शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

Submitted by shantanu paranjpe on 18 April, 2018 - 06:20

रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.

केवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही इंग्रजांनी लिहिलेले आहेत. मात्र या पुराव्यांमधून केवळ २ प्रकारची माहिती पुढे येते. एक म्हणजे ज्वर झाला होता अशी जी बहुतांश पुरावे थोड्या फार फरकाने सांगतात आणि दुसरी म्हणजे विषप्रयोग झाला अशी. यांमुळे या सर्व पुराव्यांची चिकित्सा करणे हे फार महत्वाचे ठरते. आपण प्रथम एका खाली एक लिखित पुरावे काय सांगतात ते पाहू म्हणजे त्यानंतर आपल्याला निष्कर्ष काढणे सोपे जाईल.

१. सभासद बखर-

कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या सल्लागाराने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहिली. हा सभासद महाराजांच्या पदरीच कामाला असल्याने त्याने लिहिलेल्या बखारीची विश्वासार्हता ही इतर अनेक बखरीपेक्षा कैक पटीने जास्त आणि सर्वमान्य आहे. सभासद असे सांगतो की, “मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले.”

सभासद पुढे कुणा कुणाला बोलावले त्या माणसांची नावे सुद्धा देतो. ” बितपशील- कारकून - निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत [हे] जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिस हुजरे लोक - हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ.” या सर्व जाणत्या माणसांना राजांनी काही उपदेश केला, “त्यास सांगितले की आपली आयुष्याची अवधी जाली. आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळियावरि संभाजी राजे वडील पुत्र यांस सांगितले [होते] की 'तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो. आणि उभयता सुखरूप राहणे. म्हणोन सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजी राजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदानसमय दिसताहे.” राजांचे अंत्यसंस्कार हे पुढे राजाराम महाराजांनी केले असा उल्लेख सभासद करतो.

२. याशिवाय इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात सुद्धा राजांच्या मृत्यूबद्दल मृत्यूबद्दल माहिती मिळते. इंगलीश रेकॉर्ड्स मधील २८ एप्रिल १६८० रोजीचे हे पत्र, हे पत्र समकालीन आहे.

“Wee have certaine news that Sevajee Rajah is dead. It is now 23 days since he deceased, it's said of a bloody flux, being sick 12 days. How affaires goes in his country wee shall advise as comes to our knowledge. At present all is quiett, and Sombajee Rajah is at Pornollah.”

३. जेधे शकावली-

जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली. एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते. त्यात लिहिले आहे,

“शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला”

४. मराठ्यांची बखर- ग्रांड डफ, मराठी अनुवाद डेव्हिड केपन

डफने ही बखर अनेक पत्रांचा आधार घेऊन लिहिली असल्याने अनेक जण याचा संदर्भ ,म्हणून वापर करतात परंतु ही तितकी विश्वासार्ह नाही. डफ म्हणतो,

“यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला. तो प्रकार असा, शिवाजी रायगडी असतां त्याला गुढघी म्हणून रोग झाला. तो प्रतिदिवशी वृध्धींगत होत चालला. मग त्याच्या योगेकारून मोठा ज्वर झाला. ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.”

५. श्रीमंत महाराज भोसले (शेडगांवकर) यांची बखर- मराठी रुमाल भाग १

“शके १६०२रौद्रनाम संवत्सरे फसली सन १०९० राज शके ७ या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते.तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथा ज्वराची जाहाली,ते समई महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते याणी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहाली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणिले.”

६. ९१ कलमी बखर (भारतवर्ष)-

वाकसकर यांनी छापलेल्या या बखरीचा सुद्धा एक महत्वपूर्ण साधन म्हणून उपयोग केला जातो. त्यात लिहिले आहे की,
““नंतर राजे स्वामीस नवज्वर प्राप्त झाला. शके १६०२ रुद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा, राजेस्वमी कैलासवासी झाले. सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला.”

