अमेरिकेत आज सुमारे ३० लाख (~ १% लोकसंख्या) भारतीय वंशाचे लोक राहतात; उत्पन्न आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी स्थलांतरित म्हणून भारतीय ओळखले जातात. ते तसे का आहेत हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे; ह्या लेखात मी भारतीय लोक अमेरिकेत कसे स्थिरावले याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. अमेरिकेमध्ये भारतीय स्थलांतराचा इतिहास सुमारे १५० वर्ष जुना आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. स्थलांतर खऱ्या अर्थाने वाढलं ते १९६५ नंतर आणि त्याबद्दल आपण अनेक माध्यमातून वाचत / ऐकत / पाहत आलो आहोत. पण साधारण १८८० ते १९६५ हा प्रवास मोजक्याच भारतीयांचा असला तरी संघर्षपूर्ण आहे. सध्या तरी मी याच कालखंडासंदर्भातील मांडणी करणार आहे.
अमेरिकेतील पहिल्या भारतीय माणसाचा उल्लेख १६२० सालात आढळतो - कोणी "टोनी" नावाचा हा भारतीय इसम व्हर्जिनियामध्ये जॉर्ज मेनेफी नावाच्या एक बड्या जमीनदाराकडे कामाला होता (बहुतेक गुलामच). त्यानंतर १७६८ मध्ये व्हर्जिनिया मधील पेपरात एका मालकाने दिलेली "इस्ट इंडीयन" गुलाम पळून गेल्याची जाहिरात सापडते. १७८० मध्ये "मद्रास मॅन" नावाचा व्यापारी (खरे नाव माहित नाही) मॅसेच्युस्सेट्स मध्ये आला होता असाही उल्लेख आढळतो. पण असे १-२ उल्लेख वगळता १८२० पर्यंत अमेरिकेच्या इतिहासात भारतीय स्थलांतरित फारसे दिसत नाही.
१८५७ मधील एका पुस्तकातील कॅलिफोर्निया मधील सोन्याच्या खाणीत काम केलेल्या "हिंदू" माणसाचे चित्र (बहुधा कॅलिफोर्नियामधील भारतीयांचा सर्वात जुना दस्तावेज):
स्त्रोत: हचिंग्ज कॅलिफोर्निया मॅगझिन १८९९.
१८८६ मध्ये मीर खान नावाच्या भारतीय हकीमाला लायसन्स नसताना काम केले म्हणून अटक करण्यात आली असाही उल्लेख आहे.
स्त्रोतः अल्टा डेली कॅलिफोर्निया, १८ ऑक्टोबर १८८६.
स्थलांतर - १८२० पासून पुढे (मुख्यतः कॅलिफोर्निया)
अमेरिकेत भारतीय स्थलांतराला सुरुवात झाली पश्चिम किनाऱ्यापासून. १८२० च्या आसपास भारतातून काही शीख लोक पहिल्यांदा कामाच्या शोधात उत्तर अमेरिकेत - कॅनडा मधील व्हानकुवर येथे आले आणि तेथे मुख्यतः शेती आणि लाकूड उद्योगात काम करू लागले. साधारण १८९० पर्यंत त्यांची संख्या अगदीच कमी होती पण त्यानंतर मात्र ती हळूहळू वाढू लागली. लवकरच त्यांचाविरुद्ध स्थानिक गोऱ्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि तो इतका शिगेला पोहोचला की भारतातून येणारी जहाजे स्थानिक लोक व्हानकुवर बंदरामध्ये येऊच द्यायचे नाहीत. याची सर्वात (कु)प्रसिद्ध केस म्हणजे मे १९१४ मध्ये कॅनडात येऊ पाहणारे "कोमागाटा मारू" जहाज. सुमारे ३७६ भारतीय असणारे हे जहाज स्थानिकांनी सुमारे तीन महिने बंदराबाहेरच ताटकळत ठेवले आणि अखेरीस जुलै महिन्यात ते जपानकडे (आणि नंतर भारताकडे) माघारी फिरले.
कोमागाटा मारू जहाज आणि त्यावरील भारतीय:
स्त्रोत.
