भारतीय रेल्वे जिव्हाळ्याचा विषय

Submitted by हर्ट on 19 February, 2014 - 20:44

नमस्कार, तुम्ही आम्ही आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेमधून प्रवास केलेले असतील. इथे तुम्ही तुमच्या आवडती रेल्वे , अधेमधे येणारी गावे, तालुके, जिल्हे, निसर्ग, झाडीझुडी, खा-प्यायचे पदार्थ, भेटलेले व्यक्ति आणि वल्ली, अलिकडे झालेले बदल, रेल्वेची नावे - नदीवरुन, इतिहासावरुन - ह्या सर्वांची रसभरीत चर्चा इथे करा.

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा

इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'

टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी

दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'

कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'

बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी,

पारी-मार्से अंतर ८६२ किमी आहे! Happy

लंडन-पॅरीस युरोस्टारचा वेग आतूनदेखील जाणवतो. फ्रान्समधल्या टीजीव्ही गाड्या सुद्धा लई सुस्साट जातात. कदाचित तुमच्या प्रवासात सपाट जमीन असू शकेल. त्यामुळे कधीकधी वेगाचा अंदाज येत नाही. इथे इंग्लंडमध्ये बाजूचा प्रदेश (ल्यांडस्केप) भरभर बदलतो. त्यामुळे गाडीचा वेग ठळकपणे नजरेत भरतो.

आ.न.,
-गा.पै.

जर बाफच्या शीर्षकात भारतीय रेल्वे आहे तर भारतीय रेल्वेबद्दलच बोला ना. इतर ठिकाणच्या रेल्वेसाठी वेगळे बाफ काढा की.

गमभन, सगळ माझच लिहिल आहेत. Happy फक्त संध्याकाळी ६ ला काही खात नाही पण सोलापूरची वाट पहाते पा. भा. साठी.
एक लंगडी बाई येते नेहमी ह्या ट्रेनला भिक मागायला.
मी नेहमी वरचा बर्थ बुक करते. बेपे ला हुसेनसागरमध्ये चढली की ३ ला झोपते ती रात्री ८ ला उठते आणि पाभा खाऊन झाल की पुन्हा झोपते ती दुसर्‍या दिवशी पहाटे ५ ला व्हिटी आल की उठायच. लोकल ट्रेनला गर्दी व्हायच्या आधी घरी पोहचता येत.
ह्या ट्रेनने एकदाच दगा दिला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात हिच ट्रेन सात तास लेट होती आणि हि ट्रेन पहाटे ५ ला व्हीटीला पोहचते त्याच्या अर्ध्यातासाने मांडवीच गावी जायच बुकींग होत. प्रत्येक महिन्याला मी मुंबईत आल्यावर दुसर्‍या दिवशी आम्ही गावी जातो पण ह्या वेळेस थोड अर्जंट काम होत आणि दिवस वाया नको जायला म्हणून मी त्याच दिवसाच तिकिट काढल होत. दुपारी १२.३० ला ट्रेन व्हीटीला पोहचल्यावर मी सरळ रेल्वे ऑफिस गाठल आणि त्यांना त्याच दिवसाच रेल्वे तिकीट देण्यास भाग पाडल. २ तास रेल्वेच्या ग्राउंड आणि पहिल्या मजल्याच्या ऑफिसमध्ये भांडण केल्यावर त्यांनी रात्रीच्या कोकण कन्यामध्ये कन्फर्म तिकीट दिल. संध्याकाळी ५ ला घरी पोहचली आणि पुन्हा रात्री ८.३० ला निघाली कोकण कन्यामध्ये बसायला.

त्याचदिवशी पप्पा जनशताब्दीने गावी निघाले होते. गावच्या जुन्या घराची चावी माझ्याकडे होती पण नविन घराची चावी पप्पांकडे होती जे रिकाम होत. नेहमी जात असल्याने आम्ही कपडे ,चादर कधीच बरोबर नेत नाहीत. पप्पांकडे फक्त खाण्याचे पदार्थ आणि पाणी होत. त्या रात्री पप्पा जमिनीवर झोपले. खूप वाईट वाटल. Sad

मी कनेक्टेड ट्रेनच एकाच तिकीटात बुकिंग केल नव्हत त्यामूळे मी टीडीर फाईल केल्यावर मला पैसे नाही मिळाले.