७. Storia Do Mogor (असे होते मोगल-मराठी अनुवाद,ज.स. चौबळ)

निकोलाओ मनुची हा इटालीयन प्रवाशी होता. त्याने आपल्या पुस्तकात शिवाजी राजांची तसेच संभाजी राजांची व त्यांच्या कारकीर्दिची टिपणे काढून ठेवली आहेत. तो म्हणतो,

“तो(शिवाजी)सारखा मोहिमेवर चहुकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन १६७९ मध्ये मरण पावला.”

८. मासिरे आलमगिरी-

साकी मुस्तैदखान हा मनुष्य औरंगजेबाच्या पदरी होता. त्याने मासिरे अलामगिरी हा ग्रंथ लिहिला. त्यात तो म्हणतो की,

“आमदानीचे २३वे वर्ष १०९१ हि.(मे १६८०) घोड्यावरून रपेट करून आल्यावर त्याला(शिवाजीला) उष्णतेमुळे दोनदा रक्ताची उलटी झाली”

९. शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २,लेखांक-२२८६,डाग रजिस्टर १६८०

ज्या डाग रजिस्टर मधील संदर्भ देऊन विषप्रयोग केला असा आरोप केला जातो तिथे विषप्रयोगाचा उल्लेख जरूर आहे परंतु तो सोयराबाई यांनी केला असा उल्लेख आहे.
“गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे की, शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून (म्हणजे सोयराबाई यांच्याकडून) विषप्रयोग झाला असावा”

१०. तारीखे शिवाजी (सर जदुनाथ सरकार प्रकाशित, अनुवाद वि. स. वाकसकर (९१ कलमी बखर) –

“as the maharajah's destined period of life had come to its end the queen's heart changed and she did an act (poisoning ?) Which made Shivaji give up his life”

११. History of Aurangzib (Vol. IV, Ssouthern India 1645-1689) -Jadunath Sarkar

सर जदुनाथ सरकार यांनी केलेला उल्लेख हा इंग्रजांच्या पत्रावरूनच केलेला दिसून येतो.

“On 23rd. of March 1680,the Rajah was seized with fever and blood dysentery. The illness continued for twelve days. Gradually all hopes of recovery faded away, and then after giving solemn charges and wise counsels to his nobles and officers ....the maker of Maratha nation performed the last rites of his religion and then fell into trance, which imperceptibly passed into death.”

आता या सर्व उल्लेखांमधून निष्कर्ष काय निघतात ते पाहू,

१. वर दिलेल्या ९ संदर्भांपैकी ८ संदर्भ हे सांगतात की राजांचा मृत्यू हा आजारी पडूनच झाला होता. अर्थात नेमक्या कोणत्या आजाराने याबद्दलच्या तपशिलात फराज जाणवतो हे नक्की. परंतु त्यावेळी असलेले वैद्यकीय ज्ञान आणि दळणवळणाची साधने लक्षात घेता हा फरक होणे साहजिक आहे. दळणवळणाची साधने यासाठी की महाराष्ट्रात असणाऱ्या तत्कालीन परदेशी व्यापारांची पत्रे पहिली तर असे लक्षात येते की मृत्यू झाला का नाही याच्या बद्दलच त्यांच्या मनात शंका होती. जे इच्छूक आहेत त्यानी शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मध्ये लेखांक २२४९ ते २२५३,२२५८ ते २२६१ ,२२७५,२२८१,२२८६,२३०२,२३०७ इत्यादी पत्रे जरूर वाचावी.

२. अनेक जण हा मृत्यू विष पाजल्यामुळे झाला असा बिनपुरावी आरोप करतात आणि त्याचे खापर अष्टप्रधान मंडळातील लोकांवर करतात. यासाठी पुरावा म्हणून ते डाग रजिस्टरचा उल्लेख करतात. आता वर त्या पत्रातील उल्लेख आहे. ते पत्र सांगते की विषप्रयोग हा सोयराबाई यांनी केला. अर्थात हा तपशील सुद्धा चूकच आहे. कारण एक तर ही बातमी गोवळकोंडा येथून आली होती त्यामुळे तिची विश्वासार्हता किती असेल याबद्दल शंकाच आहे आणि दुसरे म्हणजे इतर कोणतीही साधने विष पाजल्याचा उल्लेख करत नाहीत. उलट ते हेच सांगतात की राजांनी मृत्यूशय्येवर असताना जाणत्या लोकांना बोलावून घेतले आणि चार उपदेशाचे शब्द सांगितले. यासाठी संदर्भ म्हणून सभासद बखर,चिटणीस बखर,९१ कलमी बखर व भोसले घराण्याची बखर इत्यादी पाहू शकता.

