सुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी

Submitted by इब्लिस on 3 November, 2012 - 03:05

साजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.

***
इब्लिस | 2 November, 2012 - 18:50
>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<

आर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अ‍ॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.

यानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.

सेफ ड्रायव्हिंगवर एक धागा काढावा, व जाणकारांनी त्यात माहिती द्यावी.
यात,
१. रहदारीचे नियम.

२. गाडीच्या (मो.सा., चारचाकी) यांचे कोणते मेण्टेनन्स शिकून घेणे गरजेचे आहे? घरी काय काय करावे?
उदा. टायर बदलणे. ट्यूबलेसचे पंक्चर स्वतः काढता येतील अशा किट्स आजकाल मिळतात. कूलंट, पाणी, इंजिन ऑइल इ. कसे तपासावे?

३. हॉर्न/लाईट/इंडिकेटर्सचा वापर कसा करावा? (वळण्याची सूचना देण्यासाठी ऐवजी साईड देण्यासाठी इंडीकेटर आहे अशीही एक समजूत आढळते)

४. सोबत कागदपत्रे कोणती बाळगावीत. इन्शुरन्स कोणता चांगला? थर्ड पार्टी/कॉम्प्रिहेन्सिव्ह इ. थोडक्यात म्हणजे नुसती गाडी चालवणेच नाही, तर एक चांगला गाडीवान (च्याच्याकडे धन तो धनवान, या चालीवर) कसे व्हावे, याबद्दलचा बाफ निघाला तर उत्तम होईल.

५. याव्यतिरिक्त एक महत्वाचा विषय म्हणजे ड्रायव्हर नोकरीस ठेवणे. वेगवेगळ्या शहरात वेगळे पगार असतात. पण त्याला नोकरीस ठेवताना आपण काय काय चौकशा करणे गरजेचे असते? काहीवेळा आपली गाडी चालवून नेण्यासाठी अनुभवी व भरवशाचा माणुस टेंपररी बेसिसवर हवा असतो. तशा लोकांचे काही कॉण्टॅक्टस उपलब्ध असतील तर शेयर करणे इ. करता येईल.

६. इतर फुटकळ गोष्टी. जसे उन्हात रंग खराब होतो का? गाडीला अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्या? कोणत्या टाळाव्या? इ.

बघा विचार करून लोकहो.

***
यास अनुसरून बर्‍याच माबोकरांनी वेगळा धागा सुरु केल्यास चांगले असे अनुमोदन दिले. म्हणून हा धागा सुरू करीत आहे.
आपले अनुभव / एक्पर्टाईज इथे कृपया शेयर करा.
धन्यवाद!
(यासंदर्भातले प्रतिसाद इकडे हलविले जातील असे हिम्सकूल यांनी सांगितले. संपादकांनाच ते करता येईल. तसे करावे ही विनंती. लेखन कुठे टाकावे ते समजत नव्हते, म्हणून तंत्र आणि मंत्र मधे समावेश केला आहे. कार्स संबंधी धाग्यांचा वेगळा ग्रूप केला तरी चालेलसे वाटते)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो_एस
यासाठीच सीटबेल्ट लावलेला नसेल तर एयरबॅग डिप्लॉय होणार नाही अशी सोय एयरबॅगवाल्या गाड्यांमधे असते. ड्रायव्हर व्यतिरिक्त इतर कुणी बसलेलेच नसतील तर इतर बॅग्ज डिप्लॉय होऊ नाहीत म्हणून एक लॉक देखिल दिलेले असते.
(कारण नसता डिप्लॉय झालेल्या बॅग देखिल रिप्लेस करायला सुमारे ४० हजार एक एअरबॅगसाठी खर्च येतो)

