पुणं तिथं सगळंच उणं!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 08:49

मी जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा तेव्हा मला रीक्षाचा वापर करावाच लागतो. कारण पुण्यात हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली किंवा मुंबई सारखी लोकल ट्रान्सपोर्ट सेवा नाही. आता पुणे स्टेशन ते आमचं घर हे अंतर गेली अनेक वर्षे किलोमीटर मध्ये एकसारखंच आहे. किंबहुना आता मार्केट यार्ड कडून पुणे स्टेशनकडे रस्ता अतिक्रमणं हटवून मोकळा आणि मोठा केल्याने लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत पाच मिनीटांनी कमी झाला आहे. पण दरवेळी रीक्षाच्या मीटर मध्ये याच किलोमीटरचं प्रमाण नेहमी वाढतं असतं. रेल्वे स्टेशनमधुन बाहेर आलेला प्रत्येक माणूस हा पुण्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवतो आहे अशाच थाटात पुण्यातील रीक्षावाले वागत असतात. एकतर पहिल्यांदा मीटरप्रमाणे जायला कोणी तयार नसतं. डायरेक्ट ९० रूपये मागून मोकळे होतात. मीटरप्रमाणे (अगदी भाडेवाढ गृहीत धरली तरी) ३६ रूपयाच्या वर भाडं होत नाही. मग एखादा मीटरप्रमाणे जायला तयार झालाच तर माझ्या बरोबर अश्वमित्रला (गोर्‍या फॉरीनरला) बघुन आम्ही रीक्षात बसतानाच मीटरचा कान चार-पाच वेळा पिळून मीटर फास्ट करून ठेवतात. मला अजुनही हे मीटरचा कान पीळण्यामागचं गौडबंगाल समजलेलं नाहीये. मी तर सरळ एकदा रीक्षावाल्यांना म्हणाले की आहो तुमचा मीटर फास्ट आहे. रीक्षाच्या भाड्यांमध्ये जरी वाध होत असली तरी आमच्या घरापासूनचं स्टेशनचं अंतर गेली अनेक वर्षे बदलेलं नाहीये. त्यामुळे मीटर मध्ये येणारे किलोमीटर रीडींग तर सारखंच असायला हवं. तरी त्या रीक्षावाल्याने मान्य केलं नाही. मग एकदा मी एका रीक्षावाल्याला पोलीस चौकी जवळ आल्यावर म्हंटलं, "चला आपण रीक्षा पोलीस चौकीत नेऊयात. तुमच्या रीक्षाचा मीटर फास्ट आहे." झालं रीक्षावाला एकदम नरमाईत, "कशाला ताई? तुमच्या हिशोबाने किती होतात ते सांगा. मग माझ्या मीटरप्रमाणे कीती होतात ते बघु आणि मग ठरवू किती पैसे घ्यायचे ते." आता इतरांना प्रश्न पडला असेल की जर रीक्षाच्या अशा भानगडी आहेत हे माहीती आहे तर रीक्षाने जायचं कशाला? पण पुण्यात पीएमपीच्या बसेसची सेवा भयंकर या कॅटेगरीत मोडणारी आहे. बस अतिशय जुन्या, अस्वच्छ, प्रवाशांना बसायलाच जेमतेम जागा तर त्यात परगावहून आलेल्या लोकांना सामान ठेवायला स्वतंत्र अशी जागेची सोय नाही, बसची असलेली कमी संख्या, कमी वारंवारीता त्यामुळे प्रत्येक रूटवर प्रचंड गर्दी. यासगळ्यातच लांबचा प्रवास करून आलेल्या व्यक्तींना कधी एकदा पटकन घरी पोहोचतोय असं होतं म्हणून सद्य स्थितीत बस घेणं शक्यच नाहीये.

