निचरा

Submitted by सई. on 22 June, 2017 - 03:04

एका सुंदर कार्यक्रमाहून परतत होते. गवयाचा गळा तापतो तशी माझीमाझीच मनाची मैफलही रंगली होती. त्याच तंद्रीत सिग्नलला उभी असताना अचानक एक अगदी टिपेचा चिरका स्वर कानावर पडला. थांबलेले सगळेच चमकून पलिकडच्या फुटपाथकडंं बघायला लागले आणि तिथंच खिळले. मीही रेंगाळलेच क्षणभरासाठी, खोटं का बोला, पण नशिबानं झटकन भानावर येऊन मान वळवली.

मध्यमवयीन, शेलाटी, जीन्समधले लांब पाय, हल्ली स्टायलीश रुपेरी छटा वागवतात तशी पोनी वगैरे. माझ्या उडत्या दृष्टीक्षेपातलं हे चित्र. उद्रेक झाला होता तिचा. जो कुणी सोबत होता त्याच्यावर. मोठ्या आचेवरच्या दुधासारखी ती भसाभसा नुसती उतू जात होती. कुण्याकाळापासूनचं किती काय काय साचवलेलं, दडपलेलं आज काळवेळ ठिकाणाचा मुलाहिजा न राखता सैरावैरा झालं होतं बहुतेक. कशाकशाचंही भान नव्हतं तिला. डोळ्यांच्या घळघळण्याचं, बेंबीच्या देठापर्यंत पोचलेल्या आवाजाचं, तिची रथसप्तमी आयती पहाणा-या समोरच्या गर्दीचं, त्या सोबत्याचं, स्वत:चं. उलट्या जशा थोपवता येत नाहीत तसं त्या वेळी फक्त आतलं साठवण्याच्या कक्षेबाहेर पोचलेलं बाहेर फेकलं जात होतं. हा सगळा निव्वळ ९०-१२० सेकंदांचा खेळ. मला ऐकू आलेला, काहींनी हौसेनं बघितलेला.

मला हिरवा कंदिल मिळाल्यावर मी निघाले, पुढे तिचं काय झालं असेल माहिती नाही. कारण काही असेल, घरात काही बिनसलं असेल, दोघातला बेबनाव असेल, तिस-याच कुणाचा तरी उद्वेग ह्याच्यासमोर उफाळला असेल, तब्येतीची काही तक्रार असेल, अपयश असेल, तिची स्वत:ची काही चूक असेल, जे काही होतं ते अत्यंत तीव्र होतं एवढं खरं. पण तिथून निघाल्यावर उगीचच मला वाटलं की त्या आवेगाच्या क्षणी तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर थोपटायला हवं आपण. तिच्या तिच्या काय त्या जखमा आणि आता त्यावर मीठ चोळल्यासारख्या ह्या अनोळखी नजरांच्याही जखमा. अर्थात पूर्णपणे खाजगी बाब चव्हाट्यावरच उघड झाल्यावर हे अटळ आहे. आच कमी झाली की उतू जाणं आपसूक खाली बसेल, पण ही चव्हाट्यावरची जखम खात राहील तिला. मनात असो, नसो, संयमाबरोबर काळवेळ आणि ठिकाण हे अहिमही बाळगावेच लागतात, नाहीतर रांगोळी फिसकटलीच समजायची. मुद्दा तोही आहे आणि,

मुद्दा हाही आहे की त्या अनोळखीसारखे काही चेहरे मला माझ्याभोवतीसुद्धा दिसतात. मित्र, मैत्रिणींमधे. असं वाटतं की त्यांनी खूप दडपलंय आत काहीतरी, तो कोंडलेल्या वाफेचा दाब चेह-यावर, सगळ्या वागण्यावावरण्यावर कंदिलावरच्या काजळीसारखा स्पष्ट जाणवतोय. त्यांनाही जवळ घ्यायला हवंय, पाठीवर हात फिरवायला हवाय. जवळ घेणं सोडा, नुसतं अलगद बोट टेकवलं तरी पिकलेलं गळू फुटल्यासारखे ते भळभळ वाहतील आणि सगळी साचलेली ठणक काही क्षणात विरून जाईल, ते मोकळे, निरभ्र होतील, खळखळून साजरं हसतील. आनंदानं हरखतील, दु:खानं रडवेले होतील. स्वत:च्या आणि इतरांच्याही. खरेखुरे. वेळच्या वेळी.

पण जर असं काही केलं तर हल्ली व्यक्तीवाद, स्पेसेसबिसेस देण्याच्या जमान्यात हे फारच अतिक्रमण होईल, त्यामुळं मनात लाख वाटलं तरी तसं करता येत नाही प्रत्यक्षात. दिसतंय ते तसं नाही हे दिसत असूनही ते तसंच आहे असं बजावून बघावं लागतं. पण हीसुद्धा मैत्रीच. असतात काही गोष्टी निशिद्ध. असो, त्या अनोळखीचे प्रश्न काय असतील ते असतील, पण सध्या तरी ती रिती होऊन हलकीफुलकी नक्की झाली असेल एवढं खरं. त्यापायी माझे मात्र हे शब्दांचे फुकाचेच बुडबुडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलस सई!
खरचं आहे. भरून आलेलें मन, रिकामं होण्यासाठी, शब्दाची एखादी फुंकरही पुरते बघ. आणि मग मात्र एकदम हलकं हलकं प्रसन्न वाटतं . नाहीतर हे ओझं सहन करणं मुश्कील होतं. पण देव त्यासाठी कुणाची तरी पाठवणी करतोच म्हणा.
मग ते नातलग असतील, मित्र-मैत्रीणी असतील , किंवा कधीतरी अपरिचितही.