मी दर २ आठवड्याला पुणे -कोल्हापूर हाय वे वर जात असतो .
हल्ली या हायवे वरचा (त्यातल्या त्यात) सातारा -कोल्हापूर उलटीकडून वाहने यायचा त्रास प्रचंड वाढलाय . आधी फक्त दुचाकी/कार तर यायच्या आता तर ऊस भरलेले ट्रक आणी ट्रॅक्टरही येतात .
त्यात वाळू नेणारे ट्रक , मोठे कटेनर चुकीच्या लेन मधे चालवतात , कितीही हॉर्न / सिग्नल दिला तरी लेन चेंज करत नाहीत , त्यामुळे चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करावे(च) लागते , त्यात समोरून असे वाहन आले तर मग बोलायलाच नको .

atta exprs hwy la 3 shalakari pore eka scooter varun chalali aahet.>> नी, मागच्या महिन्यात सांगलीजवळ असाच एक अपघात होउन त्यात २ मुले जागीच आइ-वडिलांच्या डोळ्यादेखत गेली. चूक आई-वडिलांचीच. हे चौघे २ स्कूटर्सवर कर्‍हाडहून सांगलीकडं निघाले होते. आई-वडील एका गाडीवर आणि भाउ (१६ वर्षं) आणि बहीण (१२ वर्ष) दुसर्‍या गाडीवर. भाउ गाडी चालवत होता. सांगलीच्या अलिकडं त्याची एका एसटीशी धडक झाली आणि आई-वडीलांच्या देखत दोन्ही पोरं जागीच गेली.

योग्य वय व्हायच्या आत मुलांच्या हातात गाडी देणारे (आणि गाडी चालवता येत असल्यानं आपलं पोरगं लैच भारी आहे असं समजणारे) पालकच या सगळ्याला जबाबदार आहेत.

मी स्वतः कितीही चांगली दुचाकी चालवली तरी इतरेजण तसं करत नाहीत.
त्याची फळं शनिवारी रस्त्यावर आपटी खाउन मिळालीत. Sad

मी हॉर्न देउन देखील लेफ्ट कडुन राइटला जाताना मागे अजिबातच न बघणार्‍या सायकलस्वाराला काय म्हणावे. Angry
वर आपल्याला वाचवताना कुणी पडलय तर तिथुन पळुन जाण्याची बुद्धी मात्र लगेच.. Angry
यदाकदाचित त्याला धडकलो असतोच तर पब्लिक माझीच चुक कशी हे हिरीरीने बोलत राहिले असते. Sad

यदाकदाचित त्याला धडकलो असतोच तर पब्लिक माझीच चुक कशी हे हिरीरीने बोलत राहिले असते

बोलत?? काय बोलता राव???? पब्लिक अशा वेळी तोंडाने बोलत नाही, हातापायाने बोलते.... Happy वाचलात तुम्ही.

ज्याची गाडी मोठी त्याची चुक असा अलिखित नियम आहे. म्हणजे तुम्ही सायकलला ठोकले तर मार तुम्हाला पडणार, सायकलवाला बिच्चारा असतो अशा वेळी..

मी दर २ आठवड्याला पुणे -कोल्हापूर हाय वे वर जात असतो .
हल्ली या हायवे वरचा (त्यातल्या त्यात) सातारा -कोल्हापूर उलटीकडून वाहने यायचा त्रास प्रचंड वाढलाय

इतका सुंदर रस्ता पण त्यावर एकही पेट्रोलिंगची गाडी नसते. उलटे येणारे पहिल्या लेनमध्ये असतात, वेगाने चालवतात, त्यांना थांबवणारे कोणीही नाही. Sad Sad

परवा आमच्या इथे एक १०-११ वर्षांचे पोर बाईक चालवत होते आणि त्याचा बाप मागे बसुन मार्गदर्शन करत होता. त्याने बाईकचे हँडलही धरले नव्हते, पोरगेच सगळे मॅनेज करत होते. अशा बापांचे काय करावे??

