अंड्याचे फंडे ५ - शर्यत

Submitted by अंड्या on 7 April, 2013 - 09:20

मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्‍यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती. संध्याकाळी साडेपाच सहाची वेळ. उतरणार्‍यांना घरी जायची जेवढी घाई होती त्यापेक्षा जास्त चढणार्‍यांना जागा पटकवायची. त्यामुळे ज्या बाजूचा लोंढा जास्त त्यांची सरशी असा हा खेळ. समोरच्या गर्दीला हरवण्याच्या नादात प्रत्येक जण स्वत:च त्या गर्दीत हरवत होता. भारताने कधीकाळी ऑलिंपिकमध्ये रग्बी खेळात संघ उतरवला तर त्यात आठ-दहा जे काही खेळाडू असतात त्यापैकी निम्मे लढवय्ये तर याच लोकल ट्रेनच्या गर्दीतून मिळावेत.

अंड्या मात्र निवांत होता. आजच्या दिवसाचे काम उरकले होते. आता घरी पाचदहा मिनिटे लवकर पोहोचून काही विशेष घडणार नव्हते. आजूबाजूचे सारे मात्र उगाच इथे तिथे पळत असल्यासारखे वाटत होते. जे एकाच दिशेने पळत होते त्यांना बरोबरीचे सारेच पळत असल्याने आपल्या पळण्याचा वेग जाणवत नव्हता. अन जे विरुद्ध दिशेने पळताना दिसत होते त्यांचा वेग दुप्पट भासत असल्याने नकळत स्वताच:च वेग वाढवत होते. जणू एक शर्यतच लागली होती. स्वत:शी, इतरांशी की घड्याळ्याच्या काट्यांशी हे कोडे मात्र अंड्याला उलगडत नव्हते. सकाळी ऑफिसला वेळेत पोहोचायची घाई समजू शकते, मात्र कामावरून घरी परतायची घाई कसली याचा विचार करत अंड्या त्या गर्दीला वाट करून देत एका बाजूला उभा राहिला.

जवळपास तरुणाई टोळक्याटोळक्यांनी उभी होती. सारेच ग्रूप खांद्याला बॅग लटकवलेले अन आधुनिक वेषभुशेतील असले तरी त्यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ग्रूप कोणता आणि ऑफिसहून परतणारे कोण हे त्यांच्या देहबोलीवरून लक्षात येत होते. दिवसभर दंगा करूनही तोच उत्साह महाविद्यालयीन युवकांमध्ये सायंकाळीही झळकत होता तर दिवसभर ड्यूटी करून थकलेल्या चाकरमान्यांना मात्र घराची ओढ लागली होती.

भेsssल करत, भेळवाल्याचा आवाज कानावर पडला अन अंड्याला भूक लागल्याचे जाणवले. आवाजाचा कानोसा घेईपर्यंत तो देखील पळणार्‍या माणसांमागे दूर पळताना दिसला. ‘फास्ट’ फूड यालाच म्हणत असावे. अंड्या मात्र निवांत असल्याने या फास्ट फूड जनरेशनचे निरीक्षण करत तिथेच उभा राहिला. थोड्यावेळाने फलाटाच्या त्या टोकाला पोहोचून तोच भेळवाला परतून आला. शेवटचे हात मी कधी धुतले होते आणि त्यानंतर ते कुठे कसे वापरले होते याचे भान न राखता सवयीनेच त्याच्या टोपलीत हात घालून कुरमुर्‍यांचा कुरकुरीतपणा चेक केला. पिचकलेच दोन बोटांच्या चिमटीत पण दुसरा पर्याय नसल्याने वेळेला केळं म्हणत एका भेळेची ऑर्डर दिली.

