हातिम ताई

Submitted by पायस on 14 March, 2019 - 04:12

हातिम ताई हा एक चमत्कारिक चित्रपट आहे. त्यात चमत्कृतिपूर्ण गोष्टी घडतात म्हणून नव्हे तर त्याच्या शैलीस प्रतिकूल अशा वर्षी प्रदर्शित होऊनसुद्धा त्याने बर्‍यापैकी गल्ला जमवला म्हणून (वेगवेगळे सोर्सेस वेगवेगळे आकडे सांगत असले तरी १९९० साली याने किमान १ कोटींचा गल्ला जमवला यावर त्यांचे एकमत दिसते). असा हा विशेष सिनेमा अभ्यासायचा म्हणजे काही पूर्वाभ्यास गरजेचा आहे. तरी यावेळेस सेक्शन्सना सेक्शन ० पूर्वाभ्यास पासून सुरुवात होईल.

०) पूर्वाभ्यास

०.०) हातिम ताई : ओरिजिनल स्लमडॉग मिलिएनेअर

आधी तर हातिम ताई या थोर पुरुषाविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. मूळात हातिम ताई हा एक अरबी कवी होता, जो इस्लाम धर्म स्थापन होण्याच्याही आधी (सहावे शतक) होऊन गेला. त्याच्याविषयी अनेक किवदंती आहेत. यावर आधारित साहित्य निर्मिती अरबीत/फारसीत झाली. त्यामुळे त्याचे अल्ला का नेक बंदा, खुदा का फरिश्ता वगैरे वर्णन हे कथाकारांनी घेतलेली लिबर्टी असावी. त्याच्या दयाळु स्वभावाचे वर्णन करायचे तर काळाला साजेशी विशेषणे तर वापरावी लागणारच. हीच हुशारी या चित्रपटाच्या पटकथाकारानेही दाखवली आहे.
मूळ कथेमध्ये एक राजा हातिमचा मित्र असतो. या राजाचे हुस्न बानू नावाच्या सौंदर्यवतीवर प्रेम असते. बानूबाईला मात्र खंडोबाच हवा असल्याने तिने लग्नाचा पण म्हणून सात भलतेच अवघड प्रश्न काढलेले असतात. जसे स्लमडॉग मिलिएनेअर मधले प्रश्न कधीच केबीसीत विचारले जाणार नाहीत, तसेच हिचे व्हेग प्रश्न कोणत्याही स्वयंवरात विचारले जाणार नाहीत. आता राजा भित्रा असल्यामुळे त्याला या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपला जीव गमवायचा नसतो पण बानूही हवी असते. मग हातिम उदारपणे राजाच्या वतीने हे प्रश्न सोडवायची तयारी दर्शवतो. मग मूळ अरेबियन कथांमध्ये दर रात्री जेव्हा शहरजादे गोष्ट सांगते तेव्हा हातिम प्रश्नाचे उत्तर घेऊन बानूकडे परत आलेला असतो. तो आधी त्याची कर्मकहाणी, जमालच्या फ्लॅशबॅकप्रमाणे सांगतो. फ्लॅशबॅक संपल्यानंतर तो उत्तर देणार. ते उत्तर बरोबर आहे असे बानू सांगणार. अ‍ॅक्चुअली तिला यातले एकही उत्तर माहिती असता कामा नये. उदा. एका प्रश्नात तिने त्याला एका जागेची माहिती काढायला सांगितलेली असते आणि तिथून आजवर कोणीही मनुष्य जिवंत परत आलेला नसतो. मग हिला त्याचे उत्तर कसे माहित? कशावरून हातिमने खरे उत्तर सांगितले? तर मूळ कथानकात अशा बर्‍याच अडचणीच्या जागा आहेत. पूर्वाभ्यासासाठी इतके कळणे पुरेसे आहे की हातिम सर्व उत्तरे शोधतो आणि त्याच्या सांगण्यावरून बानू राजाशी लग्न करते.

०.१) कथेचे रुपांतर करताना काळजी घेणे आवश्यक
तर इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम - हातिमला हिरोईन नाही. ९० चे दशक उजाडले असले तरी या नियमाचे मार्गदर्शक तत्वात रुपांतर झालेले नसल्याने हातिमला हिरोईन असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे अतिशय हुशारीने कथेत आवश्यक ते बदल करून हातिमला हिरोईन मिळण्याची सोय केली आहे. तीसुद्धा अगदी विकोची हळद पिऊन गोरी झालेली!
दुसरा मुद्दा - या प्रश्नांची आन्सर की कुठून आणायची? इथे कादर खानने रुढ केलेला ८० च्या दशकातला नियम वापरावा लागतो. जादूच्या सिनेमात ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत नाही त्याचे उत्तर जादू! त्यामुळे मूळ कथेत नसलेला परीचा एलिमेंट इथे अ‍ॅड केला आहे. या दोन मूलभूत बदलांमुळे सिनेमाला मुख्य व्हिलन मिळण्याचीही सोय होते. तसेच रिडीम्ड व्हिलन, व्हिलनचे आद्य कर्तव्य सीन अशा कित्येक मौलिक संधी पटकथाकाराला उपलब्ध होतात. होतकरू लेखकांनी या अँगलने या सिनेमाचा कसून अभ्यास केला पाहिजे.

०.२) कादर खान नसेल तर जितेंद्रही काही करू शकत नाही
इथे एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. हा सिनेमा पद्मालय स्टुडिओज् चा नाही. हा सिनेमा बाबूभाई मेस्त्रींचा आहे. स्पेशल इफेक्ट्स डिपार्टमेंटमधून पुढे आलेल्या आणि साठच्या दशकातले बरेच पौराणिक सिनेमे दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शकाचा अनुभव दांडगा आहेच आणि त्याचा काही प्रमाणात सिनेमाला फायदाही होतो पण; पण हा सिनेमा ऑलमोस्ट सीन टू सीन मेस्त्रींच्याच १९७१ सालच्या सात सवालची कॉपी आहे. वाढलेल्या बजेटनुसार नवल कुमारच्या जागी जितेंद्र आणि चकाचक सेट वापरले गेले असले तरी एक घोळ झाला आहे. ८० च्या दशकात पौराणिक सिनेमांचा सॉर्ट ऑफ रिसर्जन्स झाला होता. याला कारणीभूत होता कादर खान. कादर खान काळाची पाऊले ओळखून डेव्हिड धवन लाटेचे प्रिकर्सर सिनेमे लिहित होता. या आऊटडेटेड टॉपिकला त्याने हात घातला नाही. पण या सिनेमाने १९७१ ला साजेशी पटकथा घेऊन त्याला कादर खान शैलीत बनवण्याचा प्रयत्न केला. ते तितकं काही जमलेलं नाही. हातिम ताई आणि पाताल भैरवी यांचा तौलनिक अभ्यास केल्यास कादर खानचा ग्रेटनेस समजून येतो. या धाग्याचा तो विषय नसल्याने केवळ उहापोह करून थांबतो आहे. परंतु त्यामुळे हा सिनेमा पाहून सतत "अजून भारी करता आला असता" हे वाटत राहते.

१) आटपाट नगर होते

१.१) तिथे एक अल्लाचा नेक बंदा राहत होता

लाल पडद्यावर श्रेयनामावली अक्षरे झळकतात आणि सिनेमा सुरु होतो. सिनेमा अरबस्तानात घडत असल्याचे कळण्यासाठी अरबी स्टाईलने आआआ आणि ओओओ होते. कट टू एक रँडम राजवाडा. मागून अजानची हाक ऐकू येत असल्याने वेळ पहाटेची असल्याचे कळते. कोणा शाह-ए-आलम नामक शहेनशाहला (याचं काम अमिताभने केलेले नाही, चिंता नसावी) येऊन दासी सांगते की तुला मुलगा झाला. खुश होऊन गळ्यातला हार तो तिला बक्षीस म्हणून देतो. यामुळे तो फार मोठा बादशहा आहे यावर शिक्कामोर्तब होते. फकीर-दरवेशी-नजूमी (भविष्यवेत्ते) यांना काही कामधंदा नसल्याने ते राजवाड्यातच पडीक असतात. ते या मुलाचे नाव हातिम ठेवा असे सांगतात आणि त्याचे रक्षण व्हावे म्हणून एक ताईतही देतात. असा हा हातिम ताईत क्षणार्धात मोठा होऊन जितेंद्र बनतो. जितेंद्राचे या सिनेमातले सर्व कपडे पुढील प्रकारात बसतात - अंगावर भडक रंगाचा शर्ट हवा, खाली काळ्या किंवा करड्या रंगाची पँट हवी आणि त्यावर घालायला भरजरी जाकिट. एक पांढरा शर्ट आहे त्यावरही घालायला गॉडी निळ्या रंगाचे जाकिट आहे. अनेकदा त्याच्यापेक्षा सतीश शाहचे कपडे दिसायला बरे दिसतात.

१.२) तो रोज दानधर्म करायचा

तर हातिम लाल शर्ट काळी पँट आणि डोईला पिवळसर नारिंगी रंगाचा रुमाल बांधून बसलेला असतो. त्याच्या दानधर्माची वेळ झालेली असते. सतीश शाह त्याचा मित्र नझरुल दाखवला आहे. नझरुलला हातिमची प्रशंसा करायच्या कामावर ठेवले असल्यामुळे तो लगेच हातिमची तोंडभरून स्तुती करतो. इथे आपल्याला कळते की हातिम यमन देशाचा शहजादा आहे. हातिम सद्गुणांचा पुतळा असल्यामुळे तोही जरा लाजतो वगैरे. लगेच दानधर्माचा कार्यक्रम सुरू होतो. यात हातिमच्या दरवाज्यावर सहा बायका हातात सोन्याच्या मोहोरांनी भरलेली थाळी घेऊन उभ्या असतात. घोळक्याने माणसे येतात, हातिम त्यांना मूठभर मोहोरा देतो आणि ते आपल्या वाटेने निघून जातात. या बायका आणि गरजूंचा जमाव अतिशय कंटाळलेले आहेत. एक बाई काही कारणाने जितूकडे "जवळून तितका हँडसम वाटत नाही" नजरेने बघते आहे.
अचानक एक तोंडावर फडकं बांधलेली तरुणी येते. फडकं बाजूला करताच ओळख पटते. अरे ही तर सौदागर बरजद की बेटी शहजादी मरियम! तिला त्याची मदत हवी असते. तो तिला वाड्यात बोलावतो आणि नझरुलला उरलेल्या मोहोरा वाटायला सांगतो. आता सतीश शाह अर्धी मूठ मोहोरा पर पर्सन वाटतो तरी ते लोक खुश होतात. पण हातिम त्याच्या दुप्पट (एक मूठ गच्च भरून) मोहोरा देत होता तेव्हा एकाच्या चेहर्‍यावर हसु फुटेल तर शप्पथ! अशा चमत्कारांनी हा सिनेमा भरलेला आहे.

१.३) तो प्रेमप्रकरणेही निस्तरायचा

तर मरियमची तक्रार अशी - तिचं आणि शहजादा मुनीर (विजयेंद्र घाटगे, फ्रेश फ्रॉम प्लेईंग ठाकूर प्रताप सिंग इन बंद दरवाजा) यांचे एकमेकांवर प्रेम असतं. त्यांना लग्नही करायचं असतं. पण मरियमच्या वडलांचा तिच्या लग्नालाच विरोध असतो. हा नकार ऐकून मुनीर वणवण भटकत असतो तर मरियम बाई हातिमच्या दारात मदतीची भीक मागत असतात. आता - एकतर ही बाई शहजादी कशी? मुलगी सौदागरची, शहजाद्याशी लग्नाचा पत्ता नाही तरी ही शहजादी मरियम. दुसरे हिच्या म्हणण्यानुसार घाटगे यांच्या भेटण्याच्या ठिकाणी एकटाच भटकत असतो. ते एका बागेत भेटताना दाखवले आहेत. मग पुढच्याच दृश्यात हा वाळवंटात खुरट्या दाढीने काय करत असतो? असो तर वाळवंटात जितेंद्र त्याला भेटायला तडक मरियमला घेऊन जातो. त्यांची लव्ह स्टोरी मार्गाला लावायचे तो त्यांना वचन देतो. इथे आपल्याला मरियमचे कपडे जवळपास लेटेक्स असल्याचे लक्षात येते.

१.४) आता त्याला प्रश्न पडले तर कोण काय करणार?