वाचलात तुम्ही.>> हो दोन्ही अर्थाने मीच वाचलो म्हणतोय. (फारशी दुखापत न होणे, आणि पब्लिक पासुन देखील)

हायवेवर ट्रकवाले, जड वाहने नेहमी उजव्या बाजूनेच का चालवतात्?.... हॉर्न, लाइट वगैरे देउनसुद्धा डाव्या लेनमध्ये जात नाहीत.... आणि मग कंटाळून डाव्या साईडने ओव्हर्टेक करावे लागते

- हायवेवर जड गाड्यांना उजव्या लेनमधून जाणे सोयीस्कर ठरते . कारण या गाड्या एका विशिष्ट वेगाने जात असतात,त्यांना सारखे थांबणे किंवा वेग कमी जास्त करणे अवघड असते, डाव्या लेनमध्ये ब-याचदा बंद झालेल्या किंवा विश्रांती साठी थांबलेल्या गाड्या असतात मात्र जड गाडी बंद झाल्यास तीला डाव्या लेनपेक्षा ही शक्य तितके रस्त्याच्या खाली उभी करणे गरजेचे आहे.
या गाड्यांना ओव्ह्ररटेक करताना डाव्या बाजूनेच करावे असे करताना त्या गाडीपासून किमान एक लेन दूरुन ओव्हरटेक करावा तसेच हॉर्न व लाईट दोन्हीचा वापर करावा.

हायवेवर डाव्या बाजूला रस्त्याला स्लोप असतो, त्या मुळे हेवी लोडेड ट्रक सहसा त्या बाजूला जात नाहित. पण घाटात तर ट्र्कवाले इतके स्कॅटर्ड गाड्या चालवतात की, छोट्या गाड्यांना झिगझॅग चालवावी लागते . प्रत्त्येक लेन मधे ट्रक असतोच. खास करून घाट चढताना जास्तच त्रास असतो हा.

४ तारखेला सोमवारी रात्री पाली वरुन मुंबईला परत येताना खालापूर वरुन मुंबई-पुणे Expressला लागलो. Bhatan Tunnel नंतर एक विचित्र प्रकार बघावयास मिळाला. आमची गाडी Expresswayच्या उजव्या लेन मधुन मुंबईकडे धावत असताना... एक मालवाहू ट्रक ६०-७० च्या वेगाने विरुद्ध बाजुच्या उजव्या लेन मधुन म्हणजेच पुण्याकडे जाणार्‍या उजव्या लेन मधून उलट दिशेने मुंबईकडे पळत होता. Uhoh

तो ट्रक कसा काय उलट्या मार्गात घुसला ते देवच जाणो... बर घुसला तो घुसला.. डाव्या लेन मधे जाऊन गाडी न थांबवता तो मुंबई कडून येणार्‍या ट्रॅफिकच्या तोंडात फेस आणत उजव्या लेन मधून बिनधास्त धावत राहिला. Angry

हल्ली Expresswayवर उलट्या दिशेने डाव्या लेन मधून पळणारे बाईकवालेही बघितले आहेत. तसेच पुण्यावरुन येणारे ट्रक वाले खालापूरचा टोल वाचवण्यासाठी पाली कडून Express साठी असलेल्या Enterance मधून चक्क उलट येतात. Angry

Expresswayच ट्रॅफिक कंट्रोल आणि CCTV काय झोपा काढत असतं का?

भारतातल्या गाड्यांच्या सेफ्टी फिचर्सबद्दल एक प्रश्न आहे : गाडी घेताना पॅसिव्ह सेफ्टी फीचर्सना किती महत्त्व द्यायला हवे ?

सेफ्टी फिचर्समध्ये अ‍ॅंटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टीम ( ABS ), ट्रॅक्शन कंट्रोल, सीटबेल्ट्स, एअरबॅग्ज हे अ‍ॅक्टिव्ह सेफ्टी फिचर्स आणि फ्रंट अ‍ॅंड साईड इंपॅक्ट बीम्स हे पॅसिव्ह सेफ्टी फिचर्स. वाचताना असे लक्षात आले की बऱ्याच गाड्यांच्या टॉप मॉडेल्समध्ये सुद्धा अ‍ॅक्टिव्ह फिचर्स असले तरी पॅसिव्ह फीचर्स नाहीत किंवा मग उलट. ( उदा. वॅगन आर आणि व्हिस्टामध्ये फ्रंट इंपॅक्ट बीम नाही, रिटझ, टोयोटा लिवामध्ये दोन्ही प्रकारचे बीम्स नाहीत, सॅंट्रोमध्ये एअरबॅग्ज नाहीत पण बीम्स आहेत, काहीत एबीएस नाही इत्यादी )

