जत्रा ( एक भयकथा )

Submitted by शुभम् on 1 May, 2018 - 10:17

1 PicsArt_05-01-06.53.19.jpg- ऑर्केस्ट्रा ला जायला उशीर झाला.

काटेवाडी गावाला जत्रेची परंपरा जुनीच . फार वर्षापासून ही जत्रा होते . चार दिवस जत्रा चालते गावातील सर्व लोक तेथे जातात . गावातीलच नाही तर आजुबाजुच्या गावाचे तालुक्याचे सारेच लोक येथे येतात त्यामुळे जत्रा गर्दीत होते . जत्रेत वेगवेगळी दुकाने थाटली जातात उंच उंच पाळणे छोट्या छोट्या रेल्वे गाड्या तसेच लहान मुलांना आकर्षित करणारे वेगवेगळे घटक असतात. वेगवेगळ्या नाश्त्याची , ज्यूसची , प्रसादाची , चिरमूऱ्याची , धार्मिक पुस्तकांची नि कशाकशाची दुकाने जत्रेत लागतात . चार दिवस चालणाऱ्या या जत्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तमाशा ऑर्केस्ट्रा कुस्त्या आणि काय काय …..। मागच्या पाच सहा वर्षापासून पहिल्या दिवशी कुस्त्यांचे जंगी मैदान होते , दुसऱ्या दिवशी तमाशा होतो, तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा होतो , नि शेवटच्या दिवशी गाव-जेवन असते . या जत्रेच्या बहुरंगी कार्यक्रमात लोक आपले सुख दुःख विसरून आनंदाने सामील होतात . जत्रेतील सगळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी असाते मात्र खासकरून तमाशाला नि ऑर्केस्ट्राला जास्तच गर्दी असायची . लोक दोन-दोन तास आधी येऊन बसायचे पुढे बसण्यासाठी लोकांची भांडणे व्हायची .
आज ऑर्केस्ट्राचा दिवस होता आणि गण्या मन्या राम्या यशा आणि आबा राम्याच्या घरची मका करायला व्यस्त होते. मिशन वाल्याने उशीर केल्याने त्यांना ऑर्केस्ट्राला जायला उशीर होणार होता .
“ आईला राम्या तुला दुसरा दिवस घावला नाही का मका करायला “ मन्या वैतागून म्हणाला
“ नाहीतर काय आता कुठली मिळते आपल्याला पुढे जागा ” आबा मन्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला
“ असुद्या रे घ्या संभाळून आपलाच मित्र आहे तो त्याला मदत करायची नाही तर कोणाला मदत करायची ” गन्या राम्याची बाजू घेत सगळ्यांना म्हणाला . “ झाल आता ही शेवटचं पोतं टाकू या आणि पाच मिनिटात सगळं आवरून पारावर भेटूया “
काटेवाडी गावची दीड-दोन हजार लोकसंख्या असली तर निम्म्या लोकांहोऊन अधिक लोक वाड्या वस्त्यावरती राहायचे. हे पाच मित्र ही काटे वस्ती वरती रहायचे . गावापासून दूर दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणारी काटे वस्ती आणि तेथील हे पाच मित्र आज रात्री भलत्याच संकटात अडकणार होते . काटे वस्ती वरून गावात जायला तशी एकच वाट त्याच वाटेने लोकांची ये-जा चालायची मात्र त्या वाटेने चालत जायला अर्धा ते पाऊण तास लागायचा . या वाटेमुळे दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणारे गाव तीन ते साडेतीन किमी व्हायचे . तशी दुसरी एक वाट होती पण ती वाट दिवसा वापरायलाही लोक भ्यायचे त्या वाटेचे नाव होते पाद्र्याची वाट . पाद्र्याच्या वाटेबद्दल बऱ्याच अख्यायिका प्रसिद्ध होत्या . या आख्यायिका गावात फक्त दिवसाच आवडीने चगळल्या जायच्या मात्र कोणीही पट्टा त्या वाटेने जायला तयार नसायचा . गावातील प्रत्येकाचे स्पष्ट मत होते की त्या वाटेवर पाद्र्याचे भूत आहे . कोणी कोणी ते भूत पाहिले होते तर कोणी कोणी त्या भूताला अमावस्येच्या रात्री कंदील घेऊन फिरताना पाहिले होते . कोणी कोणी तर चक्क भुताचा आवाज हि ऐकला होता तो पादरी इंग्रजी माणूस असल्याने तो इंग्रजीत बोलत असणार हे साऱ्यांनी गृहीत धरून भूत हे इंग्रजी बोलत होते इंग्रजी गाणे म्हणत होते असे गावात पसरवले होते .