३. तिसरा आरोप असा केला जातो की विषप्रयोग केला म्हणून संभाजी राजांनी अष्टप्रधान मंडळातील काही लोकांना जीवे मारण्याची शिक्षा दिली. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की संभाजी राजांनी जानेवारी १६८० मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. यावेळी अष्टप्रधानात त्यांनी जुन्या सर्व लोकांना जागा दिली होती. पुढे अण्णाजी दत्तो आणि काही लोकांनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला म्हणून त्यांना मृत्युदंड सुनावला. त्यामुळे जर शिवाजी राजांना विषप्रयोग झाला असता तर राजांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजी राजांनी या सर्वांना देहदंड लगेचच का नाही सुनावला आणि त्यावर कडी म्हणजे अष्टप्रधान मंडळात पुन्हा सर्वांना का जागा दिली हा प्रश्न पुढे उभा राहतोच.

४. भोसले बखर तसेच सभासद बखर यांमध्ये तर यादीच आहे की राजांच्या अंत्यसमयी कोण कोण उपस्थित होते अशी. ती वाचल्यावर दिसून येते की मोरोपंत, हंबीरराव मोहिते, अण्णाजीपंत दत्तो हे सर्व जण रायगडाच्या बाहेर होते. मृत्यूची वार्ता समजल्यानंतर ते रायगडी आले. अष्टप्रधान मंडळात ही तीन महत्वाची माणसे होती तीच अंतसमयी किल्ल्याच्या बाहेर स्वारीवर होती. त्यामुळे कट झाला असल्यास कधी झाला आणि कुणी केला हा एक प्रश्न पुढे उभा राहतो.

५. सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून लिहिली असा उल्लेख तो करतो. आता महाराजांचे जेव्हा निधन पावले तेव्हा राजाराम महाराज रायगडावरच होते त्यामुळे सभासदाने लिहिलेले जर चूक असते तर मग राजाराम महाराजांनी त्याला विरोध नक्की केला असता.

६. याव्यतिरिक्त सुद्धा अनेक पत्रे तसेच लेखक या घटनेचा उल्लेख त्यांच्या लिखाणात करतात. मात्र विस्तार भयास्तव ती सर्व साधने इथे देणे शक्य नाही परंतु जे जिज्ञासू आहेत त्यांनी ‘History of Sevagi and his successor, recent Conquerors in India by Father Pierre Joseph d'Orleans’, शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मधील वर उल्लेख केलेली पत्रे, चिटणीस बखर, तारीखे शिवाजी, मराठी साम्राज्याची छोटी बखर, इत्यादी ऐतिहासिक पुरावे वाचूनच निष्कर्ष काढावा.

७. छत्रपती शिवाजी राजांचा मूत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे हे खरी आणि अशा घटनेवरून राजकारण केले जात आहे ही हे तर अतिशय धक्कादायक आहे. वर नमूद केलेल्या सर्व साधनांचा आणि पुराव्यांचा विचार करता हेच कळून येते की राजांचा मृत्यू हा अति थकव्यामुळे आजार होऊन झाला होता. त्यामुळे सोयराबाई यांनी विषप्रयोग केला किंवा अष्टप्रधान मंडळातील लोकांनी त्यांना मारले या बाजारगप्पांना काही अर्थ उरत नाही हेच खरे.

बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ आहात त्यामुळे आपण पुरावे वाचून निष्कर्ष काढाल असे वाटते.