येताना पण हीच ट्रेन रात्रीची व्हिटी वरून पकडते. रात्री १० ला झोपली की सकाळी ६.३० ला उठायच सोलापूर आल की चहा पिऊन पुन्हा ११.३० पर्यंत झोपते. दुपारी १२ ला बे.पे. ला उतरायच. Happy पण माझ्या अशा झोपण्यामूळे एकदा माझ्या खालच्या बर्थवर असलेली बाई तिच्या समोरच्या बर्थवर असलेल्या बाईला सांगत होती की आजकल की लडकीया देखो कितनी सोती हे. इन लडकियो को हमारे तरह कुछ कामभी नही होता है. Uhoh लेडीज कोटामध्ये बुकिंग असल्याने ऐकून घ्याव लागल. पण त्यांना समजावण कठीण होत की मी दोन आठवड्यात अजून तीन वेळा लाँग ट्रेनचा प्रवास करून आता चैथ्यांदा प्रवास करत आहे. तसही प्रवासात मी कधीच कोणाशी बोलत नाही.

वेळ मिळाला कि मी पण अजून लिहिन. बी तुमच्यामूळे रेल्वेच्या असंख्य आठवणी जाग्या झाल्या.

रेल्वेचे एकेरी रुळ वाहतूक अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे .कोकणरे तर नवीन असून एकेरीच आहे .पण पूर्वी सिग्नल इलेकट्रॉनिक नव्हते त्यावेळी एक वेगळीच शक्कल वापरत .२००४ पर्यंत पुणे मिरज हुबळी वगैरे भागात होती .

मधल्या स्टेशनवर फास्ट गाडीच्या रुळाच्या अगदी जवळ स्टेशनचा माणूस एक मोठा वेताचा गोल उंच धरायचा .फास्ट मेलचा एंजिन ड्रायवर तो गोल गाडी वेगातच असतांना हात लांब करून शिताफीने घ्यायचा त्याअगोदर तो त्याच्याजवळचा आधीच्या स्टेशनकडून 'पास' मिळालेला वेताचा दांडका बाहेर फेकायचा .हा दांडका नंतर उलट जाणाऱ्या गाडीला देण्यात यायचा .

दक्षिणेकडच्या काही सिनेमात हे दृष्य आहे .मालगुडी डेज पुस्तकात आहे .

हा अजून एक अनुभव.
ऑक्टोबर २०१२ मध्ये सामलकोटला एक दिवसाच्या प्ल्लांट व्हिजिटला गेली होती. तिथे फ्लाईटने जाण सोईस्कर नाही म्हणून येता जाता ट्रेनची तिकीट बुक केली होती. सकाळी पोहचली आणि दिवसभर कामाच्या रगाड्यातून संध्याकाळी सामलकोट स्टेशनला आली तेव्हा समजल की तेलांगणा वादामूळे हैद्राबादला जाणार्‍या सगळ्या ट्रेन्स कॅन्सल झाल्या आहेत त्यासुद्दा तीन दिवसांकरीता किंवा जास्त दिवससुद्धा होईल. पुन्हा गेस्ट हाऊसला आली तिथे पण जास्त दिवस राहण शक्य नव्हत. माझ्याकडे एकाच दिवसाचे कपडे होते.

घरी फोन केला तेव्हा पप्पांनी आयडीया दिली की विजयवाडाला जा तिथून बंगळूरला जा. मग दुसर्‍या दिवशी दुपारची ट्रेन होती विजयवाडा त्यात कंन्फर्म तिकीट नाही मिळाल मग टीटीला पैसे दिले आणि सामलकोट सोडल तेव्हा थोड बर वाटल पण पुढे रात्री ८ ची केसरटीसीची बसच बुकींग होत पुन्हा वेळेत विजयवाडा पोहचेल की नाही हे टेन्शन. रेल्वे स्टेशनपासून बस डेपो लांब होता. अस करत जेव्हा बंगळूरच्या बसमध्ये बसली तेव्हा सुटकेचा श्वास सोडला.

आम्ही तिघे हंपी एक्स्प्रेसने हंपीला चाललो होतो. ती गाडी बंगळूरहून रात्री १० ला सुटते.मुलगा लहान असल्यामुळे त्याचं वेगळं तिकिट नव्ह्तं. मला आणि नवर्याला वरचे बर्थ मिळाले होते. आम्ही वर जाउन झोपायच्या तयारीत होतो. माझ्या खाली झोपलेल्या माणसाने मान दुखते आहे म्हणून एक एक्स्ट्रा उशी अटेन्ड्न्टकडून मागून घेतली होती. मी माझी पर्स हूकला अडकवली आणि लेकाला झोपवायच्या प्रयत्नाला लागले. माझ्या पर्समधला पाण्याचा टंबलर बहुतेक थोडा उघडा राहिला होता आणि नेमका तो आडवा झाला असणार. पर्समधून ट्पटप पाणी गळायला लागलं. खालचा माणूस दुखणारी मानबिन विसरून ताड्कन उठला आणि आम्हाला हाक मारू लागला. ते पाणीच आहे( शू नाही) याचा खुलासा झाल्यावर तो शांत झाला आणि आडवा झाला.