कपडे बदलून, घाटगेला दाढी करायला लावून जितू आणि सतीश सौदागरला जाऊन भेटतात. सौदागर असतो रझा मुराद. रझा मुरादही फार आढेवेढे न घेता त्याची अडचण जितूला सांगतो. त्याच्या घरात एक प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेला परीचा पूर्णाकृती पुतळा असतो. हा पुतळा अजिबात संगीता बिजलानी सारखा दिसत नसल्याने या पुतळ्याची संगीता बनणार हे निष्णात प्रेक्षक सांगू शकतो. जितू उगाच त्या पुतळ्याला उत्कृष्ट कारागिरीचा नमुना वगैरे म्हणतो. रझा मुराद त्यावर "होल्ड माय बीअर" म्हणून हा पुतळा नसून गुलनार नामे परी असल्याचे सांगतो. तर झालं असं की एके रात्री रझा मुराद उकाड्याचं म्हणून वरच्या मजल्यावर एकटाच झोपलेला असतो. नेमकं त्याच रात्री गुलनार (संगीता बिजलानी) च्या नशीबात दुर्बुद्धी योग लिहिलेला असतो. त्यामुळे ती उडत उडत येते (मसक्कली स्टेपमध्ये हात हलवते) आणि त्याच घरात उतरते. हवेवर झुलणार्‍या झुंबराला प्रदक्षिणा घालण्याचा टाईमपास करण्याची हुक्की तिला येते आणि आवाजाने रझा मुरादची झोपमोड होते. झोपेतून उठल्या उठल्या इतर काही न सुचल्याने तो गुलनारवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो.

आधी हा सीन विशिष्ट अंगाने जाणार अशी शंका येऊ शकते पण चमत्कार होतो. अचानक संगीताच्या तोंडावर लाल पिवळा लाईट मारला जातो. अ‍ॅपरंटली रझा मुरादने तिला वाईट हेतुने स्पर्श केल्यामुळे तिचा दगड होतो. दगड व्यक्ती दगड बनण्याचे हे इतिहासातील एकमेव उदाहरण! याची शिक्षा म्हणून ती रझा मुरादला शाप देते की तुझ्या मुलीचे, मरियमचे लग्न झाले तर लग्नाच्या रात्री तिच्या नवर्‍याचा मृत्यु होईल आणि मरियमसुद्धा दगड बनेल. इथे क्लोजअपमध्ये चंदेरी कागदाचे पंख, जनरिक परी कॉस्ट्युम (अलिफ लैला श्ट्यांडर्ड) वगैरे बघायला मिळते. ही दगड बनण्याची प्रोसेस अर्थातच तिला व्यवस्थित पोज घेता यावी, उ:शाप देता यावा इतपत स्लो असते.

असला नॉनसेन्स शाप मुरादसाहेब ऐकून घेतील हे शक्यच नाही. ते रडून, भांडून तिच्याकडून उ:शाप मिळवतात. तो उ:शाप असतो की माझ्या सात सवालांचे जवाब आणा. रझा मुराद शापमुक्त होईल आणि ही पुन्हा जिवंत होईल. जितेंद्रच्या वाचनानुसार हे सात प्रश्न आहेत (रझा मुरादने एका फळ्यावर अरबीत लिहून ठेवले आहेत. पण जितेंद्र ते उर्दूत वाचतो.)

प्रश्न १) एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस है
प्रश्न २) नेकी कर दरिया मे डाल
प्रश्न ३) सच को राहत है
प्रश्न ४) जैसा करेगा वैसा भरेगा
प्रश्न ५) कोहिनहिदा की तलाश
प्रश्न ६) मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती
प्रश्न ७) हम्मामबादगर की खबर (ते मूळ कथेत हमाम-ए-बादगढ, म्हणजे बादगढचे न्हाणीघर आहे. पण जितूचे उर्दू माशाल्लाह! नशीब जितूजींनी ते हम्मामबादनगर नाही वाचलं)

रझा मुरादच्या म्हणण्यानुसार हे प्रश्न इतके अवघड आहेत की तो कोणीही सोडवू शकत नाही. जितेंद्र म्हणतो की खुदाची इच्छा असेल तर मला हे प्रश्न सुटतील. तरी मी प्रश्न सोडवतो आहे तोवर तुम्ही विजयेंद्र घाटगेला आपल्या घरी ठेवून घ्या नाहीतर पुन्हा उन्हातान्हाचा वाळवंटात भटकायला जायचा. रझा मुराद हे मान्य करतो. इथे सतीश शाह एक फालतू विनोद करून आपल्याला या सिनेमात का घेतले आहे हे प्रेक्षकांना कळवतो. अशा रीतिने सुरू होतात हातिम आणि नझरुलची साहसे.

२) प्रश्न पहिला : एक बार देखा है, दुसरी बार देखने की हवस हैं

आता इतक्या अवघड प्रश्नांची उत्तरे कोठे बरे मिळतील? आपले पूर्वज जंगलातून आले तर बहुधा या बाबा आदमच्या जमान्यातल्या प्रश्नांची उत्तरेही जंगलात मिळतील असा सारासार विचार करून हातिम आणि नझरुल एका जनरिक जंगलात पोहोचतात. अरबी द्वीपकल्पात कुठेही इतके घनदाट जंगल नसल्याने आपण परीकथेत असल्याची खात्री पटते. परीकथेचा हिरो हा शूर आणि स्वभावाने चांगला असावा लागतो. हातिम हा चांगला असल्याचे तर ठसले पण हा शूरवीर असल्याचे सिद्ध करण्याची संधी अद्याप त्यास मिळालेली नाही. त्यामुळे नझरुलच्या "आका शेर आ जाएगा" चा क्यू घेऊन एक बिबळ्या तिथे येतो. त्याआधी नझरुल हातिमला शंका विचारतो की अशाने तर आपण उत्तरे मिळण्याच्या आधीच मरु. यावर हातिम म्हणतो की मारनेवाले से बचानेवाला हमेशा बडा होता हैं. बरं मग? संपूर्ण सिनेमात जितेंद्राचे असे बरं मग छाप बरेच डायलॉग आहेत.

२.१) विंटर सोल्जर या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटाच्या फाईट्समध्ये सरासरी सेकंदाला दोन कट्स आहेत. सारांश : लपण्याची गरज फक्त जितेंद्रालाच नसते.

तर बिबळ्या तिथे येतो. जंगली जनावराने माणसे दिसताच त्यांच्यावर हल्ला केलाच पाहिजे या नियमाची त्याला जाण असते. त्यामुळे तो जितेंद्रावर झडप घालतो. इथून पुढे १ मिनिटाची फाईट आहे. या फाईटमध्ये काय होते, जितेंद्राला जखमा होतात का, बिबळ्या खरा आहे का खोटा, जितेंद्राचे नक्की किती बॉडी डबल वापरले गेले आहेत इ. प्रश्नांची उत्तरे देता येणे केवळ अशक्य आहे. १ मिनिटाच्या फाईटमध्ये ५७ कट्स आहेत. म्हणजे जवळ जवळ सेकंदाला एक कट! जितेंद्राला फाईटिंग येत नाही हे लपवण्यासाठी इतकी मेहनत इतर कोणत्याच चित्रपटात घेतली नसावी.

असो तर हातिम बिबळ्याला भोसकून ठार करतो. एवढ्या केऑटिक फाईटमधून इतर काहीही निष्कर्ष काढणे फार कठीण आहे पण ०.२५ स्पीडमध्ये बघितल्यावर लक्षात येऊ शकते की क्लोजअपमधला बिबळ्या आणि बॉडी डबल शॉट्समधला बिबळ्या हे दोन वेगवेगळे बिबळे आहेत (त्यांच्या ठिपक्यांच्या डिझाईनमध्ये सूक्ष्म फरक आहेत). सतीश शाहला शूरवीर दाखवायचे नसल्यामुळे तो झाडावर चढून आपला जीव वाचवतो. हातिम शूरवीर सिद्ध झाल्यामुळे सिनेमा पुढे सरकतो. परीकथेतले हिरो विशेष हुशार दाखवून चालत नाही. अन्यथा देव/खुदा/पर्‍या/जादू वगैरेंची त्यांना का गरज पडेल? त्यामुळे हातिम हुशार असल्याचे सिद्ध करण्याचे कष्ट दिग्दर्शक घेत नाही.

आता अशा ठोंब्यांना या प्रश्नांची उत्तरे कोठून मिळणार? मग सर्वशक्तिमान खुदाला त्यांची दया येते आणि त्याच जंगलात कुठेतरी एका झाडाला पाचजण उलटे टांगून ठेवलेले दिसतात. हे सर्व वारंवार "एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस हैं" म्हणत असतात. हातिमला या "आदमजादांची" दया येते. उर्दू झाडण्याकरिता संपूर्ण सिनेमात हातिम व इतर अनेक पात्रे मनुष्य प्रजातीचा आदमजाद असा उल्लेख करतात. सतीश शाहला अक्कल असल्यामुळे तो या आदमजादांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. असे लॉजिकल सल्ले देत असल्यामुळेच तो या परीकथेचा हिरो होऊ शकलेला नाही. दुर्दैवाने हे नझरुलला कधीच समजू शकणार नाही. हातिम त्यांना आश्वस्त करून बंधमुक्त करू पाहतो. ते त्याला तसे करण्यास मनाई करतात. हातिम याचे कारण विचारणार एवढ्यात मागून कन्यकांचा हसण्याचा आवाज येतो. या लोकांच्या अगदी समोरच्या झाडावर सहा तरुणींची मुंडकी केसाने बांधून लटकवलेली आहेत. ही मुंडकी हातिमला बघून हसत असतात. हा प्रकार बघून हातिमला आपण एका तिलिस्ममध्ये अडकलो असल्याचे कळून चुकते.

२.२) तळ्यातले तिलिस्म

सतीश शाहलाही फार हुशार दाखवून चालणार नसल्याने तो "लडकियों के लटकते सर" बघून वेडापिसा होतो. इथे विनोदनिर्मितीचे बाष्कळ प्रयत्न होतात. त्या मुली यांना सांगतात कि आम्ही पाण्यात राहतो. हे बोलून नारळ पाण्यात पडावेत तशी ती मुंडकी अचानक अवतरलेल्या तळ्यात पडतात. हातिमची खात्री पटते की हे तिलिस्म तोडण्याचा मार्ग या तळ्यात आहे. त्यामुळे तो तळ्यात उडी घेतो. सतीश शाहला आपल्याला पाण्यात श्वास घेता येईल का याची खात्री नसल्याने तो बाहेरच थांबतो. इथे शॉटमधून असे दिसते की ते तळे फारसे खोल नाही आणि तळाशी एक गुहासदृश जागा आहे. तिथे या सहा मुली खिदळत जितेंद्राची वाटच बघत असतात. या एक्स्ट्रांपैकी एकही फारशी रुपवती नसल्यामुळे तिलिस्मची मालकीण यापैकी कोणी नसणार हे कोणीही सांगू शकतं. मग तिलिस्मची मालकीण कोण?

याचे उत्तर म्हणून मनजीत कुल्लर (शक्तिमानमधली कौशल्या उर्फ शक्तिमानची आई, अगेन फ्रेश फ्रॉम प्लेईंग सपना इन बंद दरवाजा) झुळझुळीत कपड्यांत अवतरते. ती स्वतःची ओळख "यहां की मलिका, मर्जिना" अशी करून देते. तिला जी वस्तु आवडत असते, त्या वस्तुला ती मिळवतेच. हिरोचे ऑब्जेक्टिफिकेशन होण्याचा रेअर डायलॉग झाल्यानंतर जितेंद्र तिला उपदेशाचा डोस पाजू बघतो. तिला असल्या गोष्टी प्राशन करण्यात इंटरेस्ट नसल्यामुळे ती त्याला घेऊन एका गुहेत शिरते. इथे सतीश शाहला एवढा वेळ झाला तरी जितेंद्र अजून परत न आल्यामुळे जरा चिंता वाटू लागते. मग तोही तळ्यात उडी घेतो. याच्या शॉटमध्ये मनजीतच्या घराला नीट बघता येते. तो एक शंख -शिंपले-कवड्या वगैरेंनी बनलेला महाल आहे. तिथे त्याला जितेंद्र तर नाही पण त्या सहा बायका भेटतात. त्या म्हणतात तुझा आका आता जिंदगी के मजे लुटत असेल तर तूही घे चान्स मारून. नझरुल मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो की हातिम परस्त्रीला स्पर्शही करणार नाही. आता - यांच्या मलिकाविषयी नझरुलला शून्य माहिती आहे. हातिमचे अजून लग्न झालेले नाही. म्हणजे जर ही मर्जिना त्याला आवडली तर त्यांचे लग्न होण्यात काहीच अडचण नाही. ही परीकथा असल्यामुळे गांधर्वविवाह स्कोपमध्ये आहे. एकंदरीत जंप कट + सतीश शाहचे हावभाव बघता मध्ये बराच वेळ निघून गेला आहे. सो हातिमने लग्न करून जिंदगी के मजे घ्यायला सुरुवात केली असेल ही शक्यता अजूनही स्कोपमध्ये आहे. असे असतानाही मर्जिना हातिमची चॉईस असूच शकत नाही हा आत्मविश्वास नझरुलने कुठून पैदा केला असावा?

