'जुलै'चा विजयी चौकार (Movie Review - Drishyam)

Submitted by रसप on 3 August, 2015 - 00:33

सध्या हिंदी चित्रपटाच्या सागरात दोन प्रकारच्या लाटाच जास्त उफाळून येत आहेत. रिमेक आणि चरित्रपट. कारण स्पष्ट आहे. अशीच एक लाट म्हणजे 'दृश्यम'. इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ह्यापूर्वीच्या दृश्यमांत (मल्याळम - द्रिश्यम आणि तमिळ - 'पापनाशम') काम केलं होतं मोहनलाल (मल्याळम) आणि कमल हसन (तमिळ) ह्यांनी. त्यांच्यासमोर हिंदीने उभं केलं आहे 'अजय देवगण'ला. ही तिघांची तुलना अजय देवगणसाठी दुर्दैवी आणि अन्यायकारक होते.

प्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक जोडी 'सलीम-जावेद' (सलीम खान आणि जावेद अख्तर) ह्यांनी एकदा एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'आमच्या स्क्रिप्ट्स इतक्या बारकाव्यांसकट लिहिलेल्या असतात की दिग्दर्शकाने फक्त जसं लिहिलंय तसं केलं तरी पुरेसं आहे.' हा खरं तर यशाचा उन्माद होता. पण एका अर्थी खरंसुद्धा होतं. शोले, दीवार, जंजीर, शान, डॉन, मजबूर आणि असे सलीम-जावेदचे अजूनही काही चित्रपट पाहताना ती कथानकं गच्च आवळलेली असल्याचं जाणवतंच. मात्र म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिग्दर्शक दुय्यम ठरत नाही. उत्कृष्ट कथानकांची अनेकदा माती होत असते आणि उत्कृष्ट दिग्दर्शक सामान्य कथानकातूनही असामान्य चित्रपट बनवू शकतोच.

मूळ मल्याळम भाषेतल्या 'द्रिश्यम' चा हिंदी रिमेक 'दृश्यम' बघताना मला सलीम-जावेदचं वरील वक्तव्य आठवलं. गच्च बांधलेलं, वेगवान कथानक ज्यात बारीक-सारीक तपशिलांची बऱ्यापैकी काळजी घेतलेली आहे, हे 'दृश्यम'चं वैशिष्ट्य. पण चित्रपट हे तर दिग्दर्शकाचं माध्यम मानलं जातं. मग ह्यात निशिकांत कामतांचं योगदान काय ? कदाचित हेच की त्यांनी त्या कथानकाची माती होऊ दिली नाही. मात्र त्याच वेळी, ते वेगळ्या उंचीवर नेलं का ? ह्या प्रश्नाचं उत्तर अप्रिय असू शकतं.

गोव्यात एका 'पोंदोलिम' नावाच्या लहानश्या गावात विजय साळगांवकर (अजय देवगण) पत्नी नंदिनी (श्रिया सरन) आणि दोन मुलींसोबत राहत असतो. त्याचा केबल टीव्हीचा व्यवसाय असतो. सुस्वभावी विजयचे गावांतल्या सगळ्याच लोकांशी चांगले संबंध असतात, अपवाद भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टर गायतोंडे. विजयची एकच वाईट सवय असते. आपल्या केबल टीव्हीच्या ऑफिसात बसून रात्र रात्रभर चित्रपट पाहत बसणे. ह्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो एके रात्री ऑफिसमध्ये टीव्ही पाहत बसलेला असताना, घरी त्याची मोठी मुलगी व पत्नी ह्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडते. साळगावकर कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. ह्या घटनेतून स्वत:च्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी विजय एक 'प्लान' बनवतो. तो एक कहाणी बनवतो, जगतो आणि इतरांनाही जगवतो. मात्र तरी पोलीस सहजासहजी पिच्छा सोडणार नसतातच. चुघांचीही चौकश्या, दबाव, मारहाण अशी सगळी ससेहोलपट सुरु होते. विजयचा प्लान आणि त्याने त्याच्या बायको-मुलींना केलेल्या सूचना हे सगळं कुठवर यशस्वी ठरतं ?
विजय कुटुंबाला वाचवतो का ? अश्या सगळ्या उत्कांठांनी नटलेलं नाट्य रंगतदार आहे.
घटना खूप वेगाने घडत जातात आणि लहान-मोठे धक्के देत राहतात. पण तरी काही तरी कमतरता जाणवत राहते. ती म्हणजे प्रमुख कलाकार जरा कमीच पडल्यासारखे वाटतात.

