काठावरून निरखलेला कामाठीपुरा

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

दचकायला होत ना? एक मध्यमवर्गीय घरातल्या व्यक्तीकडून, त्यातल्या त्यात स्त्रीकडून/ मुलीकडून हा शब्द ऐकला तरी आजूबाजूच्या भुवया लगेच उंचावतात!! या शब्दाचा उच्चार करण म्हणजे देखील पाप जणू.... तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात या शब्दाला जागा नसते, जणू काही हे जग अस्तित्वातच नसत आपल्यासाठी. तर, अश्याच मध्यमवर्गीय गर्दीतली आणि बर्‍यापैकी तशीच मानसिकता असलेली मी एक. मुंबईमधेच, कामाठीपुरा म्हणून एक भाग, वसाहत आहे हेच मला माहीत नव्हत. याबाबत मी पूर्ण अनभिज्ञ होते, आणि मग एके दिवशी अचानक कामाठीपुरा माझ्यासमोर उलगडला.... उलगडला कसला, अंगावरच आला एकदम...

काही वर्षांपूर्वी, काही वैयक्तिक कामांसाठी, काही महिने तरी मुंबईमधे फ़ोर्टला सतत भेट द्यावी लागणार, हे स्पष्ट झाल आणि पोटात पहिला गोळा तिथेच आला! मुंबईच्या अफ़ाट बिनचेहर्‍याच्या गर्दीची मला नेहमीच धास्ती वाटते, सहनच होत नाही ती गर्दी मला. नेहमीच धावत पळत असणारी माणस बघूनच मला गुदमरायला होत आणि आता त्याच गर्दीचा एक नगण्य भाग बनून मला त्यांच्यामधेच वावरायच होत. एक बर होत की रोजची कसरत असणार नव्हती. मधून मधून सलग, पुण्यात परतायला पण मिळणार होत आणि मुंबईच्या मानाने निवांत अस आयुष्य पण जगायला मिळणार होत. तेवढच बर वाटायच. सात समुद्रापार जाऊन देखील पुण्याची ओढ आणि थोडाफार पुणेरीपणा काही सुटत नाही!! मानाची बिरूद मिरवायला कोणाला आवडत नाही म्हणा!!

म्हणता, म्हणता, मुंबईलाही आपल म्हणायचे दिवस उजाडले आणि, मनात बरीच धाकधूक घेऊन, मी मुंबईत पोहोचले.

नशिबाने, मुंबईमधे नातेवाईक आहेत. मी मावशीकडेच राहणार होते. तिच्या घरापासून लोकल स्टेशन आणि बेस्टचा डेपो, जवळच आहेत. एक दिवस सोबत बरोबर घेऊन , लोकलची आणि पर्यायाने लोकांची गडबड, धांदल बघूनच लक्षात आले की हे काही आपल्याला झेपणारे नाही, आपल्यासाठी बसच बरी. मी बसच्या पहिल्या स्टॉपलाच चढणार होते, त्यामुळे गर्दी वगैरेची चिंता नव्हती, गंतव्य स्थानाच्या बर्‍यापैकी दारातच उतरू शकले असते, त्यामुले ती ही चिंता राहिली नव्हती. मुंबईमधे जर आधी कधीच वावरला नसाल आणि एकदम असे फ़िरायला लागले, तर मी काय म्हणते आहे ते लक्षात येईल, निदान मला तरी सुरुवातीला खूपच गोंधळल्यासारखे वाटत असे. तर पहिले दोन तीन दिवस मामाने बरोबर यायचे ठरवले. त्याच्या बरोबर गप्पांमधे प्रवासात वेळ कसा जायचा समजत नसे, बाहेरची गर्दी, रस्ता, कशाकडेच फ़ारसे लक्ष न देता, आम्ही खूप गप्पा मारत असू. बरे, तो बरोबर असल्याने मी ही निर्धास्त.

