एक अधिक एक म्हणजे एक हजार !

Submitted by स्वीटर टॉकर on 30 September, 2015 - 06:23

ही सत्यकथा नाही त्याचप्रमाणे काल्पनिकही नाही. गोपनीयतेसाठी सत्यापासून फारकत घेणं जरूरीचंच असतं.

चित्रपटाआधी एक Disclaimer येतो. Any resemblance of these characters to persons living or dead is purely coincidental. यावर कोणीतरी केलेला विनोद माझ्या वाचण्यात आला होता. Any resemblance of these characters to persons living or dead is purely their bad luck. तशी या कथेची स्थिती आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझं ग्रॅजुएशन झाल्याबरोबर माझं लग्न थाटामाटात झालं. वडिलांचं छोटंसं दुकान. सासर गर्भश्रीमंत. लक्ष्मीचा वरदहस्त असलेलं स्थळ मिळालं म्हणून सार्‍यांना कौतुक. लग्नांत मुलाकडच्यांची कोडकौतुकं पुरवता पुरवता बाबांची अन् लक्ष्मीचीच ताटातूट व्हायची वेळ आली. पण योग्य निर्णय घेण्याचं तेव्हां माझ्यात धैर्य नव्हतं अन् अक्कलही.

सासूबाई स्वभावानी मृदु अन् अतिशय प्रेमळ. पण मृदु व्यक्तींना असलेला शाप त्यांनाही होताच. घरात त्यांच्या मताला काहीही किंमत नव्हती.

दोन वर्षांनी मला जुळी झाली. मुलगा अन् मुलगी. कार्यक्षमतेची परिसीमा. एकाच प्रेग्नंसीत चौकोनी कुटुंब हासिल! ऐश्वर्य, प्रतिष्ठा अन् आता दोन गोंडस बाळं. दृष्ट लागावी अशीच परिस्थिती. वास्तव मात्र जरा वेगळं होतं.

ह्यांचा लोकसंग्रह नावापुरताच. त्यांचे फास्ट फ्रेंड म्हणजे त्यांचे वडील. रोज संध्याकाळी दोघं ऑफिसमधून बरोबरच परत यायचे. त्यानंतरची वेळगंमत म्हणजे ड्रिंक घेणे. वर सिगरेटचा धूर. माहेरी मी व्यसन हा प्रकार कधी बघितलेलाच नव्हता. शराबी चित्रपटातल्या अमिताभची नक्कल करत आम्ही बहिणी पोट धरधरून हसत असू. आता मात्र त्या आठवणीनी कसंसंच होऊ लागलं.

मी आणि सासूबाई बाळांच्या संगोपनात व्यग्र असायचो. सासूबाईंना बालसंगोपनाची शास्त्रशुद्ध माहिती. शिवाय जबरदस्त पेशन्स. आजी आणि सासू म्हणून त्या ideal होत्या. पण पत्नी आणि आई म्हणून . . . . . . .?

इकडे ड्रिंक्सचं प्रमाण अन् वेळ दिवसेन् दिवस वाढतंच चालली होती. “तुला काही कमी पडू देतो आहे का? किंवा - एवढ्या मोठ्या बिझनेसचं टेन्शन तुला काय कळणार, किंवा - तुम्हा दुकानदारी टाइपच्या लोकांच्या विचाराचा आवाकाच कमी.” वगैरे कारणं मला पटण्यासारखी नव्हती. माझे अन् त्यांचे वारंवार खटके उडत.

सासूबाई गप्पच. मी विरुद्ध ते दोघे अशा चकमकी रोजच्या. ड्रिंक्समुळे रोजची जाग्रणं. सकाळी ठणकत्या डोक्यानीच ऑफिसला जायचे. कधी जाणं, कधी न जाणं. परिणाम अटळ होता. बिझनेसला घसरण लागली. त्याचं टेन्शन. मग जास्त दारू. विषचक्रानं वेग घेतला.

मुलं मोठी होत होती. त्यांना शुद्धीत असलेल्या बाबांचा सहवास मिळेना. यांचं रोजचं बरळणं आणि मला मारणं. आमचं भांडण सुरू झालं की दोघंही बिचारी कावरीबावरी व्हायची.

विचार करकरून माझं डोकं सुन्न व्हायचं. सोन्यासारखी माझी बाळं – असल्या गटारी वातावरणात वाढणार?

