हातिम ताई

Submitted by पायस on 14 March, 2019 - 04:12

हातिम ताई हा एक चमत्कारिक चित्रपट आहे. त्यात चमत्कृतिपूर्ण गोष्टी घडतात म्हणून नव्हे तर त्याच्या शैलीस प्रतिकूल अशा वर्षी प्रदर्शित होऊनसुद्धा त्याने बर्‍यापैकी गल्ला जमवला म्हणून (वेगवेगळे सोर्सेस वेगवेगळे आकडे सांगत असले तरी १९९० साली याने किमान १ कोटींचा गल्ला जमवला यावर त्यांचे एकमत दिसते). असा हा विशेष सिनेमा अभ्यासायचा म्हणजे काही पूर्वाभ्यास गरजेचा आहे. तरी यावेळेस सेक्शन्सना सेक्शन ० पूर्वाभ्यास पासून सुरुवात होईल.

०) पूर्वाभ्यास

०.०) हातिम ताई : ओरिजिनल स्लमडॉग मिलिएनेअर

आधी तर हातिम ताई या थोर पुरुषाविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. मूळात हातिम ताई हा एक अरबी कवी होता, जो इस्लाम धर्म स्थापन होण्याच्याही आधी (सहावे शतक) होऊन गेला. त्याच्याविषयी अनेक किवदंती आहेत. यावर आधारित साहित्य निर्मिती अरबीत/फारसीत झाली. त्यामुळे त्याचे अल्ला का नेक बंदा, खुदा का फरिश्ता वगैरे वर्णन हे कथाकारांनी घेतलेली लिबर्टी असावी. त्याच्या दयाळु स्वभावाचे वर्णन करायचे तर काळाला साजेशी विशेषणे तर वापरावी लागणारच. हीच हुशारी या चित्रपटाच्या पटकथाकारानेही दाखवली आहे.
मूळ कथेमध्ये एक राजा हातिमचा मित्र असतो. या राजाचे हुस्न बानू नावाच्या सौंदर्यवतीवर प्रेम असते. बानूबाईला मात्र खंडोबाच हवा असल्याने तिने लग्नाचा पण म्हणून सात भलतेच अवघड प्रश्न काढलेले असतात. जसे स्लमडॉग मिलिएनेअर मधले प्रश्न कधीच केबीसीत विचारले जाणार नाहीत, तसेच हिचे व्हेग प्रश्न कोणत्याही स्वयंवरात विचारले जाणार नाहीत. आता राजा भित्रा असल्यामुळे त्याला या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपला जीव गमवायचा नसतो पण बानूही हवी असते. मग हातिम उदारपणे राजाच्या वतीने हे प्रश्न सोडवायची तयारी दर्शवतो. मग मूळ अरेबियन कथांमध्ये दर रात्री जेव्हा शहरजादे गोष्ट सांगते तेव्हा हातिम प्रश्नाचे उत्तर घेऊन बानूकडे परत आलेला असतो. तो आधी त्याची कर्मकहाणी, जमालच्या फ्लॅशबॅकप्रमाणे सांगतो. फ्लॅशबॅक संपल्यानंतर तो उत्तर देणार. ते उत्तर बरोबर आहे असे बानू सांगणार. अ‍ॅक्चुअली तिला यातले एकही उत्तर माहिती असता कामा नये. उदा. एका प्रश्नात तिने त्याला एका जागेची माहिती काढायला सांगितलेली असते आणि तिथून आजवर कोणीही मनुष्य जिवंत परत आलेला नसतो. मग हिला त्याचे उत्तर कसे माहित? कशावरून हातिमने खरे उत्तर सांगितले? तर मूळ कथानकात अशा बर्‍याच अडचणीच्या जागा आहेत. पूर्वाभ्यासासाठी इतके कळणे पुरेसे आहे की हातिम सर्व उत्तरे शोधतो आणि त्याच्या सांगण्यावरून बानू राजाशी लग्न करते.

०.१) कथेचे रुपांतर करताना काळजी घेणे आवश्यक
तर इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम - हातिमला हिरोईन नाही. ९० चे दशक उजाडले असले तरी या नियमाचे मार्गदर्शक तत्वात रुपांतर झालेले नसल्याने हातिमला हिरोईन असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे अतिशय हुशारीने कथेत आवश्यक ते बदल करून हातिमला हिरोईन मिळण्याची सोय केली आहे. तीसुद्धा अगदी विकोची हळद पिऊन गोरी झालेली!
दुसरा मुद्दा - या प्रश्नांची आन्सर की कुठून आणायची? इथे कादर खानने रुढ केलेला ८० च्या दशकातला नियम वापरावा लागतो. जादूच्या सिनेमात ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत नाही त्याचे उत्तर जादू! त्यामुळे मूळ कथेत नसलेला परीचा एलिमेंट इथे अ‍ॅड केला आहे. या दोन मूलभूत बदलांमुळे सिनेमाला मुख्य व्हिलन मिळण्याचीही सोय होते. तसेच रिडीम्ड व्हिलन, व्हिलनचे आद्य कर्तव्य सीन अशा कित्येक मौलिक संधी पटकथाकाराला उपलब्ध होतात. होतकरू लेखकांनी या अँगलने या सिनेमाचा कसून अभ्यास केला पाहिजे.

०.२) कादर खान नसेल तर जितेंद्रही काही करू शकत नाही
इथे एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. हा सिनेमा पद्मालय स्टुडिओज् चा नाही. हा सिनेमा बाबूभाई मेस्त्रींचा आहे. स्पेशल इफेक्ट्स डिपार्टमेंटमधून पुढे आलेल्या आणि साठच्या दशकातले बरेच पौराणिक सिनेमे दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शकाचा अनुभव दांडगा आहेच आणि त्याचा काही प्रमाणात सिनेमाला फायदाही होतो पण; पण हा सिनेमा ऑलमोस्ट सीन टू सीन मेस्त्रींच्याच १९७१ सालच्या सात सवालची कॉपी आहे. वाढलेल्या बजेटनुसार नवल कुमारच्या जागी जितेंद्र आणि चकाचक सेट वापरले गेले असले तरी एक घोळ झाला आहे. ८० च्या दशकात पौराणिक सिनेमांचा सॉर्ट ऑफ रिसर्जन्स झाला होता. याला कारणीभूत होता कादर खान. कादर खान काळाची पाऊले ओळखून डेव्हिड धवन लाटेचे प्रिकर्सर सिनेमे लिहित होता. या आऊटडेटेड टॉपिकला त्याने हात घातला नाही. पण या सिनेमाने १९७१ ला साजेशी पटकथा घेऊन त्याला कादर खान शैलीत बनवण्याचा प्रयत्न केला. ते तितकं काही जमलेलं नाही. हातिम ताई आणि पाताल भैरवी यांचा तौलनिक अभ्यास केल्यास कादर खानचा ग्रेटनेस समजून येतो. या धाग्याचा तो विषय नसल्याने केवळ उहापोह करून थांबतो आहे. परंतु त्यामुळे हा सिनेमा पाहून सतत "अजून भारी करता आला असता" हे वाटत राहते.