तसेच टोयोटा लिवामध्ये बीम्स नसले तरी त्याचे संपूर्ण बॉडी स्ट्रक्चरच शॉक अ‍ॅब्सॉर्ब करणारे आहे असे ठळक करुन सांगितले आहे. हा काय प्रकार आहे ? बीम्स आणि टोटल शॉक अ‍ॅब्सॉर्बिंग स्ट्रक्चर ह्यात काही फरक असतो का ? दोन्हींत काय चांगले ?

हे सगळे बघून गाडी घेताना पॅसिव्ह सेफ्टी फीचर्सना किती महत्त्व द्यायला हवे हा प्रश्न पडला कारण आपल्याकडे आपण गाडी चांगल्या प्रकारे चालवली तरी समोरच्याने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्यामुळे किंवा एकंदरितच नियम न पाळल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे.

हॅचबॅकमध्ये तरी अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही सेफ्टी फीचर्स देणारी मॉडेल्स हुंडाई आय टेन / ट्वेंटी, होंडा ब्रिओ ही सापडली.

अगो,बिम्स फ्रेम मजबुत ठेवतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. संपुर्ण स्ट्रक्चर उर्जा शोषणारे असेल तर धक्का बर्यापैकी शोषला जातो .बहुदा फ्रंट स्ट्रक्चर अनेक जोड देऊन बनवतात, त्यामुळे कोलिजन झाल्यास जोड असलेल्या ठीकाणी स्ट्रक्चर ब्रेक होऊन उर्जा रिलीज होते व दणका कमी बसतो.
एक उदाहरण देतो
एक सहा सात इंच लांबीची काडी घ्या व तुमचा तळहात व भिंत यामधे थोड्या ताकदीने दाबा ,काडी तळहातात रुतेल. कारण भिंतीकडुन येणारी फोर्स रिएक्शन थेट तळहाता पर्यंत येते. आता हीच काडी मध्यभागी थोडीशी ब्रेक करा व तोच प्रयोग करुन बघा काडी तळहातात रुतणार नाही, तर संपुर्ण ब्रेक होईल. कारण भिंतीकडुन येणारी फोर्स रिएक्शन काडी मोडण्यासाठी वापरली जाईल.याला क्रम्पल झोन म्हणतात.
विकिपेडीयाची हि लिँक वाचा .
http://en.m.wikipedia.org/wiki/Crumple_zone

अगो,

दोन लाख जास्त गेले तरी चालतील, ते कमवता येतात पण अ‍ॅक्टिव्ह सेफ्टी फिचर्स असल्याशिवाय गाडी घेऊ नको. कमीतकमी ABS, air bags असाव्यातच.

मास मार्केट मध्ये (भारत) असे फिचर्स अजूनही उपयुक्त समजले जात नाहीत कारण ती अ‍ॅब्सोल्युट मनीला व्हॅलू आहे. ५०००० कमी घेऊन विदाऊट एअर बॅग्सवाली कार विकता येते कारण तसे मॅन्डेटरी नाही. मार्केट इवॉल्व्ह होत आहे.

