काठावरून निरखलेला कामाठीपुरा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दचकायला होत ना? एक मध्यमवर्गीय घरातल्या व्यक्तीकडून, त्यातल्या त्यात स्त्रीकडून/ मुलीकडून हा शब्द ऐकला तरी आजूबाजूच्या भुवया लगेच उंचावतात!! या शब्दाचा उच्चार करण म्हणजे देखील पाप जणू.... तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात या शब्दाला जागा नसते, जणू काही हे जग अस्तित्वातच नसत आपल्यासाठी. तर, अश्याच मध्यमवर्गीय गर्दीतली आणि बर्‍यापैकी तशीच मानसिकता असलेली मी एक. मुंबईमधेच, कामाठीपुरा म्हणून एक भाग, वसाहत आहे हेच मला माहीत नव्हत. याबाबत मी पूर्ण अनभिज्ञ होते, आणि मग एके दिवशी अचानक कामाठीपुरा माझ्यासमोर उलगडला.... उलगडला कसला, अंगावरच आला एकदम...

काही वर्षांपूर्वी, काही वैयक्तिक कामांसाठी, काही महिने तरी मुंबईमधे फ़ोर्टला सतत भेट द्यावी लागणार, हे स्पष्ट झाल आणि पोटात पहिला गोळा तिथेच आला! मुंबईच्या अफ़ाट बिनचेहर्‍याच्या गर्दीची मला नेहमीच धास्ती वाटते, सहनच होत नाही ती गर्दी मला. नेहमीच धावत पळत असणारी माणस बघूनच मला गुदमरायला होत आणि आता त्याच गर्दीचा एक नगण्य भाग बनून मला त्यांच्यामधेच वावरायच होत. एक बर होत की रोजची कसरत असणार नव्हती. मधून मधून सलग, पुण्यात परतायला पण मिळणार होत आणि मुंबईच्या मानाने निवांत अस आयुष्य पण जगायला मिळणार होत. तेवढच बर वाटायच. सात समुद्रापार जाऊन देखील पुण्याची ओढ आणि थोडाफार पुणेरीपणा काही सुटत नाही!! मानाची बिरूद मिरवायला कोणाला आवडत नाही म्हणा!!

म्हणता, म्हणता, मुंबईलाही आपल म्हणायचे दिवस उजाडले आणि, मनात बरीच धाकधूक घेऊन, मी मुंबईत पोहोचले.

नशिबाने, मुंबईमधे नातेवाईक आहेत. मी मावशीकडेच राहणार होते. तिच्या घरापासून लोकल स्टेशन आणि बेस्टचा डेपो, जवळच आहेत. एक दिवस सोबत बरोबर घेऊन , लोकलची आणि पर्यायाने लोकांची गडबड, धांदल बघूनच लक्षात आले की हे काही आपल्याला झेपणारे नाही, आपल्यासाठी बसच बरी. मी बसच्या पहिल्या स्टॉपलाच चढणार होते, त्यामुळे गर्दी वगैरेची चिंता नव्हती, गंतव्य स्थानाच्या बर्‍यापैकी दारातच उतरू शकले असते, त्यामुले ती ही चिंता राहिली नव्हती. मुंबईमधे जर आधी कधीच वावरला नसाल आणि एकदम असे फ़िरायला लागले, तर मी काय म्हणते आहे ते लक्षात येईल, निदान मला तरी सुरुवातीला खूपच गोंधळल्यासारखे वाटत असे. तर पहिले दोन तीन दिवस मामाने बरोबर यायचे ठरवले. त्याच्या बरोबर गप्पांमधे प्रवासात वेळ कसा जायचा समजत नसे, बाहेरची गर्दी, रस्ता, कशाकडेच फ़ारसे लक्ष न देता, आम्ही खूप गप्पा मारत असू. बरे, तो बरोबर असल्याने मी ही निर्धास्त.

