हातिम ताई

Submitted by पायस on 14 March, 2019 - 04:12

हातिम ताई हा एक चमत्कारिक चित्रपट आहे. त्यात चमत्कृतिपूर्ण गोष्टी घडतात म्हणून नव्हे तर त्याच्या शैलीस प्रतिकूल अशा वर्षी प्रदर्शित होऊनसुद्धा त्याने बर्‍यापैकी गल्ला जमवला म्हणून (वेगवेगळे सोर्सेस वेगवेगळे आकडे सांगत असले तरी १९९० साली याने किमान १ कोटींचा गल्ला जमवला यावर त्यांचे एकमत दिसते). असा हा विशेष सिनेमा अभ्यासायचा म्हणजे काही पूर्वाभ्यास गरजेचा आहे. तरी यावेळेस सेक्शन्सना सेक्शन ० पूर्वाभ्यास पासून सुरुवात होईल.

०) पूर्वाभ्यास

०.०) हातिम ताई : ओरिजिनल स्लमडॉग मिलिएनेअर

आधी तर हातिम ताई या थोर पुरुषाविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. मूळात हातिम ताई हा एक अरबी कवी होता, जो इस्लाम धर्म स्थापन होण्याच्याही आधी (सहावे शतक) होऊन गेला. त्याच्याविषयी अनेक किवदंती आहेत. यावर आधारित साहित्य निर्मिती अरबीत/फारसीत झाली. त्यामुळे त्याचे अल्ला का नेक बंदा, खुदा का फरिश्ता वगैरे वर्णन हे कथाकारांनी घेतलेली लिबर्टी असावी. त्याच्या दयाळु स्वभावाचे वर्णन करायचे तर काळाला साजेशी विशेषणे तर वापरावी लागणारच. हीच हुशारी या चित्रपटाच्या पटकथाकारानेही दाखवली आहे.
मूळ कथेमध्ये एक राजा हातिमचा मित्र असतो. या राजाचे हुस्न बानू नावाच्या सौंदर्यवतीवर प्रेम असते. बानूबाईला मात्र खंडोबाच हवा असल्याने तिने लग्नाचा पण म्हणून सात भलतेच अवघड प्रश्न काढलेले असतात. जसे स्लमडॉग मिलिएनेअर मधले प्रश्न कधीच केबीसीत विचारले जाणार नाहीत, तसेच हिचे व्हेग प्रश्न कोणत्याही स्वयंवरात विचारले जाणार नाहीत. आता राजा भित्रा असल्यामुळे त्याला या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपला जीव गमवायचा नसतो पण बानूही हवी असते. मग हातिम उदारपणे राजाच्या वतीने हे प्रश्न सोडवायची तयारी दर्शवतो. मग मूळ अरेबियन कथांमध्ये दर रात्री जेव्हा शहरजादे गोष्ट सांगते तेव्हा हातिम प्रश्नाचे उत्तर घेऊन बानूकडे परत आलेला असतो. तो आधी त्याची कर्मकहाणी, जमालच्या फ्लॅशबॅकप्रमाणे सांगतो. फ्लॅशबॅक संपल्यानंतर तो उत्तर देणार. ते उत्तर बरोबर आहे असे बानू सांगणार. अ‍ॅक्चुअली तिला यातले एकही उत्तर माहिती असता कामा नये. उदा. एका प्रश्नात तिने त्याला एका जागेची माहिती काढायला सांगितलेली असते आणि तिथून आजवर कोणीही मनुष्य जिवंत परत आलेला नसतो. मग हिला त्याचे उत्तर कसे माहित? कशावरून हातिमने खरे उत्तर सांगितले? तर मूळ कथानकात अशा बर्‍याच अडचणीच्या जागा आहेत. पूर्वाभ्यासासाठी इतके कळणे पुरेसे आहे की हातिम सर्व उत्तरे शोधतो आणि त्याच्या सांगण्यावरून बानू राजाशी लग्न करते.