माझ्या हैद्राबाद-मुंबई प्रवासात तेलंगणा आंदोलनाने अनेकदा अडथळे आणले होते.

आरती,
तुमच्या सारखेच मला देखील अडकायला झाले होते. मी पुण्याला आलो होतो आणि हैद्राबादला जायला कोणार्क एक्सप्रेसचे बुकिंग होते. मी पुण्याला येताच तेलंगनाने रेल रोको सुरु केले, त्यावेळी पुण्याला संध्याकाळी ६.३०ला येणारी कोणार्क एक्स्प्रेस रात्री १.३० च्या आसपास आली होती.

अनेकदा लाँग लीव टाकली आणि घरी जायचे म्हटले की तेलंगणावाल्यांचे काही ना काही सुरु व्हायचेच.

एकदातर संगारेड्डीजवळ बस अडवून ठेवली, असो अवांतर नको!

एकदा मी अजिंठा पाहाण्यासाठी
तिकीट रिजव न करताच
दादर (आता कुर्ला) अमृतसर गाडी पकडायला दादरला गेलो .साधे जेनरलचे तिकीट होते
पहिल्या मिलिट्रीच्या डब्यात जागा होती पण कुणाला
येऊ देत नव्हते .साईड सिटस रिकाम्या होत्या .
मी एका सैनिकाला विचारले .
"जळगावला जायचे आहे ,
येऊ का ?"
"या ना ,बसा साईडला .बर्थ
नाही मिळणार मिलीट्रीसाठी आहे ."
मस्त प्रवास झाला .
सहाला जळगावला उतरलो .
अजिंठा पाहून साडेबाराला
निघालो .
केळ्यांचं गाव पण कुठेही
केळी विकणारा दिसला नाही .
पावणेदोनला परत
जळगाव स्टे ला आलो .
स्टेशनातच बसू असा
विचार करत होतो .पुढची गाडी चारला होती .परंतू
रांगेतले लोक मुंबईची तिकीटे
काढत होते .अकराची लेट
झालेली गाडी दोनला येत
होती ! त्याने नऊला घरी आलो .

बी कविता आवडले, मस्तच आहे.:स्मित: सगळ्यान्चे अनूभव पण वाचायला छान वाटतात.:स्मित:

गाडगीळ तुम्ही पद्यात का लिहीता? गद्यात लिहीण्याऐवजी.:फिदी: तुमचे अनूभव काव्यात्मक वाटतात त्यामुळे. मी तुमची आताची पोस्ट पद्यात म्हणून बघीतली.:स्मित:

गमभन, संगारेड्डीच हैद्राबाद धाग्यावर लिहा, तिकडे तेलांगणाचा विषय चालू आहे. सामलकोटची पोस्ट तिकडूनच ईकडे पेस्ट केली. Wink

आपल्या चित्तवूत्ती आनंदात असतिल तर गाडीच्या आवाजात नाद आणि ताल जाणवतो. रश्मि, माझी पोस्ट पद्यमय वाटली,धन्यवाद .

लहानपणी कोणी 'मला सोने नोकर ,प्रवास ईत्यादि धार्जिणेनाही' असे म्हणायचे त्यावेळी "धार्जिणे" याचा अर्थ कळायचा नाही .प्रवास धार्जिणे असणे याचा अर्थ पुढे मोठेपणी कळला . (संपादित)

१९९३ ते १९९६ तीन वर्षे आकूर्डी ते पुणे असा उपनगरी रेल्वेने रोजचा प्रवास केला.

त्यानंतर १९९९ मध्ये मुंबई - पाटणा आणि २००० साली पाटणा - नाशिक असा परतीचा प्रवास - दोन्ही वेळेस रेल्वेगाडी अतिशय विलंबाने पोचली. भोजनाचा दर्जा अतिशय वाईट. दिवसाच्या वेळेत आपल्या आरक्षित निद्रासनावर अजुन दोघे तिघे जबरदस्तीने येऊन बसतात असा अनुभव.

२००२ मध्ये

सचखंड एक्स्प्रेस ने औरंगाबाद अंबाला कॅन्ट पर्यंत प्रवास. ठीकठाक. फारसा आनंद दायी नाही आणि पीडादायी ही नाही. दिवसाच्या वेळेत आपल्या आरक्षित निद्रासनावर अजुन दोघे तिघे जबरदस्तीने येऊन बसतात असा अनुभव पुन्हा एकदा.

शताब्दी एक्सप्रेसने चंदीगड दिल्ली प्रवास. सुखद चेअर कारचा अनुभव. प्रवास अर्थातच वक्तशीर आणि आनंददायी.