१) आटपाट नगर होते

१.१) तिथे एक अल्लाचा नेक बंदा राहत होता

लाल पडद्यावर श्रेयनामावली अक्षरे झळकतात आणि सिनेमा सुरु होतो. सिनेमा अरबस्तानात घडत असल्याचे कळण्यासाठी अरबी स्टाईलने आआआ आणि ओओओ होते. कट टू एक रँडम राजवाडा. मागून अजानची हाक ऐकू येत असल्याने वेळ पहाटेची असल्याचे कळते. कोणा शाह-ए-आलम नामक शहेनशाहला (याचं काम अमिताभने केलेले नाही, चिंता नसावी) येऊन दासी सांगते की तुला मुलगा झाला. खुश होऊन गळ्यातला हार तो तिला बक्षीस म्हणून देतो. यामुळे तो फार मोठा बादशहा आहे यावर शिक्कामोर्तब होते. फकीर-दरवेशी-नजूमी (भविष्यवेत्ते) यांना काही कामधंदा नसल्याने ते राजवाड्यातच पडीक असतात. ते या मुलाचे नाव हातिम ठेवा असे सांगतात आणि त्याचे रक्षण व्हावे म्हणून एक ताईतही देतात. असा हा हातिम ताईत क्षणार्धात मोठा होऊन जितेंद्र बनतो. जितेंद्राचे या सिनेमातले सर्व कपडे पुढील प्रकारात बसतात - अंगावर भडक रंगाचा शर्ट हवा, खाली काळ्या किंवा करड्या रंगाची पँट हवी आणि त्यावर घालायला भरजरी जाकिट. एक पांढरा शर्ट आहे त्यावरही घालायला गॉडी निळ्या रंगाचे जाकिट आहे. अनेकदा त्याच्यापेक्षा सतीश शाहचे कपडे दिसायला बरे दिसतात.

१.२) तो रोज दानधर्म करायचा

तर हातिम लाल शर्ट काळी पँट आणि डोईला पिवळसर नारिंगी रंगाचा रुमाल बांधून बसलेला असतो. त्याच्या दानधर्माची वेळ झालेली असते. सतीश शाह त्याचा मित्र नझरुल दाखवला आहे. नझरुलला हातिमची प्रशंसा करायच्या कामावर ठेवले असल्यामुळे तो लगेच हातिमची तोंडभरून स्तुती करतो. इथे आपल्याला कळते की हातिम यमन देशाचा शहजादा आहे. हातिम सद्गुणांचा पुतळा असल्यामुळे तोही जरा लाजतो वगैरे. लगेच दानधर्माचा कार्यक्रम सुरू होतो. यात हातिमच्या दरवाज्यावर सहा बायका हातात सोन्याच्या मोहोरांनी भरलेली थाळी घेऊन उभ्या असतात. घोळक्याने माणसे येतात, हातिम त्यांना मूठभर मोहोरा देतो आणि ते आपल्या वाटेने निघून जातात. या बायका आणि गरजूंचा जमाव अतिशय कंटाळलेले आहेत. एक बाई काही कारणाने जितूकडे "जवळून तितका हँडसम वाटत नाही" नजरेने बघते आहे.
अचानक एक तोंडावर फडकं बांधलेली तरुणी येते. फडकं बाजूला करताच ओळख पटते. अरे ही तर सौदागर बरजद की बेटी शहजादी मरियम! तिला त्याची मदत हवी असते. तो तिला वाड्यात बोलावतो आणि नझरुलला उरलेल्या मोहोरा वाटायला सांगतो. आता सतीश शाह अर्धी मूठ मोहोरा पर पर्सन वाटतो तरी ते लोक खुश होतात. पण हातिम त्याच्या दुप्पट (एक मूठ गच्च भरून) मोहोरा देत होता तेव्हा एकाच्या चेहर्‍यावर हसु फुटेल तर शप्पथ! अशा चमत्कारांनी हा सिनेमा भरलेला आहे.

१.३) तो प्रेमप्रकरणेही निस्तरायचा

तर मरियमची तक्रार अशी - तिचं आणि शहजादा मुनीर (विजयेंद्र घाटगे, फ्रेश फ्रॉम प्लेईंग ठाकूर प्रताप सिंग इन बंद दरवाजा) यांचे एकमेकांवर प्रेम असतं. त्यांना लग्नही करायचं असतं. पण मरियमच्या वडलांचा तिच्या लग्नालाच विरोध असतो. हा नकार ऐकून मुनीर वणवण भटकत असतो तर मरियम बाई हातिमच्या दारात मदतीची भीक मागत असतात. आता - एकतर ही बाई शहजादी कशी? मुलगी सौदागरची, शहजाद्याशी लग्नाचा पत्ता नाही तरी ही शहजादी मरियम. दुसरे हिच्या म्हणण्यानुसार घाटगे यांच्या भेटण्याच्या ठिकाणी एकटाच भटकत असतो. ते एका बागेत भेटताना दाखवले आहेत. मग पुढच्याच दृश्यात हा वाळवंटात खुरट्या दाढीने काय करत असतो? असो तर वाळवंटात जितेंद्र त्याला भेटायला तडक मरियमला घेऊन जातो. त्यांची लव्ह स्टोरी मार्गाला लावायचे तो त्यांना वचन देतो. इथे आपल्याला मरियमचे कपडे जवळपास लेटेक्स असल्याचे लक्षात येते.

१.४) आता त्याला प्रश्न पडले तर कोण काय करणार?

कपडे बदलून, घाटगेला दाढी करायला लावून जितू आणि सतीश सौदागरला जाऊन भेटतात. सौदागर असतो रझा मुराद. रझा मुरादही फार आढेवेढे न घेता त्याची अडचण जितूला सांगतो. त्याच्या घरात एक प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेला परीचा पूर्णाकृती पुतळा असतो. हा पुतळा अजिबात संगीता बिजलानी सारखा दिसत नसल्याने या पुतळ्याची संगीता बनणार हे निष्णात प्रेक्षक सांगू शकतो. जितू उगाच त्या पुतळ्याला उत्कृष्ट कारागिरीचा नमुना वगैरे म्हणतो. रझा मुराद त्यावर "होल्ड माय बीअर" म्हणून हा पुतळा नसून गुलनार नामे परी असल्याचे सांगतो. तर झालं असं की एके रात्री रझा मुराद उकाड्याचं म्हणून वरच्या मजल्यावर एकटाच झोपलेला असतो. नेमकं त्याच रात्री गुलनार (संगीता बिजलानी) च्या नशीबात दुर्बुद्धी योग लिहिलेला असतो. त्यामुळे ती उडत उडत येते (मसक्कली स्टेपमध्ये हात हलवते) आणि त्याच घरात उतरते. हवेवर झुलणार्‍या झुंबराला प्रदक्षिणा घालण्याचा टाईमपास करण्याची हुक्की तिला येते आणि आवाजाने रझा मुरादची झोपमोड होते. झोपेतून उठल्या उठल्या इतर काही न सुचल्याने तो गुलनारवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो.

आधी हा सीन विशिष्ट अंगाने जाणार अशी शंका येऊ शकते पण चमत्कार होतो. अचानक संगीताच्या तोंडावर लाल पिवळा लाईट मारला जातो. अ‍ॅपरंटली रझा मुरादने तिला वाईट हेतुने स्पर्श केल्यामुळे तिचा दगड होतो. दगड व्यक्ती दगड बनण्याचे हे इतिहासातील एकमेव उदाहरण! याची शिक्षा म्हणून ती रझा मुरादला शाप देते की तुझ्या मुलीचे, मरियमचे लग्न झाले तर लग्नाच्या रात्री तिच्या नवर्‍याचा मृत्यु होईल आणि मरियमसुद्धा दगड बनेल. इथे क्लोजअपमध्ये चंदेरी कागदाचे पंख, जनरिक परी कॉस्ट्युम (अलिफ लैला श्ट्यांडर्ड) वगैरे बघायला मिळते. ही दगड बनण्याची प्रोसेस अर्थातच तिला व्यवस्थित पोज घेता यावी, उ:शाप देता यावा इतपत स्लो असते.

