येतील का ते दिवस...?

Submitted by Suyog Shilwant on 17 October, 2016 - 03:47

माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.

मराठ्यांच्या घरात गणपती बसल्यावर मुलाण्याची नजमा सांज होताच आरती करायला घरा घरात धावायची. आणि गावाबाहेरच्या पिराच्या ऊरसाला ब्राह्मणाच्या वाड्यातून निवद नारळ यायचा. मुसलमानांची अनेक पोरं बैलगाडीतून निघणाऱ्या गणपतीच्या मिरवणुकीपुढे नाचायची. महारवड्या मांगवाड्यातल्या देवीच्या जागराला सारा गाव पहाटेपर्यंत जागायचा.

पोतराज झालेल्या नारू तात्याच्या हलगीला, कुंभारवाड्यातला संभा संभळाची साथ द्यायला कधी चुकला नाही. अन बागवानाच्या घरचा आबूलकाका साऱ्या गावाला शिरकुर्मा वाटून गावच्या मारुतीच्या जत्रत बेभान होऊन नाचायला कधी विसरलाही नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी कित्येक वर्षे गावाला सावली देणाऱ्या पारावरच्या कडुनिंबाचा पाला खायला साऱ्या अठरापगड जमाती एकत्र जमायच्या. अन वाडवडिलांनी घालून दिलेले सगळे सण उत्साहाने साजरे करायच्या. दोन पायल्या जुंधळ्यावर सालभर गावाची डोकी करणारा न्हाव्याच्या वस्तीवरचा विठू नाना दिवस उगवायला गावाकडं सरकायचा. पेरणीच्या दिवसात कुरीचा फण, कुळवाचं जू तासायला एका हाकत वश्या सुतार हजर राहायचा.
हातात लाकडी फिरक्या घेऊन मांगवड्याच्या बाजूला घायपाताच्या वाकाचा दोर बनवत पीळ देत बसलेला पांडू तात्या त्याच्या बायकोसोबत न चुकता दिसायचा. उन्हं वर आली की गुरवाची बाळी बुट्टी घेऊन आळीतनं पीठ गोळा करत सुटायची.

गोठ्यात व्यालेल्या म्हशीचं फेसाळ दूध चरवीत भरून डोक्यावर चुंभळ करून घरामागच्या महारवाड्यात वाटून त्यांच्या चुलीवर कढणारा काळा चहा पांढरा करणारी हौसानानी माझ्याच खेड्यात जन्मली. आणि सुईन बनून साऱ्या गावाच्या पोरांची सुखरूप बाळंतपणे करून त्यांना दुनियेच्या सुरक्षित रंगमंच्यावर सोडून स्वतः आयुष्यभर वांज राहिलेली यशवदा म्हातारीही माझ्याच गावच्या महारवड्यातली.

सगळंच सुखी होतं. आलबेल होतं असं मी कधीच म्हणणार नाही. तिथंही जन्मताच पाचवीला पुजलेली जीवघेणी दुःखं होती, गावकुसाबाहेचं भकास जगणं होतं, गरिबीनं पिचलेले हाडामासांचे हलणारे देह होते, आडोशाला सूड धरून बसलेले नासके मेंदू होते. पण ते मला कधीच दिसत नाहीत. फक्त मोठेपणा भरून वाहणारे मेंदूच मला दिसतात. प्रचंड जीवघेण्या दुःखातूनही जीवनाच्या मागं दंडाच्या बेडक्या फुगवून धावण्याची ताकद मला याच खेड्यानं दिलीय. म्हणूनच खेडं सोडून कित्येक वर्षे झालीत तरी माझ्या लेखनाला संस्काराचं कुंपण घालण्याचं बळही मला माझ्याच खेड्यानं दिलंय.
आजही गावाबाहेरून वाहणारी नदी जेव्हा गावच्या वळणार डोह करून थांबलेली दिसते तेव्हा ती मला अजूनही साद घालत राहते.
आता खेडी बदललीत. गावागावात यंत्रांची खडखड आलीय. बलुतेदारी शेवटच्या घटका मोजत उध्वस्त झालीय.
मिसरूड फुटलेली पोरं गळ्यात आणि हातात वजनी दागिने घालून, पुढाऱ्यांच्या नादी लागून चौका चौकातल्या पोस्टरवर झळकलेली दिसतात. तुकडे पडलेल्या जमिनीच्या बांधावरून होणारी भांडणे आता कोर्टापर्यंत पोह्चलीत.
पुढाऱ्यानी भावकी भावकीत गट तठ पाडलेत. खेड्यात दारूचा महापूर आलाय. क्वार्टर, ब्र्यांडी, व्हिस्की, रम असे आधुनिक शब्द आता खेड्यात चांगलेच रुजलेत. आता नदीवरून भल्या पहाटे घागरी भरून पाणी वाहणारी माणसं दिसत नाहीत.

तर एकेकाळी दुधाचा रतीब साऱ्या गावाला लावणारी हौसानानी सुनांच्या राज्यात घरातल्याच एखांद्या कोपऱ्यात एक कप बिन दुधाच्या चहालाही महाग होताना दिसते. आणि आयुष्यभर उन्हातान्हात राबून एकेकाळी जीवापाड जपून गोठ्यात ठेवलेल्या लाकडी औजारांना जेव्हा घरातीलच एखांदी नवीन नांदायला आलेली सून जेव्हा पाणी तापवायच्या चुलीत मोडकी कुरी आणून घालते, तेव्हा जीर्ण झालेल्या देहाचा थकलेला नाना हताश होऊन बघताना एखांद्या अंगणात दिसतो.

म्हणूनच माणसातला माणूसपणा संपून त्यांच्यातला आक्रमक होत निघालेला पशु आता गावाचं गावपण संपवायला निघालेला मला स्पष्ट दिसतोय.

येतील का ते दिवस पुन्हा...प्रेम आणि आपुलकीचे......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण सुशिक्षित तर झालो पण माणुसकी आणि आपुलकी हरवत गेलो...एकंदरीत हेच म्हणावं लागेल. धन्यवाद तृष्णा आपल्या प्रतिसादा बद्दल...