नाव नसलेली कथा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
  • माहेर दिवाळी २०११ मधे प्रकाशित.
  • रोटरी क्लब पर्वती, पुणे चा २०११ च्या दिवाळी अंकांतील सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार.
  • दिवा प्रतिष्ठानच्या दिवाळी वाचक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार.

ही कथा इथे प्रकाशित करायची परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिक आणि मेनका प्रकाशन यांचे मनापासून आभार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

मितूनं शेवटचं पान वाचलं. परत वाचलं. खांदे उडवले आणि पुस्तक बंद केलं. यावेळेला नरहरीनी तिच्या आधीच हे पुस्तक वाचलं होतं. पुस्तकभर लाल पेनाने खुणा, रेघा करून ठेवलेल्या होत्या. लाल शाईनी अधोरेखित केलेल्या प्रत्येक ओळीओळीतून नरहरी तिला शिक्षा देऊ पाहतोय असं वाटत होतं. तिचा संताप होत होता. खुणा केलेलं पुस्तक बघितल्यावर मितूचं असंच होणार हे नरहरीला माहीत असणार आणि कुठेतरी लपून नरहरी तिचा वांझोटा संताप बघत असणार याचीही मितूला खात्री होती.

तिला झडझडून जाब विचारायचा होता नरहरीला ‘पुस्तकावर खुणा केल्यासच का? आणि केल्यास त्या केल्यास पण त्याच शब्दांवर, त्याच ओळींवर का केल्यास?’

परत पूर्वीचा खेळ. ज्या खेळापायी मितूनं जीवघेणा घाव सोसला होता. मुळापासून उन्मळून पडली होती या खेळात मितू. त्याला कारणही नरहरीच होता आणि तिला सावरणाराही नरहरीच.
नरहरी तिच्या लांबच्या नात्यातला. आजोबांची एक लांबची बहीण नवरा गेल्यावर माघारी आली. सख्ख्या भावाने हात झटकले आणि आजोबा तिला घरी घेऊन आले. तिच्या हाताला धरून तिचा अंगठ्याएवढा लेक नरहरीही आला. कोकणातल्या मोठ्या खात्यापित्या घरात कामावे तो सामावे न्यायाने ती मिसळून गेली. नरहरीची जबाबदारी आजोबांनी घेतली. मितूचे बाबा मुंबईत शिकत होते तेव्हाची ही गोष्ट. बाबांचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरी मिळाली आणि मितूच्या आईशी लग्न करून मितूचे बाबा मुंबईतच राह्यले. यथावकाश मितूचा जन्म झाला. झबल्याटोपड्यातल्या मितूला घेऊन तिचे आईबाबा पहिल्यांदा गावी आले तेव्हा खाडीतल्या धक्क्यापासून वर डोंगरात असलेल्या घरापर्यंत दहा वर्षांचा नरहरीच तिला आपल्या हातात सांभाळून अलगद घेऊन आला होता. नंतर दर सुट्टीत येणार्‍या मितूची नरहरी वाट बघायचा.

--------------

इथपर्यंत लिहून झालं आणि मी थांबले. सुरूवात तर बरी वाटत होती. मी स्वत:वरच खुश झाले. आता जरा ब्रेक घ्यायला हवा. पुढचं आत्ता सुचत नव्हतं किंवा जे सुचत होतं ते या परिच्छेदांची वाट लावणारं होतं. तसंही इतर कामं वाट बघतायतच.

मी आजवर मोजक्या कथा लिहिल्या होत्या. रग्गड कविता लिहिल्या होत्या. लेखिका होण्याचं असं काही माझं स्वप्न नव्हतं पण लिहिलेलं वाचणार्‍याला बरं वाटत होतं आणि ते बघून जरा छान बिन वाटायचं म्हणून मी परत लिहायचे. कधी कधी आता लिहिल्याशिवाय झोप लागणार नाही/ जेवण जाणार नाही म्हणूनही लिहायचे. तर कधी मंत्रचळ लागल्यासारखंही लिहायचे. आजची सुरूवात केलेली कथा यातल्या कशालाच अपवाद नव्हती. बरेच दिवसात कथा लिहिलेली नव्हती हे अजून एक कारण होतं.

नेहमीप्रमाणेच इतर कामं करतानाही माझ्या डोक्यात मितू आणि नरहरी अडकून होतेच. तान्ह्या मितूला नऊदहा वर्षाचा नरहरी उचलून घरापर्यंत आणायचा इथपासून काय काय घडलं असेल त्यांच्यात? काय बोलले असतील एकमेकांशी दोघं? आजोबांच्या घरातला आश्रित असलेला नरहरी मितूच्या आयुष्याची अपरिहार्यता का बनला असेल? प्रश्नांना अंत नव्हता आणि मितू घट्ट ओठ मिटून होती.