असला नॉनसेन्स शाप मुरादसाहेब ऐकून घेतील हे शक्यच नाही. ते रडून, भांडून तिच्याकडून उ:शाप मिळवतात. तो उ:शाप असतो की माझ्या सात सवालांचे जवाब आणा. रझा मुराद शापमुक्त होईल आणि ही पुन्हा जिवंत होईल. जितेंद्रच्या वाचनानुसार हे सात प्रश्न आहेत (रझा मुरादने एका फळ्यावर अरबीत लिहून ठेवले आहेत. पण जितेंद्र ते उर्दूत वाचतो.)

प्रश्न १) एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस है
प्रश्न २) नेकी कर दरिया मे डाल
प्रश्न ३) सच को राहत है
प्रश्न ४) जैसा करेगा वैसा भरेगा
प्रश्न ५) कोहिनहिदा की तलाश
प्रश्न ६) मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती
प्रश्न ७) हम्मामबादगर की खबर (ते मूळ कथेत हमाम-ए-बादगढ, म्हणजे बादगढचे न्हाणीघर आहे. पण जितूचे उर्दू माशाल्लाह! नशीब जितूजींनी ते हम्मामबादनगर नाही वाचलं)

रझा मुरादच्या म्हणण्यानुसार हे प्रश्न इतके अवघड आहेत की तो कोणीही सोडवू शकत नाही. जितेंद्र म्हणतो की खुदाची इच्छा असेल तर मला हे प्रश्न सुटतील. तरी मी प्रश्न सोडवतो आहे तोवर तुम्ही विजयेंद्र घाटगेला आपल्या घरी ठेवून घ्या नाहीतर पुन्हा उन्हातान्हाचा वाळवंटात भटकायला जायचा. रझा मुराद हे मान्य करतो. इथे सतीश शाह एक फालतू विनोद करून आपल्याला या सिनेमात का घेतले आहे हे प्रेक्षकांना कळवतो. अशा रीतिने सुरू होतात हातिम आणि नझरुलची साहसे.

२) प्रश्न पहिला : एक बार देखा है, दुसरी बार देखने की हवस हैं

आता इतक्या अवघड प्रश्नांची उत्तरे कोठे बरे मिळतील? आपले पूर्वज जंगलातून आले तर बहुधा या बाबा आदमच्या जमान्यातल्या प्रश्नांची उत्तरेही जंगलात मिळतील असा सारासार विचार करून हातिम आणि नझरुल एका जनरिक जंगलात पोहोचतात. अरबी द्वीपकल्पात कुठेही इतके घनदाट जंगल नसल्याने आपण परीकथेत असल्याची खात्री पटते. परीकथेचा हिरो हा शूर आणि स्वभावाने चांगला असावा लागतो. हातिम हा चांगला असल्याचे तर ठसले पण हा शूरवीर असल्याचे सिद्ध करण्याची संधी अद्याप त्यास मिळालेली नाही. त्यामुळे नझरुलच्या "आका शेर आ जाएगा" चा क्यू घेऊन एक बिबळ्या तिथे येतो. त्याआधी नझरुल हातिमला शंका विचारतो की अशाने तर आपण उत्तरे मिळण्याच्या आधीच मरु. यावर हातिम म्हणतो की मारनेवाले से बचानेवाला हमेशा बडा होता हैं. बरं मग? संपूर्ण सिनेमात जितेंद्राचे असे बरं मग छाप बरेच डायलॉग आहेत.

२.१) विंटर सोल्जर या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटाच्या फाईट्समध्ये सरासरी सेकंदाला दोन कट्स आहेत. सारांश : लपण्याची गरज फक्त जितेंद्रालाच नसते.

तर बिबळ्या तिथे येतो. जंगली जनावराने माणसे दिसताच त्यांच्यावर हल्ला केलाच पाहिजे या नियमाची त्याला जाण असते. त्यामुळे तो जितेंद्रावर झडप घालतो. इथून पुढे १ मिनिटाची फाईट आहे. या फाईटमध्ये काय होते, जितेंद्राला जखमा होतात का, बिबळ्या खरा आहे का खोटा, जितेंद्राचे नक्की किती बॉडी डबल वापरले गेले आहेत इ. प्रश्नांची उत्तरे देता येणे केवळ अशक्य आहे. १ मिनिटाच्या फाईटमध्ये ५७ कट्स आहेत. म्हणजे जवळ जवळ सेकंदाला एक कट! जितेंद्राला फाईटिंग येत नाही हे लपवण्यासाठी इतकी मेहनत इतर कोणत्याच चित्रपटात घेतली नसावी.

असो तर हातिम बिबळ्याला भोसकून ठार करतो. एवढ्या केऑटिक फाईटमधून इतर काहीही निष्कर्ष काढणे फार कठीण आहे पण ०.२५ स्पीडमध्ये बघितल्यावर लक्षात येऊ शकते की क्लोजअपमधला बिबळ्या आणि बॉडी डबल शॉट्समधला बिबळ्या हे दोन वेगवेगळे बिबळे आहेत (त्यांच्या ठिपक्यांच्या डिझाईनमध्ये सूक्ष्म फरक आहेत). सतीश शाहला शूरवीर दाखवायचे नसल्यामुळे तो झाडावर चढून आपला जीव वाचवतो. हातिम शूरवीर सिद्ध झाल्यामुळे सिनेमा पुढे सरकतो. परीकथेतले हिरो विशेष हुशार दाखवून चालत नाही. अन्यथा देव/खुदा/पर्‍या/जादू वगैरेंची त्यांना का गरज पडेल? त्यामुळे हातिम हुशार असल्याचे सिद्ध करण्याचे कष्ट दिग्दर्शक घेत नाही.

आता अशा ठोंब्यांना या प्रश्नांची उत्तरे कोठून मिळणार? मग सर्वशक्तिमान खुदाला त्यांची दया येते आणि त्याच जंगलात कुठेतरी एका झाडाला पाचजण उलटे टांगून ठेवलेले दिसतात. हे सर्व वारंवार "एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस हैं" म्हणत असतात. हातिमला या "आदमजादांची" दया येते. उर्दू झाडण्याकरिता संपूर्ण सिनेमात हातिम व इतर अनेक पात्रे मनुष्य प्रजातीचा आदमजाद असा उल्लेख करतात. सतीश शाहला अक्कल असल्यामुळे तो या आदमजादांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. असे लॉजिकल सल्ले देत असल्यामुळेच तो या परीकथेचा हिरो होऊ शकलेला नाही. दुर्दैवाने हे नझरुलला कधीच समजू शकणार नाही. हातिम त्यांना आश्वस्त करून बंधमुक्त करू पाहतो. ते त्याला तसे करण्यास मनाई करतात. हातिम याचे कारण विचारणार एवढ्यात मागून कन्यकांचा हसण्याचा आवाज येतो. या लोकांच्या अगदी समोरच्या झाडावर सहा तरुणींची मुंडकी केसाने बांधून लटकवलेली आहेत. ही मुंडकी हातिमला बघून हसत असतात. हा प्रकार बघून हातिमला आपण एका तिलिस्ममध्ये अडकलो असल्याचे कळून चुकते.

