रसग्रहण-कुसुमाग्रज-पावनखिंडीत

Submitted by सिम्बा on 28 February, 2018 - 07:18

“हल्लो सुमी का ? अगं मी बोलतेय, हेमा,
गडबडीत नाहीस ना? काही नाही ग, असाच फोन केला.”
“..........”
“ आईंच काय? बरं आहे म्हणायचं, सर्जरी होऊन ५ महिने झाले ग, अंथरुणात उठून बसतात आता, पण अजून चालता येत नाही त्यांना, सगळे अंथरुणातच आहे अजून.”
“.......”
“नाही ग, नॉर्मली १ महिन्यात पेशंट चालायला लागतो, पण आता यांचे वय, हेवी डायबेटीस वगैरे विचारात घेता सगळी गणितेच बदलतात.”
“........”
“अग मीच करते सगळे. पहिला आठवडा ब्युरोतून बाई आणली होती, पण या काही तिच्याशी जुळवून घ्यायला तयार नव्हत्या, एक तर यांना उठून बसता पण येत नव्हते तेव्हा , पण ती बाई कुठे बसली, कशी बसली, पाणी कसे भसकन पाजते अश्या नुसत्या तक्रारी करायच्या, शेवटी ती भांडून निघून गेली, तेव्हा पासून मीच पहाते,”
“दिवसभराचे बघून रात्री पण अटेंड करणं फार व्हायला लागले ग, रात्री यांच्या हाका आल्या कि उठा, काय हवे नको ते पहा. आणि आताशा एकदा उठल्यावर परत झोप लागत नाही ग मला, परत सकाळी संजू चा डबा बनवून द्यायचा असतो. हल्ली घणसोली ला कुठल्याश्या साईटवर जातो, तिकडे आसपास काही नाहीये म्हणे.”
“शेवटी रात्री पुरती परत एक बाई बोलावली ब्युरो मधून पण तरी कधीतरी उठावं लागतच. “
“..........”
“हे असतात ग घरीच, पण आता आईंचे स्पंजिंग, डायपर चेंज यात ते काय मदत करणार, कप्पाळ? हे मलाच करायला लागतं. त्यात आईंच जेवणखाण्याचे तंत्र इतके बिघडले आहे, अगदी सगळे मिक्सर मधून काढून भरवावे लागते.नाहीतर खीर किंवा ज्यूस. आता ते सगळे स्वयंपाकीण बाई वर सोडता येत नाही, आणि तिकडे पण यांची काही मदत नाही. माझा दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो काही कळत नाही बघ.”
“........”
“हो,हो, आर्याची तब्येत एकदम छान, आत्ता कुठे चौथा सुरु झालाय, हो, हो, जॉब सुरु आहे ना अजून. नवव्या पर्यंत सुरु ठेवीन म्हणतेय आत्ता तरी, बघू कसं जमतेय ते. डिलिव्हरी ला येईल इकडे परत.”
“........”
“ सौमील कुठे असतो म्हणजे काय? इकडेच असतो, सकाळी ऑफिस ला जाताना आर्या त्याला नर्सरी मध्ये सोडते, १२ ला हे घेऊन येतात, मग आर्या येईपर्यंत घरीच असतो कधी ७ कधी ८ काय विचारू नकोस, इतका गुंड झालाय ना..त्याच्या पाठीमागे धावताना कंबर ढिली होते बघ, शेवटी संध्याकाळी अगदी यांना त्याला घेऊन बागेत पाठवते, त्या १ तासात माझा स्वयंपाक तरी आटपून घेते.”
“........”
“बघ ना ग, काय करू समजत नाहीये.सगळी कडे एकटी लढतेय ग. त्यात हिच्या बाळंतपणाचे टेन्शन. आईंची तब्येत अशीच राहिली तर या 1BHK मध्ये आर्याची कशी सोय करायची देवास ठाऊक. मध्ये ३ ४ दिवस आमच्या भांड्याच्या बाई नव्हत्या तेव्हा अजून धावपळ”.
“दमायला होतं ग, गळून गेल्यासारखे वाटते, हे सगळं कधी संपणार याचा विचार करत राहते. परवा संध्याकाळी देवासमोर दिवा लावत होते अचानक रडायलाच आलं बघ. सगळ्या बाजूने संकटे पाहून जीव गुदमरला,इतकं असहाय्य कधीच वाटले नव्हते... देवाला म्हंटलं, अजून नाही धकवून नेता येत ,सोडव रे बाबा यातून. रात्री झोपल्यावर सकाळी जागच येऊ नये कधीतरी. सगळी विश्रांती एकाच वेळी मिळून जाईल”
“मी तसं म्हंटले खरं, पण मग मलाच दोषी वाटत राहिलं, आईंची त्यांच्या उमेदीत माझ्याकिती काय काय केलं, आणि माझ्यावर वेळ आल्यावर मी देवाला सरळ सोडव म्हणून सांगतेय असं वाटलं. माझीच लाज वाटली मग.”
“...........”
“नाही ग , रडत नाहीये, जरा भरून आलं. तुझ्याशी नुसते बोलल्यावर पण छान वाटले मला, चल ठेवते, सौमील यायची वेळ झाली, कुकर लावते पटकन.”
“बाय , नंतर बोलू सवडीने.”

