गर्जा महाराष्ट्र माझा! - रंग सोन्नलगीचे - लैभारी.

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 September, 2012 - 16:25

---------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
कंपुचे नाव :- लैभारी.
लेखाचे नाव :- रंग सोन्नलगीचे.

सहभागी मायबोलीकर
विशाल कुलकर्णी
मल्लिनाथ करकंटी
मुग्धा कुलकर्णी
स्वप्ना लाड
कांचन कुलकर्णी

---------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------

२००६ मधली घटना. नुकताच फुग्रो ओमनीस्टारला जॉइन झालो होतो. काही मुलभूत प्रशिक्षणासाठी म्हणून हॉलंडला कंपनीच्या मुख्यालयात हजर झालो होतो. दोन महिन्यासाठी तिथे राहावे लागणार होते. पाच दिवसाचा कामाचा आठवडा असे. शनिवार-रवीवार बुड उचलून भटकायला निघायचो. दुसर्‍या महिन्याच्या अश्याच एका रविवारी अ‍ॅमस्टरडॅमच्या 'वॅन गॉ' संग्रहालयात तळ ठोकलेला होता. इतक्यात फोन वाजला, खरेतर ग्लोबल रोमींग असल्याने उचलायला मन धजावेना, पण फोनच्या स्क्रीनवर झळकलेले नाव वाचुन राहवेना. फोन 'राजा साळुंकेचा होता. माझा जिवश्चकंठश्च मित्र. मनावर आणि खिश्यावर दगड ठेवुन फोन उचलला.

" काय करायला बे भाxxx? फोन उचलाला येवडा वेळा लागालाका तुला? (इथे टायपो नाहीये, आमच्याकडे उचलायला, बोलायला, लागायला म्हणताना मधला 'य' कृष्णार्पण करण्याची पद्धत आहे. Wink ) दात आले का बे गांX ? "

मी अक्षरशः मोहरलो. तसे घरच्यांशी बोलणे व्हायचे अधुन्-मधुन. पण खास सोलापूरी भाषेतल्या त्या मायेच्या Wink शिव्या ऐकताना अगदी मस्त वाटले. मी राजाला ती सगळी वाक्ये रिपीट करायला लावली. आणि नंतर....

"हॉलंडात आलो बे फोकलीच्या. रोमींगमध्ये आहे. बंद कर, नायतर परत आलो की 'देत्तो बग कडेलकनी एकच कनपट्टीखाली' ! "

आणि नंतर ३-४ वाक्ये त्याची, ३-४ वाक्ये माझी झाली असतील. प्रत्येक वाक्यात शिव्यांचा आणि स्पेशली 'बे' चा रतीब होता. रोमींगमध्ये असल्याने फारसे ताणले नाही राजाने, फोन बंद झाला. मी मागे वळलो, मागे एक चाळीशीचा तरुण उभा होता. चेहरा-मोहरा भारतीय.

"सोलापूरी का बे ?"

माझा चेहरा उजळला.

"तू पण?"

"ते फोनवरचं प्रेमळ संभाषण ऐकलं तेव्हाच ओळखलं हा भाड्या सोलापूरचा दिसतोय."

काय गंमत बघा, दिड महिना सोलापूरी शिव्यांना अंतरलेला मी, तिथे अ‍ॅमस्टरडॅममध्ये एक सोलापूरी भेटावा आणि त्याने कसल्याही औपचारिकता न बाळगता झक्कास आमच्या सोलापूरी भाषेत शिव्यांचा रतीब सुरु करावा. यासारखं भाग्य नाही. अर्थात त्यातली मजा अनुभवण्यासाठी तुम्ही सोलापूरी असणं गरजेचं आहे. 'बे', भाड्या, भाडखाव, गांX या शिव्या आमच्याकडे प्रिय, जिगरी, जवळचा या अर्थाने घ्यायची पद्धत आहे. त्यामुळे सोलापूरी माणसाला वाक्यात या पैकी एखादी तरी शिवी लागतेच लागते, नाहीतर उगीचच चांदीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगाची फुळकवणी आमटी प्यायला दिल्याचा फील येतो.

आमच्या सोलापुरात बे सारखंच ’मारणे’ हे क्रियापद एक लै मारलं जातय बगा, म्हंजे वापरलं जातं. कसं ? म्हणजे पहा, आम्ही गाडी चालवत नाही, गाडी मारतो. फोन, मिस कॉल सुद्धा मारतो. रंग लावत नाही, रंग मारला जातो. ’ए चल बे गाडी तु मार आज.’, ’काम संपल्यावर कॉल मार बे’, ’काय बे, नविन रंग मारलायस काय बे घराला?’ ’अरे कालच मी एक फोटो प्रिंट मारलो बे.’ ’अबे बोर नको मारुस’! हे क्रियापद चालवुन पहा तुम्हीही एकदा Wink

तर असा आमचा स्वभाव गुण आहे. उगीचच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोखठोक पाहीजे. मग भले कुणी अम्हाला फाटक्या तोंडाचा का म्हणेना !

पण केवळ फटकळपणा हा सोलापूरचा गुणधर्म नव्हे. आजकाल सगळीकडे सोलापूर म्हणले की तिथे वाक्या-वाक्यात पेरल्या जाणार्‍या शिव्या, शेंगाची चटणी आणि टेक्सटाईल्सचा व्यवसाय या तीन मुद्द्यावरच चर्चा येवून थांबते. माझ्यासारख्या अस्सल सोलापूरी माणसाला ही गोष्ट अपमानास्पद वाटते. कारण माझं सोलापूर एवढ्यापुरतंच मर्यादीत नाहीये. सोलापूर म्हणलं की अनेक गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे. त्यात सोलापूरच्या भौगोलिक परिस्थीतीबरोबरच तिथली खाद्यसंस्कृती, कन्नड, मराठी, तेलगु आणि हैदराबादी घाटणीची अफलातून उर्दुमिश्रीत हिंदी भाषिक माणसे या सर्वांना बरोबर घेवुन, त्यांचा समतोल साधत प्रगतीपथावर मार्गक्रमण करणारी सोलापूरची खर्‍या अर्थाने सहिष्णु मानवी संस्कृती, आजुबाजुची देवस्थाने, सोलापूरातील शैक्षणिक संस्था, स्वातंत्र्याच्या चळवळीत सोलापूरचा सहभाग, चार हुतात्म्यांची अमरगाथा या बरोबरच सोलापूरचा मानबिंदु आणि ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाचाही विचार होणे अत्यावश्यक आहे. चला केवळ गप्पा मारण्यापेक्षा, गप्पा मारत मारत एक आढावाच घेवुयात सोलापूरच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा !
सुरुवात करुयात सोलापूरची अमरगाथा सांगणार्‍या पोवाड्यापासून....

