विषय क्रमांक १: गुंतले भावबंध..

Submitted by रैना on 23 August, 2012 - 15:14

Everyone has two jobs – that of a film critic and what they do for a living...असे म्हणतात.

मराठी चित्रपटांशी (आणि खरंतर चित्रपटांशीच) नाळ जोडली जाणे याचे श्रेय माझ्या आईवडिलांना आणि दूरदर्शनला द्यावे लागेल. त्याकाळी दूरदर्शनवर मौज असायची (असे म्हणायची पद्धत आहे), पण खरंच, बरेवाईट, सर्व प्रकारचे चित्रपट मराठी, प्रादेशिक आणि हिंदी - हे दूरदर्शनवर पाहिलेत. त्यातही शासकीय टुमीबरहुकुम असले, तरी त्यांच्या रँडम (कधीकधी बिनडोक) का होईना, निवडपद्धतीने काय केले असेल तर बर्यावाईटाचे संस्कार. इतके चित्रपट पाहिले, की आपोआप एक प्रेक्षकवर्ग तयार होत गेला असे आता वाटते. (तेव्हा वैताग यायचा. शासकीय दुखवटा असल्यावर तर फारच) 'कसं काय पाटील बरं हाय का' नंतर थेट अदुर गोपालकृष्णन किंवा सत्यजित राय यांचे चित्रपट आणि मग थेट 'कर्ज' किंवा 'कानून अपना अपना'. कशाला कशाचा पत्ता नसे (किंवा सर्व प्रकारचे चित्रपट पहावेत, ऊंचनीच/ भेदभाव न करता) म्हणूनच अपघाताने प्रेक्षक तयार होत गेला की काय कोण जाणे. (आणि गंमत नाही, वर्षाकाठी १०४ चित्रपट कशाला पाहता असे वडिल म्हणायचेही. तरी त्यांना आम्ही बरेच प्रादेशिक भाषेतील चित्रपटही पहायचो ते बहुधा ठाऊक नसावे. मेंदुच्या हार्डडिस्कमध्ये इतका भयानक कचरा साठलेला आहे, की ती क्रॅश होणार असे वाटतच असते नाहीतरी. आता वर्षाकाठी १०४ चित्रपट पहायचा विचारही करु शकत नाही.)

माझ्या मर्मबंधातील हे काही निवडक मराठी चित्रपट, गाणी, आठवणी. या लेखनाला काहीच शिस्त नाही, अभ्यासपूर्ण नोंदी नाहीत की काळानुरुप यादी नाही. नुसतीच स्मृतिचित्रे आहेत. तुमच्या आमच्या मनातली..

नवे, तरुण, ताज्या दमाचे, मनोरंजक चित्रपट. उगाच रडायचे काम नाही. मराठी म्हणावी अशी अभिव्यक्ती, भाषा काही मरायला बिरायला टेकलेली नाही अशी आशा निर्माण करणारे. थांबवा आता ते रुदन असे मला वाटले, ते या नव्या चित्रपटांच्या लाटेमुळे. 'वळू, देऊळ, शाळा, गंध, मसाला, निशाणी डावा अंगठा, हरीश्चंद्राची फॅक्टरी, पक पक पकाक'. या 'नवीन' लोकांचा दृष्टीकोन मला आवडतो आहे. (सध्या!!!). एकतर ते चित्रपट 'चला मुलांनो, आता बरंकाSS' थाटाचे वाटत नाहीत. ताजा दृष्टीकोन वाटतो. गंमत आहे या चित्रपटांमध्ये. एक पॉश साधेपणा आहे. नवीन प्रयोग करायची तयारी आहे आणि 'थँक्यू फॉर दॅट', अभिनिवेश कमी आहे!!

हां, आता थोडेसे सुलभीकरण होते, 'हसत- खेळत' या मात्रेचा वळसा अंमळ जास्त पडतो, पण तो माझ्या अपेक्षेतला मनोरंजक चित्रपट आहे. त्यामुळे चालतेय. (सध्या!!!)