संदर्भ साधने-

१. एक्याण्णव कलमी बखर-वि.स.वाकसकर
२. सभासद बखर- कृष्णाजी अनंत सभासद
३. मराठी दप्तर,रूमाल पहिला(श्रीमंत महाराज भोसले यांची बखर)-वि.ल.भावे
४. जेधे शकावली
५. शिवकालीन पत्रसारसंग्रह
६. English records on Shivaji
७. History of Aurangzeb (vol. IV, southern India 1645-1689) -Sir Jadunath Sarkar
८. History of the Marathas-Grant Duff (मराठी अनुवाद- कॅ.डेव्हीड केपन साहेब)
९. Storia Do Mogor or Mogul India-Niccolao Manucci
१०. मासिरे आलमगिरी – साकी मुस्तैदखान

© 2017 www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शन्तनू , खूपच अभ्यासपुर्ण लेख

क्रुपया राजकारण करू नये धाग्यावर
अजून काही अभ्यासपुर्ण माहिती असेल तर नक्किच येऊ द्यावीत सर्व्वानी

________________/\_____________________

सोयराबाईंनी महराजांना विषप्रयोग केलेलं दाखवलंय.>>>>. अस डायरेक्ट दाखवल आहे का मालिकेत ???? मला शंका वाटतेय.
त्यांच्या माहेरहुन आलेल्या स्वंयपाकाने केलेल्या विषप्रयोग झाला आहे न.मी एखादा एपिसोड मिसला की काय ???

बहुतेक Typhoid वगैरे झाला असावा!! कारण अनेक ठिकाणी विषमज्वर म्हणाले आहे!! गुडघी रोगाला सध्याच्या भाषेत तापच म्हणतात!! Influenza म्हणजे गुडघी रोग!!

मालिका हे इतिहास अभ्यासाचे साधन नाही त्यामुळे मालिकेतील प्रत्येक गोष्ट खरी असेलच असे नाही!! ऐतिहासिक साधनामधुनच आपल्याला खरा इतिहास समजतो त्यामुळे तीच वाचावीत केवळ!! हल्ली छत्रपती संभाजी राजांच्या मालिकेतून सुद्धा इतिहासाचा विपर्यास होत आहे!! त्यामुळे मनोरंजन म्हणून ठीक आहे पण तो इतिहास नाही!! मालिका आणि कादंबरी यांच्यात अतिशयोक्तीचा भाग जास्त असतो त्यामुळे खरा इतिहास कळेलच असे नाही!!

अहो, आजकाल मालिका, सिनेमे हेच लोकांना खरे वाटतात. पुस्तके कोण वाचतो? त्यातून जुनी? छे:! भाषा पण कळत नाही.
सिनेमातले अकबर, जोधाबाई, बाजीराव, मस्तानी हे कसे आपल्याला समजेल अश्या भाषेत बोलतात.

खर आहे!! बाजीराव मस्तानी मध्ये काशीबाईना अगदी जोरात नाचताना दाखवले आहे!! वास्तविक त्यांना पायाचे दुखणे होते!! एक वेळ मस्तानी नाचताना दाखवली तर ते समजू शकतो!!

तुम्ही पूर्णविराम वापरण्याऐवजी दोन उद्गारचिन्हे का वापरता!! याला काही ऐतिहासिक कारण आहे का!!

कारण इतिहासात कोणी स्टेटमेंट करत नाही, सगळे "उद्गगारतात" Happy
हलके घ्या हो शंतनुराव
लेखाची मांडणी सुसूत्र, आणि कँटेंट पटणारा
संभाजी सीरिअल मध्ये विषप्रयोग दाखवला जात असतानाच हा लेख यावा हा योगायोग की अजून काही.?

मला स्वतःला 350 400 वर्षांपूर्वी कोणत्या जाती, धर्माने काय केले/किंवा केले नाही यावरून आज त्यांच्याबाबत धोरण ठरवणे पटत नाही.(जर ते आजही कॅन्टीनयू होत नसेल तर)

>>मला स्वतःला 350 400 वर्षांपूर्वी कोणत्या जाती, धर्माने काय केले/किंवा केले नाही यावरून आज त्यांच्याबाबत धोरण ठरवणे पटत नाही.(जर ते आजही कॅन्टीनयू होत नसेल तर)>> सहमत.
मुळात इतक्या वर्षांपूर्वी जे झालं ते आता उकरुन काढण्यात काय हशील?