वंदन करुनी भूमातेला, भाळी टिळा लावितो,
स्वातंत्र्याच्या होमी पडले त्यांची कथा सांगतो, सांगतो, त्यांची कथा सांगतो.
बीज पेरिले स्वातंत्र्याचे, वृक्ष आजि दिसतसे,
त्या वृक्षाला निजरक्ताचे पाणी घातले कसे? सांगतो, पाणी घातले कसे.
ऐक रसिका ऐक कथा हि प्राण आणुनी कानी,
देह अर्पिला निष्कामाने स्वातंत्र्याच्या रणी सांगतो त्यांचीच मी कहाणी

हेरंबा गणनायका ओ ssssssssssssssssssss
हेरंबा गणनायका, गौरीबालका, जगतचालका, नमितो तुजला मी त्रिवार,
भक्ती मनी दाटे अपरंपार, शाहीर करती जयजयकार हो जी जी......
शाहीर करती जयजयकार हो जी जी.....

ही नगरी सोलापूर ........ हो sssssssssssssssssssssssss हो
ही नगरी सोलापूर, माती कणखर, देव सिद्धेश्‍वर,
तयाची किरपा गावावर
शिवशंभुचा अवतार, म्हणुनी त्याचा जयजयकार............हो जी जी
रूपाई भवानी आहे सदा पाठीशी हो जी जी ....
संकटी रक्षितो माझा देव खंडोबा हो जी जी ....
सावळी विठाई चंद्रभागेच्या तीरी हो जी जी ...
तिचे पुत्र खरे गुणवंत, तसे शिलवंत, आणि यशवंत
जगी ठरले ....
मृत्यूला जिंकून ते उरले
हुतात्मे धन्य धन्य झाले हो जी जी......
हुतात्मे धन्य धन्य झाले हो जी जी......

हा पुर्ण पोवाडा तुम्हाला इथे वाचता येइल आणि इथे डाउनलोड करुन ऐकता येइल.

सोलापूर...माझं सोलापूर...
सिद्धेश्वराची पुण्यनगरी सोलापूर..
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच इंग्रज सरकारला हाकलून देऊन ९ ते ११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगलेल्या बहाद्दर जनतेचे सोलापूर.
देशात पहिल्यांदा तिरंगा महानगर पालिकेवर फडकला तो सोलापुरच्या महानगर पालिकेवर.
मार्शल लॉच्या दरम्यान आपल्या प्राणांचं बलिदान केलेल्या चार हुतात्म्यांचं सोलापूर...
सोलापूरी चादरीसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर...
एका बाजुला तुळजापूरची आई भवानी आणि एकीकडे अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ माऊलींच्या कृपाछत्राखाली वसलेले सोलापूर
'भेटेन नऊ महिन्यांनी' या अजरामर ओळी लिहिणार्‍या कवि कुंजविहारींचे सोलापूर..
चीनच्या सारख्या परक्या देशात भारताचे नाव उंच करणारे भारताचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणिसांचे सोलापूर !
'हटा तटाने पटा रंगवूनी जटा धरीशी का शिरी, मठाची उठाठेव का करी?" असे म्हणत शुभरायबुवाची कान उघाडणी करणार्‍या शाहीर रामजोशींचे सोलापूर.....
समोरच्या पडद्यावर अमिताभ असो वा मिथुन की अजय देवगण असो, चिरंजिवी असो वा महेशबाबु की रवी तेजा असो, अर्नॉल्ड असो वा जॅकी चॅन वा टॉम हँक्स असो... आमचं नातं चित्रपटांशी म्हणत, यच्चयावर सर्वच भल्या-बुर्‍या चित्रपटांना डोक्यावर घेणार्‍या चित्रपटवेड्यांचं सोलापूर...
एखाद्याला जिव लावला की त्याच्यासाठी जिव द्यायला आणि वेळ पडल्यास घ्यायलाही तयार असणार्‍या दिलदार लोकांचं सोलापुर
मराठी, कन्नड, उर्दु मिश्रीत हैदराबादी हिंदी, तेलगु अशा अनेक भाषांनी सजलेलं सोलापुर
आमच्या सोलापूराबद्दल काय आणि किती बोलावं ....

थोडासा इतिहास...
असे मानले जाते की सोलापुर हे नाव सोळा गावांमुळे पडले. आदीलपुर, अहमद्पुर, चपळदेव, फतेपुर, जामदारडी, कळजापुर, खडरपुर, खंडेरवकिवाडी, मुहम्मदपुर, रानापुर, संदाळपुर, शैखपुर, सोलापुर, सॉन्नलगी, सोनपुर आणि वैदाकवाडी. पण कल्याणि काळातले श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या लेखातुन, त्यांचा साहित्यातुन असे कळते की आधी याला 'सोन्नलगे' म्हणायचे, ज्याचे नंतर 'सोन्नलगी' आणि त्या नंतर सोलापुर झाले. आर्यभट्ट, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव आणि ब्रहण्मणी असे कित्त्येकांनी राज्य केले. यादवांचे राज्य असे पर्यंत याला 'सोन्नलगी' म्हंटले जायचे. नंतरच्या काळात त्याचे 'सोलापुर' मध्ये रुपांतर झाले.

मोहोळ मध्यल्या कामती येते सापडालेल्या शके १२३८ च्या संस्कृत लेखात असा उल्लेख आहे की, यादावांच्या उतरत्या काळात याला 'सोनलिपुर' म्हंटले जायचे. सोलापुर किल्ल्यात सापडलेल्या दोन शिलालेखात दोन वेगे वेगळ्या नावांचा उल्लेख आहे. एका लेखात 'सोनालपुर', तर दुसर्‍या लेखात 'संदालपुर' म्हंटले जायचे. नंतर ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी याचे 'शोलापुर' केले, आणि नंतर त्याचे आजच्या नावात म्हणजे 'सोलापुर'त रुपांतर झाले.

सध्याचा सोलापुर जिल्हा हा अहमदनगर, पुणे आणि सातार्‍याचा भाग होता. १८३८, १८६४, १८७१, १८७५ आणि १९५६ अश्या विभागण्या होत होत १९६० मध्ये सध्याचा सोलापुर तयार झाला. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत.