दादर - अमृतसर रेल्वेगाडीने दिल्ली पर्यंत प्रवास. अतिशय वैतागाचा. गाडी अतिशय विलंबाने धावते. खाण्यापिण्याची आबाळ. भोजनाची व्यवस्था गाडीत नाही. प्रत्येक स्थानकावर थांबा. परंतु कुठल्याही स्थानकावर इतका वेळही थांबत नाही की धडपणे भोजन उरकता यावे. शेवटी डोसा बांधून घेतला आणि गाडीत बसून खाल्ला. प्रवास असमानधानकारक. दिवसाच्या वेळेत आपल्या आरक्षित निद्रासनावर अजुन दोघे तिघे जबरदस्तीने येऊन बसतात असा अनुभव पुन्हा एकदा.

कर्नाटक एक्स्प्रेसने दिल्ली - अहमदनगर पर्यंत प्रवास. वक्तशीर आणि ठीकठाक. भोजन समाधानकारक. दिवसाच्या वेळेत आपल्या आरक्षित निद्रासनावर अजुन दोघे तिघे जबरदस्तीने येऊन बसतात असा अनुभव पुन्हा एकदा.

उद्यान एक्सप्रेस ने पुणे बंगळुरू आणि लगेच बंगळुरू पुणे असा प्रवास. गाडी विलंबानेच पोचली. बाकी ठीक. इतर वाईट अनुभव नाहीत.

२००८ - मुंबई दिल्ली आणि लगेच पुढच्या आठवड्यात दिल्ली मुंबई असा राजधानी एक्सप्रेसने केलेला प्रवास. अतिशय उत्तम. सुरक्षित. सुखद. भोजनही छान. सहप्रवासीही अतिशय चांगले. एक अविस्मरणीय प्रवास.

२०१० - पुणे सोलापूर पॅसेंजर ने प्रवास. अतिशय वाईट. आरक्षित डबा असूनही सर्वत्र प्रवासी जिकडे तिकडे खाली, स्वच्छतागृहाजवळ बसलेलेच. रात्री सर्व प्रवाशांनी खिडकीचे - काचेचे आणि लोखंडाचेही दरवाजे लावून घेतले. माझी खिडकी उघडीच. सर्वांनी खिडक्या लावल्यात तुम्हीही लावून घ्या असा सहप्रवाशाकडून सल्ला. अहो थंडीकरिता नाही म्हणत त्याने खिडकीचा आधी लोखंडी दरवाजा लावून घेतला आणि त्याचवेळी डब्यावर जोरात दगड पडू लागले. त्या पट्ट्यात रेल्वेगाड्यांवर दगडांचा मारा होतच असतो असे समजले. या प्रवासानंतर रेल्वे प्रवासाचा इतका धसका घेतला की येताना सोलापूरहून खासगी बसने आलो. अर्थात त्या चालकानेही वाहन असे चालविले की आम्ही सर्व प्रवासी संपूर्ण प्रवासात अनेक वेळा मरता मरता वाचलो. शेवटी काही तरूण प्रवाशांनी चालकाला चोप देऊन वाहन सुरक्षितरीत्या चालविण्यास सांगितले तर त्याने इतके संथगतीने चालविले की दुपारी तीनला सोलापूरहून निघालो ते रात्री बारा वाजता स्वारगेट ला पोचलो. तरी बरे त्याने निदान वाहन हळू तरी चालविले अन्यथा सुरुवातीचा वेग कायम ठेवला असता तर स्वारगेट ऐवजी स्वर्गगेटला पोचलो असतो अशी सह प्रवाशाची प्रतिक्रिया.

या बातमीनंतर तर कधी सहकुटूंब रेल्वे प्रवास करण्याची इच्छाच राहिलेली नाही : -
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/--/articleshow...?