मग, दोन तीन दिवसांनी मी एकटेच जायचे ठरवले, रोज रोज मामाला तरी कुठे जमणार होते माझ्या बरोबर यायला? त्यालाही त्याचे घड्याळाच्या काट्यांवर पळणारे आयुष्य होतेच की. आता इतका आत्मविश्वास नक्कीच आला होता, कि एकटी जाऊ येऊ शकेन, आणि बरोबर घरच्यांचा फ़ोन नंबर होताच. पुस्तक पण घेतले होते वाचायला बरोबर. पुस्तक घेऊन गेले की कुठला ही प्रवास कंटाळवाणा होत नाही, त्यामुळे प्रवासात एक वेळ तिकिट विसरेन, पण पुस्तक नाही!! पहिले तीन चार दिवस, बसमधे चढून एकदा तिकीट काढल की मी पुस्तकात डोके खूपसून वाचत बसत असे. साधारण फ़ोर्टचा भाग लागला, की कंडक्टर ओरडून सांगतच असे, त्यामुळे तशी काळजी नसे. आणि एक दिवस असच वाचत बसलेले असताना, बसच्या बाहेर खूप गलका ऐकयला आला अन, वाचनाच्या तंद्रीतून एकदम जागी झाले.

पहाते तो काय, समोरचा माहौल इतका वेगळा होता... साधारण मध्यमवर्गीय किंवा अतिशय उच्चभ्रू वातावरणापेक्षा अतिशय वेगळ, भसकन अंगावर येईल अस वातावरण वाटल मला ते त्या वेळी.

पहिली पाच दहा मिनिट केवळ अवाक होऊन बसच्या खिडकीतून बाहेर बघण्यातच गेली!! आणि एकदम लक्षात आल, ही वेश्या वस्ती!! तेवढयात पाटीही दिसली लहानशी, कामाठीपुरा. बस, येवढच लिहिलेल. कदाचित, ज्यांना इथे यायची गरज पडते, त्यांच्या साठी पुरेस असाव तेवढच. बस वेश्या वस्तीतून जाते आहे, लक्षात आल, आणि उगीचच माझच मन कसनुस झाल! म्हणजे रोज बस इथून जात होती?? आणि आपल्या काहीच नाही लक्षात आल?? मला खरच वाटेना.... नंतर किती तरी वेळ माझ्या मनातून ते वातावरण पुसलच जात नव्हत. विदारक हा शब्द ऐकला होता, पण विदारक शब्दाचा अर्थ त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिला. अतिशय सुन्न करून टाकणारा असा तो अनुभव होता....

तेह्वासुध्द्धा, पाहताक्षणी जाणवल, ते अतिशय भकास वातावरण, आणि तसेच उदास चेहरे. रस्त्यातली वर्दळही तशीच. कोणाची दखल न घेता, अलिप्त आणि मख्ख देहबोली घेऊन जगणारी, आपल्या आपल्या आयुष्याचे भार सांभाळणारी अन ओढणारी, दैन्य पांघरलेली गर्दी. अन त्यानंतर बसच्या बाहेर पहायच धाडस उरलच नाही त्या दिवशी. परत एकदा मी पुस्तकात डोक खुपसल आणि तशीच बसून राहिले. फ़ोर्ट आल, तस कंडक्टरने ओरडून सूचना दिली अन, मी तंद्रीतून जागी झाले!! इतका वेळ मी एकाच पानावर डोळे खिळवून बसले होते? लक्षातच नाही आल! एक प्रकारचा सुन्नपणा मला वेढून राहिला होता.... त्यातल्यात्यात एवढेच बरे होते, की परत जाताना मी जी बस घेत होते, ती कामाठी पुर्‍यातून जात नसे. कदाचित दुसरी बस मिळत असावी. माझा शेवटचा थांबा असल्याने, त्या थांब्याच्या नावाचा फ़लक बसवर लावलेला दिसला की मी जास्त विचार न करता बसमधे चढत असे!! काम संपवून घरी पोचले तरी, डोक्यातून विषय जात नव्हता... उद्या परत बस तिथूनच जाणार हे जाणवून उगाचच एक दडपण आले होते मनावर.

... आणि परत एकदा, दुसर्‍या दिवशी मी त्याच बसमधे चढले. आज पहिल्यांदाच मी बसमधे वाचत नव्हते. परत एकदा बस कामाठी पुर्‍याच्या रस्त्याला लागली, पण आज मी सारे पाहणार होते.. मनात थोडी भीती, थोडी जिज्ञासा, कुतूहल... हळू हळू नजर एकेक तपशील टिपत गेली... गलिच्छ रस्ता, ठिकठिकाणी फ़ेकलेला कचरा, सांडपाणी, त्यातच खाण्याच्या पदार्थाचे ठेले मांडलेले विक्रेते, चहावाले, इतर दुकाने, विक्रेते, दुकानातली गिर्‍हाईके. मला सगळयात आश्चर्य वाटत होते ते म्हणजे त्यांच्या तिथल्या सराईत वावरण्याचे. अर्थात, त्यांच्या साठी ते रोजचेच जगणे होते, अन रोज मरे त्याला कोण रडे, असेच होत असावे त्यांचे.

