'सिडनी' मधला थरार आणि सख्या रे घायाळ मी हरिणी

Submitted by अतुल. on 16 March, 2015 - 17:28

काही काही योगायोग विलक्षण असतात. एखादे गाणे ऐकावे आणि काही काळातच त्या गाण्यातल्या अर्थाची घटना खऱ्या आयुष्यात घडलेली ऐकायला मिळाली कि मन स्तिमित होते. परवा सहज लताजींनी गायलेले 'सामना' मधले "सख्या रे घायाळ मी हरिणी" ऐकत होतो. हे गाणे विलक्षण आहे. किंबहुना सामना चित्रपटच विलक्षण आहे. माझ्या जन्माच्या आधीचा चित्रपट. पण माझे भाग्य असे कि कसल्याश्या फेस्टिवल वगैरेच्या निमित्ताने पुण्यात अलका थियेटरच्या मोठ्या पडद्यावर मला हा चित्रपट एकदा पाहायला मिळाला होता. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा चित्रपट थिएटरला पाहणे हा एक अप्रतिम अनुभव आहे. खरेच. एकच शब्द "अप्रतिम". केवळ अप्रतिम. दिग्दर्शक प्रभावी असेल, कलाकार मुरलेले असतील, संगीत कसदार असेल आणि गाणाऱ्या लतादीदी असतील तर ती कलाकृती अत्युच्च दर्जाची व्हायला कलर, डॉल्बी, डिजीटल, एचडी किंवा तत्सम अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज नसते हे 'सामना' चित्रपट दाखवून देतो. "समस्त व्याघ्रमंडळी सुखी असोत" म्हणत मिश्किलपणे सरपंचाच्या भयाण वाड्यात सहजगत्या प्रवेश करणारे डॉ. लागू आणि "साहेब, ह्या देशात लोकांना एकवेळचं अन्न खायला मिळत नाही. पण तुम्ही घ्या" म्हणून आलेल्या व्ही.आय.पी. पाहुण्याचा पाहुणचार करणारे 'सरपंच' निळू फुले. ह्या दोन दिग्गजांनी केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना तीन तास खुर्चीला खिळवून ठेवण्याची किमया साधली आहे. चित्रपट पाहून थियेटर बाहेर आल्यावर "पडद्यावर कलर नव्हते, संगीत डिजीटल नव्हते, शुटींग परदेशातलं नव्हतं, गाण्यात डान्स नव्हता, खायला पोपकोर्न नव्हते" असली कसलीही खुळचट बाजारू गोष्ट मनात येत नाही. मनात भरून राहतो तो फक्त आणि फक्त चित्रपट. भरून राहतो तो निळू फुलेंचा करारी सरपंच, भरून राहतो तो डॉ. लागूंचा "मारुती कांबळे"चा शोध, आणि भरून राहते ती काळीज चिरत जाणारी लतादीदींची गाण्यातली आर्त साद... "हा महाल कसला, रान झाडी ही दाट. अंधार रातीचा, कुठं दिसना वाट"

असे आशयघन चित्रपट आणि अशी इंटेन्स गाणी आता होणार नाहीत. कारण तो काळ तसा होता. आजचा काळ वेगळा आहे. असा काहीबाही मी विचार करत होतो. तितक्यात पेपरमधल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. "सिडनी मध्ये भारतीय महिलेची हत्या". कुतूहलापोटी बातमी वाचली. आजकाल खून, बलात्कार, दरोडे, हाणामाऱ्या अगदी रोजचे झाले आहे. पण ही बातमी वाचली आणि मन अक्षरशः थरारून गेले. वेगवेगळे स्त्रोत धुंडाळून बातमीच्या मिळेल त्या डीटेल्स भराभरा मनात साठवत गेलो. आणि ज्या परिस्थितीत ज्या प्रकारे ज्या वेळी ज्या वातावरणात ही घटना घडली होती तिची कल्पना करुन अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.