माझ्या माहेरची सांपत्तिक परिस्थिती जरी बेताची असली तरी विचारांनी आम्ही नेहमीच समृद्ध होतो. माझा विश्वास सरस्वतीवर. आयुष्यभर तिची आराधना करायची. ती आपली पाठराखीण होऊन राहाते. ज्ञान कधीही वाया जात नाही. बुद्धिजीवी लोकांकडे सरस्वती असते म्हणूनच लक्ष्मी आली तर येते. सरस्वती कधी वाईट मार्गानी मिळवताच येत नाही. लक्ष्मी मात्र वाममार्गानीही येऊ शकते. लक्ष्मी नेहमी पाहुणी बनूनच राहाते. तिचा आदर करायचा पण तिच्यात जीव अडकवायचा नाही. ती असल्याचा गर्व करायचा नाही, अन् ती निघून गेली तर वाईट वाटून घ्यायचं नाही – असे माझे विचार. इथे मात्र सगळं उलटंच. हेच शिकणार का माझी बाळं ?

मारहाण आणखी वाढली. आता मुलांना घेऊन घरातून बाहेर पडणंच जरूर होतं. दोन मुलांसह माहेरी जाणं शक्य नव्हतं. मग जायचं कुठे? उपजीविकेचं काय? गरजवंताला अक्कल नसते हेच खरं.

एका औषध बनविणार्‍या कंपनीत कारकुनी नोकरी मिळाली. प्रचंड आलिशान गजबजलेलं ऑफीस. माझा पगार बेताचाच होता. पण मानसिक वेदनांवर कामाच्या तोडीचं दुसरं वेदनाशमक नाही. शिवाय दिवसभर आजीच्या प्रेमळ छत्राखाली मुलं एकदम खूष.

सर अन् मॅडम हे दाम्पत्य कंपनी चालवायचे. कंपनी मूळची मॅडमच्या दिवंगत वडिलांची. मॅडमनी सरांशी प्रेमविवाह केला होता. आता मात्र त्यातला फक्त विवाह कसाबसा तग धरून होता.

मला काम फार आवडायचं. एकाच वेळस कित्येक कामं बिनबोभाट करण्याचं वरदान बायकांना पूर्वीपासून लाभलेलं आहे. पुरुषांना तेच करायची वेळ आल्यापासून ‘मल्टीटास्किंग’ अशा भारदस्त पदवीसकट त्याला राजमान्यता प्राप्त झाली. ते मला सहज जमायचं म्हणून म्हणा, किंवा सरांच्या आवडत्या बहुरंगी नखरेल सेक्रेटरीचा माझ्यावर जाम खुन्नस होता म्हणून म्हणा, मॅडमची माझ्यावर मेहेरनजर झाली. जबाबदार्‍या खूप वाढल्या. त्याचबरोबर कामाची वेळही.

छोटीशीच का होई ना, स्वतःची केबिन मिळाली.

एक दिवस उशीरपर्यंत काम करीत बसले होते. माझी केबिन सोडून सर्व ऑफिस अंधारात होतं. अचानक धाड्कन् ऑफिसचा मुख्य दरवाजा उघडला गेला ! माझ्या छातीत धस्सं झालं! चोर! मी चटकन् केबिनमधला दिवा विझवला, कडी घातली अन् मोबाइलवर पोलिसांचा नंबर लावणार, इतक्यात ऑफिसमधले दिवे लागले आणि सरांचा अन् बहुरंगीच्या खिदळण्याचा आवाज आला !

मी त्यांना दिसू नये म्हणून अंग चोरून स्तब्ध बसले पण खरं तर त्याची काहीच जरूर नव्हती. दोघेही इतके उतावळे झाले होते की मी हाक मारली असती तरी त्यांना ऐकू गेली नसती. पुढच्या पंधरा मिनिटांत रिसेप्शनिस्टच्या टेबलावर झालेले सर्व किळसवाणे अंगविक्षेप माझ्या मोबाइलने रेकॉर्ड केले.

माझी झोपच उडाली ! कामात लक्ष लागेना. पर्समध्ये जणु जळता निखाराच होता. का ब्रह्मास्त्र? नशिबाचं दार किलकिलं झालं होतं. पण ‘ब्लॅकमेल’ हा शब्दच घृणास्पद. हेच शिकवलं का तुझ्या आईबाबांनी तुला?