पण मर्जिनाला वाईट, चवचाल दाखवायचे असल्यामुळे नझरुलचे म्हणणे खरे ठरते. हातिमच्या उपदेशाचा डोस पिण्याऐवजी मर्जिना दारु ढोसते. क्लिअरली पन्नाशीच्या दिसणार्‍या जितेंद्राला विशीतली मनजीत "हुस्न-ए-ईजाद करनेवाले ने तुझे कुछ सोच के बनाया हैं" म्हणते ते आणि एकंदरीतच तिचं फ्लर्टिंग विनोदी आणि अतर्क्य आहे. हातिमला या बाईची भुरळ पडत नाही यात काहीही आश्चर्यकारक नाही. चमत्कार असला तर हाच की हिला परत परत पाहण्याची इच्छा धरून एक नाही दोन नाही चांगले पाचजण बसले आहेत. तिच्या फ्लर्टिंगचा उबग येऊन तो तिला ढकलून देतो. या सर्वांचा शीण आल्यामुळे वाईच जरा टेकावं म्हणून तो मर्जिनाच्या सिंहासनावर जाऊन बसतो. मर्जिनाला त्याच्यावर जादू करण्यासाठी तसेही त्याला सिंहासनावर बसवायचे असतेच, त्यामुळे तिचा हेतु साध्य होतो. हातिम तिच्या जादूने बांधला जातो आणि रोमान्स करायला सिद्ध होतो. अशावेळी गाणे सुरु झाले नाही तरच नवल!

२.३) जिंदगी के मजे

अनुराधाताई पौडवाल गात आहेत "सनमा ओये सनमा, ओये ओये ओये". निव्वळ गाणे म्हणून हे गाणे ओये ओये ओये ओये ओये आहे. पण त्यावर अचाटपणाचे काही खास थर चढवल्यामुळे या गाण्यात वाह्यातपणाचे गुण आले आहेत. तर ...
या गाण्यात जर हातिम जिंदगी के मजे लुटतो आहे असे समजणे अपेक्षित असेल तर हातिमबद्दल प्रेक्षकाच्या मनात कणव निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. बारकाईने निरीक्षण करण्याची पहिली गोष्ट अशी - इतका वेळ मनजीतने सलवार विशिष्ट लेव्हलच्या खाली नेसली आहे. नेव्हल शॉट्स काढून झाल्यामुळे गाणे सुरु होताच ही सलवार वर सरकते. पण जितेंद्र तिच्यासोबत नाचू लागताच ती पुन्हा खाली घसरते. एखाद्या साईन वेव्हप्रमाणे तिची सलवार/परकर इ. (कडव्यासोबत हिचे कपडे बदलतात) पूर्ण गाण्यात वर खाली होत राहते. मिनिटभर थांबून सलवारची नाडी बदलून मग नाचगाणे केले असते तरी चालले असते. उगाच प्रेक्षकाच्या मनात धाकधूक!

मागे नाचायला म्हणून चौकटी-चौकटीच्या डिझाईनचे कपडे घातलेल्या ११ एक्स्ट्रा आणल्या आहेत. विशेष म्हणजे आधी दाखवलेल्या सहा बायकांमधली इथे एकही रिसायकल केलेली नाही. थोडक्यात खर्चा कियेला हैं. नाहीतर नाचे नागीन गली गली - बघावे तिथे एक्स्ट्रा रिसायकल. या अकराच्या अकराजणी मनजीतपेक्षा चांगल्या नाचतात. अगदी जितेंद्रही तिच्यापेक्षा चांगला नाचला असता. पण त्याला तिच्या जादूत मुग्ध झाल्याचे भाव घेऊन येरझार्‍या घालण्याचे काम दिले आहे. बापडा ते मन लावून करतोही पण ....
सेक्शन ०.२ मध्ये म्हटल्याप्रमाणे अनटॅप्ड पोटेन्शिअल असेच जाणवत राहते. इंटरेस्टिंगली याची कोरिओग्राफी पी. एल. राजने केली असली तरी या गाण्याचे अ‍ॅस्थेटिक १९९४ च्या मोहरामधल्या तू चीज बडी हैं मस्त मस्त सारखे आहेत. कदाचित इथे सरोज खान असती तर तिने जितेंद्रला नीट वापरला असता आणि मनजीतलाही जरा बर्‍या स्टेप्स दिल्या असत्या. बाकी सेट डिझाईनवर बरीच मेहनत घेतली आहे यात वाद नाही. त्यामुळे मनजीतचे ड्रेसेस अजूनच विजोड दिसतात. मध्ये तर तिला चक्क पिसांचा पोशाख (ऑफ कोर्स बिकिनी स्टाईल) दिला आहे. अंडरवॉटर राहणारी बाई असे कपडे का घालेल?

२.४) मैं आया हैं तो उपदेशामृत पाजकेही जाएगा - हातिम

सुदैवाने हा प्रकार फार काळ लांबवलेला नाही. एकदाचा हातिम तिच्या हुस्नच्या जाळ्यात अडकतो. आता तो जिंदगी के मजे लुटायला सुरुवात करणार इतक्यात त्याच्या गळ्यातला ताईत चमकू लागतो. पिशाचांना सूर्यप्रकाशाचा त्रास होतो तसा मर्जिनाला त्या ताईतातून येणार्‍या प्रकाशाचा त्रास होऊ लागतो. लहानपणी बांधलेला रक्षक ताईत कामी यायलाच हवा या नियमाचे पालन होते आणि हातिम भानावर येतो. अतिशय खराब स्पेशल शॉटमध्ये हातिम आणि नझरुल तळ्याच्या बाहेर फेकले जातात. तळ्याच्या बाहेर दिसलेली दोन्ही झाडे गायब झाली आहेत. पाठोपाठ मर्जिनाही धावत धावत तळ्याच्या बाहेर येते. तिला आता आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. प्रत्यक्षात तिला हातिमचा राग यायला हवा. पण आले दिग्दर्शकाच्या मना तिथे कोणाचे चाले? हातिमही तिला उदार मनाने माफ करतो. आता ते उलटे टांगलेले पाचजण आणि त्यांचे झाड परत प्रकट झाले आहे. हातिमच्या विनंतीला मान देऊन ती या आदमजादांना मुक्त करते. हातिम त्यांना उपदेश करतो की कामाग्नि कधीच शमत नाही. त्यामुळेच तुम्ही म्हणत होतात की "एक बार देखा हैं, दुसरी बार देखने की हवस हैं". नझरुलच्या लक्षात येते की अनवधानानेच का होईना, हातिमने पहिला प्रश्न सोडवला आहे.

इकडे यमनमध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर असल्याची लक्षणे दिसतात. पुतळ्याचा चेहरा बदलून तो संगीता बिजलानीसारखा दिसू लागतो. फळ्यावरचा पहिला प्रश्न पुसला जातो. हे बघून मरियम आणि गुलनार खुश होतात. इथे दोन चुका आहेत. आधी दाखवलेला पुतळा आणि या शॉटमधला पुतळा क्लिअरली वेगळा आहे. दुसरं म्हणजे मरियम तिला परी बानो संबोधते. ही कंटिन्यूटी मिस्टेक आहे जी या स्टेजला लक्षात येणे कठीण आहे कारण बानो हे ताई सारखे जनरिक फारसी अव्यय आहे. पण संगीता बिजलानीचा डबल रोल असून तिच्या दुसर्‍या भूमिकेचे नाव परी बानो आहे. त्यामुळे इथे मरियमने संगीताला गुलनारच संबोधले पाहिजे. क्लिअरली कंटिन्यूटी एरर. पण पहिला प्रश्न सुटल्याच्या आनंदात प्रेक्षक या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करतो.

अशा रीतिने हातिमने एक प्रश्न सोडवला. उर्वरित सहा प्रश्नांची उत्तरे काय असतात? हातिम आणि नझरुलला आणखी कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? हातिमला हिरोईन कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन उर्वरित सहा रोमांचक सेक्शन लवकरच प्रतिसादांत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पुर्ण सिनमा बघितला, आता मी पायस ह्यांच्या लेखणीतुन अवतरलेल्या खर्‍याखुर्‍या कथेची वाट पाहत आहे

४) प्रश्न तिसरा: सच को राहत हैं (थोडक्यात सत्यमेव जयते)

एव्हाना हे जंगल म्हणजे आयकिआ स्टोर असल्याची खात्री पटल्याने तिसर्‍या प्रश्नाच्या उत्तरासाठी देखील हातिम आणि नझरुल जंगलातच भटकत आहेत. त्यातल्या त्यात झाडे जरा बदलून ही जोडगोळी वेगळ्या जंगलात नाहीतरी किमानपक्षी जंगलाच्या वेगळ्या हिश्शात असल्याचे सूचित केले आहे. मध्ये बहुधा परी बानूला बोलावून नवीन कपडे मागवून घेतले असावेत कारण दोघांचे कपडे बदललेले दिसतात. तिने दिलेले घोडे आता गायब आहेत. ते काय तिच्यासोबत परत पाठवून दिले? पण आता त्यांच्याकडे घोडे नाहीत हे सत्यवचन! त्यामुळे ते जंगलातून चालत चालले आहेत. आता त्यांना कोणकोणत्या संकंटांचा सामना करावा लागणार आहे?

४.१) अरबी कथांमध्ये डिटूर घेतला नाही तर त्या अरबी कथाच नाहीत

नझरुल नेहमीप्रमाणे दमतो. जंगलातच एक काहीसा उंच असा एक चौथरा बांधलेला आहे. सतीश शाह त्या चौथर्‍यावरच लवंडतो. हातिम मात्र अजूनही बर्‍यापैकी ताजातवाना असतो. रात्रीची विश्रांती घेण्याआधी तो या जागेची सुरक्षिततेच्या दृष्टीने टेहळणी करू लागतो. असे दिसते की त्या चौथर्‍यापासून थोड्याच अंतरावर एक कब्रस्तान आहे. या कब्रस्तानात सॉलिड झोल आहेत. तिथे हेडस्टोन असलेल्या सहा कबरी आहेत आणि हेडस्टोन नसलेल्या दोन कबरी आहेत. मुळात हेडस्टोन नसलेली कबर तिथे कशाला असेल? दुसरे म्हणजे त्या कबरी नसून ते सार्कोफगस (अनेकवचन सार्कोफगाय) आहेत. सार्कोफगस म्हणजे दगडी शवपेटिका. या दगडी शवपेटिकांमध्ये शव पुरणे/चिणणे, ना की दो गज जमीन के नीचे, ही प्रामुख्याने इजिप्शियनांची पद्धत होती. म्हणजे सिनाईचे वाळवंट ओलांडून हातिमभाऊ आता इजिप्तमध्ये आले आहेत. इजिप्तमध्येही सेम भारतीय झाडे असतात हे पाहून मला गहिवरून आले.

हातिम अजूनही परिस्थितीचा अंदाजच घेत असतो तर आकाशातून एक पांढरी चादर येऊन त्या सर्व कबरींच्या मधोमध पसरते. अचानक एक कबर फोडून त्यातले मृत शरीर बाहेर येते. बेसावध प्रेक्षक आनंदाने चित्कारतो, झोंबी फाईट! पण भारतीय चित्रपट तितका पुढारलेला नसल्याने झोंबी ऐवजी कबर फोडून एक पांढरे पायघोळ वस्त्र घातलेला आणि चेहर्‍यावरून कोणी संत महात्मा वाटणारा म्हातारा बाहेर येतो. याचे नक्की नाव सांगणे थोडे कठीण आहे पण हा अलिफ लैलाच्या एपिसोड्समध्ये आहे. तसेच झी हॉरर शोमध्ये सुद्धा बर्‍याचदा इन्स्पेक्टर म्हणून याला पाहिल्याचे अंधुक आठवते. कबरी फोडून असेच आणखी चारजण बाहेर येतात. हे बाकीचे लोक मात्र जनरिक एक्स्ट्रा आहेत, हे ओळखू येण्याच्या पलीकडचे आहेत. हे सगळे बाहेर आल्यानंतर आणखी एक कबर फुटते. ही कबर मात्र काहीशी वेगळी आहे. इतर कबरी स्वच्छ दाखवल्या आहेत तर या कबरीवर गवत माजलेले आहे. बाहेर येणारी व्यक्तीही वस्त्र म्हणून ठिगळ लावलेली कोपरी, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, विस्कटलेले राकट केस अशी आहे. हा शेवटचा बाहेर आलेला आहे राजेश विवेक (वीरानामधला नकीताचा बाबा, लगानमधला गुरन इ.). क्लिअरली याने आधीच्या जन्मात वाईट कृत्ये केली असावीत तर इतरांने पुण्यकर्मे केली असावीत. ते पाच संत लोक जाऊन त्या चादरीवर जाऊन बसतात तर राजेश विवेक त्यांच्यापासून काही अंतरावर जमिनीवर बसतो.