कारण आपल्याकडे आपण गाडी चांगल्या प्रकारे चालवली तरी समोरच्याने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्यामुळे किंवा एकंदरितच नियम न पाळल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. >> खरंतर याच कारणामुळे सेफ्टी फीचर्स असलेली गाडी घेणं जास्त महत्वाचं आहे. अ‍ॅटलीस्ट दुसर्‍याच्या चुकीमुळं आपलं कमीतकमी नुकसान होइल. सेफ्टी फीचर्स हे आपल्यासाठी असतात, समोरच्यासाठी नाही Happy

हेलबॉय, क्रम्पल झोनबद्दल वाचले होते पण तुम्ही दिलेले उदाहरण जास्त आवडले Happy

केदार आणि मनीष, सेफ्टी फीचर्स असलेली गाडीच घ्यायची आहे. माझा प्रश्न थोडा वेगळा होता. बाकीच्या देशांत जिथे अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन्ही फीचर्स असणे अनिवार्य आहे तिथे भारतात कधी हे दिलेय तर कधी ते नाही असे दिसतेय. एअरबॅग्ज घ्यायच्याच आहेत पण पॅसिव्ह सेफ्टी फीचर्समध्ये कुठली कार जास्त चांगली आहे हे कळत नाही कारण क्रॅश टेस्ट रेटिंग्जची नीट माहिती नाही. जाणकारांनी पॅसिव्ह सेफ्टीबद्दल लिहावे असे अपेक्षित होते Happy

अगो, एबीएस आणि एअरबॅग मुळे थोडे महाग गेले तरी चालेल पण ते मस्ट आहे. विशेषतः लॉंग डिस्टन्सला तुम्ही एक्स्प्रेसवे वर जास्त जाणार असाल तर नक्कीच.

मी लिवा घेताना त्याच्या विड्थचाही विचार केला होता. वॅगन आर पेक्षा विडथमुळे ती स्पीडला जास्त स्टेबल राहणार, मेनली एकच व्यक्ती गाडीत असेल तर नक्कीच. असे काहीसे.

मला माझा प्रश्न नीट मांडता आला नाहीये. एअरबॅग्ज आणि एबीएस असताना सेफ्टी बीम्सना किती महत्त्व द्यावे असा प्रश्न आहे कारण हे सगळेच फीचर्स देणार्‍या गाड्या खूप कमी आहेत ( निदान पाच-सहाच्या रेंजमधल्या )

एअरबॅग्ज आणि एबीएस असताना सेफ्टी बीम्सना किती महत्त्व द्यावे >>

खरे तर प्रत्येकाचे महत्व वेगळे आहे. एअरबॅग्स ह्या माणसाला सावरतात, तर एबीस मुळे गाडी कचकन ब्रेक दाबल्यावरही सरळ रेषेत थांबते. म्हणजे रोल होण्याची शक्यता कमी. तर सेफ्टी बिम्स हे बॉडी डॅमेज कमी करण्यास मदत करतात.

मुळात अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये थोडी गल्लत होते आहे. एअरबॅग पण पॅसिव्ह मध्ये येतात. अ‍ॅक्टीव्ह सेफ्टी मध्ये साधारण कारचे मुळ फिचर्स जसे ABS , ESP, ट्रॅक्शन कंट्रोल असे फिचर्स असतात. जेणे करून कार स्वतः कंडिशन अडाप्ट करेल. आणखी उदाहरण म्हणजे हिल डिसेन्ड अ‍ॅटो ब्रेकिंग, हिल असेन्ड होल्ड. (चढा वर ३ सेकंद होल्ड)

पॅसिव्ह मध्ये एअरबॅग, सेफ्टी बेल्ट किंवा कारच्या विन्ड शिल्डची क्वालिटी असे फिचर्स येतात.

जेवढे जास्त अ‍ॅक्टिव्ह फिचर्स तेवढी कार महाग असे आपण साधारण म्हणू शकतो.

भारतातल्या सध्याच्या कार्स ( हॅच किंवा अगदी C - ) सेगमेंट मध्ये ESP वगैरे येत नाही. ABS मात्र आता स्टॅन्डर्ड आहे. त्यामुळे हॅच घेताना हे सर्व फिचर्स मिळणार नाहीत. ( ABS सोडून)

भारतातल्या सध्याच्या कार्स ( हॅच किंवा अगदी C - ) सेगमेंट मध्ये ESP वगैरे येत नाही. >>> हो, ते नोटिस केले मी.

थँक्स केदार.