'हैदर'मध्ये एका आव्हानात्मक भूमिकेनंतर तब्बू 'दृश्यम'मध्ये 'आय.जी. मीरा देशमुख' च्या भूमिकेत दिसते. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याला साजेशी आक्रमकता आणि कणखरपणा तिच्यात जाणवत नाही. ती पोलीस अधिकारी असली तरी मुलासाठी व्याकुळ झालेली आईसुद्धा आहे, असं म्हणता येईल. पण मग तिच्यातली आईच चित्रपटभर दिसत राहते, 'आय.जी.' दिसत नाही, हेच त्यातून नक्की होतं. तिचा आवाज आणि देहबोली गुळमुळीत वाटते आणि 'तब्बू'साठी चित्रपट पाहत असणाऱ्यांचा तिच्याकडून अपेक्षाभंगच होतो.

तिच्यापेक्षा कमी लांबीची भूमिका असलेल्या रजत कपूरने तिच्या पतीच्या व्यक्तिरेखेला चांगले वठवले आहे. एका दृश्यात जेव्हा तो विजयशी थेट संवाद साधतो तेव्हा एक हळवा बाप आणि खंबीर पती अशी त्याची ओढाताण तो खूप संयतपणे दाखवून देतो. मात्र 'रजत कपूर चांगला अभिनय करतो' ह्यात काही आश्चर्याची गोष्ट नसावीच ! तब्बू आणि तो समोरासमोर असताना काय होतं, हे पाहणं उत्कंठावर्धक होतं आणि लहान-लहान प्रसंगांत तो तिला अगदी सहजपणे पुरून उरला आहे.

आधीच म्हटल्याप्रमाणे 'अजय देवगण'ची तुलना दिग्गजांशी तुलना अपरिहार्यपणे होते. मात्र ते दाक्षिणात्य चित्रपट फार कमी लोकांनी पाहिलेले असावेत, त्यामुळे त्यांच्यासाठी 'विजय साळगावकर' फर्स्ट हॅण्डच आहे. त्याने नावातला एक 'A' कमी केला आहे. भारताचा तेज गोलंदाज उमेश यादवने त्याच्या आडनावात एक 'A' वाढवला आहे. देवगण आणि यादवच्या ह्या 'स्पेल-चेंज'मुळे त्यांच्यात विशेष फरक पडलेला नाही. देवगण आजही 'Director's Actor' आहे.

दिग्दर्शक निशिकांत कामत, जिथे अजय देवगणकडून समाधानकारक कामगिरी करून घेतात तिथे ते इतर पात्रांच्या बाबतीत मात्र थोडेसे कमीच पडतात. दोघी मुली व श्रिया सरनकडूनही काही 'मूल्यवर्धक' कामगिरी करवून घेता आली असती, पण तसं काही होत नाही. वेगवान कथेचा व पटकथेचा तोल ढळणार नाही, इतकीच खबरदारी त्यांनी घेतलेली आहे.

विशाल भारद्वाजच्या संगीताला फारसा वाव नाही. 'कार्बन कॉपी' आणि 'घुटता है दम' ही दोन गाणी लक्षात राहतात. गुलजार साहेबांचे शब्द एरव्हीप्रमाणे काही विशेष जादूभरे वाटत नाहीत, हा अजून एक अपेक्षा भंग.

मूळ कथा जीतू जोसेफ ह्यांची आहे. उपेंद्र शिधये ह्यांनी तिचं पुनर्लेखन केलं आहे. 'दृश्यम' चे खरे स्टार हे दोघं आहेत. जर अख्खा चित्रपट आपण श्वास रोखून पाहिला जाईल, तर तो ह्यांच्यामुळेच. चित्रपट सुरु असताना आपल्याला काही प्रश्न पडतात. थोड्या वेळाने त्या त्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळतात ! 'अमुक एक धागा सुटला', असं वाटत असतानाच अखेरीस सर्व धागे बरोब्बर जुळून येतात. लेखक हा बहुतेक वेळेस 'अनसंग हीरो' ठरत असतो. सलीम-जावेद ह्यांनी चित्रपटांसाठी लेखकाचं महत्व जगाला दाखवून दिलं. पण तरी आजही पडद्यावर दिसणाऱ्या 'दृश्यमा'लाच जास्त महत्व आहे आणि 'अदृश्य' लेखकांची कामगिरी म्हणावी तितकी वाखाणली जात नाही.