मृतात्म्यांना तहान-भूक लागत नाही अशी आपली समजूत आहे. आत्ता हातिम जिथे कुठे आहे तिथे ही समजूत नसावी. त्यामुळे या सर्वांसाठी आकाशातून तरंगत जेवणाची ताटे येतात. पाच सद्पुरुषांसाठी चांदीच्या ताटवाटीत सुग्रास जेवण येते. तर रा.वि. साठी सोन्याच्या ताटवाटीत हिरे-जवाहिर-अशर्फी आणि रक्त येते. इथे रक्त म्हणून त्यांनी चक्क वाटीत तांबडा रश्शासारखी दिसणारी ग्रेव्ही वापरली आहे, कदाचित तांबडा रस्साही असेल. ते बघून तो किंचाळतो. कधी नव्हे ते आज आणखी एक चांदीची थाळी येते. ही थाळी हातिमसाठी पाठवलेली असते. त्या म्हातार्‍यांना लगेच कळते की आपल्यात आज कोणी खुदा का नेक बंदा आहे. हातिम दृष्टीस पडताच ते त्याला ये गिळायला म्हणून आमंत्रण देतात. हातिम मात्र फारच दयाळु दाखवायचा असल्याने तो आपली थाळी रा.वि. ला देतो. रा.वि. खुश होऊन त्या सुग्रास अन्नाचा आस्वाद घेणार इतक्यात खाद्यपदार्थांऐवजी सोने-हिरे-जवाहिर आणि रक्त असा मेन्यु येतो. हातिम हा चमत्कार पाहून फारच अचंबित होतो.

तो त्या पाचजणांना हा काय प्रकार आहे ते विचारतो. तर ते म्हणतात की चांगलंच आहे की त्याला इतका भारीतला मेन्यु आहे ते. हातिम यावर म्हणतो की पर इससे कोई आदमी पेट तो नही भर सकता. आता - एकतर हे सहाच्या सहाजण आदमी नाहीत, तर मृतात्मे आहेत. त्यामुळे टेक्निकली रा.वि. ला ते सोने-हिरे व्हॉटेव्हर खाता आले पाहिजे. दुसरे म्हणजे हातिमने जेन्युईनली विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायच्या ऐवजी रा.वि. ला टोमणे हाणणारे संत महात्मे कसे काय झाले? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्या पाचपैकी तीनच जणांच्या डोक्याला अरब स्टाईलचा रुमाल का आणि उरलेल्या दोघांच्या डोक्याला का नाही? असो, हातिमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून रा.वि. आपली कहाणी सांगू लागतो. हे पाचजणही त्याची कहाणी आधी कधीच न ऐकल्याच्या उत्साहात ऐकू लागतात, प्रत्यक्षात त्यांना ती माहिती पाहिजे. होतं असं की राजेश विवेक हा फार मोठा सौदागर असतो. हे पाचजण त्याचे पार्टनर्स असतात. हे पाचजण दानधर्म वगैरे करत असतात पण रा.वि. भलताच कंजूष असतो. त्याने कधी एक रुपयासुद्धा दान केलेला नसतो. उलट या पाचजणांवर तो हसत असतो, त्यांना शिव्या देत असतो. या पॉईंटला तो अलिफ लैला एक्स्ट्रा त्याच्याकडे बघून "बास का भाई" टाईपचे हातवारे करताना दिसतो. या हातवार्‍यांमागचे प्रयोजन काय असावे हे रहस्य शेरलॉक, व्योमकेश आणि कोनन मिळून सुद्धा सोडवू शकणार नाहीत तर मी यःकश्चित पामर काय सोडवणार?

गोष्ट पुढे सरकते तसे कळते की तो सावकारही असतो. कट टू फ्लॅशबॅक - राजेश विवेक आपल्या आलिशान महालात सफरचंद खात असतो. एक अबला नारी रडत उभी असते. तिच्या नवर्‍याला याने कर्ज दिलेले असते आणि कर्जबाजारी होऊन तिचा नवरा मेला. त्याचा दफनविधी करण्यासाठी, अर्थात कफन आणण्यासाठी, तिला पैशांची गरज असते. आधी तो तिला "उसे बिना कफन के ही दफना दे" असा प्रॅक्टिकल सल्ला देतो. पण मग त्याला व्हिलनचे आद्य कर्तव्य करण्याची हुक्की येते. तो म्हणतो की ठीक आहे मी पैसे देतो पण त्याबदल्यात तुला मला काहीतरी द्यावे लागेल. त्याला काय हवे आहे हे आता शेंबडे पोरही सांगू शकेल.

आता हे त्या बाईला रुचणे शक्यच नसते. ती त्याच्या कानाखाली जाळ काढते. याने चिडून तोही तिला कानाखाली वाजवतो. नेमकी ती जाऊन पडते सफरचंदापाशी. त्याला टोचलेली सुरी काढून ती स्वतःच्याच पोटात खुपसून घेते. त्याच्याआधी झालेल्या झटापटीत तिच्याकडून कँडलस्टँड खाली पडलेला असतो. त्या मेणबत्त्यांनी रा.वि. पेट घेतो आणि जळून मरतो. फ्लॅशबॅक संपला. हातिमला हे सर्व ऐकून त्याची घृणा वाटते. पण तो फारच दयाळु असल्याने, कनवाळू असल्याने तो त्याला माफ करून देवाकडे याची रदबदली करण्याचे ठरवतो. देवाकडेही हातिमचा हॉटलाईन नंबर असल्याने तो लगेच त्याची प्रार्थना ऐकतो आणि रा.वि. शापमुक्त होतो. या स्टोरीचा आणि प्रश्नांचा काहीही संबंध नाही, हे आपलं उगाच.

४.२) परीस्तानचा बादशहा असा असेल तर परीस्तानला राष्ट्रपती फंडातून विशेष अनुदान जाहीर करण्याची नितांत गरज आहे.

आता हातिम आणि नझरुल एका फुलांनी बहरलेल्या प्रदेशात आलेले आहेत. प्रसन्न वातावरण असताना नझरुल हातिमला बानूची आठवण करून देऊन वातावरण तापवतो. हातिमही मग बँडवाले वाजवतात तशी तिने दिलेली बासरी फुकतो. इकडे संगीता बिजलानी (परी बानू) परीलोकात आलोकनाथ (तिचे वडील) आणि मास्टर रिंकू (तिचा भाऊ, ऐलान-ए-जंग मधला लहानपणचा धरम, नमक हलाल मधला लहानपणीचा शशी इ.) यांच्यासोबत हास्यविनोदात रमलेली असते. पण जसे इच्छाधारी नाग पुंगीच्या आवाजाकडे आकर्षित होतात तशी ती त्या बासरीच्या आवाजाकडे खेचली जाते. इथे आलोकनाथचा ड्रेस पहिल्यांदा बघायला मिळतो. जर एखादी घंटा एखाद्याच्या डोक्यावर ठेवली तर आलोकनाथचा या चित्रपटातला मुकुट तयार होतो. जांभळ्या रंगाचा नाईटड्रेस जर रमेश-सुरेश सांगतात तसा काही बिलान छोटा केला तर त्याचे कपडे तयार होतात. असा हा प्राणी परीस्तानचा बादशहा असल्याचा शॉक प्रेक्षकाला झेलावा लागतो.

आता जितेंद्र तिला बोलावतो आहे, त्यामुळे तिने त्याच्या हाकेला ओ देऊन त्याच्याकडे जायला हवे हे खरेच. पण आलोकनाथला किमान आपण कुठे चाललो आहोत याचे खरे/खोटे उत्तर तरी देऊन जावे. पण नाही, ऐकली बासरी की निघाली बॉयफ्रेंडकडे. अशाने वडलांना संशय येणार नाहीतर काय? तिला यायला थोडावेळ लागतो. तोवर हातिम लगेच सेंटी डायलॉग फेकायला लागतो. आपली विको वज्रदंती स्माईल देत ती हे सगळं ऐकते आणि मग येऊन त्याला चिकटते. समजूतदारपणे नझरुल तिथून काढता पाय घेतो. परीचा कॉस्ट्युम अजूनही असला तरी आता गळ्याचे डिझाईन वेगळे आहे. तिचा वॉर्डरोब एकाच जोडापुरता सीमित नसल्याचे याने कळून चुकते.

इकडे आलोकनाथकडे चिमण्यांना पाणी प्यायला ठेवतात तसले एक भांडे असते. त्या भांड्यात जादूचे पाणी असते. त्या पाण्यात त्याला संगीता जितूसोबत रोमान्स करताना दिसते. आश्चर्यजनकरित्या आलोकनाथला मात्र हा हातिम - नेकी का फरिश्ता इ. इ. ओळख पटत नाही. त्यात आपण पस्तीसचे, पोरगी पंचवीसची आणि रोमान्स करणारा पन्नासचा. हा असा विषम सामना त्याला सहन होत नाही (जळका कुठला!). थोडक्यात इथे आलोकनाथ जितेंद्रला शब्दशः पाण्यात पाहत आहे. त्यात संगीता मधूनच "तुम्हारे सवालों का सफर खतम होते ही मैं अपने जिंदगी का सफर तुम्हारे साथ शुरु कर दूंगी" असा ड्वायलॉक मारते. मग मात्र संताप अनावर होऊन तो आपल्या जादूने तिला परत बोलावून घेतो.

हातिमही साखळदंडात जखडला जाऊन परीलोकात जातो. अ‍ॅपरंटली मुद्दा असा असतो की पर्‍यांनी आदमजादांसोबत रोमान्स करणे परीलोकाच्या शान के खिलाफ असते. त्यामुळे आलोकनाथ भडकून जादूने संगीताला छोटी करतो (हनी आय श्रंक द किड्सची प्रेरणा हीच!) आणि मग एका पिंजर्‍यात बंद करतो. इथे लक्ष देण्यासारखी बाब अशी की अभिनयात जरा डाव्या असलेल्या अभिनेत्री जेव्हा रडण्याची अ‍ॅक्टिंग करतात तेव्हा त्या बोबड्या बनतात. उदा. संगीता जेव्हा "रहम अब्बा हुजूर" हा डायलॉग बोलते, तेव्हा कान देऊन न ऐकल्यास ते "नही पप्पा हुजूर" असे ऐकू येते. तिकडे हातिमला शोलेच्या धर्मेंद्रसारखे दरबाराच्या पेंटिंगसमोर बांधून ठेवलेले असते. नझरुललाही त्याच प्रकारे बांधलेले आहे. आता नझरुल त्या पाण्यात दिसलाही नाही. तरी तो कसा काय कैद झाला? हा प्रश्न प्रेक्षकाच्या डोक्यात येऊ नये म्हणून आलोकनाथ "ए जुगनू की रोशनी में अपने जिंदगी का मुकद्दर ढूंढने वाले" असा हातिमचा तपशीलवार अपमान करतो. आलोकनाथचा असा गैरसमज झालेला असतो की हातिम धोकेबाज असून तो परी बानूला प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे. यामुळे चिडून तो दरबारी जल्लादाला हातिमचे डोळे फोडायला सांगतो. जल्लादही लगेच कबाब भाजण्याचे काम बाजूला ठेवून तापलेल्या दोन सळया उचलतो आणि हातिमच्या दिशेने सरकतो. या सळया म्हणजे दोन टोकदार लाकडी काटक्या आहेत. त्या काटक्यांची टोके लालपिवळ्या रंगात रंगवून तापलेल्या सळईचा आभास निर्माण करण्याचा ढिसाळ प्रयत्न केला आहे. तो हातिमचे डोळे फोडणार इतक्यात ....