विचार करकरून डोकं भणभणलं. कृष्णनीतीच्या अभावी पांडवांचा विजय झाला असता का? शिवाजीराजे मोगलांशी सत्यासत्याचा उहापोह करत बसले असते तर स्वराज्य स्थापन झालं असतं का? द्यूत खेळला महामूर्ख आणि वस्त्रहरण झालं द्रौपदीचं ! रामराज्यात बाकी सारे सुखी. सीतेच्या पदरी मात्र अग्निपरीक्षा देऊनही पुन्हा अरण्यवास ! बस्स झालं आता. बायकांनी खूप सहन केलंय. शिवाय प्रश्न माझा एकटीचा नाही. मुलांच्या भवितव्याचा आहे.

मोबाईलमधलं नाटक सीडीवर कॉपी केलं. सरांच्या ऑफिसमध्ये गेले, त्यांना सीडी दिली आणि काही न बोलता परत आले. मला वाटलं होतं माझ्या तोंडाला कोरड पडेल, काळीज धडधडेल, हातपाय कापतील, घाम फुटेल. पण तसं काहीच झालं नाही. मुलांच्या भवितव्याच्या निश्चिंतीमुळे माझ्यात दहा सिंहिणींचं बळ आलं होतं. आत्मविश्वासही.

थोड्याच वेळात पांढरेफटक पडलेले साहेब माझ्या ऑफिसमध्ये आले. प्रश्नांचा भडिमार केला. मी एकही उत्तर दिलं नाही. माझ्या ड्रॉवरमधून वर्तमानपत्र काढलं. तीन बेडरूमचा फर्निश केलेला एक फ्लॅट विकावू होता. त्याच्या जाहिरातीभोवती मी लाल पेनानी खूण केली होती. त्यांच्या पुढे केलं. “माझ्या नावावर. मुदत साठ दिवस.” एवढंच बोलून माझ्या कामाला लागले.

त्यांनी मला इजा करायची किंवा माझा काटा काढायचं ठरवलं तर काय होईल याचा मी विचार करून ठेवला होता. माझ्या हतबलतेचा, किंबहुना माझ्या आयुष्याचा मला कंटाळा आला होता. माझ्या पश्चात सासूबाई माझ्या मुलांचा उत्तम सांभाळ करतील याची मला खात्री होती. मात्र जर का साहेबांनी काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही तर काय करायचं हे काही मी ठरवू शकत नव्हते. माझ्या हातात हुकमी एक्का होता खरा, पण तो खेळण्याची माझी इच्छा नव्हती. या हुकमी एक्क्यांचं असं असतं. एकदा खेळला की त्याची किंमत शून्य होते !

पण तशी वेळच आली नाही. अधर्माचे पाय मेणाचे असतात. खरोखरच दोन महिन्यात रजिस्ट्रेशन झालं देखील ! माझ्या चेहर्‍यावरचा आनंद मला लपवताच येत नव्हता. सासूबाईंनी मला खोदून खोदून विचारलं पण मी काहीही सांगितलं नाही. इच्छा प्रचंड होत होती पण ते शहाणपणाचं झालं नसतं.

एक दिवशी मी मुलांना घेऊन बाहेर पडले ते थेट नव्या घरी. सासूबाईंना फोन करून कळवलं. त्यांना रडूच कोसळलं. प्रचंड अपराधीपणाच्या भावनेनी मला घेरलं. त्यांनी मला नेहमीच प्रेम दिलं होतं आणि मी मात्र त्यांचा विश्वासघात केला होता. त्यांनी माझं मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि क्षणभर मी डळमळले देखील. माझे वडील नेहमी म्हणायचे, “कोठल्याही नवीन मार्गाला लागण्याआधी भरपूर विचार करायचा. मात्र एकदा चालायला लागल्यानंतर काहीही झालं तरी मागे वळायचं नाही.”

खरी परीक्षा तर अजून सुरू व्हायचीच होती.

माझ्या अपेक्षेनुसार हे रात्री आले. नेहमीपेक्षा जास्तच घेतली होती. त्यांना गेटच्या आत न सोडण्याबद्दल मी वॉचमनला आधीच सांगून ठेवलं होतं. मग रस्त्यावरूनच आरडाओरडा, अर्वाच्च्य शिव्या, भलतेसलते आरोप. मुलं भेदरून गेली.

मग यांच्या नौटंकीचा नित्यनेमच झाला. रोजच्या तमाशाची वेळ होण्याआधीच मी मुलांना झोपवून टाकायची. रस्त्यांत कधी यांची गाडी आडवी आली तर पुन्हा तेच. मी अजिबात मान खाली घालत नसे. डोळ्याला डोळा लावून उभी राही. गर्दी जमून हॉर्न वाजायला लागले की हेच गाडी पुढे काढीत. सासूबाई गाडीत असल्या तर त्या केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे पहात असायच्या.

