मोहेंजोदडो - हिंमतीला दाद ! (Movie Review - Mohenjo Daro)

Submitted by रसप on 17 August, 2016 - 03:49

पूर्वी हृतिक रोशन मला विशेष आवडायचा नाही. 'कहो ना प्यार हैं' हा एक 'जस्ट अनदर मूव्ही' होता आणि त्यातला हृतिकसुद्धा 'जस्ट अनदर स्टार किड'. पण नंतरच्या ३-४ सिनेमांत त्याने जरा वेगळेपणा दाखवला. मात्र लगेच पाठोपाठ ६-७ सुमार सिनेमेही केले. त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष कुतूहल कधी वाटायचं नाही.
पण फरहान अख्तरच्या 'लक्ष्य' नंतर तो बदलला बहुतेक. त्यापुढचे त्याचे धूम, क्रिश, काईट्स, जोधा अकबर, जिंदगी ना मिलेगी दोबारा, गुजारीश मी आवर्जून पाहिले आणि मला तो आवडायला लागला. हो, 'बँग बँग' सुद्धा पाहिला मी ! आणि लगेच तो त्याला माफही करून टाकला ! हृतिकच्या अभिनयाला मर्यादा आहेत. तरीही तो स्वत:ला आव्हानं देण्यात कमी पडत नाही. नुसती आव्हानंच देत नाही, तर स्वत:च स्वत:ला दिलेल्या ह्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरं जाण्यासाठी तो मेहनतही घेतो. भले त्यात त्याला यश मिळो अथवा न मिळो. पण त्याचा प्रयत्न मात्र कधी कमी पडलेला वाटत नाही.

ह्या आठवड्यात 'रुस्तम' आणि 'मोहेंजोदडो' एकत्रच रिलीज झाले. अक्षय कुमार आणि हृतिक दोघेही आवडते. दोन्ही सिनेमे पाहायचे होते. पण रिलीज होण्याआधीपासूनच 'रुस्तम'ची स्तुती आणि 'मोहेंजोदडो'वर टीका सुरु झाली. हे म्हणजे 'पोटात पोर अन् बाहेर बारसं' अश्यातला प्रकार होता. 'मोहेंजोदडो'चं अक्षरश: बिनडोक ट्रेलर पाहून खरं तर माझंही डोकं फिरलंच होतं.
'फर्क हैं महम, तुझे मोहेंजोदड़ो पर राज्य करना हैं और मुझे सेवा'
'इस नगर से कोई नाता हैं मेरा'
'यह मेरा नगर हैं. मोहेंजोदड़ो !'
असे सगळं कथानक उघड करणारे संवाद ट्रेलरमध्ये घेण्याचा मूर्खपणा कुणी कसं काय करू शकतं ? पण केला तर होताच. त्यामुळे लोकांची सिनेमाबद्दलची अर्धी उत्सुकता संपून गेली होती. त्यानंतर सिनेमातल्या पात्रांचे कपडेपट, इतर वेशभूषा, बोली, संगीत, नृत्यं वगैरे बाबींवर टीका करून ह्या 'पिरीयड ड्रामा' ची अगदी टिंगल केली गेली. इतकं, की हे सगळं जाणीवपूर्वक, ठरवून केलं जात आहे की काय, असा संशय यावा !

पण माझं नक्की ठरलेलं होतं. मी रुस्तम आणि मोहेंजोदडो, दोन्ही बघणार होतो. नेमकं शुक्रवार ते रविवार बाहेरगावी जावं लागल्याने ते वेळेत जमलं नाही. तरी परत आल्यावर दोन्ही सिनेमे आवर्जून पाहिले. माझे अंदाज खरे ठरले. 'रुस्तम'ला उगीच डोक्यावर घेतलं गेलं आहे आणि 'मोहेंजोदडो'ला उगीच लाथाडलं गेलं आहे. प्रत्यक्षात दोघेही सारखेच चांगले आहेत किंवा सारखेच वाईट आहेत. किंबहुना, दोघेही सारखेच 'सामान्य' आहेत.