लहानपणची गोष्ट आहे त्यामुळे सगळे तपशील नीट लक्षात आहेतच असं म्हणता येणार नाही.
आराधना (की अनुराधा) ट्रॅव्हल्सबरोबर झांसी दिल्ली आग्रा अमृतसर भाक्रानानगल काश्मीर अश्या ट्रीपला गेलो होतो. माझे वय वर्ष ८. तेव्हा ट्रॅ कंपन्या पूर्ण बोगी बुक करत. आपल्या प्लॅनप्रमाणे ती बोगी त्या त्या गाडीला लावली किंवा सोडली जाई. प्रवासातला नाश्ता, जेवण वगैरे तिथेच बनवला जाई. तर अश्या ट्रिपेतल्या दोन गमती..
मला तेव्हापासून सगळ्यात वरच्या बर्थचं जाम कौतुक होतं. पण माझी रवानगी मधल्या बर्थवर व्हायची. त्यादिवशी आम्ही झांशी पाहून आलो होतो. त्या दिवशी मला सगळ्यात वरच्या बर्थवर झोपायची परवानगी मिळाली होती. बरोबर असलेल्या एका फॅमिलीतला ८ वर्षाचा मुलगा जर वरच्या बर्थवर झोपू शकतो तर मी का नाही असा बेतोड सवाल मी केला होता आणि माझी माता निरूत्तर झाली होती. तर ८ वर्षाचे शूरवीर वरच्या बर्थवर झोपी गेले. कधीतरी अवेळी एका धक्क्याने शूरवीरांना जाग आली. शूरवीर डोळे उघडून पाहतात तो काय... दोन्ही बाजूंनी वर जाणारे बर्थस मधून डोकावणारे काळजीयुक्त चेहरे. मला उचलायला आलेले बाबा वगैरे. शूरवीर वरच्या बर्थवरून झोपेत दाणकन खाली आदळले होते. नीट जागे झाल्यावर शूरवीरांना जाम हसायला यायला लागले. पडणं, धडपडणं, खरचटणं याच्या ताज्या खुणा हातापायावर नसतील तर चुकल्याचुकल्यासारखं होत असे असा तो काळ होता त्यामुळे इतपत पडणे काहीच नव्हते. तस्मात शूरवीर उठून परत वरच्या बर्थवर जायला निघाले. त्यावर अर्थातच मनाई हुकूम जारी करण्यात आला.
मातापिता उगाच टेन्शनमधे आणि मी वरच्या बर्थवर जाऊ देत नाहीत म्हणून रूसलेली. ग्रुपमधे एक आजी होत्या. त्या जोरात म्हणाल्या 'आज झाशीला जाऊन आलो तर झाशीची राणी आली काय स्वप्नात तुझ्या? एक्दम वरून उडी मारलीस ती!' सगळेच हसले. मग मला रूसताही येईना. झोपही आली आणि मी मधल्या बर्थवर झोपी गेले.
त्यानंतर कित्येक वर्ष उंची चांगली दणदणीत झाल्यावर, बर्थच्या पट्ट्यांच्या मधूनच काय पण आख्ख्या बर्थवर मी जेमतेम मावतेय अशी उंच झाल्यावरही वरच्या बर्थवरून मी उडी मारली होती हा विनोद खानदानात पुरत होता.

त्याच ट्रिपेतला दुसरा विनोद. दिल्ली बघून झाल्यावर आमचा डबा दिल्लीहून पंजाबला जाणार्‍या गाडीला जोडला जाणार होता. मग दोनतीन दिवसात अमृतसर, भाक्रानानगल धरण असे बघून आम्ही काश्मीरास जाणार होतो. आमचा डबा जुन्या दिल्ली स्टेशनात पार्क केलेला होता आणि पंजाबाची गाडी बरोबर नवी दिल्ली स्टेशनातून सुटणार होती. त्यामुळे डबा शटल इंजिनला जोडून नवी दिल्ली स्टेशनला जाणार होता आणि तिथून पंजाबच्या गाडीला जोडला जाणार होता. हे सगळं रात्रभरात होणार होतं. आणि पहाटे आम्ही अमृतसरात पोचणार होतो. तर रात्री प्रवास सुरू झाला. आम्ही झोपी गेलो. सकाळी गाडी जिथे थांबली होती तिथे स्टेशनावर उतरलो. अरे अमृतसर तर सेम नवी दिल्ली स्टेशनसारखं आहे असे कोणीतरी तारे तोडतंय तेवढ्यात ते नवी दिल्ली स्टेशनच आहे हा साक्षात्कार झाला सगळ्यांना. म्हणजे रात्रभरात गाडीने जु दि ते न दि एवढाच प्रवास केला होता तर. पण मग रात्रभर गाडी प्रवास करतेय हे मधे मधे ज्यांना जाग आली होती त्यांना जाणवले होते. तर मग हे काय ते कुणालाच कळेना.
थोड्यावेळाने सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. काहीतरी घोळ होऊन नवी दिल्ली स्टेशनात डबा शटलपासून वेगळा करून पंजाबवाल्या गाडीला जोडायचे राहून गेले होते. आणि ती शटल असल्याने रात्रभर जुदि नदि करत होती. त्याबरोबर आमचा डबाही त्यामुळे रात्रभर जो प्रवास चालू होता तो जुदि नदि जुदि नदि असा होता.
त्यादिवशी रिस्क नको म्हणून आमचा डबा नदि स्टेशनातच रहाणार होता आणि त्या रात्री पंजाबला जोडला जाणार होता. त्यामुळे प्लॅनमधले भाक्रानानगल वगळून फक्त अमृतसरच होणार होते.
यानंतर कुणी एकाच खेपेत होण्यासारखी कामे करायला १० चकरा मारू लागला तर आमच्यात हे काय जुनी दिली-नवी दिल्ली चाललंय असा एक वाकप्रचार रूळला. पण जगताला हे माहित नसल्याने मराठी भाषेच्या डाटाबेसात तो जाऊन पडला नाही. Happy

नीरजा,
सेम पिंच.

