माझ्या वाईट सवयी १ - चोरी

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2015 - 03:41

आयुष्यातील पहिली चोरी कधी केली आठवत नाही. आयुष्यातील शेवटचा वाह्यातपणा कधी केला आठवत नाही. पण आठवेल तसे सांगतो. काही एकट्याचे पराक्रम आहेत, तर बरेचसे मित्रांच्या टोळक्याने केलेले..

किशोर वयात आपले फंडे वेगळेच असतात. चोरी करणे हे गैरकृत्य कमी आणि धाडसाचे काम जास्त वाटते. अंगात किडा असणे आणि डेअरींग असणे हे समानार्थी शब्द समजले जातात. तेव्हाचे कधीचेतरी हे किस्से. आज सहज व्हॉटसपग्रूपवर विषय निघाला म्हणून उगाळले गेले, म्हटले लिहून संकलित करूया..

सुरुवात बालपणापासून करूया. वय वर्ष साधारण आठ-दहा असावे.. त्या वयातही आम्ही एवढे वस्ताद होतो की दुकानदाराची पाठ वळताच बघता बघता बरणीतले चॉकलेट काढायचो. आमच्या बिल्डींगमधले माझे दोन जवळचे मित्र या कलेतील माझे पहिले गुरू होते म्हणू शकतो. त्यांच्याच सोबतीने दोन तीन वेळा मी स्वत: देखील ही हस्तकला आजमावली होती.
पुढे मग मोठा ग्रूप बनला. अर्थात, सारेच या कलेत माहीर नव्हते, पण मोहीम फत्ते नेण्यास गरज सर्वांचीच होती. गर्दी करून जायचो आणि दुकानातून ढोकळा, गुलाबजाम, फरसाण, पुरणपोळ्या वगैरे नाना पंचपक्वांनांची रेडीमेड पाकिटे ढापायचो. त्यात एखादेच काय ते विकत घेतलेले असायचे. ते देखील एकेक रुपया कॉंट्रीब्यूशन काढून. तिथून मग जवळपासचे एखादे गार्डन वा सायकलीला टांग मारून थेट राणीबाग गाठायचो आणि पार्टीऽऽऽऽऽ..!!

राणीबागेत विदाऊट तिकीट, कंपांऊड ओलांडत शिरायचा मार्ग माहीत होता हे इथे सांगायला हरकत नाही.

पुढे मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये याची फ्रिक्वेन्सी वाढली, दुकानदारांच्या लक्षात येऊ लागले, आमच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले, आणि ही धमाल संपली!

हाच ग्रूप गॅंगचा फंडा मग फॅशन स्ट्रीटला वापरू लागलो. कपडे, बेल्ट, पाकिटे, अगदी पर्स आणि लेडीज सॅंडलही चोरलेत. अशीच गर्दी करून जायचो आणि पिशवीत टाकायचो. १००-१५० रुपयाचे काहीतरी घ्यायचो आणि किमान हजार रुपयांचा माल फुकटात घेऊन जायचो.

आजही हे घरी समजले तर खूप शिव्या पडतील. तेव्हा समजले असते तर तुडवलो गेलो असतो. घरून तर घरून, पण त्या आधी त्या फॅशन स्ट्रीटच्या विक्रेत्यांकडूनही जबरी पडली असती. त्यामुळे दोन-तीन सीजन गाजवले, आणि हा धोका लक्षात येताच थांबलो.

बाकी गणेशोत्सव-नवरात्रीत दुपारच्या वा रात्रीच्या शांत अन निश्चल वेळी, सार्वजनिक मंडळांच्या पेटीतील पैसे काड्या करत काढणे आणि त्याला देवाचा प्रसाद म्हणून स्विकारणे असे सीजनल प्रकार चालू होतेच.

तसेच आझाद मैदानावर क्रिकेट खेळताना एक नजर ईतरांच्या बॅट बॉलवर असायची. लागली हाताला की उचलली. मग त्यानंतर ती आमच्या गल्ली क्रिकेटची शान वाढवायची, किंवा शेजारच्या गल्लीत विकली जायची.

चोरीचा माल विकण्यावरून आठवले, आमच्या बिल्डींग शेजारी एक कंपनी होती. कसली ते माहीत नव्हते, पण लोखंडाचा बराचसा कच्चा माल एके ठिकाणी पडलेला असायचा. आम्ही क्रिकेटचा बॉल तिथे मारून तो काढायला चढायचो, आणि जोडीला जमेल तितके लोखंड सोबत घेत उतरायचो. दोन चार फेर्‍यात पुरेसे जमले की ते दूरगावच्या भंगारवाल्याचा विकायचो. अगदीच पावभाजी नाही तर किमान वडापावची पार्टी तरी सुटायची. एखाद्या अश्या सेलिब्रेशन डे ला आपण क्रिकेट खेळायला नसलो, आणि पार्टीला मुकलो, तर जीव खूप हळहळायचा. कारण फुकट खाण्यातील मजा काही औरच. आणि हा तुलनेत आजवरचा सर्वात कमी रिस्की प्रकार होता.