mohenjo-daro-movie-images.jpg

'मोहेंजोदडो'चं कथानक सांगायची काही आवश्यकता नाहीच आहे. बिनडोक ट्रेलर्समधून ते आधीच सर्वांना समजलेलं आहे. तरी एक औपचारिकता !
'मोहेंजोदडो' ह्या नगरावर महम (कबीर बेदी) ची हुकुमत चालते आहे. ही सत्ता त्याने ती दगाफटका करून बळकावलेली असते. जवळपासच्या लहान लहान गावांतून व्यापारी, शेतकरी मोहेंजोदडो नगरात आपल्या व्यवसायासाठी येत असतात. तसाच 'आम्री' गावातून 'सर्मन' (हृतिक रोशन) येतो. ही कहाणी त्याचीच आहे. इथे आल्यावर त्याला दिसतं की ह्या अत्याचारी राजवटीमुळे इथला सामान्य माणूस खंगत चालला आहे. त्याला जाणवतं की ह्या जागेशी त्याचं काही तरी जुनं आणि घट्ट नातं आहे.

हे नातं नक्की काय आहे, हे आपल्याला आधीपासूनच माहित असतंच. पण ज्या प्रकारे ते उघड केलं जातं, ते इतकं बाळबोधपणे आहे की काय सांगावं ! भले तुमचा सस्पेन्स कितीही फुसका असला, तरी तो कहाणीचा गाभा आहे ना ? त्याला काही महत्व नको द्यायला ? ती गोष्ट खुद्द सर्मनला समजते तो प्रसंग तर बाळबोध आहेच, पण जेव्हा सर्मनचं सत्य सगळ्या नगरवासियांना सांगितलं जातं, तो प्रसंग तर अजूनच फुसका बार झाला आहे. एक तर असंच सगळं कथानक आपण आधी अनेकदा पाहून झालेलं आहे. नुकतंच 'बाहुबली'नेही हीच कहाणी मोठ्या रंजकतेने (अर्धीच) सांगितली आहे. त्यात तुमची प्रसिद्धी सपशेल गंडली आहे. त्यात तुमच्यावर उतावळी टीका होते आहे आणि असं सगळं असताना तुम्ही स्वत:च तुमच्या सादरीकरणात गटांगळ्या खात आहात. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास !

खरं तर सिनेमाची सुरुवात खूप रोमांचक होते आणि एकंदरीतच सगळेच अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस मस्त जमून आले आहेत. शेवटी शेवटी व्हीएफएक्स जरासं कमी पडले आहेत, पण तेही अगदीच पिचकवणी झालेले नाहीत. शेवट तर चांगलाच नाट्यमयही झाला आहे. 'पाण्यातून झेप मारुन बाहेर येणारी मगर' हाही एक विनोदाचा विषय झाला होता, पण तो प्रसंगही जबरदस्त झाला आहे.
जे प्रचंड फसलं आहे ते म्हणजे कथाकथन आणि संगीत.
कथानक त्याच त्या ठराविक वळणांनी जात राहतं. तेच ते पहिल्या नजरेत प्रेमात पडणं, तेच ते खलनायकाने प्रेयसी-प्रियकराच्या मार्गातला अडसर बनणं, तोच तो विश्वासघात, तोच तो जन-उठाव आणि तीच ती अच्छाई वि. बुराई अशी लढाई. पण एक चांगला दिग्दर्शक, एक नेहमीचंच कथानकही वेगळ्या प्रकारे सांगून रोचक, रंजक बनवू शकतो. गोवारीकरांचं गणित नेमकं काय होतं, कुणास ठाऊक !

संगीत तर रहमानसाठी लाजीरवाणं आहे, असंच क्षणभर वाटलं. पण पुढच्याच क्षणी मला 'जब तक है जान' आठवला. त्याहून जरा(संच) बरं, इतकीच समाधानाची बाब ! शब्द जावेद अख्तर साहेबांचे आहेत, ही अजून एक आश्चर्यमिश्रीत निराशा. खरं तर दोनच गाणी आहेत सिनेमात आणि एरव्ही ती दुर्लक्षितही केली असती. पण रहमान आणि अख्तर असताना ते जमत नाही. You expect something far better. गाणं सुरु झालं की कधी एकदा संपतंय, असं वाटणं ह्यासाठी रहमान आणि अख्तर जन्मले नाहीत. त्यासाठी इतर बरीच भुक्कड पिलावळ आहे की !

