चांदणी रात्र - ९

Submitted by निरंजन कुलकर्णी on 16 September, 2019 - 13:23

दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश कॉलेजला जायला निघाला. राजेश वृषालीच्या घरापाशी पोहोचला. वृषाली गाडीला किक मारत होती पण तिची गाडी स्टार्ट होत नव्हती त्यामुळे ती फार वैतागली होती. राजेशने गाडी थांबवली. वृषाली राजेशकडे पाहून हसली व “हाय” म्हणाली. “तुझी हरकत नसेल तर मी प्रयत्न करून पाहतो.” राजेश वृषालीला म्हणाला. जणू याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे वृषाली बाजूला झाली व तिने गाडी राजेशच्या ताब्यात दिली. राजेशने दोन वेळा किक मारली पण गाडी स्टार्ट नाही झाली. राजेशने कॉक ओढला व पुन्हा एकदा किक मारली पण तरीही गाडी स्टार्ट झाली नाही. शेवटी राजेशने गाडी डाव्या उजव्या बाजूला हलवून गाडीतलं पेट्रोल ढवळलं. आता मात्र गाडी एका किकमध्ये स्टार्ट झाली. राजेशने गाडी परत वृषालीच्या ताब्यात दिली. वृषाली गाडीवर बसली व राजेशकडे पाहून गोड हसली व “थँक यु” म्हणून निघून गेली. तिची पाठमोरी आकृती दिसेपर्यंत राजेश तिच्याकडे पहात होता. राजेशने घड्याळात पाहिलं. बराच उशीर झाला होता. ‘संदीप जाम चिडला असणार’ राजेशच्या मनात विचार आला. तेवढ्यात राजेशचा फोन वाजला. संदीपचाच कॉल होता. “आज काय दांडी मारायचा विचार आहे का?” संदीपने राजेशला विचारलं. “नाहिरे, पाचच मिनिटात पोहोचतो.” असे म्हणून राजेशने फोन ठेवला.
राजेश आणि संदीप एकदाचे कॉलेजात पोहोचले. पहिला तास सहस्रबुद्धे सरांचा होता व राजेश आणि संदीप आज जवळजवळ वीस मिनिट उशिरा पोहोचले होते. त्यामुळे आता वर्गात जाणं म्हणजे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. त्यांनी सहस्त्रबुद्धे सरांचा तास संपल्यावरच वर्गात जायचं ठरवलं.

वृषालीने पुन्हा एकदा राजेश आणि संदीपच्या बेंचकडे पाहिलं. त्यांचा बेंच अजूनही रिकामाच होता. आपल्यामुळे तर राजेशला उशीर नाहीना झाला? तिच्या मनात विचार आला. राजेशने आपल्याला एवढी मदत केली आणि आपण त्याच्यासाठी थांबलो देखील नाही या विचाराने तिचं तिलाच चुकल्यासारखं वाट होतं.
शेवटी एकदाचा सहस्त्रबुद्धे सरांचा तास संपला. सर वर्गातून बाहेर जाताच राजेश आणि संदीप वर्गात आले. राजेशला पाहताच वृषालीचा जीव भांड्यात पडला. का कोण जाणे पण तिला राजेश येईपर्यंत त्याच्याबद्दल काळजी वाटत होती. राजेशचा एक्सिडेंट तर झाला नसेल ना असा विचार सुद्धा तिच्या मनात येऊन गेला व त्याबरोबरच तिला तिचा व सुमितचा एक्सिडेंट आठवला. नुसत्या विचारानेच तिच्या अंगावर काटा आला.

संदीपने राजेशला उशीर झाल्याचं कारण विचारलं पण राजेशने त्याला “गॅस संपला होता त्यामुळे नवीन सिलेंडर आणायला गेलो होतो.” अस काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं. कॉलेज संपल्यावर राजेश आणि संदीप ठरल्याप्रमाणे मनालीच्या घरी पोहोचले. कॉलेजच्या स्पर्धांना आता केवळ आठवडा बाकी होता. त्यामुळे आज संदीप राजेश आणि मनालीसमोर त्याचं गाणं सादर करणार होता. त्याचं प्रॅक्टिस चांगलं झालं होतं, पण तरीही स्टेजवर गाण्याआधी एक रंगीत तालीम घेणं आवश्यक होतं. मनालीने वृषालीलासुद्धा बोलावलं होतं पण तिने मुद्दामच राजेशला सांगितलं नव्हतं आणि राजेश तिथे येणार आहे हे वृषालीला माहिती नव्हतं.