'डोंबिवली फास्ट' ते 'श्वास 'ते अगदी पार 'मातीच्या चुली' /'उत्तरायण' पर्यंत उदाहरणे असताना मराठी चित्रपटात राम नाही असे रडायचे कारणच काय? म्हणजे ठीक आहे, आहेत त्या समस्या माहीत आहेत, कबूलही आहे. तरीही वैचारिक दिवाळखोरी आली आहे असे (अजूनतरी) वाटत नाही.त्या अशोक-लक्ष्या-सचिनपटांपेक्षा बरीच बरी परिस्थिती आहे की सध्या! तरी त्यांच्या काळाला वगळून चालणार नाहीच, कारण आम्ही लहान असताना ते चित्रपट पहावे लागायचेच. आदळायचेच. इच्छा असो वा नसो. आता लक्षात आहेत ते फक्त 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका' , 'गुपचप गुपचूप', 'नवरीमिळे नवर्‍याला'.

आणि मला सर्वात आवडते ती या नवीन तरुण पब्लिकची दंभ दाखवून द्यायची वृत्ती. कानफटात न वाजवताही 'सोनाराने कान टोचले'असे वाटते की नाही पाहताना?
ह्या नवीन चित्रपटातली/ त्यातली पात्रं अशी आपल्या भोवतालची, आणि म्हणूनच 'खरी' वाटतात की नाही? तो जातीवाद, देवभोळेपणा, राजकारण. ते आपल्या मनातले छोटे गाव असते, तिथली साधी माणसे आणि दंभ, तिथला साचलेपणा, दुसर्यावर कुरघोडी करण्याची वृत्ती, ठकास महाठक बेरकी माणसे, आपल्या चांगल्याच परिचयाचे असतात.
संवाद, संगीत लक्षात राहतात की नाही ?
कथा, पटकथा, दिग्दर्शनाला आपण दाद देतो की नाही?
त्याहीपेक्षा, आपण प्रेक्षागृहातून त्या धुंदीत बाहेर पडतो की नाही?

(अवांतर
१) आणि काळजी करायचीच तर ती आधी मराठी भाषेची करावी. मराठी असे काही राहिलेच नाही हल्ली, आडातच काही नाही तर मग तो दिग्दर्शकांचा दोष कसा हेच मला कळत नाही.
२) बाकी सर्वात राग येतो तो स्वतःच्याच अति प्रेमात असलेल्या कलाकारांचा, पण ते असो. आपण त्यांच्या जागी असतो तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन शोभा करुन घेतली नसतीच अशी खात्री देता येत नाहीच, पण डोक्यात जाते हे खरे.
३) आणि नटमंडळी सारखे वर्तमानपत्रातून का लिहीत असतात ? असोच. तो एक वेगळाच विषय आहे.
४) मराठी भाषेतील लघुपट, डॉक्युमेंटरी यांच्यापर्यंत आम्ही सामान्य प्रेक्षक सहजासहजी पोचू शकत नाही)
...

काही वर्षांपूर्वीचे 'अस्मिता चित्र' चे चित्रपट माझ्या घरगुती स्मृतीचित्रांमध्ये विसावले आहेत. 'सवत माझी लाडकी', 'कळत नकळत', 'चौकटराजा' .... संयत अभिनय ही त्यांची जमेची बाजू. बाकीचेही पाहिलेत,पण विशेष आवडले नाहीत. आता हे चित्रपट पाहिले तर हे जरासे(च) अतिरंजक वाटतात, नाही असे नाही. पण तेव्हा विलक्षण ताजे वाटायचे हे खरं. त्यातली पात्रे आणि ते साकारणारे कलाकार संस्मरणीय होते. त्यातल्या स्त्री व्यक्तीरेखाही सशक्त होत्या. संवाद जबराट टाळीखाऊ असायचे, त्यामुळेच 'सातच्या आत घरात' आला तेव्हा, 'अरे! यांचे (अख्ख्या टीमचे) हे असे काय झाले?!' असे वाटले होते.