फुकट खाण्यावरून आठवले, लग्नात घुसून फुकट खाणे ही देखील एक प्रकारची चोरीच!
पण हे धंदे ईंजिनीअरींगला. स्टडी नाईटच्या नावाखाली कॉलेज आणि हॉस्टेललाच पडीक असायचो. खाण्यापिण्याची सोय जर जेमतेम मिळणार्‍या पॉकेटमनीमधून करू शकलो नसतो, आणि त्यासाठी घरी एक्स्ट्रा पैसे मागितले असते, तर या स्टडी नाईटस घरच्यांनी बंद केल्या असत्या. मग काय, शिक्षणासाठी काय पण! पापी पेटका सवाल म्हणत जराही लाज शरम न बाळगता नीटनेटके कपडे घालून कोणाच्याही लग्नात घुसू लागलो. आमचे कॉलेज जिथे होते तो मुंबईतील मध्यवर्ती विभाग असल्याने विवाह कार्यालयांना कमी नव्हती. पोटभर खायचो आणि वधूवरांना भरभरून आशिर्वाद देत बाहेर पडायचो.

पण रोज रोज दिवाळी नसते. हर दिन संडे नही होता. तसेच लग्नेही काही रोज रोज नसायची. असली तरी त्याच त्याच हॉलमध्ये जाऊ शकत नव्हतो.. पण जो पोट देतो, तोच अन्नही देतो. जो भूक देतो, तोच ती मिटवायचे मार्गही दाखवतो.
मेसमधून अंडी चोरणे आणि ती हॉस्टेलवर मित्रांच्या रूमवर आणून उकडणे हा एक साधा सोपा मार्ग. रात्री झोपायच्या आधी कूलरचे पाणी भरायला म्हणून आम्ही मोठा थर्मास घेऊन मेसमध्ये जायचो. तो अर्धा पाण्याने भरत त्यात अलगद अंडी सोडायचो. मेसची बत्ती गुल झाली असल्याने तिथे जवळच झोपलेल्या कर्मचार्‍यांना जराही पत्ता लागायचा नाही. मग ती अंडी रूमवर आणायचो, आंघोळीची बादली पाण्याने भरत त्यात पाणी तापवायचा हिटर सोडायचो, आणि त्यात ती अंडी उकडून घ्यायचो. मीठ-मसाला लावून, उपलब्ध असल्यास बारीक चिरलेल्या कांद्यासह, तीन-चार अंडी खाल्ली की एका रात्रीची सोय झाली.

पुढे हा प्रकार आजूबाजूच्या पोरांमध्येही प्रचलित झाला. मेसच्या अंड्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटू लागली. त्यातच काही मुर्खांना अंड्याच्या कवचाची योग्य विल्हेवाट लावणे जमले नाही आणि एक दिवस हा प्रकारही बंद झाला.
रात्रीची खायची सोय बंद झाली तसे पहाटेच पोटातील कावळे किलबिलाट करू लागले. मग काय, पुन्हा अन्नाच्या शोधात भटकंती. जवळच सापडले. एक छानसे दूध सेंटर. दूधाच्या पिशव्या आमची वाट बघत पडल्या असायच्या. या आणि उचला आम्हाला. आम्ही दोनच उचलायचो. रूमवर आणून मस्त तापवून टायगर बिस्किटसह आस्वाद घ्यायचो. या आधी घरी कधी दूध प्यायलेलो ते आठवत नाही, पण आता फुकट ते पौष्टिक म्हणत ते ही गोड मानून घ्यायचो.

आता खाण्यापिण्याचा विषय चालू आहे तर शाळेच्याही काही आठवणी आहेत.
खरे तर झाडावरची फळे पाडण्याची आणि चोरण्याची मजा आमच्या आधीच्या पिढीने किंवा ज्यांचे बालपण गावात गेले त्यांनी कदाचित जास्त घेतली असावी. पण आमच्या शाळेच्या परीसरात आवळे आणि जाम यांची चिक्कार झाडे असल्याने ते सुख आमच्याही नशिबी होते. आता ती सारी झाडे खाजगी होती, पण कंपाऊंडवरून आत उडी घ्यायची डेअरींग अंगात उपजतच होती. त्या बंगल्यांच्या कंपाऊंडच्या आधीही शाळेचे कंपाऊंड ओलांडावे लागायचे. मधल्या सुट्टीत असे शाळेच्या बाहेर जाणारे, ते देखील चोरीसाठी, मी आणि माझा एक मित्र, असे आम्ही दोघेच. जमा करून आणलेला माल मात्र वर्गात सर्वांना वाटायचो. पण अगदीच फुकट नाही, तर त्याबदल्यात त्यांच्याकडून ईतर काही मिळवायचो.

