भयानक : भाग ९

Submitted by यःकश्चित on 27 May, 2012 - 02:30

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
भयानक भाग ५
भयानक भाग ६
भयानक भाग ७
भयानक भाग ८

=========================================================

.....आणि अखेरीस पौर्णिमेचा दिवस उजाडला...

सकाळचे आठ वाजले होते. नाना व दाजींनी आन्हिक उरकले आणि झटपट तयारीला लागले. काही मंत्र पुटपुटत ते जागेची आवराआवर करत होते जिथे बसून ते वार करणार होते. तीन आसने मांडून त्याभोवती संरक्षण कवच तयार केले. तसेच त्यांनी वार करण्यासाठी आणि संरक्षण लागणारी साहित्य सामग्री जवळच ठेवली होती. कारण कधी कशाची गरज पडेल ते सांगता येत नाही. नानांनी विश्वासला बोलावले आणि त्याला एका आसनावर बसून नामस्मरण करण्यास सांगितले. विश्वासला कालच्या विश्रांतीने तरतरी आली होती. त्याच्या चेहऱ्यावर आता ते तेज दिसत होते जे त्याला दाजींच्या पहिल्या भेटीत त्यांच्या चेहऱ्यावर दिसले होते. तो आता युद्धासाठी पूर्णपणे तयार होता. विश्वासचे नामस्मरण चालू होते. नाना व दाजी सुद्धा मंत्रोच्चार करून वातावरणास अधिक बलवान बनवत होते. आता ते 'त्या'च्याकडून होणाऱ्या वाराची वाट बघत होते.

वाट बघता बघता दुपार टळून गेली होती. अजूनपर्यंत त्याच्याकडून एकही वार झाला नव्हता. यामुळे विश्वास अचंबित झाला होता. त्याला काळातच नव्हत की आजच पौर्णिमा आहे मग तो अजून वार कसा काय करत नाहीये. शेवटी न राहवून त्याने नानांना विचारलं,

" नाना, दुपार टळत चाललीये आणि अजून - "

" अरे विश्वा..." असे म्हणून ते केवळ हसले. त्यांच्या हसण्याचा अर्थ न कळून विश्वासने प्रश्नार्थक मुद्रेने दाजींकडे पहिले.

" हि वादळापूर्वीची शांतता आहे. " - दाजी

" आणि माझ्या अंदाजानुसार तो आज संध्याकाळी सहानंतर वार करणार. कारण वाईट शक्ती दिवसा कमजोर ठरतात. त्या रात्री बळकट होतात. " नानांनी दाजीच्या उत्तरच स्पष्टीकरण दिलं.

नानांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. सुर्यनारायण अस्ताला जात होता. हळूहळू अंधार पडत चालला होता. जसा जसा काळ पुढे सरकत होता तसतसे वातावरण भयानक होत चालले होते. शांत पण गुढ वातावरण होते ते. दाजीच्या म्हणण्याप्रमाणे हि वादळापूर्वीची भयाण शांतता होती. आणि ते खरच होतं. पण थोड्याच वेळात या वादळाचं आगमन होणार होतं.

नाना क्षितीजावरच्या अस्ताला चाललेल्या सूर्याकडे एकटक पाहत होते. तो हळूहळू खाली जात होता. आणि सूर्याचा शेवटचा किरण अंधाराने गिळला.

तेवढ्यात.......ते नानांच्या नजरेतून सुटले नाही. जांभळी छटा पसरलेल्या क्षिताजावर नारिंगी ठिपका दिसत होता जो क्षणाक्षणाला वाढत होता. तो नारिंगी गोळा त्यांच्या जवळ येत होता. नाना पटकन ओरडले, " तयार रहा.." . एवढ्यात तो जवळ आला सुद्धा. त्याचा वेग प्रचंड होता. दाजी आणि विश्वासने मागे वळून आकाशाकडे पहिले आणि ते एकदम दचकले. तो गोळा प्रचंड वेगात येऊन त्यांच्यावर आदळणार होता. त्या गोळ्याला इतक्या जवळ पाहून विश्वासने डोळे मिटले आणि एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला. त्याने डोळे उघडून बघीतले. गोळा हवेतल्या हवेत फुटला होता.
नानांनी बांधलेल्या अभिमंत्रित धाग्यांनी पराक्रम गाजवला होता. नंतर २-३ सेकंदात दुसरा निळ्या रंगाचा गोळा फुटला.

" विश्वास सुरु कर... " नाना.

विश्वासने आपल्या मुठी बंद केल्या, हात वर केले, काही मंत्र तो पुटपुटला आणि मुठींना नमस्कार करून त्याने त्या आकाशाकडे उघडल्या. विश्वासने एक यशस्वी आणि शक्तिशाली वार केला होता. त्याच्या हातातून एक हिरवा गोळा बाहेर पडून क्षितिजाकडे गेला. सलग त्याने दुसरा पिवळ्या रंगाचाही वार केला.

पलीकडून गोळे येणं काही वेळापुरत थांबलं. विश्वासचा वार त्याला लागला होता. थोड्या वेळाने पुन्हा पलीकडून गोळे आले. इथून विश्वास आणि नानांनी उतरादाखल आणखी शक्तिशाली गोळे सोडले.