मोडकांचे संगीत कहर सुरेख होते. काव्य सुंदर होते. भट्टी जमली होती. 'मुक्ता' हा चित्रपट आवडत नाही फारसा. तरी त्यातली गाणी अफाट सुंदर होती. मराठी चित्रपटसंगीताला मधुमेही गोSSSड गाण्यांतून सूट दिली ती मोडकांनी आणि (काही अंशी) हृदयनाथ मंगेशकरांनी असे वाटते. आम्ही कॉलेजात होतो. बॉम्बेचे संगीत धुमाकूळ घालत होते. त्या वेळेसच मोडकांचे संगीत वसतीगृहाच्या (काही) खोल्यांतून वाजत असे ही गोष्ट खरी आहे. आजच्या पोरांच्या मोबाईलवर, आयपॉडवर 'लल्लाटी भंडार'ची धून वाजते तशीच.

भावे-सुकथनकर यांची सिनेमा बनवायची पॅशन, प्रयोगशीलता आणि कमी खर्चात बनणारे, तशी चांगली मजबूत संहिता असलेले नावाजलेले चित्रपट पाहिलेत. त्यांचे मराठी चित्रपटांना दिलेले योगदान मोलाचे आहे याबाबत दुम्त नाही. ते चित्रपट इंटुकांना आवडतात, त्याबद्दल नेहमी लिहून येत असते वगैरे, पण ते माझे फार आवडते चित्रपट नाहीत. आधीच त्या चित्रपटांबद्दल इतके वाचावे लागते, म्हणजे ते डोळ्यासमोर आदळतच असते, की पाहीपर्यंत त्यातली मजाच निघून जाते.
का ते नाही सांगता येत. एक 'प्राण' मिसिंग वाटतो त्यांच्या चित्रपटांमध्ये. त्यातले सगळे सुटे आवडते: संवाद, स्थिरचित्रे, चौकट, अभिनय, कथा' पण एकत्रितरीत्या पाहताना काहीतरी कमी वाटते. ते पडद्यावर दाखवलेले नाटकच वाटते समहाऊ, आणि कलाकारांची निवडही नाही आवडत. दफ्तरदार बाईंच्या संवादाचा 'पिच' रसभंग करतो.एलकुंचवारही स्टिफ वाटतात पडद्यावर. पण भावे-सुकथनकरांच्या चित्रपटांच्या सीड्या मिळतात, त्यामुळे हे चित्रपट निदान पहायला मिळतात आणि वेगळा प्रयोग म्हणुन नेहमी आवर्जून पाहिले जातात. माझ्या स्मृतीचित्रांत 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'नितळ', 'दोघी' .

आणि फारसे न आवडतानाही हे चित्रपट मनात कुठेतरी राहतात.. कारण बहुतेक वेगळे विषय, सुरेख संहिता,अभिनव सादरीकरण.
पण मग आवड आणि नावड म्हणजे काय?
आपण मराठी चित्रपटांची आणि प्रेक्षकांचीच स्ट्रॅटेजी वापरुया. अशा गहन प्रश्नांच्या अरण्यात शिरायचेच नाही. बाहेरुनच प्रदक्षिणा मारायची. सोपेच करुन ठेवायचे सगळे. अल्बम चे पान पलटूया.

पालेकरांचे चित्रपट.....'ध्यासपर्व' आणि 'बनगरवाडी'. दोन्ही मला फार आवडतात.त्यातल्या चौकटी चित्रवत होत्या ना. बनगरवाडीला वनराज भाटियांनी दिलेले पार्श्वसंगीत प्रयोगशील, अभिनव आणि गोडही होते. किशोर कदम या अभिनेत्याचे चित्रपट सहसा चुकवायचे नाहीत हे मी माझ्यापुरते ठरवलेले आठवते. नंतर त्यांना 'नारायण सुर्व्यांवरील लघुपटात पाहिले, 'जोगवा'मध्ये पाहिले.
कुठल्याही भूमिकेत ते दीर्घकाळ स्मरणात राहतील. खरोखरी गुणी कलाकार हो.