--------------

नरहरी हुशार होता. आजोबांनी त्याला शाळेत घातला होता. शाळा आणि अभ्यास सांभाळून उरलेल्या वेळात बागा शिंपणं, गुरांचं करणं आणि बाकीची सगळीच कामं नरहरी पटापट शिकला. नरहरी बारावी झाला आणि पूर्ण वेळ बागा, गुरं बघायला लागला. बाहेरून का होईना पण आजोबांनी त्याला पदवी पुरी करायला लावली.

नरहरी लपून बसायचा आणि दोन वर्षाची मितू त्याला शोधून काढायची. मितू पाच वर्षाची होईतो नरहरी तिच्यासाठी खाऊ लपवून ठेवायला लागला. आणि तो शोधायसाठी खुणा सुद्धा. नरहरीने अश्या खुणा पेरणे आणि ज्यात त्यात खुणा शोधत मितूने काय असेल ती गंमत शोधून काढणे हा दरवर्षीच्या सुट्टीतला हक्काचा खेळ असायचा त्यांचा. मितूला वस्तू सापडेपर्यंत चालायचा. एक वस्तू सापडली की परत पुन्हा नवीन खेळ. दोघांच्यातली ती जमाडी जम्मत होती कुणाला न सांगण्याची.

आजोबांकडे खूप पुस्तकं जमवलेली होती. मितू थोडी मोठी झाल्यावर नरहरी पुस्तकात खुणा लपवायचा. कधी एखादं चित्र असलेल्या पानाचा कोपरा दुमड. कधी एखाद्या ओळीच्या खाली रेघा मारून ठेव. हे कोणी केलंय आजोबांना समजायचं नाही. पुस्तकांना छळलेलं आजोबांना कधीच आवडायचं नाही. नेमकी मितू पुस्तकांच्यात लुडबुडताना त्यांना सापडायची. आजोबांचा संताप ओसंडत असायचा पण मितूला बघितल्यावर त्यांना रागावणं जमायचं नाही. ते आपलं तिला समजवायचा प्रयत्न करत रहायचे आणि मितू तोंडावर हात धरून खुदखुदत रहायची.

--------------

सुरूवात केल्यानंतर एकदोन महिन्यांनी मितू आणि नरहरीला समजून घेण्याच्या नादात मी मितूचं बालपण आखून काढलं. ती माझी नेहमीची पद्धत होती. मी कधीच ठरवून लिहायला बसायचे नाही. पहिला परिच्छेद तर अक्षरश: जसा सुचेल तसा कोरून काढायचे रिकाम्या हवेतून. मग त्यात उगवलेल्या नावांना हळूहळू आकार उकार द्यायला सुरूवात करायचे. कधी प्रसंगांमधून तर कधी सरळ माहितीतून. एकदा ही सुरूवात झाली की ही उगवलेली नावंच व्यक्तिरेखा बनून माझा हात धरून पुढे घेऊन जायची. आताही तसंच होईल याची मला खात्री होती. मितू, नरहरी या नावांवरून मी मितूच्या आजोबांच्या कोकणातल्या घरी पोचले होते. मितू आणि नरहरीमधे कसला तरी खेळ चालवायचा होता तो आखायला मात्र माझी मीच सुरूवात केली होती.

काहीतरी लपवणे आणि कुणीतरी ते शोधणे अश्या प्रकारच्या खेळांचं मला उगाचच जाम आकर्षण. शोधाशोधीच्या, चित्रविचित्र क्लूजच्या गेम्समधे मी कायमच ढ होते. त्यामुळेच हे आकर्षण असावे कदाचित. काही असो शोधाशोधीचा खेळ सुरू केला होता. या खेळातच काहीतरी तिढा निर्माण व्हायला हवा होता.

मी लिहीत गेले. बरीच पानं भरली. मितू एम ए झाली. नरहरीने पदवी पूर्ण करून बराच काळ लोटला. मितूची आजी फोटोत जाऊन बसली. मितूचे आजोबाही बरेच म्हातारे झाले. आजोबा, नरहरी, पुस्तकांची खोली असं एक जग, शहर-कॉलेज-परदेशातलं शिक्षण-आईबाबा-मित्रमैत्रिणी अश्या मितूच्या शहरातल्या जगाच्या बरोबरीने समांतर धावत होती. मितूच्या सुट्टीतल्या भेटींपुरतीच ही दोन जगं एकत्र यायची. एवढा सगळा प्रपंच कागदांवर मांडला तरी अजून खेळाचं गणित काही उलगडत नव्हतंच. कथा तसूभरही पुढं सरकत नव्हती. माझ्याकडे बर्‍याच घटनांचा ढीग जमला होता. पण तरी अजून मितू मुळापासून उन्मळून पडण्याची घटना हाताला लागत नव्हतीच. सुरूवातीच्या परिच्छेदांमधेच मी सांगून बसले होते मितू आणि नरहरी कुठे पोचणार ते. आता तिथपर्यंत जाण्याचा रस्ता शोधणं हेच उरलं होतं.

