भयानक : भाग ८

Submitted by यःकश्चित on 30 April, 2012 - 12:31

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
भयानक भाग ५
भयानक भाग ६
भयानक भाग ७

=========================================================

" हलगर्जीपणा करू नकोस. याचा मला नाही तुलाच तोटा होईल. "

बुवा संतापले होते.कारण 'त्या'चे यज्ञात लक्ष नव्हते. मंत्रपठणाच्या वेळी दर एक चरण झाल्यावर पळीभर तूप आहुती द्यायची असते. पण तो कुठल्यातरी दुसऱ्याच विचारात मग्न होता. त्याने याधी दोन वेळा आहुती चुकवली होती आणि त्यामुळे त्यांना तो यज्ञ दोन वेळेस परत सुरुवातीपासून सुरु करावा लागला होता. त्याची आहुती चुकण्याची हि तिसरी वेळ होती. त्यामुळे बुवा भयंकर संतापले होते. त्यांना वेंधळेपणा आणि बेशिस्त मुळीच खपत नसे.

" आधीच तर तुझ्यामुळे आपल्याला हा यज्ञ दोनदा पहिल्यापासून करावा लागला आहे. आणि आता परत... तुला मी आता शेवटची संधी देतोय. यापुढे एकदाही तू आहुती चुकवली किंवा काही गडबड केली तर मी निघून जाईन. "

" नाही नाही. चुकल माझं. आता यापुढे मी नित लक्ष देऊन सगळ्या क्रिया करेन. पण तुम्ही निघून जाऊ नका. तुम्ही गेलात तर माझं काय होईल ? "

" बस बस. मी जात नाहीये पण ही शेवटी म्हणजे शेवटची संधी. तसं म्हणलं तर मी तुझ्याबरोबर असताना तुला कशाची चिंता आहे ? "

" बुवा, एक गोष्ट मी तुम्हाला नाही सांगितली. ती म्हणजे काही दिवसांपूर्वी इथे दाजी येऊन गेलाय. दाजी म्हणजे नानांचा जिवलग यार. त्याने इथे काय काय पाहिलं ते नक्की माहित नाही पण तो इथे आला होता म्हणजे नक्कीच त्याने आपली तयारी पाहिली असणार. तसेच त्याला आता आपला ठावठिकाणा पण माहित झाला. पण त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. आता - "

" त्याने काय फरक पडतो आपल्याला ? हे पहा, आपण जो शक्तीकामना यज्ञ करत आहोत. त्याचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. आता हा पाचवा टप्पा चालू आहे. आणि येत्या ८-१० दिवसात उरलेले तिन्ही टप्पे पूर्ण होतील. अर्थात तू आत्तासारखं नाही वागलास तर. मग हा यज्ञ पूर्ण होताच तू खूप शक्तिशाली होशील आणि तू केलेल्या आघाताचा ते प्रतिकारसुद्धा करू शकणार नाहीत. मग तुला तुझा वर्षानुवर्षाचा पण पूर्ण करता येईल. आता सांग आणखी काही चिंता ?"

बुवांच्या बोलण्याने 'त्या'चे समाधान झाले.

" बुवा, आता मी दुसरीकडे कुठेच लक्ष देणार नाही, कशाचा वायफळ विचार करत बसणार नाही. आता आपलं लक्ष फक्त शक्तीकामना यज्ञावर. खरच बुवा तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार करताय, त्याचे ऋण मी कसे फेडू ? "

" अरे बाळ, यात कसले उपकार. संकटात सापडलेल्या आपल्या काळ्या मायाजगतातील लोकांना मदत करणे हे माझे कामच आहे. "

" आणि म्हणूनच सारेजण तुम्हाला 'मायाराज' म्हणतात."

या वाक्यावर बुवांनी खुश होऊन एक स्मितहास्य दिले. आनंदून गेलेल्या त्या साऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने यज्ञाला सुरुवात केली.

