भयानक : अंतिम भाग

Submitted by यःकश्चित on 30 May, 2012 - 14:30

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
भयानक भाग ५
भयानक भाग ६
भयानक भाग ७
भयानक भाग ८
भयानक भाग ९

=========================================================================

हे सारे काय चालू आहे हे विश्वासला कळण्याच्या आतच -

त्याला जाग आली. तो त्याच्या बेडरूममध्ये पलंगावर होता. घामाने डबडबला होता.

आधी त्याला कळलेच नाही कि तो कुठे आहे. हळूहळू त्याच्या लक्षात आले की आपण आपल्याच बेडरूममध्ये आहोत आणि आता झोपेतून उठतो आहोत. म्हणजे हे सारे स्वप्न होते कि काय ? की नाना, मोहनराव, दाजी हे सारे मनाचे खेळ होते आपल्या ! पहिलीच रहस्यमय कादंबरी आणि त्याचा आपल्या मनावर इतका परिणाम व्हावा ! हे नक्की स्वप्न होते का खरच असा काही घडलं होतं आणि नेमक काय झालं ते आठवत नव्हत ? काहीच कळेना. त्या विचित्र ठिकाणी मी बेशुद्ध झालो असेन, मग कुणीतरी मला घरी आणून सोडलं असावं आणि मला आता शुद्ध येतीये. पण त्या विचित्र ठिकाणी तर कुणीच नव्हतं. तिथे तर आम्ही तिघेच होतो. तो अन् नाना तर गेले होते. मग मला इथे कुणी आणून सोडलं ? दाजी कुठे गेले ? मोहनरावांच काय झालं पुढे ? आणि महादू.....?

काहीच कसं आठवत नाहीये ! बहुतेक तलुला माहित असावं. तिला नक्की माहित असणार आपल्याला इथे कुणी आणून सोडलं ते. हो. तीच आता खर काय ते सांगेल. त्याने अंगावरचं पांघरून बाजूला केलं. चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि तो तलुला हाक मारणार इतक्यात -

बेडरूममध्ये त्यावेळी सारखा शुभ्र पांढरा प्रकाश पडला. खोलीत आता पांढऱ्या रंगाशिवाय काहीच दिसत नव्हते आणि तो पुन्हा एकदा त्या शुभ्र अवकाशात उभा होता. विश्वास पुन्हा संभ्रमात पडला.

आता पुन्हा इथे मी कसा आलो !

त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून पहिले. ते नाना होते. विश्वास आनंद आणि आश्चर्य अशा मिश्र भावनेने त्यांच्याकडे पाहत म्हणाला ,

" नाना .... बरं झालं. तुम्ही जिवंत आहात. नाना तो मेला. दामल्यांचा शत्रू मेला. पण दाजी आणि मोहनराव कुठे आहेत ? आणि मी इथे कसं काय आलो - "

" अरे थांब थांब किती बोलशील आणि किती प्रश्न विचारशील. जरा दम खा. आपण इथे नकोच बोलायला. आपण तुझ्या घरीच जाऊया. "
असे म्हणून त्यांनी विश्वासचा हात पकडला आणि ते तिथून अदृश्य होऊन विश्वासच्या बेडरूममध्ये प्रकटले. नानांनी विश्वासला पलंगावर बसवले आणि ते दरवाजाची कडी लाऊन आले. बसता बसता विश्वासला पलंगाच्या पलीकडे पडलेली ती नानांची रोजनिशी आणि त्यातून बाहेर आलेला त्या पत्राचा तुकडा दिसला.

" ती वही राहू दे तिथेच. आता तशीही तिची काहीच गरज उरली नाहीये. " असे म्हणून नाना विश्वासच्या शेजारी येऊन बसले आणि बोलू लागले,

" मी तुझ्या सर्व शंकांना उत्तरे देतो. तू फक्त शांतपणे ऐकून घे. मध्ये काहीही बोलू नकोस. आता तुला पहिला प्रश्न पडला असेल की मी जिवंत कसा झालो तर याचं उत्तर आहे की मी जिवंत नाहीये. "

हे ऐकून विश्वास दचकला.