एकंदरीत दृश्यम हा 'एकदा पाहावाच' ह्या श्रेणीतला आहे.
जुलै महिना चित्रपट रसिकांसाठी पर्वणी (बाहुबली, बजरंगी, मसान, दृश्यम) ठरला आहे. 'दृश्यम' हा 'जुलै'चा विजयी चौकार म्हणवला जाऊ शकतो.
आता येणारा 'ऑगस्ट' वाढलेल्या अपेक्षांचं ओझं सांभाळतो की त्याची 'तब्बू' होते, ते पाहू !

रेटिंग - * * *
- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-drishyam.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०२ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
103445359.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ मल्याळम द्रिष्यम आणि कमलचा पापनाशनम (हा हिंदीसारखा डायरेक्ट रिमेक नाहीये, थोडे चेंजेस आहेत आणि जे चेंजेस आहेत ते अफलातून आहेत!!) पाहिले होते, त्यामुळे हिंदी थेटरात जाऊन नक्कीच बघणार नाही.

लेखक हा बहुतेक वेळेस 'अनसंग हीरो' ठरत असतो. सलीम-जावेद ह्यांनी चित्रपटांसाठी लेखकाचं महत्व जगाला दाखवून दिलं. पण तरी आजही पडद्यावर दिसणाऱ्या 'दृश्यमा'लाच जास्त महत्व आहे आणि 'अदृश्य' लेखकांची कामगिरी म्हणावी तितकी वाखाणली जात नाही.>>> हे आवडलं. Happy

छान लिहिलंय.. तब्बू चे कास्टींग त्या सोलसाठी करायला नको होते ( मी तिचा फॅन आहे तरी हे लिहितोय. )

गच्च आवळलेलं कथानक >> हा शब्दप्रयोग अपेक्षित परिणाम साधत नाहीय. 'आवळलेलं' वाचतानाच 'नको तितकं जास्त बांधलेलं' असा अर्थ ध्वनित होतो आणि तुम्हाला बहुतेक तसं म्हणायचं नाहीये. Happy गच्च बांधलेलं च बरोबर वाटेल.
बाकी, विजयी चौकार वाचल्यावर अजय व इतर कलाकारांचे कमी पडलेले प्रयत्न, तब्बू गुलजार यांच्याबद्दल वाचून निराशाच पदरी पडली.

आवडले परीक्षण. चित्रपटाबद्दलचे मत अपेक्षेप्रमाणे.

कालच एका मित्राने बघून रिव्यू दिलेला. अजय देवगणच्या कामाची तारीफ करत होता. पण मुळात माझ्या फारश्या आवडीचा नाहीये तो. अपवाद सिंघम सारख्या एक्शन भुमिका. त्यात तो मला आवडलेला. गुणी आणि प्रामाणिक अभिनेता आहे खरे, पण अभिनय सहजपणे होत नाही त्याचा हे जाणवते.

कथेबद्दल मात्र उत्सुकता वाढीस लागलीय, योग आला तर बघणारच..

>>'आवळलेलं' वाचतानाच 'नको तितकं जास्त बांधलेलं' असा अर्थ ध्वनित होतो आणि तुम्हाला बहुतेक तसं म्हणायचं नाहीये. :स्मित गच्च बांधलेलं च बरोबर वाटेल. <<

मान्य !

Drishyam पाहिला. नाही आवडला.
तब्बु ऐवजी दुसरी कुणी अभिनेत्री ही चालली असती. रजत कपूर बद्दल ही तेच.

मला तर कथेतही विशेष दम नाही वाटला. मूळ दाक्षिणात्य आवृत्ती ची कथा ही तीच होती का? कि हिंदीत आणताना बदल केलेत? तिकडे हा सिनेमा खूप हिट होता असे ऐकले. सादरीकरणावरती असावा. हिंदीमध्ये ते ही बेतास बात वाटले.

सोपे ऑप्शन सामान्य प्रेक्षकालाही जिथे सुचू शकतात ते तब्बु ला सुचू नयेत ह्याचे आश्चर्य वाटते. जास्त लिहित नाही. अन्यथा स्पॉईलर ठरेल.