साधारणपणे तीन वर्षापूर्वी "ती" नोकरीच्या निमित्ताने भारतातून तिकडे गेली होती. घरदार कुटुंबाला सोडून इतक्या दुरवर दीर्घकाळ राहणे हा अतिशय वेदनादायक अनुभव असतो. पण कर्तव्याची जबाबदाऱ्यांची जाणीव ठेऊन भावनेला मुरड घालून आयुष्यात काही गोष्टी कराव्याच लागतात. काही काळ कुटुंबाच्या विरहाचाच फक्त प्रश्न असतो. आणि आजकाल अनेकजण असे करतातही. तिनेही तेच केले होते. नवऱ्याला आणि आपल्या सहा वर्षाच्या मुलीला सोडून ती दूर सातासमुद्रापार सिडनीला आली होती. दिवसभर खूप हेक्टीक काम असायचे. संध्याकाळी मन शिणून जायचे. पण काहीही झाले तरी भारतात असलेल्या आपल्या पतीशी आणि लाडक्या लहानगीशी ती अगदी दररोज संध्याकाळी न चुकता फोनवर बोलत असे. कारण तीच तिचे सर्वस्व होते. तिच्या भविष्यासाठीच ती इतक्या दुरवर सर्वांना सोडून इतकी वर्षे राहिली होती. पण आता मात्र ती थकली होती. कुटुंबापासून अजून जास्त काळ लांब राहणे आता तिला आता शक्य नव्हते. तसे तिने अनेकदा आपल्या नवऱ्याला फोनवर बोलून दाखविलेही होते. पण आता फक्त काही काळच राहिला होता. पुढच्याच महिन्यात ती कायमसाठी भारतात परतणार होती. नवरा आणि मुलीबरोबर नेहमी नेहमीसाठी ती राहणार होती. त्यासाठी तिने सगळी जय्यत तयारीही केली होती. चिमुकलीसाठी कपडे आणि खेळण्यांची मोठाली थैलीच तिने भरून तयार ठेवली होती. इतका प्रदीर्घ काळ बाहेर काढल्यावर कुटुंबासमवेत राहण्यासाठी ती खूप आसुसलेली होती. अधीर झाली होती. आतुरतेने सिडनी मधील शेवटचे दिवस सरण्याचीच वाट पाहत होती.

सात मार्च दोन हजार पंधराचा दिवस उजाडला. शनिवार होता. खरेतर हा सुट्टीचा दिवस. पण कामाचा ताण इतका कि आजसुद्धा काही अपॉइंटमेंट्स होत्या. महत्वाच्या होत्या. त्या आजच करणे भाग होते. पाहता पाहता तिचा अख्खा दिवस त्यात गेला. संध्याकाळ उलटून रात्र पडली. थकून भागून तिने घरी जाण्यासाठी ट्रेन पकडली. सिडनी पासून पंचवीसेक किलोमीटर दूर असलेल्या वेस्टमिड भागात ती जिथे आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती तिथून जवळ असलेल्या ट्रेन स्टेशनवर जेंव्हा ती उतरली तेंव्हा रात्रीचे चक्क नऊ वाजून गेले होते. स्टेशनवर कसलीच वर्दळ नव्हती. सिडनी शहरापासून थोडी दूर असलेली ही स्टेशन्स रात्रीच्या वेळी सामसूम असतात. ट्रेन असेपुरती थोडी गजबज. पुन्हा शुकशुकाट. आजूबाजूला माणूसकानूस दिसत नाही. दूरदूरवर निरव शांतता. रस्त्यावरच्या एखाददुसऱ्या गाड्यांचेच काय ते अधूनमधून आवाज. इथून केवळ एक दिड किलोमीटरवर तिचे घर. झपाझप पावले टाकत ती स्टेशन बाहेर आली. दरम्यानच्या काळात दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे भारतात नवऱ्याशी फोनवर बोलणे सुरु होते. मुख्य रस्त्याच्या पदपथावरून काही काळ चालल्यावर तिला आता डावीकडे वळायचे होते. तिथून पार्क शेजारून जाणाऱ्या छोट्या पायवाटेने तिचे घर लगेचच येणार होते. मोठे मैदान आणि पार्क यांच्या मधून गेलेली साधारणपणे एक किलोमीटरभर लांबीची ही पायवाट तशी तिच्या रोजच्या सवयीची. पण रात्री अपरात्री ती सुनसान असायची. चिटपाखरूही फिरकत नसे. भयाण वाटायची. म्हणूनच भुरट्या गुंडपुंड प्रवृत्तींचाही तिथे वावर होता. तिच्या मैत्रिणीने देखील तिला त्या वाटेवरून रात्री न येण्याबाबत पूर्वी एकदा दोनदा बजावले होते. पण फोनवर नवरयाबरोबर बोलायच्या नादात वेळकाळाचे भान न राहता केवळ नेहमीच्या सवयीप्रमाणे तिची पावले त्या वाटेवर आपसूक वळली. फोन वर बोलताना तशीही ती मनाने भारतातच असायची. मायदेशी परत येण्याच्या कल्पनेने ती किती उतावळी झाली आहे किती आनंदून गेली आहे हे ती नवऱ्याला सांगत होती. आपल्या चिमुकलीची प्रेमाने चौकशी करत होती.