जोपर्यंत टाईम मशीनचा शोध लागत नाही आणि न्यूट्रल विचारसरणीचे व्यक्ती त्याक्षणी त्याठिकाणी उपस्थित रहात नाहीत तोपर्यंत 'खरा' इतिहास कधीच कळणार नाही.

मुळात आपल्याकडे कुठल्हीनोंद घेण्याची पद्धत नव्हती.जश बखरी लिहिल्या जात त्याप्रमाणे अद्ययावत नोंदी आपल्या इतिहासात नाही.बखरींमधे डवेउजवे असेलही.तरी बर्‍याच गोष्टी नेमक्या नोंदविल्या जात.
पानिपतच्या पराभवाचे वर्णनच "लाखो मोत्यें गळाली"वगैरे अलंकारिक भाषेत केले आहे.नेमके किती मृत झाले माहित नाही.

कारण इतिहासात कोणी स्टेटमेंट करत नाही, सगळे "उद्गगारतात" >>> Lol

(बाय द वे सिम्बा, नक्की कोणत्या शंतनूरावांना उद्देशून ते लिहीलेस? Wink )

लेखाची मांडणी सुसूत्र, आणि कँटेंट पटणारा >>> सहमत. बरेच वेगवेगळे सोर्सेस वापरले आहेत हे ही आवडले. नाहीतर आजच एका फेबु ग्रूप मधे श्रीमान योगी मधल्या कसल्यातरी गोष्टीचा उल्लेख करून "ही परिकल्पना नव्हे, खराखुरा इतिहास आहे" असे उद्गारलेले दिसले Happy

जोपर्यंत टाईम मशीनचा शोध लागत नाही आणि न्यूट्रल विचारसरणीचे व्यक्ती त्याक्षणी त्याठिकाणी उपस्थित रहात नाहीत तोपर्यंत 'खरा' इतिहास कधीच कळणार नाही. >>>>>

त्याची सुद्धा गरज नाही अहो. कारण आपल्याकडे अनेक समकालीन पत्र उपलब्ध आहेत. फक्त पुण्यातील पेशवे दफ्तर घ्यायचे म्हणले तर तिथे ३-३.५ कोटी पत्र आहेत!

पूर्वीच्या काळी जसे राजवाडे, सरदेसाई, खरे यांच्यासारखी माणसे होऊन गेली तशी आत्ता सुद्धा व्हायला हवीत इतकेच.

तुम्ही पूर्णविराम वापरण्याऐवजी दोन उद्गारचिन्हे का वापरता!! याला काही ऐतिहासिक कारण आहे का!! >>>>>

सवय झाली आहे अहो. अर्थात पुस्तकात आणि वर्तमानपत्रात लेख लिहिताना नाही वापरत पण ब्लॉगवर वगैरे लिहिताना वापरले जातात.. आपला इतिहास हा विस्मयकारक आहे म्हणून असेल कदाचित.

संभाजी सीरिअल मध्ये विषप्रयोग दाखवला जात असतानाच हा लेख यावा हा योगायोग की अजून काही.?>>>

मी संभाजी सिरीयल नाही बघत. हा लेख बराच आधी लिहिला होता. पण आत्ता सिरीयल मध्ये हेच दाखवत असतील तर माझे म्हणणे आहे की हा लेख शेअर करा.. अगदी नाव काढून शेअर केलात तरी चालेल.

मला स्वतःला 350 400 वर्षांपूर्वी कोणत्या जाती, धर्माने काय केले/किंवा केले नाही यावरून आज त्यांच्याबाबत धोरण ठरवणे पटत नाही.(जर ते आजही कॅन्टीनयू होत नसेल तर)>>

अगदी बरोबर! पूर्वीच्याकाळी खोपड्यानी काही चुकीचे केले म्हणून त्यांच्या आत्ताच्या वंशजांचा तिरस्कार करणे हे अत्यंत चूक आहे. आपल्याकडे दुर्दैवाने दोन्ही होताना दिसते. पूर्वजांनी पराक्रम गाजवला म्हणून आत्ताचे त्यांचे वंशज स्वतःला राजे-महाराजे म्हणवत फिरतात आणि काहींच्या पूर्वजांनी फितुरी केली म्हणून आत्ताच्या वंशजांना शिव्या पडत्तात!! हे दोन्ही प्रकार थांबवले पाहिजेत!! आपल्या देशात दुर्दैवाने कर्तुत्वाला नसून
dynasty ला जास्त महत्व दिले जाते!