भेळ हातात घेऊनच ट्रेनमध्ये चढलो. नवीनच दिसत होती राव. सेकंडक्लासचाच डब्बा, पण आधीच्या लाकडी बाकड्यांच्या जागी सोफा सीट बसवल्या होत्या. अगदी फर्स्टक्लास इतक्या मऊशार नव्हत्या पण सरकारला गरीबांचीही काळजी आहे हे दर्शवण्यास पुरेश्या होत्या. माझ्या पाठोपाठ चढलेले आणखी दोघेजण फर्स्टक्लास समजूनच गंडले. त्यांना मुळात फर्स्टक्लासमध्येच चढायचे होते. पण जेव्हा त्यांना समजले की हा सेकंडक्लास आहे आणि इथेही फर्स्टक्लाससारख्या सोफा सीट लागल्या आहेत तेव्हा बडबडतच उतरले. कसलासा असंतुष्टपणा त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. सेकंडक्लासलाही सवलती दिल्या तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय उरला अशी त्यामागे भावना असावी. अंड्याला मात्र याच्याशी काही घेणेदेणे नव्हते. तो आपला भेळेचा आस्वाद घेत बसला होता. हो, बसलोच होतो कारण ट्रेन इथूनच सुटणार असल्याने बर्‍यापैकी रिकामी होती. पण अजूनही काही जणांची चूळबूळ चालूच होती. काही जण जाळीच्या खिडकीला डोके लाऊन दूरवर काही दिसते का बघत होते, तर काही सीटवर बॅग ठेऊन पुन्हा पुन्हा दारात जाऊन परतत होते. अधूनमधून सर्वांचीच एक नजर प्लॅटफॉर्मवरच्या ईंडिकेटर वर तर एक नजर घड्याळावर. थोड्यावेळाने अंड्याची ट्यूब पेटली. आमची ट्रेन सुटायला उशीर होत होता म्हणून समोरच्या ट्रॅकवर मागाहून पनवेलवरून सुटणारी ट्रेन येतेय का यावर लोकांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांचा अंदाज खरा ठरला. समोरच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येऊन लागली. केवळ दहा सेकंदातच ती सुटणार असल्याने सारे जण तिथे पळत सुटले. पुरुष तर पुरुष, महिलाही पळत सुटल्या. सार्‍या आधुनिक हिरकण्याच जणू. अंड्याने पाहिले तर त्या ट्रेनला हिच्या तुलनेत बर्‍यापैकी गर्दी होती. तरी देखील सर्वांना त्या ट्रेनचेच वेध लागले होते कारण काय तर ती पाचेक मिनिटे त्यांना लवकर घरी पोहोचवणार होती. अंड्या मात्र अगदी निवांत आणि फिकिर नॉट कॅटेगरीतला मुलगा. बसूनच राहिलो आपल्या सीटवर. इकडचे तिकडे गेल्याने आणखी ऐसपैस जागा तयार झाली होती. त्याबद्दल त्यांचे आभार मानून अंड्या त्यांना अलविदा करणार इतक्यात अचानक काहीतरी सुरस अन चमत्कारीक घडावे तसे आमचीच ट्रेन हलली. इतका वेळ आमची ट्रेन सुटत नव्हती पण आता तिचा ड्रायव्हर थोडा उशीरा का होईना आपल्या ड्यूटीवर आला होता आणि वेळापत्रकनुसार त्या ट्रेनला लाल सिग्नल दाखवून आमची ट्रेन आधी काढली होती. पुन्हा एकदा तिकडचे काही जण इथे उलट पावली धावत आले. पण यावेळी जरा जास्तच जीव तोडून कारण आमची ट्रेन हळूहळू वेग पकडत होती. या वेगाशी शर्यत जे जिंकले ते चढले.. अन हरले ते राहिले..

बसायला अमाप जागा होती, पण आता बसावेसे वाटत नव्हते म्हणून मी दारात येऊन उभा राहिलो. वाशी खाडीवरच्या पूलावरून ट्रेन जाऊ लागली अन माझा दारावर उभे राहायचा निर्णय सार्थ ठरला असे वाटू लागले. दोन्ही बाजूला पसरलेला निश्चल समुद्र आणि थैमान वारा. आपल्या घरी परतायची जराही घाई नसलेला, हळूहळू पाण्यात विरघळणारा तांबडा सूर्य. कविता अंड्याला जमत नाही पण एखादे गाणेच गुणगुणावेसे वाटले. थोड्या वेळासाठी ट्रेनला सिग्नल लागून ती तिथेच पूलावर काही काळ थांबावी अशी इच्छा मनात उत्पन्न झाली खरी, मात्र सहप्रवाश्यांना ते परवडण्यासारखे नव्हते म्हणून कोण्या देवाने तथास्तु म्हणायच्या आतच अंड्याने ती इच्छा माघारी घेतली.