रणजीत,

तुमच्या परिक्षणाची अगदी वाटच पहात असतो आम्ही !! जरुर पाहणार हा चित्रपट.
रच्याकने >>आता येणारा 'ऑगस्ट' वाढलेल्या अपेक्षांचं ओझं सांभाळतो की त्याची 'तब्बू' होते, ते पाहू<< ह्या वाक्याने मला पु. लं. च्या..... की त्याचा अण्णू गोगटे झाला ह्याची आठवण झाली Happy

फारच चांगला रिव्ह्यू लिहिलास रणजीत. अजय आवडतोच मला खूप त्यामुळे पाहणार असं ठरवलंच होतं.
तुझं परिक्षण वाचून सिनेमा पहायचं पक्कं केलंय. Happy

मुलगी दत्तक असल्याचे दाखविण्यामागचे प्रयोजन समजले नाही.
असंच आपलं का? सख्खी मुलगी असती तरी कथेत फरक पडला नसता.

कदाचित एवढी मोठी मुलगी अजय आणि श्रियाची कशी असं वाटू नये म्हणून असेल.. (हे त्यानाच वाटेल, प्रेक्षकांना नाही)

कदाचित एवढी मोठी मुलगी अजय आणि श्रियाची कशी असं वाटू नये म्हणून असेल >>>

ही ही ही. असू शकेल. श्रिया ची कास्टिंग केल्या नंतर कथेमध्ये चेंज केला गेला असेल. Wink

त्या दोघींनाही घेणे ही अपरिहार्यता असेल मग वयात अंतर दिसणार नाही म्हणून क्लुप्ती केली कथालेखकाने.

भारी ये हा चित्रपट , आवडला, परिक्षण मस्त. स्मित (लहान्गी ची कामगीरी पन छान) >> +११११
तिच्यापेक्षा कमी लांबीची भूमिका असलेल्या रजत कपूरने तिच्या पतीच्या व्यक्तिरेखेला चांगले वठवले आहे. एका दृश्यात जेव्हा तो विजयशी थेट संवाद साधतो तेव्हा एक हळवा बाप आणि खंबीर पती अशी त्याची ओढाताण तो खूप संयतपणे दाखवून देतो. मात्र 'रजत कपूर चांगला अभिनय करतो' ह्यात काही आश्चर्याची गोष्ट नसावीच ! तब्बू आणि तो समोरासमोर असताना काय होतं, हे पाहणं उत्कंठावर्धक होतं आणि लहान-लहान प्रसंगांत तो तिला अगदी सहजपणे पुरून उरला आहे. >>> +११११११
तिचा आवाज आणि देहबोली गुळमुळीत वाटते आणि 'तब्बू'साठी चित्रपट पाहत असणाऱ्यांचा तिच्याकडून अपेक्षाभंगच होतो. रच्याकने >>आता येणारा 'ऑगस्ट' वाढलेल्या अपेक्षांचं ओझं सांभाळतो की त्याची 'तब्बू' होते, ते पाहू>> +११
हा पण तब्बूमुळे सतत तो पकडला जाईचि भिती वाटत राहिली.

छान परिक्षण. काल पाहिला. एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.
काय आवडलं: कमलेश सावंत (इन्स्पेक्टर गायतोंडे) आणि अजय देवगणचा अभिनय (हो..याच क्रमाने), क्लायमॅक्स मधला उलगडा.
नाही आवडलं: तब्बू (कोणीही चालली असती.. त्यामुळे पूर्णपणे अपेक्षाभंग), श्रिया सरन आणि ती मोठी मुलगी. त्या दोघींनाही घेणे ही अपरिहार्यता असेल मग वयात अंतर दिसणार नाही म्हणून क्लुप्ती केली कथालेखकाने>>> हे पटलं. पण तरी शाळेकरी गणवेशात अगदीच ऑड वाटली ती (नापास होत असेल सारखी.. जाऊद्या :))

काय आवडलं: कमलेश सावंत (इन्स्पेक्टर गायतोंडे) >> अगदी अगदी. या रोलचा कुणीच उल्लेख केला नाही, याचं जरा नवल वाटलं..

देवगणमामा इंटेन्स रोलसाठी प्रसिद्धच आहे. त्यापुढे तब्बुची इंटेन्सिटी थोडी कमी पडली असं म्हणता येईल. पण मग तब्बुपेक्षा आणखी कुणी चांगला केला असता- ते नाव डोळ्यांसमोर येत नाही.

कमलेश सावंत यानी साकारलेल्या इन्स्पेक्टर गायतोंडेचा उल्लेख आवश्यकच.....मागे "अग्ली" या चित्रपटात आपल्या गिरिश कुलकर्णी यानी साकारलेल्या इन्स्पेक्टर जाधव यांच्या भूमिकेचे सर्वच स्तरावरील परीक्षणातून खूप कौतुक केल्याचे वाचनात आले होते....अर्थात गिरिशने ती भूमिका विलक्षण वठविली आहेच अग्लीमध्ये.