कॅनडा मधून पिटाळले गेलेले भारतीय कामाच्या शोधात मग अमेरिकेचा पश्चिम किनार्यावर आले. सुरुवातीला त्यांनी ओरेगन आणि वाशिंग्टनच्या लाकूड, शेती आणि रेल्वे उद्योगात काम केलं आणि त्यानंतर १८९० च्या दशकापासून ते मोठ्या संख्येने कॅलिफोर्निया मध्ये येऊ लागले आणि इकडे हळूहळू आपला जम बसवायला सुरुवात केली.
१८९९ साली सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल मध्ये आलेली एक बातमी:
स्त्रोत.
१९०० सालातील शीख कामगारः
स्त्रोत.
भारतीय येथे येण्याआधीपासूनच कॅलिफोर्नियात चीनी आणि जपानी कामगार मोठ्या प्रमाणावर आले होते. त्यामुळे स्थलांतरितांविरोधात इथे आधीच असंतोष होता. मग कॅनडा मध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती अमेरिकेतही होऊ लागली. भारतीयांविरोधात विरोधात दंगली झाल्या; जाळ्पोळी आणि मारहाणी झाल्या. त्याचबरोबर त्याना प्रचंड वंशभेदाचा सामना करावा लागला. त्वचेच्या रंगामुळे तर अर्थातच पण त्याच बरोबर त्यांचे कपडे, वास, सवयी यामुळे सुद्धा. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बरीच भारतीय मंडळी आफ्रिकन अमेरिकन आणि मेक्सिकन लोकांबरोबर राहिली आणि त्यांच्यातच मिसळले. भारतीय स्थलांतरित हे मुख्यतः अविवाहित पुरुष असल्यामुळे अनेकांनी त्यांच्याशी लग्नेही केली. अर्थातच लपून छपुन. कारण इंटररेशियल लग्नांवरहि कायद्यानुसार बंदी होती - पण मेक्सिकन स्थलांतरित अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आल्यानंतर (साधारण १९२० नंतर) मात्र चित्र थोडे पालटले - कारण भारतीय आणि मेक्सिकन दोघेही ब्राउन! या काळात अनेक भारतीय-मेक्सिकन लग्ने झाली आणि त्यांनी मारिया सीता हर्नांडेझ, होजे अकबर खान वगैरे अत्यंत इंटरेस्टिंग नावे असलेली मुलेही जन्माला घातली !
एंजल आयलंड:
एशियन लोकांच्या स्थलांतरामध्ये सॅन फ्रान्सिस्को बे मध्ये असलेल्या एंजल आयलंडचं एक महत्वाचं स्थान राहिलं आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर येणाऱ्या परदेशी नागरिकांचा एंजल आयलंड वर इमिग्रेशन चेक होत असे. तिथे डिटेन्शन सेंटर सुद्धा होते. गंमत म्हणजे या डिटेन्शन सेण्टर मध्ये डिपोर्टेशन रेट होता जवळजवळ ३० ते ४०%! इतर ठिकाणी (विशेषतः पूर्व किनाऱ्यावरील एलिस आयलंड येथे) हाच रेट १ ते २% च होता. १९१० ते १९४० च्या दशाकात अमेरिकेत येऊ पाहणारी जवळ जवळ सर्वच भारतीय कुटुंबे एंजल आयलंडवर ठेवली गेली. भारतीयांबरोबरच मुख्यतः इथे राहिले ते म्हणजे चायनीज आणि जपानी. अत्यंत वाईट सुविधा असलेल्या या डिटेन्शन सेण्टर्स मध्ये डिटेनीजना अनेक दिवस राहावे लागे. अशा वेळी अनेक डिटेनिज भिंतीवर आपल्या कविता आणि कथा कोरत असत. त्यामधून त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना येते. एंजेल आयलंड वरील बिल्डिंग्ज मध्ये आजही त्या कविता तशाच सापडतात. कितीतरी गोष्टी तर लिहिल्याच गेल्या नसतील.
डिटेन्शन सेंटरची इमारत:
डॉर्मस:
भिंतींवर कोरलेल्या कविता:
स्त्रोतः विकीपीडीया.