२.२) तळ्यातले तिलिस्म

सतीश शाहलाही फार हुशार दाखवून चालणार नसल्याने तो "लडकियों के लटकते सर" बघून वेडापिसा होतो. इथे विनोदनिर्मितीचे बाष्कळ प्रयत्न होतात. त्या मुली यांना सांगतात कि आम्ही पाण्यात राहतो. हे बोलून नारळ पाण्यात पडावेत तशी ती मुंडकी अचानक अवतरलेल्या तळ्यात पडतात. हातिमची खात्री पटते की हे तिलिस्म तोडण्याचा मार्ग या तळ्यात आहे. त्यामुळे तो तळ्यात उडी घेतो. सतीश शाहला आपल्याला पाण्यात श्वास घेता येईल का याची खात्री नसल्याने तो बाहेरच थांबतो. इथे शॉटमधून असे दिसते की ते तळे फारसे खोल नाही आणि तळाशी एक गुहासदृश जागा आहे. तिथे या सहा मुली खिदळत जितेंद्राची वाटच बघत असतात. या एक्स्ट्रांपैकी एकही फारशी रुपवती नसल्यामुळे तिलिस्मची मालकीण यापैकी कोणी नसणार हे कोणीही सांगू शकतं. मग तिलिस्मची मालकीण कोण?

याचे उत्तर म्हणून मनजीत कुल्लर (शक्तिमानमधली कौशल्या उर्फ शक्तिमानची आई, अगेन फ्रेश फ्रॉम प्लेईंग सपना इन बंद दरवाजा) झुळझुळीत कपड्यांत अवतरते. ती स्वतःची ओळख "यहां की मलिका, मर्जिना" अशी करून देते. तिला जी वस्तु आवडत असते, त्या वस्तुला ती मिळवतेच. हिरोचे ऑब्जेक्टिफिकेशन होण्याचा रेअर डायलॉग झाल्यानंतर जितेंद्र तिला उपदेशाचा डोस पाजू बघतो. तिला असल्या गोष्टी प्राशन करण्यात इंटरेस्ट नसल्यामुळे ती त्याला घेऊन एका गुहेत शिरते. इथे सतीश शाहला एवढा वेळ झाला तरी जितेंद्र अजून परत न आल्यामुळे जरा चिंता वाटू लागते. मग तोही तळ्यात उडी घेतो. याच्या शॉटमध्ये मनजीतच्या घराला नीट बघता येते. तो एक शंख -शिंपले-कवड्या वगैरेंनी बनलेला महाल आहे. तिथे त्याला जितेंद्र तर नाही पण त्या सहा बायका भेटतात. त्या म्हणतात तुझा आका आता जिंदगी के मजे लुटत असेल तर तूही घे चान्स मारून. नझरुल मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो की हातिम परस्त्रीला स्पर्शही करणार नाही. आता - यांच्या मलिकाविषयी नझरुलला शून्य माहिती आहे. हातिमचे अजून लग्न झालेले नाही. म्हणजे जर ही मर्जिना त्याला आवडली तर त्यांचे लग्न होण्यात काहीच अडचण नाही. ही परीकथा असल्यामुळे गांधर्वविवाह स्कोपमध्ये आहे. एकंदरीत जंप कट + सतीश शाहचे हावभाव बघता मध्ये बराच वेळ निघून गेला आहे. सो हातिमने लग्न करून जिंदगी के मजे घ्यायला सुरुवात केली असेल ही शक्यता अजूनही स्कोपमध्ये आहे. असे असतानाही मर्जिना हातिमची चॉईस असूच शकत नाही हा आत्मविश्वास नझरुलने कुठून पैदा केला असावा?

पण मर्जिनाला वाईट, चवचाल दाखवायचे असल्यामुळे नझरुलचे म्हणणे खरे ठरते. हातिमच्या उपदेशाचा डोस पिण्याऐवजी मर्जिना दारु ढोसते. क्लिअरली पन्नाशीच्या दिसणार्‍या जितेंद्राला विशीतली मनजीत "हुस्न-ए-ईजाद करनेवाले ने तुझे कुछ सोच के बनाया हैं" म्हणते ते आणि एकंदरीतच तिचं फ्लर्टिंग विनोदी आणि अतर्क्य आहे. हातिमला या बाईची भुरळ पडत नाही यात काहीही आश्चर्यकारक नाही. चमत्कार असला तर हाच की हिला परत परत पाहण्याची इच्छा धरून एक नाही दोन नाही चांगले पाचजण बसले आहेत. तिच्या फ्लर्टिंगचा उबग येऊन तो तिला ढकलून देतो. या सर्वांचा शीण आल्यामुळे वाईच जरा टेकावं म्हणून तो मर्जिनाच्या सिंहासनावर जाऊन बसतो. मर्जिनाला त्याच्यावर जादू करण्यासाठी तसेही त्याला सिंहासनावर बसवायचे असतेच, त्यामुळे तिचा हेतु साध्य होतो. हातिम तिच्या जादूने बांधला जातो आणि रोमान्स करायला सिद्ध होतो. अशावेळी गाणे सुरु झाले नाही तरच नवल!

२.३) जिंदगी के मजे

अनुराधाताई पौडवाल गात आहेत "सनमा ओये सनमा, ओये ओये ओये". निव्वळ गाणे म्हणून हे गाणे ओये ओये ओये ओये ओये आहे. पण त्यावर अचाटपणाचे काही खास थर चढवल्यामुळे या गाण्यात वाह्यातपणाचे गुण आले आहेत. तर ...
या गाण्यात जर हातिम जिंदगी के मजे लुटतो आहे असे समजणे अपेक्षित असेल तर हातिमबद्दल प्रेक्षकाच्या मनात कणव निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. बारकाईने निरीक्षण करण्याची पहिली गोष्ट अशी - इतका वेळ मनजीतने सलवार विशिष्ट लेव्हलच्या खाली नेसली आहे. नेव्हल शॉट्स काढून झाल्यामुळे गाणे सुरु होताच ही सलवार वर सरकते. पण जितेंद्र तिच्यासोबत नाचू लागताच ती पुन्हा खाली घसरते. एखाद्या साईन वेव्हप्रमाणे तिची सलवार/परकर इ. (कडव्यासोबत हिचे कपडे बदलतात) पूर्ण गाण्यात वर खाली होत राहते. मिनिटभर थांबून सलवारची नाडी बदलून मग नाचगाणे केले असते तरी चालले असते. उगाच प्रेक्षकाच्या मनात धाकधूक!

मागे नाचायला म्हणून चौकटी-चौकटीच्या डिझाईनचे कपडे घातलेल्या ११ एक्स्ट्रा आणल्या आहेत. विशेष म्हणजे आधी दाखवलेल्या सहा बायकांमधली इथे एकही रिसायकल केलेली नाही. थोडक्यात खर्चा कियेला हैं. नाहीतर नाचे नागीन गली गली - बघावे तिथे एक्स्ट्रा रिसायकल. या अकराच्या अकराजणी मनजीतपेक्षा चांगल्या नाचतात. अगदी जितेंद्रही तिच्यापेक्षा चांगला नाचला असता. पण त्याला तिच्या जादूत मुग्ध झाल्याचे भाव घेऊन येरझार्‍या घालण्याचे काम दिले आहे. बापडा ते मन लावून करतोही पण ....
सेक्शन ०.२ मध्ये म्हटल्याप्रमाणे अनटॅप्ड पोटेन्शिअल असेच जाणवत राहते. इंटरेस्टिंगली याची कोरिओग्राफी पी. एल. राजने केली असली तरी या गाण्याचे अ‍ॅस्थेटिक १९९४ च्या मोहरामधल्या तू चीज बडी हैं मस्त मस्त सारखे आहेत. कदाचित इथे सरोज खान असती तर तिने जितेंद्रला नीट वापरला असता आणि मनजीतलाही जरा बर्‍या स्टेप्स दिल्या असत्या. बाकी सेट डिझाईनवर बरीच मेहनत घेतली आहे यात वाद नाही. त्यामुळे मनजीतचे ड्रेसेस अजूनच विजोड दिसतात. मध्ये तर तिला चक्क पिसांचा पोशाख (ऑफ कोर्स बिकिनी स्टाईल) दिला आहे. अंडरवॉटर राहणारी बाई असे कपडे का घालेल?