४.३) जर तुम्हाला अमर अकबर अँथनीमधला निरुपा रॉयचा साईबाबा सीन अचाट वाटत असेल तर हाय कंबख्त अभी तुने बॉलिवूड समझाही नही

सर्वशक्तिमान खुदा हातिम आंधळा होणे कसे काय खपवून घेईल? त्यामुळे लगेच तिथे भूकंप येतो. परीस्तान भूतलावर नसतानाही, भूपट्टांच्या हालचालींमुळे येणारा भूकंप तिथेही होतो हा दैवी चमत्कार नाही तर अजून काय? हा भूकंप कमी आणि सेटला कोणीतरी हातांनी धरून गदागदा हलवले आहे असे दिसते. परिणामस्वरुपी हातिम वाचतो. पण मास्टर रिंकू, परीस्तानचे युवराज, यांची दृष्टी जाते. वास्तविक पाहता त्याच्या आंधळेपणाच्या अभिनयाकरता त्याला ऑस्कर नाही तर गेला बाजार फिल्मफेअर द्यायला हवा होता. पण तसे झाले नाही. आलोकनाथ आपला शहजादा आंधळा झाला हे ऐकून पार खचून जातो. तिथला हकीमही लगेच "ये बात मेरी हिकमत की पहुंच से बाहर हैं" म्हणतो. "अब इन्हे दवा की नहीं दुवा की जरुरत हैं" ची परीस्तान आवृत्ती. तो पुढे म्हणतो की हा आदमजाद (पक्षी: हातिम) नक्कीच खुदा का नेक बंदा असला पाहिजे. हे सगळं आपण त्याला त्रास दिल्याने झाले आहे, तरी आपण जाऊन त्याची माफी मागितली पाहिजे. आलोकनाथला ते काही पटत नाही. हकीम लगेच "आप सच पर पर्दा डालना चाहते हैं" म्हणून इथे तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर मिळणार असल्याचे प्रेक्षकांना फोरशॅडो करतो. इथे पटकथा सीरियसली वीक आहे कारण इथे आलोकनाथ काही डिरेक्टली खोटे बोललेला नाही. त्या बिचार्‍याचा फक्त गैरसमज झालेला आहे. ओरिजिनलमध्ये (म्हणजे लिखित साहित्यात, १९२९ पासून सर्व सिनेमांत हेच उत्तर वापरले आहे आणि तो फ्लॉ सार्वत्रिक आहे) तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर या सबप्लॉटमध्ये नाही. ओरिजिनलमध्ये हातिम परीलोकांपैकी एका शक्तिशाली बादशहा महापरीच्या मुलाची दृष्टी ठीक करतो तो एक जादुई मणी वापरून आणि त्यामागचा त्याचा हेतु असतो महापरीकडचे शाहमुरा नामक रत्न हस्तगत करणे. इथे पटकथाकाराने पुरेसा विचार केलेला नाही हेच खरे!

असो, तर आलोकनाथ अजूनही जरा घुश्श्यातच असतो. पण पोरासाठी म्हणून तो पडते घेतो आणि हातिम व नझरुलला मोकळे करतो. हातिमही त्याची सिचुएशन बघून प्रार्थना करायला घेतो. पुन्हा एकदा कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी पुढची सहा मिनिटे सिनेमा म्युट करावा. मुन्ना अझीझ विव्हळू लागतो - मेरे मालिक, मेरे दाता, ए मेरे परवरदिगार | काली कमली वाले के सदके मेरी सुनले पुकार || थोडक्यात हातिम म्हणतो आहे की अरे देवा, खुदा, भगवंता, काली कमली वाले (म्हणजे सूफी साहित्यातील कृष्ण) मी तुझ्या दरबारात आलो आहे, माझे म्हणणे ऐकून घे. निव्वळ गाणे म्हणून हे खरंच छान लिहिले आहे, शब्द कोणा हसन कमलचे आहेत. पण मुन्ना अझीझच्या आवाजातील शक्तीला अंडरएस्टिमेट केल्यास डोकेदुखी उद्बवण्याचा संभव आहे. हे गाणे या चित्रपटात जितेंद्राला कसा वाया घालवला आहे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. पूर्ण गाण्यात हातिम नुसता आकाशाकडे बघत इकडे तिकडे फिरत राहतो. मधून मधून कॅमेरा आलोकनाथ, रिंकू, सतीश शाह प्रभूतिंवर मारला आहे तेवढेच. जर हेच शूट करायचे होते तर जितेंद्राजागी कोणताही ठोकळा चालला असता. जितेंद्रच कशाला पाहिजे? दिग्दर्शकाच्या डोक्यात क्लॅरिटी नसेल तर प्रेक्षक असे प्रश्न विचारण्याचा धोका असतो आणि चित्रपटातली बदाबदा रडण्याची जागा फुकट जाते.

बरं इतका गंभीर प्रसंग चालला आहे, तर दरबारी लोकांच्या चेहर्‍यावर काही सुतकी कळा? गेला बाजार एकाच्या तरी डोळ्यांत अश्रू? काही काही दरबारी तर इतके कंटाळलेले आहेत की "चला आटपा लवकर लवकर, अजून पाच मिनिटांत शेजारच्या सेटवर माझी शिफ्ट आहे" अशा चेहर्‍याने ते उभे आहेत. त्या मास्टर रिंकूच्या देखभालीकरता ठेवलेली कोण बाई आहे, ती तर सरळ सरळ पेंगुळली आहे. आणखी कहर म्हणजे ते गाणे या काँटेक्स्टमध्ये अतिशय विचित्र आहे. सरळ सरळ त्या मुलासाठी प्रार्थना करायची सोडून ते जनरिक सूफी कवन होते. मग त्यात मूसा (मोझेस)ने लाल समुद्र दुभंगण्याचा सीन आणि त्याचे वर्णन आहे. येशूने मृतांना जिवंत केल्याचे वर्णन आहे. हे सर्व कशाला पाहिजे? पुन्हा क्लॅरिटीचा अभाव, जो पदोपदी जाणवत राहतो.

शेवटी खुदालाच प्रेक्षकांची दया येते. तो थेट मक्केतल्या काबामधून दोन ज्योती पाठवतो. त्या ज्योती मक्केतून आकाशमार्गे प्रवास करत परीस्तानात पोहोचतात. मग त्या रिंकूच्या डोळ्यात प्रवेश करतात आणि त्याची दृष्टी परत येते. हा सीन बघण्यासारखा आहे. निरुपा रॉय-साईबाबा कॉम्बो यापुढे किस झाड की पत्ती आहे. हा चमत्कार बघून आलोकनाथ नमतो. रिंकूसुद्धा जाऊन हातिमभावजींना बिलगतो. लगेच "आपाजान को रिहा किया जाए" ही अक्कलही त्याला सुचते. इथे अखेर आपल्याला परी बानूचे अ‍ॅक्चुअल नाव हुस्ना आहे असे कळते. मग ती आधीच आपले नाव हुस्ना बानू असे का बरे सांगत नाही? पुन्हा क्लॅरिटीचा अभाव!

तिला आजाद केल्यानंतर आलोकनाथ खरा प्रॉब्लेम सांगतो. जर एका परीने एका आदमजादसोबत लग्न केले तर तिला तिच्या पंखांची कुर्बानी द्यावी लागते. ती म्हणते मला चालेल. तो म्हणतो ओके, मला हे लग्न मान्य आहे. इतका फडतूस प्रॉब्लेम बोलाचालीने सोडवण्याऐवजी बाकीचे धंदे करत बसल्याने सिनेमा फुकटच वीस मिनिटेतरी लांबतो (वर सहा मिनिटे मुन्ना अझीझ सोलो). यापेक्षा आपली दुसरी मुलगी इतके दिवस घरी परत आलेली नाही, तिचा शोध घ्यावा. ही परी बानू पृथ्वीवर गुलनारच्या शोधात फिरते आहे, तिला काय कळले आहे का हे विचारावे. असे सर्व लॉजिकल ऑप्शन त्याला सुचत नाहीत. हा भोंगळा कारभार बघता हातिम परीस्तानचा जावई बनतो आहे ते परीस्तानच्या भवितव्याच्या दृष्टीने लाभदायकच म्हणावे लागेल. हातिमच मग त्याला सांगतो की अरे तुला आणखी एक संगीता बिजलानी मुलगी आहे बघ, ती ना दगड होऊन पडली आहे. तिला पूर्ववत करण्यासाठी मी सात सवाल सोडवायला निघालो आहे. हे ऐकून आलोकनाथ पुरता विरघळतो. म्हणतो की तू ग्रेट आहेस आणि तुझ्या सच्च्या प्रेमाने हे सिद्ध केले की सच को राहत हैं. सतीश शाह लगेच म्हणतो की हेच तर आपल्या तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर (वाट्टेल ते!)

लगेच तिसरा प्रश्न सुटल्याची लक्षणे दिसू लागतात. दुसर्‍या प्रश्नातच गुलनारचे पंख पूर्ववत झाल्याचा शॉट काढून घेतल्यामुळे यावेळी तिच्या शरीराचा नवीन कोणता भाग पूर्ववत होत नाही. फळ्यावरचा तिसरा प्रश्न मात्र पुसला जातो. रझा मुराद लगेच येऊन तिला म्हणतो की रब्-ए-अझीमने माझा आणखी एक गुन्हा माफ केला. यावर गुलनार रझा मुरादकडे इतक्या प्रेमाने बघते की प्रेक्षकाला तिच्या डोक्यात कांदे आहेत की बटाटे ही शंका आल्याखेरीज राहत नाही. अशा रीतिने तीन प्रश्न पूर्ण झाले, अजून चार प्रश्न बाकी.

या स्टोरीचा आणि प्रश्नांचा काहीही संबंध नाही, हे आपलं उगाच.>>> Uhoh Lol
आलोकनाथ जितेंद्रला शब्दशः पाण्यात पाहत आहे>>>> भारी.
आलोकनाथचा ड्रेस बघण्यासाठी युट्युब उघड्लं Lol
आपण पस्तीसचे, पोरगी पंचवीसची आणि रोमान्स करणारा पन्नासचा. हा असा विषम सामना>>>> Rofl
४.३ भारी जमलंय.

Rofl
तो कबरींचा सीन अशक्य आहे, ताटातलं रक्त वाटतच नाही, मला तर तो तिखटा चा रस्सा आहे अस वाटल होत
भुते व्यवस्थित जेवतात ही नविन माहीती मिळाली

आलोकनाथ च्या ड्रेस्स्बद्दल ३००% अनुमोदन

रच्याकने " खुदा का नेक बंदा" ह्या टर्म च फ्रीक्वेन्सी अनालीसीस केलं पाहिजे, ऐकुन ऐकुन कान किटले

खूपच मस्त!
मस्त पंचेसः
फडतूस प्रॉब्लेम, आणखी एक संगीता बिजलानी मुलगी, रा.वि. ला टोमणे हाणणारे संत महात्मे..... (बाय द वे..हा अगदी राजेश विवेक का कोण आणि तो बानूचा भाऊ...........असले लोक - तेही त्यांच्या आधी-नंतर केलेल्या भूमिकांसकट!! .......................... कसे काय लक्षात राहतात तुमच्या? !!
ग्रेट निरीक्षण शक्ती!
आणि मेन म्हणजे- सच को राहत है - प्रश्नाचं उत्तर कसं काय मिळालं...? काहीही!
Lol

त्यात आपण पस्तीसचे, पोरगी पंचवीसची आणि रोमान्स करणारा पन्नासचा. हा असा विषम सामना त्याला सहन होत नाही (जळका कुठला!). थोडक्यात इथे आलोकनाथ जितेंद्रला शब्दशः पाण्यात पाहत आहे. <<<<<<<

टू मच! Rofl

यातल्या 'आज बचना है मुश्किल तेरा'च्या थोड्या आधीपासूनच्या प्रसंगांवर मी आधी अ नि अ बाफवर लिहिले होते बहुधा. जादूगार कमलाख (म्हणजे कमल जैसी आंखवाला??? Proud नसावा. अमरीश पुरीचे नाव आहे ते!) चे सुपरडुपरहिट, इंटेन्स क्लोजप..

"ए जुगनू की रोशनी में अपने जिंदगी का मुकद्दर ढूंढने वाले" असा हातिमचा तपशीलवार अपमान करतो.<<<<<
'तहलका'मधली 'दानवीर कर्ण की नाजायज औलाद' ही तपशीलवार शिवी आठवली.

मस्त लिहिलं आहे!