रोज सकाळच्या वेळी तिथल्या, देह विक्रयाचा व्यवसाय करणार्‍या स्त्रिया, रस्त्यावर किंवा त्यांच्या खोल्यांच्या दारांत बसलेल्या असायच्या. काही एकमेकींशी बोलत असायच्या, काही जणी उगाच थकून भागून बसलेल्या. सगळे काही स्वीकारल्या सारख्या. तर काही उगाच कुठे तरी भकास नजरेने पहात हरवलेल्या.. सार्‍याच थकलेल्या, भागलेल्या.. आणि काही आक्रस्ताळेपणे झगडताना दिसायच्या. नक्की कोणाशी भांडत असायच्या कोण जाणे? समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? या स्त्रियांना बघणे, त्यांच निरीक्षण करणे हा एक कडवट अनुभव होता माझ्यासाठी. का म्हणून यांच्या नशिबात हे दान पडल होत?

इथे येताना कितीजणींना आपण कुठे आणि का चाललोय ते माहीत असेल? अजाणत्या वयात काय अनुभव घेतले असतील? मनावर ओरखडे उठले असतीलच ना? नक्कीच.. आणि मग कदाचित एक दिवस सार काही मनाविरुद्ध अंगवळणी पडल असेल, पाडून घ्याव लागल असेल.. काहींनी कळत्या वयात, नाइलाज म्हणून हे अग्निदिव्य स्वीकारल असेल, घरच्यांवर मायेची पाखर घालण्यासाठी स्वत: अंतर्बाह्य जळत असतील, आणि ही पाखर घालतानाही आपल अस्तित्व दृष्टीआड ठेवून. घरचे लोकही कदाचित दृष्टीआड सृष्टी म्हणत असतील का?? कधीकधी माणसाचे नाइलाज किती पराकोटीचे असू शकतात..... सारच अर्तक्य! काहींची स्वप्नं चुरगाळली गेली असतील, ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी अश्याच कोणी नवर्‍याने, प्रियकराने, भावाने, नात्यातल्या काका, मामानेच या लेकी बाळींना इथे आणून इथल्या गिधाडंपुढे फेकून दिल असेल! या लेकी बाळी ही कधी काळी निरागसपणे कुठे तरी, आपापल्या घरच्या अंगणात बागडल्या असतील, काहींनी परकराच्या ओच्यात फुल, पान जमवली असतील, काहींनी भातुकलीचे संसार मांडले असतील, सख्यांबरोबर साईसुट्यो खेळल्या असतील.. घरच अठरा विश्व दारिद्र्य आणि झोपडीतला अंधार देखील यांच्या स्वच्छ हसण्याने उजळून निघाला असेल..... आज तस हसू फ़ुलेल कधी यांच्या चेहर्‍यावर? आयुष्यात परत या स्त्रियांचा कधी, कोणावर विश्वास बसेल??

आणि रस्त्यालगतच बागडणारी या माउल्यांची लहान मुल?? त्यांच्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतात!! त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल….. काय भविष्य आहे यांच, हा प्रश्न सतत मनत आल्याशिवाय राहिला नाही… यातल्या मुली असतील, त्यांच हे हसू असच कायम राहील?? का आसूंत बदलेल? या मुलांच निरागस मन निब्बर व्हायला किती लवकर सुरुवात होत असेल! त्यांना देखील याच खातेर्‍यात उडी घ्यावी लागणार आहे का? काय वाटत असेल तिथे व्यवसाय करणार्‍या आईला, लेक पोटी आली म्हणून? काय विचार करत असतील ह्या आया आपल्या लेकरांच्या भवितव्याचा? असा काही विचार करायची मुभा नियती देत असेल त्यांना ?? सगळीच परिस्थिती, दाटला अंधार अशी.....

