मित्राचा अपघातात मृत्यू होतो तेव्हा.....

Submitted by ..सिद्धी.. on 28 March, 2018 - 06:57

2016  साली या दिवसात आमची दहावीची परीक्षा सुरू होती. आयसीटीचा पेपर संपला होता. शेवटचा फक्त एकच पेपर राहीला होता. आणि मग परीक्षा संपून आम्ही उनाडक्या करायला मोकळे होणार होतो. पण सगळच आपल्या मनासारख होईल तर नशीब हा फॅक्टर आपल्या आयुष्यात नसला असता. त्या दिवशीही आम्ही पेपर सुटल्यावर चर्चा करत शाळेबाहेर पडलो. माझ्या बेस्ट फ्रेंड आदित्यचा मित्र माझ्याच शाळेत होता.तो इंग्लिश मिडीयमला होता आणि मी सेमी इंग्लीशला. त्यामुळे सहसा आमची भेट होत नसे. पण आता परीक्षा सुरू असल्यामुळे झालेल्या पेपरवर चर्चा करत बर्याचदा आम्ही भेटत होतो.त्या दिवशीही असेच पंधरा वीस मिनीटं गप्पा मारत उभे होतो. नंतर पुन्हा भेटू असं म्हणत मी घरी आले. पण हीच आमची शेवटची भेट ठरेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच दिवशी  रात्री अकराच्या सुमारास आदित्यचा मेसेज आला की; आपल्या अथर्वचा  रोड अॅक्सिडंट मध्ये मृत्यू झालाय.
पहिल्यांदा मला वाटलं की तो गंमत करतोय माझी पण पाच मिनीटांनी व्हाॅट्स अॅपवर पण हाच मेसेज आला.मला प्रचंड धक्का बसला.खरं तर या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता.अजूनही हे खरं वाटत नाही. ज्याच्याशी मी काही तासांपूर्वी बोलले तो आता या जगातच नाहीये हे पचवणं फारच अवघड होतं. पण तरीही तेच सत्य होतं जे आम्हाला स्वीकाराव लागलं.
अथर्व हा नॅशनल लेव्हलचा सायकलपटू होता.त्या दिवशीही तो मॅचच्या सरावासाठी गेला होता कारण आमची बोर्डाची परीक्षा संपल्यावर तीन दिवसांनी त्याची मॅच असणार होती. साडेआठच्या सुमारास तो प्रॅक्टीस संपवून घरी येत होता .तेव्हा समोरून राॅग साईडने एक टेम्पो आला आणि त्याची धडक बसल्यायाने अथर्व डिव्हायडरवर आपटला.नेहमीप्रमाणे टेम्पोचालक पळून गेला होता. जवळपास तासभर तो रस्त्यावर विव्हळत पडला होता.पण लोकं फक्त नुसतं बघून पुढे जात होती.तासाभराने एका भल्या माणसाने त्याला हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं .पण तेव्हा उशीर झाला होता.आतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला होता. अर्धा तास आधी आणलं असतं तर त्याचा जीव वाचू शकला असता असं डाॅक्टर म्हणाले. नंतर त्याला घरी आणल्यावर आम्ही आमच्या मित्राला शेवटचं बघायला गेलो.तेव्हा त्याच्या आईचा आक्रोश बघवत नव्हता.काही वेळापूर्वी परत भेटायच म्हणून सांगितलेला मित्र आता पुन्हा कधीच भेटणार नव्हता.त्याला असं शांत निपचीत पडलेलं आजिबात बघवत नव्हतं. मागच्या वर्षीच्या क्रिडाप्रात्यक्षिकांमधले त्याचे एकेक चित्तथरारक पराक्रम त्याची चेंदामेंदा झालेली सायकल बघून आठवत होते. एकुलत्या एका मुलाच्या अशा अकाली मृत्यूने त्याच्या आईवडीलांना हेलावून सोडलं होतं. हे सगळ सहन मला सहन झालं नाही. म्हणून मी तिथून निघून आले. कारण त्याला अग्नी देताना मला बघवलं नसतं. पण पुढचे पंधरा वीस दिवस फार वाईट गेले. कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू मी पहिल्यांदाच बघत होते. या घटनेला आता दोन वर्ष झाली. पण आजही काही प्रश्न पडतात. ज्याची उत्तरं मला आजवर मिळाली नाहीत.