समुद्रौल्लंघन करून ट्रेन मानखुर्द स्टेशनला पोहोचली. इथे मात्र उतरणार्‍यांपेक्षा चढणार्‍यांची संख्या जास्त असल्याने एकतर्फीच सामना होता. हे जाणून असलेल्या आणि उतरायची इच्छा बाळगून असलेल्या शिलेदारांनी धावत्या ट्रेनमधूनच फलाटावर उड्या फेकल्या. चढणारे धाडधाड करत आत चढले अन ट्रेन जराही वेळ न दवडता पुन्हा सुटली. फलाटावरील प्रवाशी, बाकडे, खाद्यपदार्थांचे स्टॉल एकेक करून मागे पडत होते आणि इतक्यात अचानक समोरच्या खांबामागून एक कुत्रा उठला आणि आमच्या ट्रेनच्या पाठी पळत सुटला. ट्रेनला अगदी लागूनच समांतर धावत होता जिथे त्याच्या मार्गात येणारेही कोणी नव्हते. ट्रेनच्या वाढत्या वेगाबरोबर त्याचाही वेग वाढत होता, मात्र त्याचे हरणे निश्चित होते. कुठल्याही क्षणी तो ट्रेनमध्ये झेप घेईल या आवेशात त्याने धाव घेतली होती खरे पण शेवटपर्यंत हा मुर्खपणा काही त्याने केला नाही. फलाटाचे टोक संपेपर्यंत त्याने ट्रेनचा पाठलाग की ट्रेनला सोबत केली पण त्यानंतर पुढे काय झाले हे समजायला मात्र वाव नव्हता. ट्रेनने वळण घेतले आणि तो नजरेआड झाला. पण अंड्याच्या विचारातून तो गेला नाही. तो कुत्रा नक्की कोणाशी शर्यत करत होता, कोणाच्या मागे लागला होता, जर त्याला ट्रेन पकडायचीच नव्हती तर का उगाच तो आपली शक्ती आणि वेळ वाया घालवत होता. हा त्याचा खेळ होता की निव्वळ मुर्खपणा. तो प्रत्येक ट्रेनच्या मागे असाच पळत असावा की आमच्याच ट्रेनमध्ये त्याला काही विशेष दिसले. आता तो थकून बसला असेल की या खेळात त्याचा कोणी जोडीदारही असेल. एक ना दोन, अनेक प्रश्न अंड्याच्या डोक्यात आले ज्याचा छडा लावायला मी पुढच्या स्टेशनवर उतरून पुन्हा मागे जायचे ठरवले. आता तुम्ही म्हणाल की एवढ्यासाठी पुन्हा मागे. त्याचे काय आहे, झाडावरून पडलेले सफरचंद सारेच खातात, पण त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा एखादा न्यूटनच असतो. अंड्याचेही काहीसे असेच आहे.

पुढच्या स्टेशनला उतरून अंडया परत फिरला आणि स्वत:शीच स्वत:चा एक किस्सा आठवू लागला. कॉलेजचा काळ, परीक्षेचे दिवस, दुसर्‍या दिवशी कठीण समजला जाणारा असा एक विषय. वर्षभर फारसा काही अभ्यास न करता परीक्षेच्या आदल्या काही दिवसांमध्ये करूया असा हिशोब. पण काही कारणांमुळे त्या आणीबाणीच्या दिवसांतही पुरेसा अभ्यास झाला नव्हता. जवळपास निम्मा अभ्यासक्रम ऑप्शनला टाकावा लागतो की काय अशी परिस्थिती उदभवली होती. तरी रात्रभर जागून जेवढे जमेल तितके पठण चालू होते. पण कितीही हातपाय झाडले तरी अभ्यास काही संपत नाही हे समजून चुकल्याने त्या टेंशनमुळे आणखीनच काही सुचत नव्हते. दुसर्‍या दिवशी तसेच जागरण करून ओडसलेले डोळे, प्रश्नपत्रिका हातात पडताच खाडकन उघडले. अधाश्यासारखी चाळली तर बरेचसे प्रश्न ओळखीचे. उत्साहाने लिहायला सुरुवात केली. माझ्याप्रमाणे सारेच त्या प्रश्नपत्रिकेवर तुटून पडले होते. वर्षभर तुम्ही काय अभ्यास केला, तुम्हाला किती येते आणि तुमच्यात किती अक्कलहुशारी आहे हे येत्या तीन तासांत दाखवायचे होते. अंड्याची लेखणी देखील झरझर चालू लागली. सारे काही येत असूनही केवळ संथ लिखाणामुळे स्पर्धेत मागे पडून चालणार नव्हते. पहिले पाच प्रश्न, प्रश्नातील उपप्रश्नांसह लिहून झाले. वेळ संपत आली तरीही अजून बरीच प्रश्नपत्रिका शिल्लक कशी म्हणून सुरुवातीच्या सूचना पुन्हा सावचितपणे वाचल्या आणि हातातले पेनच गळून पडावे असा धक्का बसला. पहिल्या पाच प्रश्नांपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे होते. याचा अर्थ मी आतापर्यंत सोडवलेल्या पाच प्रश्नांपैकी केवळ दोनच प्रश्न ग्राह्य धरले जाणार होते. वेळ संपल्यातच जमा होती आणि आता माझे नापास होणे निश्चित होते. शेवटची दहा-पंधरा मिनिटे, हाताला कितीही ताण दिला तरी ओरबाडून ओरबाडून आणखी किती गुण मिळवणार होतो. ताण हातापेक्षा भणभणून उठलेल्या डोक्यावर येत होता. जेव्हा तो असह्य झाला तेव्हा खाडकन डोळे उघडले आणि अंड्या झोपेतून जागा झाला. कॉलेज संपून आज पाच-सहा वर्षे उलटली आहेत हे स्वत:ला पटवायला किंचित वेळच गेला, मात्र असे स्वप्न पडायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. अजूनही त्या स्पर्धापरीक्षांचा घेतलेला धसका कधीकधी असा स्वप्नांच्या रुपात बाहेर पडतो आणि जाग आल्यावर त्यांना मी आता फार मागे सोडून आलो आहे ही जाणीव सुखावते. माझ्या आसपास दिसणार्‍या या लोकांनाही अशीच ट्रेन सुटत असल्याची स्वप्ने पडत असावीत का..