बराच वेळ हे गोळेयुद्ध चालू होतं. अधूनमधून वेगवेगळया आकाराचे गोळे फेकले जायचे. कधी चांदणीचा...तर कधी पानाच्या आकाराचा...कधी चौकोनी तर कधी त्रिकोणी...

जवळ जवळ अर्धा तास हे चालू होत. दोन्हीकडचे आता वार करून थकले होते. नाना व विश्वासवर अजून एकही वार झाला नव्हता. कारण अभिमंत्रित धागे. पण त्यालाही काही मर्यादा होत्या. धागे अभिमंत्रित असले तरी बरेच शक्तिशाली वार सलग झेलल्यामुळे तेही आता थोडे क्षीण होत होते. कुठल्याही क्षणी आता वार विश्वासला लागणार होता. आणि तो त्याच्या तयारीत होताच. "त्या"ने अनेक वार झेलूनही तो अजूनही तेवढेच शक्तिशाली वार करत होता कारण त्याने शक्तिशाली शक्तीकामना यज्ञ केला होता.

इतक्यात एक गोळा आला आणि तो हवेत न फुटता दाणकन विश्वासवर आदळला. अचानकपणे झालेल्या वारामुळे विश्वासला मूर्च्छा आली. दाजी येऊन विश्वासला धरणार तोच विश्वासने स्वतःला सावरले. विश्वास आता त्या भट्टीत तयार झाला होता. तोपर्यंत दोन वार नानांनी केले आणि म्हणाले,

" आता काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवा. तू आत्मा-संमोहन कर आणि बुवाला ताब्यात घे. मी आणि विश्वास इकडून "त्या"च्यावर एकत्रित वार करतो. "

दाजींनी डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरु केले. पलीकडून आलेल्या दोन वारांना विश्वासने संरक्षण वार करून चोख प्रत्युत्तर दिले. नंतरचे काही वार असेच संरक्षणात्मक केले गेले.

दाजींना काहीसे झटका आल्यासारखे झाले. ते फुटभर हवेत उडाले आणि जमिनीवर पडले. ते उठले आणि ओरडले,
"नाना, पटकन......" आणि अचानक नानांना बुवांचा आवाज ऐकू आला,
" अरे नीच माणसा... " " ..त्याच्यावर वार .." " शेवटी तू इथे मला " " करा " " आणलाच ..."

" विश्वास , बुवाची आत्मा दाजीच्या ताब्यात आहे. पटकन तुझा हात माझ्या हातात दे."

विश्वासने व नानांनी एकमेकाच्या मुठी जुळवल्या आणि काही मंत्र म्हणले. एवढ्यात समोर आकाशात एक प्रचंड मोठा आगीचा गोळा दिसला आणि ह्या दोघांनी मुठी तिकडे केल्या. त्यांच्या हातातून एक निळसर गोळा बाहेर पडला आणि आकाशातल्या त्या गोळ्यावर आदळला आणि आसमंतात शुभ्र प्रकाश पसरला. त्या प्रकाशाने विश्वासचे डोळे दिपले. तो प्रकाश त्याच्या डोळ्यांना सहन होईना. म्हणून त्याने डोळे मिटले. एवढा तेजस्वी प्रकाश पाहिल्यामुळे त्याच्या मेंदूला किंचित बधिरता आली होती.

त्याने प्रकाश कमी झाला का पाहायला डोळे उघडले आणि.......

तो जंगलात नव्हताच मुळी. तो एका अशा ठिकाणी होता जिथे ना जमीन होती ना आकाश होते ना झाडे ना पाणी होते. फक्त आणि फक्त पांढरा रंग दिसत होता. तो कशावर उभा होता हेही त्याला माहित नव्हते. फार विचित्र जागा होती ती. त्याने सभोवार नजर फिरवली आणि त्याला नाना आणि "तो" चा मृतदेह आढळला. तो नानाच्या जवळ गेला. आसपास दाजी कुठेच दिसत नव्हते. त्याला ते दृश्य पाहून अतिशय दुःख झालं. आपण आपली सर्व शक्ती लावून लढलो. पण आपला काहीच उपयोग झाला नाही. त्याने नानांना मारले. शेवटी वाईटाचाच विजय झाला. पण इथे अजून एक गोष्ट घडली होती ती म्हणजे तोही मेला होता. हे दोघे कसे मेले ते त्याला कळेना.
पण त्याला फार दुःख झालं. त्याने नानाचा हात हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले.

अचानकपणे त्याच्या डोक्यात भयंकर कळा येऊ लागल्या. तो डोके गच्च धरून बसला. त्या वातावरणाचा पांढरा रंग आता हळूहळू नाहीसा होत होता आणि एक काळी पोकळी दिसत होती.

हे सारे काय चालू आहे हे विश्वासला कळण्याच्या आतच -

क्रमशः

गुलमोहर: 

पुढील भागाच्या प्रतिक्षेत. आता पुढचा भाग शेवटचाच भाग ना!>> हो पण बहुदा पुढच्या महिन्यात. Sad

प्लिज पुढचा भाग लवकर लिहा. कथा चांगली आहे.

हे सारे काय चालू आहे हे विश्वासला कळण्याच्या आतच - क्रमशः

काय हो वाक्य पण क्रमशः
आता प्लीज दहावा भाग लवकर येउ द्यात.

कथा चांगली जमलीये.. पण आधीच्या भागात काही ठिकाणी नाना आणि दाजी ह्यांच्यात घोळ झाल्यासारखा वाटतो आहे