मला मात्र आता फार वर्षांनी शांत झोप लागू लागली. कोणी इतकसं काही बोललं की कुढत बसणारी, डोळ्यातनं पाणी काढणारी मी, आता इतकी बदलले?

रविवारी सकाळी पेपर वाचत बसले होते. दाराची बेल वाजली. दार उघडलं तर सासूबाई ! मी काही बोलण्याआधीच नेहमीच्या मृदु आवाजात म्हणाल्या, “तुझी हरकत नसेल तर तुझ्याकडे राहायची इच्छा होती – कायमचं!”

मग नेमकं काय झालं मला आठवत नाही. मी भानावर आले तेव्हां आम्ही दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. गालाला गाल टेकले होते अन् दोघींचे अश्रू एकत्र घळाघळा वाहात होते. मुलगा “आज्जी-आज्जी” ओरडत सोफ्यावर दाणदाण् उड्या मारत होता. मुलगी आजीला बिलगली होती !

पावसाची सर येऊन गेल्यावर वातावरण प्रसन्न होतं तशी माझ्या मनाची स्थिती झाली होती. दोघींच्या अश्रूंच्या पुरात माझं टेन्शन, थकवा, आपण अवलंबलेल्या मार्गाच्या योग्यायोग्यतेबद्दलचा संभ्रम, मुलांची चिंता, सार्‍या सार्‍याचा निचरा झाला होता.

स्वतःला आप्त म्हणवून घेणार्‍यांविरुद्ध जिला एकटीनं उभं ठाकायची वेळ येते तिलाच हे अंकगणित समजतं.

एक अधिक एक म्हणजे दोन नव्हे. एक अधिक एक म्हणजे एक हजार !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित सुरक्षित जगात वावरत असल्याने असे वाटत असेल पण हा ब्लॅकमेल करण्याचा मार्ग नाही पटला.

(कोणत्याही कारणाने असेना पण) घर सोडण्यापुर्वी साबांना विश्वासात घ्यायला हवे होते असेही वाटले.

कोणत्याही कारणाने असेना पण) घर सोडण्यापुर्वी साबांना विश्वासात घ्यायला हवे होते असेही वाटले.>>>>सेम हिअर!

कथा चांगली आहे. वाचल्यानंतर सत्य आहे का काल्पनिक याचा विचार केला नाही. पण कथा वास्तववादी नक्कीच आहे.

स्वीटर टॉकर, सुरेख लिहिलं आहेत !
तुम्हा दोघांकडे हटके किश्श्यांचा खजिना तर आहेच पण ते अत्यंत परिणामकारक रित्या फुलवून सांगण्याची हातोटीही आहे. लिहित राहा ...

ह्या घटनेकडे नैतिक किंवा अनैतिक अशा दृष्टीकोनातून मला बघताच आलं नाही. तिने काय सोसलं असेल, त्यावर कसा मार्ग काढला असेल, असं पाऊल उचलायला उद्युक्त का झाली असेल ह्याची कल्पना सुरक्षित कोषात बसून करणं माझ्यासाठी अशक्य आहे.
कदाचित ती चांगल्या मार्गावरुनच चालू इच्छित होती हा दिलासाही पुरेसा वाटला असेल. त्यामुळे All's well that ends well ...एवढीच प्रतिक्रिया आली मनात !

दिनेश म्हणतात तसे कथानकातील वास्तव (तिच्या ऑफिसमध्ये जे काही झाले वा तिने त्याचा लाभ का आणि कसा करून घेतला) कल्पितापेक्षाही जास्त आहे, असे कथा आवडलेली अक वाचक या नात्याने मी म्हणू शकतो.

समाजातील नोकरीव्यवसायात बॉस आणि त्याची ती सेक्रेटरी (जिचा लेखिका बहुरंगी या नावाने उल्लेख करते) यांच्यातील प्रणयदृश्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग गुपचूपपणे नायिका करते हा प्रसंग काल्पनिक असण्यापेक्षा सत्य असण्याची शक्यता गृहित धरली तरी तो सर वा बॉस भांडे फुटू नये म्हणून सहजासहजी तीन बेडरूमचा फर्निश केलेला एक फ्लॅट देऊन टाकतो....(म्हणजे अन्य काही विकल्पाचा तो विचारही करत नाही) हे पचविणे वाचकाला जड जाते. नायिकेच्या सासूबाई प्रेमळ आहेत शिवाय त्यानीही त्यांच्या तारुण्यात त्यांच्या पतीकडून दडपशाही मूकपणे स्वीकारल्याचे कथेत दिसत्ये आहेच. अशा स्त्री चे चिरंजीव (ज्यांचा स्वभाव बापाप्रमाणेच आहे) आपली पत्नी नोकरीला लागून वर्षदोनवर्षेही झालेली नाहीत तर तीन बेडरूमचा फ्लॅट कसा काय घेऊ शकते ? याचा विचार करतच नसेल का ?