कायदेशीर लढाई
१९१७ सालच्या इमिग्रेशन अॅक्ट मध्ये एशियाटिक देशांमधून आलेल्या स्थलांतरितांवर बंदीच घालण्यात आली. या कायद्यान्वये फक्त कॉकेशियन आणि आफ्रिकन लोकांनाच अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकत होते आणि अक्षरशः अक्षांश रेखांश काढून आशियातून होणाऱ्या सर्वच स्थलान्तरांवर बंदी घातली गेली. या कायद्याच्या अटी इतक्या जाचक होत्या की अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय मुलानादेखील अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकत नव्हते. ह्या कायद्याविरुद्ध अनेक भारतीयांनी कायदेशीर मार्गाने लढाई देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी उल्लेखनीय केसेस म्हणजे भगतसिंग ठींड आणि दिलीपसिंग सौंद यांच्या.
भगतसिंग ठींड यांनी प्रथमच स्थलांतरासाठी कायदेशीर लढाई देण्याचा प्रयत्न केला. ठींड यांनी पहिल्या महायुद्धात अमेरिकन मिलिटरी मध्येही काम केलं होतं. पण १९२३ साली कोर्तानी त्यांच्या विरोधी निकाल दिला. ठिंड यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की भारतीय लोक हे टेक्निकली कॉकेशियनच आहेत. पण कोर्टाने कॉकेशियनची व्याख्या व्हाइट अशीच मर्यादित ठेवली.
भगतसिंग ठिण्ड (१९१८):
स्त्रोत.
दिलीपसिंग सौंद हे १९२० मध्ये गणितात पीएचडी करण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कली) आले. उन्हाळ्याच्या सुट्टीत पैसे मिळविण्यासाठी ते आसपासच्या शेतांवर कामे करायचे. १९२४ साली पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सरळ शेती करण्यास सुरुवात केली. पण आजूबाजूला राहणाऱ्या देशवासीयांची परिस्थिती बघून त्यांनी त्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढत देण्याचा निर्णय घेतला.
नागरिकत्व नसल्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनादेखील जमिनी विकत घेता येत नसत. जमीन लीज करण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे बहुतांश भारतीय आयुष्यभर शेतमजूर म्हणूनच काम करत असत. सुमारे वीस वर्ष सौंदसाहेब वेगवेगळ्या कोर्टात भारतीयांच्या समान नागरिकत्वासाठी लढाई देत राहिले.
याच काळात इतर भागातील भारतीयांनीही (जे संख्येने फ़ारच कमी होते) वेगवेगळ्या पद्धतीने अमेरिकन सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. उदा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मदत करण्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फिलाडेल्फियातील लाला हरदयाळ यांनी हिंदुस्तान गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी भारताच्या स्वातान्त्र्याबरोबरच (लाल लजपत राय याच्या होम रूल चळवळीला मदत) स्थलांतराच्या प्रश्नावर देखील बरेच काम करण्यास सुरुवात केली. मुबारक अली खान (अरिझोना) आणि सरदार जगजीतसिंग (न्यूयॉर्क) यांनी राजकारणी, डिप्लोमॅट, मिडिया वगैरेंबरोबर जोरदार लॉबिंग केलं. शेवटी १९४६ साली ह्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले आणि १९४६ साली कॉंग्रेसने ल्युस-सेलर कायदा पारित केला. ह्या कायद्याअंतर्गत भारतीय (आणि फिलिपिनो) स्थलांतरितांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार सुप्रीम कोर्टाने दिला. त्याचबरोबर दरवर्षी १०० भारतीयाना ग्रीन कार्ड (कायमचे स्थलांतरित असा दर्जा) देण्यासही मान्यता दिली. १९४९ साली नागरिकत्व मिळाल्या मिळाल्या लगेच दिलीपसिंग सौंद कॅलिफोर्नियात जज्ज म्हणून निवडून आले आणि १९५६ साली सेण्ट्रल डेमोक्रटिक पक्षातर्फे कॅलिफोर्निया मधून कोंग्रेसवर निवडूनही गेले. कॉंग्रेसवर निवडून येणारे सौंद हे पहिले एशियन ! सौंद यांची एक जुनी मुलाखत इथे पाहता येईल.
दिलीपसिंग सौंद तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्यासमवेत:
स्त्रोत.
सॅनफ्रान्सिस्को मध्ये अजूनही हिंदुस्थान गदर पार्टीचे ऑफिस जतन करून ठेवले आहे (5, Wood Street). या म्युझियमचे उद्घाटन १९७६ साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते.
स्त्रोत.