०.१) कथेचे रुपांतर करताना काळजी घेणे आवश्यक
तर इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम - हातिमला हिरोईन नाही. ९० चे दशक उजाडले असले तरी या नियमाचे मार्गदर्शक तत्वात रुपांतर झालेले नसल्याने हातिमला हिरोईन असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे अतिशय हुशारीने कथेत आवश्यक ते बदल करून हातिमला हिरोईन मिळण्याची सोय केली आहे. तीसुद्धा अगदी विकोची हळद पिऊन गोरी झालेली!
दुसरा मुद्दा - या प्रश्नांची आन्सर की कुठून आणायची? इथे कादर खानने रुढ केलेला ८० च्या दशकातला नियम वापरावा लागतो. जादूच्या सिनेमात ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत नाही त्याचे उत्तर जादू! त्यामुळे मूळ कथेत नसलेला परीचा एलिमेंट इथे अ‍ॅड केला आहे. या दोन मूलभूत बदलांमुळे सिनेमाला मुख्य व्हिलन मिळण्याचीही सोय होते. तसेच रिडीम्ड व्हिलन, व्हिलनचे आद्य कर्तव्य सीन अशा कित्येक मौलिक संधी पटकथाकाराला उपलब्ध होतात. होतकरू लेखकांनी या अँगलने या सिनेमाचा कसून अभ्यास केला पाहिजे.

०.२) कादर खान नसेल तर जितेंद्रही काही करू शकत नाही
इथे एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. हा सिनेमा पद्मालय स्टुडिओज् चा नाही. हा सिनेमा बाबूभाई मेस्त्रींचा आहे. स्पेशल इफेक्ट्स डिपार्टमेंटमधून पुढे आलेल्या आणि साठच्या दशकातले बरेच पौराणिक सिनेमे दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शकाचा अनुभव दांडगा आहेच आणि त्याचा काही प्रमाणात सिनेमाला फायदाही होतो पण; पण हा सिनेमा ऑलमोस्ट सीन टू सीन मेस्त्रींच्याच १९७१ सालच्या सात सवालची कॉपी आहे. वाढलेल्या बजेटनुसार नवल कुमारच्या जागी जितेंद्र आणि चकाचक सेट वापरले गेले असले तरी एक घोळ झाला आहे. ८० च्या दशकात पौराणिक सिनेमांचा सॉर्ट ऑफ रिसर्जन्स झाला होता. याला कारणीभूत होता कादर खान. कादर खान काळाची पाऊले ओळखून डेव्हिड धवन लाटेचे प्रिकर्सर सिनेमे लिहित होता. या आऊटडेटेड टॉपिकला त्याने हात घातला नाही. पण या सिनेमाने १९७१ ला साजेशी पटकथा घेऊन त्याला कादर खान शैलीत बनवण्याचा प्रयत्न केला. ते तितकं काही जमलेलं नाही. हातिम ताई आणि पाताल भैरवी यांचा तौलनिक अभ्यास केल्यास कादर खानचा ग्रेटनेस समजून येतो. या धाग्याचा तो विषय नसल्याने केवळ उहापोह करून थांबतो आहे. परंतु त्यामुळे हा सिनेमा पाहून सतत "अजून भारी करता आला असता" हे वाटत राहते.

१) आटपाट नगर होते

१.१) तिथे एक अल्लाचा नेक बंदा राहत होता

लाल पडद्यावर श्रेयनामावली अक्षरे झळकतात आणि सिनेमा सुरु होतो. सिनेमा अरबस्तानात घडत असल्याचे कळण्यासाठी अरबी स्टाईलने आआआ आणि ओओओ होते. कट टू एक रँडम राजवाडा. मागून अजानची हाक ऐकू येत असल्याने वेळ पहाटेची असल्याचे कळते. कोणा शाह-ए-आलम नामक शहेनशाहला (याचं काम अमिताभने केलेले नाही, चिंता नसावी) येऊन दासी सांगते की तुला मुलगा झाला. खुश होऊन गळ्यातला हार तो तिला बक्षीस म्हणून देतो. यामुळे तो फार मोठा बादशहा आहे यावर शिक्कामोर्तब होते. फकीर-दरवेशी-नजूमी (भविष्यवेत्ते) यांना काही कामधंदा नसल्याने ते राजवाड्यातच पडीक असतात. ते या मुलाचे नाव हातिम ठेवा असे सांगतात आणि त्याचे रक्षण व्हावे म्हणून एक ताईतही देतात. असा हा हातिम ताईत क्षणार्धात मोठा होऊन जितेंद्र बनतो. जितेंद्राचे या सिनेमातले सर्व कपडे पुढील प्रकारात बसतात - अंगावर भडक रंगाचा शर्ट हवा, खाली काळ्या किंवा करड्या रंगाची पँट हवी आणि त्यावर घालायला भरजरी जाकिट. एक पांढरा शर्ट आहे त्यावरही घालायला गॉडी निळ्या रंगाचे जाकिट आहे. अनेकदा त्याच्यापेक्षा सतीश शाहचे कपडे दिसायला बरे दिसतात.