1.)  लहानपणापासून आत्तापर्यंत शाळेत ; घरात  आपल्याला नेहमी एक गोष्ट शिकवली जाते. "अपघातात सापडलेल्या माणसाची मदत करावी." आतापर्यंत एक दोनदा बाबांबरोबर येताना समोर अपघात झालेला दिसल्यावर जमेल तितकी मदत आम्ही केलीये.अगदी शाळेसमोर झालेल्या अपघातातही त्या स्त्रीला मदत करताना मी अथर्वला पाहिलय. पण जेव्हा त्याला गरज होती तेव्हा मात्र लवकर मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अगदी चौथीत असताना आम्हाला मराठीत याच आशयाचा एक धडा होता. पण आता तो ही फोल वाटायला लागला आहे.अर्थात यालाही अपवाद असतील .आपल्याकडे कोणाला मदत करावी इतकीही माणुसकी शिल्लक नाही का?

2.) अनेकदा अशा प्रसंगी  'लोकं पोलीसांच नसतं लचांड मागे नको लागायला' म्हणून मदत करणं टाळतात.हे कितपत बरोबर आहे ?

3.) हल्ली व्हाॅट्स अॅप नाहीतर फेसबुकवर अपघाताच्या ठिकाणी उभं राहून काही लोकं सेल्फी काढताना दिसतात.त्यापेक्षा मदत करणं खरंच इतकं अवघड आहे का?

आतापर्यंत मला या प्रश्नांची पटतील अशी उत्तर मिळाली नाहीत. उलट मदत न करण्याची कारणं कशी बरोबर आहेत याचीच स्पष्टीकरणं मिळाली. परवा अथर्वच्या या दुसर्या पुण्यतिथी निमीत्त आमच्या वर्गाने आपापल्या काॅलेजमध्ये  याविषयी पाच मिनीटांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हाही थोड्याफार प्रमाणात हीच मानसिकता दिसून आली.त्यामुळे मीच कुठे चुकतेय का ? असा प्रश्न मला आता पडला आहे. तेव्हा मी जर यात चुकत असेन तर मला सांगा.
====================================
तळटीप :- वरील घटना खरी असून त्यात जीव गमावलेल्या मित्राचे नाव बदलले आहे. जर यात मी कुठे चुकत असेन तर मार्गदर्शन करावे.
====================================
तेव्हा झाली ती घटना आम्ही टाळू शकत नव्हतो हेच एकमेव सत्य आहे. पण आता पुन्हा हे घडू नये असं आम्हाला वाटतं .त्यामुळे याबाबतीत अॅट लीस्ट आमच्या माहीतीतल्या लोकांना किंवा राहते त्या एरीयातल्या लोकांना योग्य ती माहिती देणं यासाठी सध्या आमचे प्रयत्न सुरू आहेत.हे आमचं या सुट्टीचं aim आहे.त्यामुळे यात माझं कुठे काही चुकत नाहीये ना हे जाणून घेणं हा धागा काढण्यामागचा माझा उद्देश आहे. ज्यांना ज्यांना याविषयातील माहिती आहे त्यांनी ती शेअर करावी हीच माझी सगळ्यांना विनंती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्दैवाने खरं आहे.माझा भाऊ रोज दुचाकीने बराच मोठा प्रवास करतो.तो म्हणतो की 'अपघात झाला तर स्वतः फोन करुन अम्ब्युलन्स बोलावण्याइतकं किंवा स्वतः जाऊन हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट होण्याइतकं शुद्धीवर रहायचं.तसं न झाल्यास लोक आपण मरत असताना समोर व्हिडिओ आणि सेल्फी काढून १० व्हॉटसप फेसबुक ग्रुप वर 'इस को आपके मदत की जरुरत है, शेअर किजीए' वाल्या पोस्ट लिहीतील पण हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणार नाहीत.कोणाला आपली गाडी खराब होण्याची भिती असेल तर कोणाला 'तूच याला मारले' म्हणून आपल्याला अटक होण्याची.'