पुण्यात एकूणच शासनकर्ते, पीएमपीएम वाले आणि रीक्षावाले यांची इतकी छान भट्टी जमली आहे. शासनाने दर पंधरा दिवसांनी पेट्रोल दरात आडीच ते तीन रूपयांनी वाढ करायची. त्यामुळे सगळेच भाव गगनाला भिडतात. कारण पेट्रोल-डिझेल शिवाय साधा भाजीपाला सुद्धा वाहून आणला जात नाही. मग याच महागाईच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ झाली की पुण्यातील रीक्षावाले बेसीक फेअर वाढवण्याची मागणी करतात. बरं या रीक्षावाल्यांमध्ये प्रामाणिकपणा फारच कमी आढळतो. भाडेवाढ करतानाच इलेक्ट्रॉनीक मीटर बसवण्याची सक्ती केली आहे पण इलेक्ट्रॉनीक मीटर या लोकांना बसवायचा नसतो. पुणे स्टेशनला एशीयाड बस स्टॅंड्च्या बाहेर प्रीपेड रीक्षाचा एकच काऊंटर आहे आणि बहुतांशवेळा तो बंदच असतो. ९०% रीक्षावाले भाडे दर्शवणारं कार्ड दाखवत नाहीत. मनाला येईल ती रक्कम झालेलं भाडं म्हणून सांगतात. मग आपण कार्ड बघायला मागीतलं की ४-५ रूपयाचा फरक दिसतोच. एकदा तर पुण्यात रीक्षाचं बेसीक भाडं वाढून पुन्हा कमी झालं होतं. तर हे रीक्षावाले स्वत:च्या सोयीप्रमाणे आधीचं भाडेवाढ असलेलं कार्ड दाखवून पैसे घ्यायचे. नेहमी पुण्यात रीक्षाने प्रवास करणार्‍याला हा फरक समजू शकतो पण दर काही महिन्यांनी येणार्‍याला हा फरक समजत नाही. पुण्यातील ९०% रीक्षाचालक प्रचंड उद्धट आहेत. खरंतर रीक्षा चालवण्यासाठी म्हणून तुम्ही रस्त्यावर आणलीत की कितीही अंतरा पर्यंतचं भाडं असू देत (जवळ किंवा लांब) रीक्षावाल्यांनी प्रवाशाला नाही म्हणायचं नाही असा कायदाच आहे. पुण्यातील रीक्षावाले हमखास हा नियम धाब्यावर बसवतात. संपूर्ण देशात पुण्यातील पेट्रोलचे दर हे सर्वात जास्त आहेत.

पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असण्यालागचं कारणही हेच आहे. ज्यांच्याकडे चारचाकी आहे अशांना प्रत्येक ठीकाणी चारचाकी घेऊन जाणं शक्य नसतं. पुण्यातील रस्ते हे पादचार्‍यांना आजीबात अनुकुल नाहीत. पदपथांवर एकतर पथारी पसरून विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं असतं नाहीतर दुचाकीस्वार दुचाकी चालवताना आढळतात. पुण्यात म्हणे दोन वर्षांपूर्वी कुठलेतरी गेम्स झाले त्यावेळी प्रचंड खर्च करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. बीआरटी प्रकरण तर औरच आहे. बीआरटी असलेल्या कोणत्याही रस्त्यावर आपण गेलो तर प्रचंड विनोदी चित्र पहायला मिळतं. सायकल ट्रॅक मध्ये चारचाकी गाड्यांनी पार्कींग केलेलं असतं. सायकल्स्वार स्वत:ची सायकल आणि जीव दोन्ही सांभाळत दुचाकी आणि चारचाकी यांच्या ताफ्यातून वाट काढत असतात. दुचाकीस्वार पदपथांवरून दुचाकी चालवत असतात. बीआरटी मार्गावरून केवळ पीएमपी आणि बीआरटीच्याच बस न धावता इतर वाहने सुद्धा धावत असतात. यासगळ्या वाहत्या रस्त्यांवर रस्ता क्रॉसकरणे म्हणजे एक मोठं दिव्यच आहे.

म्हणजे एकूणच पुण्याच्या सर्व पायाभूत सुविधांचा शक्यतेवढा बट्याबोळ करून ठेवून "पुणं तिथं काय उणं" च्या ऐवजी "पुणं तिथं सगळंच उणं" अशी उक्ती प्रचलीत करण्याचा प्रघात चालू झाला आहे.