१.२) तो रोज दानधर्म करायचा

तर हातिम लाल शर्ट काळी पँट आणि डोईला पिवळसर नारिंगी रंगाचा रुमाल बांधून बसलेला असतो. त्याच्या दानधर्माची वेळ झालेली असते. सतीश शाह त्याचा मित्र नझरुल दाखवला आहे. नझरुलला हातिमची प्रशंसा करायच्या कामावर ठेवले असल्यामुळे तो लगेच हातिमची तोंडभरून स्तुती करतो. इथे आपल्याला कळते की हातिम यमन देशाचा शहजादा आहे. हातिम सद्गुणांचा पुतळा असल्यामुळे तोही जरा लाजतो वगैरे. लगेच दानधर्माचा कार्यक्रम सुरू होतो. यात हातिमच्या दरवाज्यावर सहा बायका हातात सोन्याच्या मोहोरांनी भरलेली थाळी घेऊन उभ्या असतात. घोळक्याने माणसे येतात, हातिम त्यांना मूठभर मोहोरा देतो आणि ते आपल्या वाटेने निघून जातात. या बायका आणि गरजूंचा जमाव अतिशय कंटाळलेले आहेत. एक बाई काही कारणाने जितूकडे "जवळून तितका हँडसम वाटत नाही" नजरेने बघते आहे.
अचानक एक तोंडावर फडकं बांधलेली तरुणी येते. फडकं बाजूला करताच ओळख पटते. अरे ही तर सौदागर बरजद की बेटी शहजादी मरियम! तिला त्याची मदत हवी असते. तो तिला वाड्यात बोलावतो आणि नझरुलला उरलेल्या मोहोरा वाटायला सांगतो. आता सतीश शाह अर्धी मूठ मोहोरा पर पर्सन वाटतो तरी ते लोक खुश होतात. पण हातिम त्याच्या दुप्पट (एक मूठ गच्च भरून) मोहोरा देत होता तेव्हा एकाच्या चेहर्‍यावर हसु फुटेल तर शप्पथ! अशा चमत्कारांनी हा सिनेमा भरलेला आहे.

१.३) तो प्रेमप्रकरणेही निस्तरायचा

तर मरियमची तक्रार अशी - तिचं आणि शहजादा मुनीर (विजयेंद्र घाटगे, फ्रेश फ्रॉम प्लेईंग ठाकूर प्रताप सिंग इन बंद दरवाजा) यांचे एकमेकांवर प्रेम असतं. त्यांना लग्नही करायचं असतं. पण मरियमच्या वडलांचा तिच्या लग्नालाच विरोध असतो. हा नकार ऐकून मुनीर वणवण भटकत असतो तर मरियम बाई हातिमच्या दारात मदतीची भीक मागत असतात. आता - एकतर ही बाई शहजादी कशी? मुलगी सौदागरची, शहजाद्याशी लग्नाचा पत्ता नाही तरी ही शहजादी मरियम. दुसरे हिच्या म्हणण्यानुसार घाटगे यांच्या भेटण्याच्या ठिकाणी एकटाच भटकत असतो. ते एका बागेत भेटताना दाखवले आहेत. मग पुढच्याच दृश्यात हा वाळवंटात खुरट्या दाढीने काय करत असतो? असो तर वाळवंटात जितेंद्र त्याला भेटायला तडक मरियमला घेऊन जातो. त्यांची लव्ह स्टोरी मार्गाला लावायचे तो त्यांना वचन देतो. इथे आपल्याला मरियमचे कपडे जवळपास लेटेक्स असल्याचे लक्षात येते.

१.४) आता त्याला प्रश्न पडले तर कोण काय करणार?