केदार,
तुमचा अभ्यास या विषयात आहे, म्हणून, धागा-विषयाशी धरून व चर्चेसाठी विचारतो,

ही सगळी फीचर्स अ‍ॅव्हेलेबल आहेत असे सांगून भारतात कार्स विकणार्‍या लोकांवर 'क्वालिटी कण्ट्रोल' ठेवणारी व 'रिलायेबली' तो 'एन्फोर्स' करणारी यंत्रणा आपल्या देशात आहे असे तुम्हाला वाटते का? (म्हणजे समजा उदा. उत्पादकाने 'कोलॅप्सिबल स्टिअरिंग व्हील' अशी जाहिरात करून विकलेली झेन आमच्या एका मित्राने आपटल्यानंतर स्टिअरिंग कोलॅप्स झालेच नाही. इंडिव्हिज्युअल आयटेम डिस्फंक्शन म्हणून त्यांनी फक्त दिलगिरी व वस्तू (स्टिअरिंग असेम्ब्ली) रिप्लेसमेंट देऊ केली होती. मित्र जिवंत होता वगैरे अलाहिदा...)

मुद्दा हा, की जाहिरात केलेली सेफ्टी फीचर्स खरेच काम करतात काय?

दुसरे म्हणजे, 'सेक्युअर इन अ सिएन्ना' अशी जाहिरात करणार्‍या गाडीत प्रवास करणारे सगळेच लोक एका मोठ्या अपघातात मेलेले आठवतात. प्रॉमिनंट फॅमिली होती.. एकही एअर बॅग उघडली नाही. कारण? : ड्रायव्हरने सीट बेल्ट लावलेला नव्हता.

इन जनरलच, सेफ्टीफीचर्स कशी वापरावीत अन का, याबद्दल आपल्याकडे घोर अज्ञानापासून प्रचण्ड उर्मट निष्काळजीपणा असाच स्पेक्ट्रम दिसून येतो, असे मला तरी वाटते.

माझा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे एअरबॅग आणि सीट बेल्टस हा...गेली १० वर्ष मोटाऊन मध्ये ह्या क्षेत्रात मी काम करत आहे.

माझ्या माहितीप्रमाणे सीट बेल्टस लावणे आणि एअरबॅग उघडणे यांचा एकमेकांशी संबंध नाहीये. गाडीमध्ये असलेली sensor system ठरवते कि एअरबॅग कधी उघडायची आहे. आणि ते गाडीच्या deceleration (धडक झाल्यानंतर वेग कमी व्हायचा अवधी) वर अवलंबून असते.

एअरबॅग्ज आणि एबीएस असताना सेफ्टी बीम्सना किती महत्त्व द्यावे?>>
नक्कीच द्यावे. कारण सेफ्टी बीम्स हे impact energy absorption चे काम करतात. आणि एअरबॅग्ज ह्या आतल्या माणसाच्या energy absorption चे काम करतात. They both go hand in hand.

एबीएस हे मुख्यतः गाडीची चाके लॉक होण्यापासून रोखतात. त्यामुळे गाडी नियंत्रणात राहू शकते.

ही सगळी फीचर्स अ‍ॅव्हेलेबल आहेत असे सांगून भारतात कार्स विकणार्‍या लोकांवर 'क्वालिटी कण्ट्रोल' ठेवणारी व 'रिलायेबली' तो 'एन्फोर्स' करणारी यंत्रणा आपल्या देशात आहे असे तुम्हाला वाटते का?>>
नाही. भारतात अजून कोणत्याही प्रकारची सेफ्टी रेग्युलेशन्स आलेली नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अजून तरी शक्य नाही. मी स्वतः ज्या कंपनीमध्ये काम करतो त्यांची मोडेल्स प्रत्येक देशाच्या Rules/regulation प्रमाणे वेगळी आहेत.

आत्तापर्यंतचा research असे दाखवतो कि धडक झाल्यानंतरच्या impact energy मधली ७०% impact energy सीट बेल्टस dissipate करतात. त्यामुळे पुढच्या सीटवर असो वा मागच्या सीटवर सीट बेल्ट लावणे कधीही चांगलेच.