अल्बम मधले अजून एक पान. खरे तर सोनेरी पिंपळपान. या पानावर 'शामचीआई', 'साधीमाणसं', 'मराठा तितुका मेळवावा,' 'ब्रम्हचारी', 'कुंकू', 'माणूस', 'तुकाराम'. यातल्या प्रत्येक चित्रपटावर कितीतरी लिहीता येईल. लिहील्या गेले आहे. माझ्या कुटुंबातील मुलांना हे चित्रपट कधी पहायला मिळतील का? निदान वारसा म्हणून तरी .. असे मला कधीतरी वाटून जाते. यातला प्रत्येक चित्रपट निदान दोनतीनदा पाहिला तो दूरदर्शनच्या कृपेने. त्यातली गाणी पाहिली ती दूरदर्शनवर. चित्रपट पाहिला की दुसर्या दिवशी आम्ही शाळेत दुष्टपणे 'नगं,नगं' वगैरे आवलीबाईंची नक्कल करायचो, पागनीसांच्या आमच्या मते 'संत' (मरीयल)टोन मध्येबोलायचो. माझी धाकटी बहिण 'कशाला उद्याची बात' मधल्या शांताबाईंची नक्कल हुबेहुब करायची, तेव्हापासून ते आत्ता आत्तापर्यंत. 'प्रभात' आणि 'व्ही.शांताराम' आणि 'जयप्रभा' आणि 'चित्रतपस्वी भालजी पेंढारकर' ही काय चीज होती ते फक्त वाचूनच कळले नंतर. 'देव, देश आणि धर्म' यांनी झपाटलेल्या भालजींच्या चित्रकर्तृत्वाने, किंवा प्रभातच्या क्रियेटीव्हीटीने दिपून जायला होते. निदान सांस्कृतिक वारसा म्हणून हे चित्रपट पहायला मिळाले हेच नशीब. ते मला आवडतात का, हा प्रश्नच गौण आहे. आज माझ्या स्मृतीचित्रांत 'आधी बीज एकले', 'कुंकू' मधल्या शांताबाई आपटे, 'माणूस' (आणि 'पिंजरा') चे स्टायलिश दिग्दर्शन आणि कहर खत्तरनाक गाणी आणि लागू-संध्या, 'साधी माणसं' मधील लताबाईंच्या सुरेख चाली, खेबुडकरांचे शब्द आणि जयश्रीबाई आणि त्यातील खलनायक.

दोन परिच्छेदांत काय काय सामावणार. तरीही ही छोटीशी पोच. माझ्या मनात 'सेपिया टोनची जादू' रुजली ती या चित्रपटांनी. हा सांस्कृतिक वारसा आवडनिवडीच्या पलिकडच्या कप्प्यात आहे. एकदा कपाट उघडले की ठेवणीतल्या भरजरी पैठण्यांसारखे हे. किती भरजरी आहे. कोण नेसणार रोज? काय हे भडक रंग.. वगैरे..अस्थानी.

आणि या अशा तथाकथित सोज्वळ, पवित्र, समाजाभिमुख, तत्ववादी अँड ऑल दॅट चित्रपटनिर्मीती करणार्‍या मराठी चित्रपटसृष्टीतले राजकारण, पैसा, प्रसिद्धी, आयुष्याची शोकांतिका, नशेचा अंमल, अनेक स्त्रियांशी संबंध वगैरे अटळ दशावतार. नंतर 'कुण्या एकाची भ्रमणगाथा', 'सांगत्ये ऐका', 'उषःकाल- 'उषा किरण यांचे आत्मचरित्रापासून ते अगदी अलिकडे आलेल्या 'परतीचा प्रवास' मध्ये वनमालाबाईंच्या विस्कळीत आठवणी, 'नाथ हा माझा' यातून तुकड्या तुकड्यातून उमजत गेले तेव्हा मराठी साहित्याबाबत वाटला, तो त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आदरच.
कष्ट, कष्ट म्हणजे किती कष्ट. फडक्यांच्या स्ट्रगल बद्दल, वणवणीबद्दल 'जगाच्या पाठीवर' मध्ये वाचले तेव्हां काय वाटले ते शब्दात सांगणे अवघड आहे. त्यांना त्याबद्दल फारशी खंत नाही, त्रागा नाही की काही नाही. झळझळीत यशामागची ही बाजू वाचताना, ते यशही ज्यांना आजन्म लाभले नाही, असे कित्येक कमनशीबी असतील हा विचार डोकावतोच.