कपडे बदलून, घाटगेला दाढी करायला लावून जितू आणि सतीश सौदागरला जाऊन भेटतात. सौदागर असतो रझा मुराद. रझा मुरादही फार आढेवेढे न घेता त्याची अडचण जितूला सांगतो. त्याच्या घरात एक प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेला परीचा पूर्णाकृती पुतळा असतो. हा पुतळा अजिबात संगीता बिजलानी सारखा दिसत नसल्याने या पुतळ्याची संगीता बनणार हे निष्णात प्रेक्षक सांगू शकतो. जितू उगाच त्या पुतळ्याला उत्कृष्ट कारागिरीचा नमुना वगैरे म्हणतो. रझा मुराद त्यावर "होल्ड माय बीअर" म्हणून हा पुतळा नसून गुलनार नामे परी असल्याचे सांगतो. तर झालं असं की एके रात्री रझा मुराद उकाड्याचं म्हणून वरच्या मजल्यावर एकटाच झोपलेला असतो. नेमकं त्याच रात्री गुलनार (संगीता बिजलानी) च्या नशीबात दुर्बुद्धी योग लिहिलेला असतो. त्यामुळे ती उडत उडत येते (मसक्कली स्टेपमध्ये हात हलवते) आणि त्याच घरात उतरते. हवेवर झुलणार्‍या झुंबराला प्रदक्षिणा घालण्याचा टाईमपास करण्याची हुक्की तिला येते आणि आवाजाने रझा मुरादची झोपमोड होते. झोपेतून उठल्या उठल्या इतर काही न सुचल्याने तो गुलनारवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो.

आधी हा सीन विशिष्ट अंगाने जाणार अशी शंका येऊ शकते पण चमत्कार होतो. अचानक संगीताच्या तोंडावर लाल पिवळा लाईट मारला जातो. अ‍ॅपरंटली रझा मुरादने तिला वाईट हेतुने स्पर्श केल्यामुळे तिचा दगड होतो. दगड व्यक्ती दगड बनण्याचे हे इतिहासातील एकमेव उदाहरण! याची शिक्षा म्हणून ती रझा मुरादला शाप देते की तुझ्या मुलीचे, मरियमचे लग्न झाले तर लग्नाच्या रात्री तिच्या नवर्‍याचा मृत्यु होईल आणि मरियमसुद्धा दगड बनेल. इथे क्लोजअपमध्ये चंदेरी कागदाचे पंख, जनरिक परी कॉस्ट्युम (अलिफ लैला श्ट्यांडर्ड) वगैरे बघायला मिळते. ही दगड बनण्याची प्रोसेस अर्थातच तिला व्यवस्थित पोज घेता यावी, उ:शाप देता यावा इतपत स्लो असते.

असला नॉनसेन्स शाप मुरादसाहेब ऐकून घेतील हे शक्यच नाही. ते रडून, भांडून तिच्याकडून उ:शाप मिळवतात. तो उ:शाप असतो की माझ्या सात सवालांचे जवाब आणा. रझा मुराद शापमुक्त होईल आणि ही पुन्हा जिवंत होईल. जितेंद्रच्या वाचनानुसार हे सात प्रश्न आहेत (रझा मुरादने एका फळ्यावर अरबीत लिहून ठेवले आहेत. पण जितेंद्र ते उर्दूत वाचतो.)

प्रश्न १) एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस है
प्रश्न २) नेकी कर दरिया मे डाल
प्रश्न ३) सच को राहत है
प्रश्न ४) जैसा करेगा वैसा भरेगा
प्रश्न ५) कोहिनहिदा की तलाश
प्रश्न ६) मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती
प्रश्न ७) हम्मामबादगर की खबर (ते मूळ कथेत हमाम-ए-बादगढ, म्हणजे बादगढचे न्हाणीघर आहे. पण जितूचे उर्दू माशाल्लाह! नशीब जितूजींनी ते हम्मामबादनगर नाही वाचलं)

रझा मुरादच्या म्हणण्यानुसार हे प्रश्न इतके अवघड आहेत की तो कोणीही सोडवू शकत नाही. जितेंद्र म्हणतो की खुदाची इच्छा असेल तर मला हे प्रश्न सुटतील. तरी मी प्रश्न सोडवतो आहे तोवर तुम्ही विजयेंद्र घाटगेला आपल्या घरी ठेवून घ्या नाहीतर पुन्हा उन्हातान्हाचा वाळवंटात भटकायला जायचा. रझा मुराद हे मान्य करतो. इथे सतीश शाह एक फालतू विनोद करून आपल्याला या सिनेमात का घेतले आहे हे प्रेक्षकांना कळवतो. अशा रीतिने सुरू होतात हातिम आणि नझरुलची साहसे.