ठरल्याप्रमाणे पाचच मिनिटात आवरून गाण्या पारावर पोहोचला . बघतो तर अजून कोणच आले नव्हते त्यामुळे तो जाम वैतागला तो मन्याला हाक मारायला जाणार तेवढ्यात त्याला मन्या येताना दिसला .
“ आईला मन्या आधीच उशीर झाला आहे आणि हे अजून आले नाहीत आपल्या आपणच जायचं का का बोलवायला जाऊया त्यांना “ गाण्या मन्याला म्हणाला तेवढ्यातच उरलेले तिघे त्याला येताना दिसले त्यांना दोन चार शिव्या देऊन वक्तशीरपणाचे लेक्चर गण्याने उरकून टाकले
अगोदरच उशीर झाला असल्यामुळे गण्या म्हणाला की आता आपण पाद्र्याच्या वाटेने गावाकडे जायचे.
राम्या आणि मन्या तयार झाले मात्र यशा आणि आबा घाबरून लांबच्या वाटेने जाऊया असं कळकळीने गन्या राम्या आणि मन्याला सांगू लागले . गन्याला मागं बसनं अजिबात पसंत नव्हतं म्हणून जवळच्या वाटेने पटकन जाऊया असं त्याचं म्हणणं होतं . त्यावेळी आबाने पद्र्याच्या भुताची आठवण करून दिली त्याच बरोबर कंदील घेऊन फिरणाऱ्या पांडबाची भीतीसुद्धा आबाने गाण्याला दाखवली मात्र गन्या त्यांना घाबरणाऱ्यातला नव्हता . “ भागुबायांनो तुम्ही जावा लांबच्या वाटेने पण आम्ही पाद्र्याच्याच वाटंन जाणार “ असा टोला मारून गन्या राम्या आणि मन्या पाद्र्याच्या वाटेने निघाले .

या पाद्र्याची नि पाटलाच्या पोरी ची चमत्कारिक प्रेम कथा ही गावात फारच प्रसिद्ध होती . साधारणपणे सांगितलं जायची की ६० - ७० वर्षापूर्वीच्या काळात हे लफडं ( गाववाल्यांच्या भाषेत ) झालं .
पूर्वीच्या काळी ख्रिश्चन लोक धर्मप्रसारासाठी गावोगावी जात असत त्यासाठीच पाद्री गावात आला होता आणि त्याने ख्रिश्चन धर्म प्रसार सुरू केला होता . गावाच्या पाटलाची पोरगी की मुंबईला शिकून आलेली त्यामुळे बऱ्याच पुढारलेल्या विचारांची होती . तिचं नाव शेवंता होतं . शेवंता जर रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायची. चर्च म्हणजे काही फार प्रशस्त व मोठा नव्हता . तिथल्या तिथे प्रार्थनेसाठी म्हणून छोटासा चर्च पाद्रीने बांधून घेतला होता . एरवीही वेळ मिळेल तेव्हा ती त्याला भेटायला जायची . चर्चमध्ये प्रार्थनेसाठी फार थोडे लोक जमायचे मात्र काही गोष्टी गावभर पसरावयच्यख असल्या तरी जास्त लोकांची गरज लागत नाही . जंगलात वनवा जसा पसरत असतो तशा या गोष्टी आगीसारख्या भरभर पसरत जातात . शेवंताच्या आणि पाद्रीच्या बाबतीत असेच झाले. लोक शेवंता च्या बाबतीत नाही नाही त्या गोष्टी बोलू लागले .
“ सर्वांदेखत पाद्री शेवंताच्या हाताचे मुके घेतोय असे मग सगळ्यांच्या डोळ्यामागं काय काय होत असेल देव जाणे “ लोक म्हणायचे . गावाला चगळायला एक चवदार विषय मिळाला होता . काही झालं तरी शेवंता पाटलाची पोरगी होती , मागं कोणीही कितीही वाईट वंगाळ बोललं तरी पाटलांसमोर बोलायची हिम्मत कुणाची नव्हती . मात्र अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाही एक दिवस ही गोष्ट पाटलाला कळालीच . तेव्हापासून म्हणे पाटलाने शेवंताला पाद्रीला भेटायची मनाई केली . पाद्रीलाही चांगलाच चोप दिला . मात्र शेवंताला हे सारं सहन न झाल्यामुळे तिनं चर्चा पुढे जाऊन फास घेतला.
पोरीन फास घेतल्यामुळे पाटील चांगलाच पिसाळला त्याने पाद्रीचा चर्चमध्येच खून घडवून आणला सारा गाव जो या लफड्याला नावं ठेवत होता तोच या दोघांसाठी हळहळून रडू लागला . पाटलाच्या नावानं खडे फोडू लागला . त्याला शिव्या घालू लागला . शेवंता आणि पाद्रीच्या प्रेमाला लैला-मजनू , हीर-रांझा, बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमाच्या उपमा देऊ लागला पाटील यांच्या दृष्टीने खलनायक झाला . पाटील खलनायक झाला खरा मात्र याच खलनायकाचा पाद्र्याच्या भुताने भयानक अंत केला . लोक म्हणू लागले पाटलाला चांगला धडा मिळाला मात्र त्याच बरोबर त्या वाटेवर जायलाही भिऊ लागले
या साऱ्या गोष्टींमुळे ज्या बाजूला छोटखाना चर्च होता त्या बाजूच्या या वाटेला पाद्र्याची वाट असे नाव पडले . आणि त्याच वाटेवरून गन्या मन्या आणि राम्या जायला निघाले होते.
क्रमशः ......।

पुढील भाग .....
https://www.maayboli.com/node/66048

PicsArt_05-01-06.53.19.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाद्री-शेवंता लवस्टोरी......
जरी सध्या पहिल्या भागात ही ही लव्हस्टोरी वाटत नसली तरी तिसऱ्या भागात सविस्तरपणे येईल