सोलापूर म्हणलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि ग्रामदेवता आई रुपाभवानी ! खरेतर सच्चा सोलापूरकर सोलापुरला सिद्धेश्वर नगरी म्हणुनच ओळखतो, मग त्याचं मुळचं जुनं नाव सोन्नलगी असलं तरी. खुप पुर्वी साधारण १२ व्या शतकात सिद्धेश्वर नामक भक्ताच्या तपस्येवर प्रसन्न होवून श्री शिवशंकराने त्यांना दर्शन दिले. त्या नंतर सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूर शहरात अनेक ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केली. त्यापैकी पहिलं स्थान म्हणजे भुइकोट किल्ल्याच्या मागे तळ्यात वसलेलं श्री सिद्धेश्वर महादेवाचं मंदीर. सिद्धेश्वर यांनी स्थापना केली, म्हणुन इथे शिवालाही सिद्धेश्वर याच भक्ताच्या नावाने ओळखले गेले. श्री सिद्धेश्वर महाराजांनी पुढे जिवंत समाधी घेतली. सिद्धेश्वर मंदीरातच त्यांची संजिवन समाधी आहे. सोलापूरात मध्यवर्ती असलेलं श्री सिद्धेश्वराचं देखणं, मनोहारी आणि भर गर्दीत देखील नेहमी शांत असणारं मंदीर हा सोलापूरकरांच्या श्रद्धेचा आणि अभिमानाचा विषय असतो. एका भव्य जलाशयाच्या (तळ्याच्या) मधोमध असलेलं सिद्धेश्वराचं रम्य आणि निसर्गसुंदर देवस्थान हे सोलापूराचं शक्तीस्थळ आहे असं म्हटलं तरी त्यात गैर काही नसावे. सिद्धेश्वर मंदीराला लागुनच असलेला सोलापूरचा भुइकोट किल्ला आता फक्त "इमारत कभी काफी बुलंद हुआ करती थी" एवढं सांगण्याच्याच पात्रतेचा उरलेला आहे. आता किल्ल्यात महानगरपालिकेने बाग केलेली आहे. अर्थात आज तीदेखील कधी काळी खुप सुंदर होती असे म्हणायची वेळ आलेली आहे.

मार्शल लॉ

उगवत्या मराठी साम्राज्याची जेव्हा इंग्रज चर्चा करीत होते तेव्हा त्या निवडक जिल्ह्यांमध्ये त्यांनी सोलापूरचाही समावेश केला होता. त्यात शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूरने इंग्रजांना लढा दिला. १९व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे मध्यमवर्गीय लोकांमध्ये राजकीय आणि सामजिक जाणीवा वाढीस लागल्या होत्या तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर न्या. रानडे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी भारावून गेले होते. १९२० मध्ये जोमाने पसरलेल्या राष्ट्रीय चळवळीचा परिणाम सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्येही दिसून आला.लोकमान्य टिळकांनी १९२० मध्ये सोलापूरात दिलेल्या भाषणाचा हा परिणाम म्हणुन पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता..

गिरणी कामगारांची सरकार आणि भांडवलदारांविरुद्धची चळवळ जोर धरू लागली .यात ७ कामगार मृत्युमुखी पडले तर शेकडो जखमी झाले. गिरणी कामगारांनी केलेला हा हरताळ ही देशातल्या महत्त्वपूर्ण क्रांतीची नांदीच होती. १९३० मधील गांधीजींच्या दांडीयात्रेनंतर ६ एप्रिल १९३० रोजी सोलापूरातील म्युनसिपल कॉर्पोरेशन एक बिल संमत केले आणि राष्ट्रीय ध्वजाचे रोहण करण्यात आले. या घटनेनंतर सोलापूरात जे काही घडले ते इतिहासात सुवर्णाक्षरात लिहून ठेवले गेले आहे. ५ मे १९३० रोजी मध्यरात्री गांधीजींना अटक करण्यात आल्याची बातमी सोलापूरात पसरली. या विरोधात जनतेने मोर्चे काढले, देशभक्तीपर गीते गायिली. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा गिरणी कामगार कामावर गेले तेव्हा त्यांनी ही बातमी ऐकताच याविरुद्ध निदर्शने केली. गिरण्या बंद झाल्या, जनतेने रेल्वे अडविल्या, डब्बे जाळल, शिंदीची झाडे पाडली. यात मॅजिस्ट्रेट जखमी झाले, पोलिस स्टेशन जाळले. परंतु सायंकाळी सगळ्या नेत्यांनी शांततेचा मार्ग अवलंबायचे असे ठरविले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

८ मे १९३० रोजी सरकारने बजाज आनि नरीमन यांना अटक केली. नरीमन युवकांचा लाडका नेता होता.जनतेने या घटनेचा तीव्र निषेध केला. जगन्नाथ सिंदे आनि कुर्बान हुसेन यांनी या प्रिय नेत्यांच्या छायाचित्रांची मिरवणूक काढण्याचे ठरविले. आणि त्यांनी तसे केलेही. काही युवक शहरातील रुपाभवानी भागात शिंदीची झाडे पाडण्यास गेले. हे पोलिसांना कळताच त्यांनी गोळीबार सुरु केला. जेव्हा पोलिसांच्या गोळ्या संपल्या तेव्हा लोकांनी त्यांना पकडून त्यांच्या दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी लोकनेते मल्लप्पा धनशेट्टी तेथे आले आणि त्यांनी जनतेला शांत केले व कलेक्टर नाईटना लोकांच्या तावडीतून सोडविले. पण या गोष्टीची जराही जाणीव न ठेवता पोलिसांनी जनतेवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यात कितीतरी बायका मुले म्रुत्युमुखी पडले. तेथे शंकर शिवधर नावाचा नेता मृत्युमुखी पडला आणि तोच पहिला हुतात्मा ठरला. हे सगळे पाहून जनतेने सरकारी कार्यालये पेटविली, सरकारी कर्मचार्‍यांवर द्गडफेक केली. या सगळ्याकडे नाईट यांनी दुर्लक्ष केले. जेव्हा सगळे शांत झाले पोलिसांनी त्यांच्या गाड्यांमधून गोळीबार सुरु केला. दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत पोलिसांनी शहराच्या प्रत्येक गल्ली बोळांमधून गोळीबार केला. यात ५० निष्पाप जीवांचा बळी गेला.ह्या घटनेची सविस्तर माहिती रामभाऊ राजवाडेंच्या "कर्मयोगी" या साप्ताहिकात मिळेल(१० मे १९३०). या घटनेने संपूर्ण इंग्रज साम्राज्य हादरून गेले होते. मिनी जालियानवाला घटनेची छोटी आवृत्ती म्हणून ओळखल्या जाणारी सोलापूर मार्शल लॉ चळवळ हे संपूर्ण स्वातंत्र्य लढय़ातील एकमेव उदाहरण आहे. परंतु तरीदेखील त्याची इतिहासात फारशी दखल घेतली गेली नाही.