२) प्रश्न पहिला : एक बार देखा है, दुसरी बार देखने की हवस हैं

आता इतक्या अवघड प्रश्नांची उत्तरे कोठे बरे मिळतील? आपले पूर्वज जंगलातून आले तर बहुधा या बाबा आदमच्या जमान्यातल्या प्रश्नांची उत्तरेही जंगलात मिळतील असा सारासार विचार करून हातिम आणि नझरुल एका जनरिक जंगलात पोहोचतात. अरबी द्वीपकल्पात कुठेही इतके घनदाट जंगल नसल्याने आपण परीकथेत असल्याची खात्री पटते. परीकथेचा हिरो हा शूर आणि स्वभावाने चांगला असावा लागतो. हातिम हा चांगला असल्याचे तर ठसले पण हा शूरवीर असल्याचे सिद्ध करण्याची संधी अद्याप त्यास मिळालेली नाही. त्यामुळे नझरुलच्या "आका शेर आ जाएगा" चा क्यू घेऊन एक बिबळ्या तिथे येतो. त्याआधी नझरुल हातिमला शंका विचारतो की अशाने तर आपण उत्तरे मिळण्याच्या आधीच मरु. यावर हातिम म्हणतो की मारनेवाले से बचानेवाला हमेशा बडा होता हैं. बरं मग? संपूर्ण सिनेमात जितेंद्राचे असे बरं मग छाप बरेच डायलॉग आहेत.

२.१) विंटर सोल्जर या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटाच्या फाईट्समध्ये सरासरी सेकंदाला दोन कट्स आहेत. सारांश : लपण्याची गरज फक्त जितेंद्रालाच नसते.

तर बिबळ्या तिथे येतो. जंगली जनावराने माणसे दिसताच त्यांच्यावर हल्ला केलाच पाहिजे या नियमाची त्याला जाण असते. त्यामुळे तो जितेंद्रावर झडप घालतो. इथून पुढे १ मिनिटाची फाईट आहे. या फाईटमध्ये काय होते, जितेंद्राला जखमा होतात का, बिबळ्या खरा आहे का खोटा, जितेंद्राचे नक्की किती बॉडी डबल वापरले गेले आहेत इ. प्रश्नांची उत्तरे देता येणे केवळ अशक्य आहे. १ मिनिटाच्या फाईटमध्ये ५७ कट्स आहेत. म्हणजे जवळ जवळ सेकंदाला एक कट! जितेंद्राला फाईटिंग येत नाही हे लपवण्यासाठी इतकी मेहनत इतर कोणत्याच चित्रपटात घेतली नसावी.

असो तर हातिम बिबळ्याला भोसकून ठार करतो. एवढ्या केऑटिक फाईटमधून इतर काहीही निष्कर्ष काढणे फार कठीण आहे पण ०.२५ स्पीडमध्ये बघितल्यावर लक्षात येऊ शकते की क्लोजअपमधला बिबळ्या आणि बॉडी डबल शॉट्समधला बिबळ्या हे दोन वेगवेगळे बिबळे आहेत (त्यांच्या ठिपक्यांच्या डिझाईनमध्ये सूक्ष्म फरक आहेत). सतीश शाहला शूरवीर दाखवायचे नसल्यामुळे तो झाडावर चढून आपला जीव वाचवतो. हातिम शूरवीर सिद्ध झाल्यामुळे सिनेमा पुढे सरकतो. परीकथेतले हिरो विशेष हुशार दाखवून चालत नाही. अन्यथा देव/खुदा/पर्‍या/जादू वगैरेंची त्यांना का गरज पडेल? त्यामुळे हातिम हुशार असल्याचे सिद्ध करण्याचे कष्ट दिग्दर्शक घेत नाही.

आता अशा ठोंब्यांना या प्रश्नांची उत्तरे कोठून मिळणार? मग सर्वशक्तिमान खुदाला त्यांची दया येते आणि त्याच जंगलात कुठेतरी एका झाडाला पाचजण उलटे टांगून ठेवलेले दिसतात. हे सर्व वारंवार "एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस हैं" म्हणत असतात. हातिमला या "आदमजादांची" दया येते. उर्दू झाडण्याकरिता संपूर्ण सिनेमात हातिम व इतर अनेक पात्रे मनुष्य प्रजातीचा आदमजाद असा उल्लेख करतात. सतीश शाहला अक्कल असल्यामुळे तो या आदमजादांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. असे लॉजिकल सल्ले देत असल्यामुळेच तो या परीकथेचा हिरो होऊ शकलेला नाही. दुर्दैवाने हे नझरुलला कधीच समजू शकणार नाही. हातिम त्यांना आश्वस्त करून बंधमुक्त करू पाहतो. ते त्याला तसे करण्यास मनाई करतात. हातिम याचे कारण विचारणार एवढ्यात मागून कन्यकांचा हसण्याचा आवाज येतो. या लोकांच्या अगदी समोरच्या झाडावर सहा तरुणींची मुंडकी केसाने बांधून लटकवलेली आहेत. ही मुंडकी हातिमला बघून हसत असतात. हा प्रकार बघून हातिमला आपण एका तिलिस्ममध्ये अडकलो असल्याचे कळून चुकते.