१९६५ आणि नंतर
ह्या कायदेशीर लढाईनंतरही १०० ग्रीन कार्ड कोट्यामुळे भारतीय स्थलांतरितांची संख्या फार काही वाढली नाही; १९६५ पर्यंत ही संख्या सुमारे १० ते १२,००० च होती. पण १९६० च्या आसपासच्या सिव्हिल राइट्स चळवळीचे पडसाद इमिग्रेशन पॉलिसीमध्येही पडले नसते तरच नवल होतं. १९६५ साली अमेरिकन सरकारने एक कॉंप्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन कायदा पास केला. सर्व देशांमधून आलेल्या आलेल्या स्थलांतरितांना दर वर्षी समान कोटा पद्धत तेव्हा सुरु झाली जी आजतागायत चालू आहे. १९६५ नंतर मात्र भारतीय स्थलांतरित मोठ्या संख्येनं अमेरिकेत आले. १९८० पर्यंत त्यांची लोकसंख्या २ लाख झाली आणि त्यानंतर दर दशकाला ती दुप्पट ते अडीचपट होत आता ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. हा सगळा पुढचा इतिहास सर्वश्रुत आहेच.
१८८० ते २०१५, we have indeed come a long long way.
वॉशिंग्टन डीसी मधील स्मिथसोनियन म्युझियममध्ये ह्या विषयावरील प्रदर्शन ऑगस्ट २०१५ पर्यंत चालू आहे (Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation). शक्य असेल तर आवर्जून भेट द्या आणि कसे वाटले किंवा नवीन काय माहिती मिळाली हे इथे जरूर लिहा.
*****
देशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास : http://www.maayboli.com/node/54325
*****
अजून एक कल्पना:
मायबोलीवर अनेक देशांतील सदस्य आहेत. जर त्या प्रत्येक देशामधील भारतीय स्थलांतराचा इतिहास आपण संकलित करू शकलो तर तो एक अतिशय उपयुक्त दस्तावेज ठरेल. मराठीमध्ये माझ्या मते अशी माहिती संकलित केलेली नाही.
अधिक संदर्भ:
बर्कली साउथ एशिया लायब्ररी: http://www.lib.berkeley.edu/SSEAL/
Berkeley South Asian History Archive: http://www.berkeleysouthasian.org/
Smithsonian: Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation: http://smithsonianapa.org/beyondbollywood/
एंजल आयलंड इमिग्रेशन स्टेशन: http://www.aiisf.org/pdf/aiisf_sfChron_seAsian.pdf
मायग्रेशन पॉलिसी इंस्टिट्यूट: http://www.migrationpolicy.org/article/indian-immigrants-united-states
सर्व प्रतिसादही फारच रोचक
सर्व प्रतिसादही फारच रोचक आहेत ..
१९२१ मध्ये सिलोन (श्री लंका) मध्ये ६५०,०००, मलेशियात ४५०,००० ह्या आकड्यांवर विश्वास बसत नाही ..
गामा: करेक्ट. पण १९१० च्या
गामा: करेक्ट. पण १९१० च्या सुमारापर्यंत मेक्सिकन (किंवा हिस्पॅनिक) लोकांची सन्ख्या कॅलिफोर्नियात बरीच कमी होती. १८४० साली कॅलिफोर्नियाची लोकसंख्या फक्त ८,००० च्या आस्पास होती. १९१० पासून मेक्सिकोत राज्यक्रांती आणि यादवी युद्ध सुरु झालं आणी तुफान हिंसाचार झाला. त्याला कंटाळून अनेक नवे स्थलांतरित कॅलिफोर्निया आणि इतर राज्यात आले.
अवांतर: मेक्सिकोतील राज्यक्रांती फारच इंटेरेस्टिंग प्रकरण होतं (१९१० ते १९२०). अमेरिका आणि ब्रिटन तत्कालीन हुकुमशहाला तर जर्मनी क्रांतिकारकांना मदत करत होती.पहिले महायुद्ध याच काळातले. त्याबद्दल एक वेगळा लेख लवकरच.
मस्त लेख. सशल, सध्या
मस्त लेख.
सशल,
सध्या मलेशियात १०% भारतिय आहेत. १९३० च्या आधी १०% पेक्षा बरेच जास्त भारतिय होते. १९३० च्या दंगलीत बर्याच भारतियाना परत जावे लागले होते.