आणि ज्या उल्लेखाशिवाय माझी रुपेरी पडद्यावरील स्मृतीचित्रे अपूर्ण आहेत ते जब्बारपट. 'सामना', 'सिंहासन', आणि अविस्मरणीय 'उंबरठा' !! स्मिता पाटलांनी प्राण फुंकलेली 'सुलभा महाजन' कोण विसरु शकेल. आजसुद्धा उंबरठाच्या तोडीचा त्याच विषयावरचा मराठी चित्रपट सहजासहजी आठवत नाही. कुटुंब व्यवस्थेत घुसमटणारी, स्वतःला शोधणारी ती स्त्री, तिची आपल्या कामाप्रती असलेली स्वच्छ व्यावसायिक निष्ठा, भोवतालचा पोखरलेला, गंजलेला, सडका समाजव्यहार आणि पोकळ नात्यांचे डोलारे, आणि शेवटी घराचा उंबरठा कायमचा ओलांडण्याच्या निर्णयाप्रत आलेली ती स्त्री. (१९८२ साली समलैंगिकताही न कचरता दाखवली याबाबत पटेल, तेंडुलकरांचे प्रचंड कौतुक वाटते.) आजही सुलभा महाजन knows no parallel. प्रचलित व्यवस्थेविरुद्धच्या झगड्यात 'दीवार'चा अमिताभ आणि ही मनस्वी बाई माझ्या डोक्यात सारखेच फीट आहेत. त्यांच्या नजरेतील ती धग, चीड, त्वेष आणि बरंच काही मला अस्वस्थ करतं, सोबत करतं आणि झपाटुनही टाकते. (आणि त्यांच्याजागी इतर कुणाची कल्पनाही करवत नाही)
आणि गाणी?
.....आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळु दे.....
खरंतर नुसत्या गीतांवरच एक वेगळा लेख लिहिला जावा. त्या भट/ बापटांच्या अस्सल कविता आहेत आणि संगीत एका झपाटलेल्या फकीराची कमाल आहे. ते शब्दांना फुटलेले मोहर आहेत, गोंडस सुकोमल नव्हेत, शाल्मलीच्या मोहरासारखे ज्वालाग्रही भासणारे..

..या भाराभार चिंध्या तर खरेच....
आम्ही रहात होतो त्या एका देशात, मंदिरासमोर झाडाला चिटोरे बांधुन मन्नत मागायची पद्धत आहे. हिवाळ्यात ती पर्णहीन झाडे आणि कोणाकोणाच्या अपूर्ण इच्छांची रंगीबेरंगी कागदी भूते वार्‍यात फडफडत असतात. ह्या माझ्या स्मृतीतील तशाच कागदी चिंध्या समजा....

आणि या अजून सोबत असताना कशाची वानवा ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच लिहिले आहेस. शेवट खास.

माझी नाळ वळू, देऊळशी जुळली नाही. नटरंग, बालगंधर्व- माफ करा.

मला आवडलेले अलिकडचे मराठी सिनेमे रेस्टॉरन्ट, गजर.. बास फार नही.

गंध फार आवडला नाही. काहीतरी मिसिंग होते.

गजेन्द्र अहिरेंचे सिनेमे डोक्यात जातात. भावे-सुकथनकर ठीक. डॉक्युमेन्टरीज म्हणून बघायला ठीक.

मेलोड्रॅमेटिक असूनही मातीच्या चुली मधला बराचसा भाग आवडला.

बहुधा मला मराठी सिनेमांच्या बाबतीत माझं शहरी जगणं ज्यात प्रतिबिंबीत होतं, अगदी जसंच्या तसं नाही, पण शहरी.. ते सिनेमे आवडतात. मजा म्हणजे हिंदी सिनेमांच्या बाबतीत अशी काहीच अट नाही.