मग, दोन तीन दिवसांनी मी एकटेच जायचे ठरवले, रोज रोज मामाला तरी कुठे जमणार होते माझ्या बरोबर यायला? त्यालाही त्याचे घड्याळाच्या काट्यांवर पळणारे आयुष्य होतेच की. आता इतका आत्मविश्वास नक्कीच आला होता, कि एकटी जाऊ येऊ शकेन, आणि बरोबर घरच्यांचा फ़ोन नंबर होताच. पुस्तक पण घेतले होते वाचायला बरोबर. पुस्तक घेऊन गेले की कुठला ही प्रवास कंटाळवाणा होत नाही, त्यामुळे प्रवासात एक वेळ तिकिट विसरेन, पण पुस्तक नाही!! पहिले तीन चार दिवस, बसमधे चढून एकदा तिकीट काढल की मी पुस्तकात डोके खूपसून वाचत बसत असे. साधारण फ़ोर्टचा भाग लागला, की कंडक्टर ओरडून सांगतच असे, त्यामुळे तशी काळजी नसे. आणि एक दिवस असच वाचत बसलेले असताना, बसच्या बाहेर खूप गलका ऐकयला आला अन, वाचनाच्या तंद्रीतून एकदम जागी झाले.

पहाते तो काय, समोरचा माहौल इतका वेगळा होता... साधारण मध्यमवर्गीय किंवा अतिशय उच्चभ्रू वातावरणापेक्षा अतिशय वेगळ, भसकन अंगावर येईल अस वातावरण वाटल मला ते त्या वेळी.

पहिली पाच दहा मिनिट केवळ अवाक होऊन बसच्या खिडकीतून बाहेर बघण्यातच गेली!! आणि एकदम लक्षात आल, ही वेश्या वस्ती!! तेवढयात पाटीही दिसली लहानशी, कामाठीपुरा. बस, येवढच लिहिलेल. कदाचित, ज्यांना इथे यायची गरज पडते, त्यांच्या साठी पुरेस असाव तेवढच. बस वेश्या वस्तीतून जाते आहे, लक्षात आल, आणि उगीचच माझच मन कसनुस झाल! म्हणजे रोज बस इथून जात होती?? आणि आपल्या काहीच नाही लक्षात आल?? मला खरच वाटेना.... नंतर किती तरी वेळ माझ्या मनातून ते वातावरण पुसलच जात नव्हत. विदारक हा शब्द ऐकला होता, पण विदारक शब्दाचा अर्थ त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिला. अतिशय सुन्न करून टाकणारा असा तो अनुभव होता....

तेह्वासुध्द्धा, पाहताक्षणी जाणवल, ते अतिशय भकास वातावरण, आणि तसेच उदास चेहरे. रस्त्यातली वर्दळही तशीच. कोणाची दखल न घेता, अलिप्त आणि मख्ख देहबोली घेऊन जगणारी, आपल्या आपल्या आयुष्याचे भार सांभाळणारी अन ओढणारी, दैन्य पांघरलेली गर्दी. अन त्यानंतर बसच्या बाहेर पहायच धाडस उरलच नाही त्या दिवशी. परत एकदा मी पुस्तकात डोक खुपसल आणि तशीच बसून राहिले. फ़ोर्ट आल, तस कंडक्टरने ओरडून सूचना दिली अन, मी तंद्रीतून जागी झाले!! इतका वेळ मी एकाच पानावर डोळे खिळवून बसले होते? लक्षातच नाही आल! एक प्रकारचा सुन्नपणा मला वेढून राहिला होता.... त्यातल्यात्यात एवढेच बरे होते, की परत जाताना मी जी बस घेत होते, ती कामाठी पुर्‍यातून जात नसे. कदाचित दुसरी बस मिळत असावी. माझा शेवटचा थांबा असल्याने, त्या थांब्याच्या नावाचा फ़लक बसवर लावलेला दिसला की मी जास्त विचार न करता बसमधे चढत असे!! काम संपवून घरी पोचले तरी, डोक्यातून विषय जात नव्हता... उद्या परत बस तिथूनच जाणार हे जाणवून उगाचच एक दडपण आले होते मनावर.

... आणि परत एकदा, दुसर्‍या दिवशी मी त्याच बसमधे चढले. आज पहिल्यांदाच मी बसमधे वाचत नव्हते. परत एकदा बस कामाठी पुर्‍याच्या रस्त्याला लागली, पण आज मी सारे पाहणार होते.. मनात थोडी भीती, थोडी जिज्ञासा, कुतूहल... हळू हळू नजर एकेक तपशील टिपत गेली... गलिच्छ रस्ता, ठिकठिकाणी फ़ेकलेला कचरा, सांडपाणी, त्यातच खाण्याच्या पदार्थाचे ठेले मांडलेले विक्रेते, चहावाले, इतर दुकाने, विक्रेते, दुकानातली गिर्‍हाईके. मला सगळयात आश्चर्य वाटत होते ते म्हणजे त्यांच्या तिथल्या सराईत वावरण्याचे. अर्थात, त्यांच्या साठी ते रोजचेच जगणे होते, अन रोज मरे त्याला कोण रडे, असेच होत असावे त्यांचे.

