भक्ती.......

Submitted by निशदे on 16 January, 2012 - 23:00

उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग,
सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो ||
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता
कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो ||

दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी
हातातील नाणी, उगीच मोजतो ||
पोटाचेच जिथे, रोजचे सायास
कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||

उडवती नाणी, ओवाळिती नोटा
सारे त्या भगवंता, लाच दाखविती ||
येई कोणी शेट, मागाहून पुढे
देवाहून जास्ती, सलाम ठोकिती ||

हा परी इथे, खातो शिळेपाके,
देवाच्या वाटी, साधा नमस्कार ||
भक्ती मनी दाटे, परी भूक लागे,
पोटापुढे नसतो, मनाचा विचार ||

कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र
कोणी आरोग्य, आयुही मागिती ||
सारी असली जरी, देवाचीच पोरं,
एक दुजियाचा, नाशही मागिती ||

देव येई निघुनी, याच्यापुढे उभा,
"मला लेका तुझा, नमस्कार भारी ||
येती लाखो माझ्या, सामोरी आडवे
भक्तीपरी मात्र, पैशाची मुजोरी ||

बदलती देव, कपड्यासारखा
भावापेक्षा यांची, धनाची सलामी ||
पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद
देवालाही लावी, कराया गुलामी ||

पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
जोडी दोन हात, घेई माझे नाम
तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" ||

देव जाई निघुनी, मंदिरी कल्लोळ
सारेची निष्फळ, प्रयत्न यांचे ||
दोषारोप चालू, पोलीसा सांगिती,
पूरची लोटिती, हरेक उपायांचे ||

अखेरीस कोणी, आणिती पाषाण
शेंदूर फासून, "देव" सारी म्हणे ||
पुनश्च चालू, दगडाचा जयघोष,
देव परी दूर, पाहतो विषण्णे ||

गुलमोहर: 

बऱ्याच काळाने लिखाणाचा प्रयत्न केला आहे. कविता या जास्त अवघड क्षेत्रातील हा पहिलाच प्रयत्न. मागील लेखनानंतर कित्येक महिने लोटूनही काही सुचतच नव्हते. हे देखील चांगले आहे असे म्हणणे नाही............तुम्हीच ठरवा........ Happy

बदलती देव, कपड्यासारखा
भावापेक्षा यांची, धनाची सलामी ||
पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद
देवालाही लावी, कराया गुलामी ||>>

छान

“अखेरीस कोणी, आणिती पाषाण
शेंदूर फासून, "देव" सारी म्हणे ||
पुनश्च चालू, दगडाचा जयघोष,
देव परी दूर, पाहतो विषण्णे ||” >>>> विषण्ण व्हायची पाळी देवावर आली आहे हे अगदी खरं.
------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीमंतांच्या बेगडी भक्तीने देव विषण्ण झाला हे कवितेतून नीट मांडलंय.
परंतु, गरीबाने असं काय केलं की देव त्याच्यावर प्रसन्न झाला
याचं स्पष्टीकरण कवितेत मिळत नाही.
केवळ गरीब असणं हा भक्तीचा मापदंड होऊ शकत नाही.

श्रीमंतांच्या बेगडी भक्तीने देव विषण्ण झाला हे कवितेतून नीट मांडलंय.
परंतु, गरीबाने असं काय केलं की देव त्याच्यावर प्रसन्न झाला
>>> भिडे, असं काही दिसलं नाही. काही कडव्यांमध्ये दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्याला उपाशी पोटी भक्ती कशी सुचावी असंही सुचवलंय की ! Happy

दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी
हातातील नाणी, उगीच मोजतो ||
पोटाचेच जिथे, रोजचे सायास
कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||

असं काही दिसलं नाही. >>>>
आश्विनीजी,
"पुंडलिक तूच .... " या कडव्यातून तसं दिसतंय म्हणून तो प्रश्न उद्भवला.

पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
जोडी दोन हात, घेई माझे नाम
तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" ||

यात श्रीमंत गरीब अशी विभागणी नाही. यात भगवंताला पैशाने तृप्त करता येत नाही, तर भक्तीभावानेच तृप्त करता येते असं म्हटलंय. एखाद्या गरीबाने जर त्याला शक्य असेल तेवढा एखादा रुपया किंवा एखाद्या श्रीमंताने एक कोटी रुपये देवाला अर्पण केले आणि त्या दोघांच्याही मनामध्ये भक्तीभावच नसेल तर त्या त्यांच्या त्या पैशांचं भगवंताला काय अप्रूप असणार आहे? (अर्थात त्यांच्या यथाशक्ती दानाचं महत्व आहेच पण ते दान मोठेपणासाठी असू शकतं किंवा देवाजवळ केलेला एक व्यवहार असू शकतं) त्यांच्यापेक्षा एक पैसाही न देता मनामध्ये कायम भगवंताला स्थिर करणार्‍यालाच भगवंत भुलणार ना?

अर्थात एखाद्या कवितेचा अर्थ वाचकाने घ्यावा तसा असतो Happy

छान

सर्वांना मनापासून धन्यवाद......
pradyumnasantu ,बेगड्या भक्तीमुळे देव देखील खिन्न होत असेल असेच दाखवायचे होते......
उल्हास जी, गरीबाची अथवा श्रीमंताची भक्ती असा इथे विचार मी केलेला नव्हता. भक्तीचे झालेले व्यापारीकरण, त्यात आलेला स्वार्थ इतका दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. साध्या नमस्काराने देखील देव आनंदी होऊ शकतो हे दाखवायचे आहे....... आपण सध्या कोणत्याही देवस्थानाकडे पाहिले तरी हेच चित्र दिसते...... Happy

कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र
कोणी आरोग्य, आयुही मागिती ||
सारी असली जरी, देवाचीच पोरं,
एक दुजियाचा, नाशही मागिती ||

आणि

पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
....

ही दोन कडवी खासच...बाकी कविताही उत्तम !!

फार छान आशय विषय अभिव्यक्तीही उत्तम !

माण्डणी जरा सरस हवी होती वृत्ताच्या अन्गाने ...........(वैयक्तिक मत !!)
ही रचना अभन्गाच्या रूपरेषेत रचणे हा उद्देश असेल तर काही गोष्टी जपायला हव्यात.मला असलेली माहिती खालील प्रमाणे ............
अभन्गात पहिले तीनही चरण बहुधा षडाक्षरी असतात चौथ्यात अक्षर सन्ख्या बदलू शकते
पहिल्या तीन चरणात यमक शक्यतो साधले जाते.

अशा स्वरूपात ही रचना बसवल्यास नक्कीच खूप अधिक परिणाम साधता येईल.(हेही वैयक्तिक मतच !!)

अरेच्चा....... ही परत वर कधी आली.....
किरण, धन्यवाद...... दंडवत स्वीकारला आहे.... Wink
आयडू, जादुगर, मिडासटच ......... मनापासून धन्यवाद.....
वैभव..... वैयक्तिक मते पूर्णपणे मान्य. आता लिहिली तर कदाचित अधिक चांगली लिहू शकेन. पण ही अक्षरशः १५ मिनिटात लिहून पोस्ट केली. Happy
क्रांति..... धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया फार मोलाची आहे.... Happy

Pages