>> तब्बुपेक्षा आणखी कुणी चांगला केला असता- ते नाव डोळ्यांसमोर येत नाही. <<

चित्रपट पाहता पाहता वाटत होतं की 'दिव्या दत्ता' हवी होती.
नंतर अजून एक नाव सुचलं, 'सुश्मिता सेन.'

'सीमा विश्वास' ने 'एक हसीना थी' मधली पोलीस ऑफिसर सॉलिड केली होती. ती आता कशी दिसते माहित नाही, तीसुद्धा मस्तच वाटली असती.
तब्बू अगदीच पिचकवणी झालीय.

तब्बू बद्दल मी मध्यंतरी, काही विशिष्ट भुमिका चांगली निभावणारी पण मर्यादीत क्षमतेची अभिनेत्री असा उल्लेख केला होता. काही लोकांना तेव्हा ते नव्हते पटले. पण द्रुश्यमचे रिव्यू पाहता ते तसेच आहेसे वाटतेय.

'सीमा विश्वास' ने 'एक हसीना थी' मधली पोलीस ऑफिसर सॉलिड केली होती.<<< मराठी बिनधास्तमध्येही तिचं काम अफाट होतं.

सुश्मिता सेननं करीअरची वाट लावली नसती तर असले रोल खास तिच्यासाठी लिहिले गेले असते. तमिळ-मल्यळममधली गीता शरद पण चांगलं काम केलं होतं.

http://www.thehindu.com/features/metroplus/high-five-for-drishyams-decep... हा एक लेख वाचला!

छान. आवडलं परीक्षण.

चित्रपट सुरवातीला बराच संथ वाटला. बर्‍याच ठीकाणी बळच विनोदनिर्मिती करायचा प्रयत्न केला आहे. पण मध्यातरानंतर आवडला. अजय देवगण चं काम आवडलं. त्या श्रीया सरेनचे साउथ इंडीयन अक्सेंट वाले उचार खटकत होते. साळ्गावकर ची बायको आणि तिची फॅमिली पण मराठीच दाखवलीये. एखादी हिंदी हिरोइन हवी होती.
रजत कपुर आणि तब्बु बद्दल +१

पिक्चर आवडला. रसप, रिव्ह्यू एकदम परफेक्ट लिहीलाय. इतक्या शांत भूमिकेसाठी अजय देवगण एकदम शोभला असं वाटलं. पण तब्बूऐवजी कोणी दुसरी अ‍ॅक्टर हवी होती. कुठेही आयजी असल्याची तडफ वगैरे न दाखवता बंद पडलेली वाटते आहे सतत. गायतोंडेचं काम भारी!

>>>
चित्रपट सुरु असताना आपल्याला काही प्रश्न पडतात. थोड्या वेळाने त्या त्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळतात ! 'अमुक एक धागा सुटला', असं वाटत असतानाच अखेरीस सर्व धागे बरोब्बर जुळून येतात. लेखक हा बहुतेक वेळेस 'अनसंग हीरो' ठरत असतो. >>>> अगदी अगदी!

'सीमा विश्वास' ने 'एक हसीना थी' मधली पोलीस ऑफिसर सॉलिड केली होती. ती आता कशी दिसते माहित नाही, तीसुद्धा मस्तच वाटली असती.>>> एकदम हेच डोक्यात आलेले. करारीपणा तिने मस्त दाखवला असता ह्यात काहीच शंका नाही. पण मग अश्या करारी आईचा मुलगा इतका वाहवून गेलेला तितका शोभला नसता...

सुश्मिता सेन!!! ओ माय गॉड विचारच करवत नाही! दोष माझा... तिची अगदीच सेक्सी इमेज डोक्यात फिट्ट बसलीय... :-o

पण तब्बू शोभली नाही हे मात्र खरं.

मला शेवटचा सीन पण अनावश्यक किवा चुकीचा वाटला... उगीच थोडा भावनिक केलाय... अजयने काहीही सिम्बॉलिकली सुद्धा मान्य करणे आवश्यक नव्हते... एक सामान्य नागरिक म्हणून ते धोकादायक होते.

बाय द वे तो पोलीस चौकीत हाजिरी का देतो त्याचा काहीच उलगडा नाही दाखवलाय...

Pages