*******

" अजून किती वेळ आहे पोहोचायला ? "

एका निर्जन रस्त्यावरून विश्वासची कार धावत होती. सहा वाजत आले होते. सूर्यदेवही जाण्याच्या तयारीत होते. पक्षी आपापल्या घरट्याकडे परतत होते. चौघेही आता एका मोठ्या मोहिमेवर निघाले होते.बऱ्याच पिढ्यांपासून चालत आलेल्या युद्धाचा आता शेवट होणार होता की इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती, देव जाणे ! पण चौघांनीही ठाम निश्चय केला होता की 'त्या'ला संपवयाचा आणि या युद्धाला पूर्णविराम द्यायचा. त्याचवेळी तिकडे 'तो'सुद्धा या चौघांच्या विनाशाची तयारी करत होता.नेहमीप्रमाणे दामले आणि 'त्या'च्यात युद्ध होणार होते पण यावेळी दोन प्रबळ शक्ती सर्व ताकदीनिशी झुंजणार होत्या. 'त्या'ची अर्ध्याधिक तयारी झाली होती. नानाच्या तयारीला अजून अवकाश होता. उद्यापासून ते यज्ञ आणि पूजा-अर्चा सुरु करणार होते. सर्व रस्ता आणि आसपासचा परिसर निर्जन होता. दूरदूरवर कुठेही जंगल वा गर्द झाडी दिसत नव्हती. इच्छित स्थळाचा नेमका अंदाज न आल्याने विश्वासने नानांना विचारले,

" अजून किती वेळ आहे पोहोचायला ? "

" अजून १५-२० मिनिटात आपण पोहचू. "

" पण इथे तर कुठेच झा..."

" अरे तू फक्त १५ मिनिटे धीर बाळग आणि स्वस्थपणे गाडी चालव. "

विश्वास शांत होऊन समोर कुठे झाडी दिसते का याचा अंदाज घेत गाडी चालवू लागला. थोड्या वेळानी नानांनी विश्वासला डावीकडे वळायला सांगितले.तिथे फक्त दोन झाडे दिसत होती. त्या दोन झाडांमधून विश्वासला गाडी घ्यायला सांगितले. विश्वास चक्रावला. ह्या दोन झाडांमधूनच कशाला बाजूने एवढी मोठी जागा असताना ? पण नानांचा आदेश त्याने पाळला. त्याने कार दोन झाडांमधून नेली आणि क्षणभर विश्वासला झटका बसल्यासारख झालं आणि लगेच परत पूर्ववत झाला तो. पण समोर जे काही दिसलं त्याला ते पाहिलं आणि जागच्या जागी त्याने कार थांबवली.

ते समोरचे दृश्य फारच विलोभनीय होते. नानांना गाडीतून उतरताना पाहून बाकीचे तिघेही कारच्या बाहेर आले. विश्वास प्रथम आपली मान वळवून मागे पाहू लागला आणि त्याला ती दोन झाडे दिसेचनात जिथून तो आला होता. मागेतर पूर्ण गर्द झाडी होती आणि एक झरा समोरून त्या झाडीत खळखळ आवाज करत वाहत होता. विश्वास परत समोर पाहू लागला. एका उंच कड्यावरून पाणी मंजुळ आवाज करीत पडत होते. ते फेसाळलेले शुभ्र पाणी झऱ्यातून वाहत होते. तो पाण्याचा वाहणारा आवाज त्या शांत वातावरणात घुमत होता. त्या हिरव्यागार वनराईतून वारादेखील गाणे गुणगुणत होता. शहरात कधी न दिसणारे ते पक्षी मंजुळ किलबिल करत होते. एकूणच वातावरण शांत आणि सात्विक होते. अशी जागा विश्वासने उभ्या आयुष्यात कधी पहिली नव्हती. त्यामुळे तो या वातावरणात हरवून गेला होता. नानांनी त्याला हाक मारली तसा तो भानावर आला.