फारच छान लिहिलयसं सई...
कधी कधी भिती वाटत असते लोकांमधे वावरताना कि कुणी चुकुन एखादी प्रेमळ विपू करु नए..स्वत:ला स्ट्राँग करताना असे बरेच मळभ मनामधे पचवले आहे ते खरच एका धक्क्याने वाहू लागतील या स्थितीपर्यंत... आजकाल खुप जवळच्या माणसांपासुन, प्रेमळ लोकांपासुन दूर राहायला बघते.. उगा नको त्या सवयी लागायची भिती वाटते Wink

मस्तं लिहिलंय, भिडलं. मलाही खूपदा असं वाटतं कि आपल्या आजुबाजूच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना काहीतरी सांगायचं असेल, कुठेतरी आत काही त्रास होत असेल पण कुणी कधी व्यक्तच होत नाही. हल्ली ना हे फॅशन सारखं झालंय , आपल्या गोष्टी कुणाशी शेअरच करायच्या नाहीत. अगदी जिवलग मित्र आहोत असं म्हटलं तरी फोनवर, भेटल्यावर खूप वरवरच्या गप्पा होतात असा अनुभव आहे. << आवेगाच्या क्षणी तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर थोपटायला हवं आपण, पण जर असं काही केलं तर हल्ली व्यक्तीवाद, स्पेसेसबिसेस देण्याच्या जमान्यात हे फारच अतिक्रमण होईल>> +१०००

छान लिहिलंय. एवढं तीव्र असेल तेव्हा मानसीक विकाराचीही शक्यता असते. असल्यास त्यात सुद्धा काही करता येत नाही तिसर्‍या व्यक्तीला.

खूप छान लिहीलंय सई! मला तर वाटतं प्रत्येकजण (बरेच) आतून पोखरलेले आहेत व मुखवटे धारण करून आम्ही किती सुखी , आनंदी आहोत हे दाखवण्याची स्पर्धेत उतरलेत. अनामिकाहीने योग्य शब्दात मांडलंय......

तुमच्या या अनुभवावरून आठवलं. एकदा पुण्यात रात्री गणपती बघायला गेलो होतो. पेरुगेटजवळच्या एका गल्लीत होतो. अचानक एका मुलीने तिच्या सोबतच्या मित्राला खाडकन कानाखाली मारली. तो तिला काही तरी समजावत असावा. ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. सोबत तिसराही एक मुलगा होता. तो त्यांच्याकडे पाठ करून उभा होता. काय प्रकार घडला होता कुणास ठाऊक!

सई, देवा शपथ सांगते मी वाक्य न वाक्य वाचून ढसा ढसा रडले..

त्यांनी खूप दडपलंय आत काहीतरी, तो कोंडलेल्या वाफेचा दाब चेह-यावर, सगळ्या वागण्यावावरण्यावर कंदिलावरच्या काजळीसारखा स्पष्ट जाणवतोय. त्यांनाही जवळ घ्यायला हवंय, पाठीवर हात फिरवायला हवाय. जवळ घेणं सोडा, नुसतं अलगद बोट टेकवलं तरी पिकलेलं गळू फुटल्यासारखे ते भळभळ वाहतील आणि सगळी साचलेली ठणक काही क्षणात विरून जाईल, ते मोकळे, निरभ्र होतील, खळखळून साजरं हसतील. आनंदानं हरखतील, दु:खानं रडवेले होतील. स्वत:च्या आणि इतरांच्याही. खरेखुरे. वेळच्या वेळी.

>>
आज या सगळ्याची नितांत गरज होती मला आणि तुझ्या लेखाने ते काम केलंय .. आय लव्ह यू सो मच!

टिना, तुझा प्रतिसाद वाचून अगदी अगदी झालं अगं ! आज काल मी फार क्वचित भळभळणार्‍या जखमा जगाला दाखवते कारण एकाने जरी मलमपट्टी करायची तयारी दाखवली तर त्या जखमांची सवय नाहीशी होईल याची भिती वाटते

अचानक एका मुलीने तिच्या सोबतच्या मित्राला खाडकन कानाखाली मारली. >>> असेच एक दृष्य मी पाहिले होते.. बाईकवर एक मध्यमवयीन जोडपे चालले होते अन उंच आवाजात बोलणा-या तिने त्याला मागून एक लगावली. कचाकचा भांडत ते तसेच पुढे गेले... आज ५-६ वर्षे झाले असतील हे पाहून.. पण त्या दिवशी शॉक बसलाच पण अजूनही कसेतरी वाटते. स्त्रिया जेव्हा पब्लीक मधे असे करतात तेव्हा नक्कीच वाफ कोंडलेली असते असे मला वाटते.
लेख चांगला लिहीला आहे सई.