संदीपने स्पर्धेसाठी अरिजित सिंगचं “खामोशिया” हे गाणं निवडलं होतं. या गाण्यातल्या काही नोट्स खूप वरच्या पट्टीतल्या असल्यामुळे संदीपला स्टेजवर गाणं नक्कीच चॅलेंजिंग असणार होतं. संदीपचं गाणं झालं. काही ओळी गाताना सूर थोडा हलला होता. खासकरून वरच्या पट्टीतल्या ओळी गाताना त्याचा श्वास फुलत होता. राजेशने त्याला कोणत्या ओळींवर अजून सराव करायला हवा ते सांगितलं. राजेशला स्वतःला जरी फार चांगलं गाता येत नसलं तरी तो उत्तम कानसेन होता. मनाली मात्र संदीपच्या रोमँटिक आवाजात एवढी हरवून जायची की तिला त्याच्या गण्यातल्या चुकाच दिसायच्या नाहीत.

संदीपने पुन्हा एकदा गाणं गायलं. त्याचं गाणं संपलं आणि मागून टाळ्यांचा आवाज आला. राजेश आणि मनालीने मागे वळून पाहिलं. मागे वृषाली उभी होती. वृषालीला पाहताच राजेशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. यावेळी संदीपचं गाणं आधीपेक्षा चांगलं झालं होतं. “वृषाली पण फार छान गाते बरका. आणि तीसुद्धा स्पर्धेत भाग घेणार आहे.” मनालीने राजेश आणि संदीपला सांगितलं. वृषालीने स्पर्धेसाठी लतादीदींच “मेहेंदीच्या पानावर” हे गाणं निवडलं होतं. तिने गायला सुरुवात केली. एखाद्या सराईत गायिकेसारखी वृषाली गात होती. गाता गाता तिचं लक्ष राजेशकडे गेलं. राजेश अगदी एकाग्रनेते आपल्याकडे पाहतोय हे तिच्या लक्षात आलं. राजेश तल्लीन होऊन वृषालीचं गाणं ऐकत होता. गाणं ऐकता ऐकता तो एका वेगळ्याच विश्वात पोहोचला होता. जिथे फक्त तो आणि वृषाली दोघेच होते. या विश्वात वृषाली फक्त राजेशसाठीच गात होती आणि हे गाणं संपूच नये असं राजेशला वाटत होतं. त्याची ही विचारसमाधी टाळ्यांच्या आवाजाने भंगली. वृषालीचं गाणं अतिशय उत्कृष्ट झालं होतं. संदीपला मात्र अजून थोडी तयारी करावी लागणार होती.
राजेश, संदीप आणि वृषालीने मनालीचा निरोप घेतला व ते तिथून निघाले. राजेशने गाडी स्टार्ट केली. वृषालीनेही गाडी स्टार्ट केली व तिने गाडी राजेशच्या गाडीजवळ न्हेली व राजेशला म्हणाली, “राजेश, मला तुला काही सांगायचंय.” राजेशच्या हृदयाची धडधड वाढली. “बोल ना” तो म्हणाला. “आज सकाळी खरंतर माझ्यामुळे तुला कॉलेजला पोहोचायला उशीर झाला. तू मला एवढी मदत केलीस आणि मी तुझ्यासाठी थांबले सुद्धा नाही.” राजेशला वृषाली वेगळच काहीतरी बोलेल असं वाटलं होतं पण स्वतःला सावरून घेत तो म्हणाला, “अगं त्यात काय एवढं! एखादा दिवस कॉलेजला पोहोचायला उशीर झाला म्हणून काही जग कोसळणार नाही. उलट गाडीचा कधी काही प्रॉब्लेम झाला तर मला सांगायचं. माझा नंबर तर तुझ्याकडे आहेच. एक कॉल केला की हा गडी हजर!” राजेशच्या शेवटच्या वाक्यावर वृषाली हसली व त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून निघाली.

राजेश आणि संदीपसुद्धा निघाले. “अच्छा, आता कळलं तुला सकाळी यायला उशीर का झाला ते.” संदीप चिडवण्याच्या सुरात राजेशला म्हणाला. राजेश नुसता हसला. “बर, मला सांग, तुमच्यात हे केव्हापासून सुरु आहे?” संदीपने राजेशला विचारलं. “काय सुरु आहे?” राजेश अगदी निरागसपणे म्हणाला. “जास्त भोळा बनू नकोस. मनालीने मला सगळं सांगितलय.” संदीप राजेशला म्हणाला. “अजून फक्त सुरुवात आहेरे. पण तिच्या मनात काय चाललंय तेच कळत नाही.” राजेशने कबुली दिली. “काळजी नको करू रे. या मुली अशाच असतात. पण मुलीच मुलींना ओळखतात. आणि मनालीकडून मला समजलंय की वृषाली तुझं खूप कौतुक करत होती. त्यामुळे आय थिंक यु आर ऑन द राईट ट्रॅक.” संदीप राजेशला म्हणाला. पण संदीपच्या या शेवटच्या वाक्यामुळे राजेशच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला होता.