-कथेची सुरूवात बरी झाली म्हणून पुढची चार-पाच पानं फारसं काहीच न घडणारी कथा कोण का वाचेल?
-सतत काहीतरी घडतच राह्यलं पाहिजे. घटनेनंतर घटना येतच राह्यली पाहिजे एवढंच असतं का कुठल्या कथेमधे?
-कथा ही घटनांची साखळी असते तेव्हा एकानंतर एक घटना येणारच ना?
-नुसती घटनांची साखळी म्हणजे कथा नव्हे.
-तर मग सांग बालिके कथा म्हणजे काय?
-एक प्रवास ज्याला सुरूवात मध्य शेवट असेल.
-आता मला झोप आली. तरीही सांगते सुरूवात मध्य आणि शेवट अशी व्यवस्थित मांडणी असली तरच कथा होते असं नाही. या मांडणीशिवायही कथा होऊ शकतेच. सुरूवात मध्य आणि सुरूवात असंही असूच शकतं कथेमधे.
-पण तरी तो एका टप्प्याचा शेवट असतो त्यामुळेच तर कथा संपते तिथे.
-बर तसं. पण पुढे काय? कथा म्हणजे अजून काय हवं?
-वर्णन व्यक्तिरेखांचं, घटनांचं, भावनांचं..
-अजून?
-संघर्ष. वाद. कॉन्फ्लिक्ट
-त्याशिवाय कथा शक्य नाही?
-नाही.
-नक्की?
-नसावी म्हणजे..
-घटनांची साखळी, सुरूवात मध्य शेवट, प्रवास, वर्णन, संघर्ष इत्यादी म्हणजे कथा?
-स्वभावत: वादग्रस्त संकल्पना या विषयाचं लेक्चर नकोय.
-मग आता काय?
-लिहायला लागणे. पुढे जाणे.

पुढे म्हणजे कुठे? मितू हुशार होतीच. बुद्धिला, ज्ञानाला महत्व देणार्‍या घरात वाढली. भरपूर शिकली. लग्न, करीअर आणि आयुष्याचे सगळे निर्णय संपूर्णपणे मितूवर सोपवून ‘तुझ्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठींबाच असेल’ असं आनंदाने सांगणार्‍या घरात तिचं व्यक्तिमत्व जोपासलं गेलं. या टप्प्यावर आलेल्या मितूचं आता पुढे काय करायचं? आता तिची वाट नरहरीपर्यंत कशी पोचवायची?

नरहरी पदवीपर्यंत शिकला. आजोबांची आंब्याची कलमं, काजू आणि शेती सगळंच बघायला लागला. पुढे घोळ नकोत म्हणून त्याला आजोबांनी वेळेतच त्याला बर्‍याच हिश्श्याचा मालकही बनवलं. तिच्या जन्मापासून नरहरी तिला ओळखत होता. दर सुट्टीतला तिचा खेळगडी होता. पण सुट्ट्या सोडून नरहरीचा आणि मितूचा संपर्क संदर्भातूनच येई.

अश्या नरहरीला मितूची अपरिहार्यता कसं बनवायचं?

असं काहीतरी व्हायला हवं ज्यात मितू उध्वस्त होऊ शकेल. ज्यात नरहरीचा हात असेल आणि तरीही नरहरीच तिला सावरेल. असं झालं तरंच नरहरी मितूची अपरिहार्यता बनेल.

मितू कशाने उध्वस्त होईल? आईवडिलांची, नशिबाची, सधनतेची, उत्तम शिक्षणाची साथ लाभलेली मुलगी नक्की कश्या प्रकारे किंवा कश्यामुळे उध्वस्त होऊ शकते? एखादी मुलगी कश्याने उध्वस्त होईल? कोणीही व्यक्ती कशाने उध्वस्त होईल?

कुठल्याही व्यक्तीला जवळच्या काही व्यक्ती असतात. काही अगदी हृदयाशी बाळगलेल्या वस्तू, वास्तू, घटना असतात. अश्या व्यक्ती आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू, वास्तू, घटनाच नष्ट झाल्या, खोट्या ठरल्या तर अतीव तुटलेपण येऊन माणूस उध्वस्त होऊ शकतो.

प्रत्येक व्यक्तीच्या काही धारणा असतात, काही गोष्टींवर विश्वास असतो. या धारणांवर, या विश्वासांवर माणूस आपलं आयुष्य आखत असतो. या धारणाच फोल ठरल्या, आपण ज्यावर विश्वास टाकला त्या गोष्टीच पोकळ निघाल्या तर पायाच निखळल्यासारखा माणूस उध्वस्त होतो.

एखादा भयंकर आघात व्यक्तीला उध्वस्त करू शकतो जसे की अपघातात एखादा अवयव जाणे किंवा मुलगी असेल तर तिच्यावर बलात्कार होणे.

आईवडिलांची, नशिबाची, सधनतेची, उत्तम शिक्षणाची साथ लाभलेली मुलगी या सगळ्यात संपूर्ण उध्वस्त होईल? बलात्काराने संपूर्ण उध्वस्त होईल? तिची झगडण्याची उर्मी नष्ट होईल? एखादी व्यक्ती केवळ अपरिहार्य म्हणून ती गळ्यात बांधून घेण्याइतकी उध्वस्त होईल?