मुळात आपल्याकडे कुठल्हीनोंद घेण्याची पद्धत नव्हती.जश बखरी लिहिल्या जात त्याप्रमाणे अद्ययावत नोंदी आपल्या इतिहासात नाही.बखरींमधे डवेउजवे असेलही.तरी बर्‍याच गोष्टी नेमक्या नोंदविल्या जात.
पानिपतच्या पराभवाचे वर्णनच "लाखो मोत्यें गळाली"वगैरे अलंकारिक भाषेत केले आहे.नेमके किती मृत झाले माहित नाही.>>>

मुळात बखर ही ऐकीव माहितीवरून लिहिलेली असते. त्यात सर्व खरे किंवा सर्व खोटे असेल असे नाही!! अनेक वेळा बखरीतून सत्य इतिहासाचा मजकूर काढून घेणे अवघड होऊन जाते. इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की, "एक अस्सल कागदाचे चिटोरे अनेक बखरींच्या बहुमताला हाणून पाडण्यास पुरेसे आहे". बखर ही अगदीच टाकाऊ नसते.

आता सभासद बखरीसारखी समकालीन बखर ही इतिहासात त्यातल्या त्यात विश्वसनीय मानली जाते. आपल्याकडे इतिहासात नोंदी ठेवल्यात जात नव्हत्या हे पेशवेकाळाबाबत तितकेसे खरे नाही! हे एक वेळ मान्य करेन मी की शिवाजी राजांच्या किंवा अगदी बहामनी काळातील नोंदी तुलनेने आपल्याला कमी आढळतात! पण जर पेशवे काळात पाहायला गेले तर पुण्यातील पेशवे दप्तरात ३-३.५ कोटी कागद आहेत!! मेणवली दफ्तरातील कागद वेगळे, सांगलीकर पटवर्धनांचे वेगळे, नागपूरकर भोसल्यांचे वेगळे, होळकरांचे वेगळे, शिन्द्यांचे वेगळे.. त्यामुळे इतिहास लिहिला नाही असे नाही म्हणता येणार. पण कसे आहे की आपल्याकडे संशोधकांची कमी आहे!! अनेकानी ठरवले की नोकरी सांभाळून थोड फार इतिहासाला योगदान द्यायचे तर कागदपत्रात दडून बसलेला इतिहास समोर यायला फारसा वेळ नाही लागणार!!

पानिपतच्या पराभवाचे वर्णनच "लाखो मोत्यें गळाली"वगैरे अलंकारिक भाषेत केले आहे.नेमके किती मृत झाले माहित नाही.>>

हे वर्णन तर समकालीन पत्रात केले आहे. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफ़ात, रुपयोंकी गिनती नहीं" असे ते वाक्य आहे.. ते अलंकारिक असले तरी त्यात ऐतिहासिक सत्य आहे.. दोन मोती म्हणजे सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव पेशवे. अश्राफात मध्ये बळवंतराव मेहेंदळे यांच्यासारखे अनेक महत्वाचे सरदार येतात. पानिपतमध्ये एकूण किती सैन्य गेले याचा आकडा अजिबात कळत नाही.. पण मराठा साम्राज्याचे ते संपूर्णसैन्य नव्हते. आपले एक सैन्य कर्नाटकात होते तर दुसरे नानासाहेबांसोबत होते आणि हा तिसरा भाग होता. पण एकूण मेलेल्या लोकांची संख्या ८० हजारांच्या घरात सहज जाईल!!

