीन शिकावेसे वाटायचे. आता समजलेय की जितके नवीन शिकू तितके जास्त काम करावे लागेल. म्हणून ईच्छाच मेली. रोचक माहिती मिळाली तर जपून ठेवतो. बस्स

पूर्वी हट्टी होते, आग्रही होते
आता नाही.

पण त्याचे दु:ख नाही. उलट आता प्रवाहाबरोबर पोहता येते, शांतीने जीवन व्यतित करता येते याचा आनंदच आहे.

सर्व काही सामाईक करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे.
मग ते सोशल साईटवर सामाईक करणे असो वा प्रत्यक्ष आयुष्यात मित्र्परीवार आणि कुटुंबियांशी सामाईक करणे असो.. कित्येक गोष्टी असतात ज्या आपल्या आपल्यालाच ठाऊक असतात. त्या आतच ठेऊन लोकं वर जातात 

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 10:20
>>>>
म्हणजे आम्हाला कधीच कळणार नाही, की या आयडी चे खरे नाव काय?
Rofl

पूर्वी आदर्शवादी होते.आता नाहीये.ऑल काइंड ऑफ अनफेअर शीx हॅपन्स इन वर्ल्ड या शक्यतेला मनात स्वीकारले आहे.

मी आधी अज्ञानी होतो (अज्ञानातच खरे सुख असते असे म्हणतात)
आता हळूहळू मायबोलीमुळे ज्ञानात भर पडून ज्ञानी होइन की काय अशी भीती वाटते !

तुला रे कशाला हवंय ते Wink
Submitted by हर्पेन on 7 November, 2019 - 17:41
>>>>

मला कश्यालाही नकोय ते. उत्तराची अपेक्षा नसलेले सहज गंमतीशीर विधान होते ते...

आता तुम्ही म्हणाल ईतके लेट उत्तर का? ऋन्मेषा कुठे गेला तुझा हजरजबाबीपणा??
तर प्रामाणिकपणे सांगू ईच्छितो धागा खाली गेल्यास वर काढता येईल म्हणून उत्तर राखून ठेवले होते.

त्या दहापैकी कोणते खोटे असेल त्याचा तू अंदाज बांधू शकतोस.

तो प्रतिसाद धागा घसरला की मग दे म्हणजे परत धागा वर येईल.

९. मला मोदी आवडत नसत आता आवडतात
आणि सर्वात मोठा बदल म्हणजे
१०. मला खोटे बोलता येत नसे आता दहात एखादवेळा जमते

>>
हर्पेन, दोन्ही बदल एकाच वेळी झालेत का ? Lol

विलभ Lol

विलभ - दहा पैकी दहा मार्क


'अजून काय बदललं नाही' ह्या मुद्द्याकरता वेगळा धागा उघडायचा असतो .
पण धागा भरकटवायचाच असंही तुझे तत्व आहे का? Wink

Pages