अप्रतिम लेख.. सर्व प्रतिसादही
अप्रतिम लेख..
सर्व प्रतिसादही फारच रोचक आहेत ..>>+१
खूप नवीन माहिती मिळाली
मस्त माहितीपूर्ण लेख निकीत.
मस्त माहितीपूर्ण लेख निकीत. सगळीकडचा डेटा मिळाला तर एक अनमोल खजिना जमा होईल.
मी ऑरेगन राज्यात आहे. इथल्या मराठी मंडळातल्या एका सिनिअर मेम्बरनी युनिव्हरसिटीत जाऊन जुन्या मराठी लोकांची माहिती गोळा केली. त्यामध्ये पांडुरंग खानखोजे यांच्या नावाचा सर्वात जुना संदर्भ मिळाला. त्यांची माहिती विकिपिडियावर पण आहे.
मला मराठी मंडळाची या संशोधनावरील लिंक मिळत नाहीये पण त्यांच्या पुढच्या पिढ्या बहुतेक मेक्सिको आणि कॅनडात आहेत असं ऐकून आहे.
पटेलांचा इतिहास देखील वाचण्याजोगा असावा.
धनश्री, जबरी.. मी हेच
धनश्री, जबरी.. मी हेच लिहायचं म्हणून कालपासून लिंक शोधत बसलीये (आणि प्रतिसाद लांबणीवर टाकला)....लिंक नाहीच मिळाली अजून
निकीत, अतिशय मस्त , अभ्यासपूर्ण आणि इंटरेस्टींग लेख. प्रतिसादही वाचायला छान वाटलं.
उत्तम काम केलं आहेस, करत आहेस... अश्या कामात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हायला नक्की आवडेल
हा लेख अन सगळे प्रतिसाद पण
हा लेख अन सगळे प्रतिसाद पण मस्त . त्या खानखोजेंची माहिती इंटरेस्टिंग आहे एकदम. खरं ग्लोबल लाइफ जगलेत ते! जर्मनी रशिया, अमेरिका, मेक्सिको अन बॅक टु नागपूर !!
Khankhoje yanchya ayushyawar
Khankhoje yanchya ayushyawar veena gavankar yanni 'nahi chira, nahi paNatee' navacha pustak lihila ahe.
चिनुक्स + १ इप्रसारण इंटरनेट
चिनुक्स + १
इप्रसारण इंटरनेट रेडियोवर या पुस्तकाचं वाचन झालं होतं.
रार - मंडळाने मध्यंतरी साईट
रार - मंडळाने मध्यंतरी साईट अपडेट केली ना, आधी झुमला की काय असं काहीतरी नाव होतं आता स्वतंत्र वेबसाईट आहे. त्या प्रक्रियेत कुठेतरी हा डेटा हरवलेला दिसतो. सौरभ भिडे कडे ही माहिती असावी.
असो अवांतराबद्दल क्षमस्व.
आनंदीबाई जोश्यांची इथे काही माहिती उपलब्ध असेलच की. न्यूयोर्क/पेनसिव्हिनिया भागात होत्या ना त्या?
खानखोज्यांची माहिती मस्त.
खानखोज्यांची माहिती मस्त. मेक्सिको वैअगिरे भारिच. मला ते मानवेंद्रनाथ रॉय यांचे सहकारी म्हणूनच ठाऊक होते. रॉय यांच्या जोडीने कम्युनिझमचा भारतामधील परिस्थितीत (जमीनदारी, जातीव्यवस्था ई.) अंगीकार कसा करायचा याबद्दल त्यांनी विवेचन केले होते.
रारः लिंक देता येइल का ?
आनंदीबाई जोशी न्यूजर्सी
आनंदीबाई जोशी न्यूजर्सी भागात.
निकीत, लिंकचा शोध घेते आणि देते इथे. वेबसाईट अपडेट प्रकरणात गहाळ झालेली दिसते.
