कधी एक ओळ एका थेंबासारखी येते
कधी दोन तीन तर कधी पूर्ण
कविताच पाऊस बनून येते
काही ओळी मनाच्या गर्भात झिरपून जातात
काही ओळी पापण्यांवर दव बनून राहतात
काही बरसतात, काही कोसळतात,
काही रिमझिम सरींसारख्या भुरभुर करत राहतात
वाटते कधी छत्री बंद करून भिजाव
त्या प्रत्येक ओळीला अंगाखांद्यावर खेळवाव
एखादी ओळ वाहून जाते नाल्यातून
एखादी कुणीतरी साठवून देखील ठेवत
कुणाच्या गावात शुष्कतेचा दुष्काळ असतो
कुणाच शहर एका पावसात पाण्याखाली जात
कुणाच अंगण साफ होत, कुणाच्या दारात भावनांचा चिखल होतो
कुणाच्या उरात पूर भरून येतो,
कुणाचे डोळे टपकत राहतात
मनात साठलेल्या ओळी बाहेर काढताना
कागदी पातेले भरून जातात
अतिवृष्टी झाल्यावर कवितेचाही विटाळ येतो
आता नको पुन्हा त्या ओळी, नको पुन्हा तो पाऊस
पुन्हा दुष्काळ पडल्यास देवाला नको नवस घालूस
©प्रतिक सोमवंशी
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
Hats off!!
Hats off!!