जम्मूला जात होतो. मी पहिलीत होतो तेव्हा. दिल्ली सोडल्यानंतर गाडीत खूप पोलिस आले. दरवाजेखिडक्या घट्ट बंद करण्यात आल्या. पंजाबातले अतिरेकी तेव्हा जोरात होते. 'चोर येतील म्हणून पोलिस आले' असं मला कारण सांगण्यात आलं. मी वरच्या बर्थवर एकटा झोपलो. सकाळी उठलो, तर खालच्या बर्थवर आजीशेजारी होतो. पाठ प्रचंड दुखत होती. नंतर कळलेला तपशील असा की, मी रात्री 'चोर चोर' ओरडत वरच्या बर्थवरून खाली पडलो होतो. अर्धा तास झोपेतच रडत होतो.
पाठदुखी दोन दिवस राहिली, पण नंतर मला व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. त्यानंतर आजपर्यंत मी दोनएकदाच थ्री टिअरच्या वरच्या बर्थवर झोपलो असेन. टू टिअरचा बर्थ जरा खाली असल्यानं तिथे सुखात असतो.

समहाऊ मला वरून पडल्यावर कुठे काही लागल्याचे, दुखण्याचे वगैरे आठवत नाहीये. आई असती तर तिला विचारलं असतं. तिच्या लक्षात असायच्या सगळ्या गोष्टी. बाबांना आठवणं शक्य नाही.
अर्थात व्हर्टिगोचा प्रॉब्लेम मलाही आहे. पण वरच्या बर्थचा काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतरही शक्य तेव्हा मी वरच्या बर्थवरच झोपलेली आहे.

रेल्वे प्रवासाची खरी मजा खिडक्या उघड्या असलेल्या डब्यातून जाणे ही आहे. पण..............! अलिकडे आरक्षित स्लीपर डबा व 'सामान्य' डबा यातील फरक जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे नाइलाजाने 'एसी' चा पर्याय घ्यावा लगतो. बिगर एसी पहिला वर्ग बंद झाला ते माझे मोठे दुक्ख आहे.

गोरखपूर एक्स्प्रेस मधून कोणी गेलय का? एकच शब्द आहे. बकाल. (कोणाला राग आला तर येवु दे ..)

इतकी दादागिरी, मारामारी , गचाळ लोकं आजूबाजूला. नुसती बजबज्पुरी वातावरण. कुठ्लाही क्लास असो.

त्यात चीड आणणारी गोष्ट म्हणजे , कुठल्याही रेल्वे प्रवासात, आमचं कारटं कसं देवाचे फुल...
अशी कारटी कुठल्याही वेळेला ट्रेनमध्ये गोंधळ करणार, उच्छाद मांडणार. आणि उर्मट आई-वडील, मुलंच ते.. मस्ती नाहीतर काय करणार इतक्या प्रवासात.. अश्या आविर्भावात / दांडगाई करणार आणि मुलाला जराही गप्प बसवणार नाहीत. कितीही ओरडत, पळापळी करत असले मूल तरी.

चेतन ,अहो काही गाड्या ब्लैकलिस्ट मध्ये आहेत .त्यात ठराविक त्रास वाटयाला येतातच .
मुंबई पुणे धावणाऱ्या सिंहगड,डे इक्सप्रेस, औरंगाबादकडची
तपोवनही अपवाद नाहीत .

रिजव डब्यात वेटलिस्टवाल्यांचे
जरा सरका आणि चौथी सीट
बसण्याचा प्रयत्न .एवढासातर मुलगा आहे ,घ्या मांडीवर !अहो त्याचे तिकीट काढले आहे अशी भांडणे .
हे परतीच्या गाडीत फार चालते .
सर्वांनाच जरा टेकायचे असते .

शूरवीरांचे आत्मचरित्र छान .

दौंड-सोलापूरच्या मध्ये रात्री गाड्यांवर जोरदार दगडफेक होत असते. अनेकदा या पट्यात ट्रेन्स लुटल्या गेल्या आहेत.

पोलीस अनेकदा फेर्‍या मारुन लोकांना सांगत असतात की खिडक्या बंद करा, पण अनेक लोक ऐकुन न ऐकल्या सारखे करतात. काही लोक तात्पुरती खिडकी लावतात आणि मग परत उघडतात.

तेव्हा असे वाटते की एखादा दगड अश्या बिनडोक माणसांच्या टळक्यात बसायलाच हवा.