२.४) मैं आया हैं तो उपदेशामृत पाजकेही जाएगा - हातिम

सुदैवाने हा प्रकार फार काळ लांबवलेला नाही. एकदाचा हातिम तिच्या हुस्नच्या जाळ्यात अडकतो. आता तो जिंदगी के मजे लुटायला सुरुवात करणार इतक्यात त्याच्या गळ्यातला ताईत चमकू लागतो. पिशाचांना सूर्यप्रकाशाचा त्रास होतो तसा मर्जिनाला त्या ताईतातून येणार्‍या प्रकाशाचा त्रास होऊ लागतो. लहानपणी बांधलेला रक्षक ताईत कामी यायलाच हवा या नियमाचे पालन होते आणि हातिम भानावर येतो. अतिशय खराब स्पेशल शॉटमध्ये हातिम आणि नझरुल तळ्याच्या बाहेर फेकले जातात. तळ्याच्या बाहेर दिसलेली दोन्ही झाडे गायब झाली आहेत. पाठोपाठ मर्जिनाही धावत धावत तळ्याच्या बाहेर येते. तिला आता आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. प्रत्यक्षात तिला हातिमचा राग यायला हवा. पण आले दिग्दर्शकाच्या मना तिथे कोणाचे चाले? हातिमही तिला उदार मनाने माफ करतो. आता ते उलटे टांगलेले पाचजण आणि त्यांचे झाड परत प्रकट झाले आहे. हातिमच्या विनंतीला मान देऊन ती या आदमजादांना मुक्त करते. हातिम त्यांना उपदेश करतो की कामाग्नि कधीच शमत नाही. त्यामुळेच तुम्ही म्हणत होतात की "एक बार देखा हैं, दुसरी बार देखने की हवस हैं". नझरुलच्या लक्षात येते की अनवधानानेच का होईना, हातिमने पहिला प्रश्न सोडवला आहे.

इकडे यमनमध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर असल्याची लक्षणे दिसतात. पुतळ्याचा चेहरा बदलून तो संगीता बिजलानीसारखा दिसू लागतो. फळ्यावरचा पहिला प्रश्न पुसला जातो. हे बघून मरियम आणि गुलनार खुश होतात. इथे दोन चुका आहेत. आधी दाखवलेला पुतळा आणि या शॉटमधला पुतळा क्लिअरली वेगळा आहे. दुसरं म्हणजे मरियम तिला परी बानो संबोधते. ही कंटिन्यूटी मिस्टेक आहे जी या स्टेजला लक्षात येणे कठीण आहे कारण बानो हे ताई सारखे जनरिक फारसी अव्यय आहे. पण संगीता बिजलानीचा डबल रोल असून तिच्या दुसर्‍या भूमिकेचे नाव परी बानो आहे. त्यामुळे इथे मरियमने संगीताला गुलनारच संबोधले पाहिजे. क्लिअरली कंटिन्यूटी एरर. पण पहिला प्रश्न सुटल्याच्या आनंदात प्रेक्षक या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करतो.

अशा रीतिने हातिमने एक प्रश्न सोडवला. उर्वरित सहा प्रश्नांची उत्तरे काय असतात? हातिम आणि नझरुलला आणखी कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? हातिमला हिरोईन कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन उर्वरित सहा रोमांचक सेक्शन लवकरच प्रतिसादांत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एक बाई काही कारणाने जितूकडे "जवळून तितका हँडसम वाटत नाही" नजरेने बघते आहे. >> खोखो हसले हे वाचून Biggrin

भारीच Happy Lol

मला यातल्या अगदी काही चुकार गोष्टी आठवतम्ल,

micro मिनी घातल्यासारखा फ्रॉक घालणारा त्या परी चा बाबा,
शिंगवाली काठी हातात घेतलेला अमरीशपुरी,
आणि मसक्कली step मध्ये पोपटाच्या मागे उडणारी संगीता बिजलानी
आणि क्लाय्माक्स मध्ये सगळ्यांना बांधून धेवालेले असतांचे एक गाणे.

डिसेक्शन करण्यासाठी अगदि योग्य चित्रपट Lol

पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत Happy

भयंकर
माझी अनेक दिवस हसायची सोय झाली.
मला फक्त मिश्या वाली संगीता आणि जितेंद्र चा भयंकर वेलबुट्टी लपेल चा कोट आठवतोय.

ज ह ब ह री.......!! मस्त!
Lol
जिंदगी के मजे, हिरोचे ऑब्जेक्टिफिकेशन, आदमजादे (यावरुन ऑभ्वियसली हरामजादे चीच आठवण येते!) - हे भारीच.
त्याच जंगलात कुठेतरी एका झाडाला पाचजण उलटे टांगून ठेवलेले दिसतात. हे सर्व वारंवार "एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस हैं" म्हणत असतात. - ही अशी पटकथा कोण लिहू शकतं...?
आणि हातीम ताई का म्हणे....ताईत दिला असतो म्हणून... 'ताई'?
कितीदाही सांगितलं तरी, हातिम ताई हा माणूस (पक्षी : जितेंद्र) आहे हे लवकर पटत नाही! ती स्त्रीच वाटते. Happy

मला वाटलं जुना टॉपिक असेल कारण जुन्या मायबोलीवर केलेल माफक डीसेक्शन आठवतय.
अचानक लक्षात आलं पायस प्रसन्न.

मनसोक्त हसलो. कलिग्ज विचारत होते मग दिली लिंक.
पुढच्या भागाची वाट बघतोय

धमाल आहे !!! जसे वाचत गेलो तसतसा एक एक सिन आठवत गेला.
कितीदा ही सांगितलं त री हातिम ताई हा मर्द आहे हे लवकर पटत नाही! >> +१११ पिक्चर बघितलेला आहे तरीही हातिमताई ऐकल्यावर डोळ्यासमोर आधी स्त्रीच उभी राहते.

चिंचे +1. हातिमताई म्हणजे स्त्रीचं वाटते अजूनही. Happy
मी कधीतरी लहानपणी बघितलाय हातिमताई. तेव्हा एवढं काही कळत पण नव्हतं. पण हे परीक्षण वाचून थोडी थोडी आठवतेय फिल्म.

निव्वळ गाणे म्हणून हे गाणे ओये ओये ओये ओये ओये आहे. पण त्यावर अचाटपणाचे काही खास थर चढवल्यामुळे या गाण्यात वाह्यातपणाचे गुण आले आहेत. >> Rofl हे गाणं आठवतंय मला एकदा झी वर का कुठेतरी लागलेला तेव्हा हेच गाणं चालू होतं आणि वैतागून चॅनेल बदललं होतं मी.

वावावा! येउद्या अजुन.
हा सिनेमा पाहिलेला आहे झी सिनेमावर. तेव्हा लहान मुलांसाठीचा जादुचा सिनेमा असेल असं वाटलेल. Happy

एक बाई काही कारणाने जितूकडे "जवळून तितका हँडसम वाटत नाही" नजरेने बघते आहे. >> Lol
(म्हणजे नेमकी कशी बघतेय ते बघण्यासाठी मी तेवढा भाग शोधुन पाहिला युट्युबवर Lol )

चला, पायस ने नव्या(?) सिनेमाचं अ‍ॅनलिसीस हातात घेतलय. म्हणजे पुढचे काही दिवस अत्यंत सुखात जाणार आहेत. फारएण्ड आणी श्रद्धा चं सुद्धा ह्या धाग्यावर लवकरच आगमन होवो! व्वा!! आने दो!!