मितू कशाने उध्वस्त होईल?

मितूवर बलात्कार झाला तर ती नक्कीच जखमी होईल. तिच्या उडण्याच्या वेगाला खीळ बसेल पण थोडीशीच. आईवडील, आजोबा, बुद्धी सगळ्याच्या मदतीने ती सावरेल त्यातून. अजून प्रगल्भ होईल. पण संपूर्ण उध्वस्त होणार नाही. नरहरीच सावरू शकेल इतकी उध्वस्त होणार नाही.

पण बलात्काराबरोबरच किंवा बलात्काराशिवायही आईवडिल, आजोबा नाहीसे झाले तर? जखम खोल असेल अजून. वेळ लागेलच. पण सावरेल. त्यातून बुद्धी नाहिशी कशी होईल? ती असतेच ना.

म्हणजे या सगळ्याबरोबरच आयुष्य ज्यावर आखलंय त्या धारणा, ते विश्वास कोलमडायला हवेत. कोणीतरी जवळचं एकदम उलटं फिरायला हवं. उलटून सपकन वार केल्यासारखं फिरायला हवं. आता नरहरीच तिला उध्वस्त व्हायला कारण व्हायला हवा तर तोच उलटा फिरायला हवा.

नरहरी उलटा फिरेल म्हणजे काय घडेल? नरहरी मुळात आहे तरी कसा?

मितू अगदी तान्ही असताना नऊदहा वर्षांचा नरहरी तिला खाडीतल्या धक्क्यापासून डोंगरातल्या घरापर्यंत अलगद घेऊन आला. त्याच अलगदपणाने त्याने तिला खेळवलं असणार. आठ नऊ वर्षाने लहान असलेल्या मितूशी त्याचं कधी भांडण झालं नसणार. छोट्या मितूने हट्ट केले असतील तर नरहरीने पुरवले असतील. मितूचे पाय दुखले तर नरहरीने पाठुंगळी घेतलं असेल. आजोबांची शिस्त, शाळा, कामं या सगळ्यातून वर्षभर तो मितूची वाट बघत असणार आणि सुट्टीच्या काळात नरहरीचं शेपूट असणार छोटी मितू.

नरहरी अगदी लहानपणी आईच्या हाताला धरून आजोबांच्या गावात आला त्यानंतर मोठा होईतो त्याने गाव पण कधी सोडलं असेल की नाही कुणास ठाऊक. आजोबांनी कधीही जाणवू दिलं नसलं तरी आपण आश्रित आहोत आणि तरीही त्यांनी आपलं पालनपोषण, शिक्षण सगळं यथाशक्ती केलंय याची जाणीव नरहरीला असणारच.

मितू काय असेल नरहरीसाठी? दरवर्षी मुंबईहून येणारं धमाल मजेशीर गाठोडं? छोटी मैत्रिण जिची सगळीकडे हुंदडताना काळजी घ्यायला हवी अशी? खेळगडी? की मालकांची नात? दरवर्षी मितू त्याच्या जगाबाहेरचे अनुभव गोळा करून घेऊन त्याला येऊन सांगत असेल. दर वर्षी तिच्याकडच्या गमतींची पोतडी मोठी होत गेली असेल. गाव, झाडंमाडं, शाळा यापलिकडे आपलं जग वाढतच नाहीये हे नरहरीला कधीतरी टोचलं असेल का? त्याची खंत वाटली असेल? किंवा थोडा हेवा मितूचा?

मितू मोठी होत गेल्यावर नरहरी काय विचार करत असेल तिच्याबद्दल? तेव्हाही ती छोटी मैत्रिण असेल? तेव्हाही तेवढंच साधंसोपं राह्यलं असेल? मितूच्या जन्मापासून मितू गावात सुट्टीला येण्याची वाट नरहरी दरवर्षी पहायचा. ओढ होतीच. जीव होताच त्याचा मितूवर. मितू मोठी झाल्यावर तिचा हेवाही वाटत असेल, उत्सुकताही वाटत असेल आणि ओढही. आणि थोडाफार हक्क? हक्क वाटत असेल त्याला तिच्यावर?

मितूचं आभाळ मोठं मोठं होत चाललेलं बघून नरहरीला आनंद होत असेल पण आपण तिच्या जगाचा भागच नाही आहोत, केवळ ठिपक्याइतकेही उरणार नाही आहोत याची जाणीव त्याला त्रास देत असेल? हो बहुतेक. पण या जाणिवेपोटी तो मितूला कायमचं बांधून घालण्याइतका, तिचे पंख कापण्याइतका निर्दय बनेल? तो स्वत:हून कदाचित नाही बनणार पण कुणीतरी त्याला तसं बनवलं तर? कुणी म्हणजे कोण?