" घाबरून नकोस. माझे बोलणे संपल्यावर तुला सर्व गोष्टींचा खुलासा होईल. तर ऐक.

फार वर्षांपूर्वी ... नाही नाही युगांपुर्वी म्हणजे सत्ययुगात, जेंव्हा हे विश्व सत्य आणि पवित्रता या दोन गोष्टींच्या आधारावर चालू होते. ज्ञान, ध्यान व तपस्या यांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व होते. मानवाचा प्रत्येक विचार हा शुद्ध आणि पवित्र असायचा. संपूर्ण मानवजाती देवाकडून चालवली जायची. आश्रम हे दुष्टपणा आणि छळरहित असायचे. आणि नाट्य, याची त्याकाळी गरजच नव्हती कारण तेंव्हा प्रत्येक माणूस आनंदी असायचा. कारण तेंव्हा कुणी गरीब नव्हता न श्रीमंत. त्यामुळे कुणी कुणाला राबवायचे नाही. जे जे मानवाला हवे असायचे ते त्याच्या इच्छाशक्तीवर मिळायचे. परिणामी माणूस सुखी असायचा.

त्या सत्ययुगाच्या अखेरच्या कालखंडात सांदिप नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. त्या ऋषींच्या आश्रमात देवराज आणि भोईराज नावाचे दोन भाऊ शिक्षण घेत होते. पूर्वी गुरुकुलात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आश्रमातील काही कामे वाटून दिली जायची. तशीच त्या दोघांनाही ऋषींनी काही कामे वाटून दिली होती जसे कि नदीवरून पाणी भरून आणणे, लाकडे तोडून आणणे इत्यादी.. दोघेही मिळून कामे करत. त्यांच्यामध्ये इतके सख्य होते की कुणालाही त्यांचा हेवा वाटावा. जणू त्यांना द्वेष इर्षा भांडण हे शब्दसुद्धा माहित नसावे. आणि तो काळही तसाच होता.

असेच एकदा ते नदी किनारी पाणी भरून आणायला गेले होते. त्या दिवशी ते नेहमीच्या वाटेने न जाता थोड्या वेगळ्या मार्गाने गेले होते. पाणी भरून परतत असताना वाटेत त्यांना एक रथ दिसला. तो धुराळा उडवत मार्गक्रमण करत होता. बहुतेक त्याला घाई असावी. त्यामुळे तो रथ वेगात हाकत होता. तो रथवान त्यांच्यासमोरून वेगाने गेला आणि जाता जाता वाटेत असलेल्या कडेच्या एका दगडावरून चाक गेल्याने रथाचा मागचा भाग हिंदकळला आणि सोन्याच्या काही सुवर्णमुद्रा रथातून उडून बाहेर पडल्या. देवराज त्या रथवानाला हक मारणार तोच भोईराजने त्याला मागे खेचले. तो मागे ठेचकाळला. पुन्हा सावरून तो हाक मारणार होता पण तोपर्यंत रथ फार लांब गेला होता.

भोईराजने त्या सुवर्णमुद्रा उचलल्या आणि उपरण्यात ठेऊन गाठ मारली. देवराजला हे पाहून राग आला. तो भोईराजला झापू लागला.

" हे बरोबर नाही. जा आत्ताच्या आत्ता त्या वाटेने जा आणि तो रथ कुणीकडे गेला हे बघून ह्या सुवर्णमुद्रा परत करून ये. "

" हे बघ. आपण काही या मुद्रा चोरल्या नाहीत. त्या रथातून पडल्या होत्या. चल आता आश्रमात पाणी भरायचं आहे. "

" पण गुरुदेवांना कळाले तर काय होईल तू जाणतोसच. "

" आपण इथे काय केलं ते त्यांना कसे काय कळेल ? आणि मी ह्या मुद्रा नीट लपवून ठेवीन. तू काळजी करू नकोस."

" तरीही मला हे तुझ वागणं पटत नाहीये. पण आता मोठा भाऊ म्हणून गप् बसतो."