क्वचित अपवाद असतीलही.जिथे मदत मिळते.त्यातल्या त्यात महिलांना अजूनही मदत मिळते गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाल्यास.पण गर्दी नसलेल्या ठिकाणी बेशुद्ध पडलेल्या पुरुषाला अनोळखी माणसांनी वेळेत मदत करणे जरा कमी फ्रिक्वेंट आहे.

लोक मदत करतात असे आतापर्यंत मी पाहिलेल्या अपघातात तरी झाले आहे. एकजण असाच गाडीच्या आडवे आलेले कुत्रे चुकवायला जाऊन रस्त्यात पडला. बाजुने बस जात होती. एका धिप्पाड माणसाने लगेच त्याला धरुन अलगद बाजुला ओढले. परवाच एक अपघात पाहिला अपघातग्रस्त् गंभीर जखमी होता. पण पंधरा मिनिटाच्या आत मदत मिळाली.
(पण तिथेही फोटोसेशन करणारे महाभाग हजर असतात. )

तुमचं म्हणणही बरोबर आहे. पण मी आतापर्यंत जे पाहिल त्यावर आधारीत लिहीलं आहे. अर्थात याला अपवाद असतील हे मलाही मान्य आहे.

माणूस जिवंत आणि शुद्धिवर दिसला तर पटकन मदत मिळते, बेशुद्ध किंवा व्हीजिबली खूप इंज्युर्ड दिसला तर पोलिस केस, आपल्याला हॉस्पिटल चे बिल भरावे लागेल(ते लागू नये अपघात केस मध्ये असा नियम होउनही) या भीतिने पटकन मदतीला लोक पुढे होत नाहीत असे काहीसे म्हणायचे आहे.
अर्थात ठिकाण टू ठिकाण डिफर करते.

लोकं पोलीसांच नसतं लचांड मागे नको लागायला' म्हणून मदत करणं टाळतात.
>>> दुर्दैवाने हे खरे आहे. Crime पेट्रोल मध्ये कित्येक एपिसोडेस असे पाहिले आहेत जिथे सामान्य माणूस मदत म्हणून पोलिसांना इंफॉर्म करतो. त्यालाच चोपतात मस्त आधी मग नंतर सोडतात हा भाग वेगळा.

दुर्दैवी घटना..

मध्यंतरी कानावर आलेले की लोकांनी मदत करावी म्हणून पोलिसी नियम बदलले आहेत की वागणे सौजन्यशील झाले आहे वगैरे.. कोणाला याबाबत काही माहिती..

'पोलीस आपल्याला धरतील' ही भीती याच एका बाबतीत नाही तर अनेक इतर घटनांमध्ये पण काही वेळा दिसते. जर खरच पोलीसांनी नियम शिथील केले असतील तर त्याबद्दल सूचना देणं किंवा मेन चौकांमध्ये तसे माहीतीदर्शक बोर्ड त्यांनी लावावेत.

मागे एकदा रिक्षाने ऑफिसला जात असताना आमच्या रिक्षासमोर एक रोड क्रॉस करणारी बाई आली आणि ठोकली. बाईचीच चूक होती. अतिघाई नडली. रिक्षावाला थांबेल वा स्लो होईल हे गृहीत धरून बरेच महाभाग बिनधास्त हात दाखवून रस्ता ओलांडतात. तिने तर हात दाखवायचीही तसदी घेतली नव्हती. मग आम्हीच त्यांना रिक्षात बसवून नजीकच्या दवाखान्यात नेले. एक्सरे काढला. मुका मार बसलेला बराच. पण फ्रॅक्चर नव्हते. बाईही शुद्धीवर होती. तिची काही तक्रार नव्हती. ते बघून मग गरज पडल्यास माझा नंबर त्या रिक्षावाल्याला देऊन मी निघालो. तो थांबून राहिला तिचे नातेवाईक येईपर्यंत..