२.२) तळ्यातले तिलिस्म

सतीश शाहलाही फार हुशार दाखवून चालणार नसल्याने तो "लडकियों के लटकते सर" बघून वेडापिसा होतो. इथे विनोदनिर्मितीचे बाष्कळ प्रयत्न होतात. त्या मुली यांना सांगतात कि आम्ही पाण्यात राहतो. हे बोलून नारळ पाण्यात पडावेत तशी ती मुंडकी अचानक अवतरलेल्या तळ्यात पडतात. हातिमची खात्री पटते की हे तिलिस्म तोडण्याचा मार्ग या तळ्यात आहे. त्यामुळे तो तळ्यात उडी घेतो. सतीश शाहला आपल्याला पाण्यात श्वास घेता येईल का याची खात्री नसल्याने तो बाहेरच थांबतो. इथे शॉटमधून असे दिसते की ते तळे फारसे खोल नाही आणि तळाशी एक गुहासदृश जागा आहे. तिथे या सहा मुली खिदळत जितेंद्राची वाटच बघत असतात. या एक्स्ट्रांपैकी एकही फारशी रुपवती नसल्यामुळे तिलिस्मची मालकीण यापैकी कोणी नसणार हे कोणीही सांगू शकतं. मग तिलिस्मची मालकीण कोण?

याचे उत्तर म्हणून मनजीत कुल्लर (शक्तिमानमधली कौशल्या उर्फ शक्तिमानची आई, अगेन फ्रेश फ्रॉम प्लेईंग सपना इन बंद दरवाजा) झुळझुळीत कपड्यांत अवतरते. ती स्वतःची ओळख "यहां की मलिका, मर्जिना" अशी करून देते. तिला जी वस्तु आवडत असते, त्या वस्तुला ती मिळवतेच. हिरोचे ऑब्जेक्टिफिकेशन होण्याचा रेअर डायलॉग झाल्यानंतर जितेंद्र तिला उपदेशाचा डोस पाजू बघतो. तिला असल्या गोष्टी प्राशन करण्यात इंटरेस्ट नसल्यामुळे ती त्याला घेऊन एका गुहेत शिरते. इथे सतीश शाहला एवढा वेळ झाला तरी जितेंद्र अजून परत न आल्यामुळे जरा चिंता वाटू लागते. मग तोही तळ्यात उडी घेतो. याच्या शॉटमध्ये मनजीतच्या घराला नीट बघता येते. तो एक शंख -शिंपले-कवड्या वगैरेंनी बनलेला महाल आहे. तिथे त्याला जितेंद्र तर नाही पण त्या सहा बायका भेटतात. त्या म्हणतात तुझा आका आता जिंदगी के मजे लुटत असेल तर तूही घे चान्स मारून. नझरुल मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो की हातिम परस्त्रीला स्पर्शही करणार नाही. आता - यांच्या मलिकाविषयी नझरुलला शून्य माहिती आहे. हातिमचे अजून लग्न झालेले नाही. म्हणजे जर ही मर्जिना त्याला आवडली तर त्यांचे लग्न होण्यात काहीच अडचण नाही. ही परीकथा असल्यामुळे गांधर्वविवाह स्कोपमध्ये आहे. एकंदरीत जंप कट + सतीश शाहचे हावभाव बघता मध्ये बराच वेळ निघून गेला आहे. सो हातिमने लग्न करून जिंदगी के मजे घ्यायला सुरुवात केली असेल ही शक्यता अजूनही स्कोपमध्ये आहे. असे असतानाही मर्जिना हातिमची चॉईस असूच शकत नाही हा आत्मविश्वास नझरुलने कुठून पैदा केला असावा?