आता या कुणीतरीचं उत्तर शोधायचं तर नरहरीची माणसं शोधावी लागतील. आजोबा, आजी, नरहरीची आई ही त्याची अगदी पहिली माणसं आणि कदाचित गावातली काही मित्रमंडळी. या यादीतून आजी आजोबांना काढायला हवं कारण त्याने कथा अगदीच अतर्क्य होत जाईल. आजी, आजोबा आपल्याच एकुलत्या नातीला अडकवून ठेवण्याइतके निर्दयही नाहीत आणि पारंपारीक तर त्याहून नाहीत. मग राह्यली नरहरीची आई आणि गावातली मित्रमंडळी. नरहरीच्या आईला मुलाच्या भविष्याची चिंता सतावत असणार. पण आजोबांनी त्याला त्याचा हिस्सा वेळेवारी तोडून दिलेला असल्याने तो काही प्रश्न उदभवत नाही. नरहरीचं लग्न हा मात्र तिच्यासाठी महत्वाचा विषय. ते मितूशीच झालं तर उरलेल्या हिश्श्यावरही नरहरीची मालकी येइल असं काहीतरी तिच्या डोक्यात घोळत असेल तर? थोडक्यात नरहरीच्या आईला मालिकांच्यामधली कडवट आणि कारस्थानी खलनायिका बनवायचं.

तशी ती झाली की ती नरहरीच्या मनात मितूशी लग्न हा किडा सोडणार. आजोबांना त्याची कुणकुण लागली तरी नरहरीवर आणि मितूवरही विश्वास असल्याने ते स्वस्थ बसणार. पण तो किडा नरहरीच्या मनात प्रचंड घाणेरड्या प्राण्याचे रूप घेणार. नरहरीचा मितूवरचा जीव, मितूबद्दलची ओढ हे एका विचित्र वेडाचे रूप घेणार. पण हे सगळं मितूसाठी ‘उलटं फिरून सपकन वार’ प्रकारातलं होण्यासाठी मितू नरहरीबद्दल नक्की काय विचार करते हे स्पष्ट होणं महत्वाचं आहे.

मितूचा तो संरक्षक, सुट्टीतला खास मित्र इतका खास की लहानपणी ती त्याचं शेपूटच असावी सुट्टीत. हे झालं पण पुढे मितू मोठी झाल्यावर काय? तिचाही जीव असणारच त्याच्यावर. त्याला पर्याय नाही. सगळ्या शहरात वाढलेल्या आणि गावात मुळं असलेल्या, गावी सुट्ट्यांपुरतेच राह्यलेल्या मुलामुलींप्रमाणेच मितूसाठीही गावची प्रत्येक गोष्ट ही प्रत्यक्ष स्वर्गातून अवतरल्यासारखी असणार. माणूस म्हणून घडत असतानाच्या काळातल्या सुंदर आठवणी, शिकवण इत्यादी सगळंच. या सगळ्याचा आजीआजोबांच्याइतकाच महत्वाचा भाग नरहरी. त्यामुळे मोठी होत गेल्यावरही तिच्यासाठी तो मित्रच राहणारही. असा मित्र की जो आपल्याला कधीच दगा देऊ शकत नाही. कधीच विरूद्ध वागू शकत नाही. आपण कुठेही गेलो जगाच्या पाठीवर तरी ह्या मित्राचं आपल्यावर लक्ष असणार त्यामुळे आपण कधी चुकीचं वागून आयुष्याचा खेळखंडोबा करून घ्यायचा नाही आणि आपल्या मित्राला अपयश द्यायचं नाही. असं काहीतरी मितूला त्याच्याबद्दल वाटायचं किंवा म्हणजे वाटत असणार.

आता मी योग्य वळणावर आलेय. नरहरी आणि मितूला एकमेकांबद्दल नक्की काय वाटतं, नकी काय अपेक्षा होत्या/ आहेत हे एकदा शोधून काढल्यावर सप्पकन वार करणं सोपं आहे.

मितूचं आकाश वाढत जातंय म्हणल्यावर नरहरी ते कापायचा, मितूला आपल्यातच अडकवायचा प्रयत्न करणार. किंवा त्याची तशी इच्छा तरी असणार. ती समोर आल्यावरच मितू सटपटणार. ती इच्छा पूर्ण होत नाहीये म्हणल्यावर नरहरी घाईघाईत अस्वस्थपणे अशी काही कृती करणार ज्याने मितू मुळापासून उखडून निघेल. आणि त्याच क्षणाला नरहरीला आपली चूक लक्षात येईल. तो तिला त्या धक्क्यातून बाहेर काढेल. मग कश्यातरी प्रकारे मितू स्वत:ला त्याच्याशी बांधून घेईल.

इथपर्यंत मी माझा विचार खेचला एकदाचा. आता कथेला व्यवस्थित दिशा मिळाली होती. जिथे जायचं तिथपर्यंतची सगळी महत्वाची स्टेशनं ठरवून झाली होती. आता फक्त विस्तार की आलीच कथा हातामधे. मी थोडसं हुश्श केलं. दिवस बराबिरा गेला.