परीचा कॉस्ट्युम अजूनही असला तरी आता गळ्याचे डिझाईन वेगळे आहे. तिचा वॉर्डरोब एकाच जोडापुरता सीमित नसल्याचे याने कळून चुकते.>>>
actually निरिक्षणाअंती असे लक्षात येते की संगीताबाईंचे परीच्या भूमिकेसाठी गुलनार-गेटअप आणि हुस्ना-गेटअप असे दोनच जोड (पंख, अलंकार, झगा) आहेत. गुलनार पूर्ण सिनेमाभर गुलनार-गेटअपमधे आहे. हुस्ना सुरवातीला हुस्ना-गेटअप मधे आहे पण नंतर परीस्तानमधला तिचा गुलनार-गेटअप आहे. मग नंतर अधूनमधून दोन्ही गेटअपची अदलाबदल आहे. शेवटी दोन्ही बहिणी एकमेकींना भेटतात तेव्हा दोघींचे ओरिजिनल गेटअप आहेत. नाहीतर मग हातीमची पंचाईत झाली असती की आपली हिरॉईन कोण म्हणून Happy

५) प्रश्न चौथा: जैसा करेगा वैसा भरेगा

हातिम आणि नझरुल आता गवताळ प्रदेशात आलेले दिसतात. इजिप्तमध्ये नाईलच्या किनार्‍याने थोडे दक्षिणेला जाऊन मग सुदानमधून त्यांनी चाड मध्ये प्रवेश केला असावा. हे अरब प्रवासांशी सुसंगत आहे कारण तेही असेच पश्चिमेकडे (मघ्रिब) सरकत मोरोक्कोपर्यंत गेले होते. यावरून हातिम आता भूतलावर परतला असल्याचे सिद्ध होते. तसेच हाच मार्ग कायम राहिला तर यानंतरचे प्रश्न जंगलात (नायजेरिया, माली इ.) मग काहीसा खडकाळ, डोंगराळ प्रदेश (दक्षिण मोरोक्को, अल्जेरिया इ.) आणि मग वाळवंट (अल्जेरिया) असा होणार यात शंका नाही. भूगोल सॉर्ट आऊट झाल्यानंतर हातिम आणि नझरुलचे पुढे काय होते ते बघूया.

५.१) अंगावर पांघरायला म्हणून शक्यतो शाल द्यावी, नाहीतर हालचाली ऑकवर्ड होतात

नेहमीप्रमाणे नझरुल दमतो. सॅव्हानाच्या गवताळ प्रदेशाला लाजवेल असे खुरटे गवत दाखवून प्रेक्षकांना निराश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. झाडाची सावली बघून ते आपापली बुडे टेकवतात न टेकवतात तोच त्यांना सात भालदार घेराव घालतात. यातल्या उजव्या कोपर्‍यातल्या भालदाराच्या खांद्यावरची दोरी त्यांचा उद्देश स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. पण ती वापरायची वेळच येत नाही कारण हातिम आपल्या सासर्‍याप्रमाणे आततायी नसतो. तो सामोपचाराने बोलाचाली करतो. या भालदारांची मलिका कोणी सलोनी म्हणून असते. सलोनी येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांना पकडून कसली तरी परीक्षा द्यायला लावत असते. आजपर्यंत त्या परीक्षेत कोणीही पास झालेले नसते. भालदाराचे एक्झॅक्ट शब्द ("कोई बच नही सका") परीक्षेचे स्वरुप प्राणघातक असल्याचे दर्शवतात. हातिम शूरवीर असल्याने तो म्हणतो की बरं, आधी तुमच्या मलिकाकडे घेऊन तर चला.

कट टू आणखी एक रँडम राजवाडा. या वाड्यात मध्येच एक जिना आहे आणि त्याच्या टोकाशी एक सिंहासन मांडले आहे. तिथे एक तरुणी तोंडावर फडकं आणि अंगावर गालिचा पांघरून उभी असते. डोक्याला विचित्र डिझाईनचा हेअरबँड आहे आणि त्यात एकच पीस खोवलेले आहे. तो राजवाडाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या भिंतींवर जागोजागी प्राण्यांची मुंडकी लावली आहेत. सलोनीला शिकारीची आवड असल्याचे यातून फोरशॅडो केले आहे (या सिनेमाच्या मानाने हे फोरशॅडोईंग फारच सटल म्हणावे लागेल). सलोनी विचारते की दोघांपैकी आधी इम्तिहान कोण देणार? हातिम म्हणतो मी. नझरुल म्हणतो की अरे तुला अजून ४ प्रश्न सोडवायचे आहेत. त्यापेक्षा मी देतो इम्तिहान. आता हा सल्ला लॉजिकल आहे. हातिम बाजूला बसून आधी इम्तिहान काय आहे हे बघू तरी शकतो. मग गोळा केलेल्या डेटानुसार स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करता येऊ शकते. पण यात नझरुलला सॅक्रिफाईस करावे लागेल. सतीश शाह या कथेतला एकमेव कॉमिक रिलीफ असल्यामुळे पटकथालेखकाला हा लॉजिकल पण रिस्की गँबल खेळता येत नाही आणि हातिम त्याला गप्प बसवतो.

यानंतर हातिम आणि सलोनी एकमेकांसोबत खुदा-खुदा खेळतात. बेसिकली उर्दूमध्ये एकमेकांवर जड जड ड्वायलॉक फेकून मारतात आणि प्रत्येक डायलॉगमध्ये खुदा हा शब्द आलेला आहे. सर्वशक्तिमान देवाने सुद्धा आपल्या नावाचा असा घाऊक वापर पाहून कपाळाला हात लावला असेल. या संवादांचा कथेच्या दृष्टीने काही एक उपयोग नाही. हातिम हा खुदा का नेक बंदा असल्याचे खूप आधीच एस्टॅब्लिश झाले आहे. ती बाई खुदाची नेक बंदी नसल्याचे शेकडो क्लू आहेत. एकतर तिला हातवारे करता येत नाहीत. त्या गालिच्याला सांभाळण्याच्या नादात ती सगळ्या ड्रॅक्युलाच्या पोझेस घेते. अंगावरची शाल फाकवून पंखांचा एफेक्ट देण्याची पोझ, गालिचा तोंडावरून ओढण्याची बॅटमॅन वाली पोझ - यू नेम इट आणि या सर्व पोझेस विविध ड्रॅक्युलापटांत सापडतील. त्यात त्या वाड्यात एकही देवाचे चिन्ह दिसत नाही. तिला काँट्रास्ट म्हणून कधी नव्हे ते हातिमनेही पांढरे कपडे घातले आहेत. अजून वेगळा काय क्लू पाहिजे?

५.२) करामतचे टायमिंग जमले पाहिजे

प्रेक्षकाला जेवढे फ्रेममध्ये दिसते तेवढेच सिनेमातल्या पात्रांना दिसते या नियमानुसार राजवाड्यात असलेला, लालबुंद कोळशांनी भरलेला एक कुंड या लोकांना दिसत नाही. सलोनीची परीक्षा अशी असते. त्या कुंडात उडी घ्यायची. मग पुढे तुमचं नशीब आणि तुम्ही. डेमो म्हणून ती काहीतरी त्या कोळशांत फेकते आणि लगेच भडका उडतो. ती इशारा करते आणि तिचे सेवक येऊन हातिमचे बूट काढून घेतात. तसे बघावे तर नंगे पाव चलना पडेगा अशी काही अट नाही, तरी उगाच त्याचे बूट काढले जातात. या निमित्ताने आपल्याला पांढर्‍या रंगाचे बूट बघायला मिळतात. या सीनमध्ये जितेंद्राने गुलाबी शर्टावर पांढरे जाकिट, पांढरी पँट आणि पांढरे बूट असा अतिशय फॅशनेबल वेष धारण केला आहे.

मुन्ना अझीझ पुन्हा एकदा रडू लागतो. पण हे रुदन काही क्षणांपुरतेच आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की हे सर्वजण सहन करू शकतात. हातिम त्या शोलों के उपर चालतो. तो एका टोकापासून दुसर्‍या टोकाशी जाताच त्या कुंडातील निखार्‍यांचे गुलाबांत रुपांतर होते. तसे बघावे तर हातिमने पाय टाकताच हे रुपांतर झाले असते तर त्याला फुकट त्या निखार्‍यांवरून चालावे लागले नसते. त्याच्याभोवती काही कवच असल्याचे किंवा ते शोले थंड पडल्याची लक्षणे दिसत नाहीत. म्हणजे पाय भाजून घेत तो चालला. त्याचे पाय भाजून भुना पाय झाले आणि मग तो फुलांचा चमत्कार घडतो. बैल गेला आणि झोपा केला मधला प्रकार. आता त्या चमत्काराचा काय उपयोग?

सलोनी मात्र हे बघून फारच प्रभावित होते. लगेच ती हातिमचे पाय धरते. हातिमही सरप्राईजिंगली ओके दिसतो आहे. ती त्याच्याकडे आपल्या कृत्याची माफी मागते. हातिम म्हणतो की माफी खुदाकडे माग. ती म्हणते की तो मला माफ नाही करणार. तो म्हणतो का नाही करणार? यावर ती एका दालनात जाते. तिथे चादरीने एक तैलचित्र झाकून ठेवलेले असते. हे चित्र असते रेश्मा सिंगचे. आता इथे कोणीही सांगू शकते की सलोनीची भूमिका रेश्मा सिंगने केली आहे. हातिमही ते चित्र सलोनीचे असल्याचे ओळखतो. त्या चित्राला बघून तो ज्या पद्धतीने "कुदरत की कारगिरी का बेहतरीन नमुना" म्हणतो ते ऐकून मात्र फुर्रकन हसू फुटू शकते, तरी चहा पित असाल तर सावधान! ती म्हणते की पण आत्ता मी अशी दिसत नाही. हातिम म्हणतो की बघूच आता तू कशी दिसते. हो ना करता करता ती आपला बुरखा बाजूला करून आपले रुप दाखवते. तिचे तोंड माकडासारखे झालेले असते आणि तिला दाढी मिशा असतात. तर तिचे हात अस्वलासारखे दिसत आहेत. पण नेव्हल आणि क्लिव्हेज शॉट घ्यायचा असल्याने तिच्या उर्वरित शरीरावर एकही केस नाही. जणू ताई वॅक्सिंग करून आल्यात. अंगावर कपडेही बेली डान्सरचे. रच्याकने हा डिरेक्टर नेव्हल शॉट्सच्या बाबतीत ऑब्सेस्ड आहे, यातल्या प्रत्येक हिरविणीचा एकतरी तसा अँगल लावलेला आहे.

५.३) शाप आणि साप दोन्ही विषारी असू शकतात

तिच्या नोकरांनीही अ‍ॅपरंटली तिचे हे रुप बघितलेले नसते. इतकी वर्षे हे सीक्रेट तिने कसे लपवले असेल हा प्रश्न पडणे साहजिक आहे पण त्याचे कसलेही उत्तर आपल्याला मिळत नाही. हातिम तिला विचारतो हे सर्व कसे काय झाले? फोरशॅडो केल्याप्रमाणे तिला शिकारीची आवड असल्याचे दाखवले जाते. आत्ता अंगावर जे कपडे आहेत (गालिचा आणि बुरखा वजा करून) तेच घालून ती कित्येक वर्षांपूर्वी शिकारीला गेलेली असते. तिच्याच म्हणण्यानुसार ती घमंडी आणि मग्रूरही असते. आफ्रिकेच्या जंगलात आपल्याला मग फ्लॅशबॅकमध्ये चितळ बघायवयास मिळते. रेश्मा सिंग तिरंदाज असते. एका झाडापाशी ते चितळ काहीतरी चरत असते. तिला बघून ते पळत सुटते. ती नेम धरून बाण सोडते पण नेमबाज म्हणून अतिशय फडतूस स्किलसेट असल्याने तिचा नेम चुकतो आणि तो बाण जाऊन झाडीत लपलेल्या एका फकीराला लागतो. इथे अ‍ॅक्चुअली ते हरीण फकीर बनलेले दाखवणे अधिक श्रेयस्कर ठरले असते पण असो.

बाण फकीराला उजव्या खांद्याजवळ लागतो. जखम निश्चितच प्राणांतक दिसत नाही. त्याला वेळेत डॉक्टरकडे नेऊन सहज वाचवण्यासारखे आहे. पण तो फकीर पाप्याचे पितर असल्याने लगेच मरायला टेकतो. फकीर, साधू, ऋषी इ. लोकांचे आद्य कर्तव्य असल्याप्रमाणे तो मागचे पुढचे काही न बघता तिला बदसूरत होण्याचा शाप देतो. तिने गयावया करताच तिला तो उ:शापही देतो. कोणा खुदाच्या नेक बंद्याने जर तिच्या अंगातील बद्दुआ का जहर चोखून बाहेर काढले तर तिचे रुप तिला परत मिळेल. च्यायला तो फकीर आहे का इच्छाधारी नाग?!

बाकी मुद्दा लक्षात आला असेलच. ती अग्निपरीक्षेमार्फत खुदाचा नेक बंदा शोधत होती. हातिम तो खुदाचा नेक बंदा. आता हातिम तिच्या शरीरातून जहर चोखून बाहेर काढणार आणि थुंकून टाकणार. हे त्याला करता येणार का अशी शंका येऊच शकत नाही कारण प्राचीन काळापासून हिरोंना विष चोखून थुंकण्याची इंद्रजालीय कला अवगत आहे. यानंतरचा शॉट कदाचित आजच्या सेन्सॉरमधून सुटला नसता. हातिम तिच्या हाताला चाकूने जखम करतो आणि तिला ऑलमोस्ट चावतो. मग चोखून विष थुंकणे प्रोग्राम होतो आणि रेश्मा सिंग पूर्ववत होते.