पण तेव्हाही डोक्यात हाच विचार होता. आता हीने तक्रार केली तर मी साक्षीदार म्हणून फुकट या दोघांच्या झमेल्यात लटकलो.

<<< आतापर्यंत मला या प्रश्नांची पटतील अशी उत्तर मिळाली नाहीत. उलट मदत न करण्याची कारणं कशी बरोबर आहेत याचीच स्पष्टीकरणं मिळाली. >>>
फारच दुर्दैवी. हा प्रसंग नुसता वाचूनच फार वाईट वाटले, प्रत्यक्ष अनुभव तर दूरच.
पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेपण नाहीत हो.

जेव्हा एखाद्या बाईकस्वाराचा अपघात होतो तेव्हा त्याला उचलताना काही मेडिकल फॅक्ट्स सुद्धा लक्षात घ्यावे लागतात. असं एके ठिकाणी वाचलेल .चुकीच्या पद्धतीने उचलल्यावर परमनंट डॅमेजही होण्याची संभावना असते.एका मेडिकल मॅक्झीनमध्ये वाचलेलं.
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

एकदम दुर्लक्ष करुन तासभर तसाच रस्त्यात पडून आहे असं माझ्या बघण्यात तरी एकही अपघात नाही..
अजुनतरी कुणाचा अगदी तोल जरी गेला तरी हातातल काम सोडून धावून जाणारे बघीतलेय मी.
तुमच्या मित्राबाबत जे झालं ते वाईट झाल..

तुमच्या प्रश्नांबाबत म्हणाल तर पहिली केस हि फार रेअर होते.. मलातरी अशी सापडली नाही. जवळपास सार्याच ठिकाणी लोकांनी मदत केलीए. मी स्वतः अगदी मरणाच्या दाढेत गेलेली लोकांच्या तत्परतेमुळे वाचली आहे १२वीत असताना.

प्रश्न २च्या बाबतीत म्हणाल तर पोलिसांचा वाईट अनुभव याला कारणीभूत ठरु शकतो. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात जिथे पावलोपावली गुन्हे घडत आहे, अपघात होत आहे तिथे हे सतत पाहून पाहून पोलिसांच मन जर निब्बर बनत असेल अन ते जे मदतीला आले त्यांनाच इंगा दाखवत असेल तर लोकसुद्धा अशा वेळी स्वतःला त्यातून वाचवू पाहतात. कितीही म्हटल तरी आपमतलबीपणा हा सर्व सजीवांचा गुणधर्म आहे.

३रा प्रश्न म्हणावा तर मला नाही वाटत डोक्याने अन विचाराने सुज्ञ लोकं अश्यावेळी मोबाईल घेऊन फिरत असतील. मला तर गर्दीत हरवलेल्या रडणार्‍या मुलालापन बघवत नाही तर फोटो काढून शेअर करण सोडाच हालाकी ते कधी कधी कामी येत नाही असं नाही.

बाकी तुम्हाला तुमच्या मित्राच्या वियोगाचं दु:ख पचवायची ताकद मिळो आणि त्याला नाही मिळाली म्हणुन आपण पन कुणाला मदत करायची नाही अश्या ड्यांजर विचारांपासुन दूर राहायची पॉझिटिविटी मिळो हि आशा आहे..

त्याला नाही मिळाली म्हणुन आपण पन कुणाला मदत करायची नाही अश्या ड्यांजर विचारांपासुन दूर राहायची पॉझिटिविटी मिळो हि आशा आहे..>>>>>

छे हो.असला विचार चुकून सुद्धा मनाला शिवणार नाही.उलट त्याच्यासाठी काहीतरी करायचा तोच एक मार्ग आहे हे लक्षात घेऊन मी लोकांची मदत करते. आणि मलाही असं दुर्लक्ष करून निघून जाणं कधीच जमणार नाही.कोणाला संकटात सोडून जाणं याआधीही जमलं नव्हतं आणि यापुढेही जमणार नाही.
कधीकधी असं वाटत की मी त्यावेळी तिथे असते तर..