बिंदू जोडून चित्र पूर्ण करायला बसले. एका बिंदूकडून दुसर्र्‍याकडे जायचं तर सहज वाटलं पाहिजे पण अगदी आधीच कळून येइल इतकं सोपंही नसायला हवं. लोकांना वाचताना ‘वाटलंच मला’ किंवा ‘असं होणार हे कळतंच होतं’ असं नाही वाटलं पाहिजे. हे ही सोप्पं नव्हतं तेवढं.

नरहरीची आई कडवट बाई बनून आली कागदावर. नरहरीच्या मनात ती विष पेरू लागली. मितूशी लग्न करून सगळी इस्टेट नरहरीची व्हावी यासाठी गणितं मांडू लागली. नरहरीवर त्याचा परिणाम होऊ लागला. त्याचं मन मितूकडे दुप्पट वेगाने ओढ घेऊ लागलं. आजोबांना शंका आल्यावर ते चिडचिडायला लागले.

--------------

मितू परदेशात शिकायला जाणार. कधीच आपल्या हातात लागणार नाही हे कळल्यावर नरहरी तळमळला. नरहरीने शोधाशोधीच्या खेळाची मदत घेतली. खुणा पेरून ठेवल्या योग्य ठिकाणी की मितू त्याच्यापर्यंत पोचेल. त्याच्यापर्यंत पोचली मितू की तो तिला सांगणार होता आपल्या मनातलं सगळं. कसंही का होईना आपल्या मनासारखं करून घेणारंच होता. आजोबा, मितूचे आईबाबा कोणाकोणाची फिकीर करणार नव्हता. मितू त्याला हवीच होती. मितू बिचारी भोळी भाबडी तिला कशाची शंका येणार? तिला काय कल्पना नरहरीच्या मनात असं काही असेल? ती बिचारी त्या शोधाशोधीच्या खेळात सड्यावर पोचली. सड्यावरच्या देवांची पूजा आता नरहरीच करतो हे माहित होतं तिला. नरहरी होताच तिथे. पण नेहमीसारखा नव्हता.

--------------

एका बिंदूपासून सुरू केलेली रेघ दुसर्‍या बिंदूला नेऊन जोडताना शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्याला कळलं नाही पाहिजे कुठे चाललोय ते. पण तो बिंदू जोडला गेला की ह्या बिंदूशिवाय पर्यायही नाही याची खात्री पटली पाहिजे. उगा खेचल्यासारखी रेघ जाता कामा नये. इथे मात्र वेगळंच दिसत होतं. खेचाखेच प्रचंड होत होती.

-इतकी शाळा केलीस माझी. दुसरं काय होणार!
-मितू इतकी का फिस्कारतेय?तुझ्याभोवतीच तर सगळं रामायण घडतंय आणि तुझी शाळा?
-नाहितर काय? हुशारी, बुद्धी आहे म्हणे मला? आणि तरी विशीबाविशीतली मी संस्कृत नाटकाच्या अल्लड षोडशा नायिकेसारखी मी कशाचाही सुतराम क्लू लागणार नाही अशी भोळी भाबडी?

एक तुच्छ कटाक्ष टाकून मितू कथेतल्या व्यक्तिरेखा जिथे गायब होतात तिथे गेली.

कथा हातात आल्यासारखी वाटली होती आणि गेली निसटून. आली नव्हतीच कथा हातात मुळात त्यामुळे निसटायला काही नव्हतंच.
मग आता?
आता मितूला शोधणे. तिने मूर्खात काढलंय आणि आपण तेवढ्या मूर्ख नाही असा दावा आहे तर शोधा.
एवढा वेळ काय केलं मग?
त्याला घटना असं म्हणतात. फक्त घटना तपासणं, आखणं म्हणजे व्यक्तिरेखा धुंडाळणं नव्हे.

काय आहे मितू? मोकळ्या वातावरणात वाढली आणि तिच्याकडे बुद्धी आहे. विचारांच्यातला प्रचंड मोकळेपणा टॉनिक म्हणून मिळाल्यावर कशी वाढू शकतात मुलं? कुठल्याच विचारांवर बंधनं नाहीत. कुठल्याच प्रयोगांना आडकाठी नाही. प्रत्येक गोष्टीचा भरपूर विचार करण्याचं मात्र बंधन. तरीही चुकायची, पडायची पूर्ण मुभा. हे सगळं आयुष्यातल्या शिक्षण, करीअर, समाजातला वावर, मित्रमैत्रिणी, छंद, लैंगिक कल, लग्न, कपडे, नटणेमुरडणे सगळ्या सगळ्यासाठी तसंच.

पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अमाप प्रयोग केलेले असणार. अनेक अनुभव घेतलेले असणार. मग भाबडेपणा उरला असेल?
तरी वय शेवटी बाविस-तेवीसचंच ना. जग बदलण्याचा, जिंकण्याचा रोमँटिसिझम शिल्लक असेल पण नरहरीच्या मनात काय ते समजूच नये असा भाबडेपणा नाहीच ना?
ते समजल्यावर धक्का बसेल ना पण?
कदाचित बसेल कदाचित नाही पण मुळापासून उन्मळून पडण्याइतका नाही. पंधरासोळाची असल्यापासून शंका आलीच असणार.
पण एवढा विचार करायला बाकीच्या जगातून वेळ तर मिळाला पाहिजे. वीसबावीस वयाला गोष्टी समजून आल्यावर कुणाला आपल्याबद्दल काय वाटावं यात आपण काही करू शकत नाही पण आपण नकार देऊ शकतो ही समज असणारच मितूकडे.
पण मग नरहरीने जबरदस्ती केली असेल तर?
तिचा संताप होईल. त्याचा खून करावासा वाटेल. आजोबांना सांगून ती त्याला हाकलून लावायला बघेल. पण अपरिहार्यता म्हणून आयुष्यभर गळ्यात वागवणार नाही.
कदाचित जे समजून आलंय ते नकोसं नसेलच तर?
छे मितूला नरहरी कसा काय आवडेल?
आवडेलच असं नाही पण त्याला आपण हवे आहोत यात इगो सुखावत असेल तर?
इतकी इन्सिक्युअर नाहीये मितू. किंवा मग त्याला आपण हवे आहोत हे कळल्यावर आवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल तर?

जर चुकून कुठे मितूलाही नरहरी आवडू लागला असेल तर मग तो तिची अपरिहार्यता का बनेल?
अनेक अपरिहार्य जोडपी बघत नाही आपण?
पण कथेचा मुद्दा तो आहे का?
तो तिला अगदी पार ‘प्रेमात बुडणे’ अश्या प्रकारे आवडत नसेल पण बघू तरी या नात्याचं काय होतंय म्हणून ती प्रयोग करत असेल?
आणि आपण प्रयोगातलं बाहुलं आहोत हे नरहरीला समजल्यावर नरहरी दुखावून वार करेल?
प्रयोगात सगळ्याच गोष्टी येऊन गेल्यावर मग होईल तो वार मितूवर नसेल तर स्वत:वर करेल नरहरी. कारण मितूवर वार करता येण्यासारखं काही उरलं नसेल.

मितू भोळीभाबडी नाही असं ठरलंय. म्हणजे तिला खलनायिका बनवायलाच हवी असं नाही.
जर काहीतरी उलथापालथ करणारं घडवायचं असेल तर कुणीतरी बिघडायलाच हवं.
कोणीही बिघडलेलं नसलं तरी उत्पात घडू शकतातच की.

मितू आणि नरहरी दोघंही बिघडलेले नाहीत. दोघेही दुष्ट नाहीत आणि भोळेभाबडेही नाहीत. एकमेकांबद्दल ओढ आहे आणि नाहीच्या मधली त्यामुळे एकत्र येणं हे खरंतर तसं गरजेचं नाही. तरीही काहीतरी उत्पात होऊन ते पुढे जाऊन एकत्र आहेत. एकमेकांना छळण्यासाठीच एकत्र असावेत अशी दाट शक्यता. पण नातं बिघडल्यानंतरही निभावण्याची अपरिहार्यता हा या कथेचा मुद्दाच नसल्याने तिकडे जायची गरज नाही. मग कथेचा मुद्दा काय? मितू नक्की कोण? नरहरी नक्की काय विचार करतोय?

केलेले सगळे विचार, बांधलेले सगळे आडाखे, आखलेले सगळे बिंदू फुकाचे वाटायला लागले. मितू आणि नरहरी मला ओळख पण देईनासे झाले. इतके की त्यांची नावं मितू आणि नरहरीच आहेत की अजून काही हा गोंधळ व्हायला लागला. त्यांच्याबद्दल लिहायला मजाच येईनाशी झाली. बंदच केली मी वही.

स्वत:च्या लिखाणाविषयी एकदम रोमँटिक दु:ख होऊन मी कथा लिहूच शकणार नाही अशी माझी खात्री पटली. त्यामुळे यापुढे कधीही कथा लिहिणार नाही अशी उगाच प्रतिज्ञाही मी केली. बाकी आयुष्याला सुरूवात केली. पाह्यलं तर सगळं जग सुखाने चालत होतंच.

मग एक दिवस परत कोर्‍या वहीने खुणावले आणि मी नव्याने कथा लिहायला सुरूवात केली.

--समाप्त

- नीरजा पटवर्धन

प्रकार: 

क्षमा करा, पण वाचताना कंटाळा आला.

इतके की त्यांची नावं मितू आणि नरहरीच आहेत की अजून काही हा गोंधळ व्हायला लागला.>>> तुम्हालाच नाहि तर आम्हाला कसे समजेल कि नक्की काय चालयय!