दादा कोंडकेंचे सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा सुद्ध एन्जॉय केलेले आठवताहेत.

टीव्हीवर पाहीलेल्या सिनेमांमधे मला आश्चर्यकारकरित्या काही तमाशापट बारकाईने आठवताहेत. नावं आठवत नाहीत. पण लिला गांधी, जयश्री गडकर, अरुण सरनाईक, चंद्रकांत्-सूर्यकांत वगैरे डोळ्यांपुढे आहेत. या खास दूरदर्शनी आठवणी म्हणायला लागतील. रंगल्या रात्री अशा आठवतो आहे. एक गाव बारा भानगडीही आठवतो.

२२ जून आवडला होता. अगदी भारावले वगैरे होते. का ते आठवत नाही. विषयामुळे असू शकतं.

जुन्या काळात मला पुन्हा पुन्हा बघायला आवडतात ते मुंबईचा जावई, घरकुल, वर्‍हाडी-वाजंत्री आणि त्यानंतर एकदम उंबरठा (यातही पुन्हा शहरी पार्श्वभूमीची नावे जास्त येताहेत).

सिंहासन- उषःकाल होता होता आणि अभिनयाकरता, पटकथेकरता कितीही वेळा बघायला आवडेल.

क्लासिक मराठी सिनेमा अजून यायचा आहे.

सगळा लेखच आवडला आणि पटलाही बहुतांश ! तिसरा पॅरा , नवे तरुण.... अगदीच अनुमोदन . मोडकांच्या संगीताचा उल्लेख..खूपच आवडलं हे ! मलाही खूप आवडतात त्यांची गाणी ! अस्मिता चित्रचा 'आनंदाचं झाड' ही आवडला होता मला ( तेव्हा) . आणि हो ,शेवट एकदम खास !

आवडला लेख.
पण दूरदर्शनवर पाहिलेल्या आणि नंतरच्या मराठी चित्रपटांबद्दल लिहिलंत तर अगदी त्या वयात/काळात डोक्यात जाणारे पाहुणी, तू सुखी रहा हे आणि असे अनेक 'माहेरची साडी'चे पूर्वज पाहण्यात आले नाहीत की तिथे 'obliviate' केले?

आवडला.

नटरंग, बालगंधर्व माफ कराच. त्या लिस्टीत नवीन तुकाराम ही माफ कराच. असो

अवांतरातले २ आणि ४ चे मुद्दे खूप पटले.
अर्ध्या हळकुंडाने पिवळी नटमंडळी पोत्याने आढळतात. प्रेक्षकही २ एपिसोडात दिसलेकी त्यांना 'लॉरेन्स ऑलिव्हिए' च्या एवढं मोठ्ठं करून ठेवतात. असो..

मराठी डॉक्यु आणि शॉर्टस पोचत नाहीत हे अगदी खरं आहे. गणिताशी झटापट करताना नाकी नऊ येतात केवळ मराठीच नाही तर हिंदी वा इंग्रजी मधेही हीच वस्तुस्थिती आहे. छोट्या छोट्या पातळ्यांवर अनेकांचे प्रयत्न चालू असतात पण म्हणावं तसं बाळसं या प्रयत्नांनी अजून धरलं नाहीये. आशा करूया हे घडेल अशी.

तार्‍यांचे बेट पाह्यला नाहीस का? सध्या येऊन गेलेल्या सिनेमांमधे ताजेपणा, साधेपणा, सहजपणा या बाबतीत त्या सिनेमाचा उल्लेख मस्ट आहे. Happy

छानच Happy मते आणि प्रतिक्रिया वैयक्तिक असल्या, तरी हा प्रदीर्घ काळाचा आढावा आहे, जे करणं सोपी गोष्ट नाही.

मी स्वत:, काही अपवाद वगळता, जितक्या समरसतेने हिंदी सिनेमे पाहते, हिंदी गाणी ऐकते, तितकी मराठी सिनेमे-गाणी यात कधीच रमू शकले नाही. अनेकदा विचार करूनही याचं कारण मला कळलेलं नाही. तू उल्लेख केलेले बहुतेक सर्व सिनेमे पाहिलेले आहेत. पण ते अशा प्रकारे मनात रुतून इत्यादी बसलेत असं मला वाटलं नाही, कधीच.