नवा चेहरा (हिंदीसाठी) पूजा हेगडे, 'चेहरा' म्हणूनच चांगला आहे. बाकी सगळा आनंदी आनंदच आहे. तर घसा खरवडून खरवडून बोलणारा कबीर बेदीही खूप थकलेला जाणवतो. अरुणोदय सिंग व इतर सहाय्यक कलाकार आपापलं काम व्यवस्थित करतात. विशेष लक्षात राहणारं असं कुणी नाही.
हृतिक रोशन मात्र पुन्हा एकदा त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांनी मन जिंकतो. हे काही त्याचं सर्वोत्तम काम म्हणता येणार नाही पण कुठे काही कमी तरी पडणार नाही, ह्याची त्याने काळजी नक्कीच घेतलेली आहे.

All in all, 'मोहेंजोदडो चांगला आहे की वाईट ?' Let's say, Average. तरी दोन गोष्टींवर बोलणं महत्वाचं वाटतंय -

१. मोहेंजोदडोवर झालेली प्रदर्शनपूर्व टीका

ही सगळी टीका पात्रांचे कपडेपट, इतर वेशभूषा, बोली, संगीत, नृत्यं वगैरे बाबींवर होती. त्या काळात कपड्यांना शिवण नसे, नुसतं एखादं कापडच गुंडाळत, नक्षीकाम, प्रिंटींग तर अगदीच नसे; ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे. तरी सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून हे सगळं समजून घ्यायला हरकत नसावी. तर संगीत, नृत्यं ह्या तर खूपच किरकोळ गोष्टी आहेत. खरं सिनेमावर टीका करण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. बुळबुळीत कथानक, त्याचं बोथट कथन, काही लोकांचं सामान्य दर्ज्याचं काम ह्यांवर बोला की. मात्र त्यांवर बोलण्यासाठी आधी तो पाहायला तर हवा !

२. रुस्तम वि. मोहेंजोदडो

दोन्ही सिनेमे पूर्णपणे वेगळ्या धाटणीचे असले, तरी त्यांची तुलना स्वाभाविक आहे कारण बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उणीवा रुस्तममध्येही आहेत आणि मोहेंजोदडोमध्येही. 'रुस्तम' हा त्या मानाने कमी आव्हानात्मक विषय होता असं मी म्हणीन. त्याला एका सत्यघटनेची पार्श्वभूमी होती, त्यामुळे कथानक बहुतांश तयारच होतं. 'मोहेंजोदडो' जास्त आव्हानात्मक होता कारण सगळंच अगदी शून्यातून तयार करायचं होतं. 'पिरीयड ड्रामा' दोन्ही आहेत. संगीत आणि कथाकथनही दोन्हींचं फसलं आहे. पण दोन्हींचा विचार केला तर 'सृजनशील प्रायोगिकता' ही 'मोहेंजोदडो'मध्ये जास्त आहे. सत्यघटनांवर, पात्रांवर आधारित सिनेमांचं तर सध्या पीकच आलं आहे. रुस्तमने कोणता मोठा तीर मारला आहे ? धाडस एखाद्या अस्पर्श्य कथानकाला हात घालण्यात जास्त आहे. ते गोवारीकरांनी केलं आहे. एखादा ऐतिहासिक सिनेमा बनवणं वेगळं आणि एखाद्या अगदी प्राचीन काळाला पूर्णपणे improvise करणं वेगळं. हे भारतात तरी सहसा कुणी करायला धजावत नाही. कारण भरमसाट संदर्भ उपलब्ध असलेला ऐतिहासिक विषयच आपल्याला झेपत नाही. भन्साळीचा बाजीराव 'वाट लावली' करत मवाली नृत्य करतो आपल्याकडे !
असो.

एक मात्र खरं आहे, अजून खूप चांगलं करता आलं असतं आणि करायला हवंही होतं.
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद द्यायला हवी ना ?
मी तरी देतो आणि रुस्तमपेक्षा मोहेंजोदडोची शिफारस करतो.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/08/movie-review-mohenjo-daro.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाच्या हिंअतीला दाद?

अहो प्रेक्षकांक्ष्ही हिंमत दाद देण्यासारखी आहे.

बोबड्या ॠतिक सारखं,

म्मै तुम्म सबक्की द्दाद देत्ता हू.... ( हो तो असेच जोर देत बोलतो).

मला या हल्लीच्या मुलींची स्माईल देत, ओठ वाकडे न करता बोलायची पद्धत अजिबात आवडत नाही (मुली म्हटलंय, पण त्यात एक टायगर श्रॉफ पण धरा. तो तर भयाण्पद्धतीने बोलतो) . >>> Lol Lol Lol

Pages