तिथल्या ह्या स्त्रियांच्या खोल्यांकडे बघवत नव्हतं, मोठया मोठया खिडक्या असणार्‍या काडेपेट्यांसारख्या, तितकीच लांबी, रुंदी असलेल्या ह्या खोल्या पाहून, कबुतरांची खुराडी सुद्धा बरी अस वाटल्या वाचून राहिल नाही. रात्रीच्या वेळेस, ह्याच काडेपेट्यांचे विलास महाल बनतात? तेव्हा, या विलास महालातली औट घटकेची रातराणी, आपल्या कच्च्या बच्च्यांना कुठे आसरा देत असेल? कोणा महाभागाची औट घटकेची सोबत करताना, तिच्या मनात काय येत असेल? मन कस आणि किती आक्रंदत असेल? असे किती मातांचे, नवतरुणींचे, अबोध बालिकांचे आक्रोश या भिंतींनी पाहिले असतील? पचवू शकल्या असतील? सकाळच्या वेळेस, या खोल्यांच्या भिंती अगदी भकास वाटायच्या, जणू काही या बायकांच्या मनातल्या मूक आक्रोशाच्या साक्षीदार होता होता, जगायच विसरून गेल्यासारख्या. सार्‍या वातावरणातच एक मृतप्राय कळा, एक उदासवाणा, अलिप्त भाव. जणू माणूसकीची जिती जागती कबर.

उगाचच एक वाक्य आठवल होत तेह्वा. स्त्री ही क्षणकालची पत्नी अन अनंतकालची माता असते.... किती वेगळ्या अर्थाने ते वाक्य तिथे साकार झाल होत!

.... अजून एक विरोधाभास पाहिला अन खूप जाणवलाही.

एक रेणुकामातेच देऊळ होत, छोटस, सुंदरस.. मनोभावे स्त्री रुपाची, आदिशक्तीची पूजा झालेली दिसत होती. देवीची मुद्रा प्रसन्न, हसरी, नजर तिच्या ह्या लेकींकडे. देवळाच्या बाहेर एक पताका लावलेली होती, त्यावर देवी सूक्तातले मंत्र ठळक अक्षरात लिहिले होते...

ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll

काय पाहत होती आई उघड्या डोळ्यांनी? मानवरुपातल्या स्त्रीशक्तीची, मातृरुपाची विटंबना? दैन्य, लाचारी, असहायता???

का सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे केवळ???

विषय: 
प्रकार: 

शैलजा .. छान शब्दात मांडले आहेस..
सहज एक विचार मनात आला... वेश्या व्यवसायातील एखादी बाईने जर स्वखुशीने हा व्यवसाय सोडून सर्वसामान्य जिवन जगायचे ठरवले तर आपला समाज तिला किती साथ देईल.. समाजातील किती बायका तिच्याशी मैत्री करायला तयार होतील?? किती जणी तिला घरी बोलावतील?? आणी पुरुषांचे तिच्याविषयीचे मत किंवा भावना?? काय नजरेने पाहील सगळा समाज तिच्याकडे??? काही लोक तिच्याकडे सहानुभुतीने पहातीलही पण तिला एक माणुस म्हणुन स्वाभिमानाने जगु देणार नाहीत अर्थात काही लोक चांगले आहेतही पण अशी संख्या नगण्य असेल..
या व्यवसायातुन अश्या स्रियाना बाहेर काढायचे असेल तर समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे..

या व्यवसायातुन अश्या स्रियाना बाहेर काढायचे असेल तर समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे.<<<
खरंय.

हे वर काढल्याबद्दल अनेकानेक आभार.
शैलजा- बरे झाले लिहीलेस. Sad
मणिकर्णिका, अरुंधती, - तुमच्या प्रतिसादांमधुन बरेच काही शिकायला मिळाले. धन्यवाद.
नीरजा- अनुमोदन.

Sad Speechless
.
.
.
या व्यवसायातुन अश्या स्रियाना बाहेर काढायचे असेल तर समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे.<<<<< अनुमोदन

त्या प्रकाशन समारंभात सुनीताताई जोगळेकरांनी सांगितले की:

१. कोणत्याही वेश्येला लायसेन्स वगैरे नसते. हे गैरसमज आहेत.

२. उदरनिर्वाहासाठी देहविक्रय करण्याची कायद्यात परवागी आहे.

३. दुसर्‍याकडून देहविक्रय करवून घेऊन पैसे मिळवणे याला बंदी आहे.