असो...एक वाचक या नात्याने मनी आलेल्या काही शंका आहेत...त्याला कारण असे की लेखिकेने सुरुवातीलाच "...ही सत्यकथा नाही त्याचप्रमाणे काल्पनिकही नाही. गोपनीयतेसाठी सत्यापासून फारकत घेणं जरूरीचंच असतं...." दिलेली ही चेतावणी वाचल्यामुळे यात सत्यता किती आणि कल्पकता किती ? हा विकल्प समोर येतो, त्या अनुषंगाने मांडलेले हे मुद्दे.

चांगली कथा आहे. पण बॉसकडून पुढेमागे धोका असू शकतो(नोकरीत आरोप्/इतर काही) असं जाणवलं.
यात सत्याचा थोडा भाग असेल तर नक्कीच धीराची बाई आहे ही.

छान फुलवून लिहिली आहे कथा. आवडली Happy वर अगो म्हणत्येय त्याच्याशी सहमत. तिच्या बुटात पाय ठेवल्याखेरीज कळणार नाही दाहकता.

कथा आवडली.

तुम्हा दोघांकडे हटके किश्श्यांचा खजिना तर आहेच पण ते अत्यंत परिणामकारक रित्या फुलवून सांगण्याची हातोटीही आहे. लिहित राहा ... >>> अगो +१

सर्वांना धन्यवाद !

पोस्ट केल्यापासून पाच तासात मी प्रतिसादांना प्रतिसाद लिहीन असं मला वाटलं नव्हतं. तुम्हा सगळ्यांचा promptness भलताच आहे. (म्हणजे चांगल्या अर्थानी 'भलताच' असं म्हणतिये मी.)

मी नताशा आणि रश्मी
मी तिला व्यवस्थित ओळखत असल्यामुळे तिने ब्लॅकमेल का केला याच्या बद्दल आणखी लिहिणार नाही. मात्र तिने सासूला आधी न सांगण्याचं कारण असं की त्या तशा मनानी कमकुवत असल्यामुळे त्यांना कळल्यबरोबर त्या मुलाला आणि नवर्याला सांगतील अशी तिची खात्री होती आणी ती खरी देखील ठरली. त्यांना जर आधी कळलं असतं तर तिला मुलांना घेऊन जाता आलं नसतं.

अशोक
तिने फ्लॅट मिळवला आहे हे नवर्याला माहीत नव्हतं. ते त्याला त्याच्या आईने सांगितल्यावरच कळलं. तीन बेडरूमचा फ्लॅट तुम्हाआम्हाला महाग वाटत असला तरी कंपनीच्या मालकाच्या मालमत्तेच्या मानानी नगण्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन ठिकाणी बर्यापैकी राडा झाला तो मला गाळणंच भाग होतं. एक म्हणजे फ्लॅट देण्याआधी आणि दुसरी हिने घर सोडल्यानंतर. तो तपशील लिहिणं योग्य होणार नाही. मात्र सासूबाईंनी घर सोडल्यानंतर सगळं पूर्णपणे थंडावलं आहे.

मी अनु
हा सगळा इशू चांगलाच धोकादायक आहे आणि बॉसकडून पुढेमागे त्रास होण्याची शक्यता नक्कीच आहे. मात्र सासूबाई इकडे आल्यावर सगळंच आर्थिक चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. आता काळजीचं कारण नाही.

In fact टाईम्स ऑफ इंडियाने अकरा लेखकांच्या मदतीने दर महिन्याला एक कथा अशी एक वर्षभर चालणारी इंग्रजी कथास्पर्धा आयोजित केली आहे. www.toi.in/writeindia जुलै २०१५ ते जून २०१६
त्यात स्वीट टॉकर नी हीच हकीकत एका वेगळ्या रस्त्यानी पुढे नेलेली आहे. त्याचा रिसल्ट २० ऑक्टोबरला आहे.