" अरे विश्वास कुठे हरवलास ? "

" क..कुठे नाही. फार आल्हाददायक आहे इथलं वातावरण. पण आपण इथे कसे आलो ? ती दोन झाडे आणि तो निर्जन परिसर..... ? "

" अरे हीच ती जागा जिथे आपल्याला आपला यज्ञ पूर्ण करायचाय. ती मागची दोन झाडे म्हणजे गुप्त प्रवेशद्वार आहे. फार पूर्वीपासून ऋषीमुनीसुद्धा इथेच यायचे तपश्चर्येसाठी. आता ही कार इथेच राहु देत. इथून सरळ - " एका पायवाटेकडे हात दाखवत ते म्हणाले, " या पायवाटेने चालत गेलो कि आपल्याला महादेवाचे मंदिर लागेल. तिथे आपल्याला यज्ञ करायचाय. "

सारेजण त्या पायवाटेने चालत निघाले. समोर महादेवाचे मंदिर आले. सर्वानी महादेवाचे दर्शन घेतले आणि बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसले. तोच एक माणूस धापा टाकत तिथे आला आणि नानांना म्हणाला,

" अवो मालक माफी करा. जरा उशीर झालं. ते तुमच्याच राह्याची जागा सोच्च करत व्हतो. "

" असू देत. ये तुझी ओळख करून देतो. हा महादू. आपला गडी, याने अन याच्या गेल्या चार पिढ्यांनी आपली इमाने इतबारे सेवा केली आहे. आपली राहायची, खायची व्यवस्था हा बघणार आहे. तसेच युद्धातही लागेल ती मदत हा करेलच. आणि महादू, दाजीला तर तू ओळखतोच. हा विश्वास माझा नातू आणि हा मोहन माझा पुतण्या. आता जा झऱ्यातून थंडगार पाणी घेऊन ये. "

महादुने सगळ्यांना नमस्कार केला व पाणी आणायला निघून गेला.

नानांनी बोलायला सुरुवात केली.

" सर्वात पहिली गोष्ट अशी कि हे सारे करताना अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मनोनिग्रह. खंबीर मनोनिग्रह असल्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही. आणि आत्मविश्वास किंचित जरी ढळला तरी तो त्याच्या पथ्यावर पडू शकतो. म्हणून विश्वास, तू मनाची तयारी कर. या युद्धात असे बरेच क्षण येतील जे तुझे मानसिक संतुलन बिघडवतील. त्यावेळी तुला तुझ्या मनाला खंबीर ठेवावे लागेल. मला कळतंय की तुला हे सारे नवीन आहे. पण आता काही पर्याय नाहीये. अजून १० दिवस आहेत आपल्याकडे. या दहा दिवसात दाजी तुझ्या निद्रितावस्थेतील मेंदूला जागे करील. त्याच वेळात मीही इकडे शक्तिवर्धन यज्ञाला सुरुवात करेन. दाजीला आत्मा संमोहन विद्या प्राप्त आहेच. तिघांच्याही शक्ती एकत्र केल्या तर 'तो'च काय त्याचा बुवा पण आडवा पडेल. "

तेवढ्यात महादू पाणी घेऊन आला. सारेजण ते झऱ्याचे गोड पाणी प्याले. थंड पाणी प्यायल्यामुळे आणि नानाच्या बोलण्याने विश्वासच्या चेहऱ्यावर तरतरी आली होती.

" मोहन सध्यातरी तुझे काहीच काम नाहीये. पण कदाचित नंतर तुझी गरज लागेल. त्यामुळे तू नेहमी आमच्या सोबत रहा. मी गरज पडली कि तुला सांगेनच. आता सर्वाना एका शांत आणि दीर्घ विश्रांतीची गरज आहे. कारण उद्यापासून सलग दहा दिवस आपल्याला फार कमी वेळ आणि सावध झोप घ्यावी लागेल. 'तो' आपल्याला शक्तीहीन करण्याच्या प्रयत्नात असणार. तो या संधीची वाटच बघत असेल. त्याला एकदाही हि संधी मिळू देऊ नका. चला आता झोपायला. "

असे म्हणून नाना व महादुच्या पाठोपाठ सारेजण चालू लागले. महादुने त्यांना त्यांच्या झोपण्याच्या जागा दाखवल्या. थोडा वेळाने भरपेट जेवण करून ते सारे झोपी गेले.