चालता चालता बोलता बोलता काही क्षण कसे गेले तिला कळलेही नाही. अंगाला रात्रीच्या वेळची बोचरी थंडी जाणवत होती. वाऱ्याने आजूबाजूच्या गर्द झाडीत पानांची सळसळ व्हायची. बाकी सगळं वातावरण स्तब्ध. आणि अचानक तिला पाठीमागून कोणाचीतरी चाहूल लागली. इतर कोणीतरी पांथस्थ असेल म्हणून तिने सुरवातीला दुर्लक्ष केले. पण "त्या" व्यक्तीची चाल काही ठीक नाही हे तिच्या अंत:चक्षूना जाणवले. तशी ती चपापली. सतर्क झाली. नकळत कानोसा घेऊ लागली. आणि काही वेळातच ती मागून येणारी व्यक्ती अन्य कोणी पांथस्थ नसून आपलाच पाठलाग करत आहे हे तिच्या लक्षात आले. आता दूरदूरवर तिथे आजूबाजूला वस्ती नव्हती. त्या छोटेखानी वाटेवर गर्द झाडी. विजेच्या दिव्यांचे खांब लांब लांब अंतरावर लावलेले. एका बाजूला विशाल मैदान. दुसरीकडे मोठ्ठे पार्क. आणि सभोवार गडद अंधार. ती थरारली. पावले भरभर पडू लागली. लांडग्याने सावजावर पाळत ठेवावी तशा नजरेने पाहत मागची ती व्यक्ती तिच्या अजून जवळ येऊ पाहत होती. दूर अंतरावर असलेल्या पथदिव्याच्या अंधुक प्रकाशात तिला त्याचा भेसूर चेहरा दिसला. आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. घशाला कोरड पडली. हजारो किलोमीटर दूर असलेल्या नवऱ्याला तिने फोन वर सांगितले, "माझा कोणीतरी पाठलाग करतंय. मला भीती वाटतीये." अचानक कापरे भरलेला तिचा आवाज ऐकूनच तिचा नवरा हादरला. परिस्थिती जाणून घेण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. काहीतरी अघटीत घडणार आहे याची पाल नकळत त्याच्या मनात चुकचुकली. त्याने जादा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. धीर देत राहिला. "मी घरापासून तशी जवळ आली आहे. पण मला खूप भीती वाटतीये रे. काय करू" आता मात्र ती रडवेली झाली. जीव कासावीस झाला होता. नियती पण किती विचित्र. आपली प्रिय पत्नी जीवघेण्या संकटात आहे हे सगळे काही त्याला समजत होते. पण पण तो काहीच करू शकत नव्हता. तिने आता भीतीने जोरजोरात चालायला सुरवात केली. ह्रिदयाची धडधड जोरात वाढली होती. पावले अडखळली. मदतीची तिची आर्त याचना फोनमधून त्याच्या कानावर पडली. आणि त्याच्या पायातले त्राण संपले. तो फक्त वेड्यासारखा तिला हाका मारत राहिला. तिचा आर्त आवाज असहायपणे ऐकत राहिला. एव्हाना त्या नराधमाने तिला गाठले होते. एका झेपेत तिला पकडून तिचा रस्ता अडवून तो भेसूर नजरेने तिच्याकडे रोखून पाहत उभा राहिला. नजर अतिथंड पण जीवघेणी. हिंस्र श्वापदालाही लाजवेल इतके क्रौर्य आणि निष्ठूरपणा त्याच्याकडे पाहिल्यावर जाणवत होता. बघता बघता मानसिक तोल ढळल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले आणि विमनस्क हसल्या सारखे करत त्याने धारदार सुरा काढला.