आवडली कथा. अगोचा प्रतिसाद आवडला. मला पण असंच काहीसं वाटलं कथा वाचल्यावर. त्या मुलीला पुढे जावून काही त्रास होउ नये अशी आशा. बॉसच्या बायकोचा मात्र नवरा आणि ऑफिसमध्ये जिच्यावर विश्वास टाकला ती कलीग दोघांकडून विश्वासघात झाला असं वाटलं.

मस्त कथा ..
त्या बाईंची भूमिका पटली कणखर पणा आवडला .
अगो यांनी वर म्हणल्या प्रमाणे All's well that ends well .
फक्त याला खात्रीने पूर्णविराम लागलेला असण महत्वाच .

सिंडरेला,
मॅडमचा दोघांकडून विश्वासघात झाला यात शंकाच नाही. मात्र मी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या प्रेमविवाहापैकी फक्त विवाहच कसाबसा टिकून आहे. प्रेम कधीच नाहिसं झालं आहे.
मात्र कंपनी मॅडमच्या नावावर असल्यामुळे नवर्याला चॉइसच नाही.

अगो+१

स्वीटर टॉकर, सहज एक सांगावस वाटलं म्हणुन - कोणालाही कसलंही एक्स्पेनेशन देऊ नका Happy
ही कथा वाचणारा प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या अँगलने विचार करणार... तुम्ही किती जणांना आणि काय काय समजावत बसणार? Happy

कथा आवडली Happy

रीया....

तुझा प्रतिसाद वाचल्यावर त्याबद्दल मला दोन शब्द लिहावेसे वाटतात. कथा कविता आवडली वाचकाना तर त्या नात्यानी लेखक/लेखिकेला तसे कळविण्यात काही वावगे नसते. कौतुकाच्या चार वाक्यांनी लेखिकेला आनंद होत असतोच. पण त्याचवेळी वयाने ज्येष्ठ या भूमिकेतून माझ्यासारख्या वाचकाने कथानकासंदर्भात काही मुद्द्याबाबत लेखिकेसोबत थोडक्यात चर्चा केली तर स्वीटर टॉकरसारख्या नवोदितेला या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी ते पूरक शाबीत होत असतात. मी (किंवा अन्यांनी...) त्यांच्या लिखाणावर कोणतेही आक्षेप न घेता त्यातील काही घटनाबाबत विचारणा केली....तीही लेखिकेने सुरुवातीलाच "..ही सत्यकथा नाही त्याचप्रमाणे काल्पनिकही नाही..." अशी खुलासेवजा सूचना दिली असल्याने मग वाचक साहजिकच किती आणि कोणता भाग सत्य तर कोणता भाग काल्पनिक याबाबत तर्कांची सुई घेऊन बसला तर ते साहित्याच्या दृष्टीने जसे हानीकारक नाही तसेच लेखिकेसमोर अडचणीही निर्माण करणारे नाही.

ज्या विनयाने स्वीटर टॉकर यानी प्रतिसादकांना खुलासे दिले आहेत ते वाचता त्यानाही वाचकांनी इतक्या सखोलतेने त्यांचे लिखाण वाचल्याचे पाहून समाधान झाल्याचे दिसत आहेच.

Mama ,kahi velane laptop warun lihite Happy
Tumhi mhanatay te manya ahech.
Mi kahis vegal mhanatey

माझा पण या दोघात गोंधळ होतो. एक मेल आणि एक स्त्री आहेत आणि ते स्वीट स्वीटर नीट वाचले तरच लक्षात येते. हे दोन्ही आय डी एकमेकांच्या नात्यातले नाहीत का?

हे दोन्ही आय डी एकमेकांच्या नात्यातले नाहीत का?>>>> Lol

कथा आवडली. बाकी, तिचे वागणे बरोबर चूक वगैरे भानगडीत मी जाणार नाही. प्रत्येकाचा लढा वेगळा अस्तो आणि लढायची पद्धतदेखील. पण जर ही सत्य अक्था असलीच तर यामधून कुठल्याच पार्टीला कसलाही मनस्ताप होऊ देत नको असं मात्र वाटलं.

खोसला का घोसला सारखं आहे. असं व्हावं असं आपल्याला मनातून वाटत असतं त्याचबरोबर यातून कोणते भावी धोके उत्पन्न होऊ नयेत असं पण.

कथा आवडली आणि अगोचा प्रतिसादही.
बाईंचे आणि तिच्या पिल्लांचे पुढील आयुष्य कसले प्रॉब्लेम न होता जावो.

Pages