पुण्याची अशी स्थिती का आहे याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की पुण्यात अतिशय अयोग्य आणि कमकुवत राजकीय प्रतिनीधी आहेत. अयोग्य याअर्थी की ते पुण्याच्या विकासाचा, पुण्यातील नागरीकांचा विचार करत नाहीत आणि कमकुवत याअर्थी की भ्रष्ट राजकारण्यांना खाली खेचण्याची ताकद अस्लेल्या नेतृत्त्वाचा सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभाव. पुण्यात कॉंग्रेस सोडलं तर इतर राजकीय पक्षांमध्ये नेतृत्त्वाचा अभाव आहे. कॉंग्रेसचे नेतृत्त्व म्हणजे गेली बरीच वर्षे निवडुन येणारे भ्रष्ट खासदार आणि राष्ट्रकुल सकट क्रिडा क्षेत्रातील इतर घोटाळ्यांचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी. इतका भ्रष्टाचार करूनही ही व्यक्ती पुण्यातून निवडुन येण्यामागे पुण्यातील निष्क्रीय राजकीय पक्षांचे लोक तसेच पुण्यातील मतदान न करणारे, स्वत:च्याच आयुष्यात मशगुल असलेले मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय लोक जबाबदार आहेत. सर्वच राजकीय पक्षांत तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांत भविष्यवेध आणि नियोजन याचा प्रचंड अभाव आहे. एक रस्ता महापालीकेने नविन बनवला असेल तर तीसर्‍याच दिवशी ड्रेनेज लाईन साठी म्हणून किंवा टेलीफोन लाईनच्या दुरूस्तीसाठी म्हणून नविन तयार केलेला रस्ता खणला जातो. रस्ता खणण्याचं या लोकांना माहीती. मग नंतर तो नीट एकसारखा करून दुरूस्त करणं म्हणजे काय असतं ते ह्या लोकांना आजतागायत माहीती नाही.

पुण्यात आज कोणत्याही पक्षाकडे असं नेतृत्त्व नाहीये की ज्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या चारीएत्र्याकडे तसेच काम करण्याच्या क्षमतेकडे बघुन लोक त्यांना मतदान करतील. कॉंग्रे-राष्ट्रवादी केवळ भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या बळावर सत्तेत येत आहेत. शिवसेना आणि मनसे एकमेकांच्या लाथाळ्यात आणि एकमेकांना शह-काटशह देण्यात गुंतलेले आहेत. भाजपामध्ये राष्ट्रीयस्तरावर नेत्यांमध्ये चालू असलेल्या वादामुळे स्थानीक नेतृत्त्व निवड आणि क्षमता वाढ याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मग आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी जरी पंतप्रधान पदाचे उमेद्वार म्हणून प्रोजेक्ट केले तरी काहीही उपयोग होणार नाही. एक व्यक्ती निस्पृह असून चालत नाही. त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोकही त्या व्यक्तीला साथ देणारे लागतात. गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जो करीष्मा करून दाखवला आहे तो इतर ठीकाणी दाखवणं खरंच शक्य आहे.......सध्याच्या स्थितीमध्ये?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

याला काही संख्याशास्त्रीय आधार आहे का? >>> सध्या नाही पण सर्वेक्षणासाठी पुणे महानगरपालिकेकडे अर्ज करतो उद्या आणि आकडेवारी मिळाली की कळवतो. पुण्याबद्दल जाणुन घेण्याची आपली तळमळ अतुलनिय आहे. त्याबद्दल पगडी देता येईल का याविषयीही पगडी बनविन्यार्‍या दुकानदारांशी चर्चा करतो.

हायला सगळ्या भारताचा अभिमान बाळगला की Jingoistic म्हणतात>>> हायला, पण अभिमान बाळगा आणि मनात ठेवा ना! दुराभिमान मात्र चुकीचाच! मग तो कुठल्याही देशाचा असो, जातीचा असो नाहीतर आणखी कशाचा....आणि जिथे जे चांगलं आहे त्याचं कौतुक करा. आपल्यात जे कमी आहे ते मान्य करा. इतकं हे साधं सोप्पं सरळ आहे!

याला काही संख्याशास्त्रीय आधार आहे का?

तसे नाही ,असे सिद्ध करणारा पुरावा तुमच्याकडे आहे का? निदान संख्याशास्त्रीय आधार तरी?

(पाहिलत्? पुणेकरांशिवाय इतरांना सुचेल का असले उत्तर?)

Happy

>>आपल्यात जे कमी आहे ते मान्य करा. इतकं हे साधं सोप्पं सरळ आहे!

ते "इथे" शक्य नाही गं Wink इथे फक्त जाज्वल्य अभिमान. Proud

पण ते तसे आहे हा क्लेम तुमचा होता, म्हणून पुरावा मागितला... ते तसे नाही, हा क्लेम मी केलाच नाही.... तर पुरावा कसला देऊ?

(पाहिलत्? पुणेकर असून हे तुम्हाला सुचलं नाही?)

Proud

जिथे जे चांगलं आहे त्याचं कौतुक करा. आपल्यात जे कमी आहे ते मान्य करा. >>> का?>>> उगाच आपसात दुही निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर करा... तसं काही वाटत नसेलच, तर नका करु... तुमची मर्जी!

.

.