टिना, मलाही माणसाच्या माणुसकीवर विश्वास ठेवण्याची इच्छा आहे, पण दुर्दैवाने अनेक तास मदत मिळाली नाही अशी माणसं आणि अश्या केसेस भारतात खूप आहेत.
शिवाय स्त्री असताना पटकन मदत मिळणं वेगळं आणि पुरुष असताना आणि स्वतः शुद्धीवर नसताना/काही संदिग्धता असताना(रात्री अपरात्री किंवा प्यायल्याची शंका वगैरे) मदत मिळणं अवघड होतं.

कार चालवताना एपिलेप्सी चा ऍटॅक आलेल्या आणि कार ने एकाला धडक दिलेल्या डॉक्टर ला मद्यधुंद समजून तो हाताने खुणा करून सांगायचा प्रयत्न करत असताना बाहेर काढून बेदम मारहाण झाल्याचा पिंपरी चा किस्सा पाहिला असेलच.

आपल्या इथे अपघातात आपण आणि समोर चा शुद्धीवर असल्यास रोड रेज दाखवणे, कानाखाली/कॉलर/भ आणि म प्रणित शिव्या स्किलसेट दाखवणे किंवा समोरचा बेशुद्ध पडल्यास आपण सुम मध्ये पळून जाणे हे दोन प्रकार प्रामुख्याने दिसतात.एकसिडेंटल रन ओव्हर कबूल करणे, तातडीने मदत मिळवणे,दवाखान्यात वेळेत दाखल करणे वगैरे प्रकार अती दुर्मिळ.(अपवाद: तुम्ही दीपिका किंवा श्रद्धा कपूर किंवा आलिया सम दिसणारी व तत्सम लेटेस्ट फॅशन ची वस्त्र प्रावरणे परिधान केलेली अविवाहीत तरुणी असणे.विधान लै प्रेज्युदाईज्ड वाटत असलं तरी पुढच्या वेळी निरीक्षण करा.पटेल.)
माझ्या नवऱ्या च्या नव्या पल्सर ला रॉन्ग साईड ने येऊन तरुणी ने ऍक्टिवा ने धडक मारली आणि तुटलेल्या लाईट चं नुकसान भरून द्यायला तयार नव्हती म्हणून नवर्याने गाडीची चावी काढून घेतली तर 2 टेराडेटा मधली बाजूला बघणारी मुलं भांडायला आली, तुमची आई बहीण अश्या प्रसंगात असती आणि कोणी चावी काढून घेतली असती तर कसं वाटलं असतं वगैरे ☺️☺️

http://www.bbc.com/news/magazine-36446652

https://blogs.wsj.com/indiarealtime/2017/02/06/why-some-indians-are-relu...

http://indianexpress.com/article/cities/delhi/admitted-to-safdarjung-hos...

आपण अशी आशा करू की नवा कायदा आणि जागो रे अभियानाने चित्र बदलेल.

2.) अनेकदा अशा प्रसंगी 'लोकं पोलीसांच नसतं लचांड मागे नको लागायला' म्हणून मदत करणं टाळतात.हे कितपत बरोबर आहे ?>>>>>
मा. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत की, अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्याची कोणत्याही प्रकारची चौकशी होऊ नये, तसेच अपघातग्रस्तावर प्रथमोपचार करणे हे डॉक्टरचे कर्तव्य आहे. (मध्यंतरी ही माहिती देणाऱ्या जाहिराती FM radio वर यायच्या.)