बस्स मग एके दिवशी कधी ना कधी जे घडणारच होते ते घडले. मित्राच्या दगडाने खिडकीची काच फुटली. शाळेतील एकूण एक वर्गात नोटीस फिरली. ज्या कोणी अज्ञात मुलांनी हा खोडकरपणा केला होता त्यांना तंबी देण्यात आली. आमच्या वर्गात नोटीस वाचली जात असताना काही मुलांनी आमच्याकडे बघत नेत्रपल्लवी केली. मात्र आमची नावे अज्ञातातच राहीली. आणि अज्ञानात सुख असते असे का म्हणतात ते आम्हाला समजले.

पण त्यानंतरही आम्हा दोघांची डेअरींग बघा. साधारण महिन्या दोन महिन्यांनी आम्ही एका कंपांऊंडमधील फणस तोडला. हाताने तोडता येईल एवढ्या उंचीवरच लागलेला. पण मोठ्या कष्टानेच तोडला. सकाळी तोडला. दिवसभर एका सिक्रेट जागी लपवून ठेवला. आणि संध्याकाळी घरी घेऊन निघालो. वाटेत काही जाणकारांनी खबर दिली की हा कच्चाच आहे आणि फक्त भाजी बनवायला कामाला येईल. तर आईला नेऊन द्या. अर्थात हि शक्यता बाद होती. आमच्या आयांनी त्या फणसाच्या जागी आम्हालाच चिरला असता. मग एरीयातीलच एका भाजीवाल्याला तो विकला.

तर ही चोरीची कला काही सण ही साजरे करायला कामी यायची. एक म्हणजे रंगपंचमी. कुठल्याश्या फॅक्टरीमधून आम्ही रंगाच्या पावडरीचे पॅकेटस चोरायचो. एकदम पक्का कलर. कलर गया तो पैसा वापिस. फॅक्टरीत तो नेमका कश्याला वापरायचे काही कल्पना नाही, कारण ती फॅक्टरी कसली होती हेच मुळात माहीत नव्हते. पुढे कधीतरी थोरामोठ्यांकडून समजले की त्या रंगात घातक केमिकल्स असण्याची शक्यता होती. तसे ही चोरीही बंद केली.

आणखी एक सण म्हणजे ३१ डिसेंबर, वर्षाची शेवटची रात्र. मोठी माणसे नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करायची. आम्ही बच्चे कंपनी नाचून, फटाके फोडून आणि जिंगलबॅंग नामक बुजगावणे जाळून करायचो. सांताक्लोजला आम्ही जिंगलबॅंग बोलायचो. अजब वोकॅबलरी. तर हे माणसाच्या आकाराचे बाहुले. जुन्या शर्टपॅंटमध्ये गवत कोंबून बनवले जायचे. वर डोक्याच्या जागी गवतानेच भरलेली दूधाची पिशवी आणि त्यावर मुखवटा. यात काही फटाकेही भरले जायचे, जेणेकरून जाळताना ते अधूनमधून फुटतील आणि आनंद द्विगुणित करतील.
तर इथे सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक गल्लीबोळात असे कित्येक बुढ्ढे बनवले जायचे. अगदी २०-२२ डिसेंबर पासून बनवून कुठेतरी टांगले जायचे. आम्ही ३०-३१ तारखेला दुपारच्या वेळेस बाहेर पडायचो आणि जिथे जिथे हे बेवारसपणे पडलेले दिसायचे तिथून सरळ चोरून आणायचो. एखाद दिवस लपवून ठेवायचो. आणि थेट ३१ च्या बारा वाजताच जाळायला बाहेर काढायचो.

हे किस्से त्यामानाने हलकेफुलकेच पण चोरीचे काही सिरीअस किस्से आठवायचे म्हटल्यास एक फसलेली पेपर चोरी.
ईंजिनीअरींग ड्रॉईंग, आणि त्यातील भुमिती. मला जमायचे पण कैक मित्रांचे धाबे दणाणले होते. त्यांच्या डोक्यावर माझे डोके आपटून झाले तरी त्यात काही शिरत नाही हे लक्षात आल्यावर आम्ही एक सिरीअसली डेंजरस प्लान बनवला. पेपरचोरीचा. कोणते सर पेपर काढणार आहेत हे माहीत होते. जर अमुक तमुक दिवशी त्यांच्या केबिनमध्ये शोधाशोध केली तर कच्चापक्का स्वरुपातला पेपर हाती लागू शकेल असे कॅलक्युलेशन मांडले. ठरलेल्या दिवशी लंचब्रेकला सात आठ जणांना ठराविक अंतराने इशारा देण्यास उभे करत आम्ही दोघे जण सरांच्या केबिनमध्ये शिरलो. अर्थात केबिन कुलूप लावून बंद होते, पण वरतून ओपन होते. म्हणजे कोणी अचानक आल्यास आम्हाला चपळाईने निघणे शक्य नव्हते. आणि हाच धोका होता. तरी तो धोका उचलत आम्ही जवळपास दहा ते बारा मिनिटे शोधाशोध केली पण काही हाती लागले नाही. अन्यथा आमच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला असता.