रोज सकाळच्या वेळी तिथल्या, देह विक्रयाचा व्यवसाय करणार्‍या स्त्रिया, रस्त्यावर किंवा त्यांच्या खोल्यांच्या दारांत बसलेल्या असायच्या. काही एकमेकींशी बोलत असायच्या, काही जणी उगाच थकून भागून बसलेल्या. सगळे काही स्वीकारल्या सारख्या. तर काही उगाच कुठे तरी भकास नजरेने पहात हरवलेल्या.. सार्‍याच थकलेल्या, भागलेल्या.. आणि काही आक्रस्ताळेपणे झगडताना दिसायच्या. नक्की कोणाशी भांडत असायच्या कोण जाणे? समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? या स्त्रियांना बघणे, त्यांच निरीक्षण करणे हा एक कडवट अनुभव होता माझ्यासाठी. का म्हणून यांच्या नशिबात हे दान पडल होत?

इथे येताना कितीजणींना आपण कुठे आणि का चाललोय ते माहीत असेल? अजाणत्या वयात काय अनुभव घेतले असतील? मनावर ओरखडे उठले असतीलच ना? नक्कीच.. आणि मग कदाचित एक दिवस सार काही मनाविरुद्ध अंगवळणी पडल असेल, पाडून घ्याव लागल असेल.. काहींनी कळत्या वयात, नाइलाज म्हणून हे अग्निदिव्य स्वीकारल असेल, घरच्यांवर मायेची पाखर घालण्यासाठी स्वत: अंतर्बाह्य जळत असतील, आणि ही पाखर घालतानाही आपल अस्तित्व दृष्टीआड ठेवून. घरचे लोकही कदाचित दृष्टीआड सृष्टी म्हणत असतील का?? कधीकधी माणसाचे नाइलाज किती पराकोटीचे असू शकतात..... सारच अर्तक्य! काहींची स्वप्नं चुरगाळली गेली असतील, ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी अश्याच कोणी नवर्‍याने, प्रियकराने, भावाने, नात्यातल्या काका, मामानेच या लेकी बाळींना इथे आणून इथल्या गिधाडंपुढे फेकून दिल असेल! या लेकी बाळी ही कधी काळी निरागसपणे कुठे तरी, आपापल्या घरच्या अंगणात बागडल्या असतील, काहींनी परकराच्या ओच्यात फुल, पान जमवली असतील, काहींनी भातुकलीचे संसार मांडले असतील, सख्यांबरोबर साईसुट्यो खेळल्या असतील.. घरच अठरा विश्व दारिद्र्य आणि झोपडीतला अंधार देखील यांच्या स्वच्छ हसण्याने उजळून निघाला असेल..... आज तस हसू फ़ुलेल कधी यांच्या चेहर्‍यावर? आयुष्यात परत या स्त्रियांचा कधी, कोणावर विश्वास बसेल??

आणि रस्त्यालगतच बागडणारी या माउल्यांची लहान मुल?? त्यांच्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतात!! त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल….. काय भविष्य आहे यांच, हा प्रश्न सतत मनत आल्याशिवाय राहिला नाही… यातल्या मुली असतील, त्यांच हे हसू असच कायम राहील?? का आसूंत बदलेल? या मुलांच निरागस मन निब्बर व्हायला किती लवकर सुरुवात होत असेल! त्यांना देखील याच खातेर्‍यात उडी घ्यावी लागणार आहे का? काय वाटत असेल तिथे व्यवसाय करणार्‍या आईला, लेक पोटी आली म्हणून? काय विचार करत असतील ह्या आया आपल्या लेकरांच्या भवितव्याचा? असा काही विचार करायची मुभा नियती देत असेल त्यांना ?? सगळीच परिस्थिती, दाटला अंधार अशी.....