अरे बापरे, भयानक विनोदी चित्रपट आहे हा. त्यात त्या आलोकनाथचा ड्रेस (?) काय खतरा आहे Happy
संगीता बिजलानीची वेषभूषा लहान मुलांच्या संमेलनातील नाटकात परीराणी असते तसली आहे. in fact, आम्हीच तिसरी चौथीत असताना नाटक बसवले होते त्यातली परी तशीच होती. थर्माकोलचे चंदेरी कागद लावलेले पंख, डोक्यावर चंदेरी मुकुट, पांढरा फ्रॉक, चंदेरी कागद लावलेली जादूची कांडी. Happy

हातीम ताई बरेच दिवसांत पाहिलेला नाही. आता नक्कीच पहावा लागेल. सुरूवातीचा एक प्रसंग पहिला असता असे जाणवले की त्या मरियमच्या कपड्यांवर बराच खर्च केलेला दिसतो. तिच्या गुलाबी ड्रेस वर तर अगदी नको तिथे चमकणारी फुलं लावली आहेत Proud
बाकी हळू हळू बघेनच. (रझा मुराद च्या फळ्यावर नक्की अरबीत लिहीलेले असते की उर्दूत ? मला लिप्यांमधला बेसीक फरक कळत नाही)

तू आठवण करून दिलेल्यामध्ये पाताल भैरवी हा माझा आवडता पिक्चर आहे. त्यातले ते संजिवनी बुटी वगैरे गोष्टी एक नंबर आहेत.

सर्वांना धन्यवाद Happy

हातीम ताई का म्हणे >> ताई हे जमातीचे नाव आहे. थोडक्यात ते ताईंचा (ताई कुलोत्पन्न) हातिम असे आहे. त्याचं पूर्ण नाव हातिम बिन अब्दुल्लाह इब्न सादत ताई असे भारदस्त आहे.

पटकथा अशी का लिहिली आहे? >> कारण ओरिजिनल कथा अजूनच बाँकर्स आहे. त्यात तर पशुपक्षी सुद्धा हातिमला एका नजरेत नेकी का फरिश्ता म्हणून ओळखतात.

आलोकनाथचा ड्रेस >> Lol येऊ त्याच्याकडे वेळ आली की.

मरियमच्या कपड्यांवर बराच खर्च केलेला दिसतो >> हो हो. तिला चमकीत बुचकळून काढलं आहे असं वाटतं ना? हा सिनेमा पाहून माझ्या मनात पहिला विचार हाच आलेला की खर्चा किएला हैं.

रझा मुराद च्या फळ्यावर नक्की अरबीत लिहीलेले असते की उर्दूत? >> मी वाचण्याचा प्रयत्न केला. मध्ये मध्ये उर्दू शब्द आहेत, एक दोन अरबी शब्द वाटतात आणि बाकी कचरा. जे काही जितेंद्र वाचतो त्याच्याशी मला ते लिहिलेले मॅच नाही करता आले.

पायस धिस इज गोइन्ग टु मेक माय वीकेंड. गॉड ब्लेस जबरी विनोदी व्हेन सापडली आहे तुम्हास उपरवाला मेहरबान है. मेरी तरफसे एक बिर्यानी और हलीम चिकन ६५ और फिरनी.

३) प्रश्न दुसरा: नेकी कर दरिया में डाल

अजूनही हे प्रश्न सोडवण्याची सिस्टेमॅटिक पद्धत न सापडल्याने हातिम आणि नझरुल जंगलातच भटकत असतात. त्यांच्या सुदैवाने हे जंगल आयकिआ स्टोर असल्याने त्यांना तरीसुद्धा पुढच्या प्रश्नाचे उत्तर जंगलातच सापडणार यात प्रेक्षकाला तिळमात्र शंका नाही. हे लोक आता अधिकच घनदाट जंगलात हिंडत असल्यामुळे हे पृथ्वीतलावर नक्की कोठे आहेत हे सांगणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. किंबहुना तिथले जीवजंतु, झाडे बघता हे पृथ्वीतलावर तरी आहेत का हेही सांगता येत नाही. अजून मानवाने अंतराळातील भूगोलाचा अभ्यास केला नसल्याने मला या सिनेमाचा भूगोल अभ्यासता येणे शक्य नाही, तरी मी दिलगीर आहे. काही क्षण चालल्यानंतर दिग्दर्शकाच्या लक्षात येते की एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडणे आवश्यक आहे आणि ती या सिनेमांच्या नियमानुसार पहिल्या अर्ध्या तासात होणे अनिवार्य असते. हे २९ वे मिनिट चालू असल्याने ती गोष्ट घडण्यासाठी सतीश शाह थकल्याचा अतिशय खराब अभिनय करतो आणि ते दोघे विश्रांतीसाठी म्हणून वाटेतल्या पाषाणांवर विसावतात.

३.१) हिरोईन की एंट्री

आता गुलनार काही हातिमची हिरवीण असू शकत नाही. हिरोईन जर हिरोपासून दीर्घकाळ दूर राहणार असेल तर ती व्हिलनकडे असावी लागते. रझा मुराद काही सिनेमाचा व्हिलन नाही तसेच त्याचे परिवर्तनही झालेले आहे. इतर दोन पोरी (मरियम आणि मर्जिना) सुद्धा याच्या हिरवीणी नाहीत. थोडक्यात अजून याला हिरवीण आणलीच नाही आहे. अर्धा तास झाला तरी हिरोला हिरोईन नाही ये बहुत नाइंसाफी हैं. त्यामुळे आता हिरवीणीची एंट्रीचा सीन घेण्याची वेळ झाली आहे.

होतं काय की हे दोघं जरा बूड टेकवतात न टेकवतात तोच अतिशय हिडीस मेकअप केलेले चार ओंडके त्यांना घेराव घालतात. या ओंडक्यांना कवट्या महाकाळ स्टाईलचे मुखवटे घातले आहेत आणि डोळ्यांच्या जागी पाकपूक करणारे बल्ब लावले आहेत. हातिम नझरुलला सांगतो की हे खवीस आहेत. हे माणसांना खातात आणि पार हाडे सुद्धा चावून पचवतात. एकतर खवीस हे अरबी लोककथांनुसार एक प्रकारचे जिन्न असतात. अगदी भारतीय कॉकटेल वापरायचे तरी त्यातही ते सहसा गुंजेसारखे लाल डोळे असलेल्या माणसाच्या रुपात असतात. त्यामुळे हे चालणारे झाडे प्रकरण भंकस आहे. दुसरे म्हणजे ते इतके निवांत चालत येत आहेत की सतीश शाहच्या साईझचा माणूस सुद्धा त्यांना सहज चकवून निसटू शकेल. पण फॉर द ग्रेटर गुड ते तसेच थांबतात.