याच विचारात अंड्या पुन्हा आधीच्या स्टेशनला परतला. पण तो कुत्रा कुठे दिसत नव्हता. कदाचित त्याच्या खेळाची वेळ संपली असावी अन अभ्यासाला गेला असावा, की हाच त्याचा अभ्यास होता. इतक्यात मागाहून अजून एक ट्रेन आली. नेहमी सारखी स्वयंचलित सामानाची चढउतार झाली आणि पुन्हा सुटली. त्याच ट्रेनमध्ये अंड्याही चढला. आता तरी कुठूनसा तो येईल म्हणून फलाटावर नजर फिरवली तर स्टेशनच्या प्रवेशद्वारातून दोन माणसे जीव तोडून आमच्या ट्रेनमागे धावत येताना दिसले. यांना मात्र ही ट्रेन पकडायचीच होती. नाहीतर पुन्हा पाच मिनिटे मागच्या ट्रेनची वाट बघत थांबा. ट्रेनच्या वाढत्या वेगाबरोबर शर्यत जिंकण्यात जो एक जण यशस्वी ठरला त्याने ती ट्रेन पकडली, तर दुसरा ज्याचा वेग मंदावला तो खालीच राहिला. दोघेही धापा टाकत होते. फरक इतकाच एक जण फलाटावर धापा टाकत होता तर एक इथे ट्रेनमध्ये. एकाच्या चेहर्‍यावर ओशाळलेले पराभूत भाव तर एकाच्या चेहर्‍यावर विजयश्री झळकत होती. अंड्याला मात्र मगासच्या त्या कुत्र्यापेक्षा आताची हि माणसेच जास्त केविलवाणी वाटत होती.

- अंड्या उर्फ आनंद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीवन ही एक शर्यतच आहे..............हे मुंबईकरांना जास्त माहीती झाले आहे... एक वेळेस पाढे पाठ झाले नव्हते परंतु लोकल ची टाईमिंग पाठ आहे....
इधर दौड है उधर दौड है
ये जीना यारो दौड है

शर्यत आहे नाही आपण बनवून ठेवलीय.. आणि काही ठिकाणी उगाचच..
मुंबईकरांना प्रकर्षाने जाणवते.. मात्र लागली सगळीकडेच आहे..

वाचतेय.. छान वाटतय वाचुन. आपल्या आजुबाजुला रोज घडण्यार्‍या गोष्टी पण तुम्ही (सर्व लेखक) किती छान मांडता.
अंड्या, लिहिण्याच कौशल्य सगळ्यांकडेच नसतं. इतकच म्हणेन. (तुझ्यात आहे असं म्हणायचय मला, उगाच अर्थाचा अनर्थ नको व्हायला म्हणुन स्पष्ट केलं Happy )
बाकी अजुन वाचतेय. ऑफिस सुटायला अर्धा तास आहे अजुन तो पर्यंत वाचणार बाकी उद्या.