*******

शक्तीकामना यज्ञाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला होता. 'त्या'ला पाचवा टप्पा पूर्ण झाला म्हणून खूप आनंद झाला होता. सलग पाच टप्पे पूर्ण केल्यानंतर बुवांनी सहा तासांची विश्रांती दिली होती सर्वांना. काहीजन पहुडले होते. तर काहीजण जंगलात फिरायला गेले होते. 'तो'सुधा काहीवेळ जंगलात फिरून आला. तोपर्यंत बुवांची सारी कामे आटोपली होती. ते सारेजण जमायच्या प्रतीक्षेत गुहेच्या तोंडाशी सूर्यकिरणे खात बसले होते. तो बुवांच्या शेजारी येऊन बसला. तो काही बोलायला तोंड उघडणार इतक्यात बुवा म्हणाले,

" एवढ्यातच इतका हुरळून जाऊ नकोस. अजून तीन टप्पे बाकी आहेत. ते सर्वात महत्वाचे आणि मोठे आहेत. यात तुला आधीपेक्षाही जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत आणि आधीसारखा हलगर्जीपणा आता नको. त्यांनी तुझ्याविरुद्धच्या तयारीला आता सुरुवात देखील केलीये. "

" तुम्हाला कसे काय कळले ?", त्याने एकदम आश्चर्याने विचारले.

" या सबंध भूतलावर माझ्याविरुद्ध काही शिजत असले की याची इत्थंभूत माहिती मला मिळते आणि त्याचे संकेत सतत येत राहतात. याचे कारण म्हणजे माझी पंधरा वर्षांची तपश्चर्या. "

'त्या'चा उजळलेला चेहरा पाहून ते म्हणाले,

" आताही हुरळून जायची गरज नाही कारण ते जे काही करत आहेत ते माझ्याविरुद्ध नसून तुझ्याविरुद्ध आहे. मी तुला साथ देतोय त्यामुळे मला फक्त संकेत येत आहेत. त्याची पूर्ण माहिती मिळत नाहीये. "

मगाशी आनंदलेला त्याचा चेहरा खर्रकन उतरला.

" पण निदान आपल्याला धोक्याची जाणीव होते. जसजसे ते प्रबळ होत जातील तसतसे संकेतही त्रीव्र होतील आणि मी हे तुला वेळोवेळी सांगेनच. चल आता थोड्याच वेळात सारेजण येतील. मग आपण पुन्हा यज्ञाला सुरुवात करुया. यज्ञाबरोबर काही छोटे विधी करून दामलेंच्या विधीत अडथळा आणूयात. "

त्याने होकारार्थी मान डोलावली आणि साऱ्यांना घेऊन तो बुवांच्या मागे गुहेत प्रवेशला.

*******

महादेवाच्या मंदिराबाहेर अहोरात्र मंत्रजागर चालू होता. एकावेळी एकाच ठिकाणी दोन यज्ञ चालू होते. एक होता तो आत्मा संमोहनास्त्र प्रबळ करण्यासाठी आणि दुसरा विश्वासच्या मेंदूला जागृत करण्यासाठी. त्याचवेळी तिकडे गुहेमध्ये शक्तीकामना चालू होता ज्याचे पाच टप्पे पूर्ण झाले होते आणि आणखी फक्त तीन बाकी होते. दोन्ही यज्ञ, शक्तीकामना आणि आत्मा संमोहन तोडीस तोड होते. त्यामुळे ह्यावेळी आधी कधीही झाले नाही असे तुंबळ युद्ध होणार होते. दोन्ही पारडे बरोबरीचे होते. एकीकडे नाना तर दुसरीकडे बुवा. फक्त एक गोष्ट नानांकडे कमी होती ती म्हणजे विश्वास हा अननुभवी होता. खरेतर त्याच्याकडे नानांपेक्षा जास्त शक्ती होती पण याची त्याला जाणीव नव्हती. विश्वास लढू शकेल का याबाबत नाना जरासे साशंकच होते पण विश्वासचा आत्मविश्वास पाहून त्यांना थोडे हायसे वाटले.