टिना, तुझा प्रतिसाद वाचून अगदी अगदी झालं अगं ! आज काल मी फार क्वचित भळभळणार्‍या जखमा जगाला दाखवते कारण एकाने जरी मलमपट्टी करायची तयारी दाखवली तर त्या जखमांची सवय नाहीशी होईल याची भिती वाटते>> +१ रीये.. याकरता आता मला माणुसघाणी हा किताब सुद्धा मिळायला लागलाय..बट हू केअर्स.. ज्याचं जळतं त्यालाच कळत.. ही दोन दिसांची नाती नको वाटते मला.. प्रेम करायच तर झोकून करा नाहीतर पळा लेकहो..

सर्वांना मनापासून धन्यवाद.

रीया, टीना, काय बोलू यावर? प्रत्येकजण स्वत:ला सुचतील, रुचतील आणि मुख्य म्हणजे मानवतील असे मार्ग काढतोच. पण ह्या सगळ्यात स्वत:तला ओलावा मुळीच हरवू देऊ नका. मला माहितीये, हे नुसतं सांगणं सोपं, करणं फार अवघड आहे, पण तरीही मनापासून सांगते.

छान लिहीलय.
एकदा रात्री रेल्वे प्लॅटफॉर्म वर एक बाई दारुड्या नवर्याला मोठ्या आवाजात शिव्या देतांना बघितल. जाणारे येणारे काही गंमत म्हणुन बघत होते. पण त्या बाईचा उद्रेक अगदी जाणवत होता. आता आठवत नाही पण बहुतेक पगार दारुत उडवुन आलेल्या त्या नवर्याला ती झापत होती आणि मग काही वेळाने हे करुन काहीच उपयोग होत नाही म्हणुन मधुन मधुन रडत होती.

सई नेहमीप्रमाणेच मनाला भिडणारं लिहिलंस.. सार्वजनिक ठिकाणी असा भावनांचा उद्रेक होणे म्हणजे खरच स्त्री किती गोष्टींचा मनात भरणा करत असेल.. अस होणं हे साहजिकच आहे.
छान .. असच लेखन येवुदेत..

खरंच खूप सुंदर लिहिलंय... व्यथा, मनाची अवस्था...

गरज असते निचऱ्याची...नाहीतर कधी कधी स्फोट होतो... अन सगळंच संपत

>>>>. गरज असते निचऱ्याची...नाहीतर कधी कधी स्फोट होतो... अन सगळंच संपत <<<<
मला वाटते की दुर्दैवाने, वर कथेत लिहिलय, तो स्फोटच होता... निचरा नव्हे.... Sad
आधीच निचरा झाला, तर स्फोटाची शक्यता रहात नाहि...
अन स्फोट झाल्यानंतरच्या "हलकेपणाला" मी निचरा नाही म्हणू शकत Sad

परवाच लोकलमध्ये दोन बायकांच्या भांडणात हे असेच दुर्दैवी स्फोट होताना पाहिले. त्यातली एक बाई चालत्या गाडीतून उडी मारायला निघाली होती. तिला चार बायकांनी धरुन अडवले हे नशीब!
लेख छान आहे. शाळेत खरंतर गणित, भाषा, विज्ञानाच्या जोडीने थोडेसे मानसशास्त्र देखिल शिकवले पाहिजे (गुणांसाठी नव्हे)!

खूप छान लिहिले आहे.

याला एक दुसरी बाजू देखील आहे. माझा चेहराच तसा होता/आहे किंवा मी स्वतः फारशी बोलत नाही त्यामुळे असेल कदाचित; पण पूर्वी खूप लोक त्यांचा निचरा करायला माझ्याकडे यायचे. त्यांचा निचरा व्हायचा पण माझ्याकडे बराच परदुखाच स्टॉक जमू लागला. ते सगळं मळभ मला कुठेही उतरवता यायचे नाही. तसे करणे मला betrayal/गॉसिप वाटायचे. या सगळंयाचा माझ्यावरच वाईट परिणाम होऊ लागला. त्यामुळे आजकाल मी लोकांना अवोईडच करते. त्यांचे फ्री कौन्सेलिंग करायला मी काही मानसोपचार तज्ञ नाही...

सहमत आहे जिज्ञासा.

अ‍ॅमी, बरोबर आहे, हा मुद्दा लक्षातच आला नव्हता. पण तुम्ही लिहिल्यावर असे माझ्या ओळखीतले आश्वासक चेहरे तरळून गेले Happy त्यात काही माबोकरही आहेत Happy

छान लिहिलेय.. निचरा झाल्यासारखे..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 23 June, 2017 - 01:25
+10000
माझे मत सांगतो. सिग्नलला उभे असताना तुम्ही जे अनुभवले त्याने कुठे तरी या लेखाला त्याला वाट मिळाली. पुलेशु.

Pages