तिथल्या ह्या स्त्रियांच्या खोल्यांकडे बघवत नव्हतं, मोठया मोठया खिडक्या असणार्‍या काडेपेट्यांसारख्या, तितकीच लांबी, रुंदी असलेल्या ह्या खोल्या पाहून, कबुतरांची खुराडी सुद्धा बरी अस वाटल्या वाचून राहिल नाही. रात्रीच्या वेळेस, ह्याच काडेपेट्यांचे विलास महाल बनतात? तेव्हा, या विलास महालातली औट घटकेची रातराणी, आपल्या कच्च्या बच्च्यांना कुठे आसरा देत असेल? कोणा महाभागाची औट घटकेची सोबत करताना, तिच्या मनात काय येत असेल? मन कस आणि किती आक्रंदत असेल? असे किती मातांचे, नवतरुणींचे, अबोध बालिकांचे आक्रोश या भिंतींनी पाहिले असतील? पचवू शकल्या असतील? सकाळच्या वेळेस, या खोल्यांच्या भिंती अगदी भकास वाटायच्या, जणू काही या बायकांच्या मनातल्या मूक आक्रोशाच्या साक्षीदार होता होता, जगायच विसरून गेल्यासारख्या. सार्‍या वातावरणातच एक मृतप्राय कळा, एक उदासवाणा, अलिप्त भाव. जणू माणूसकीची जिती जागती कबर.

उगाचच एक वाक्य आठवल होत तेह्वा. स्त्री ही क्षणकालची पत्नी अन अनंतकालची माता असते.... किती वेगळ्या अर्थाने ते वाक्य तिथे साकार झाल होत!

.... अजून एक विरोधाभास पाहिला अन खूप जाणवलाही.

एक रेणुकामातेच देऊळ होत, छोटस, सुंदरस.. मनोभावे स्त्री रुपाची, आदिशक्तीची पूजा झालेली दिसत होती. देवीची मुद्रा प्रसन्न, हसरी, नजर तिच्या ह्या लेकींकडे. देवळाच्या बाहेर एक पताका लावलेली होती, त्यावर देवी सूक्तातले मंत्र ठळक अक्षरात लिहिले होते...

ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll

काय पाहत होती आई उघड्या डोळ्यांनी? मानवरुपातल्या स्त्रीशक्तीची, मातृरुपाची विटंबना? दैन्य, लाचारी, असहायता???

का सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे केवळ???

विषय: 
प्रकार: 

शैलजा, किती आतून लिहितेस!

तुमचा लेख वाचुन दचकायला नाही झाल पण काही आठवणी जाग्या झाल्या. कॉलेजात असताना या भागात निर्मला निकेतन च्या BSW च्या फ्रेंड्स बरोबर बर्‍याच वेळा तिकडे गेलोय. त्यांचे प्रश्न मांडलेत त्यापेक्षाही गंभीर आहेत. बरेच NGO काम करतात इथे ते इथे Creche चालवतात रात्रिच्या वेळि. अर्थात त्यामुळे काही त्या मुलाना रात्रि कुठे ठेवायचे हा प्रश्न सुटत नाही.
प्रीती पाटकरांची प्रेरणा ही NGO खुप काम करते या भागात
http://www.preranaatc.com .

गजानन, धन्यवाद.
अजय, छान महिती.

शैलाजा खूप वेदनादायक लिहीता . हे चित्र बद्लायला खूप वेळ लागणार आहे पण नक्की बदलणार खूप जण काम करत आहेत त्यासाठी
मलाही काही रेफरन्स दिले होते. तुम्ही मुम्बइत आलात की सान्गा आपणही खूप काही करु शकतो फक्त विचार नक्की पहीजे

हा लेख मागे मी तुझ्या आंतरजालातील ब्लॉग वर वाचला होता. तिथे प्रतिक्रिया काय द्यावी हे सुचले नाही.

घारुअण्णा, केदार लेखाबद्दल आवर्जून सांगितल्याबद्दल आभार.

घारुअण्णा, जरूर. केदार, ते सगळ आहेच अस्वस्थ करण्यासारख... हे सगळ पाहिल की वाटत आपण किती लहानसहान गोष्टींसाठी नाराज होतो आपल्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर... काही अधिकार आहे का आपल्याला.... इतक सुखी आयुष्य पदरात पडलय आपल्या!

खरच शैलजा मनापासून लिहितेस अगदि, तुझ्या ब्लॉगवर वाचलाय हा लेख पण अभिप्राय आपल्या आपल्या घरी देतीये:)
लिहित रहा ग

शैलजा, अगदी व्यवस्थित टिपलयं हे तू!! आणि मनाला भिडणारं, समाजाचच्या ह्या अंगाचे दर्शन करविताना त्याची व्यथा आणि खंत अगदी नीटसपणे टिपलियेस!

