आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय

Submitted by पाषाणभेद on 2 November, 2019 - 13:06

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय

चल उठ मराठी गड्या पुन्हा एकदा लढ लढा
बोल की आता आमचं ठरलयं
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||धृ||

नको कानडी सोन्याचा घास
लावील तो आम्हाला फास
किती मार आता सहन करायचा?
मुकाट अन्याय किती सोसायचा?
सरकारनं अपमानाचं जीणं केलंय
म्हणूनचं आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||१||

आमचंच आहे कारवार निपाणी
बिदर खानापूर भालकी
कोणाची टाप नाय म्हणण्याची
बेळगावसगट हे पण घेवूच की
सहीशिक्कामोर्तब आम्ही केलंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||२||

आमच्या आजानं खाल्ली काठी
आमच्या बापानं खाल्ली लाठी
नाही घाबरत आम्ही त्याला
जरी पडली ती आमच्या पाठी
तिन पिढ्यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||३||

कानडी गड्या घे आता ऐकून
सीमाभाग हा माझाच सांगतो ठासून
शस्त्राविना हि लढाई मी लढणार
मराठीभाषीक शेवटी एक होणार
जय महाराष्ट्र कधी बोलतोय असं मला झालंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||४||

- पाषाणभेद
एक नोव्हेंबर (सीमाभागासाठीचा काळा दिवस) २०१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतंच अत्र्यांच्या कर्हेच्ं पाणी मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल वाचलं. त्यामुळे ही कविता कळली. नाहीतर ह्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती. तरी पण आता हे होणं थोडं कठीण वाटतंय. कारण बदल घडवून आणणारा जनमताचा रेटा कुठून आणणार? हा प्रश्न जिव्हाळ्याचा वाटणारे किती लोक आता महाराष्ट्रात असतील?