संक्रांत पर्वणी - तुकोबांच्या नजरेतून.

Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2015 - 10:00

संक्रांत पर्वणी - तुकोबांच्या नजरेतून.

देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ॥३॥ अभंगगाथा क्र. ४०५९||

(तिळी-तीळामधे, तिळाच्यारुपाने., धाला-आनंदला. , साधला-प्राप्त केला., पर्वकाळ-पर्वणी, पुण्य मिळवण्याची सुसंधी., अंतरींचा-मनातला, चित्तातला., मळ-दोष., खुंटले-संपले)

संक्रांत हा पर्वकाळ समजला जातो. या पर्वकाळात संपूर्ण भारतात अनेक लोक नदीत, विशेषतः समुद्रात स्नान करतात - का तर पाप निघून जाते आणि पदरी पुण्य पडते म्हणून. तसेच संक्रांतीला हलवा, तीळगुळ वाटण्याचीही प्रथा आहे - या सर्व संकल्पना बुवा कशा सुरेखरित्या आणि नजाकतीने वापरतात ते पाहण्यासारखे आहे अगदी ...

देवदर्शन हा तुकोबांना पर्वकाळ वाटतोय. ते म्हणतात माझ्या अंतरात देव प्रगटलाय आणि त्यामुळे मी अंतर्बाह्य आनंदरुप झालोय...
देव पहाणे, देव भेटणे, साक्षात्कार याविषयी आपल्या सर्वसामान्यांच्या ज्या कल्पना असतात आणि संतांचा जो निखळ अनुभव असतो यात जमिन-अस्मानाचे अंतर असते. आपली एक कल्पना असते की कोणी मुगुटधारी-पीतांबर नेसलेली व्यक्ति अकस्मात आपल्या समोर येऊन उभी रहाणार आणि त्याने आशीर्वादासारखा हात केला की त्यातून काही किरण बाहेर पडून आपल्या अंतरात ते शिरणार ... Happy Wink (टिपिकल टी व्ही वर दाखवतात ना तसे देवदर्शन आपल्याला अपेक्षित असते)

याउलट बुवा म्हणतात - देव अंतरात प्रगट होतो - इथे उदाहरण काय अप्रतिम दिले आहे पहा - देव तिळी आला - तिळाभोवती साखर जमा होऊन मग तो 'हलवा' दिसायला लागतो. अंतरात जर देव प्रगटला (अनुभूतीला आला) तर तो जीव गोड गोड होतो म्हणजेच आनंदरुप-सुखरुप-समाधानी होतो - बुवांसारखा, ज्ञानोबांसारखा - कुणाही संतांसारखा ... "मग तू अवघाचि सुखरुप" होसी अशाप्रकारे ..
चंदनाचे हात पायही चंदन | - अंतर्बाह्य तो महापुरुष आनंदरुप होऊन रहातो -
सर्व ज्ञानाची लक्षणे त्या महापुरुषाच्या ठायी दिसू लागतात. इथे ज्ञानाची लक्षणे म्हणजे काय हे देखील नीट पहाणे आवश्यक आहे - भगवद्गीतेत सांगितलेली ज्ञानलक्षणे, भक्तलक्षणे, योगीलक्षणे, गुणातीताची लक्षणे, स्थितप्रज्ञलक्षणे ही सगळी लक्षणे जे सांगतात तीच ती लक्षणे - उदाहरणादाखल -
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च |
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ||अ. १२, श्लोक १३||
( कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी
मी माझे न म्हणे सोशी सुख-दु:खे क्षमा बळे || गीताई)

