भाई निर्दोष सुटले !! ओह खान तुस्सी ग्रेट हो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2015 - 12:31

.

"" खानो मे खान, सलमान खान !! ""

.

ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..

सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.

फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.

त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!

.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.

आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..

आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!

सत्यमेव जयते !! जय हिंद !!!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे रे रे. सलमान बद्दल मनात आदर होताच हा धागा वाचल्यानंतर द्विगुणित झाला.
असे स्टार शतकांमधे क्वचितच होतात. गरिबांच्या प्रति त्याचा ओढा फार होता. विविध चॅरिटी टिव्हीवर दाखवुन तो गरींबांना मदत करत होता. इतकी वर्ष लोकांच्या शिव्याशाप ऐकुन काढली फार फार वाईट वाटले हो. शेवटी सत्याचाच विजय झाला. एका निष्पाप कोवळ्या जीवाला न्याय मिळेल अशी आशा वाटु लागली
डोळे पाणावले

आ न

बिईंग ह्युमन

सल्लु मेरेकु भी आवडता पण भारतरत्न म्हणजे काय हलवा आहे कुणालाही वाटत सुटायला .. कैच्याकै ..>> +१००

सल्लू इतका दयाळू आहे तर त्याला त्या फुटपाथवरच्या माणसांची दया नाही आली का?

आपल्या गुन्हा केलेल्या ड्रायव्हरला वाचवण्यापेक्षा त्याला तेव्हाच पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे होते. सल्लूला त्या ड्रायव्हरच्या बायको अन् मुलांची पालनपोषणाची (आर्थिक) जबाबदारी घेता आलीच असती. त्यासाठी त्याचा गुन्हा स्वतःवर घ्यायची गरज नव्हती.

आणि गुन्हगाराला पाठीशी घालणा-यालाही शिक्षा झाली पाहिजे.

सल्लूला त्या ड्रायव्हरच्या बायको अन् मुलांची पालनपोषणाची (आर्थिक) जबाबदारी घेता आलीच असती. > घेतली असेलच ना. इतका दयावान तो आहेच असेलच

सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते.>>
कबीर, मी ते यासंदर्भात म्हणालेय.

तो अडकला असता तरीही सल्लु त्यांची काळजी घेऊ शकलाच असता.

अहो आता ही घेतली असेलच की. अब करे सो आज कर आज करे सो कल कल करे सो परसो कर केहत गये कबीर जहा जागो भय्या वही सवेरा होये .

सल्लू इतका दयाळू आहे तर त्याला त्या फुटपाथवरच्या माणसांची दया नाही आली का?

>>>>>

आली असेलच दया, पण जाणारे गेले होते, तो त्यांना जिवंत तर करू शकणार नव्हता. त्यांना न्याय मिळवून देणे म्हणजे नक्की काय? ड्रायव्हरला फासावर लटकावणे का? पण त्या न्यायाने नक्की कोणाचे भले होणार होते? प्रॅक्टीकल विचार करता त्याने नक्कीच जिथे शक्य तिथे आर्थिक आणि भावनिक मदत केलीच असणार. किंबहुना त्यासाठी तो ओळखला जातो..

जर त्याने स्वता गुन्हा केला असता तर मात्र त्याने स्वता प्रायश्चित घेतले होते पाहिजे वगैरे बोलू शकतो, पण आता ती देखील केस नाहीये.

@ भारतरत्न
काय गैर आहे त्यात? कला जोपासणारे किंवा खेळात प्रावीण्य दाखवणारे मिळवू शकतात तर यांच्या जोडीने माणूसकी आणि सामाजिक बांधिलकी दाखवणार्‍याला का नाही मिळावे?

मला कोणी एखादे कारण सांगा जे लता मंगेशकर यांना भारतरत्न देऊ शकतो मात्र सलमान खान त्याला अपात्र ठरतो.

मला कोणी एखादे कारण सांगा जे लता मंगेशकर यांना भारतरत्न देऊ शकतो मात्र सलमान खान त्याला अपात्र ठरतो.>>>
नविन पोल चा विषय आणि धागा..

लता मंगेशकर आणि सलमान ची कंपॅरिझन? Uhoh
होऊ शकत नाही. लता मंगेशकरांना मिळू शकतो म्हणून त्यालाही मिळावं हे कसलं लॉजिक आहे?
मग त्या प्रमाणे सगळेच कलाकार लायनीत येतील त्यांनी काय घोडं मारलंय? Uhoh

अखिल भारतीय बलात्कारपटू संघटनेचे तहहयात अध्यक्ष श्रीमान शक्तीकपूर किंवा संस्थापक सदस्य रणजित यांना सुद्धा द्यावं लागेल..