असाच एक सेम टू सेम पण तुलनेत कमी धोकादायक प्रकार ईंजिनीअरींगच्याच आणखी एका वर्षाला केला होता. कमी धोकादायक यासाठी की केबिनचा दरवाजा उघडाच होता. पण यावेळचा हेतू वेगळा आणि शुद्ध चोरीचा होता. त्या सरांच्या केबिनमध्ये कॉलेजच्या लायब्ररीची कित्येक पुस्तके रचून ठेवली होती. आमचा बस्स त्यावरच डोळा होता. कसलेही विघ्न न येता मिशन सक्सेसफुल झाले आणि तब्बल दोनेक हजारांना ती पुस्तके सेकंडहॅंड बाजारात विकली गेली.

जाता जाता एक शेवटचा किस्सा ज्यात थेट पैश्यांचीच चोरी होती. पीसीओचे लाल पिवळे डब्बे उघडायची मास्टर की हाती लागली होती. सगळेच नाही पण ३०-४० टक्के डब्बे तरी उघडायचे. ते शोधत आम्ही कुठे कुठे फिरायचो. अर्थात आजूबाजुला रहदारी आणि वर्दळ नाहीये हे देखील बघणे गरजेचे होते. कारण रिस्की प्रकार होता. एक लॉक उघडला की आत आणखी एक लॉक उघडायचा असायचा. पण एकदा खुलला की एकेक रुपयांचे सरासरी पाच-सहाशे कॉईन खणखण करत आमच्या खिशात पडायचे.
थोड्याच दिवसांत अक्कल आली. यात पकडलो गेलो तर कदाचित बाराच्या भावात जाऊ. आपण चांगल्या घरची मुले आहोत आणि असल्या लफड्यात आपली करीअर डावावर लावण्यात अर्थ नाही. तर या नादातूनही बाहेर पडलो.

एकंदरीत आजवरच्या सर्वच प्रकरणात, कुठे पकडलो गेलोय, कुठे मार पडलाय, कुठे मानहानी झालीय असे कधीच घडले नाही हे एक कौतुकास्पद!
त्यामुळे कधी कधी वाटते की मी ईंजिनीअर झालो नसतो तरी एखादा छोटामोठा चोर बनत आपले आणि आपल्या बायकापोरांचे पोट भरलेच असते.

तर हे एक माझे झाले, आता तुम्हाला कोणाला ईथे लिहून हलके व्हायचे असेल तर व्हा बिनधास्त.
कसली भिती वाटत असल्यास सर्वांसाठी एक कॉमन डिस्क्लेमर टाकतो.
डिस्क्लेमर - या लेखात वा प्रतिसादांत, आलेले वा येणारे, बहुतांश वा सर्वच, किस्से वा कथा, काल्पनिक वा आतिशयोक्तीपुर्ण, असण्याची दाट शक्यता असून एखादी घटना खरी आहे आहे याचा सबळ पुरावा असेल तरच आक्षेप उचला. अन्यथा जय हिंद, जय महाराष्ट्र!
तुमचाच ऋन्मेऽऽष

अवांतर तळटीप - धागा काढताना शब्दखुणात चोरी टाकलेले पण ते लेखनचोरी असे दिसू लागले, जी मी कधी केली नाही. म्हणून शब्दखुण काढून टाकली.

..................................................................................................

वैधानिक इशारा - चोरी करणे वाईट आहे. कायद्याने गुन्हा आहे. पकडले गेल्यास शिक्षा होऊ शकते!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे एकदा कोणीतरी कोकणात कोणाच्या तरी बागेतले काहीतरी चोरले होते (परवानगीशिवाय घेतले होते) अशा आशयाचा लेख लिहिला होता.. त्यावर मी आश्चर्य व्यक्त करणारी एक कॉमेंट टाकली होती तेव्हा "यात काही विशेष नाही" असे त्या अनुभवाच्या समर्थनार्थ बरेच लोकानी लिहिले होते. त्यामुळे आजच्या युगात बहुतेक "चोरी" ची व्याख्या सब्जेक्टीव झाली आहे असे वाटत आहे.
"ज्यावर आपला हक्क नाही आणि जे दुसर्‍याच्या मालकीचे आहे ते त्याच्या परवानगीशिवाय घेणे" ही चोरीची व्याख्या बहुतेक मोडीत निघाली आहे. कालाय तस्मै नमः

ऋनम्या तुम्हारा चुक्याच !

चोरी अजाणतेपणी, न कळत्या वयात केली गेली असती / हातून झाली असती तर समजू शकलो अस्तो तुझे लिखाण.