जेव्हा एखाद्या बाईकस्वाराचा अपघात होतो तेव्हा त्याला उचलताना काही मेडिकल फॅक्ट्स सुद्धा लक्षात घ्यावे लागतात. असं एके ठिकाणी वाचलेल .चुकीच्या पद्धतीने उचलल्यावर परमनंट डॅमेजही होण्याची संभावना असते.....
हो, हे खरे आहे. विशेषतः फ्रॅॅक्चर असेल तर त्या व्यक्तीस उचलताना अधिक काळजी घेण्याची गरज असते, जसे की फ्रॅॅक्चर झालेल्या अवयवास आधारफळीने आधार देणे वा स्ट्रेचर वापरणे. फ्रॅॅक्चर होऊन हाड बाहेर आलेले असल्यास ते स्वतःहून आत दाबण्याचा प्रयत्न न करणे, त्या जखमेवर एखादे स्वच्छ कापड ठेवणे (बांधू नये) जेणेकरून जखमेतून जंतूसंसर्ग होणार नाही. इत्यादी. अर्थात यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ते बिनकामाचे विषय शिकवण्यापेक्षा असे काहीतरी (Disaster Management, First Aid) शाळेत आवर्जून शिकवावे.

टीना ताई जगातली माणूसकी संपलीये असं मला आजिबात म्हणायचं नाहीये. मदत करणारी लोकं आहेत यावर माझाही विश्वास आहे. झाली ती घटना आम्ही टाळू शकत नव्हतो हेच एकमेव सत्य आहे. पण आता पुन्हा हे घडू नये असं आम्हाला वाटतं .त्यामुळे याबाबतीत अॅट लीस्ट आमच्या माहीतीतल्या लोकांना किंवा राहते त्या एरीयातल्या लोकांना योग्य ती माहिती देणं यासाठी सध्या आमचे प्रयत्न सुरू आहेत.हे आमचं या सुट्टीचं aim आहे.त्यामुळे यात माझं कुठे काही चुकत नाहीये ना हे जाणून घेणं हा धागा काढण्यामागचा माझा उद्देश होता. ज्यांना ज्यांना याविषयातील माहिती आहे त्यांनी ती शेअर करावी हीच माझी सगळ्यांना विनंती आहे.

मी अपघातात मदत केल्यानंतर माझ्यावरच शेकण्याचे प्रसंग पुर्वी कॉलेजमधे असताना आणि नंतर काही वर्षांनी ऑफिसला जाताना असे दोनदा घडलेले आहेत. बाकी माणुसकी वगैरे ठीक आहे, पण तेव्हा आपण किती भयानक परिस्थितीत सापडतो हे फक्त त्या प्रसंगातुन जाणार्‍या माणसालाच माहित.

आता मी जर अपघाताच्या ठिकाणी अगदीच एकटी असेन आणि समोरच्या माणसाचा जीवच जाणार असेल तरच मदत करेन. अन्यथा बाकीच्या लोकांनी मदत करावी हाच अ‍ॅप्रोच असेल. ( त्यातला एक प्रसंग मी पुर्वी कोणत्या तरी धाग्यावर मी लिहिला होता, पण कॉलेजच्या दिवसांमधला घडलेला दुसरा प्रसंग फारच सिरियस होता. कारण ते आजोबा ८४ वर्षांचे होते. त्यांना झालेलें फ्रॅक्चर बहुदा सहन झालं नाही आणि ते महिन्याभरात गेले. मी अपघाताच्या ठिकाणी काही मिनिटांनी पोचले होते तरी मला चौकशीला आणि नातेवाइकांच्या नजरांना सहन करावं लागलं होतं. लकीली माझ्या मागुनच दुसरी एक बाइक आल्यामुळे विटनेस होता. आणि आजोबांच्या मुलाला परिस्थिती नीट कळ्ल्यावर त्याने मदत केली म्हणुन उलट कौतुक केलं)
मदत करा पण आजुबाजुला विटनेस असेल याची खात्री करा असा सल्ला नक्कीच देइन.

जर प्रबोधन करत असाल तर वाहतुकीचे नियम, आणि हेल्मेटचा वापर याविषयी ही करा. यामुळेही बरेचसे अपघात कमी होतील.

मधुसुदन हा मुद्दा इन्क्लूड केला आहे. सगळ्यात आधी तेच सुचलेलं. तरीही थॅक्स.
मनिमाऊ तुमच्या प्रतिसादातला विटनेसचा मुद्दा पटला.तोही अॅड केला लिस्ट मध्ये. तुम्हालाही धन्यवाद.
विक्षीप्त मुलगा तुम्ही दिलेली माहितीही बरोबर आहे.त्याचाही अंतर्भाव केलाय .धन्यवाद

आदिसिद्धी, आधी माफ कर फार उशिरा धागा वाचतेय. या ग्रुपकडे फिरकणंच होत नाही बघ..... आता वाचते.