या सगळ्या प्रकारामुळे भयभीत झालेली जनता सोलापूर हे सुरक्षित ठिकाण नाही असे मानून सोलापूर सोडून स्थलांतरीत झाली. जवळ जवळ २५००० लोक सोलापूर सोडून निघून गेले.या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय नेत्यांनी सोलापूरला स्वतंत्र घोषित केले. ३ दिवस सोलापूर स्वतंत्ररित्या कार्यरत होते. स्वतःच्या यंत्रणेखाली जखमींची देखभाल केली गेली.सगळे अगदी स्वतंत्र निर्भीड!! अगदी अश्याच प्रकारची घटना १९७१ मध्ये पॅरीस मध्ये घडली. निवृत्त पोलिस अधिकारी इमाम शेख यांच्या मदतीने नाईटने सोलापूरची क्रांती चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक द्वेषापोटी खानने सोलापूरात मार्शल लॉ लागू केला. अश्या तर्‍हेने महाराष्ट्रात सर्वप्रथम सोलापूरात मार्शल लॉ लागू झाला.

संपूर्ण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ात १९३० साली एकमेव सोलापुरात मार्शल लॉ लागु झाला होता. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच यात सोलापूरच्या बहाद्दर जनतेने इंग्रज सरकारला हाकलून देऊन ९, १० आणि ११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. त्या वेळी सोलापूर नगरपालिकेवर युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला होता.

मार्शल लो असताना सोलापुरात राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यात आली होती. राष्टनेते श्री. व्ही.व्ही. साठे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रध्वजासमेत सोलापुरात आले. त्यांना स्टेशनवरच अटक झाली. त्यानंतर या झेंडा सत्याग्रहासाठी सम्पूर्ण देशभरातून लोक सोलापुरात येवून दाखल होवून लागले. सरतेशेवटी स्वतः गव्हर्नर मुंबईहून येथे आले. व त्यांनी पाहाणी केली. नंतर ३० जून १९३० या दिवशी तब्बल ४८ दिवसांनी सोलापुरातील मार्शल लो मागे घेण्यात आला. कोर्टाला आग लावल्या प्रकरणी १८ ऑक्टोबर१९३० रोजी निकाल देण्यात आला. जगन्नाथ परदेशी, छन्नूसिंग चंदेले, डॉ. अंत्रोळीकर या तिघांना दोषी ठरविण्यात आले.

या घटनेचा सूड उगवण्यासाठी पुण्यात वासुदेव गोगटे याने हॉटसनवर हल्ला केला. पण चिलखतामुळे हॉटसन वाचला. त्याला या कृत्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले असता त्याने ,” ब्रिटीश सरकारच्या सोलापुरातील अमानुष कृत्याचा निषेध म्हणून मी हे केले” असे सांगितले. अशा प्रकारे सोलापुरातील मार्शल लो भारताच्या स्वातंत्र लढ्यातील एक महत्वाची घटना होती.

सोलापूरातील हा पहिलाच मार्शल लॉ असल्याने जनतेला बरेच सहन करावे लागले.गांधी टोपीवर बंदी घालण्यात आली, लोकांना निर्दयपणे मारण्यात आले, म्युनिसिपल प्रमुख माणिकचंद शहा यांनी राष्ट्रध्वज काढण्यास नकार दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.पोलिसांनी धनशेट्टी,सारडा, हुसेन, शिंदे यांची धिंड काढली.या चौघांना पुण्याच्या सेशन कोर्टाने ८ मे १९३० रोजी झालेल्या पोलिसाच्या मृत्युसंदर्भात दोषी ठरवून मरेपर्यंत फाशी देण्याचा आदेश काढला.खरेतर यात या चौघांची काहीच चूक नव्हती. फासावर चढताना ते जयहिंद, वंदे मातरम ई.नारे देत फासावर चढले. लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या ब्रिटीशांनी ४ निष्पाप लोकांचा बळी दिला. पुण्यात या विरोधात बरीच निदर्शने झाली. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सर्व भागातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. रविंद्रनाथ टागोरांनी देखील लंडन टाईम्स मध्ये या घटनेचा निषेध केला.

त्यांची माहिती खालीलप्रमाणे:

१. मल्लप्पा धनशेट्टी: "पेंढारकर" पेढी मध्ये कारकून म्हणून कार्यरत.यांनी नाईटचा जीव वाचविला.
२. जगन्नाथ शिंदे: युवानेता, अप्रतिम वक्तृत्वशैली. मिलिटरी लॉ अंतर्गत शिक्षा झाले.
३. किसानलाल सारडा: श्रीमंत मारवाडी. खरेतर राजकारण, समाजकारणाशी काहीही संबंध नव्हता. हिंदू समाजाचे सुदृढीकरण केले.
४. कुर्बान हुसेन: गिरणी कामगारांचा लाडका युवा नेता. हिंदु मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्नशील.

या घटनेनंतर या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा व अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे वेगवेगळ्या जाती-धर्माचे चार देशभक्त फासावर गेले. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांचे पुतळे पूर्वीच्या कामगार बागेजवळ व सध्याच्या पार्क स्टेडियमजवळ उभारण्यात आले आहेत. चार हुतात्मा चौक म्हणून हा परिसर ओळखला जातो. हे चार हुतात्मे तरूणांसाठी स्फूर्तिस्थाने आहेत. येथे आल्यानंतर तरूणांमध्ये वीररस निर्माण व्हावा म्हणून या चार हुतात्मा पुतळ्यांचे दिमाखदार स्मारक निर्माण करण्यात आले आहे. राष्ट्रपुरूषांचे स्मृती सर्वासाठी स्फूर्तीदायी असतात. मार्शल लॉमधील चार हुतात्म्यांचे हे पुतळे आम्हा सोलापूरकरांसाठी मानबिंदू आहेत.

सोलापूरची खादगी..