लिखाणाची शैली छान आहे. पण ह्या लेखात घटना अशा काहीच नाहीत फक्त भाव आहेत. जे पुर्णपणे वाचकांपर्यंत पोचतात...

श्यामली, कृ तुम्हांला लेख आवडला हे बघून बर वाटल... सांगितल्यबद्दल खूप आभार Happy

बी, धन्यवाद, अन लेख वाचला तर हे लक्षात आलच असेल की हे सार मी रोज तिथन बसने प्रवास करतना टिपल आहे, त्यात घटना कुठून येणार?? आणि तसही तिथल्या कुठल्याच घटना पाहण्याचही सामर्थ्य माझ्यात नाही!! तेवढी हिम्मत नाहीये माझ्यात.

शैलजा
याआधी मी इथे प्रतिसाद दिला होता. कुठे गेला ?

आयटे, खूप सुंदर आणि मनापासून लिहिलयस. वाचल्यावर अस्वस्थ व्हायला होतंच. भावना थेट भिडतात.

मी किती दिवसांपासून इथे प्रतिक्रिया लिहायला येत आहे, पण 'नविन प्रतिक्रिया' वर क्लिक केल्यावर पेज एक्स्पायर होत होतं. कमीत कमी १० वेळा तरी मी प्रयत्न केला असेन. शेवटी आज लिहिली गेली प्रतिक्रिया.......

माहीत नाही दिनेशदा... मी नाही वाचला तुमचा अभिप्राय... कदाचित पोस्ट झाला नसावा?
मंजू, धन्स ग Happy

काठावरून पाहिलं तर इतकं भयानक वाटतं. तिथं जगणार्‍यांना काय वाटत असेल?
शैलजा छान टिपलंयस आणि मांडलंयस पण.

देवी चे मंदीर आणि तीथल्या बायका खरच ना !
छान मांडलस,
मला तर तीथलया मुलांचे फार वाईट वाटते काय जगत असतील ??/ आणि काय बघत असतील??

छान लिहीलयस. त्या अमरप्रेम movie मधल आठवुन गेल. बंगाल मधे देवीची मुर्ती बनवताना या बायकांकडची माती मिसळतात ना. आणि मंडी पण आठवुन गेला.

खुपच त्रासदायक सत्य मांडले आहे. मलापण कामामुळे रात्री १० च्या सुमारास घाटकोपर स्थानकाजवळ्च्या अश्या भागातुन स्थानकाला जावे लागायचे, तेव्हा याहीपेक्षा भयानक चित्र असायचे तिकडे.

संघमित्रा, लोपा, दिव्या, रमणी तुम्हां सार्‍यांचेच आभार.

काठावरून जे काही पाहीलंत त्यावर इतका विचार आणि इतकं सुंदर शब्दात मांडलंत त्याबद्दल खरोखर आपले अभिनंदन. हे एक भीषण सत्य आहे आणि सत्य बदलता येतही नाही आणि येणारही नाही. कारण प्रत्येक राज्यात कुठे ना कुठे असे कामाठीपुरा आहेतच. आजही उत्तर-पुर्वेकडील स्त्रीया, तरुणींच्या अपहरणाच्या बातम्या आपण वृत्तमानपत्रात वाचतोच. १०० आणल्या जातात आणि सुटका फक्त ४ किंवा ५ जणींचीच होते ! मध्यंतरी मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्व्हा बिल गेट्स भारत दौर्‍यावर आले होते तेव्हा अश्या बर्‍याच रेडलाईट एरीयांना त्यांनी भेट दिली. वेश्याव्यवसायात आलेल्या,आणलेल्या स्त्रीयांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आणि आरोग्यासाठी काहीतरी करावं या हेतुने त्यांनी पुढाकारही घेतला आहे. पण हे सगळं चालूच राहणार का? कुठेतरी समुळ नष्ट व्हायलाच हवं ना?

आता तर काय या सगळ्याचं स्वरूप बदलत चालंलय. कामाठीपुरा सारख्या भागात हे उघडपणे चालतयं म्हणून आपल्याला कळतं आणि आपलं मन हे पाहून विव्हळतं तरी. पण छुप्या आणि फ्लॅशलाईटच्या झोतातल्या कामाठीपुरांचं काय?

