पंचामृती मिरच्या (फोटोसहित)

Submitted by दिनेश. on 5 December, 2010 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जाड्या बुटक्या ताज्या हिरव्या मिरच्या ३०,
तेल २ टेबलस्पून,
गोडा मसाला दिड टेबलस्पून,
जिरे १ टेबलस्पून,
पांढरे तीळ ३ टेबलस्पून,
हिंग १ टिस्पून,
हळद १ टिस्पून,
सूक्या खोबर्‍याचा किस ४ टेबलस्पून,
टॅमरिंड पल्प २ टेबलस्पून (किंवा चिंचेचा दाट कोळ अर्धा कप )
क्रंची पीनट बटर ३ टेबलस्पून (किंवा दाण्याचे कूट अर्धा कप )
बेदाणे अर्धा कप,
काजू अर्धा कप (वगळल्यास चालतील )
मीठ १ टिस्पून,
डिमेरारा (ब्राऊन) शुगर पाऊण कप (किंवा तेवढाच गूळ, बारीक करून किंवा साधी साखर )

क्रमवार पाककृती: 

पुर्वी आपल्याकडे मराठी लोकांत लग्नाच्या जेवणावळीत पंचामृत आवर्जून असे. त्या जेवणात (जिलेबी मठ्ठा, पुर्‍या, वांगी बटाटा भाजी, भजी, तोंडले भात, अळूचे फदफदे ईत्यादी.. ) हा प्रकार मस्तच लागत असे.
ह्या मिरच्या त्याच्याच प्रकार आहे पण, त्यामानाने कमी खटाटोपाचा. शिवाय दिसायला छान.

तर यासाठी,
मिरच्यांना एक उभी चिर देऊन, मीठ घातलेल्या थंड पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवाव्या. मग निथळून घ्याव्यात. (असे केल्याने मिरच्यांचा तिखटपणा थोडा कमी होतो, पाण्यात नाही ठेवल्या तरी चालतील.)
तेलाची हिंग हळदीची फोडणी करुन त्यात जिरे टाकावे, ते फूलले कि तीळ टाकावेत व जरा परतावेत.
मग खोबरे घालून आणखी परतावे. गोडा मसाला टाकावा. (तूम्हाला हौस असेल आणि वेळ असेल तर हा मसाला थंड करुन प्रत्येक मिरचीत थोडा थोडा भरावा, पण तशी गरज नाही, मी केलेले नाही.)
मग त्यात मिरच्या घालाव्यात, जरा परतून दोन मिनिटे झाकण ठेवून जरा वाफ येऊ द्यावी.
मग त्यात चिंचेचा कोळ वा पल्प घालून कपभर पाणी घालावे. मग गूळ आणि बाकीचे घटक क्रमाने घालावे, हलक्या हाताने ढवळून झाकण न ठेवता मंद आचेवर शिजवावे.
तेल वेगळे दिसू लागेपर्यंत शिजवावे.
कुठल्याही मराठमोळ्या जेवणाबरोबर खाव्यात.
या मिरच्या आठवडाभर टिकतील.

वाढणी/प्रमाण: 
तीस भागिले खाण्यार्‍यांची क्षमता
अधिक टिपा: 

यात हवे तर बारिक चिरलेली कोथिंबीर घालता येईल, बारिक चिरुन तीळा बरोबर परतायची.
फोटो प्रतिसादात आहेत.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक पदार्थ आणि सध्या बाजारात उपलब्ध पदार्थ वापरुन केलेला प्रयोग.
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, ही मस्त रेसिपी आहे तुमची.

मी घरी नैवेद्याच्या जेवणात पंचामृत करताना , मूळ पाच घटक पदार्थ - सुके खोबरे, काजू, बेदाणे, शेंगदाणे आणि खारीक मिक्सरमधून बारीक करून (फक्त बेदाणे अख्खे) घेते. काजू आणि बेदाणे काही तास पाण्यात भिजवून ठेवते आणि शेंगदाणे भाजून कूट करते. खारीक फोडून, बिया काढून मग मिक्सरमधून वाटते.मिरच्या अशा अख्ख्या न ठेवता ४-५ बारीक चिरुन घालते थोडेसे लाल तिखटसुद्धा. तिळकुट घालते आणि हो फोडणीत कढीपत्ता मस्ट.

यात काजू, बेदाण्याची गोडस चव आणि तिखट व चिंचेची तिखट आंबट चव मस्त लागते. मूळ पारंपारिक रेसिपीत फोडी करतात त्यापेक्षा हे मस्तच लागते.

करुन बघितल्या. एकदम मस्त झाल्या. हा पदार्थ पहिल्यांदाच खाल्ला त्यामुळे मुळ चव माहित नाही. आत्ता जी चव आलीये ती एकदम आवडली.

Pages