X X X X X X

अखेर ज्या दिवसाची सर्वजण उत्सुकतेने वाट पहात होते तो दिवस उजाडला. स्पर्धेचा पहिला दिवस. सकाळी सहा वाजता धावण्याची स्पर्धा होती. स्पर्धा तीन दिवस चालणार होती. एकूण तीन राउंड होणार होते. चार मुलांचा एक गट असे चार गट केले होते. पहिल्या राउंडला प्रत्येक गटातील दोन जण निवडणार होते. दुसऱ्या राउंडला निवडलेल्या आठ जणांमध्ये परत चार जणांचे दोन गट पडणार होते. यातील टॉप फोर शेवटच्या राउंडमध्ये धावणार होते. स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल सारखे इतर खेळही खेळले जाणार होते. दुसऱ्या दिवशी रात्री नृत्य स्पर्धा होणार होती तर गायन स्पर्धेने तिसऱ्या दिवशी रात्री कार्यक्रमाची सांगता होणार होती. सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने सर्व मुलं-मुली खुश होते.

राजेशची तयारी चांगली झाली होती. तो व संदीप पहाटे साडेपाचलाच मैदानावर पोहोचले. पहाटेची वेळ असल्यामुळे स्पर्धा पाहायला खूप कमी मुलं आली होती. मुलीतर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच होत्या. स्पर्धा सुरू होण्यास पाचच मिनिटे बाकी होती. राजेशने वृषाली कुठे दिसते का हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहिले व त्याला मनाली व वृषाली मेनगेटमधून आत येताना दिसल्या. वृषालीला पाहताच राजेशचा आनंद द्विगुणित झाला. आता त्याला जिंकायलाच हवं होतं. रेफरीने शिट्टी वाजवतात सर्व धावपटूंनी पोजिशन घेतली. दुसरी शिट्टी वाजताच धावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला राजेश चौथ्या क्रमांकावर होता. पण काही सेकंदातच तो एकेकाला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला व त्याने शंभर मिटरची रेषा ओलांडली. धापा टाकतच त्याने बाजूला पाहिलं. संदीप, मनाली व वृषाली टाळ्या वाजवत होते. वृषालीला पाहताच राजेशचा थकवा कुठल्याकुठे पळाला. स्पर्धा जिंकल्यापेक्षा पण वृषाली खुश झालेली पाहून त्याला जास्त आनंद झाला होता. राजेश काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण दम लागल्यामुळे त्याला नीट बोलता येत नव्हतं. “आधी जरा विश्रांती घे, थोडं पाणी पी.” संदीप म्हणाला व त्याने पाण्याची बाटली राजेशच्या हातात दिली. पाणी प्यायल्यावर राजेशला थोडं बरं वाटलं. “आता सँडविच खाऊन घे. वृषालीने खास तुझ्यासाठी बनवलंय.” मनाली चिडवण्याच्या सुरत म्हणाली व तिने डबा राजेशच्या हातात दिला. “एवढ्या सकाळी?” राजेशने आश्चर्याने विचारलं. वृषाली नुसतं हसली. राजेश सँडविच खाऊन झाल्यावर म्हणाला, “असं सँडविच मला रोज मिळणार असेल तर मी रोज धावायला सुद्धा तयार आहे!” हे ऐकून वृषाली लाजली व तिच्या गालावर लाली चढली. “तुझ्यासाठी सँडविचच काय अख्ख जेवण सुद्धा बनवेल वृषाली.” मनाली वृषालीला चिडवत म्हणाली. वृषाली पुन्हा लाजली व तिने लटक्या रागाने मनालीकडे पाहिलं. राजेश मात्र मनोमन खुश झाला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chan ahe

छान !!
हल्ली मायबोलीवर जी युद्धसदृश परिस्थिती दोन्ही पक्षाचे आयडी / ड्यू आयडी अनेक धाग्यावर निर्माण करून वातावरण तापवत राहतात त्या पार्श्वभूमीवर अशी हलकी फूलकी कथा वाचताना खरंच खुप बरे वाटते.

पहिल्या भागात जो सस्पेन्स दाखवलाय तो कधी उलगडणार? राजेश अलिबागला गायब होऊन स्वारगेटला सापडला त्याचं काय कारण होतं नक्की??

ओके