कथेच्या शेवटच्या "स्वत:च्या लिखाणाविषयी ...." पासुन चालु होणार्या परिच्छेदाबद्दल सिरियसली विचार करावा आणी एक्दा केलेली प्रतिज्ञाही पाळावी! हि सिरियस विनंती आहे , ह्यात sarcasm वगैरे काहि नाहि

मी पण वाचली होती हि कथा, त्या अंकात. लक्षात होती, अजून.

( प्रकाशित झाल्यानंतर, सहा महिन्यानंतर ती कुठेही प्रकाशित करायची मुभा असते ना ? परत परवानगी का घ्यावी लागली ? )

एक वर्षानंतर मुभा असते.
परवानगी घेणे मला योग्य वाटले म्हणून मी घेतली.

खूप सुंदर कथा. लेखिकेचे स्वःताशी असलेले संभाषण, मनोगत आवडले.
मितू, आणि नरहरीच्या कथेतले तुकडे खिळवून ठेवणारे.

मी माझ्याही नकळत विचार करायला लागलो होतो की ही कथा कशी बरं पुढे नेता येईल...सॉलीड पेच पडलाय...तिथेच तुमच्या लिखाणाला दाद दिली...
मस्त कन्सेप्ट...भारी जमलाय...

दर महिन्याला प्रसिद्ध होणार्‍या अंकांत प्रसिद्ध होणारे लेख सहा महिने ऑनलाइन प्रकाशित करू नयेत, अशी अपेक्षा असते. दिवाळी अंकांतील लेखांसाठी हा कालावधी एका वर्षाचा आहे.

आपण जन्म घातलेल्या पात्राच्या प्रेमात लेखिका [इथे मुद्दाम लेखिका म्हणतो] पडते तेव्हा ती अपरिहार्यतेपणे 'तिला' कधी दुखवू इच्छित नाही. मितू कितीही डावी वागली तरी तिचे तसले वागणेही मुळात नरहरी वा तत्सम व्यक्ती वा घटनेमुळे का झाले आहे याचे 'जस्टिफिकेशन' लेखिकेला द्यावे लागते आणि मग इथे पात्रांचे सुखदु:ख हे लेखिका अलिप्तपणे पाहू शकतच नाही. नीरजातील लेखिका साफ स्पष्ट कबुलीच देते की "....रोमँटिक दु:ख होऊन मी कथा लिहूच शकणार नाही अशी माझी खात्री पटली...". या ठिकाणी लेखिकेपेक्षा 'कथा' मोठी होऊन बसली, जे होणे लेखिकेच्या क्षमतेवर अन्याय करण्यासारखेच आहे.

पु.ल. एकदा खानोलकरला म्हणाले, "अरे, दोन पायांनी धड असलेल्या त्या अच्याला टॅक्सीखाली घालून पांगळा रे कशाला केलास ?" यावर खानोलकरांनी थंडपणे पु.लं.ना उत्तर दिले, "मी नाही केला. तो झाला." आपण निर्माण केलेल्या पात्रांच्या भाळी जे लिखित सटवाईने लिहिले आहे त्याचे भोग त्या पात्रानेच थेट भोगले पाहिजेत, तिथे लेखक/लेखिकेच्या प्रेमाला आपलेपणाला स्थान नसते. मितू असो वा नरहरी....दोघांच्याही प्रवासात जे काही घडू पाहात आहे ते घडताना लेखिकेने आपल्या भावनेला तिथे आणले नाही तरच ते दोघे तिला आपली ओळख करून देतील. आज लेखिका म्हणते, "...त्यांच्याबद्दल लिहायला मजाच येईनाशी झाली. बंदच केली मी वही....", बंद करण्याची कारणमीमांसा लेखिकेने केल्यास तिच्या लक्षात येईलच की दोन सुरातील नाती जाणण्यासाठी आपण साज आणि सूर दोन्हीपासून लांबच राहिले पाहिजे.

[काहीसे अवांतर : तुमची कथा होऊ पाहाणारी कथा वाचताना का कोण जाणे मला 'अनिल' यांची 'केळीचे सुकले बाग असुनिया पाणी....कोमेजलि कवळी पाने असुनि निगराणी...." आठवत गेली, समोरही उभी ठाकली. हे का व्हावे, त्याची तर्कसंगती नेमकी काय, हे मला या क्षणी तरी सांगता येणार नाही. पण पुढे त्याबाबत जरूर विचार करीन.]

अशोक पाटील

Katha purna zalyavar nakki update kara..

English madhe lihilyabaddal kshamasva...

मी माहेर मधेच वाचली होती. माफ करा पण मला तरी विस्कळीत वाटली. कथेला काहितरी आकार येईल अशी अपेक्षा शेवटपर्यंत धरली पण फोल ठरली.
बहुतेक हा लेखनप्रकार नवा असावा आणि माझ्या पचनी पडला नाही. Happy

कथा आवडली.
पारितोषिके मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

अशोक, तुमचा प्रतिसादही खुप विचार करायला लावणारा आहे.

अशोककाका, तुमचा विस्तृत प्रतिसाद थोडा अजून स्पष्ट कराल का? मला नीटसं कळलंय असं वाटत नाहीये.

Pages