तर ग्रेटर गुड असे - आकाशात संगीता बिजलानी परीचा गॅदरिंग स्पेशल पोशाख (पांढरा शुभ्र फ्रॉक, त्याला पिसांची झालर, थर्माकोलचे पंख, त्याला चंदेरी कागद आणि हातात चांदणीची छडी) घालून उभी असते. तिच्या छडीतून किरणांचा वर्षाव होतो आणि ही चौकडी पळून जाते. गंमत म्हणजे पळताना ते त्याच वेगाने बॅकवॉक करत जातात. व्हॉटेव्हर, सध्या मुख्य मुद्दा असा की आकाशात हा दगड कसा काय तरंगतो आहे? आय मीन दगडाची झालेली परी इथे कशी काय? हातिम आणि नझरुलला ती परी दिसते. परीताई सुद्धा जमिनीवर उतरतात. इथे नीट पाहिले तर लक्षात येते की हिच्या फ्रॉकचे डिझाईन, खासकरून गळ्याचे डिझाईन, थोडे वेगळे आहे. त्यामुळे ही गुलनार परी असूच शकत नाही. पण हे हातिमला कळत नाही त्यामुळे तो तिला गुलनार परी समजतो. आता त्याला हाही प्रश्न पडला पाहिजे की ती दगड झालेली परी इथे कशी काय येईल? हा कोणीतरी वेगळा दगड आहे. परीकथेतले हिरो हुशार नसतात हेच खरे!

हातिम आणि परी एकमेकांना पाहून छानपैकी लाजतात. ही असते परी बानू. आधी नमूद केल्याप्रमाणे हिचे अ‍ॅक्चुअल नाव काहीतरी वेगळे असायला हवे. पण लेखक कंटाळल्यामुळे त्याने बहुधा हिच्या नावावर गिव्ह अप मारला आहे. किंवा हिचे नाव हातिमशी लग्न झाल्यावर तसेही परी ताई होईलच म्हणून ते फारसी मध्ये परीताई (ताई=बानू) ठेवले असावे. नुसता तायांचा सुळसुळाट!
परी बानू गुलनारची जुळी बहीण असते. तिला हातिम आपल्या बहिणीसाठी सात प्रश्न सोडवायला निघाला आहे हे ठाऊक असते. हे कळल्यापासून तिचे हातिमवर प्रेम बसले(!!) आणि प्रत्येक आदमजादबद्दल तिला ममत्व वाटू लागले आहे (हे जरा जास्तच होतंय). म्हणून तिने त्याला वाचवले. ती आता हातिमला शोधते आहे. नझरुल लगेच सांगतो की तुझ्या समोरचा गबरु जवानच हातिम आहे. हे ऐकताक्षणी ती हातिमला चिकटते. दगडासोबत रोमान्सला अजून हातिम कंफर्टेबल नसल्याने त्याच्या चेहर्‍यावर काहीसे अवघडल्याचे भाव आहेत. ते दूर करण्यासाठी गाणे गरजेचे आहे.

३.२) हिरो-हिरोईनच्या रोमान्सचे गाणे सिनेमात असलेच पाहिजे

वैधानिक इशारा द्यायची वेळ झालेली आहे. इथून पुढची पाच मिनिटे मुन्ना अझीझ विव्हळतो. कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी इथून पुढचा पाच मिनिटाचा सिनेमा म्युट करून पाहावा. गाणे आहे "न दिल क्युं दीवाना तुम्हे देखकर हो, तुम्हे क्या खबर तुम हसीन किस कदर हो." सोबतीला आहेत अनुराधा पौडवाल. यांना नाचता यावे म्हणून बानू हातिमला घेऊन सूर्यफुलांची बाग, उटी, आकाश, नदीकाठ अशा विविध ठिकाणी घेऊन जाते. हा डान्स एकापेक्षा एकमध्ये नक्की शंभर रुपये मिळवेल. कारण हा संपूर्ण डान्स इथून ते इथपर्यंत होतो.
बाकी गाण्याविषयक सांगण्यासारखे विशेष काही नाही. या सिनेमात एकंदरीतच लक्ष्मीकांत-प्यारेलालनी तितका जीव ओतलेला नाही. राहता राहिला या दोघांचा रोमान्स - संगीताताईंकडे बघून त्यांच्यात जितेंद्राला उचलून उडण्याची शक्ती असल्याचे कोणालाही पटेल, शंका नसावी. रादर जितेंद्र परा असता तर त्याच्यात हिला घेऊन उडण्याची शक्ती असती का असा प्रश्न पडणे अधिक स्वाभाविक आहे. शेवटी हे दोघे आकाशात जाऊन ओष्ठमिलनाचा कार्यक्रम पार पाडतात असे सूचित करून गाणे संपते.

इकडे नझरुल एकटाच यांची वाट पाहत बसलेला असतो. हे परत येतात तर तो भावी वहिनींना सांगतो की तायडे मला भूक लागली. म्हणे की याने आणि हातिमने पंधरा दिवस काहीच खाल्लेले नसते. बानू लगेच छडी फिरवते आणि मेवा-मिठाई वगैरे एका गालिच्यावर अवतरते (हा स्पेशल इफेक्ट सीन चांगला घेतला आहे. किंबहुना अशा टाईमपास सीन्सना नीट शूट केल्यामुळेच हा सिनेमा चालला असावा). खाणे समोर दिसताच नझरुल अधाशासारखा ते हादडतो. अनाकलनीय कारणाने हे हातिम आणि बानू कौतुकाने बघत राहतात. त्या दोघांनाही नझरुल थोडे बहुत खाऊन घ्यायची विनंती करतो. पण आधीच्या एका वाक्याचा रेफरन्स घेऊन बानू म्हणते की मी तुझ्या आकाप्रमाणेच काही खात पित नाही, फक्त दुसर्‍यांसाठी जगते. ती एक परी आहे, तिला नसेल भूक लागत. या हातिमचा काय मुद्दा आहे? असो हे दुसर्‍यांसाठी जगणे फार महत्त्वाचे आहे कारण ही दुसर्‍या सवालाची पार्श्वभूमि आहे.
या दोघांनी सोबत कपडे, सामान सुमान काहीच घेतलेले नसल्यामुळे तीच यांच्यासाठी नवीन कपड्यांची व्यवस्था करते. अशावेळी कळकट कपड्यातल्या (भले ते वाटत नसले तरी गोष्टीनुसार कित्येक दिवस ते धुतलेले नाहीत) हातिमसोबत या परीने कसा काय रोमान्स केला असेल हा विचार प्रेक्षकाच्या मनात डोकावून त्याला अचानक संगीताबद्दल सहानुभूति निर्माण होते. यांच्या प्रवासाची सोय म्हणून ती दोन घोडेही कुठून तरी पैदा करते. शेवटी परत गरज पडली तर जितेंद्राला तिला बोलावता यावे म्हणून ती त्याला एक बासरी देते. ही बासरी वाजवली की ती येणार. हे सांगून ती निघून जाते.

३.३) झिबू झेपान की, कसम हैं मुझे इस खुले आसमान की

बराच टाईमपास झाल्याने आता पुन्हा प्रश्न सोडवण्याची वेळ झालेली आहे. सीन बदलून असे दिसते की जोगिंदर आणि त्याचे पाच-सहा सोबती डाकू आहेत. त्यांनी गोगा कपूरला बांधून ठेवले आहे. गोगा कपूरला कोणत्यातरी खजिन्याचा पत्ता माहित आहे. जोगिंदरला तो खजिना पाहिजे. साधे सोप्पे गणित सांगते की गोगा कपूर त्याला खजिना देणार नाही, कारण दिला तर तो या सिनेमात राहण्यास लायक नाही. याने भडकून जोगिंदर गोगाला उघडा करून चाबकाने फोडत असतो. गोगा कपूर एका फकीर स्टाईल वेशात दाखवला आहे. जोगिंदरने श्रीप्रदाचा मैं हूं शेरनी मधला ड्रेस घातला आहे. जर चालबाजमधल्या रोहिणी हट्टंगडीचा केसांचा कोंबडा सोडून बाकीचा चकोट केला तर जोगिंदरची या सिनेमातली हेअर स्टाईल तयार होते.
तेवढ्यात तिथे घोड्यांवरून हातिम आणि नझरुल येतात. गोगा कपूर असला म्हणून काय झालं, असं कोणालाही फोडू देणं त्यांच्या उसूलांत बसत नसतं. त्यामुळे ते बोलाचाली न करता थेट हाणामारी सुरु करतात. हाणामारी फारच किरकोळ आहे. हातिम आणि नझरुल इतर सर्व गुंडांना बदडतात. सुटका झालेला गोगा जोगिंदरला फोडतो. मग हातिम जोगिंदरला जवळच असलेल्या दरीत ढकलून देतो. या संपूर्ण सीनमध्ये जोगिंदरचा अभिनय केवळ एंटरटेनमेंट आहे.