कारण आता भूक वाढलेली नाहीये, आता वाढलीये ती वासना ! वेळीच आळा घालावा लागेल नाहीतर उद्या कळीचं फूल होण्याआधीच कुठेतरी काट्यांमधे गुदमरलेल्या पाकळ्या बघायला मिळायच्या. Sad

गिरगावातून बाँबेसेंट्रलला वगैरे जाताना बस रुटवर लागायचा कामाठीपुरा. तेव्हा खूप ऑब्झर्व केलंय असंच काठावरुन. १५-१६ वर्षांच्या वाटणार्‍या मुलीसुद्धा विविध हावभाव करताना पाहून धस्स झालं होतं. खुराड्यांनी भरलेल्या बिल्डिंग्ज, पानाचे जागोजाग ठेले, अरुंद गल्ल्या. बघाल तिथे ह्याच व्यवसायाचं बसलेलं बस्तान. किती वर्षं जुनं असेल हे जग कुणास ठाऊक?

तिथे खरंतर आंध्रमधल्या कुटुंबवत्सल लोकांची वस्ती आहे, म्हणून तर नाव कामाठीपुरा आहे. पण काही गल्ल्यांमध्ये हाच व्यवसाय असल्याने पूर्ण भागच बदनाम आहे. फोरास रोड वगैरे भागही तसाच.

त्या भागात समाजसेवेच्या खूप अ‍ॅक्टिव्हिटीज चालतात पण पुरेशा नसाव्यात. पुर्वी एक डॉक्टर (नाव विसरले) व त्यांची टिम तिथे कंडोम्स वाटायचे आणि एड्सबद्दल माहिती द्यायचे. एड्सबाबतीत त्या भागात काम करणारे ते पहिले डॉक्टर होते ज्यावेळेस एड्सबद्दल काहीच जनजागृती नव्हती.

शैलजा, बोलायला शब्दच नाहीत. खुपच उत्कटतेने लिहिलयस.

खरंच कधी कधी एक योगायोग म्हणून आपण सामान्य जीवन जगतोय असंच वाटत राहतं. अशा कुठल्या ठिकाणी जन्माला आलो असतो तर????

शैलजा,
आपण कितीतरी लोकं बघतो ना? तुरुंगातली माणसं, फ़ुटपाथवरचे भिकारी, अपंग, कुणाला नको असलेली म्हातारीकोतारी,कुष्ठरोगी. पण त्यातलं आतपर्यंत काही पोहोचत नाही.त्यांच्यावरुन नजर निर्विकारपणे फिरुन येते पण त्यांच्या वेदना/दु:ख/ व्हॉटेव्हर मनात उमटत नाही. दुसरयाच क्षणी ती माणसं जगात नाहीचेत अशा सहजतेने आपण पुढे जातो, आपापल्या कामाला लागतो. आपल्याला आपलेच प्रश्न कमी आहेत का की आता भरीस भर यांचाही विचार करायचा? ,इतकी टोकाची संवेदनशीलता आजच्या जगात असून भागत नाही हे सगळं वादविवादाकरता किंवा डिफेन्सकरता बोलायला ठिके, पण त्याने थोडंफार आत जळायचं थांबत नाही.प्रत्येक समस्येसाठी आपण उठून काही करु शकतो किंवा करावं ही अपेक्षा अवाजवी आणि पण खुपतंय ते बोलून दाखवलं की सलणारं काहीतरी वाहून गेल्यासारखं वाटतं. ते जळणं, खुपणं तू समर्थ शब्दात मांडलयंस.

रविवार पेठेकडून सिटी पोस्ट ऑफीस कडे जाताना उजव्या बाजूच्या एका अरुंद गल्लीत मी प्रथम देहविक्रय करणारया स्त्रियांना पाहिलं होतं. त्यानंतर बरेच दि वस मी तिथून गेले. कधी नकळत, कधी मुद्दामून. भरपूर मेकअप चोपडलेल्या त्यांच्या चेहरयावरची थिजलेली भयाण हास्य बघवत नाही की त्यांच्या नजरेला नजर देववत नाही. आपल्या तथाकथित नॉर्मल आयुष्याबद्दल मग उगाचच अपराधीपणा येतो.