मुळचा सोलापूरी माणुस अस्सल खवैय्या आहे. आम्ही आमच्या पुरती मराठीतली एक म्हण मॉडीफाय करुन घेतलेली आहे. आम्ही म्हणतो "चवण्याचे खाणार त्याला सोलापुरकर देणार"

आमच्या सोलापूरच्या शेंगांची बातच काही वेगळी. त्यामुळे ईथल्या शेंगाची चटणी, शेंगा पोळ्या आणि ठेचा खूपच प्रसिद्ध् आहे. तेल न घालता सुद्धा तेलकट, लालबुंद असुन सुद्धा कमी तिखट, जाड्या भरड्या अश्या शेंगाच्या चटणीची बातच काही और. इतक्या सुंदर चवीचे घटक पण फक्त मोजकेच, भाजक्या शेंगा ,तिखट,मीठ,जीरे आणि लसूण. सगळे जिन्नस एकत्र करुन ऊखळात कुटले की झाली शेंगा चटणी तयार. ह्याशिवाय संक्रांतीच्या दिवसात शेंगाचाच अजून एक केला जाणारा लै भारी प्रकार म्हणजे शेंगा पोळी. सोलपुरच्या पदार्थांची खासियत हीच की कमीत कमी घटक वापरुन चवदार पदार्थ करायचा. त्याप्रमाणे शेंगा +गूळ एकत्र करुन कुटायचा आणि कणकेच्या पारीत हे सारण घालून पातळ अशी पोळी लाटून तगड या एका वेगळ्या प्रकारच्या पत्र्यावर लाटायच्या आणि तव्यावर खरपूस भाजायची आणि नंतर तूप लावून खायची......स्वर्गसुख म्हणजे आणखी काय !!!!

(ताटातील पदार्थ (डावीकडून सुरुवात): दही शेंगाचटणी, शेंगापोळी, बाजरीची कडक भाकरी. तिखट आमटी. भरली वांगी, गरगट्टा).

पोळी तर झालीच पण भाकरी आणि तत्सम प्रकरांमध्ये सुद्धा आम्ही फेमस आहोत. पुरीसारखी टम्म फुगलेली ज्वारीची कडक पण तरीही कागदासारखी आणि कागदाएवढी पातळ भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि दही ! बास्स.... कुठलाही सोलापुरकर काय किंवा एकदाच चव चाखलेला बाहेरगावचा माणुस काय, कुणीही ही चव विसरणार नाही. बरं भाकरीची पद्धत ही नेहमीच्या भाकरीं सारखीच फक्त भाजून झाल्यावर चुलीच्या मागे ठेवायची. पद्धत जरी तीच असली तरी चव मात्र फक्त आमच्या सोलापुरातच. अशीच संक्रांतीच्या दिवसात केली जाणारी तिळ लावुन केलेली बाजरीची भाकरी . हे सगळे लिहताना आता कधी एकदा संक्रांत येतेय असे झाले आहे. भाकरीचाच अजून एक प्रकार म्हणजे धपाटे. ज्वारीच्या पिठात तिखट,मीठ, ठेचलेला लसूण,हळद, हिंग घालून एखाद्या कापडावर पातळ थापून भाजलेला प्रकार तो हाच.

भाकरीचे प्रकार झाले आता तोंडी लावायला काहीतरी हवेच. काहीतरी म्हणजे काय तर एक साधा, सोप्पा पदार्थ तो म्हण्जे मिरचीचा खर्डा/ठेचा. ईतर प्रकारांप्रमाणेच अगदी मोजकेच घटक वापरले जातात. प्रथम एका तव्यावर सर्व साधारणपणे भाकरी करून झाल्यावर त्याच तव्यावर मिरच्या व लसूण तेल टाकून ठेवायच्या. नंतर त्याच्यात अक्खे शेंगदाणे व मीठ घालून वाटीने तव्यावरच ठेचायचा (कच्चे टमाटेही मऊ परतुन घालु शकता). झाला ठेचा तयार.

ह्या पारंपारिक पदार्थाबरोबरच चाट प्रकारातही आम्ही मागे नाहि आहोत्.पुण्या-मुंबईतल्या सारखी गरम व २-३ प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्यांची पाणीपुरी नाही तर एका पाण्यातच आंबट, तिखट, गोड चवीची एकदम थंडगार अशी पाणीपुरी खायची तर एकदा सोलापुरात 'पार्क' ला भेट द्याच. हे पार्क म्हण्जे बाग नाही बरंका.. तर ही आहे सोलापुरची चौपाटी. इथलाच अजून एक पदार्थ "भैय्या ची भेळ", "अनेकात एक आमचाच भैय्या" हे त्याच्या भेळेच्या गाडीवर लिहीलेले वाक्य तो खरे करून दाखवतो आणि एक प्लेट खाऊन पोट भरते पण मन काही भरत नाही.

शाकाहारी खादाडी : चार पुतळ्यासमोरचे हॉटेल सिटी पार्क, हॉटेल ऐश्वर्या, टिळक चौकातले श्री दत्त इडली गृह, सोलापूर बस स्टँड समोरचे सोलापुर इडली गृह, सुप्रजाची पावभाजी आणि लांबोटीचा खुसखुशीत आणि झणझणीत मक्याचा चिवडा, भाग्यश्रीचा खमंग चिवडा आणि मुंबईच्या जंबो वडापावच्या तोंडात मारेल असा झकास भाग्यश्री वडा, नव्या पेठेतली आण्णाची मिरची भजी, पांचाली, रसिक सारखी गुजराथी हॉटेल्स, सात रस्त्यावरची सिद्धेश्वरची भेळ आणि महादेवची डिस्कोभजी ही सोलापूरच्या शाकाहारी मंडळींची आवडीची ठिकाणं ! याचबरोबर सोलापूर - पुणे रोडवरीला सिद्धेश्वर, हॉटेल अविराज, नसले बंधुंचे हॉटेल ही देखील काही चांगली हॉटेल्स...

मांसाहारी मंडळींसाठीदेखील बरीच ठिकाणे आहेत बरंका....
पण फेमस म्हणाल तर 'सावजी'ची सगळी मांसाहारी हॉटेल्स, एंप्लॉयमेंट चौकातलं 'सावजी बिर्याणी' आणि हैदराबाद रोडवरचा 'चाचा'चा धाबा ! इथलं मटणाचं लोणचं खायला लोक कुठुन कुठुन येत असतात. विजापूर वेशीतली कित्येक हॉटेल्स खास मोगलाई आणि हैदराबादी पद्धतीच्या सामिष जेवणासाठी लोकप्रिय आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिटी पार्क सारखी जरा मोठी हॉटेल्स सोडली तर खादाडीची बहुतेक सगळीच ठिकाणं सर्वसामान्याच्या खिश्यालाही परवडणारी.

आमच्या सोलापुरात आणी आजुबाजुला पहाण्या सारखंही खुप आहे. दोन ते तीन दिवसात सारं फिरुन होईल. आता सोलापुरातच पहा ना इथे पार्क, भुईकोट किल्ला, श्री सिद्धेश्वर देउळ, पार्क, कंबर तलाव वगैरे तर आहेतच, पण शेजार पाजारची ठिकाणं म्हणाल तर तुळजापुर, अक्कलकोट, नळदुर्ग, पंढरपुर सुद्धा आहेत. सारं कसं हातभर अंतरावरचं आहे बघा.

(सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज, डावीकडून: आई तुळजाभवानी, आजोबा गणपती, सिद्धेश्वर महाराजांची योग समाधी, उजवीकडे: श्री मल्लिकार्जुन)

(कंबर तलाव, नळदुर्ग किल्ला (नर मादी धबधबा), सिद्धेश्वर तलाव, उजवीकडे : १५ ऑगस्टला भुईकोट किल्ल्यावर फडकवलेला झेंडा, इंद्रभुवन (सोलापूर महानगरपालिका), चार हुतात्म्यांचे अर्धपुतळे)

सोलापूरची कधी आशिया खंडाचे मँचेस्टर ही ओळख होती. पण आता ही ओळख बदलतेय. दुर्दैवाने पुसली जातेय. लक्ष्मी विष्णु, नरसिंग गिरजी, जुनी मिल या सोलापूरची शान असलेल्या टेक्स्टाईल मिल्स आता बंद पडल्या आहेत. तिथे त्या जागांवर बिल्डर माफियाचा कब्जा होतोय. पुर्व भागात अजुनही तशा बर्‍याच समृद्ध मिल्स आहेत. पुलगम, चिल्का, क्षीरसागर, चाटला आणि पुर्व भागातील साळी (पद्मशाली) बांधवाच्या घरा-घरातून चालणारे पॉवरलुम्स, हँडलुम्स आजही चालतात. सोलापूरातून आजही चादरी, बेडशीट्स, टॉवेल्स जगभर निर्यात होतात. परमेश्वर करो आणि माझ्या या सिद्धेश्वरनगरीला तिची जुनी ओळख पुन्हा प्राप्त होवो.

आमच्या काही खास सोलापुरकरांची नावे :

स्वातंत्र्य सैनिक :
जगन्नाथ शिंदे, मल्लपा धनशेट्टी, कुर्बान हुसेन आणी किसन सारडा.
तुलसीदास जाधव, चंद्रशेखर म्हमाणे, शंकरराव मोहिते-पाटील, माने गुरुजी.

शंकर राव मोहिते पाटील हे फक्त स्वातंत्र्य सैनिक नव्हते तर सहकार चळवळीचे मुख्य नेते होते. त्यांनी सोलापुर जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांसाठी सहकार चळवळ सुरु केली.

चित्रपट सृष्टी:
डॉ. जब्बार पटेल( चित्रपटः डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जैत रे जैत, सिंहासन, उंबरठा, नाटकः शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल्,अशी पाखरे येती)
शशीकला(मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू)
सरला येवलेकर
अतुल कुलकर्णी
वेदिका कुमार(तामीळ, तेलुगु , कानडी चित्रपटांतील नायिका)
फय्याज (गायीका, अभिनेत्री)
दिपक देशपांडे (पहिला हास्य सम्राट)

राजकीय व्यक्तिमत्त्व
सुशीलकुमार शिंदे (युनोमध्ये भारताचे पहिले नेतृत्व)

कलाक्षेत्र
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि वादग्रस्त चित्रकार कै. एम.एफ हुसेन
शिल्पकार भगवान रामपुरे (मुंबईतील स्टॉक एक्स्चेंजसमोर उभ्या असलेल्या 'बुल' चे निर्माते)

नामांकित व्यावसायिक
वालचंद हिराचंद दोशी: २३ नोव्हेंबर १८८२ ते ८ एप्रिल १९५३ भारतात सर्वप्रथम आधुनिक बंदर, विमान निर्माण आणि कार तयार करण्याचा कारखाना यांनी सुरु केला.

क्रीडा क्षेत्र
सलील अंकोला : १९९६च्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या भारतीय संघात समावेश,
पॉली उम्रीगर - क्रिकेटपटू
अनघा देशपांडे- महिला क्रिकेट पटू

साहित्यिकः
राम जोशी
कवी कुंजविहारी
रा.ना. पवार
श्रीराम पुजारी
डॉ. निर्मलकुमार फडकुले
कवी संजीव
दत्ता हलसगीकर

संगणक क्षेत्रातील महत्वाचे नाव : अच्युत गोडबोले.

तर असं आहे आमचं सोलापुर....

यावं मंडळी, यावं आपण सोलापुराला
इथे येवूनी नतमस्तक व्हा सिद्धेश्वराला
कुडल खजिना किल्ला साक्ष आमच्या इतिहासाला
हुतात्म्याच्या गावी या जरा विसाव्याला,

यावं एकदा संक्रांतीच्या गड्ड्याला,
फिरणाया झोपाळ्याला, शोधनाया पन्नालाला,
भेळ, पाणीपुरी, पाव-भाजी, रगडा, पार्क चौपाटीला.
अन आत्मा तृप्त करणाया ’कृष्णा’ला.

शाल मायेची चादर घ्या या चाटला पुलगमला,
संध्याकाळी फेरफटका मीना, भागवतला,
रात्रीला बेत नक्की सावजी हाटेला.

गोड मानुनी घ्यावे आमच्या पाहुणचाराला
हातभार लागे मग आमच्या विकासाला.

काय काय आहे आमच्या सोलापुरात ?

आमचे प्रसिद्ध पदार्थ
पाणीपुरी
शेंगाचटणी
हुरडा
ज्वारीची, बाजरीची भाकरी
ठेचा/खरडा
सावरकर मैदानाजवळचं झणझणीत रगडा पॅटीस एकदा चाखायलाच हवं...

आमचे खाऊचे अड्डे
पार्क(पाणी पुरी, भेळ, कचोरी)
सुप्रजा(पावभाजी हुतात्मा बागेजवळ)
इडली गृह(इडली द. कसबा)
कृष्णा(आईसक्रीम- सात रस्ता)
कामत हॉटेल(चहा जुना एंप्लोयमेंट चौक)
हॉटेल सिटी पार्क(पार्क)
नसले ढाबा(पुणे हायवे)
चंद्रबळ(पुणे हायवे)

आमच्या बागा
राणीची बाग (विजापूर रोड)
किल्ल्याची बाग(लकी चौक)
संभाजी तलाव(कंबर तलाव विजापूर रोड)
रेवणसिद्धेश्वर प्राणीसंग्रहालय (विजापूर रोड)
हुतात्मा बाग(सावरकर मैदान)
चार पुतळे(पार्क)