दिवसामागून दिवस जात होते. नानांनी यज्ञ सुरु करून सात दिवस उलटले होते. त्यांच्यावर एकही हल्ला झालेला नव्हता. याचा अर्थ नानांनी आणि दाजींनी ओळखला होता की तो आता कोणताही हल्ला करत नाहीये म्हणजे त्या पौर्णिमेच्या रात्री तो सर्वशक्तीनिशी एकदम वार करणार. म्हणजेच आपल्याला आपली शक्ती अजून वाढवावी लागेल. पण याचा अर्थ असा नाही कि तो येत्या तीन दिवसात शांत बसेल. नानांना याची नक्की खात्री होती म्हणून त्यांनी महादू आणि मोहनवर एक काम सोपवले. त्यांनी अभिमंत्रित केलेले एकवीस धागे दोघांना दिले आणि सांगितले की, " हे दोरे इथल्या एकवीस झाडांना असे बांधा की ती एकवीस झाडे वर्तुळाकार व आपल्याला घेरून टाकणारी असावीत." हे धागे म्हणजे एक प्रकारचे सुरक्षा कवच होते. याच्या आत 'तो' हल्ला करू शकणार नव्हता. ते दोघे धागे बांधायला गेले. आत्मा संमोहनासाठीचा यज्ञ अंतिम टप्प्यात आला होता. विश्वासचा मेंदू हळूहळू जागृत होत होता. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळेच तेज झळकत होते. विश्वासला स्वतःलाही हे जाणवत होते.

संध्याकाळ होत आली होती. महादू आणि मोहन धागे बांधून आले होते. म्हणजे ते सारे आता सुरक्षित होते.

तिकडे त्याचा सातवा टप्पाही पूर्ण झाला होता. आता फक्त एकच आणि शेवटचा टप्पा बाकी होता. यज्ञ सिद्धीस जात असला तरी 'तो' मनातून थोडासा अस्वस्थ होता. बुवांच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटले नाही.

" कसला विचार करत आहेस ? यज्ञाच्या वेळी हे असे अस्वस्थ असू नये, त्याचा यज्ञावर परिणाम होतो. "

" बुवाजी, पौर्णिमा आता फक्त तीन दिवसावर आहे आणि आपण त्यांच्यावर कसलाच हल्ला केला नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा आणलेली नाही - "

" अरे मुर्ख माणसा, ", त्याचे वाक्य तोडत बुवा म्हणाले. त्यांच्या मुर्ख म्हणण्याने तो दचकला, " तुला काहीच कस समजत नाही. आजवर आपण त्याच्यावर हल्ला केला नाही याचे कारण त्याला असाच गाफील ठेवायचा आणि शेवटच्या दिवशी त्याच्यावर सर्व ताकदीने हल्ला करायचा कि त्याला काही करायलादेखील सवड मिळाली नाही पाहिजे. पण तरी तू म्हणतोस तर आपण पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तीन-चार वार त्याच्यावर करू. म्हणजे तो थोडा दुबळा होईल. पण आपल्याला त्याला इतकाही दुबळा नाही समजला पाहिजे. कारण कधी कधी मला येणारे ते संकेत क्षणभरासाठी भलतेच त्रीव्र होतात आणि परत लगेच कमीही होतात. तेंव्हा तुही खबरदारी घे. "

"..."

तो काही बोलणार इतक्यात बुवांनी त्याला इशारा करून आत्ता यज्ञाकडे लक्ष दे असे सुचवले त्यामुळे तो गप्प बसला.

*******

अजून दोन दिवस बाकी होते. वाटत जरी जास्त असले तरी ते काहीच नव्हते. हा हा म्हणता दोन दिवस कसे निघून जातील कळणारसुद्धा नाही. नानाच्या सुदैवाने आणि बुवांच्या दुर्दैवाने आजचा दिवस विना हल्ला गेला. कारण तिकडे मागच्यावेळी प्रमाणे 'तो' तुपाची आहुती द्यायला विसरला होता. त्यामुळे यज्ञ संपायला तब्बल एक दिवसाचा उशीर लागला आणि दामले सुरक्षित राहिले. नाहीतर आज बुवा वार करणार होते. आजचा दिवस जरी सुरळीत गेला असला तरी उद्या जाईल याची काय शाश्वती ! उद्या त्याचा शक्तीकामना यज्ञ पूर्ण होणार होता. नानाचा आत्मा संमोहनाचा यज्ञ पूर्ण झाला होता आणि विश्वासचा मेंदू जागृत व्हायला अवघे सहा तास उरले होते.