सरद, मुक्तछंदात का लिहित आहात?

असो.. माझ्या कवितेला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. कविता आता पुढे गेली आहे. तुम्हा सर्वांकडून एक एक कडवे मिळण्याची अपेक्षा आहे.

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा

इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'

टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी

दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'

कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'

बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'करत हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं

दर्शन घडविते भक्तांना
नाशकाची 'गोदावरी' मी
प्रभू रामाची आठवण करते
अशी 'तपोवन' मी
स्वामी विवेकानंदाचे स्मरण करते
दक्षिणेची 'कन्याकुमारी' मी

स्वराज्य घडविलेल्या दख्खनची
'डेक्कन एक्सप्रेस' मी
शतके पाहता.. धावता
'शताब्दी एक्सप्रेस' मी

ओसाड कोयनेतली नदीच्या नावे
'कोयना एक्सप्रेस' मी
सावंतांच्या वाडीला नेणारी
'राजा राणी एक्सप्रेस' मी

"गोय्वाक जाउ रे पुता" म्हणणारी 'मांडवी एक्सप्रेस' मी
ऐरणातून नेता - 'ऐरणाकुलम एक्सप्रेस' मी
भुवन जेथ, तेथ 'भुवनेश्वर एक्सप्रेस' मी
अमृताहूनी गोड अम्रुतसरला नेणारी 'अमृतसर एक्सप्रेस' मी

'सचखंड' वा 'अमृतसर' पावन
'देवगिरी' असो वा 'तपोवन'
'मनमाड' हून 'पंचवटी' धावे
'नंदिग्राम' सह 'अजंता' ही पावे
'जनशताब्दी' असो वा 'सिकंदराबाद'
प्रिय अमुअचे येतेच 'औरंगाबाद'

डुगडुगते यवतमाळ ते अचलपुरी
जख्ख 'शकुंतला' आज्जी मी
सर्व बांधवांना समान लेखते
तुम्हा सर्वांची 'समता एक्सप्रेस' मी

झाडा झुडुपातून ..पाऊस वार्‍यातून
थंडीच्या लाटेतून धावते मी
धावता धावता विसरुन जाते
मदमस्त मी.. आगगाडी मी!

नवीन कवी आहेत: संदीप गोडबोले, वृंदा टिळक, राहूल नेरकर, सय्यद खुर्शिद, प्रसाद पाटिल, छाया, भाऊ नेमसकर, बी

तुम्ही पण एखाद दोन कडवी लिहा. बघा किती कित्ती नावे आहेत आगगाड्यांची:
http://www.prokerala.com/travel/indian-railway/trains/#M

बदलापूर, अंबरनाथ स्थानकांदरम्यान अश्याच मारल्या गेलेल्या दगडाने डॉ. श्रीराम लागूंच्या मुलाचा तनवीरचा जीव घेतला होता.

srd हे प्रत्येक वाक्यानंतर enter कळ दाबत आहेत, त्यामुळे अनेकांना त्यांचे लेखन पद्यात्मक / काव्यात्मक वाटत आहे. enter ची कळ प्रत्येक वाक्याला न दाबता परिच्छेद पूर्ण झाल्यावरच दाबली तर अशी समस्या जाणवणार नाही.

अर्थात मी हे संगणक व कळफलकाचा वापर करून टंकलेखन करण्याबाबत म्हणत आहे. हल्ली लोक अनेक आधुनिक उपकरणांचा (जसे की टॅब्लेट, स्मार्टफोन, इत्यादी) उपयोग करून आंतरजालावर व्यक्त होत असतात, त्यांना काय समस्या येत असतील त्याबाबत मी अनभिज्ञ आहे.

srd - आपण काळ्या यादीत टाकल्या जाणार्‍या रेल्वेगाड्यांविषयी जे लिहीलेय त्याबाबत सहमत. मी माझ्यापुरते तरी मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेस वगळता सर्वच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना काळ्या यादीत टाकलेय. जवळच्या अंतराकरिता रेल्वेगाडीचा मला तरी फारसा उपयोग / गरज वाटत नाही.

झन्पे गोरखपूरबाबत तुला भरपूर काजू/खवा/आम्बा मोदक.:फिदी: उ. प्रदेशाकडे जाणार्‍या कुठल्याही गाड्या या बकालेस्टच असतात.( व्याकरण बहकवलय मी). काशी(गोरखपूर्),पवन या गाड्या जाम गचाळ केल्यात या उ. प्र वाल्यानी. जागेवरुन एका भय्याशी माझे सॉलिड वाजले होते. शुद्ध हिन्दीत मी त्याच्याशी जोरदार भान्डले, त्यातुन जळगावकर मन्डळीनी मला भरपुर साथ दिली. त्याबद्दल मी त्यान्ची ऋणी आहे.:फिदी:

तो भैय्या मला डब्यातच चढु देईना, वरतुन मला धमक्या देत होता की उ प्र मध्ये या, तुम्हाला बघुन घेईन. त्याला म्हणले, तूच ये महाराष्ट्रात परत, तुला बघते.:खोखो:

भरपूर आठवणी आहेत.