आमची देऊळे
श्री सिद्धेश्वर मंदिर
श्री मल्लिकार्जुन मंदिर
श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर
श्री राघवेंद्र मंदिर
रुपाभवानी मंदिर
आजोबा गणपती
गजानन महाराज मंदिर
साईबाबा मंदिर

आमची ग्रंथालये
हिराचंद .नेमचंद वाचनालय

आमची प्रेक्षणीय स्थळे
चार हुतात्मा
हिप्परगा तलाव
महानगर पालिका भवन

आमची चित्रपटगृहे
आशा
उषा
मीना
चित्रा
प्रभात
गेंट्याल
लक्ष्मी(७० मीमी)
कल्पना
कलामंदिर

आमच्या व्यतिरिक्त भेट देणयाजोगी जवळपासची ठिकाणे
पंढरपूर
तुळजापूर
अक्कलकोट
विजापूर(गोलघुमट)
गाणगापूर
हत्तरसंग कुडाल

तर मंडळी असं आहे आमचं सोलापुर.
एवढ्या माहीती वरुन एकदा तरी सोलापुरला चक्कर मारावं वाटेलाच तुम्हाला यात शंका नाही. आणी हो, या व्यतिरीक्त अजुन काही माहीती हवी असेल तर आम्हास संपर्क साधायला विसरु नका.

तर मग कधी करताय बेत सोलापुरचा..... ?

---------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
पुर्ण पोवाडा तुम्हाला इथे वाचता येइल आणि इथे डाउनलोड करुन ऐकता येइल.
---------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
श्रेयनामावली
१. सौ. राजेश्वरी आपटे
२. श्री. रोहित आपटे
३. गायन- कु. श्रुती विश्वकर्मा , तबला- श्री. मुकुंद दातार, संकलन- सौ. दिपाली दातार
४. प्रा. मोहिनी पिटके
५. श्री. सु. ना. मित्रगोत्री
६. सौ. तेजस्विनी करकंटी

आम्ही सोलापूरकर !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडंसं भागवत चित्रपटगृह संकुलाबद्दल....

तुमची माहिती बरोबरच आहे, थोडासा बदल करुयात फक्त. केवळ चौमजली नव्हे तर 'चार (की सहा) स्क्रीन्स' असलेलं म्हणा. जेव्हा इतर महाराष्ट्राला (मला वाटतं भारताला म्हणायलाही हरकत नसावी) मल्टीप्लेक्स ही संकल्पना माहीतही नव्हती तेव्हापासून आमच्या सोलापूरच्या 'भागवत चित्रपटगृह संकुलात' आम्ही सोलापूरकर या संकल्पनेचा लाभ घेतोय. आता त्याचं रुपांतर 'भागवत बिग सिनेमाज' या नावाने मल्टीप्लेक्समध्ये झालय.

मनःपूर्वक आभार मंडळी !

मामी, सेनापती तुमच्या मताचा पुर्ण आदर बाळगून मी मुग्धानंद यांच्याशी सहमत आहे. मुग्धानंद यांनी आमच्या पाची जणांच्या मनतली एकमेकाबद्दलची कृतज्ञता त्या प्रतिसादात व्यक्त केली आहे. त्याचे निकालाशी काहीही संबंध नाही.

धन्यवाद सोलापूरकर्स Happy

ए... आता बदलून काय? फिदीफिदी मुदत संपली आहे ना...>>>

सेना, बदलून म्हणजे काही टायपो झाल्या होत्या टंकताना. पोस्ट करताना गडबडीत पोस्ट झालं आणि नंतर एकेक टायपो लक्षात यायला लागल्या म्हणून त्या सुधारून घेतल्या एवढेच. Happy

मस्त लेख. शब्दाशब्दातून अभिमान दिसतो आहे.
सोलापूरात जेवलो / खाल्लो आहे पण कधी मुक्काम आणि फिरणे झाले नाही. आता मुद्दाम वेळ काढून गेले पाहिजे.

तुमच्या सगळ्यांच्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मंडळी Happy
दिनेशदा तुमचं म्हणण खरंय !! सोलापूरी असून त्याला सोलापुरचा अभिमान नाही असा माणूस सापडणे नाही.
नसानसात भिनलय सोलापूर सोलापूरकरांच्या त्यामुळे अभिमान तर आहेच पण त्यातही जास्त आपुलकी आणि जिव्हाळा आहे सोलापूरच्या मातीविषयी एवढचं !!

सही रे विकू, मी दरवर्षी कुलदेवता तुळजाभवानी मातेच्या दर्शनास येते तेव्हा सोलापूरातच मुक्काम असतो, तेव्हा सिद्धेश्वराचे, अक्कलकोटास स्वामी समर्थांचे दर्शन घेतेच.... आजोबा गणपती बाप्पाच्या दर्शानाला नक्की जाईन येत्या वर्षी.

मुक्कामासाठीचे चांगले हॉटेल्सही द्यायचेस ना विकू Happy मदत झाली असती, मग हेच प्रिंट "सोलापूर गाईड" म्हणूनही वापरता येईल मला Happy

टीमचे अभिनंदन! Happy

हा आहे किला बगीचा, सिद्धेश्वर मंदिराजवळुन काढलेला फोटो. Happy

z

ही आहे समाधी

z

हे आहे सिद्धेश्वराचं मंदिर. ह्याच्या सभोवताली तळे आहे.

z

ही आहे सोलापुरातली मला आवडलेली नितांत सुंदर अशी महानगरपालिकेची इमारत.
खुप छान मेन्टेन केली आहे.

z

झकासराव, किल्ल्याचा फोटो खूप खूप सुंदर आलाय. तळ्याच्या कडेने जो रस्ता आहे तो अजून वापरात आहे का??
आम्ही बालवाडीत असताना गणपती घाटापासून ते सिध्देश्वर मंदिरापर्यन्त चालत (२-२ च्या रांगा करून) शाळेची सहल गेली होती. त्यावेळी तळ्याच्या कडेकडेने जाणं काय भन्नाट वाटलं होतं. चालून चालून शेवटी पाय दुखले ते वेगळं पण तो लांबचलांब निर्मनुष्य रस्ता, वळणावळणाचा, एका बाजूला खोल तळे आणि दुसर्‍या बाजुला किल्ल्याची तटबंदी आणि मधे आम्ही वानरसेना!!! भलतंच Adventure करतोय असं वाटत होतं. आज हा फोटो पाहून तेच आठवलं. धन्यवाद. Happy

झक्या, मस्तच रे !
बादवे इंद्रभवन बाहेरुन जितकं सुंदर दिसतं तितकं आतुन त्याची कळा गेलेली आहे आता. कुठल्याही सरकारी कार्यालयाच्या इमारतीत जे दृष्य दिसतं (इतस्ततः पसरलेल्या फायली, जिन्याच्या कोपर्‍या-कोपर्‍यात पान खाऊन मारलेल्या पिचकार्‍या, कचरा, अस्वच्छता) ते इंद्रभवनाच्या वास्तुच्या अंतरंगाच्याही वाट्याला आलेलं आहे. Sad

धनश्री, तो रस्ता अजुनही वापरात आहे. त्या रस्त्याने गेल्यास ’होम मैदानापासून निघून लकी चौकातून, सावरकर मैदानामार्गे दत्त चौकात पोहोचण्याच” लांबचा पल्ला टाळता येतो. लकी चौकमार्गे चालत गेल्यास दत्त चौकात पोहोचायला अर्धातास लागतो, तेच या रस्त्याने गेल्यास पाच मिनीटात पोहोचता येते. Happy

सोलापूर महानगरपालिकेची विस्तारीत इमारत...