पण मर्जिनाला वाईट, चवचाल दाखवायचे असल्यामुळे नझरुलचे म्हणणे खरे ठरते. हातिमच्या उपदेशाचा डोस पिण्याऐवजी मर्जिना दारु ढोसते. क्लिअरली पन्नाशीच्या दिसणार्‍या जितेंद्राला विशीतली मनजीत "हुस्न-ए-ईजाद करनेवाले ने तुझे कुछ सोच के बनाया हैं" म्हणते ते आणि एकंदरीतच तिचं फ्लर्टिंग विनोदी आणि अतर्क्य आहे. हातिमला या बाईची भुरळ पडत नाही यात काहीही आश्चर्यकारक नाही. चमत्कार असला तर हाच की हिला परत परत पाहण्याची इच्छा धरून एक नाही दोन नाही चांगले पाचजण बसले आहेत. तिच्या फ्लर्टिंगचा उबग येऊन तो तिला ढकलून देतो. या सर्वांचा शीण आल्यामुळे वाईच जरा टेकावं म्हणून तो मर्जिनाच्या सिंहासनावर जाऊन बसतो. मर्जिनाला त्याच्यावर जादू करण्यासाठी तसेही त्याला सिंहासनावर बसवायचे असतेच, त्यामुळे तिचा हेतु साध्य होतो. हातिम तिच्या जादूने बांधला जातो आणि रोमान्स करायला सिद्ध होतो. अशावेळी गाणे सुरु झाले नाही तरच नवल!

२.३) जिंदगी के मजे

अनुराधाताई पौडवाल गात आहेत "सनमा ओये सनमा, ओये ओये ओये". निव्वळ गाणे म्हणून हे गाणे ओये ओये ओये ओये ओये आहे. पण त्यावर अचाटपणाचे काही खास थर चढवल्यामुळे या गाण्यात वाह्यातपणाचे गुण आले आहेत. तर ...
या गाण्यात जर हातिम जिंदगी के मजे लुटतो आहे असे समजणे अपेक्षित असेल तर हातिमबद्दल प्रेक्षकाच्या मनात कणव निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. बारकाईने निरीक्षण करण्याची पहिली गोष्ट अशी - इतका वेळ मनजीतने सलवार विशिष्ट लेव्हलच्या खाली नेसली आहे. नेव्हल शॉट्स काढून झाल्यामुळे गाणे सुरु होताच ही सलवार वर सरकते. पण जितेंद्र तिच्यासोबत नाचू लागताच ती पुन्हा खाली घसरते. एखाद्या साईन वेव्हप्रमाणे तिची सलवार/परकर इ. (कडव्यासोबत हिचे कपडे बदलतात) पूर्ण गाण्यात वर खाली होत राहते. मिनिटभर थांबून सलवारची नाडी बदलून मग नाचगाणे केले असते तरी चालले असते. उगाच प्रेक्षकाच्या मनात धाकधूक!

मागे नाचायला म्हणून चौकटी-चौकटीच्या डिझाईनचे कपडे घातलेल्या ११ एक्स्ट्रा आणल्या आहेत. विशेष म्हणजे आधी दाखवलेल्या सहा बायकांमधली इथे एकही रिसायकल केलेली नाही. थोडक्यात खर्चा कियेला हैं. नाहीतर नाचे नागीन गली गली - बघावे तिथे एक्स्ट्रा रिसायकल. या अकराच्या अकराजणी मनजीतपेक्षा चांगल्या नाचतात. अगदी जितेंद्रही तिच्यापेक्षा चांगला नाचला असता. पण त्याला तिच्या जादूत मुग्ध झाल्याचे भाव घेऊन येरझार्‍या घालण्याचे काम दिले आहे. बापडा ते मन लावून करतोही पण ....
सेक्शन ०.२ मध्ये म्हटल्याप्रमाणे अनटॅप्ड पोटेन्शिअल असेच जाणवत राहते. इंटरेस्टिंगली याची कोरिओग्राफी पी. एल. राजने केली असली तरी या गाण्याचे अ‍ॅस्थेटिक १९९४ च्या मोहरामधल्या तू चीज बडी हैं मस्त मस्त सारखे आहेत. कदाचित इथे सरोज खान असती तर तिने जितेंद्रला नीट वापरला असता आणि मनजीतलाही जरा बर्‍या स्टेप्स दिल्या असत्या. बाकी सेट डिझाईनवर बरीच मेहनत घेतली आहे यात वाद नाही. त्यामुळे मनजीतचे ड्रेसेस अजूनच विजोड दिसतात. मध्ये तर तिला चक्क पिसांचा पोशाख (ऑफ कोर्स बिकिनी स्टाईल) दिला आहे. अंडरवॉटर राहणारी बाई असे कपडे का घालेल?