४. पुण्यातील बुधवार पेठेत न राहणार्‍या परंतु केवळ अतिरिक्त पैसे व देहसुख या मोहाने बाहेरून तेथे दिवसभर येणार्‍या व संध्याकाळी घरी परत जाणार्‍याही अनेक महिला आहेत. एका अशा महिलेच्या मुलाच्या मित्राने तिला लक्ष्मी रोडवर पाहिले व तिच्या मुलाला सांगितले. मुलाने दुसर्‍या दिवशी लक्ष ठेवले. संध्याकाळी भांडणे झाली व मुलगा घरातून निघून गेला.

५. मारामार्‍या, भांडणे, छळ, गिर्‍हाईकाने केलेली नियमीत मारहाण व बाहेरच्या जगात काहीही स्थान न मिळणे यामुळे हे जग अत्यंत विदारक परिस्थितीत असते. येथील राहणीमान किळसवाणे असते. तारुण्य ओसरल्यानंतर येथे कागदाच्या कपट्याइतकेही महत्व मिळत नाही.

=====================================

हे जग आपल्याच जगात आहे. नाटकशाळा, बटीक, रखेली, रखेल, वेश्या, रांड, रंडी, देवदासी ही केवळ विशेषणे नव्हेत तर यांचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. पेशव्यांच्या काळात अनेक नाटकशाळा किंवा बटीक असायच्या. दासीही असायच्या. इतकेच नाही तर काही वेळा नाटकशाळा किंवा बटीकच सती जायची पत्नीऐवजी! त्याचवेळेस त्या सर्व स्त्रिया बुधवार पेठेत राहू लागलेल्या होत्या.

हे जग आपणच निर्माण केलेले आहे. घृणेचा दृष्टिकोन सोडणे केव्हा जमेल माहीत नाही. कर्नाटक, आंध्र, बंगाल व नेपाळ येथील मुली अल्पवयात येथे आणल्या जातात. एका कार्यक्रमात एका सहावीतल्या मुलीला कसले तरी बक्षिस मिळाले. ती आनंदाने आईकडे गेली तर आईचे वय फक्त चोवीस होते. म्हणजे तिला बाराव्या वा तेराव्या वर्षी ही मुलगी झालेली असणार!

========================================

मीनाताईंनी सांगितले की एक हजार रुपये एक तासाचे या भावावरून शेवटी एक कप चहा देतोस का असे विचारण्यापर्यंत या स्त्रियांची परिस्थिती होते.

=======================================

हा लेख वाचून त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. मूळ लेखावर आधी प्रतिसाद दिलेलाच होता, पण परत हा प्रतिसाद द्यावासा वाटला.

-'बेफिकीर'!

.

प्रगो,

हबा आणि विशाल यांची रजिस्टर्ड संस्था त्यातील एका अँगलवर काम करत आहे. तुम्ही तयार असाल तर आपण दोघे मिळून वंचित विकासचे काम करूयात, मी तसाही करणारच आहे. तुमची साथ मिळाली तर उत्तमच!

-'बेफिकीर'!

प्रगो आणि बेफिकीर, तुम्ही चर्चेसाठी वेगळा बाफ काढून तिथे चर्चा करु शकाल. धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियांसाठी आणि मांडलेल्या माहितीबद्दल मनापासून आभार.

एका अशा महिलेच्या मुलाच्या मित्राने तिला लक्ष्मी रोडवर पाहिले व तिच्या मुलाला सांगितले. मुलाने दुसर्‍या दिवशी लक्ष ठेवले. संध्याकाळी भांडणे झाली व मुलगा घरातून निघून गेला.
>>>> Sad त्या मुलाला प्रचंड मानसिक धक्का बसला असेल. परंतु रेडलाईट एरियात आईसमवेत रहाणार्‍या मुलांना हेच नॉर्मल जिवन वाटत असेल.

या व्यवसायातुन अश्या स्रियाना बाहेर काढायचे असेल तर समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे.<<<<< अनुमोदन
कळस म्हणजे, जो पुरुष व ज्या पुरुषी वृत्तीसाठी त्यांना यात ढकलले जाते तो मात्र समाजात सहज वावरत असतो. समाजाचा स्त्रीकडे पाहायचा दृष्टीकोन बदलण्या ऐवजी जर अशा पुरुषाकडे पाहायचा बदलला तर............??? परिस्थीती लवकर सुधारेल. पण याला किती वर्षे जातील माहीत नाही. हे होउ शकते का तेही माहीत नाही.