30283991_19550e46e9.jpg

सोलापूर महानगरपालिकेची मुळ इमारत असलेल्या 'इंद्रभवन' या वास्तुचे मालक (श्री. वारद / वारंग ) यांच्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते. ही दंतकथा मी अशाच एका वृद्ध नागरिकाकडून ऐकली आहे. खरं खोटं त्या काळची माणसंच जाणोत.

स्वातंत्र्यपुर्व काळात जेव्हा ब्रिटनच्या राणीने भारताला भेट दिली होती तेव्हा तिच्या स्वागतासाठी इंद्रभवनचे मालकही सोलापूराहून गेले होते. राणीचे आगमन झाले तेव्हा तिची मिरवणूक एका चार घोडे जोडलेल्या बग्गीतून काढण्यात आली. त्यावेळी वारदांच्या बग्गीला मात्र सहा घोडे जोडलेले होते. झाले, राणीचा अपमान झाला म्हणून तत्कालिन ब्रिटीश सरकारने वारदांना दोषी ठरवले. पण एवढ्या श्रीमंत माणसाला एवढ्या छोट्या चुकीसाठी दंड तरी किती करायचा? कारण वारद हे प्रचंड श्रीमंत होते. कितीही दंड केला तरी तो त्यांनी सहजच भरला असता. म्हणून तत्कालीन ब्रिटीश न्यायासनाने त्यांना दंड तर केला पण तो अशा पद्धतीने केला की ज्यामुळे वारदांच्या आत्मसन्मानालाच धक्का लागावा. या गुन्ह्यासाठी वारदांना दंड ठोठावण्यात आला पुर्ण ' एक आणा' !
माझ्या सारख्या गडगंज माणसाची किंमत फक्त 'एक आणा' केली याचा वारदांना प्रचंड धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

ही विस्तारीत इमारत आहे होय.
आम्हाला वाटल जुनी इमारत तशीच अ‍ॅज हेरीटेज म्हणुन ठेवायची आहे म्हणुन सर्व कारभार नवीन इमारतीत हलवलाय.
बाय द वे, ती इमारत पाहुन मनात आलेला विचार हाच होता की ह्या इमारतीत क्लास वन हापिसर म्हणुन नोकरी मिळायला पाहिजे. म्हणजे रोज तिच्या सहवासात राहता येइल Happy

ते इंद्रभवनाच्या वास्तुच्या अंतरंगाच्याही वाट्याला आलेलं आहे>> Sad

मुग्धानंद, विशाल आणि धनश्री धन्यवाद Happy

इंद्रभवन म्हणजे बहुतेक वारदांचं राहतं घर होतं आधी, काही जणांच्या मते ते त्यांनी नंतर महानगरपालिकेसाठी दान केलं Happy
तर एक कथा अशीही आहे की सरकारने ही वास्तु जबरदस्तीने ताब्यात घेतली, त्यामुळे तत्कालिन मालकाने केस पण केली होती कोर्टात. ती त्याच्या विरोधात गेल्याने त्या धक्क्याने त्याचा मृत्यु झाला. खरे खोटे देवच जाणे !

खूप छान माहिती . सोलापूर ला एकदाच जाणे झाले. लेख वाचून पुन्हा जावेसे वाटतेय.
पुर्ण टीम ला शुभेच्छा. पूलगम नावाच्या दूकानातून खूप खरेदी केली होती. नक्कि नाव आठवत नाही पण बहुतेक "निसर्ग" नावाच्या हॉटेल मध्ये मस्त जेवालो होतो.
सिद्धेश्वराचं मंदिर खूप आवडले होते.
tuljapoor.jpg

लकी चौकमार्गे चालत गेल्यास दत्त चौकात पोहोचायला अर्धातास लागतो.>>> पण वाटेत खादाडी करता येते त्याचे काय? Proud

लकी चौकमार्गे चालत गेल्यास दत्त चौकात पोहोचायला अर्धातास लागतो.>>> पण वाटेत खादाडी करता येते त्याचे काय>> जो खादाडीचा मोह टाळुन दत्त चौकात पोचतो तो महान योगी वै... Wink

त्या आदरणीय हुतात्म्यांची एवढी सविस्तर माहिती तुझ्यामुळे मिळाली...>>>

शशांकदा, त्या माहितीचे श्रेय मल्ली आणि स्वप्नाला जाते. धन्स मल्ली, स्वप्ना Happy

पण वाटेत खादाडी करता येते त्याचे काय? >>>>
यप्प, पार्कवर आजकाल फारशी चक्कर नाही मारत मी, पण सावरकर मैदानावरील झणझणीत रगडा पॅटीसच्या आठवणीने माझी जिभ परत बेचैन झालीये Wink

जो खादाडीचा मोह टाळुन दत्त चौकात पोचतो तो महान योगी वै...
१०००+ अनुमोदन.. Happy

इंद्रभवन म्हणजे बहुतेक वारदांचं राहतं घर होतं आधी
हे खरं आहे. Happy पण याला माझ्याकडे पुरावा नाहीय. Sad

खूपच छान! माझं जन्मगाव आणि आता सासर. (अगदी किल्ल्याच्या बागेसमोर आमचं घर.)
पण गड्ड्याच्या जत्रेचा उल्लेख राहिलाय की माझ्याकडून वाचायचा सुटलाय?

मनस्विता गड्ड्याची जत्रा वेळेअभावी आणि जागेअभावी नाही घेता आली. त्याच्यासाठी एजून एक गट करून त्यात काठ्यांचं लग्न, आतषबाजी इ.इ. कव्हर झालं असतं. हा पहिलाच प्रयत्न होता ना पुढल्या वेळेला नक्की लक्षात ठेवू.

Pages