हातिम आणि नझरुल मग गोगा कपूरला हा काय प्रकार होता हे विचारतात. तो त्याची कर्मकहाणी सांगू लागतो. पूर्वी तो एक डाकू होता आणि मर्जान (जोगिंदर) व हे इतर लोक त्याच्या गँगचे मेंबर होते. एके दिवशी काय होते की हे सगळे एक काफिला लुटून परतलेले असतात. गोगा कपूर बराच जखमी झालेला असतो. पण त्याची एक सवय असते. काय वाट्टेल ते होवो तो माशांना खायला घालायला विसरत नसतो. त्यानुसार तो तसाच जखमी अवस्थेत रोट घेऊन नदीकाठी जातो आणि त्याचे तुकडे माशांना खाऊ घालतो. अशा अवस्थेत नसते उद्योग केल्यानंतर हा गचकला नाही तरच नवल! त्या रात्री मौत के फरिश्ते (दोन काळे कभिन्न एक्स्ट्रा) येतात आणि त्याच्या आत्म्याला घेऊन जातात.
त्याला शैतानासमोर आणतात. इथे याची पापे अर्थातच जास्त असल्यामुळे शैतान त्याला जहन्नुमच्या आगीत टाकायला सांगतो. पण तिथे नेकी नावाची परी येते. तिच्या म्हणण्यानुसार याने भुकेल्या माशांना अन्नदान करुन मोठ्या पुण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्याची दोरी बळकट झाली असून त्याला परत पाठवावे. शैतानही फारसे आढेवेढे न घेता त्याला परत पाठवतो.

आपल्या एका छोट्याशा पुण्यकर्मामुळे आपल्याला जीवनदान मिळाले हे गोगाच्या लक्षात येते. त्यामुळे तो लगेच डाकूगिरीचा त्याग करून फकीर बनतो. जोगिंदर हे बघून म्हणतो की ठीक आहे तू बन फकीर पण आम्ही का डाकूगिरी बंद करू? तो खजिना दे आणि मग जा उडत. गोगा कपूर काही खजिना देत नाही. आणि पुढची कहाणी हातिम आणि नझरुललाही ठाऊक झालीच आहे. त्या दोघांचे आभार मानून गोगा कपूर म्हणतो की आता माशांना खायला द्यायची वेळ झाली. स्पेसिफिक डायलॉग - मेरी मछलियां मेरा इंतजार कर रही होगी. या सगळ्या बॅकग्राऊंड नंतरही हे वाक्य गोगा कपूरच्या तोंडी ऐकायला गंमतीशीर वाटते. हातिम म्हणतो की आम्ही सुद्धा तुझ्यासोबत येऊन अन्नदान करतो. मग ते जाऊन माशांना पोळीचे तुकडे टाकत असतात तेव्हा पाण्यात अक्षरे तरंगतात - नेकी कर दरिया में डाल.

लगेच दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर बरोबर असल्याची लक्षणे दिसू लागतात. गुलनारचे धड आणि पंख पूर्ववत होतात. फळ्यावरचा दुसरा प्रश्न पुसला जातो. दुसरा प्रश्न सुटला.

Lol
त्या जोगिंदर व गोगाच्या लढाईत हातिम अशी बाय डिफॉल्ट गोगाची बाजू कशी काय घेतो..? आधी जाणून तरी घ्यायचे ना की कुठल्या पार्टीचे काय म्हणणे आहे!
बाकी मस्तच.. परा, ग्रेटर गुड, मेरी मछलीया.......!!

आणि गोगा जर एनी वे फकीर बनलाच आहे...तर मग देऊन टाकायचा ना खजिना त्या जोगिंदर का कुणाला ते....!! त्यात काय इतकी हिंसा....?

आपल्या हिंदू तत्व ज्ञानानुसार, जर कुणी अगदी परोपकारी संत चुकून यमसदनास गेला..आणि तो परोपकारी इ असल्याने त्याचे डिसिजन रिव्हाईज करण्याची वेळ आलीच...तर त्याला या ऐहिक लोकात परत पाठविणे म्हणजेच खरे तर शिक्षा...... त्याला तिकडेच मुक्ती मिळेल.
पण यांचे वेगळे असावे. त्यामुळे गोगा परत येतो.
लोल Biggrin पायस, तुम्हाला हे गोगा कपूर आणि तत्सम सेकंडरी व्हिलन्/हिरोज (कथानकाच्या गरजेनुसार) इतके मुखोद्गत कसे आहेत?

असाच एक सिनेमा आहे त्यात विक्रम गोखले हीरो आहे. त्यात पण असेच सात प्रश्न सोडवायचे असतात. लहानपणी खुप आवडलेला.

जर चालबाजमधल्या रोहिणी हट्टंगडीचा केसांचा कोंबडा सोडून बाकीचा चकोट केला तर जोगिंदरची या सिनेमातली हेअर स्टाईल तयार होते. >> Lol

हापिसात वाचायची सोय नाय Happy

तुम्ही लिहीलत तेव्हढाच भाग काळजीपुर्वक पाहिला
धम्माल आहेत सगळे पन्चेस Happy
भनाट निरी?क्षणॅ आहेत सगळीच Proud
एक बाई काही कारणाने जितूकडे "जवळून तितका हँडसम वाटत नाही" नजरेने बघते आहे. >> Lol
कसं सुचतं तुम्हाला असं.. १ सेकन्दाचा असेल तो सीन..
(म्हणजे नेमकी कशी बघतेय ते बघण्यासाठी मी तेवढा भाग शोधुन पाहिला युट्युबवर >> हा सीन पुन्हा पुन्हा पाहिला.. आधी कळेनाच कुठली बाई ते, नन्तर ट्युब पेटली Proud

Rofl
Lol

मस्त लिहीलंय. काय जबरा निरीक्षण व काथ्याकूट. आता शिणुमाची लिंक व प्रसंगानुरूप अनुक्रमाणिका टाकायला हवी फक्त. फार पुण्याचं काम केलंयत् पायसराव. आजचा दिवस सत्कारणी लागला.

हिचे नाव हातिमशी लग्न झाल्यावर तसेही परी ताई होईलच>>>गूड वन Lol
चालबाजमधल्या रोहिणी हट्टंगडीचा केसांचा कोंबडा सोडून बाकीचा चकोट केला तर जोगिंदरची या सिनेमातली हेअर स्टाईल >>> Lol

पारस,तुमची विनोद बुद्धी आणि निरिक्षण शक्ती अशक्य आहे. 0.30 सेकंदाच्या सीन चे पण विश्लेषण केलेलं दिसतय.पुन्हा आज वाचलेला भाग बघीतला..youtube वर हिट्स वाढणार तुमच्या परिक्षणानंतर Lol

Pages