बापरे! फारच भयंकर घटना! देव तुला या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती देवो....! एखाद्या अपघातात 'मला काय त्याचं', 'किती अपघात होतात, प्रत्येकवेळी काय आपणच पुढे व्हायचं' अशा कूपमंडूकी प्रवृती दिसतात. अपघातातही मनोरंजन शोधणारे विक्षिप्त स्वभावही दिसून येतात. दोन वर्षांपूर्वी माझा इथल्या अगदी गजबजलेल्या रस्त्यावर एक किरकोळ अपघात झाला होता, तेव्हा बघ्यांचीच संख्या जास्त होती. पण माझी शुद्ध थोडा वेळ हरपली होती, म्हणून कोण मदतीला आलं, नाही ,मला आठवत नाही.

तुझे प्रश्न स्वाभाविक आहेत. सोशल मिडियाने खरं माणसाला स्वार्थी बनवलंय....

पण तुझ्या या मित्राचा प्रसंग फारच ह्रदयद्रावक आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!

तुला उपक्रमासाठी सोशल मिडिया नक्की मदत करेल. ट्विटरवर टॅगलाईन्स वापरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, फेसबुक पेज काढणं, वाॅट्सअॅप वरून मेसेज पाठवणं, हे बेसिक उपक्रम करता येतील. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. अनेकांना सामील करून घेता येईल. माझं काही काम लागल्यास मलाही योगदान द्यायला आवडेल.

पण अशा बाबींवर प्रबोधन ही काळाची गरज आहे.

अवांतर- मी सेमी इंग्लीशला. >>>>> तुही सेमीलाच होतीस का? मीही सेमीलाच आहे!

येस्स सोशल मिडीयाच डिपार्टमेंट ज्या ग्रुपचं आहे त्याला सांगेन मी.माझं माबो सोडलं तर कुठे अकाऊंट नाहीये.ज्यांची अकाऊंट आहेत ते त्या ग्रुप मधे आहेत.
माझ्याकडे माहिती गोळा करून व्हेरीफाय करायच डिपार्टमेंट आहे. म्हणून इथे धागा काढला. मदतीबद्दल धन्यवाद.
अवांतर: माझही पाचवीपासून सेमी इंग्लीश होतं.

ओह्. मग मस्तच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तुम्हाला. उपक्रमासाठी शुभेच्छा!

माझ्याकडे माहिती गोळा करून व्हेरीफाय करायच डिपार्टमेंट आहे.>>>>> म्हणजे नक्की काय करणार तू?

मनिमाऊ यांच्या प्रतिसादातील 'विटनेस'च्या मुद्द्यावरून एक सुचले.
आजकाल Action Camera खूप स्वस्त झाले आहेत. (Amazon वर तर अवघ्या १२६० रु. पासून उपलब्ध आहेत.) असाच एखादा कॅमेरा आपल्या स्कूटरच्या हॅॅन्डलवर किंवा गाडीच्या dashboard वर लावल्यास आपले निर्दोषत्व सिद्ध करणे सहजसोपे होईल. (काही हजारांची बाईक किंवा काही लाखांची गाडी विकत घेणाऱ्यांना १५००-२००० रु. चा जादा खर्च म्हणजे काही विशेष नाही.)

या बाबतीत मदत करताने जे मेडिकल फॅक्ट्स आहेत ते शोधणे..म्हणजे जखमी व्यक्तीला उचलताना काय कराव किंवा करू नये याची माहीती गोळा करणार .
बाकी ट्रॅफीक रूल्स ; सेफ्टी ; पोलिसांचे नियम( ह्याची माहिती गोळा करणं सुरू आहे.) या आणि अजून सुचतील त्या गोष्टी अॅड करणार. माहिती चुकीची नाहीये हे क्षेत्रातल्या तज्ञाकडे जाऊन चेक करणार.

Pages