५.४) हिरोची बहीण

आपण शापमुक्त झालो याचा आनंद झाल्याचा अभिनय मग पुढचे दहा सेकंद होतो. मास्टर रिंकूच्या अंध अभिनयानंतर संयत अभिनय तो हाच! लगेच हातिमला बिलगण्याचा कार्यक्रमही पार पडतो. आता आपल्या मसीहासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून रेश्मा आणि तिच्या सेविका नाचायला लागतात. त्यांच्या हातात खंजिरी दिली आहे. डान्स बराचसा भांगडा छाप आहे. गाणे आहे - ए जाना, ए जाना, ए जाना जाने जाना, दिल हैं तेरा दीवाना, ए जाना जाने जाना, दिल हैं तेरा दीवाना. रेश्मातैंना आवाज दिला आहे अनुराधा पौडवाल यांनी. निव्वळ गाणे म्हणून हे ठीकठाक आहे. नथिंग स्पेशल, टिपिकल एटीज् अफेअर पण पासेबल. कोरिओग्राफी मात्र आयटम साँगची आहे. रेश्मा आपल्या शरीराचा कणन् कण हलवून घेते. आयटम साँग्जप्रमाणेच या नाचाला एक अशी शैली नाही. भरीस भर म्हणून स्टेप्सना लयही नाही. टू एलॅबोरेट - जर स्टेप्सचे एक चक्र ठरवून ते रिपिट केले तर आपोआपच त्या नाचाला लय प्राप्त होते. शेवटी गतीच्या पुनरावृत्तीस तर लय म्हणतात (गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी पुरस्कृत बहुतांश पुस्तकांतली व्याख्या). त्यामुळे या नाचाला अजिबात लय नाही. वर जितेंद्र यात नाचतच नाही त्यामुळे पुन्हा एकदा त्याला वाया घालवला आहे. पार सतीश शाहलाही नाचायला लावता आणि जितेंद्र हाताची घडी घालून उभा राहणार याला काय अर्थ आहे?
कोरिओग्राफर कमी म्हणून मग एडिटरला उत येतो. माशीच्या डोळ्यांतून बघत असल्यासारखे जितेंद्र आणि रेश्माच्या शॉटचा कॉप्या बनवून त्या एकत्र चिकटवल्या जातात. आता हे एक दोन शॉटपुरते असते तर ठीक होते पण जवळपास एक कडवे तसे घ्यायचे म्हणजे अतिरेक नाही का? आणखी एक इंटरेस्टिंग प्रकार म्हणजे हुमाच्या डोईचे पीस तिच्या कपड्यांना मॅचिंग रंगाचे दाखवले आहे. तिचे कपडे बदलतात तसे तिचे पीसही बदलत जाते.

एकदाचा तो डॅन्स संपतो. हातिम तिच्या आवाजाची तारीफ करतो (त्यालाही डॅन्स फारसा आवडला नसावा). मग रेश्मा त्याला विचारते की ते सगळं ठीक आहे पण तुझ्या हृदयात या गाण्याने काहीच मोहोब्बत जागृत नाही झाली का? यावर हातिम "हातिम की दुनिया मोहोब्बतही मोहोब्बत हैं" असा प्रेमाचा शांतिसंदेश देणारा ड्वायलॉक मारतो. मग ती त्याला बिलगताच तो महत्त्वाचे टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय वाचून दाखवतो. तो तिला सांगतो की मला ऑलरेडी हिरवीण आहे पण तू माझी मानलेली बहीण बनू शकतेस. ती थोडी खट्टू होते पण म्हणते ओके. मग ती म्हणते की किमान काही दिवस इथे राहा तरी. तो म्हणतो नाही. ती थोडी खट्टू होते पण म्हणते ओके. मग ती म्हणते की किमान काहीतरी आठवणीची वस्तु तरी देऊन जा. हातिम खोटा खोटा हसतो आणि म्हणतो ओके. तो तिला गळ्यातला हार काढून देऊ करतो पण कोणी अदृश्य व्यक्ती तिला चोपू लागते. हातिम त वरून ताकभात ओळखणारा असतो. ही परीबानू असल्याचे त्याला झटक्यात समजते.

परीबानूचा बहुतेक हातिमवर पूर्ण विश्वास नसावा त्यामुळे ती सर्वकाळ आलोकनाथच्या जादूच्या पाण्यात हातिमला स्टॉक करत असावी. गैरसमज वाढण्याच्या आत हातिम सलोनीला बानूची ओळख तिची भाभी म्हणून करून देतो. हे करताना तो चलाखीने सलोनीच्या खांद्यावर मस्तपैकी हात टाकून घेतो. बानू तेवढी हुशार नसल्याने हे तिच्या नजरेतून निसटते. मग ती लगेच आपल्या हातांनी तो हार सलोनीला देते. याने सलोनी पार "गदगद होते" (हे इथल्या रझा मुरादच्या अ‍ॅक्सेंटमध्ये वाचावे). तिने हातिमला भेटण्यापूर्वी मनाची समजूत घातलेली असते की आपले काहीच होऊ शकत नाही आणि ही आपल्या कर्मांची फळे आहेत - जैसा करेगा वैसा भरेगा. सतीश शाहला प्रश्न सोडवायची जितेंद्र आणि संगीतापेक्षा अधिक गरज असल्याने त्याला हे चौथ्या प्रश्नाचे उत्तर असल्याचे लक्षात येते आणि तो आनंदाने चित्कारतो.

लगेच हे उत्तर बरोबर असल्याची लक्षणे दिसू लागतात. फळ्यावरचा चौथा प्रश्न पुसला जातो. गुलनारच्या कंबरेपासचा भाग पूर्ववत होतो. अशा रीतिने चार प्रश्न सुटले. पुढच्या प्रश्नासाठी हातिम आणि नझरुलला कोणत्या संकटाचा सामना करावा लागणार आहे?

मस्त!!
पायस ती हुमा खान नाही रेश्मा सिंग आहे.
८०, ९० च्या चित्रपटात ती बलात्कारापुरती बहिण किंवा हिरोला जाळ्यात ओढण्यापुरती यायची

हे प्रश्न उदाहरणासह सोडवायचे असतात का..? या सगळ्या केस स्टडीज आहेत आणि त्याचे तात्पर्य म्हणजे प्रश्नाचे उत्तर! मस्त झालाय हाही भाग.

पाप्याचे पितर असलेला फकीर, न नाचणारा जितेंद्र, एडिटरचे कारनामे, सलोनी चे विष चोखून थुंकणे, बानू 'भाभी'...किती त्या जितेंद्र वर संकटं दाखवायची...!!!!

पुढे?

६) प्रश्न पाचवा: कोह-ए-निदा की तलाश

इथून पुढच्या तिन्ही प्रश्नांचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे अन्यथा हे प्रश्न अतिशय गोंधळात पाडणारे आहेत (तसेच हे केस स्टडी नाहीत, यांना एक स्पेसिफिक उत्तर आहे). उर्दू/अरबीमध्ये कोह म्हणजे पर्वत तर निदा म्हणजे हाक. कोह-ए-निदा म्हणजे हाक देणारा पर्वत अर्थात बोलता पर्वत. या प्रश्नात हातिमला बोलत्या पर्वताचा शोध घ्यायला सांगितले जाते. ओरिजिनलमध्ये हा पर्वत हिंदुस्तानात असून त्या पर्वतातून येणारे आवाज एक ट्रॅप आहेत. त्या पर्वतामार्फत पर्‍यांच्या एका तिलिस्मात तुम्ही अडकत असता. ओरिजिनलमध्ये हातिमला त्याची होणारी बायको, परीराणी झरीनपाश यातून वाचवते. हे तिलिस्म फारच एपिक असल्यामुळे अर्थातच पटकथेत याला फारच टेम पर्याय दिला आहे.

६.१) गोष्टीत जिन्न आला नाही तर अरबी कथांमध्ये फाऊल होतो

आता हातिम आणि नझरुल एका भिल्ल कबिल्यात आलेले आहेत. परीबानूने जाण्यापूर्वी नवे कपडे दिलेले आहेत. या कबिल्यात जागोजागी अननसे टांगून ठेवली आहेत. काही कारणाने ते कबिलेवाले मिठाची गुळणी धरून बसलेले आहेत. नझरुल त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करतो पण सगळे ढिम्म! मनात म्हणत असतील की अरे दिग्दर्शकाने आम्हाला डायलॉग दिलेच नाहीत तर आम्ही तुझ्या प्रश्नांची काय उत्तरे देणार? कदाचित यांना प्रेमाची भाषा समजेल असा विचार करून हातिम त्यांच्या सरदाराला जाऊन हबीबी असे संबोधतो आणि अस्खलित उर्दूमध्ये तुम्ही सगळे गप्प का असे विचारतो.

या लोकांचा सरदार असतो देवकुमार. भिल्ल असूनही देवकुमारला उर्दू येत असते. तो म्हणतो की ते बघा ती माझी मुलगी कशी नवरीप्रमाणे नटली आहे. सतीश शाह म्हणतो की अरे वाह, काँग्रॅट्स! देवकुमार म्हणतो आधी पूर्ण ऐकून घे, नुसतं अभिनंदन करण्याची घाई. तिची आज कुर्बानी दिली जाणार असते. आता हा कुर्बानीचा काय मुद्दा आहे? तर मुद्दा असा की तिथे एक बजेट गुहा असते. हिला बजेट म्हणण्याचे कारण असे की सहसा अशा गुहा गणेशोत्सावात देखाव्यांसाठी उभारतात. गुहेच्या तोंडाला दोन लाल डोळे (झीरोचे बल्ब) आणि चार वाकडेतिकडे सुळे लावून तिचे भीतिदायक स्वरुप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या गुहेत म्हणे एक जिन्न राहत असतो. दर महिन्याच्या चौदा तारखेला (चौदाव्या दिवशी/रात्री टू बी स्पेसिफिक) त्या गुहेतून तो हाक देत असतो. त्याने हाक दिली की या लोकांनी एक कुमारिका त्याच्यासाठी पाठवायची असते. जर तसे केले नाही तर तो या कबिल्याला नष्ट करेल. या कुमारिका परत येत नसल्याने त्यांना जिन्नने मारले असा निष्कर्ष काढला जातो. हातिम म्हणतो की हा वेडेपणा आहे. अशाने तुम्ही वर्षाला बारा निष्पाप जीवांचा बळी देता.
आता - यांना काय माहित आतमध्ये जिन्नच आहे? यांनी एकदातरी त्या जिन्नला पाहिले आहे का? बर त्या जिन्नला कुमारिकाच का हव्यात? त्याला काय माहित पाठवलेली स्त्री कुमारिका आहे का नाही? आणि समजा निर्धारित बळीला मरायचे नसेल आणि तिने विवाहबाह्य संबंधातून कौमार्यभंग केला तर? हे होऊ नये म्हणून देवकुमार आणि कंपनीकडे काय ऑप्शन्स आहेत? पुन्हा एकदा पटकथाकाराकडे असलेला क्लॅरिटीचा अभाव दिसून येतो. दुसरे म्हणजे मला कायम नवल वाटते की या गोष्टींमध्ये जेव्हा कबिला/गाव/बस्तीच्या प्रमुखाची मुलगी बळी जायची असेल नेमक्या त्याच दिवशी हिरोची एंट्री होते. हा अद्भुत चमत्कार कसा काय घडतो?

असे प्रश्न प्रेक्षकांना पडू नयेत म्हणून हातिमच्या डायलॉगचा क्यू घेऊन आतला जिन्न रेकतो - या आक्रित!! वेड्याने "या इफ्रित" असे रेकले पाहिजे कारण इफ्रित हे दुष्ट जिन्नांचे बादशहा असतात. पुन्हा शून्य क्लॅरिटी आणि निघाले अ‍ॅडाप्टेशन करायला. देवकुमार पोरीला फालतू डायलॉग मारतो - तुला नवरीचे कपडे घालून पालखीत बसवण्याऐवजी मी बळी देतो आहे, मला माफ कर. देवकुमारच्या ड्रेस विषयी जरा बोलले पाहिजे. अंगात बिबळ्याच्या कातडीचा बनलेला शर्ट आहे. प्राचीन काळी मोरोक्कोच्या आसपास बिबळे होते (बार्बेरियन बिबळे) म्हणजे हे लोक आत्ता बर्बर प्रदेशात आहेत. अंगावर चामडीचे जाकिट, खाली लुंगी. या लुंगीवर क्रेपपेपरने बनवलेले एक आवरण लपेटले आहे. डोक्याला भिल्ल स्टाईलचा मुकुट आहे, त्यात रंगीत पिसे खोवली आहेत. हातिमला त्या मुलीची दया येते. तो म्हणतो की यावेळेस बळी आम्ही देतो. इथे देवकुमार ब्राह्मण, हातिम कुंती, जिन्न बकासूर हे स्पष्ट झाल्यामुळे त्यातल्या त्यात भीम म्हणून सतीश शाहच उरतो. त्यानुसार जितेंद्र सतीश शाहच्या कानात काहीतरी कुजबुजतो.