"क.. कक.... क्काय.... काय... हवेय तुला? कक काय हवे ते घे. चीजवस्तू. पैसे. दागिने. प्प... पण प प्ली प्लीज. प्लीज. मारू नको. प्लीजजजजजज. मला मारू नको.", ती किंचाळली. ठेचकाळत पडली. कशीबशी सावरत उठून उभी राहिली. काही क्षणात हे सर्व काय घडले होते. तेवढ्यात मृत्यूची कराल दाढ होऊन उभ्या असलेल्या त्याचा हात सुऱ्यासहित वर गेला.

आणि जिवाच्या आकांताने ती फोनवर ओरडली, "डार्लिंग, मला भोसकले त्याने. भोसकले मला. वाचव."

आणि त्यानंतर काही क्षणातच तिची रक्त गोठवणारी गगनभेदी किंकाळी त्याला ऐकू आली.

त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. हाता पायाला घाम सुटला. अंगातले बळच निघून गेले. चक्कर येतेय कि काय असे वाटून बाजूच्या खांबाचा आधार त्याने घेतला. मूठ घट्ट आवळली. आणि होते नव्हते तेवढे त्राण घशात आणून तो ओरडला,

"प्रभा... प्रभा... प्रभा SSSSSS......"

मात्र त्याच्या हाकेला पलीकडून तिचा कसलाही प्रतिसाद आला नाही. त्याच्यापासून हज्जारो किलोमीटर अंतरावर दूर प्रदेशात पथदिव्याच्या मंद प्रकाशात रक्ताच्या थारोळ्यात तिचा देह निपचित पडला होता. सगळी धडपड थांबली होती. आता सगळे शांत झाले होते. परत जाण्याची स्वप्ने. आतुरता. अधीरपणा. सगळे सगळे सगळे, आता शांत शांत झाले होते.......

हा महाल कसला रानझाडी ही दाट
अंधार रातिचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव
केलि कशी करणी ?
सख्या रे, घायाळ मी हरिणी

काजळकाळी गर्द रात अन्‌ कंप कंप अंगात
सळसळणार्‍या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी

गुपित उमटले चेहर्‍यावरती, भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी

सख्या रे, घायाळ मी हरिणी. सख्या रे, घायाळ मी हरिणी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा,

>> पण तिने थोडा धोका पत्करला होता

या विधानाअगोदरचा परिच्छेद वाचला तर तिने खूप धोका पत्करला होता असं दिसतंय.

भ्रमणभाषावर बोलताबोलता गाडी चालवणं जसं धोकादायक आहे तसंच रात्रीबेरात्री भ्रभावर बोलत हिंडणंही खतरनाक मानलं जायला हवं.

आ.न.,
-गा.पै.

दाद व इतर, काळजी करू नका, माझ्या वा इतर काही पोस्ट्स मुळे लगेच काय भारत सरकार त्यांच्या नागरिकांकरता, ऑस्ट्रेलिया व सिडनीमधे फिरणे धोकादायक असले काही जाहीर करणार नाही, Proud अदरवाईज जसे ते अमेरिका/इन्ग्लंड व इंग्लंडच्या पावलावर पाऊल ठेवून ऑस्ट्रेलिया/न्युझिलंड भारताबद्दल त्यांच्या नागरिकांकरता सूचना जाहिर करीत असतात..... Wink

काल संध्याकाळी साडे सहावाजता (लख्ख उजेडी) एका पार्क मध्ये चालणाऱ्या १७ वर्षाच्या मुलीचा खुन झाला आहे.... या भागात मी राहिले आहे आणि अगणित वेळा चालायला गेले आहे.... झालय काय लोकांना?ती मुलगी घरापासून अर्धा किमी दूर होती....