दुसरा दिवस उजाडला. एका दिवसाचा अवकाश आणि दोन प्रतिस्पर्धी आपली सगळी शक्ती पणाला लावून लढणार होते. विश्वास आज नेहमीपेक्षा फार वेगळा वाटत होता. त्याच्या चेहेऱ्यावर तेज झळकत होते. विश्वास आता संपूर्ण तयार झाला होता. कोणत्याही क्षणी तो लढायला तयार होता. नाना व दाजीसुद्धा तयार होते. विश्वासचे म्हणणे असे होते की आपण आजच त्याच्यावर हल्ला करूयात. आज तो बेसावध असणार म्हणजे आपला विजय निश्चित. पण नानांचे विचार विश्वासच्या बरोबर उलटे निघाले. ते म्हणत होते की तो जरी बेसावध असला तरी त्याच्याकडे शक्ती आहे. आणि मुख्य म्हणजे वर्षानुवर्षे हे युद्ध पौर्णिमेला होत आले आहे. हि पौर्णिमा म्हणजे त्या पत्राने म्हणजे नियतीने ठरवलेली वेळ आहे. आपण नियतीला विरोध करणे ठीक नाही. तेंव्हा आज तू तुझा आत्मविश्वास वाढव, ध्यान कर, जप कर जेणेकरून तुझी शक्ती वाढेल. आज आपण त्याच्यावर कुठलाही हल्ला करायचा नाही.
सकाळचे दहा वाजले होते. सर्वांनी जेवण केले. जेवण करून विश्वास ध्यान करायला बसला. नाना आणि दाजी जप करत शेजारीच बसले होते. मोहन जरा विश्रांती घेत होता आणि महादू त्याची कामे करत होता. ध्यानाला सुरुवात करून जेमतेम अर्धा तास नाही झाला तोच विश्वास अचानक विचित्रपणे वागू लागला. त्याचे पाय लटपटू लागले. डोळ्याची बुब्बुळे नाहीशी झाली. अर्धांगवायूचा झटका आल्याप्रमाणे तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. ते पाहून नाना आणि दाजी लगेच उठून त्याच्या जवळ गेले. नानांनी काय झाले म्हणून त्याचा हात हातात घेतला तर एक जोरदार कळ त्यांच्या हातातून डोक्यापर्यंत गेली. झटकन त्यांनी त्याचा हात सोडला आणि म्हणाले,

" सुरुवात झाली...!"

दाजींनी तोवर मोहन आणि महादुला हाक मारून बोलावले. दोघेही धावत तिथे आले. ते दृश्य बघून दोघेही घाबरले. नाना म्हणाले,

" दाजी, ताबडतोप बाधा निवारण मंत्रजप सुरु कर. 'त्या'ने हल्ला केला."

दाजींनी लगेच मंत्र म्हणायला सुरुवात केली.

" महादू आणि मोहन, तुम्ही ते धागे व्यवस्थित बांधले आहेत ना ? एखादा दोरा सैल वगैरे झाला असेल जा पटकन बघा कुठे काय झालं ते. "

दोघेही धागे बघायला गेले. त्याने हल्ला केला होता. तोही साधासुधा नाही पहिल्याच डावात शक्तिशाली हल्ला केला होता. जर त्याची सुरुवात अशी असेल तर पुढे काय होईल याचा अंदाजच करायला नको. नाना काळजीत होते. आपण एवढे अभिमंत्रित धागे बांधूनही त्याचा हल्ला इथपर्यंत पोहोचलाच कसा. तिकडे बुवा होते. त्यांची शक्ती फार प्रचंड होती. त्यासमोर हे धागे ते काय !. पण नानांनी या साऱ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच ते धागे अभिमंत्रित केले होते. त्यांना तडा जाणे जवळजवळ अशक्य होते. ते बघण्यासाठीच नानांनी मोहन आणि महादुला पाठवले होते.

नानांनी तांब्याभर पाणी घेतले आणि काही मंत्र पुटपुटत नागवेलीच्या पानांनी पाणी शिंपडायला सुरुवात केली. दहा मिनिटांनी विश्वासचे लोळणे थांबले. पण तो मध्ये विव्हळत थोडा हलायचा पुन्हा स्वस्थ व्हायचा. नाना अजूनही चिंतेत होते. विश्वासचे विव्हळणे कमी झाले तरी त्याचे डोळे अजून पांढरेच होते. त्याच्या डोळ्यात बुब्बुळेच दिसत नव्हती.