बिच्चारे खानखोजे. एव्हढे थोर,
बिच्चारे खानखोजे. एव्हढे थोर, कर्तबगार क्रांतिकारी, स्वातंत्र्यासाठी प्राणावर उदार होऊन कष्ट केले. पण अहिंसा वादी स्रकारला त्याची काय पर्वा? बिचारे १९६१-६२ या वर्षी आमच्या नागपूरच्या कॉलेजात जर्मनचे लेक्चरर होते. त्या वेळी जर्मनपेक्षा ते त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत. पायावर ब्रिटिशांची गोळी झेलली तो पाय दर दोन तीन लेक्चर्स नंतर दाखवत असत. नुसतेच मारामारी नाही तर उद्योगधंदे, संशोधन या क्षेत्रातहि त्यांनी बरेच काम केले, त्याबद्दलहि ते बरेच काही सांगत. पण चीनशी १९६३२-१९६३ मधे युद्ध होइस्तवर भारतीय अहिंसेने भारावले होते. करायचे काय लष्कर? आपण चरखा चालवू, शेळीचे दूध पिउ नि गप बसू!!
बाकी निकीत, लेख उत्तम, माहितीपूर्ण. १९९५ नंतर आलेल्या लोकांना त्या काळातील लोकांच्या परिस्थितीची, त्यांच्या संघर्षाची काय कल्पना!
बायदिवे, झक्की किती सालि
बायदिवे, झक्की किती सालि पहिल्यांदा अमेरिकेत गेले?
>>
माझ्या मते झक्की हे भारतातून अमेरिकेत मायग्रेट झालेले पहिले भारतीय आहेत. चुभूदेघे.
ते जौद्या ...
निकीतच्या रूपाने आणखी एक सकस लेखन करणारा मायबोलीकर लाभला आहे असे म्हणता येईल...
>>> माझ्या मते झक्की हे
>>> माझ्या मते झक्की हे भारतातून अमेरिकेत मायग्रेट झालेले पहिले भारतीय आहेत. चुभूदेघे <<<<
बहुतेक असेच असावे, फक्त त्या आधी ते नागपुराहून पुण्यात मायग्रेट झाले होते असे ऐकिवात आहे.. ख.खो.दे.जा. अन झक्की जाणे !
निकीत, >> मेक्सिकोतील
निकीत,
>> मेक्सिकोतील राज्यक्रांती फारच इंटेरेस्टिंग प्रकरण होतं (१९१० ते १९२०). अमेरिका आणि ब्रिटन तत्कालीन
>> हुकुमशहाला तर जर्मनी क्रांतिकारकांना मदत करत होती.पहिले महायुद्ध याच काळातले. त्याबद्दल एक वेगळा लेख
>> लवकरच.
हा हुकूमशहा मेक्सिकोचा ना? बाकी मजकुराशी सहमत. मेक्सिकोची क्रांती हे रक्तरंजित प्रकरण होतं असं ऐकून आहे. ती जगातली पहिली कम्युनिस्ट क्रांती आहे. रशियातली त्यानंतर झाली.
आ.न.,
-गा.पै.
राॅबिनहूड: धन्यवाद गामा:
राॅबिनहूड: धन्यवाद
गामा: करेक्ट. मेक्सिकोमधील हुकुमशहा.
मेक्सिकोमधील राज्यक्रांतीचं नेमकं वर्गीकरण कसं करायचं हा इतिहासकारांना अजूनही पडलेला प्रश्न आहे. रुढार्थाने ती कम्युनिस्ट क्रांती नव्हती. मेक्सिकन कम्युनिस्ट पार्टीचा त्यातील सहभाग मर्यादीत होता. क्रांतिकारक (विशेषतः मदेरो, सपाटा वगैरे नेते मंडळी) हे लोकशाही-समाजवादी होते. किंबहुना त्यांनी 1917 सालीच घटना तयार करून लोकशाही निवडणूका घेतल्या आणि काही वर्षातच कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली. त्याचबरोबर, मेक्सिकोतील तत्कालीन व्यवस्था ही रशियासारखी बूर्झ्वा (bourgeois) नव्हती तर बर्याच प्रमाणात जमीनदारी (feudal) होती. त्यामुळे अनेक जण ह्या क्रांतीला फ्रेंच राज्यक्रांतीच्या जवळचीही मानतात.
अवांतर:
मानवेंद्रनाथ रॉय यांनी मेक्सिकन कम्युनिस्ट पार्टी स्थापण्यात पुढाकार घेतेलेला होता.
माहिती पूर्ण लेख!
माहिती पूर्ण लेख!