हे कशाने झाले तेदेखील बुवा आवर्जून सांगताहेत - गेला अंतरीचा मळ - अंतरंगातले सारेच्या सारे दोष गेले आणि सहाजिकच त्या निर्मळ अंतःकरणात गोपाळ रहायला आला - मन करा रे निर्मळ | येऊनि गोपाळ राहे तेथे |
सारी अध्यात्म-साधना या एका चरणात सांगितली आहे बुवांनी. येन केन प्रकारेण हे मन निर्मळ झाले रे झाले की तिथेच तो देव प्रकटणार आहे - सगळ्यात मुख्य साधना आहे - संतसंगती.
संतचरणरज लागता सहज | वासनेचे बीज जळूनि जाय |
मग रामनामी उपजे आवडी | सुख घडोघडी वाढू लागे | तुकोबा|
आणि हाच खरा पर्वकाळ - की जिथे मुख्य मनच निर्मळ होते. संतांना जो पर्वकाळ वाटतो आहे तो आपल्या पर्वकाळापेक्षा फार फार वेगळा आहे - या पर्वकाळात अंतरींचा सर्व मळ, सर्व घाण निघून गेली त्यामुळे संतांना ही पर्वणी वाटते. आपण फक्त बाह्य शुचि (बाहेरील स्वच्छता) ला महत्व देतो पण संत मात्र अंतर्शुचिला फार महत्व देतात - एऱ्हवीं तरी पंडुसुता | आंत शुद्ध नसतां | बाहेरि कर्म तो तत्त्वतां | विटंबु गा ||ज्ञा. अ. १३ -४६८||
आत-बाहेर शुचिता ही संतांना अभिप्रेत आहे - म्हणे शुचित्व गा ऐसें | जयापाशीं दिसे | आंग मन जैसें | कापुराचें ||ज्ञा. अ. १३ -४६२|| कापूर आत बाहेर एकसारखाच सुगंधी, स्वच्छ असतो तसे.

पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें - बर्‍याचदा परमार्थी लोकांना विचारले की हे सर्व (पूजाअर्चा, तीर्थयात्रा, ध्यानधारणा, इ.) का करता तर उत्तर मिळते पुण्य मिळवण्यासाठी. आणि बुवा तर म्हणताहेत - पापपुण्य गेले - भगवंत आंतमधे प्रकटला की पाप-पुण्य दोन्ही गेलेच की - ते सारे रिलेटिव्ह होते - भगवंत तर "केवल' (अ‍ॅबसोल्यूट) स्वरुपात असतो - त्याठिकाणी ना पाप ना पुण्य, ना अज्ञान ना ज्ञान, ना सगुण ना निर्गुण - 'केवल' स्थिती.
जसे गंगामैयाच्या पाण्यात स्नान केले की सारी पापे नष्ट होतात असे म्हणतात तसे हे पापपुण्य एका स्नानानेच गेले - अंतरातील मळ/दोष जाणे हे एकच स्नान - आत्मदर्शन झाले की अंतर पूर्ण निर्मळ झालेच झाले - म्हणजेच एका स्नानानेच सारे काही झाले...
गंगा न जाऊंजी मैं जमुना न जाऊंजी ना कोई तिरथ जाऊंजी
अडसठ तीरथ हैं घटभीतर वाही मैं मनमल न्हाऊंजी | गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याउंजी | दूजेके संग नही जाऊंजी || श्रीगोरक्षनाथ ||

तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ||
अशा महात्म्याचे बोलणे कसे असते तर अतिशय शुद्ध, पवित्र आणि गोड (मन सुखावणारे) - जणू अमृताची धार... ब्रह्मींचें विसवणेंवरी | उन्मेख लाहे उजरी | जें वाचेतें इयें करी | सुधासिंधु ||ज्ञा. अ. १५-१०|| या ,महापुरुषाची वाणी म्हणजे जणू अमृतसिंधूच...
समर्थ म्हणतात -
अंतरी गेलिया अमृत | बाह्य काया लखलखीत | अंतरस्थिती बाणता संत -| लक्षणे कैसी || दासबोध || अंतरात जर परमात्मा प्रगटला तर बाहेरही ते ज्ञान लक्षणांद्वारे कोणाच्याही लक्षात येणारच की ... अशा महात्म्याचे साधे पाहणेही कृपापूर्ण असते, स्नेहार्द्र असते -
पुढां स्नेह पाझरे | माघां चालती अक्षरें | शब्द पाठीं अवतरे | कृपा आधीं ||ज्ञा. अ. १३-२६३|| स्वामी स्वरूपानंदांची दृष्टी अशी होती - दृष्टीतूनच प्रेमवर्षाव व्हायचा, शब्द तर नंतर यायचे ....आणि हे शब्द तरी कसे तर - अगदी कमी (मितले) पण शुद्ध, मृदू आणि भावभरले - ऐकणार्‍याला वाटत असेल अरे या तर अमृताच्या लाटा कानावर पडताहेत जणू ...
तैसें साच आणि मवाळ | मितले आणि रसाळ | शब्द जैसे कल्लोळ | अमृताचे ||ज्ञा. अ. १३-२७०|

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशा आत्मज्ञानी पुरुषाला सगळ्या जनामधे, समस्त लोकांमधे जनार्दनच दिसू लागतो. जे जे भेटेल भूत | ते ते मानिजे भगवंत | हा भक्तियोगु निश्चित | जाण माझा || हा त्याचा भाव नसतो तर अनुभूति असते.
पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरि | धन्य तो संसारी भाग्यवंत || स्वामी स्वरुपानंद ||

हें असो आणिक कांहीं| तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं| जैसें सबाह्य जळ डोहीं| बुडालिया घटा ||ज्ञा. अ. ७-१३३||
हें समस्तही श्रीवासुदेवो| ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो| म्हणौनि भक्तांमाजीं रावो| आणि ज्ञानिया तोचि ||ज्ञा. अ. ७-१३६||

तुकोबांना, सार्‍या संतांना जी ही पर्वणी साधली तशी आपल्यालाही साधता यावी यासाठी या संतांच्याच चरणी मनोभावे प्रार्थना....

उदारा जगदाधारा देई मज असा वर
स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर ....

इति ||
----------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेखात ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्या उद्धृत केल्या आहेत त्यांचे अभंग ज्ञानेश्वरीतून सुस्पष्टीकरण ...

एऱ्हवीं तरी पंडुसुता | आंत शुद्ध नसतां | बाहेरि कर्म तो तत्त्वतां | विटंबु गा ||ज्ञा. अ. १३ -४६८||
(तैसे बाह्यकर्म | जाणावे निष्फळ | अंतर निर्मळ | नसे जरी ||अभंग ज्ञाने. )

म्हणे शुचित्व गा ऐसें | जयापाशीं दिसे | आंग मन जैसें | कापुराचें ||ज्ञा. अ. १३ -४६२||
(देह आणि मन | ज्याचे मलहीन | कापुरासमान | अंतर्बाह्य ||)

ब्रह्मींचें विसवणेंवरी| उन्मेख लाहे उजरी| जें वाचेतें इयें करी| सुधासिंधु ||ज्ञा. अ. १५-१०||
(जेणे योगे ज्ञान | उत्कर्ष पावून | राहे विसावून | ब्रह्मपदी ||
जेणे योगे होय | वाचा सुरसाळ | सिंधु चि केवळ | अमृताचा ||)

तैसें साच आणि मवाळ| मितले आणि रसाळ| शब्द जैसे कल्लोळ| अमृताचे ||ज्ञा. अ. १३-२७०|
(तैसे सत्य मृदू | मोजके रसाळ | शब्द ते कल्लोळ | अमृताचे ||)

पुढां स्नेह पाझरे| माघां चालती अक्षरें| शब्द पाठीं अवतरे| कृपा आधीं ||ज्ञा. अ. १३-२६३||
(पुढा स्नेहभाव | पाझरे संपूर्ण | अक्षरे मागून | धाव घेती ||
कृपा तरी आधी | होतसे प्रकट | मग पाठोपाठ | शब्द येती ||)