लता मंगेशकर आणि सलमान ची कंपॅरिझन? >> अंह तुलना त्या दोन दिग्गजांमध्ये नाही करत आहे. भारतरत्नाच्या निकषाच्या अनुषंगाने बोलत आहे.
लता मंगेशकर या आपल्या गायन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत आणि त्यांनी रसिकांना आपल्या कलेने भरभरून आनंद दिला आहे.
हेच जर सलमान आपल्या क्षेत्रात करत असेल, इतर कोणापेक्षाही सर्वोत्तमरीत्या करत असेल, तर का नाही? नक्की कोणत्या निकषावर इतर भारतरत्न मिळालेले कलाकार त्याच्यापेक्षा सरस ठरतात?

ओह ऋन्मेऽऽष आज तो तुने मेरा दिन बना दिया.
सलमान एक नट म्हणुन तर आवडतोच पण माणुस म्हणुन त्याच्याबद्दल खुप आदर आहे. तो जरी चांगला अभिनेता नसला तरी त्याच्या 'हसासाहै' मधल्या 'प्रेम' वर तर मी फिदा आहे. एव्हढा मस्त लाजतो की माझ्याच गालावर लाली चढते. 'गर्व' मध्येही तो खुप आवडलाय. बाकी बर्‍याच सिनेमात लोकांना जरी तो माकडचाळे करतोय असे वाटले तरीही मी त्याला सहन करु शकते एव्हढा आवडतो तो मला.

सल्लू इतका दयाळू आहे तर त्याला त्या फुटपाथवरच्या माणसांची दया नाही आली का?
>>>>>
आली असेलच दया, पण जाणारे गेले होते, तो त्यांना जिवंत तर करू शकणार नव्हता. त्यांना न्याय मिळवून देणे म्हणजे नक्की काय? ड्रायव्हरला फासावर लटकावणे का? पण त्या न्यायाने नक्की कोणाचे भले होणार होते? प्रॅक्टीकल विचार करता त्याने नक्कीच जिथे शक्य तिथे आर्थिक आणि भावनिक मदत केलीच असणार. किंबहुना त्यासाठी तो ओळखला जातो.. .>> हो नक्कीच केली असेल त्याने मदत पण त्याबद्दल माहिती देत नसणार कारण कोर्ट केस सुरु आहे.

जवानीच्या जोशमध्ये त्याच्याकडुन गुन्हे झालेत आणि त्याने ते मान्यही केलेत पण त्यानंतर मात्र त्याने स्वतःला बदलले. जगासमोर स्वतःची चांगली इमेज ठेवली आणि बहुतेक जणांनी मान्यही केली.

असो, जर ही बातमी खरी असेल तर नक्कीच सलमानबद्दलचा आदर द्विगुणित झाला आहे.

कशावरून सलमानने पैशाच्या जोरावर ड्राईव्हर ला अडकवत नसावा ? आणि खरोखर ड्राईव्हरच गाडी चालवत होता तर इतक्या लोकांना चिरडलेल्या खुन्याला वाचवायचा प्रयत्न केल्याबद्दल सलमानला शिक्षा का होऊ नये ? आपल्या घरातली प्रिय व्यक्ती त्या चिरडल्या गेलेल्या लोकांत नवती म्हणून ह्या लोकांना खान ग्रेट वाटतोय?

खरोखर ड्राईव्हरच गाडी चालवत होता तर इतक्या लोकांना चिरडलेल्या खुन्याला वाचवायचा प्रयत्न केल्याबद्दल सलमानला शिक्षा का होऊ नये ? >> +१
मलाही हेच म्हणायचेय.

आणि शिक्षा द्यायची सोडा इथे तर त्याला भारतरत्न द्यायची मागणी करतायत.
Sad

कशावरून सलमानने पैशाच्या जोरावर ड्राईव्हर ला अडकवत नसावा ? आणि खरोखर ड्राईव्हरच गाडी चालवत होता तर इतक्या लोकांना चिरडलेल्या खुन्याला वाचवायचा प्रयत्न केल्याबद्दल सलमानला शिक्षा का होऊ नये ? आपल्या घरातली प्रिय व्यक्ती त्या चिरडल्या गेलेल्या लोकांत नवती म्हणून ह्या लोकांना खान ग्रेट वाटतोय?
>>>>>>>>>>>>>

जर त्याला पैशाच्या जोरावर ड्राईव्हरला अडकवायचा असता तर एव्हढ्या वर्षांनी का? आधीच केले असते की.
आणि जरी तो स्वतः गाडी चालवित असेल किंवा खुन्याला वाचवायचा प्रयत्न करत असेल दोन्ही गुन्हेच आहेत त्यामुळे इथे कुणीच त्याला शिक्षा होऊ नये असे म्हणतच नाहीयेत फक्त तो ग्रेट माणुस आहे असेच म्हणत आहेत कारण त्याने दुसर्‍याचा अपराध स्वतःच्या खांद्यावर घेतलाय.