आपला जन्म सुखवस्तू कुटुंबात न होता यांच्याजागी झाला असता आणि आपण इथे खितपत पडलो असतो तर काय? ही कल्पनाही करवत नाही. आणि वांझोटा राग, निष्क्रिय चीड याबद्दल स्वतःची घृणा आल्याशिवाय राहत नाही.

तू मीरा नायरचा 'सलाम बाँबे' बघितलायेस का? नसशील तर जरुर बघ.

अगं मी हे कसं मिसलं होतं.
चांगलं लिहिलंयस..
पुण्यात ११ वी मधे पहिल्यांदा जाधव नाट्य संसार मधे फेरी मारावी लागली होती. प्रचंड स्टॉक आणि किंमती अगदी कमी त्यामुळे हौशी, समांतर आणि कॉलेज रंगभूमीला ड्रेपरी आणि प्रॉपर्टीसाठी पुण्यात तेव्हा जाधव नाट्य संसारला पर्याय नव्हता. अगदी आत्ता ४-५ वर्षापूर्वीपर्यंत जाधवांचं दुकान बुधवारातच होतं. ऐन वस्तीत. करोडो फेर्‍या मारल्या असतील तिथे वेगवेगळ्या नाटकांच्या निमित्ताने. ते सगळं आठवलं.

खूपच छान मांडलय!!! या व्यवसायात काहीजणी जबरदस्तीने, फसवणुकीने, परिस्थीतीने आल्या असतील, तश्याच काहीजणी स्वेच्छेनेही आल्या असतील का? असा प्रश्न मला नेहमी पडतो. कोल्हापुरात असताना आम्ही पत्रकारीतेचे काही विध्यार्थी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो पण त्याना पांडित्य, सहानुभुतीपेक्षा गिर्‍हायकाची गरज जास्त असायची त्यामुळं अशा प्रश्नांची उत्तरे कधीच मिळाली नाहीत.

खरंच कधी कधी एक योगायोग म्हणून आपण सामान्य जीवन जगतोय असंच वाटत राहतं. अशा कुठल्या ठिकाणी जन्माला आलो असतो तर????<<<<
खरंच... टोटल रॅण्डम.. अपघातानेच केवळ!

धन्स. सुरेख लिखाण. आतून ढवळून आणणारे. कारण मी हे सारं बालपणी पाहिलंय. त्यावेळी क्लासला जाण्याचा रस्ता 'अशा' वस्तीतूनच होता. त्यावेळी - दिवसा आणि रात्री तील फरक स्पष्ट जाणवायचा. रात्रीची मेनका सकाळी (किंवा दुपारी) दारात केस विंचरत दिसायची तेव्हा शिळी भाजीची पेंढीची अवस्था असायची. आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्यांचे म्हातारपण... प्यासा मधल्या गुरुदत्त सारखी कुठेतरी बेवारस मरून पडायच्या.. म्युनसिपालीटी ची माणसं घेउन जायची. लिहिवत नाही.
तरूण पणी 'त्यांचा' अड्डा आम्ही काही मुलांनी गावाबाहेर नेला तेव्हा त्यांच्या खोल्यावर धाड घातली तेव्हा खाली जेव्हा श्रुंगार सुरू असे तेव्हा वरच्या पोटमाळ्यावर कितीतरी जणी दडून बसलेल्या असायच्या हे आम्हाला आढळले. उबग यायची आणि कीव पण.
मारहाण्,दारु,भांडणे आणी पुन्हा राजरोस बाजार..

हे कसं सुटलं वाचायचं...

कॉलेज संपलं आणी नवीन जॉबला लागले होते. संध्याकाळी एका वेन्डरची पार्टी होती म्हणुन सगळे गेलो होतो ऑफिसमधले. बहुतेक ६.३०-७ वाजले असतील संध्याकाळचे आणि बस नेमकी कामाठीपुर्‍यात शिरली. इतकं भयाण वाटलं होतं ते सगळं. अगदी सगळी वस्ती अंगावर आल्यासारखी झाली होती. खोल्यांमधुन अंधुकसा प्रकाश, चेहरे रंगवलेल्या मुली, बायका. बापरे, तेव्हा एका क्षणासाठी वाटुन गेलं होतं की किती सिक्युर्ड आयुष्य जगतोय आपण. पुढचे ७-८ दिवस तरी हे सगळं डोळ्यांपुढुन जात नव्हतं.

Pages