ते दोघे आश्रमात गेले. त्यांनी आणलेले पाणी ठेवले. लाकडेपण तोडून घेऊन आले. दुपारच्या अध्ययनासाठी ते आश्रमात असलेल्या पिंपळाच्या पारासमोर बसले. त्यांचा अंदाज होता की सांदिप ऋषींना काही कळणार नाही. पण त्यांचा अंदाज साफ खोटा ठरला कारण त्यांना अजून ऋषींच्या शक्तीचा अंदाज नव्हता.

थोड्याच वेळात ऋषी आले. त्यांची मुद्रा संतप्त होती. डोळे लालभडक झाले होते. आल्याआल्या त्यांनी नजर देवराज आणि भोईराजकडे टाकली आणि जोरात ओरडले,

" पाप्यानो उठा आणि चालते व्हा ह्या आश्रमातून. या आश्रमात तुमच्यासारख्या अधर्मी व्यक्तींना यत्किंचितही थारा नाही. एका क्षणात चालते व्हा माझ्या डोळ्यांसमोरून. "

त्यांच्या बाकी शिष्यांना समजेना की ह्या आदर्श बंधूंना गुरुवर्य असे का ओरडत आहेत. पण लगेचच या गोष्टीचा खुलासा झाला. देवराज आणि भोईराज उठले , ऋषीच्या जवळ जाऊन त्यांचे पाय धरण्यासाठी खाली वाकले. तोच ऋषी मागे सरकले आणि म्हणाले,

" व्हा मागे. तुमची लायकी नाही. भोईराजने चूक केलीच. पण देवराज तू कमीतकमी मला तरी येऊन सांगायचस. पण दोघांनी एक चकार शब्द काढला नाही आणि चक्क मुद्रा लपवून ठेवल्या. "

" पण गुरुवर्य आम्ही फक्त - "

" तुम्ही जे केलं ते चौर्यकर्म नाही पण तेही एक प्रकारचे अनैतिक कामच. याबद्दल तुम्हाला माफी नाही. "

ऋषी अतिशय संतापले होते. त्याचा संतापात त्यांनी त्या दोघांना शाप दिला.

" तुमच्या या गैरवर्तनाबद्दल मी तुम्हाला शाप देतो की कलीयुगात तुम्ही पुन्हा या पृथ्वीवर जन्म घ्याल आणि तेंव्हा तुम्ही एकमेकांचे शत्रू असाल. तुम्ही एकमेकांचा जीव घ्याल. तुम्हाला गैरवर्तन करण्याची इतकीच हौस आहे ना मग तुमच्यासाठी कलियुगच योग्य आहे. तुम्ही कलीयुगात पुन्हापुन्हा जन्म घेऊन याची पुनरावृत्ती करीत राहाल आणि तुम्हाला कलियुग संपेपर्यंत मोक्ष मिळणार नाही. "

दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आता कलीयुगाच्या मानाने ती एक क्षुल्लक गोष्ट असली तरी सत्ययुगात हा एक मोठा अपराध होता. ऋषींनी भयंकर शाप दिला होता. या शापाच्या विचारानेच त्या दोघांच्या पोटात गोळा आला. त्यांना आता त्यांच्या चुकीची जाणीव होऊन ते या चुकीसाठी प्रायश्चित्त घ्यायला तयार होते. पण त्यासाठी इतका भयंकर शाप !

ते दोघे सांदिप ऋषींसमोर सपशेल आडवे झाले आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घालू लागले. रडून भेकून ते माफी मागू लागले.

" गुरुवर्य आमचा अपराध आम्हाला मान्य आहे. पण त्यासाठी एवढा मोठा शाप नका देऊ. आम्ही या चुकीचे हवं ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत. "

ऋषींचा राग किंचित कमी झाला होता. त्यांना वाटले की खरच यांना यांच्या चुकीची जाणीव झाली आहे.