दुर्योधन, धन्यवाद Happy

प्लीज ह्याही प्रश्नाचे उत्तर द्याल का ?

बीम्स आणि टोटल शॉक अ‍ॅब्सॉर्बिंग स्ट्रक्चर ह्यात काय फरक असतो ? दोन्हींपैकी काय प्रीफर करावे ?

हेलबॉयनी चांगले उत्तर दिले आहे पण तुम्ही ह्याच क्षेत्रात आहात म्हणून विचारावे वाटले.

अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी. ------

अ‍ॅक्टिव्ह सेफ्टी म्हणजे अपघातच टाळला जावा म्हणुन जे फिचर दिले असतात ते - ABS, collision sensors, parking camera वगैरे
पॅसिव्ह सेफ्टी म्हणजे अपघात झाल्यानंतर इजा कमी व्हावी या हेतुने केलेले डिझाइन - airbag, seat belt with pretensions and load limiters, front crumple zone वगैरे.

नाही. भारतात अजून कोणत्याही प्रकारची सेफ्टी रेग्युलेशन्स आलेली नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अजून तरी शक्य नाही. मी स्वतः ज्या कंपनीमध्ये काम करतो त्यांची मोडेल्स प्रत्येक देशाच्या Rules/regulation प्रमाणे वेगळी आहेत. >> + १

फ्रंट अ‍ॅंड साईड इंपॅक्ट बीम्स --- दोन्हि आवश्यक आहेत. भारतात सेफ्टी रेग्युलेशन्स strigent नसल्यामुळे आणी ग्राहकात पुरेशी जागरुकता cost cutting साठी हे panels काढले जातात नाहितर कमी strenght चे मटेरियल आणी कमी थिकनेसचे panel वापरले जातात.

बीम्स आणि टोटल शॉक अ‍ॅब्सॉर्बिंग स्ट्रक्चर ह्यात काय फरक असतो ? दोन्हींपैकी काय प्रीफर करावे ? >>>
वरिल उत्तर पहा -- बिम काढल्यानंतर तीच strength बाकिच्या panel मधुन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

क्वालिटी कण्ट्रोल' ठेवणारी व 'रिलायेबली' तो 'एन्फोर्स' करणारी यंत्रणा आपल्या देशात आहे असे तुम्हाला वाटते का? >

अशी यंत्रना आहे पण ती पूर्णपणे कार्यक्षम नाही. आपल्याकडे ARAI चे रुल्स अन रेग्युलेशन, स्टॅन्डर्ड मेंटेन केले जातात. पण सरकारचा भर इमिशन कंट्रोल वर असल्यामुळे भारत ३, भारत ४ (खरे तर त्याही युरो ३ / ४ च्या कॉप्याच आहेत) हे रेग्युलेशन जरूर आहेत व त्या टेस्ट शिवाय गाडी विकता येत नाही. पण अजूनही क्रॅश टेस्टींग साठी चांगल्या यंत्रना नाहीत हे तेवढेच सत्य आहे. म्हणून उत्तर यंत्रना आहे पण म्हणावी तितकी कार्यक्षम नाही. गाडीच्या प्रत्येक पार्ट साठी एक स्टॅन्डर्ड आपणही तयार केले आहे, उदा रिअर फॉग लाईट, सेफ्टी बेल्ट, इंजिन कॅपेसिटी विथ इमिशन, चासि लोड कॅपॅसिटी इत्यादी इत्यादी आणि ते सर्व कंपन्या फॉलो करतात.

पण खरी गोम तुम्ही नंतर जी उदाहरणं दिली आहेत त्यात आहे. तुमच्या "सेफ्टीफीचर्स कशी वापरावीत अन का, याबद्दल आपल्याकडे घोर अज्ञानापासून प्रचण्ड उर्मट निष्काळजीपणा असाच स्पेक्ट्रम दिसून येतो, असे मला तरी वाटते." ह्या वाक्याशी मी सहमत आहे.