फोन ठेऊन हेमाताई उठल्या , पदराने डोळे टिपले आणि स्वयंपाकघरात आल्या, तांदूळ काढण्याआधी त्यांनी सहज रेडीओ सुरु केला ,

आर्त आवाजात लता गात होती...............................

सरणार कधी रण प्रभो तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

---------------------------
खरं तर हे रूढ अर्थाने रसग्रहण नाही, आणि कुसुमाग्रजांची हि कविता सुद्धा अगदी सरळसोट आहे. त्यात कुठल्याही वेगळ्या इंटरप्रीटेशनला वाव नाही,
मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात “संग्राम” वगैरे म्हणावे अशा लढाया अपवादानेच येतात,मुळात आपल्या नेमस्त आयुष्याला रणांगण, कुरुक्षेत्र वगैरे म्हणणे म्हणजे “सश्याच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्या सारखे आहे”.
आपल्या स्वप्नांची पालखी इप्सिताचा गड गाठत नाही तो पर्यंत येणारे प्रोब्लेम्स चे चौफेर हल्ले परतवणारा बाजी आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो. आपली स्वप्न,ध्येये पूर्ण होईपर्यंत वाढत्या बळाने येणाऱ्या समस्यांशी तो झुंजत असतो. मात्र कधीतरी तो सुद्धा विव्हल होतो,त्याला हि शस्त्रे ठेवावीशी वाटतात. नेमकी हिच वेळ असते त्याला तोफांचे आवाज कानी न आल्याची आठवण करून देण्याची.
आपली स्वप्ने पूर्ण झाली नाहीयेत याची आठवण झाली हि तो जिद्दीने नव्या प्रोब्लेम्स ला समोर जायला तयार होतो.
आपल्या प्रत्येकाच्या मनात असणाऱ्या त्या विजीगीषु बाजीला हि वाहीलेली आदरांजली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाब्बो, फारच कातिल लिहिलंय तुम्ही सिम्बा.
हे असं काही वाचलं की सुन्न होऊन जायला होतं. प्रतिक्रिया तरी काय द्यायची पण तुम्ही लिहिलेलं आतपर्यंत भिडलं हे सांगायलाच हवं होतं.

बाब्बो, फारच कातिल लिहिलंय तुम्ही सिम्बा.
हे असं काही वाचलं की सुन्न होऊन जायला होतं. प्रतिक्रिया तरी काय द्यायची पण तुम्ही लिहिलेलं आतपर्यंत भिडलं हे सांगायलाच हवं होतं.
नवीन Submitted by व्यत्यय on 28 February, 2018 - 21:07
+999

अप्रतिम. तुमचे लिखाण काळजाला भिडले.

ज्जे बात
बहोत खुब
मस्तच
आवडेश

पु ले शु

वाह मेरे शेर!
काय मस्त लिहिलंय.

रसग्रहण डीकन्स्ट्रक्टेड. वेगळीच सुंदर कन्सेप्ट. उत्कृष्ट उतरलेली आहे.

सुंदर!
सशाच्या टाळूला गंडस्थळ हा विचार माझ्याही मनात आला, पण तुमची भावना समजली.
शिवा काशिद, बाजीप्रभू, हिरोजी फर्जंद- मदारी मेहतर अशा असंख्य शूर शिलेदारांना ज्याच्या जिवासमोर स्वतःचा जीव तुच्छ वाटला, असा शिवाजी त्यांच्या आयुष्यात होता. आपल्याला आपला शिवाजी सापडला, की आपल्यातले बाजीप्रभूही लढायला लागतात.

सिम्बा, हे आगळं वेगळं रसग्रहण आवडलं . नुसतंच आवडलं नाही तर काळजाला भिडलं.

येणारे प्रोब्लेम्स चे चौफेर हल्ले परतवणारा बाजी आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो. >>> अगदी खरं आहे.

सिम्बा !!!
काटा आला "सरणार कधी रण" ओळ वाचली तेव्हा. सुंदर लिहीलं आहेस.
हे जवळच्या व्यक्तीने अनुभवलंय त्यामुळे आणखी रिलेट झालं.