मै भी प्रेम की दीवानी हु।

पण ऋन्मेशाला तो मैप्याकीपासून कसा आवडायला लागला? तेव्हातर ऋन्मेशबाळ एकतर रांगत तरि असणार किंवा नर्सरित बसून abcद गात असावेत Wink

फक्त नावावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये >> ह्याबद्दल दुमत नाही, पण भारतरत्न वैगेरे जरा अति होतयं असं नाही का वाटत?

पैसा फेको तमाशा देखो!

ड्रायव्हर गाडी चालवत होता, तर इतके दिवस का नाही सांगितलं ? शूटिंगच्या डेट्स जुळवून केसला हजेरी लावणं, परदेशात जाण्यावर बंधनं येणं, ह्या सगळ्या प्रोफेशनल हॅझार्ड्सपेक्षा ड्रायव्हरचं सत्य सांगून, त्याच्यासाठी सर्वोत्तम वकील नेमून त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेणं जास्त सोयीचं होतं ना !

ऋन्मू,
बाळा, शहाणा ना तू.. असं सारखं सारखं पोल-पोल नाही करू रे ! मोदी काकांना तुझा पोल दिसला, तर खरोखर द्यायचे पुरस्कार..

रच्याकने,
ऋन्मेष केजरीवालांचा अनुयायी आहे का ? बात बात पे पब्लिक ओपिनियन लेता है ! Wink

@ भारतरत्न हा धाग्याचा विषय नाही, त्यामागच्या भावना समजून घ्यायला हव्या. लेखात स्पष्ट उल्लेखलेय की सैफ अली ला पद्मश्री मिळत असेल तर सलमानला भारतरत्न हवे. तरीही त्यावर चर्चा करायचीच असेल तर हरकत नाही, कारण माझ्या हातात असते तर मी नक्कीच सलमानला भारतरत्न दिले असते.

असो,
आता इतर

कशावरून सलमानने पैशाच्या जोरावर ड्राईव्हर ला अडकवत नसावा ?
>>>
शक्यय, पण एवढी सोपी गोष्ट आधी का नाही केली? कित्येक चित्रपटात जे दाखवले गेलेय ते चित्रपटक्षेत्राशीच संबंधित व्यक्तींना सुचू नये?

आणि खरोखर ड्राईव्हरच गाडी चालवत होता तर इतक्या लोकांना चिरडलेल्या खुन्याला वाचवायचा प्रयत्न केल्याबद्दल सलमानला शिक्षा का होऊ नये ?
>>>
कायद्यात असेल ती शिक्षा होईलच, पण नैतिकतेच्या निकषावर तोलता त्याला ड्रायव्हरची किती चूक वाटली वा प्रत्यक्षात तशी किती होती हे त्यांनाच माहिती.

पण ऋन्मेशाला तो मैप्याकीपासून कसा आवडायला लागला? तेव्हातर ऋन्मेशबाळ एकतर रांगत तरि असणार किंवा नर्सरित बसून abcद गात असावेत
>>>>>>>
शोले चित्रपट सुद्धा माझ्या जन्माच्या कैक वर्षे आधीचा पण अमिताभ मला शोलेपासून आवडायला लागला.
म्हणजे या विधानाचा अर्थ जेव्हा त्याचा शोले हा चित्रपट मी पाहिला तेव्हापासून आवडायला लागला अस होऊ शकतो.
असो, तसेही त्याचा तो पहिला चित्रपट म्हणून तशी पद्धत असते म्हणून लेखात तसा उल्लेख केला इतकेच.

शक्यय, पण एवढी सोपी गोष्ट आधी का नाही केली? कित्येक चित्रपटात जे दाखवले गेलेय ते चित्रपटक्षेत्राशीच संबंधित व्यक्तींना सुचू नये?

>> तेव्हा ड्रायव्हरने नकार दिला असेल, आता काही 'नाईलाजास्तव' तयार झाला असेल किंवा परिस्थितीजन्य पुरावे अश्या हेराफेरीला जागा ठेवत नसतील किंवा तेव्हा वाटलं असेल की चुटकीसरशी सुटून जाऊ, इ.

त्याचा तो पहिला चित्रपट म्हणून तशी पद्धत असते म्हणून.....

>> पहिला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' होता.

पहिला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' होता.
>>>
वाटलेच होते कोणीतरी याचा उल्लेख करणार.

असो, तो फारूख शेख आणि रेखाचा चित्रपट होता. Happy

<< असो, तो फारूख शेख आणि रेखाचा चित्रपट होता. >>

बिंदू, बिंदूला कसे विसरलात? आखिर बिंदु बिंदुसेही तो रेखा बनती है ना?

Pages