चोरी करणे वाईट आहे ! - हा मथळा दिशाभूल करणारा आहे. हो चोरी ही वाईटच असते... पण लेखात तशा अर्थाचं काहीही नाही .

आणि ही धमाल संपली!
दोन-तीन सीजन गाजवले
हे किस्से त्यामानाने हलकेफुलकेच

ही वाक्ये काय बरे सुचित करतात
वैधानिक ईशारा तर 'फक्त पकडले जाऊ नका' हेच सांगतोय.

तू हा लेख लिहून चोरीचं / न पकडल्या जाण्याच्या हुशारीचं / नशीबाचं उदात्तीकरणच करतोयस.

नाही आवडलं लिखाण
असं लिखाण तुझ्या हातून झालं हे तर अजूनच नाही आवडलं
आजच्या घडीला ह्या सगळ्याचं समर्थन करतोयस हे त्याहूनही नाही आवड्लं.

नाही आवडले!
वयानुसार झाले आणि अमुक एका व्यक्ती मुळे अथवा घटने मुळे हे (चोरी करणे) चुकीचे आहे हे कसे कळले-असा जर लेखनाचा प्रवाह असता तर योग्य संदेश मिळाला असता. इथे वाईट सवयींचे उदत्तीकरण केलेय.

आजच्या घडीला ह्या सगळ्याचं समर्थन करतोयस हे त्याहूनही नाही आवड्लं.
>>>
खरे तर समर्थन करणे हा लेखाचा हेतू नाहीयेच. (जर मला पश्चाताप नाही याचा अर्थ समर्थन निघत असेल तर ती गोष्ट वेगळी.) तसेच हे कुठले कन्फेशनही नाही. आपण काही उडपटांग आयुष्य जगलोय जे आता जगू शकत नाही, फक्त आठवणीतच राहणार आहे तर का नाही संकलित करूया हाच हेतू होता. तसेच मी जे लिहितोय ते आयुष्यात केलेल्या गैरकृत्यांबद्दल लिहितोय याचीही जाण होतीच. चोरीला तू वाईट आहेस हे सर्टिफिकेट मी द्यायची गरज नाही Happy

तसेच मी काही युथ आयकॉन किंवा सेलिब्रेटी नाही जे माझे अनुकरन करून युवा पिढी बिघडेल त्यामुळे तश्याही परीणामांचा सिरीअसली विचार केला नाही.
किंबहुना मोठमोठे सेलिब्रेटी अश्या परीणामांचा विचार न करता आपल्या आत्मचरीत्रात प्रामाणिकपणे बरेच काही लिहितात. ते चूक की बरोबर की नुसता पुस्तक खपायला पब्लिसिटी स्टंट हा वेगळ्या धाग्याचा विषय झाला.

तरीही आपल्या लेखाने कोणी प्रेरीत होऊ नये वा चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून काल शीर्षक बदलले, जे आधी चोरीच्या गप्पा होते. पण तेच लेखात परावर्तित होत नाहीये कारण लेखातील भाषा वर उल्लेखलेल्या मूळ हेतूला धरूनच आहे.

एकंदरीत काही का असेना, जो काही आपला भूतकाळ असतो आपण त्याला स्विकारायला हवे.

वयानुसार झाले आणि अमुक एका व्यक्ती मुळे अथवा घटने मुळे हे (चोरी करणे) चुकीचे आहे हे कसे कळले-असा जर लेखनाचा प्रवाह असता तर योग्य संदेश मिळाला असता.
>>>

याच्याशी सहमत आहे. पण लेख लिहिताना काही संदेश जातोय का बघणे हे ध्यानात नव्हते.
अर्थात आता मी हे असले काही करत नाही किंवा पार मागे सोडले आहे हे सत्य आहेच. तेव्हा ते का सोडलेय याची कारणमीमांसा स्वत:शी प्रामाणिक राहून शोधायला हवे. पण त्या आधी ऑफिसचे थोडे काम करायला हवे, अन्यथा ती ऑफिसकामाची चोरी होईल Happy

चोरी करून संन्याशाचा आव आणणारी माणसे 'जनाची नाही तरी मनाची' ह्या कॅटेगरीतले असावीत.

सांगून सवरून लुटणारे दरवडेखोर प्रामाणिक म्हणावे काय

ऋन्मेष,
तुझ्यातल्या अंगभूत वावदूक हुशारी मुळे नेहेमी प्रमाणे तू जे काय लिहिलंयस त्यामुळे तुझ्यातलं वाक्चातुर्य सिद्ध झालंय फक्त ! त्यापलिकडे त्यातून काहीही निष्पन्न झाले नाहीये.

पत्रीकेत आपला बुध आणि शनी युतीत असावा. असे असल्याखेरीज अश्या इच्छा होत नाहीत. आपला गुरु बलवत्तर असावा म्हणुन आपण मोठठा हात मारण्याचा फंदात पडला नाहीत.