खूप मस्त लेख. आणखीही अशाच
खूप मस्त लेख. आणखीही अशाच अभ्यासपूर्ण लिखाणाची वाट बघते आहे
निकीत.. हे इथे थोडे अवांतर
निकीत.. हे इथे थोडे अवांतर होइल.. पण मेक्सिकन सिव्हिल वॉरच्या संदर्भात जे तु म्हणालास की....
"१९१० पासून मेक्सिकोत राज्यक्रांती आणि यादवी युद्ध सुरु झालं आणी तुफान हिंसाचार झाला. त्याला कंटाळून अनेक नवे स्थलांतरित कॅलिफोर्निया आणि इतर राज्यात आले." ...
त्याबाबतीत.. अगदी थोडक्यात सांगायचे तर मॅनिफेस्ट डेस्टीनी व मन्रो डॉक्ट्राइन या दोन गोष्टींच्या नावाखाली १९व्या शतकात अमेरिकेने आपला देश पुर्वेला अॅटलांटीक महासागरापासुन ते पश्चिमेला पॅसिफिक महासागरापर्यंत पसरवला. त्या दोन गोष्टींच्या नावाखालीच १८४६ ते १८५० च्या दरम्यान प्रेसिडेंट जेम्स पोक व प्रेसिडेंट झॅकरी टेलरच्या कारकिर्द्रीत अमेरिकेने चक्क मेक्सिकोकडुनच टेक्सास व कॅलिफोर्निया ही दोन मोट्ठी राज्ये बळकावली होती.(अलाँग विथ.. प्रेझेंट डे अॅरिझोना अँड न्यु मेक्सिको ऑल्सो!)
आज मात्र आपण सहज म्हणु शकतो की १९१० ते १९२० दरम्यानच्या मेक्सिकन राज्यक्रांतीच्या वेळी बरेचसे मेक्सिकन कॅलिफोर्नियात स्थलांतरीत झाले....:)
खुपच माहितीपूर्ण
खुपच माहितीपूर्ण लेख.
प्रतिसादांमधे आलेली माहितीही खुप महत्वपूर्ण आहे.
दीप कधी आला?
दीप कधी आला?
अभ्यासपूर्ण लेख..! फारच
अभ्यासपूर्ण लेख..!
फारच आवडला...
http://www.nypl.org/blog/2013
http://www.nypl.org/blog/2013/01/31/africans-india-slaves-generals-and-r...
चिनूक्स, मस्तच लिंक.
चिनूक्स, मस्तच लिंक. धन्यवाद.
आजही भारतात सुमारे १५,००० आफ्रिकन वंशाचे लोक राहतात (विद्यार्थी, तात्पुरते स्थलांतरित वगैरे सोडून). अर्थात अनेकशे वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज भारतात आले. त्यामुळे हे खरे भारतीयच. यातले बहुतांश गुजरात मध्ये आहेत आणि त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. हा व्हिडीयो बघा: https://www.youtube.com/watch?v=oiA9QiAnA8I
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=p6I6L8b6mQs
आंदमान मध्ये ही आहेत. त्यांना अॅथलिट्स म्हणून ट्रेन करावे असे प्रयत्न ही झाले.
Nikit and all, found
Nikit and all, found something relevent to your article...
http://scroll.in/article/675432/rare-photos-of-pandurang-khankhoje-the-i...
लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचून
लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचून माहितीत बरीच भर पडली. निवांत वाचायचा म्हणून अनेक महिन्यांपासून हा लेख विशलिस्टवर होता, वेळेचं सार्थक झालं
अतिशय उत्तम माहितीपूर्ण
अतिशय उत्तम माहितीपूर्ण लेख.प्रतिसाद ही माहितीपूर्ण.
ह्यावेळच्या इकॉनॉमिस्ट मध्ये
ह्यावेळच्या इकॉनॉमिस्ट मध्ये गुजराती लोक एकोणीसाव्या शतकापासून आफ्रिका ते युरोप अमेरिकेपर्यंत कसे पसरले यावर लेख आहे. वाचनीय.
http://www.economist.com/news/christmas-specials/21683983-secrets-worlds...
माझ्या आणि मुकुंदच्या आधीच्या प्रतिसादात हे पटेल लोक अमेरिकेतील मोटेल व्यवसायात कसे शिरले हे लिहिले आहे.
Pages