फारच भयंकरच Sad
<<प्रभा त्या भागात दोन-तीन वर्षं रहात होती. त्या रस्त्याने कुणीही शहाणं माणूस त्या वेळी जाऊ धजणार नाही हे जर तिला इतक्या वर्षांनीही माहीत नसेल तर मात्रं खरच कठीण आहे>>
माहितीही असेल पण नवर्याशी फोन वर बोलता बोलता पटकन लक्षात आल नसेल. बर्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात पण आपल्या हातून अनवधानाने घडत असतात.शेवटी तिचा काळ आला होता आणि वेळ पण म्हणूनच वरच्यानी तिला त्या वाटेने जायची बुद्धी दिली एवढंच म्हणू शकतो Sad

दाद, मीना प्रभुंनी " न्यू यॉर्क न्यू यॉर्क " पुस्तकात अशा एका जागेचा उल्लेख केलाय. पोलिस त्यांना तिथे जाऊ नका असे सांगत होते. त्या हट्टाने पोलिसांसोबत गेल्या तिथे. तिथले अनुभव भयानकच होते आणि पोलिस सोबत नसते तर वाईट घडले असते, असेही त्यांनी लिहिलेय.

मुंबईतही अशा जागा आहेतच. दिवसा गजबजलेला फोर्ट विभाग, रात्री असुरक्षित असतो. तसाच झुनझुनवाला कॉलेजसमोरचा पूलही. झेड ब्रिज, कुलाबा कॉजवेच्या मागच्या गल्ल्या दिवसाही असुरक्षित आहेत.

या ठिकाणी जे गुंड वावरतात त्यात अंमली पदार्थाचे सेवन करणारे / व्यापार करणारे सहसा असतात. आणि कुठल्याही देशाने कितीही पहारे बसवले तरी हा व्यापार रोखणे अजून कुठल्याही देशाला शक्य झालेले नाही.

नेमका कुठला विभाग आणि कुठल्या कारणांनी असुरक्षित होत जातो, हाही प्रश्न आहेच.

सध्या गाजतोय त्या एन एच १० चित्रपटाबाबतही असा आक्षेप वाचला, कि हरयाणात असे घडते, हे सगळ्यांनाच माहित असते. तिथल्या लोकांना तर नक्कीच. त्यामूळे डोळ्यादेखत जरी असे घडले, तरी दुर्लक्ष करावे, अशी त्यांची पॉलिसी असते. पोलिसांची पण तशीच असते.

प्रभा बळी जाते आणि (चित्रपटातली ) मीरा मूर्ख ठरते.

खरच सांगा, असा बोर्ड लावून ती जागा आंदण दिल्यासारखीच नाही का?. असा बोर्ड सरकार लावून हात झटकू शकतं का? अशा सरकारला मी टिकू देणार नाही. (मत देणार नाही).
>>>>
दाद, मी ते शेवटचे वाक्य, निदान बोर्ड लावा की, आणि सरकार जबाबदारी घेणार नाही, वगैरे उपरोधाने लिहिले होते.

संरक्षण हा नक्कीच आपला पहिला हक्क आहे.

फे फे उडेल ह्याची गॅरेंटी असल्या मुळे अश्या एकाड्या ठिकाणी जात नाही. उगाच नस्ती साहसे करण्याची गरज नाही.>>>+१११
Prevention is better than cure

तिच्या मैत्रिणीने देखील तिला त्या वाटेवरून रात्री न येण्याबाबत पूर्वी एकदा दोनदा बजावले होते. पण फोनवर नवरयाबरोबर बोलायच्या नादात वेळकाळाचे भान न राहता केवळ नेहमीच्या सवयीप्रमाणे तिची पावले त्या वाटेवर आपसूक वळली. >>>
प्रभाचा मूर्खपणा सुधा कारणीभूत झाला

मग त्या त्या देशाचे/शहराचे पोलिस/सैन्य/होमगार्ड इत्यादी व्यवस्था या "माहित असलेल्या जागी" वावरणार्‍या गुन्हेगारांचा बंदोबस्त का करू शकत नाहीत?>>>
अश्या जागा भारतात सुधा आपल्या पोलिसांना माहित असतात .पण त्यांनी action घेतली तर पण मग गुंडांकडून मिळणारे हप्ते , भेटी आणि काय काय बंद नाही का होणार . तसंच काहीसं ऑस्ट्रेलिया त सुधा काही भागात घडत असावं