सुरेख लेख.

प्रत्येकाचं चित्रपटांशी असलेलं नातं किती वेगळं आणि तरीही किती सारखं असतं हे पहिला प्यारा वाचतानाच लख्ख जाणवलं. आता तर मी फिल्म फेस्टीव्हलला जाणंही टाळतो कारण एकामागून एक चित्रपट पाहिले की मेंदू हँग झाल्यासारखा वाटतो. गंमत म्हणजे याच डीडीच्या 'सेक्युलर' संस्कृतीत वाढूनही सिंहासन, साधी माणसं, २२ जून सारखे अपवाद वगळता मराठी चित्रपटांशी कधीच पूर्णपणे समरस होता आलं नाही. (यामागे इतर वैयक्तिक कारणेही आहेत त्यात जात नाही. ) उदा, दीवार किंवा काला पथ्थरचा अमिताभ जसा आत खोलवर रूतून बसलाय, तसं मराठीच्या बाबतीत झालेलं आठवत नाही. आता अमिताभने ब्लॉगवर कितीही स्वस्तुती केली, रोज स्वतःचे फोटो लावले तरी अशा भूमिकांसाठी आणि त्याच्या आवाजासाठी त्याला सगळं माफ आहे.

छान लिहिलंस. Happy 'वजीर'चा उल्लेख राहिला असं वाटतं. तसे अनेक राहून गेले असतील खरं तर.

आवडते ती या नवीन तरुण पब्लिकची दंभ दाखवून द्यायची वृत्ती >> अगदीच!
सोपेच करुन ठेवायचे सगळे >> Happy खरं आहे. अनेक काळ्यागोर्‍या बर्‍यावाईट धाग्यांच्या वीण बघताना नक्की कुठचे धागे का नि कशासाठी आवडले, कुठचे खुपले ते शेवटी सांगता येत नाही. 'मराठीप्रेमापोटी' हे एक सोयीस्कर आणखी आहेच!

छान लिहीले आहेस रैना. Happy शेवटचा पॅरा खासच. Happy

मी स्वत:, काही अपवाद वगळता, जितक्या समरसतेने हिंदी सिनेमे पाहते, हिंदी गाणी ऐकते, तितकी मराठी सिनेमे-गाणी यात कधीच रमू शकले नाही. अनेकदा विचार करूनही याचं कारण मला कळलेलं नाही. >>> + १ लली Happy
गेल्या १०-१२ वर्षात तर एकही म. चि. ( याला आश्चर्यकारक अपवाद श्वास चा - तेही तो इथे लागला म्हणून) पाहिला नाही. Sad हिंदी सुध्दा १-२ च पाहिलेत म्हणा..

छान लिहिलय.

माझ्यापण आठवणी अश्याच विस्कळीत. पण माझा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कायम येणेजाणे, असल्याने
ते वातावरण चित्रपटात आले कि मला फार आवडायचे.
तमाशापट देखील आवडायचे.

टिळा लाविते मी रक्ताचा, मला तुमची म्हणा, हर्‍या नार्‍या जिंदाबाद, वारणेचा वाघ, सुगंधी कट्टा, डोंगरची मैना,
पुढारी, केला इशारा जाता जाता, गणानं घुंगरु हरवलं, मल्हारी मार्तंड असे आवडते चित्रपट होते.

गजेंद्र अहिरे पट, एखाद दुसरा आवडला पण मग तेच कलाकार, तेच वातावरण बघून कंटाळा यायला लागला.

कधी कधी तर उगाच सिडी घेतली, असे पण वाटायचे.

तार्‍यांचे बेट आवडला होता.

दादा कोंडके यांचे पहिले २/३ अगदी आम्ही सर्वांनी थिएटरला जाऊन बघितले होते. मग मात्र द्वर्थी संवाद आणि विचित्र उच्चारातली गाणी, यामूळे बघावेसे वाटते नाहीत.