नितीनचंद्र, मी अगदी हेच वा अशाच अर्थाचे सांगायला आलो होतो. तुम्ही आधीच लिहिलेत. Happy
यच्चयावत माणसास चौर्य कर्माची जाण/संवेदना/इच्छा असतेच असते.
धर्माधारीत/जात्याधारीत संस्कार /नितीनियम त्यास अडथळे आणु पहातात.
तरीही, कुंडलित जर बुध बिघडला असेल, तर माणूस कितीही श्रीमंत असो वा नसो, गरज असो वा नसो, हात साफ करतोच करतो.
वर म्हणले आहे तसेच, जर गुरु बलिष्ठ असेल, तर अन तरच तो या मार्गातुन वेळीच बाहेर पडतो, अन्यथा चढत्या भाजणीप्रमाणे गुन्हेगारी विश्वाची वाटचाल सुरू झालेली असते. जोडीने मंगळही पॉवरफुल्ल असेल, तर विचारायलाच नको. (हप्ता गोळा करण्याचे हो.... Proud )
असो.

सांगून सवरून लुटणारे दरवडेखोर प्रामाणिक म्हणावे काय
>>>
नक्कीच नाही,
हे लिहिताना काही प्रामाणिकपणा दाखवावा असा हेतूही नव्हता. वा आताही बघा मी प्रामाणिकपणा तर दाखवला अशी हुशारी मारायची नाही.
वर कोणी प्रतिसाद देताना प्रामाणिकपणा शब्द वापरला ही त्यांची सकारात्मकता.

ऋन्मेश - लहानपणाच्या गोष्टी वेगळ्या पण तू कॉलेज मधे पण अश्या गोष्टी करत होतास हे खरोखरच सिरीयस आहे. ते वय चांगलेच जाणते होते.

तुझ्या चोरी मुळे कोणाला मार पण खावा लागला असेल ( दुकानातला नोकर वगैर ) कोणाला चांगलेच आर्थिक नुकसान झाले असेल. अजिबात बरोबर नाही.

तुझ्या मुलां समोर तर ह्या गोष्टींचा अजिबात उल्लेख करु नकोस.

ऋन्मेष, वरती सगळ्यानी चोरी वाईट वैगेरे लिहील आहे आणि ती वाईटच आहे पण खर सांगु का तु जे लिहील आहेस ते वाचुन तु किती वाया गेलेला मुलगा होतास वैगेरे नाही वाटल मला. का ते लॉजिकली नाही सांगता येतय मला.

ऋन्मेष, वरती सगळ्यानी चोरी वाईट वैगेरे लिहील आहे आणि ती वाईटच आहे पण खर सांगु का तु जे लिहील आहेस ते वाचुन तु किती वाया गेलेला मुलगा होतास वैगेरे नाही वाटल मला.>>>>>

बहुतेक वेळा वाया गेलेली मुलं चोरी करताना पकडली जातात, किंवा नंतर ते उघडकीस येऊन दम, शिव्या खातात त्यामुळे ती वाया गेलेली आहेत हे जाहीर होते, वरील बाबतीत चोरी करताना शहाणपणाने केली असल्याने या मुलांची 'वाया गेलेली मुलं' अशी कीर्ती होण्याची शक्यताच नाही Happy

>>एकंदरीत आजवरच्या सर्वच प्रकरणात, कुठे पकडलो गेलोय, कुठे मार पडलाय, कुठे मानहानी झालीय असे कधीच घडले नाही हे एक कौतुकास्पद>> अगदी प्रचंड प्रमाणावर कौतुक होण्याची गरज आहे. पण मायबोलीकरांना त्याचं मेलं काय म्हणतात ते नाहीच, कौतुक हो.
इथे धागा बिगा काढून संकलित करण्यासारखा अनुभव, किस्से अजिबातच नाहीत. त्याच वेळी एखाद्या दुकानदाराने ठोकलं असतं तर आईवडिलांना वेळीच कळलं असतं.

मनीमोहोर धन्यवाद Happy
आणि लॉजिक लावूही नका, मलाही स्वताला खात्री आहे मी वाया गेलेला मुलगा नाहीये. हीच खात्री मला पर्सनली ओळखणार्‍या सर्वांना आहे, कदाचित म्हणूनच मी इथे बागडताना याने माझी इमेज काय होईल याचा विचार करत नाही.

टोचा, आपल्या मार आणि आर्थिक नुकसानीच्या मुद्द्याशी सहमत आहे. असे फार काही घडल्याचे कानावर तेव्हा आले नाही म्हणून कदाचित पश्चातापाची भावना नसावी. पण येस्स घडलेही असावे, कबूल आहे.

