आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
तुम्हाला ब्ल्~ओक करावे लागेल अशाने>> कसं करायचं कुणा एका/अनेक आयडींना ब्लॉक? माझ्या लिस्टमध्ये बरेच आहेत.

अरे व्वा!! माबोवर पण ब्लॉक करायची सोय दिली की काय वेमांनी/अ‍ॅडमिननी.
किती दिवसांपासून बरेच जण ही सोय मागत होते. धन्यवाद वेमा/ अ‍ॅडमिन.

उथळता असा शब्द मराठीत नाही. उथळपणा असा आहे. मराठीच्या परंपरेला गालबोट लावू नका. तसेच, परंपरा शब्दावरून पारंपरिक असा शब्द होईल. पुढेमागे वापरावासा वाटला तर हाताशी असू द्या. माझी ही पोस्ट शीर्षकास धरून आहे. तुम्हांला चालावी. बाकी विषयाला धरून पोस्ट नंतर टाकेन. आताशा टायपिंग होत नाही, शहात्तरी गाठली आता. नात पोस्टे टायपून देते, पण सध्या तिची इंजिनीयरिंगची सेमिस्टर परीक्षा आहे.

श्रद्धाकाकू, तुम्हाला उथळता हा शब्द माहित नसलेले पाहून सखेद आश्चर्य वाटले. उसळता, कोसळता, सळसळता तसाच उथळता असादेखील शब्द आहे. आमच्यात वापरतात.

नातीला इंजीनीअरिंगच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. अभ्यास वगैरे करते ना? आमच्या लेकाच्या पुढल्या महिन्यांत ज्युनिअर केजीच्या सेमीस्टर परीक्षा आहेत. कार्टी जरासुद्धा अभ्यास करत नाहीत हो. काय सांगावं!

सगळ्यांनी खुर्ची टाकून शांत बसावे आणि ज्यांना विषयांशी संबंधित पोस्ट टाकायची असल्यास प्रतिक्रया द्यावी

अरे काय विषय काय. तुम्ही बोलता काय...
चार वर्षांपूर्वी मी रात्री एका पेट्रोल पंपावर गेलो असता एका तरूणीला पाहिले. तिला हेच आधुनिकता म्हणजेच उथळता समजवून सांगायला गेलो तर कार्टी माझेच पाच हजार रुपये घेऊन लंपास झाली.
तेव्हापासून शपथ घेतली पुन्हा कुठल्याही तरुणीला उथळतेबद्दल सांगायला जाणार नाही.

लूनावाले ब्रह्मे

या धाग्याचा विषय म्हणजे मी आणि माझ्या ग’फ्रेंड मधील नेहमीचा वादाचा विषय.

मी जुने ते सोने करणारा, सर्व संतवचने मानणारा.. तर ती मॉडर्न भारतीय नारी, तुझे माझ्यावर प्रेम आहे तर सिद्ध करून दाखव तरच विश्वास ठेवेन म्हणनारी..

प्रेम हे सिद्ध करायची नाही तर करायची गोष्ट असते हे कधी समजणार देव जाणे..

माझेच पाच हजार रुपये घेऊन लंपास झाली.>>>>
लूनावाले ब्रह्मे, तुमच्या मूळ लेखात चारच हजार होते. हे वरचे हजार व्याजाचे वाटतं?

. या विशयाची आवड असेल तर आपला प्रतिसाद द्यावा.<<<<
विषय. पण मनाच्या श्लोकांमध्ये काय म्हटलं आहे? 'मना कल्पना ते नको वीषयांची | विकारें घडे हो जनीं सर्व चीं चीं' विषयाची आवड तर मग लांबचीच गोष्ट.

अगंबाई ही कियारा (आमची नात) पळाली वाटतं बँग बँग बघायला.

पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. >>> अहो हे जर खरं असतं तर रामायण , महाभारत घडलचं नसतं आणि विशेष म्हणजे आपल्याला ते दर रविवारी दुरदर्शनवर बघायलाही नसतं मिळालं.

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात. << म्हणजे कोणत्या ते पण सांगा की. चर्चा करायला सोप जाईल.

आवरा रे हे सर्व. माबोवरचे मागे गेलेले चांगले लिखाण शोधून शोधून वाचावे लागतय अश्यामूळे.

Pages