"सभासद बखरीसारखी समकालीन बखर ही इतिहासात त्यातल्या त्यात विश्वसनीय मानली जाते"

--> तरीही या बखरीमध्ये अतिरंजित आणि अवास्तव वर्णने केलेली आहेत. घटनाक्रम सुद्धा पाळलेला नाही. (जाता जाता: समर्थ रामदासांचा उल्लेख मात्र या बखरीत कुठेही केला गेलेला नाही हे सुद्धा नोंद घेण्यासारखे). बहुतेक बखरी ह्या भावनाविवश होऊन लिहिलेल्या आहेत. वस्तुनिष्ठपणे नव्हे. शिवाय लिहिणाऱ्यावर तत्कालीन व्यक्तींचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे त्यात अतिशयोक्ती, अवास्तव, संदिग्ध, असंबंध, परस्परविरोधी अशा प्रकारची विधाने आढळतात.

संदर्भ:
१. इतिहासाचा वाटाड्या (लोकसत्ता १३ एप्रिल २००३): https://www.loksatta.com/daily/20030419/lmbakar.htm
२.सभासद बखरीतील महाराज (मटा १९ फेब्रुवारी २०१३): https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/-/articleshow/...

"पुण्यातील पेशवे दफ्तर घ्यायचे म्हणले तर तिथे ३-३.५ कोटी पत्र आहेत"

--> हि सांख्यिकी आपणास कुठे मिळाली? लिखाणाचा एकंदर कालखंड आणि किती व्यक्ती सहभागी आहेत याविषयी काही संख्याशात्रीय माहिती आहे का? आकडा अवास्तव वाटतो. प्रतिदिनी किती कागद लिहिले गेले असतील हे पट्कन काढूया. शिवरायांच्या नंतरच्या दोनशे वर्षाच्या काळात (इस. १७०० ते १९००) हि लिहिली गेली आहेत असे मानू. दोनशे वर्षाचे २००*३६५ असे ७३००० दिवस होतात. ३०००००००/७३००० केल्यास जवळपास ४११ येतात. म्हणजे दोनशे वर्षे रोज सरासरी चारशेहून अधिक कागदे लिहिली गेली असतील? त्याकाळात छपाई यंत्रणा नव्हती. मी आपला दावा खोटा ठरवायचा प्रयत्न करत नाही पण वस्तुनिष्ठपणे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय इतकेच.

दोनशे वर्षाचे २००*३६५ असे ७३००० दिवस होतात. ३०००००००/७३००० केल्यास जवळपास ४११ येतात. म्हणजे दोनशे वर्षे रोज सरासरी चारशेहून अधिक कागदे लिहिली गेली असतील? त्याकाळात छपाई यंत्रणा नव्हती.
>>
इतर मुद्द्यांबद्दल काही म्हणायचे नाही,
पण एकुण भारतातील त्याकाळातील मराठा सत्ता केंद्रे, उपकेंद्रे, युद्धेतर छोटे मोठे पत्रव्यवहार, मोहीमा इतर सर्व बघता या सगळ्या ठिकाणांचे व लोकांचे मिळुन दिवसाला ३००-४०० पत्र होऊ शकतील असे वाटते.

हि सांख्यिकी आपणास कुठे मिळाली? लिखाणाचा एकंदर कालखंड आणि किती व्यक्ती सहभागी आहेत याविषयी काही संख्याशात्रीय माहिती आहे का? आकडा अवास्तव वाटतो. प्रतिदिनी किती कागद लिहिले गेले असतील हे पट्कन काढूया. शिवरायांच्या नंतरच्या दोनशे वर्षाच्या काळात (इस. १७०० ते १९००) हि लिहिली गेली आहेत असे मानू. दोनशे वर्षाचे २००*३६५ असे ७३००० दिवस होतात. ३०००००००/७३००० केल्यास जवळपास ४११ येतात. म्हणजे दोनशे वर्षे रोज सरासरी चारशेहून अधिक कागदे लिहिली गेली असतील? त्याकाळात छपाई यंत्रणा नव्हती. मी आपला दावा खोटा ठरवायचा प्रयत्न करत नाही पण वस्तुनिष्ठपणे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय इतकेच.>>>