सायो,
<<इथे धागा बिगा काढून संकलित करण्यासारखा अनुभव, किस्से अजिबातच नाहीत. त्याच वेळी एखाद्या दुकानदाराने ठोकलं असतं तर आईवडिलांना वेळीच कळलं असतं.>>>>
लेखात मी कौतुकास्पद असेच लिहिले. त्याचे कौतुक नाही. माझे नशीब चांगले जे असे झाले नाही. पण झाले असते तर ते देखील इथे लिहिले असते.

इथे अभिमानाने लिहून मिरवण्यासारखं ह्यात मुळातच काही नाही हा मुद्दा आहे.

सायो, इथे शाळा कॉलेज हॉस्टेलच्या आठवणी असा धागा असेलच. तर त्यावर लिहिणे म्हणजे आपल्या शाळेच्या आठवणी अभिमानाने मिरवणे असा अर्थ होतो का..

शाळा कॉलेजच्या वयात केलेल्या गंमती जंमती आणि तू त्या वयात केलेल्या चोर्‍यांच्या आठवणी इथे लिहिणं हे सेमच आहे का? म्हणजे तुझ्याकरता असू शकतील पण मला तरी त्यात काही गंमत दिसली नाही. इनफॅक्ट मुलगा अशा छोट्या मोठ्या चोर्‍या करत फिरताना आईवडिलांचं लक्ष कुठे होतं हा प्रश्न मनात नक्कीच आला जो इथे फार पर्सनल होईल म्हणून विचारला नाही. तू इथे तुझं शब्दचातुर्य दाखवायला आणखीन लिहित रहाशीलच. मला जे म्हणायचं होतं ते म्हणून झालं आहे तेव्हा असो.

शाळा कॉलेजच्या वयात केलेल्या गंमती जंमती आणि तू त्या वयात केलेल्या चोर्‍यांच्या आठवणी इथे लिहिणं हे सेमच आहे का?
>>>
गंमतीजमती हा शब्द आपला आहे. शाळेतल्या मारामारीच्या, शिक्षकांनी ओरडल्याच्या, कॉपी केल्याच्या, नापास झाल्याच्याही आठवणी असतातच ना.

इनफॅक्ट मुलगा अशा छोट्या मोठ्या चोर्‍या करत फिरताना आईवडिलांचं लक्ष कुठे होतं हा प्रश्न मनात नक्कीच आला जो इथे फार पर्सनल होईल म्हणून विचारला नाही.
>>>
विचारू शकता. मी इथे जे लिहितो त्यावर येणारे सर्व प्रकारचे प्रतिसाद गुहीत धरूनच.
असो, पण याचे उत्तर, हे देखील माझे नशीबच. दुकानदाराचे लक्ष गेले नाही तसेच.

तरीही, कुंडलित जर बुध बिघडला असेल, तर माणूस कितीही श्रीमंत असो वा नसो, गरज असो वा नसो, हात साफ करतोच करतो.

पत्रीकेत आपला बुध आणि शनी युतीत असावा. असे असल्याखेरीज अश्या इच्छा होत नाहीत.

<<

च्या मारी,

अखंड हिंदुस्थानातील यच्च्यावत न्यायालये बंद करावीत, अन त्या ऐवजी गुन्हेगारांच्या कुंडल्या काढून त्यातल्या ग्रहांच्या शांत्या करायला ज्योतिषांच्या फौजा बसवाव्यात. असेही लाच खाऊन न्याय देतात असले व्हॉट्सॅप लोक काढतातच. इथे ज्योतिषीच होमहवनादी कृत्ये असल्याने या कुडमुड्यांना हापिशली दक्षिणा तरी देता येईल. "नैका?"

त्याचप्रमाणे प्रत्येक अपत्याच्या जन्मतःच कुंडल्या काढून सर्व संभाव्य खुनी, दरवडेखोर, चोर भामट्यांची शांती तरी करावी, किंवा तिथेच नि:पात तरी करावा असा प्रस्ताव या निमित्ताने मांडतो.

(मुसलमान, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, नवबौद्ध, जैन, पारशी व इतरांच्याही कुंडल्या समान नागरी कायदा करून एकाच पद्धतीने काढाव्यात असेही सुचवितो)

ऋणम्या,

चोर्‍या गुपचुप कराव्यात. बावळटासारखा बोभाटा करून र्‍हायला आहेस. गुपचुप खाऊन पचवता आलं की राजकारणात जाऊन प्रगती करता येते.

सुधर जरा. बीजेपीची मेंबरशिप घे. Wink

धागा काय विचार करून काढलाय ते समजत नाही. पूर्ण गंडलेला आहे. शिवाय दर प्रतिक्रियेमागे येत असलेलं स्पष्टीकरण केविलवाणं वाटतंय. आवरा.

तेच.

ट्यार्पी घसराया लागलाय ऋण्म्याचा त्ये राकु आल्याधरनं. त्यापाई असला 'आपलं नाक कापून दुसर्‍याला अपशकुन' स्टाईल धागा काढलाय त्यानं. तो नैका 'धुळे दिल्ली इन २४ तास' सारखा होता एक?