इतक्यात मोहन आणि महादू धावत आले. मोहनने नानांना सांगितले की एका झाडाचा दोरा पक्ष्याने चोची मारल्याने खाली पडला होता. आम्ही तो बांधून आलो आहोत. आणि बाकीचे धागे सुद्धा घट्ट करून आलोय. आज संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बघून येऊ. नानांना जरा हायसे वाटले. आपले धागे त्याचा वार पेलू शकतात याचे त्यांना समाधान वाटले. त्यांनी आणखी काही धागे अभिमंत्रायला सुरु केले. दाजींचे मंत्र म्हणणे चालूच होते. नानांनी ते मंतरलेले धागे कुंकू लाऊन विश्वासच्या मनगटात बांधले आणि विश्वासने एक जोरात झटका दिला आणि निपचित पडला. नाना काळजीने विश्वासकडे बघू लागले. दाजीसुद्धा मंत्र म्हणत विश्वासकडे पाहू लागले. दोघांचाही श्वास थांबला होता. हळूहळू विश्वासने बोटे हलवली. त्याने डोळे उघडले....

... आणि दोघांच्या जीवात जीव आला. विश्वासची बुब्बुळे आता डोळ्यात दिसत होती. तो उठून बसला. महादू पाणी घेऊन आला. पाणी पिऊन आता जरा तरतरी आली. नाना विश्वासला म्हणाले,

" त्याने तुझ्यावर हल्ला केला होता. आता तो काही करू शकणार नाही. आपलं सुरक्षा कवच आता तो भेदू शकणार नाही. तू आता विश्रांती घे आणि तयार हो. कारण उद्या याहून मोठी परीक्षा आहे तुझी. "

विश्वास विश्रांती घ्यायला गेला.

मोहन आणि महादू पण निवांत झाडाखाली पहुडले.

नाना आणि दाजी मंदिरात जप करत बसले.

तिकडे तो आणि बुवा चरफडत होते. त्यांचे वार आता निकामी ठरत होते. आता त्याला हल्ला करण्यासाठी नवीन मार्ग शोधावा लागणार होता.

.....आणि अखेरीस पौर्णिमेचा दिवस उजाडला...

क्रमशः

गुलमोहर: 

@निलीमाताई : ळोळ्ज.....
माफ करा ताइ...उशीर झाल्याबद्दल..
आता शेवटचाच भाग राहिला आहे...दोनच दिवसात टाकेन..

@नीलिमाताई : तसेही तुटलेली लिंक जोडायला आधीचे भाग वाचावे लागतील...त्यासाठी १५ दिवस लागतील ना ?

काय रे मित्रा.. कुठे गायब होतास इतके दिवस? मी आशाच सोडुन दिली होती पुढच्या भागांची.. एवढी छान कथा लिहितो आहेस.. असा ब्रेक घेतला कि लिंक जाते रे आणि उत्सुकता कमी होते..
असो.. आता शेवटचा भाग लवकर टाक.

पु.ले.शु.

नीलिमा, जो_एस, चौकट राजा : मनःपूर्वक आभार...!!!

आबासाहेब : आता वार करण्याची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही...!!

छान

....आणि अखेरीस पौर्णिमेचा दिवस उजाडला... >>>>>>

इथून पुढचा भाग क्रमशः होता तिथे थोडा मजकूर टाकला आहे....
बाकी उर्वरित कथा बदलली नाही...

....आणि अखेरीस पौर्णिमेचा दिवस उजाडला... >>>>>>

इथून पुढचा भाग क्रमशः होता तिथे थोडा मजकूर टाकला आहे....
बाकी उर्वरित कथा बदलली नाही...
>>>> अरे त्या लिखाणाचाच अजुन १ भाग झाला असता.
तु विपुत कळवलं म्हणून मी बदललेली कथा वाचली नाहीतर वाचणं झाल नसतं.

हा अ‍ॅडिशनल मजकुरच भाग ९ म्हणून टाक आणि शेवटचा भाग नंतर टाक, अर्थात तुला पटल तर आणि वेळ असेल तर Happy