" हे पहा माझा शाप तर मी मागे घेऊ शकत नाही. पण मी तुम्हाला उःशाप देईन. कलियुग सुरु होऊन पाच हजार वर्षे झाल्यावर एक कथाकार तुमच्या चालू जन्मावर कथा लिहेल. तेंव्हा तो कथाकारच तुमची मुक्तता करेल. त्याच्याकडे दैवी शक्ती असतील पण त्या तुम्हाला जागृत कराव्या लागतील. "

" हि होती कथा देवराज आणि भोईराज या भावांची "

एवढे बोलून नाना थांबले. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा बोलू लागले,

" तो देवराज मीच आहे आणि 'तो' म्हणजे भोईराज. तुझे खूप खूप धन्यवाद. आमची या कलीयुगातून मुक्तता केल्याबद्दल. "

विश्वास थोडासा गोंधळात पडला. हि कथा ऐकून तो आत्तापर्यंत घडलेल्या साऱ्या गोष्टींचा संबंध जुळवू लागला.

" मग मोहनराव, महादू, दाजी याचं काय ? " - विश्वास.

" ते फक्त एक आभास होते. ती या उःशापासाठी तयार करण्यात आलेली माया होती. त्या व्यक्ती अस्तित्वातच नाहीत. आणि आता त्या कुणाला आठवणारदेखील नाहीत."

" म्हणजे तलुलासुद्धा मोहनराव आठवणार नाहीत ? "

" अर्थात. कारण हि सर्व माया होती आणि आता माझ्या जाण्यानंतर काळसुद्धा मागे जाईल त्या दुपारीपर्यंत जेंव्हा भयानकच्या प्रकाशनाला आठवडा उलटला होता आणि अल्पावधीत त्याच्या ५०० च्या वर प्रती खपल्या असतील. कुणालाही काहीच आठवणार नाही, फक्त तुला सोडून. "

विश्वासच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. त्याच्या चेहऱ्यावर आता फक्त आणि फक्त समाधान होते. आता त्या खोलीत पूर्ण शांतता होती.

त्या शांततेचा भंग करीत नाना म्हणाले,

" तर मग विश्वा, मी निघतो आता मुक्तीच्या प्रवासाला. "

आणि पुन्हा एकदा खोलीत शुभ्र पांढरा प्रकाश पसरला अन् काही क्षणात तो प्रकाश नाहीसा झाला.

आता त्या खोलीत नाना नव्हते. मगाशी जमिनीवर दिसलेली ती रोजनिशी आणि पत्रही तिथे नव्हते. तो बाहेरच्या खोलीत आला आणि सोफ्यावर बसला. त्याने स्वयपाकघरात काम करत असलेल्या तलुला ओरडून सांगितले,

" तलु, आज संध्याकाळचा स्वयपाक करू नकोस. आज आपण हॉटेलला - "

काहीतरी विचार मनात येऊन तो एकदम थांबला. तेवढ्यात त्याच्या कानाशी एक मंद हलकासा ओळखीचा आवाज आला. तो आवाज नानांचा होता.

" जा. बिनधास्त जा. आज तिथे मोहन तुला हाक मारणार नाही. "

समाप्त

गुलमोहर: 

सर्व मायबोलीकरांना माझे मनःपूर्वक धन्यवाद..

हि माझी पहिलीच कथा आज पूर्ण झाली आहे.

मला कथा पोस्ट करण्यास उशीर होत असूनही त्यांनी माझी कथा वाचली.

आणि वेळोवेळी मला कथा लिहिण्यास प्रोत्साहन दिले ज्यामुळे मी हि कथा पूर्ण करू शकलो.

तसेच त्यांनी वेळोवेळी चुकाही सांगितल्या जेणेकरून मी लेखनात सुधारणा करू शकलो.

पुनःश्च सर्व मायबोलीकरांना माझे मनःपूर्वक धन्यवाद..

khupach chan... sagle bhag ek sath vachlyane kalale.... aavdli tumch bhayanak... pan evdhi bhayanak navti... pan bandhun thevnari hoti...

छान कथा, अभिनंदन !!!

भयानकला मुक्ती मिळाली.. आता भुक्कड आणि भैराळ्याला मुक्ती मिळो. >>> त्यांचा आत्मा माबोवर घुटमळतोय. Rofl