ही सर्व पत्रे पेशव्यांची नाही!! यात अनेक दफ्तरे आहेत पण पेशवे दफ्तर हा त्यातला मोठा भाग असल्याने त्या सर्वाना एकत्रितपणे पेशवे दफ्तर असे म्हणले जाते!! ही पत्रे गावागावातून गोळा केली आहेत इंग्रजांनी.. त्यात फक्त राजकारण विषयक माहिती नाही तर गावातले तंटे, जमिनीचे हक्क वगैरे यांसारखे असंख्य रुमाल आहेत! पेशवे दफ्तरात, मोडी लिपीतील २७,६८७ रुमाल असून त्यापैकी ८६८१ रुमाल हे खुद्द पेशव्यांच्या कारभाराचे आहेत. उरलेले रुमाल इतर अनेक दफ्तरे मिळून आहेत. घडणी दफ्तराच्या एका कागदानुसार (रुमाल ३७५, कागद ११वा) पेशवेकालीन दफ्तराचे सोयीसाठी एकूण सात भाग दिसून येतात.
१) एकबेरजी दफ्तर
२) स्वारी लष्कर दफ्तर
३) चालते दफ्तर
४) पोतनिशी दफ्तर
५) पारसनिशी दफ्तर
६) कारखानिशी दफ्तर
७) वाकेनवीशी दफ्तर

त्यामुळे इथे फक्त पेशव्यांची कागदपत्रे आहेत हा निष्कर्ष चुकीचा आहे!! त्यात आंग्रे, सातारकर महाराज, इतर सरदार अशा अनेकांची आलेली पत्रे किंवा त्यांची स्वतःची दफ्तरे सुद्धा आहेत!!

इनामदार यांनी दिलेल्या ह्या दुव्यात खालील वाक्य दिली आहेत.
---
त्या समर्थ रामदासांचे नाव देखील कृष्णाजी अनंद सभासद विरचित बखरीमध्ये वाचावयास मिळत नाही. म्हणूनच त्र्यं. शं. शेजवलकरांसारखा सत्यशोधक इतिहासकार सभासदांच्या वस्तुनिष्ठतेचा मनःपूर्वक गौरव करतो.
---
वरिल वाक्य वाचून एक प्रश्न पडतो की,
सभासदाने त्याच्या बखरीत 'समर्थ रामदासांचे' नाव एकादाही लिहिले नाही,
म्हणून थोर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर, सभासद बखरीचा गौरव करतात. हे वाक्य वाचून मटातील त्या लेखाचा लेखक, एकादा बीग्रेडी आय मीन ब्रिगेडी मनोवृत्तीचा असावा अशी शक्यता आहे.
------
आता सभासदाने त्याच्या बखरीत समर्थ रामदासांचा उल्लेख केला आसता तर थोर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांच्या मते ती बखर अगदीच टाकाऊ झाली असती का?

तरीही या बखरीमध्ये अतिरंजित आणि अवास्तव वर्णने केलेली आहेत. घटनाक्रम सुद्धा पाळलेला नाही. (जाता जाता: समर्थ रामदासांचा उल्लेख मात्र या बखरीत कुठेही केला गेलेला नाही हे सुद्धा नोंद घेण्यासारखे). बहुतेक बखरी ह्या भावनाविवश होऊन लिहिलेल्या आहेत. वस्तुनिष्ठपणे नव्हे. शिवाय लिहिणाऱ्यावर तत्कालीन व्यक्तींचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे त्यात अतिशयोक्ती, अवास्तव, संदिग्ध, असंबंध, परस्परविरोधी अशा प्रकारची विधाने आढळतात.>>>>>>>

सभासद हा शिवाजी राजांच्या काळातील असल्याने त्याची बखर ही 'त्यातल्या त्यात' विश्वसनीय मानली जाते!! बाकी विसंगती तर असणारच कारण ती बखर राजाराम महाराजांच्या काळात लिहिली गेली. म्हणूनच अस्सल कागदाचा चिटोरा हवा!!

महाराष्ट्र टाईम्स मध्ये दिलेल्या लेखात चांगली माहिती होती पण शेवटच्या उताऱ्यात लेखकाने माती खाल्ली!! रामदास स्वामींचे अस्तित्व सभासद बखरीत नाव नाही म्हणून नाही असे असेल तर हास्यास्पद आहे ते लिखाण!!

Pages