>>झन्पे गोरखपूरबाबत तुला भरपूर काजू/खवा/आम्बा मोदक<< Happy

त्यात ह्या उ. प्र. लोकांचा एकंदर कल असा की, गाडी त्यांच्या बा ची आहे. बाईला पण ढकला ढकली करायला(हात वगैरे लावून) मागे बघत नाही.
इतकी घाण गाडी करतात ...... एसी क्लास काढूनही फायदा नाही. एकुणात सगळ्यांच्या चेहर्‍यावर माजोरी भाव. १० वर्षाचा मुलगा पण हाताने बुक्का मारु म्हणालाय अश्याच एका भांडणात..
त्यात जबल्पूरला अशी घाण चढते ना...

चुकुन्ही गेले नाही अश्याच एका प्रवासानंतर.(तशी दोनदाच गेले काही काम होते म्हणून ह्या ट्रेनने).

(माझी चूक कळली .आजच सकाळी बरेच लिखाण संपादित केले आणि पद्याचे गद्य झाले.एंटर कळीचा वापर आता फक्त परिच्छेद पाडायलाच करेन .)

बेळगाव हुबळीकडे धावणाऱ्या साउथ वे रे बद्दल अगोदरच लिहिले आहे की इकडे फुकट्यांचे लाड अजिबात करत नाहीत .वेटलिस्टवाले फुकट नाही जात परंतू त्यांनाही नियमाप्रमाणे रिजव डब्यातून हाकलतात .दुसरी चांगली रेल्वे कोकण रेल्वे .भिकारी ,फुकटेंना ,विनाबिल्ला विक्रेते यांना स्टेशनकडे फिरकूपण देत नाहीत .उत्तरेत मात्र टिटिलाच बाहेर फेकायला घाबरत नाहीत .त्यामुळे ते रोजची वरकमाई आणि आयुष्यात एकदा मिळणारे दहेजचे मोठे गाठोडे याकडेच लक्ष देतात .

खाण्याची चंगळ असते ती गुजरात भागातल्या पसैंजरमध्ये शिवाय ते गपिष्ठ त्यामुळे मजा येते . वापि स्टेशनला दादरा गार्डन पाहाण्यास गेलो होतो त्यावेळी ढोकळा ,जलेबी गाठ्या ,भेळ ,बाफेला सेंग हे सारखे चालूच .वर मसालावाली चाय .खारे शेंगदाण्याची नुसती खैरात . आख्खी पाटी गरम असते तरी उगाच "गरम छे ?" विचारले की मूठभर हातात कोंबणार "खाईने जुओ "(खाऊन पाहा ) .स्टेशनला ढीग .गरम ? विचारत पाव किलो असेच मिळवले होते .

@ सरद , कोकण रेल्वेसाठी अनुमोदन. खरेच छान प्रवास. ती सुरू झाल्यान>तर जेव्हा आम्ही प्रवास केला होता तेव्हा तर स्टेश्न्स अती सुन्दर व स्वच्छ होती. प्रत्येकस्थान कावर आम्ही खाली उतरून ते कौतुकाने पाहत होतो.
ढाका ते लंडन या आंतर् राष्ट्रीय रेल्वेचे बांध्काम गेले अनेक व. चालू आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्या गाडीने काही अ>तर तरी प्रवास करावा अशी इच्छा आहे.

हायला गाडगीळ तुमची खाण्याची जाम चन्गळ झाली की गुजराथमध्ये. एवढी मजा आहे खाण्याची तर गुजराथ ट्रिप मस्ट आहे मग.

लहानपणी सुट्टीत दौंड ते बारामती या नॅरोगेज रेल्वेने भरपूर प्रवास केलायं. या ट्रेनचं नाव "केकावली" (कवी मोरोपंताची "केकावली" ) होतं. सध्या बारामती-दौंड (कर्जत) ब्रॉडगेज गाडी धावतेय पण अजुनही त्या छोट्या गाडीने केलेला प्रवास आठवतोय (खिडकीची जागा पकडण्यासाठी आम्हा भावंडात चढाओढ लागायची). अजुनही दौंडला ते छोटसं स्टेशन आहे. Happy

याच रेल्वे लाईनवर "रावणगाव" नावाचं एक स्टेशन लागायंच. Happy

Pages