२.४) मैं आया हैं तो उपदेशामृत पाजकेही जाएगा - हातिम

सुदैवाने हा प्रकार फार काळ लांबवलेला नाही. एकदाचा हातिम तिच्या हुस्नच्या जाळ्यात अडकतो. आता तो जिंदगी के मजे लुटायला सुरुवात करणार इतक्यात त्याच्या गळ्यातला ताईत चमकू लागतो. पिशाचांना सूर्यप्रकाशाचा त्रास होतो तसा मर्जिनाला त्या ताईतातून येणार्‍या प्रकाशाचा त्रास होऊ लागतो. लहानपणी बांधलेला रक्षक ताईत कामी यायलाच हवा या नियमाचे पालन होते आणि हातिम भानावर येतो. अतिशय खराब स्पेशल शॉटमध्ये हातिम आणि नझरुल तळ्याच्या बाहेर फेकले जातात. तळ्याच्या बाहेर दिसलेली दोन्ही झाडे गायब झाली आहेत. पाठोपाठ मर्जिनाही धावत धावत तळ्याच्या बाहेर येते. तिला आता आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. प्रत्यक्षात तिला हातिमचा राग यायला हवा. पण आले दिग्दर्शकाच्या मना तिथे कोणाचे चाले? हातिमही तिला उदार मनाने माफ करतो. आता ते उलटे टांगलेले पाचजण आणि त्यांचे झाड परत प्रकट झाले आहे. हातिमच्या विनंतीला मान देऊन ती या आदमजादांना मुक्त करते. हातिम त्यांना उपदेश करतो की कामाग्नि कधीच शमत नाही. त्यामुळेच तुम्ही म्हणत होतात की "एक बार देखा हैं, दुसरी बार देखने की हवस हैं". नझरुलच्या लक्षात येते की अनवधानानेच का होईना, हातिमने पहिला प्रश्न सोडवला आहे.

इकडे यमनमध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर असल्याची लक्षणे दिसतात. पुतळ्याचा चेहरा बदलून तो संगीता बिजलानीसारखा दिसू लागतो. फळ्यावरचा पहिला प्रश्न पुसला जातो. हे बघून मरियम आणि गुलनार खुश होतात. इथे दोन चुका आहेत. आधी दाखवलेला पुतळा आणि या शॉटमधला पुतळा क्लिअरली वेगळा आहे. दुसरं म्हणजे मरियम तिला परी बानो संबोधते. ही कंटिन्यूटी मिस्टेक आहे जी या स्टेजला लक्षात येणे कठीण आहे कारण बानो हे ताई सारखे जनरिक फारसी अव्यय आहे. पण संगीता बिजलानीचा डबल रोल असून तिच्या दुसर्‍या भूमिकेचे नाव परी बानो आहे. त्यामुळे इथे मरियमने संगीताला गुलनारच संबोधले पाहिजे. क्लिअरली कंटिन्यूटी एरर. पण पहिला प्रश्न सुटल्याच्या आनंदात प्रेक्षक या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करतो.

अशा रीतिने हातिमने एक प्रश्न सोडवला. उर्वरित सहा प्रश्नांची उत्तरे काय असतात? हातिम आणि नझरुलला आणखी कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? हातिमला हिरोईन कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन उर्वरित सहा रोमांचक सेक्शन लवकरच प्रतिसादांत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy मस्त. कालीन ला लटकून पाठलाग ही केवळ अशक्य प्राय गोष्ट आहे. कालीन काय कडक लोखंडाची बनलेली असते काय?
काहीही !

चले आओ हातिम, चले आओ , फ्रिक्शनला इग्नोर करणारा पाषणा, शॉट प्रेक्षक अ‍ॅक्सेप्ट करतील हा कॉन्फिडन्स - हे मस्त!
आणि एकूणात हातिम पेक्षा तर परी बानूच शौर्य गाजवताना दिसते. आणि यांना हमाम बादगर ची नुसती खबर आणावयाची होती ना....कमलाख इतका जीवावर उठायला त्याचे हातिम ने काय घोडे मारले होते?

महान आढावा ! Rofl
खरं तर असे सिनेमे स्पेशल स्क्रिनिंग करुन ग्रुप ने बघितले पाहिजेत. धमाल येईल !

वाह् पायस वाह्..
प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शानं अहिल्येचा उद्धार व्हावा तसं तुमच्या हस्तस्पर्शानं ह्यातीनतायांचा उद्धार झालेला आहे.

Pages