सुंदर झालाय लेख. आवडलाच....
साजिरा म्हणतो तसे काही उल्लेख राहुन गेलेत पण भावना पोहोचल्या हे महत्वाचे ! खुप छान... Happy

मस्त लिहिलयस रैना, एकदम नेटक Happy

माझ्या चित्रपटाशी जुळलेल्या आठवणी मुख्यतः गाण्यांमुळे, माझेही काही अपवाद वगळता फारसे मराठी चित्रपट बघीतले गेले नाहीत. तुकाराम (जुना) चित्रपटाबरोबर मला कथा, गाणी आणि कलाकारांसकट अतिशय आवडलेला एक जुना चित्रपट म्हणजे ही वाट पंढरीची, ज्यात पु ल देशपांडेंनी काम केलय.

शेवटचा परिच्छेद लईच भारी रैना.
मराठी चित्रपट म्हटले की मला 'थरथराट' 'पछाडलेला' 'झपाटलेला' हेच आधी आठवतात.
आवडलेल्यांमध्ये खास उल्लेख करायचा तर कळत-नकळत, उंबरठा, सर्जा, श्वास, तार्‍यांचे बेट ....

सुंदर लिहिलेय.......

मराठीला पहिल्यापासूनच समहाऊ "बॉलीवूडशी" स्पर्धा करत टिकत रहावं लागलय..... त्यात साऊथ सारखं भाषेच्या (आणि आपल्या स्टार्सच्या) प्रेमाखातर धो धो सिनेमा चालवणारे प्रेक्षक मराठीत नाहीत.... बेटर चॉईस सहज उपलब्ध असला की हे असं होत असावं बहुधा....... साऊथमध्ये त्यांच्या भाषेव्यतिरिक्त इतर चित्रपटांना इतका वाव आणि भाव मिळतच नाही त्यामुळे ते लोक आपल्या चित्रपटांच्या प्रेमातून बाहेर पडतच नाहीत आणि मग ती इंडस्ट्री चालते..... सगळी आर्थिक गणितं जमून येतात.

तरीही दर्जात्मक पाहिलं तर राजाभाऊ परांजपे, व्ही. शांताराम यांचे चित्रपट, त्या काळातले नायक चंद्रकांत सूर्यकांत, अरूण सरनाईक, रविंद्र महाजनी, राजा गोसावी, शरद तळवलकर खणखणीत नाणी होती.
आपला त्यातच्या त्यात होऊन गेलेला सुवर्णकाळ मला नेहमीच ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा वाटतो. ते चित्रपट आजही कुठे लागले तर एकटक पहावेसे वाटतात. हवेहवेसे वाटतात....... "हा माझा मार्ग एकला" तर मला य्य म्हणजे य्य च आवडतो..... हॅट्स ऑफ टू राजाभाऊ.

मधल्या विनोदी लाटेच्या नावाखाली आपलं आभाळ लयाला गेलयं असं राहून राहून वाततेय..... Sad
आता नव्या दमाचे दिग्दर्शक नवे विषय हाताळतायत पण मार्केटिंग प्रमोशन्स मध्ये अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. नव्या लोकांच्या प्रयत्नांना शुभेच्छा...!!!!

चांगले मराठी चित्रपट आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पहा. सीडीची वाट न पाहता.

जाताजाता, एक खेदजनक नोंद. "बदाम राणी गुलाम चोर" पहायचा ठरवला होताच... पण पहिले दोन आठवडे जमला नाही...... आनी अचानक तो सिनेमा मुंबई थिएटरातून गायबच झाला... असा की हा चित्रपट आला होता का इतकी शंका यावी. जिथे होता ते शोज ऑड टायमिंगचे.......
हे असेच होणार असेल तर कितीही चित्रपट चांगले आले तर लोकांपर्यंत कसे पोचणार????
आणि लोकांनी तरी प्रयत्नपूर्वक त्या चित्रपटांपर्यंत पोचायचेच कसे???? Sad

Pages