६.२) हा जिन्न एका माठात कैद असता तर अधिक सयुक्तिक झाले असते

हताश होऊन सतीश शाह जाऊन त्या मुलीला म्हणतो की तुझे कपडे काढ. हे वाक्य आणि नामू परटाचे "बाई कापडं काढा" दोन्ही एक्झॅक्टली सेम आहेत. अनुभवी प्रेक्षकाला हे कळून चुकताच त्याला हातिमच्या कल्पनेमागची भयंकरता लक्षात येते आणि तो भयातिरेकाने किंचाळतो. याचा सतीश शाहला काहीच फरक पडत नाही. तो त्या मुलीला घेऊन जवळच्याच एका खोलीत शिरतो. भिल्ल वस्ती असली तरी घरे पक्की सिमेंटची दिसतात. त्याहूनही आश्चर्यजनकरित्या सतीश शाहला तिथला एकही भिल्ल विरोध करत नाही. त्यांना हे लोक आपल्याऐवजी बळी जात आहेत याचीच जास्त काळजी. रेकॉर्ड टाईममध्ये नझरुल वेषांतर करून बाहेर येतो. याचा सुगावा आधीच लागलेला असल्याने आता प्रेक्षक किंचाळत नाही. नझरुलने स्त्रीवेष धारण केलेला असतो. मग हातिम आणि नझरुल गुहेत शिरतात. बकासुराला गाडाभर भात लागत असतो. जिन्नला सुरईभर मद्य लागत असते. ते दोघे गुहेत शिरतात आणि भिल्ल लोक बाहेर थांबून तमाशा बघतात.

तो जिन्नही फारसा पॉवरबाज नसावा. गुहेत दोनजण शिरले आहेत आणि त्यात एकही बाई नाही (कुमारिका तर जाऊच देत) हे त्याला लक्षात येऊ नये हे जरा आश्चर्यजनक आहे. टू प्ले डेव्हिल्स अ‍ॅड्व्होकेट, जर त्याची जादू फक्त कौमार्य टेस्ट करत असेल तर याचा अर्थ हातिम आणि नझरुल दोघेही व्हर्जिन आहेत (जे अगदीच विश्वसनीय आहे). जे काही असो तो जिन्न बुद्धू आहे यात दुमत नसावे. हातिम आणि नझरुल जेव्हा त्याला उल्लू बनवतील तेव्हा प्रेक्षकाला धक्का बसू नये म्हणून असे सटल कॅरेक्टरायझेशन केले असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

गुहेत जागोजागी दगडी स्तंभ उभारले आहेत आणि त्यात अग्नी प्रज्ज्वलित केलेला आहे. त्यामुळे गुहा प्रकाशमान आहे. इतस्ततः कवट्या आणि सांगाडे पसरलेले दाखवून जिन्न या कुमारिकांना खात असल्याचे ठसवले आहे. पण गुहेत मृतदेहांचा फारसा उग्र वास येत नसावा, तसे हातिम आणि नझरुलच्या हावभावांवरून वाटत तरी नाही. थोडक्यात जिन्नला थोडीफार स्वच्छतेची आवड आहे पण त्याला हाडे पचवता येत नाहीत. असा हा सर्वशक्तिमान जिन्न गुहेत मधोमध एका चौथर्‍यावर बसलेला आहे. अदमासे वीस-बावीस फूट उंच असा जिन्न उघडा बसलेला आहे. थोडक्यात गुहेत बराच उकाडा असावा. कंबरेला व्याघ्राजिन गुंडाळले आहे. जिन्न लोकांना कंपल्सरी असलेली दाढी राखलेली आहे. मिशा थोडा मंगोल पद्धतीच्या आहेत तर कडेचे केस आणि मध्येच एक पुंजका सोडला तर टक्कल आहे. जिन्न लोकांना कंपल्सरी असल्याने शेंडी राखली आहे. हातात नजरेत भरेल अशी अंगठी आहे. अंगठी नजरेत भरते कारण ती त्याच्या मापाची नाही. हा पुढच्या सीनचा सेटअप आहे.

नझरुल दारू घेऊन त्याच्याकडे जातो. जिन्न नुकताच झोपेतून उठला असल्याने आळोखे पिळोखे देत असतो. यावेळेस जाडजूड पोरगी पाठवल्याने जिन्न खूष होतो. क्लॅरिटी नसल्याने तो माणसे मागवायची सोडून नाजूक कुमारिका मागवत बसला. कसे काय त्याला धष्टपुष्ट बळी मिळणार? बरं आजूबाजूला मानवी कवट्या आणि हाडे दिसत असताना सुद्धा धादांत खोटे बोलतो तो - मी हाडे सुद्धा चावून पचवतो. मग त्या कवट्या काय इंटिरिअर डिझाईनरने आणून ठेवल्या? जिन्न म्हणतो की आता मला दारू पाज. एवढ्याशा सुरईतून हा काय दारू पिणार असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण जेव्हा सतीश शाह त्याला दारू भांड्यात ओतून देतो तेव्हा तो जादूने ते भांडे एनलार्ज करून घेतो. मग ते भांडे आगीत भिरकावून देतो. हा क्रम नव्या भांड्यासह रिपीट. भांड्यांची केवढी ती नासाडी.

जिन्नची कॅपॅसिटी फार नसावी. तीन पेगमध्ये त्याला चढते. मग तो म्हणतो की आता जरा नाचगाणे करून माझे मनोरंजन कर. मग सतीश शाहचा "जिन्न विन्न भूत वूत मैं क्या जानूं रे" अशा अतिशय ओरिजिनल गाण्यावर डान्स होतो. इंटरेस्टिंगली दर दोन सेकंदानंतर सतीश शाह जितेंद्रकडे बघून आता काय करू विचारत राहतो तरी जिन्नला गुहेत आणखी कोण आहे अशी शंका येत नाही. तो शिळोप्याच्या गोष्टी चालू ठेवतो. नझरुल म्हणतो की मला खाण्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दे. जिन्न म्हणतो ओके. तो विचारतो की तू इथे कसा काय आलास? जवळ एक काचेची बाटली असते. जिन्न तिच्याकडे बोट दाखवून म्हणतो की मी या बाटलीत कैद होतो. मग कोणीतरी मला सोडवले. आता मला भूक लागली तर मी तुला (आणि इतर भिल्लांना) खाणार. नझरुल "काय फेकतो" अशा चेहरा करताच जिन्नला राग येतो. जिन्नची सुद्धा काही डिग्निटी आहे का नाही. तो म्हणतो थांब तुला दाखवतोच. असे म्हणून तो हातातली अंगठी काढून नझरुलला देतो. म्हणतो की ही अंगठी घासलीस की मी परत बाटली बाहेर येईन. मग व्हायचे ते होते - जिन्न बाटलीत शिरतो, हे लोक बाटलीत बूच लावून त्याला कैद करतात. जिन्नकडे हात चोळत बसण्याशिवाय काही पर्याय राहत नाही.

६.३) गाण्याचा नीट सेटअप केला नसेल तर ते तांदळ्यातल्या खड्यासारखे लागते

मग हे बाहेर येऊन मोठमोठ्याने भिल्लांना सांगतात की आम्ही जिन्नला बाटलीत कैद केले. इथे देवकुमारची मुलगी नीट बघावयास मिळते. तिला बघते हिचे कपडे सतीश शाहला कसे काय मापात आले असा प्रश्न पडू शकतो. असे होऊ नये म्हणून सतीश शाह धांदरटपणाने बाटली जमिनीवर पाडतो. बाटली फुटते, जिन्न बाहेर येतो. जिन्न नुसता हसतो तर हे लोक सैरावैरा धावत सुटतात. हातिम येऊन त्या सर्वांना शांत करतो. जिन्नची अंगठी हातिमकडे असल्याने तो आता हातिमचा गुलाम असतो. हातिम त्याला आदेश देतो की इथून पुढे तू इंसानी कुर्बानी मागणार नाहीस. तसेच तो त्याला ही बस्ती सोडून जायचा आदेशही देतो. जिन्न त्यानुसार तिथून निघून जातो.

हा आनंद साजरा झालाच पाहिजे म्हणून लगेच गाणे सुरू होते. गाणे आहे - आये हाये, ओये होये, दे दू तुझे दिल का नजराना, रुक जा कोई करके बहाना. गायिका आहेत - कविता कृष्णमूर्ती आणि अलका याज्ञिक. हातिम देवकुमार शेजारी बसला आहे, सतीश शाह (अजूनही स्त्रीवेषात) उभा राहून जागच्या जागी ठेका देतो आहे. समोर भिल्ल कन्यका आपली नृत्यकला दाखवत आहेत. या भिल्ल असल्यामुळे त्यांना घागरा चोळी घालायला दिली आहे. मध्ये त्या जितेंद्र आणि सतीशला नाचायला ओढून घेतात. या सिनेमात जितेंद्र नाचणार नाही असे कलम असल्यामुळे त्याच्या नाचाला साजेसे गाणे असूनही तो ढिम्म एका कोपर्‍यात मंद हसत उभा राहतो. आणि त्याच्यासाठी सतीश शाह आणि भिल्लीणी नितंब उडवत नाचतात. मग हे लोक फुगड्या खेळू लागतात. जितेंद्र दांडिया स्पर्धांचे जज फिरत असतात तसा मधून मधून गस्त घालतो. हा प्रकार एक पाच मिनिटे चालतो. तसा सुसह्य प्रकार असला तरी हे गाणे स्किप केले असते तरी काही फरक पडला नसता.

हे सगळे झाल्यानंतर देवकुमारला अखेर हे लोक कोण आहेत याची चौकशी करावीशी वाटते. ओळख पाळख होते आणि नझरुल देवकुमारच्या मुलीला मागणी घालतो. देवकुमारही आनंदाने होकार देतो. हातिम म्हणतो की चला आता आम्ही निघतो, आम्हाला कोह-ए-निदा शोधयचा आहे. देवकुमार पंजाबी अ‍ॅक्सेंटमध्ये म्हणतो की ती गुहाच तर "कोयेनिदा" आहे. नझरुल म्हणतो की अरे व्वा, मला बायको आणि तुला प्रश्नाचे उत्तर मिळाले. नझरुलचे चित्कारणे प्रश्न सुटण्याचा ट्रिगर असल्याने लगेच तशी लक्षणे दिसू लागतात. फळ्यावरचा पाचवा प्रश्न पुसला जातो. इथून पुढचे पूर्ववत होणारे भाग कंबरेखालचे असल्याने तो शॉट काही दिसत नाही. त्याऐवजी मरियम गुलनारला येऊन मिठी मारते. पुन्हा एकदा हातिमचा "खुदा का नेक बंदा" असा उद्धार होतो आणि सिनेमा पुढे चालू राहतो. शेवटचे दोन प्रश्न बाकी आहेत आणि अजूनही मुख्य व्हिलनविषयी आपल्याला काहीही माहिती नाही. पुढच्या प्रश्नात त्याच्याविषयी काही कळेल का?

<<<कोह-ए-निदा म्हणजे हाक देणारा पर्वत अर्थात बोलता पर्वत. >>>
<<<हे तिलिस्म फारच एपिक असल्यामुळे अर्थातच पटकथेत याला फारच टेम पर्याय दिला आहे...>>>

बापरे... कुठे बोलता पर्वत आणि कुठे रेकती गुहा??? ठोकळा (सतीश शाह) देऊन 'कोह'ळा काढलाय का? Lol
बाकी भन्नाट चीरफाड चालू द्या... शेवटच्या दोन प्रश्नांबद्दलच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत Happy

मस्तच!
सिनेमात जितेंद्र आजिबातच नाचला नाहीये? म्हणजे कमालच आहे. Happy

एकदम भन्नाट विडंबन कम परीक्षण, मजा आली, जाम हसलो वाचून.... हतीमताई सारखा महान एपिक मूवी ऑलरेडी बघितला असल्याने पुढे अजून काय धुमाकूळ घालशील याची उत्सुकता आहे!
टीप- अशीच चिरफाड धरम-वीर मूवी ची पण होऊन जाऊदे.

Pages