किंबहुना पांडवा| शरीर जैसें अवयवां| तैसा नुबगे जीवां| जीवपणें जो ||ज्ञा. अ. १२-१६७||
(काय सांगू फार | जैसे अवयवा | शरीर पांडवा | कंटाळेना ||
तैसे भूतजात | आपले मानीत | नाही कंटाळत | कोणासी जो ||)

जगचि देह जाहलें| म्हणौनि प्रियाप्रिय गेलें| हर्षामर्ष ठेले| दुजेनविण ||ज्ञा. अ. १२-१६८||
(विश्वरुप काया | जाहली म्हणोनी | प्रियाप्रिय दोन्ही | हरपली ||)

हें असो आणिक कांहीं | तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं | जैसें सबाह्य जळ डोहीं | बुडालिया घटा ||ज्ञा. अ. ७-१३३||
(असो हे सर्वत्र | तयालागी पाही | दुजे काही नाही | माझ्याविण ||
पार्था देखे घट | बुडता डोहात | जळ जैसे आत | बाहेर ते ||)

हें समस्तही श्रीवासुदेवो| ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो| म्हणौनि भक्तांमाजीं रावो| आणि ज्ञानिया तोचि ||ज्ञा. अ. ७-१३६||
(संपूर्ण हे विश्व | वासुदेवमय | ऐसा चि प्रत्यय | आला तया ||
म्हणोनी तो ज्ञानी | भक्तांमाजी राजा | जाण कपिध्वजा | निश्चयेसी ||)

--------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तैसें साच आणि मवाळ| मितले आणि रसाळ| शब्द जैसे कल्लोळ| अमृताचे || >>किती अर्थमधुर ओळी!
या लेखावर काय प्रतिक्रिया लिहावी उमगत नाहीये. शब्द नाहीत ,मधुधारान्चा वर्षाव होतोय.नुसता...
पुढां स्नेह पाझरे | माघां चालती अक्षरें | शब्द पाठीं अवतरे | कृपा आधीं ||ज्ञा. ..>>>
पण आत्ताच्या काळात अशी व्यक्ती असण अशक्यच वाटतय.

अहाहा! केवळ अप्रतिम! खरोखर आमच्याकरता संक्रांत पर्वणी!

उदारा जगदाधारा देई मज असा वर
स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर ....

ही माझी अत्यंत आवडती प्रार्थना आहे. सुदैवाने फार लहानपणी कानावर पडून पडून पाठ झाली (तेव्हा फारसा अर्थ कळला नव्हता). पण आता जेव्हा म्हणते तेव्हा डोळ्यात पाणी येतेच येते! ही कोणाची रचना आहे?

हे सर्व तुकोबांचेच आहे - मी तर केवळ गद्यात उतरवतो आहे झालं ...

सर्व तुकोबाप्रेमींचे मनापासून आभार .... Happy

उदारा जगदाधारा देई मज असा वर
स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर .... >>> स्वामी स्वरूपानंद (पांवस)

सुरेख, मनाला उभारी देणारं विवेचन आहे शशांक.

ज्ञानेश्वरी, गीताई, निर्गुणी भजनं, अमृतधारा, सगळी एकाठायी तुमच्यामुळे भेटतात आणि विनासायास. तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत!
गीताई तर शाळेनंतर वाचलीच नाही पुन्हा. थेट ज्ञानेश्वरी आणि गाथा अजूनही समजण्यापलिकडची आहे, कदाचित कायमच राहील. अमृतधारा वाचते आहे. निर्गुणी भजनं फक्त ऐकली जातात, कुमारांमुळे डोळे मिटून डोलायला, अंतर्मुखही व्हायला होतं पण तरीही अर्थ, भाव झिरपतात किती संदेह आहे. तुमच्यामुळे हे सगळं साधतंय.