तसं काही वाटत नसेलच, तर नका करु... तुमची मर्जी! >>> अहो अशा वादावर येऊ नका. तुमचं मत अगदी योग्य आहे. पण फक्त पुणेकरांनाच ते लागू पडत नाही. यशस्वी झाल्यानंतर कुठलाही माणूस पहिले आभार आपल्या जन्मभुमिचेच मानतो. त्या गायक पोर्‍यानेही तेच केले. पुणेकर बोलतात बाकीचे न बोलता करतात एवड्।आच काय तो फरक असेल. माहेरच्या/गावच्या माणसाला चहाचा आग्रह करताच ना? नसाल करत तर मग तुम्ही आजच्या युगाच्या एकदम फॉरवर्ड का काय असतं तसल्या ग्लोबल नागरीक का काय ते आहात असे म्हणता येईल... काय?

असो, जेवल्या ताटाला नमस्कार करायची आपली पध्दत आहे. काही लोक जेवतानाच ताटाला लाथा घालत बसतात. पुणे काय नी सातारा काय प्रत्येक ठिकाणी काही उणे काही देखणे असणारच,,, देव तुम्हा सर्वांना सदसदविवेकबुंदी देवो!
भांडू नका. गुण्यागोविंदानं प्रश्न हातावेगळे करा.
हेमाशेपो.
(शेपोची भाजी का शापुची भाजी? हा प्रश्न बर्‍याच दिवसापासून छळतो आहे! कुणी पुणेकर आहे का रे इथे?)

ह.बा. हा बाफ पुण्याच्या संदर्भाने आहे म्हणून त्या अनुषंगाने मी लिहिलेय... अभिमान आणि दुराभिमानात असलेली एक सूक्ष्मरेषा लक्षात ठेवून वागणूक ठेवली तर बरीच नाती बिघडण्यापासून वाचतील, इतकेच माझे म्हणणे आहे. Happy

सानी - हो का? मग ते ही चुकच.... ह्या अशा वल्गना करणार्‍या लोकांमुळेच आपल्या देशात एकात्मता, प्रेम नाही... आधीच जाती, भाषा, संस्कृतींमधले भेद आणि वैर आणि वरुन हे गावांवरुन उगाचच्या उगाच ओढून ताणून आणलेले वैर वाटते...
>> मागच्या आठवड्यात मी हेच म्हणत होतो..

फरक इतकाच की आम्ही म्हणजे परफेक्शनिस्ट असा फुकाचा आव इतर गावातले नागरिक आणत नाहीत....
>> असहमत. हे मत जरा अती आहे.

लेखाचे शिर्षक "पुणे तेथे सगळेच उणे" असे असायला हवे होते. सद्ध्याचे शिर्षक अस्सल पुणेरी वाटत नाहीये. Happy

महेश... Happy

हबा local time zone setting चेक करायला लागेल.... माझे सदस्यत्व -> संपादन मध्ये..

हबा local time zone setting चेक करायला लागेल.... माझे सदस्यत्व >>> तुम्ही कोणत्या देशात हायेत आत्ता?

ते तसे नाही, हा क्लेम मी केलाच नाही
तुम्हीच काय, कुणीच तसा क्लेम करणार नाहीत. जे 'अनादिअनंत सत्य' आहे, त्याविरुद्ध जायची ताकद ब्रह्मदेवात पण नाही!!! असे खुद्द पुण्यातल्या लोकांनी सांगितले आहे. आणखी काय पाहिजे?

Happy Light 1

शांतीसुधा - पुण्यातले रिक्षावाले आहेतच माजोरडे (दुर्दैवाने). त्यांना त्यांच्याच भाषेत टक्कर द्यावी लागते. नाहीतर मनस्ताप होतो. मुंबईतून शिफ्ट झालेल्या एका मित्राला मी सांगीतलं होतं कि पुण्यात हिंडायला दुचाकी सगळ्यात चांगली पण त्याला रिक्षाच करायची होती आणि मग नंतर तुमच्यासारखेच अनुभव सांगत आला. मधे एकदा रिक्षावाल्यांनी संप केला होता तेव्हा पी.एम्.टी नी जादा बस सोडल्या आणि लोकांनी रिक्षावाल्यांकडे दुर्लक्ष करून त्या वापरल्या आणि रिक्षावाल्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. परत तसं झाल्याच ऐकलं नाही.

एक नम्र विनंति:
भडक टाळक्याच्या, जरा गंमतीत लिहीण्याचे वावडे असणार्‍या, सतत भांडण करणार्‍या लोकांनी माझे लिखाण मनावर घेऊ नये. या बीबीच्या मूळ लेखकाची संमति नसेल तर मी पण इथे लिहीणार नाही.

Pages