तसेच अशी यंत्रना (बॉडी) असूनही रुल्स बाबत अजून आपण मागासलेले आहोत. प्रत्येक कार मध्ये एअर बॅग असाव्यातच हा रुलच आपल्याकडे नाही. कारण आपण अजूनही अ‍ॅटो मार्केट मध्ये अंडर डेव्हलप आहोत. हा रुल खरे तरे असायला हवा. तसेच ABS पण असायलाच हवे पण हे दोन्ही अ‍ॅड केले की गाडी महाग होते. व्हाल्युम वर परिणाम होतो. म्हणून अ‍ॅटो लॉबीने हा रुल अजून येऊच दिला नाही.

सिएन्नाच काय अगदी कुठल्याही कार मध्ये ( जर्मनी / अमेरिकन / जपान ह्या देशात सुद्धा) अ‍ॅक्सिडेंट होऊ शकतो व त्यात लोकं मरू शकतात हे मान्य आहे. पण बेसिक सेफ्टी न देता कार विकणे व ती विकत घेणे मात्र अमान्य.

आणखी एक मुद्दा रिकॉल हा प्रकार अजून भारतीय अ‍ॅटो मेकर्स आणि भारतात विकणारे परदेशी लोकं वापरत नाहीत कारण येथील ग्राहक हा जागरूक नाही आणि चलता है अ‍ॅटिट्युड. खरेतर एखाद्या पार्ट मधून गाडीला व पर्यायाने गाडीत बसणार्‍याला धोका असेल तर रिकॉल व्हायला पाहिजे पण भारतात होत नाहीत, आताशा गेल्या वर्षभरात एक दोन गाड्या रिकॉल झालेल्या पाहिल्या.

ती यंत्रना खूप कार्यक्षम होणे (लवकरात लवकर) गरजेचे आहे. थोडक्यात सेफ्टी रुल्स पाळणे ह्यात आपण खूप मागे आहोत.

हेलबॉयनी जे सांगितले आहे तसेच आहे.

बीम्स हे साधारणपणे साईड ईम्पॅक्ट स्ट्रक्चर म्हणून वापरतात. त्यांचा उपयोग localized energy absorbers म्हणून जास्त होतो.

हेलबॉय म्हणाल्याप्रमाणे फ्रंट ईम्पॅक्ट स्ट्रक्चर हे वेगवेगळे जोड देऊन बनवलेले असते. त्याचे मुख्य काम असते कि जमेल तेवढी impact energy शोषून घेणे आणि driver compartment पर्यंत कमीत कमी intrusions येऊन देणे.

टोटल शॉक अ‍ॅब्सॉर्बिंग स्ट्रक्चर हे कधीही चांगले जर ते खरच तसे असेल तर.

बाकि बीम संपुर्णपणे काढणे शक्यच नाहि. - दोन्हिहि - front आणी side
कारण त्यामुळे फक्त सेफ्टीच नाहि तर ride and handling, torsional and bending stiffness देखील मिळत नाहि.

माझ्या प्रश्नावर इतक्या कमी वेळात इतकी छान उत्तरं देणार्‍या भारतीय, केदार, दूर्योधन, तुमचे आभार!

>>माझ्या माहितीप्रमाणे सीट बेल्टस लावणे आणि एअरबॅग उघडणे यांचा एकमेकांशी संबंध नाहीये. गाडीमध्ये असलेली sensor system ठरवते कि एअरबॅग कधी उघडायची आहे. आणि ते गाडीच्या deceleration (धडक झाल्यानंतर वेग कमी व्हायचा अवधी) वर अवलंबून असते. <<

एक शंका.
नुसती रात्री पार्क करून ठेवलेली गाडी आहे. समोरून चुकून कुणीतरी धडक मारली. एयर बॅग्ज डिप्लॉय झाल्या तर विनाकारण ५० हजार रुपये पर बॅग खर्च येईल मालकाला. म्हणून ड्रायव्हर सीटबेल्ट च्या क्लिप मधे सेन्सर असतो असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.. यात तथ्य किती?

Pages