अश्या जागा भारतात सुधा आपल्या पोलिसांना माहित असतात .पण त्यांनी action घेतली तर पण मग गुंडांकडून मिळणारे हप्ते , भेटी आणि काय काय बंद नाही का होणार .
>>>>
सहमत आहे, आधीची कुठलीशी पोस्ट लिहिताना माझ्याही हे डोक्यात आलेले. पण पोलिसांनाच का बदनाम करा, त्यांच्याही डोक्यावर बरेच असतात.. जबाबदार पुर्ण सिस्टीम आहे.. ठरवले तर गुन्ह्यांची शिक्षा लक्षणीयरीत्या कमी करू शकण्याची धमक जी प्रत्यक्षात बाळगून आहे.. पण.........

रोजचे जीवन जगत असताना एखाद्या गोष्टीतली संभाव्य धोक्याची शक्यता (Potential Risk) ओळखता येणे हे पण खूप आवश्यक आहे. पण सगळेजणच त्याबाबत तितकेसे जागरूक असतात असे नाही, हे वेगवेगळ्या बातम्या वाचल्या कि जाणवते. केवळ "संभाव्य धोका लक्षात न आल्याने" घडलेल्या दुर्घटना खूप असतात. माझ्याच आठवणीत अशा अनेक घटना आहेत, आणि त्या लक्षणीय आहेत. कि खरेच त्या सर्व लोकांनी संभाव्य धोक्याचा थोडा जरी विचार केला असता तरी ते वाचले असते. जिथे जाऊ नको म्हणून सांगितले होते तिथे (नकळत/दुर्लक्ष करुन/अतिआत्मविश्वासापोटी) प्रभा गेली. पण समुद्र किनारे, खोल दऱ्या, धोकादायक तलाव इ. असलेल्या पर्यटनस्थळी आपण बरेचदा पाहतो कि तिथे लिहिलेल्या धोक्याच्या सूचना धुडकावून काही लोक नको तिथे जात असतात वं "मजा करत" असतात. आणि इतकेच काय जे तिथे जायला घाबरतात त्यांना पण ते "घाबरट आहेस का" म्हणून बरोबर येण्यासाठी उद्युक्त करतात. तेंव्हा त्याला काय म्हणावे? मला तरी अशा प्रकारांची मनस्वी चीड येते. शालेय शिक्षणातच याबाबत मुलांवर परिणामकारकरित्या बिंबवले तर उपयोग होईल असे वाटते.

दिनेशदा,

मुंबईतल्या खतरनाक जागांच्या यादीत एसीसीची गल्ली पण टाका. दिवसा उजेडी हजारो लोक जा ये करतात तिथून. पण संध्याकाळनंतर तुमचा जीव जाऊ शकतो. लोकांचे गेलेत. Sad

आ.न.,
-गा.पै.

अत्यंत प्रभवी लेखन आहे.
घटना दुर्दैवी Sad

वर्षा पुर्वी चा माझा प्रवास (युके तील) आठवला... हा भाग सेफ़ आहे पण मी पुर्णपणे टरकले होते .. (नुकतीच झालेली अनुप बिडवे ची केस )
रात्री १०.३०- ११.०० वाजता पिकाड्डीली ते सेल बस ने त्या बस मधे मी नी ड्रायव्हर असे दोघेच आणि बस स्टॉप ते घर साधारण अर्धा किमि.. चांगला रस्ताच पण अंधार आणि माणुस नाही की काणुस नाही असा ...

वत्सला, त्या बातमीच्या लिन्क मधे सर्वात शेवटी थ्रीडी फोटो दिलाय फ्लॅश वापरुन, तो फिरवुन ३६० अंशात बघता येते.
ते बघितले तर जाणवते की ती तर तिकडील चांगली वस्ती आहे... घरे आहेत, गाड्या आहेत. निर्मनुष्य/ओसाड धोकादायक अशी जागा वाटत नाही ती.
तर मग तरी तिथे असे का व्हावे?