शैलजा.. काय लिहीलयस तू, फारच आतून... मला खरच धक्का बसला.
तुझ हे ललित मी एका जुन्या कवितेत मांडल होतं, तिच कविता उलघडून सागितलीस असं वाटलं, किती साम्य आहे,बघ वाचून. इथे लिंक देतो आहे.

http://www.maayboli.com/node/4342

Sad पूर्वी दिलेली प्रतिक्रिया गायब झालीय. असो

हे असे बघतांना कित्ती हताश वाटते ना... तू अगदी मनापासून लिहिले आहेस. तिथल्या लहानग्यांचे भविष्य काय असेल, हा खरेच प्रश्न पडतो.

भयानक आहे यात वादच नाही...असे जीवन कोणाच्याही नशिबी न येओ..
पण वेळ आलीच तर या स्त्रियांचे अन त्यांच्या मुलांचे पुनर्वसन करायच्या वेळी "समाजाने दृष्टीकोन बदलायला हवा " म्हणणारे काय मदत करतील? आमच्या मुली बाळी आहेत, मुलगा आहे वगैरे सांगून हात झटकणार नाहीत कशावरून? समाज म्हणजे आपणच दुसरे कोण? शिवाजी दुसर्याच्याच घरी जन्मायचा झाला तर त्यासाठी जिजाऊ जन्मायला हवी. असो.

बर्याच स्त्रिया/ मुली यात स्वखुशीनेसुद्धा पोकेट मनी साठी येतात हेसुद्धा सत्य आहे...संख्या तुलनेने कमी असेल. पण वेश्यावस्तीत राहणाऱ्यांचे पुनर्वसन होतेय हे अगदी उत्तम. बाकी समाजमन पहा , देवीच्या चरणी तरण्या मुली खालून मग लोक त्यांचा उपभोग घेणार...जर देवीच्याच चरणी घालायचे तर इतरांचा काय संबंध येतो? पण नाही...सोय सगळीच.. Sad
हळूहळु का होईना विचार बदलताहेत हे काय कमी?

काठावरून.... ह्म्म्म.. लेखनशैली छान आहे.. लेख भिडला.. गेलोय त्या बाजूने बऱ्याचदा.. तू म्हणतेस तसे नकोसे होते अनेकदा..

थोड मागे जाउया.. मुळात कामाठीपुरा इथे का वसला? ब्रिटीश काळात फोर्ट म्हणजे किल्ला भागात जे इंग्रज अधिकारी राहत त्यांची शारीरिक गरज भागवण्यासाठी हा भाग तयार झाला. अनेक ठिकाणाहून स्त्रियांना जबरदस्तीने येथे आणून व्यवसाय करावयास भाग पडले गेले. इंग्रजांसाठी हे काम सिद्दी करत. आज मात्र त्याचे प्रचंड मोठे रूप आपल्याला पाहायला मिळते.

सुंदर लेख. अशा स्त्रीयांसाठी/मुलांसाठी काहीतरी समाजकार्य करायला हवे. माबो वर मैत्र जीवांचेची मध्ये काही योजना सुरु होती. त्यांच्या कक्षेत हे येत नाही का?

शैलजा,
एक वेगळा आणि भिडणारा विषय !
Happy
हे पुर्ण बंद होणं किंवा कमी करणं शक्य नाही असं वाटतं, शेवटी ही देखील समाजाची एक गरज तर आहे
पण यात असलेल्या स्त्रिंयाना थोडं तरी मानान जगता याव,त्यांची दलालाकडुन होणारी फसवणुक्,लुबाडणुक थांबवण्यासाठी,राहणीमान सुधारण्यासाठी समाजानी मदत करण्याची गरज आहे अस वाटतं.

रात्रीच्या वेळेस, ह्याच काडेपेट्यांचे विलास महाल बनतात? तेव्हा, या विलास महालातली औट घटकेची रातराणी, आपल्या कच्च्या बच्च्यांना कुठे आसरा देत असेल? कोणा महाभागाची औट घटकेची सोबत करताना, तिच्या मनात काय येत असेल? मन कस आणि किती आक्रंदत असेल? असे किती मातांचे, नवतरुणींचे, अबोध बालिकांचे आक्रोश या भिंतींनी पाहिले असतील? पचवू शकल्या असतील?>>>>>>
बाप रे ,शैलजा काय अचूक शब्दात मांडलंस!

Pages