काय नाय तर श्यानपत्ती शिकवायला तरी लोकं पोस्टी टाकू टाकू शे सव्वाशे पोस्टी जमतील, प्रत्येकाला उत्तर देऊ देऊ हा भौ अडीच-तीनशे करील.

*

रच्याकने.

ओ संतुलीतभौ,

सोन्स्कार आन मान'सिक' वर आमचा कापीराईट हाय. रायल्टी तिक्डं धाडायचं बगा आमच्या अका-ऊंट णंब्राला.

धन्नेवाद!

धार्मिक, शिष्टसंमत चोर्‍यांत

१. मा. श्रीकृष्णजी यादव यांनी केलेली माखनचोरी हापिशली अलाऊड हाये. व बाय डीफाल्ट, त्यांच्या सर्व वंशज यादवांनी केलेल्या ल्हान-मोट्या उदा. दूध/म्हैस/लोणी/म्हशीचा चारा इ. तदानुषंगिक चोर्‍यादेखिल माफ हायेत.

२.
>>क म्हणजे रंगपंचमी. कुठल्याश्या फॅक्टरीमधून आम्ही रंगाच्या पावडरीचे पॅकेटस चोरायचो<<
होळीचा सण हा आपल्यातले दुर्गुण "दाखवण्याचा" "सण" आहे. (म्हणूनच आसारामाचे पाणी अलाऊड आहे) यात लाकूड, गोवर्‍या इ. चोरूनच आणायच्या असतात, शिवाय होळी पेटवताना शिवीगाळही करायची असते. अगदी 'होलिकादहनासाठी' आणलेले गुर्जीही आता तोंडावर पालथा हात ठेवून बोंब ठोका, असे यजमानांना (पक्षी गल्लीतील सभ्य होतकरू भावी राजकारण्यांना) सांगतात. (रच्याकने : बोंब ठोकण्याची हीच क्रीया मडक्याला भोके पाडून प्रदक्षिणा झाल्यानंतर, मडके पाठी फेकून फोडतात, तेव्हादेखिल करतात Wink )

शेवटी,
३. किसीके दिल की चोरी करना तो हसीन गुनाह होता हय, कयामतके दिवसपर इस्कू सजा नै, तोफा कुबूल हय.

तेव्हा,

चोरी इज नॉट आल्वेज व्राँग, यू क्नो Wink

अगदी लहान असताना दुकानातून पेढा किंवा चॉकलेट चोरणे, शेजार्‍याच्या कैर्‍या चोरणे, बाजारात एखादा आवळा तोंडात टाकणे वगैरे क्यूट वाटते. पण मोठे झाल्यावर राजरोसपणे केलेल्या चोर्‍या खरेच चुकिच्या व रिस्की असतात. आपल्या चोरीमुळे दुकानात किमान वेतनावर काम करणार्‍या पोर्‍याला भुर्दंड पडू शकतो, त्याची नोकरीही जाऊ शकते. त्यातून अगदीच भूक लागली म्हणून एखाद्या गरीबाच्या मुलाने अन्नाची चोरी केलेली समजून घेता येते. वरील किस्से खरच किस्से म्हणता येतील का?

माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत मुसलमानाचे एकच गोळ्या बिस्किटांचे दुकान होते. दरवेळी दंगल झाली की गल्लीतली मवाली पोरे ते दुकान फोडत व त्यातल्या गोळ्या बिस्किटे सर्वांना वाटत. मीही एक दोनदा खाल्ले. आम्हा पांढरपेशा लहान मुलांना ते लईच भारी हिरोगिरी वाटत असे. आता ते आठवले की कसेसेच वाटते.

हर्पेन + १
आई वडीलांनी चांगले संस्कार दिले असतील (अ‍ॅट लिस्ट त्यांना आवडणार नाही ह्याची तुला जाणीव होती), मग अश्या रिपीटेड चोर्‍या का करत राहीला असशील असा मनात विचार आला. सद्सद्विवेकबुद्धी नावाचा एक प्रकार असतो, तो कुठे गेला होता असेही वाटले. कदाचित संगत का असर असेल जो सुरुवातीला इतरांचा तुला झाला असेल, आणि नंतर इतरांना तुझा. कंपुही असाच मिळत राहीला. (तुमच्यात कोणी असं होतं का, जो म्हटला.. हे चूक आहे, आणि आता आपण ह्यापुढे करायचे नाही की दिवसेन्दिवस हे थ्रील वाढतच राहिलं, म्हणून करत राहिलात? )
मला वाचताना दर वेळेला 'सिरियसली???' असं वाटत होतं. पण अशी मुलं (मुली) असतील/असतात. अश्यांना Kleptomaniac असं गोंडस नाव आहे.

Pages