लिंबु, तेच तर... त्या मुलीचा आवाज ऐकून लोकांनी लगेच इमरजेंसी ला फोन केला... तो गुन्हेगार त्या काळात crime spree वर होता... असे नंतर बातम्यांत होते..पकडला गेला आहे तो माथेफिरु....आज त्या मुलीचं open to public funeral होतं Sad

Nira, सेल कुठेशी आलं? लंडनमध्ये होतात का? किती नंबरची बस होती?
आ.न.,
-गा.पै.

गा पै जी...
मी मन्चेस्टर -सेल मधे रहात होते (ऑफ़िशीयल विसीट) आणि एकटिच शनि-रवि लंडन ट्रिप करुन आले-
युस्टन ते पिकड्डिली रेल माग पुढे बस

वत्सला, अशा घटनांचा तिथे काय परिणाम झालाय ?. जनमत खवळले आहे का ? पोलिसांनी काही सावधगिरीच्या सुचना दिल्या आहेत का ?

गा. पै....

कधी कधी नवीन रस्ते वगैरे झाले कि असे बदनाम भाग नष्ट होतात. कुर्ल्याला पश्चिमेला गर्दुल्यांचा अड्डा होता. नवीन फ्लायओव्हरमूळे ते सोडून गेले.

एक स्त्री मृत्युमुखी पडली आणि तुम्हाला लेखात गाणीबिणी लिहायला सुचताहेत हे अजिबात आवडलं नाही.>>
मलाही ही गोष्ट खटकली. गाण्याचा संबंध याघटनेसोबत लावणे अजिबात लॉजीकल वाटत नाही.

Nira,

बापरे, तुम्ही मँचेस्टर पिकॅडिलीहून रात्री बस पकडलीत! Sad अतिशय बदनाम भाग आहे तो.

आ.न.,
-गा.पै.

एका स्त्रीच्या दुर्दैवी मृत्युचा (मग भले तिची स्वतःची थोड्या प्रमाणात चूक असेना) उपयोग करून 'ललित' लिहिलं जातं हे मलाही खटकलं होतं, पण अनुल्लेखाने मारावं म्हणून काही लिहिलं नाही, पण धागालेखक पुरेसा टीआरपी मिळवण्यात यशस्वी झाला आहेच, तर मत नोंदवतो. हा 'ललित लेख' आवडला नाही.
आणि 'थरार' कसला डोंबलाचा! हा शब्द थ्रिलिंग या अर्थाने वापरला जातो. या आधीही दहशतवादी हल्ल्यांच्या संदर्भात वापरला गेलेला पाहिला आहे. लोकांचे मुडदे पडताहेत त्यात यांना 'थरार' कसला वाटतो आहे.

>> आणि 'थरार' कसला डोंबलाचा! हा शब्द थ्रिलिंग या अर्थाने वापरला जातो.

'थरार' शब्द 'थ्रील' पेक्षा 'हॉरर' च्या जास्त जवळचा आहे (म्हणूनच हॉरर मुव्हीज साठी "थरारपट").
'थ्रील' साठी 'थरार' पेक्षा 'रोमांचक' हा प्रतिशब्द जास्त योग्य वाटतो.

गा पै जी...
अगदी 'बापरे' इतकी भीती वाटली नाही...पण घाबरले होते हे नक्की..
अखंड ओम नम:शिवाय चा जप करत आले.
मेट्रो आणि बस हे २ पर्याय होते..त्यात मेट्रो स्टेशन ते घर २ किमी आहे आणि रविवारी रात्री १०.३० ला ट्रेन मधे आणि रस्त्या वर कोणिही नसणार याची खात्री होती...त्यातल्या त्यात बस मधे निदान ड्रायव्हर तरी बरोबर असेल असा विचार केला...
असो.

मी खुप घाबरलेली होते पण अलर्ट होते...म्हणजे नमके काय माहीत नाही. पण माझी सतत चुळबुळ चालु होती इतके खरे की फोन वर बोलावे असे वाटले नाही कारण बोलत असताना माझे आजुबाजुचे लक्श विचलीत होइल याची भिती वाटत होती.

दुर्दैवी प्रभा यांच्या मनात काय चालु होते याचा अन्दाज लावता येईल. त्याही अलर्ट असतीलच ..पण म्हणजे नेमके काय कोणीच सांगु शकत नाही.

Pages