उत्तर

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 January, 2009 - 16:15

आई,

आता मी जे लिहिणार आहे, त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कशी करावी मला समजत नाही.
थेटच लिहितो.

आई गं, मी आत्महत्या करतोय.

फक्त वाटलं की मी हे का करतोय हे तुला माहीत असायला हवं. आणि तुला न सांगता कधी कुठे गेलो नाही ना. खरंतर तेवढ्यासाठीच घरी आलो काल रात्री. नाहीतर कदाचित तेव्हाच –
शिवाय लिहून ठेवलेलं असलं की पोलीस केस वगैरे झाली तर तुझ्या आणि अभिच्या बाबतीत शंकेला जागा राहणार नाही ना.

काल सकाळी प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी कॉलेजला गेलो तेव्हा तू पाहिलंस ना माझ्या गळ्यातली बॅग कसली जड झाली होती. प्रोजेक्ट रिपोर्टच्या कॉपीज, प्रेझेंटेशनच्या स्लाईड्स, काय काय होतं त्यात. गेले सहा महिने केलेल्या ढोरमेहनतीचे पुरावे. चांगल्या ग्रेड्सवरचा, चांगल्या जॉबवरचा क्लेम.

गर्दीचीच वेळ होती. ट्रेनमधे चढताना फूटबोर्डवरचा मधला बार असतो ना, त्याच्याभोवती माझ्या बॅगचा पट्टा अडकला. बारच्या एका बाजूला मी आणि दुसर्‍या बाजूला बॅग. मलाही त्यामुळे नीट आत शिरता येत नव्हतं आणि दुसर्‍या बाजूलाही एक जण त्या अडनिड्या बॅगमुळे अडकला होता. पाय फूटबोर्डवर जेमतेम टेकवलेला, हाताने कसाबसा बार घट्ट धरलेला – असा तो जवळपास बाहेरच लोंबकळत होता. तो ओरडून ओरडून मला सांगत होता की बॅग सोडा, नाहीतर मी पडेन.

आणि आई, माझ्याच्याने इतक्या पटकन, इतक्या सहज ती बॅग टाकवेना. मी सोडतो सोडतो म्हणत म्हणत तो क्षण थोडा – थोडासाच - लांबवला. पण तेवढ्याने उशीर झाला गं. त्याचा पाय तेवढ्यात निसटला फूटबोर्डवरून. धपकन आवाज झाला. डब्यातल्या कलकलाटात त्याची किंकाळीसुद्धा विरून गेली. गाडीने प्लॅटफॉर्म नुकता सोडला होता नव्हता – खालच्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा गाडीतले लोक म्हणायला लागले, कोई गिर गया लगता है बेचारा – ट्रेन मत रोको – लेट हो जायेगा – वो अब वापस थोडेही आयेगा! पण गाडी थांबलीच. मग तीच लेट होणारी लोकं ट्रेनमधून उड्या मारून कोंडाळं करून त्याचं ते छिन्नविच्छिन्न शरीर बघत उभी राहिली. माझे पाय लटपटत होते. कसाबसा प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर जाऊन बसलो. सुन्न झालो होतो.

जरा भानावर आल्यावर पहिला विचार मनात आला तो काय होता माहीत आहे? रिलीफचा होता आई! हे आपल्यामुळे झालं, हे आपण सोडून कोणालाही माहीत नाही – याचा रिलीफ!

मग सुचलं हळहळणं वगैरे! ते ही किती? पाचेक मिनिटंच गेली असतील. मग कॉलेज, प्रेझेंटेशन, होणारा उशीर सगळं आठवलं. उठलो, एक कप गरम कॉफी प्यायलो. स्वतःला सांगितलं, तू बॅग सोडणारच होतास – नव्हे, जवळपास सोडलीच होतीस.. पण तीच अडकली होती.. इतकी अवजड बॅग – कशी हलणार होती त्या गर्दीत? त्या माणसाने तरी – म्हणजे गेला हे वाईट झालं – पण कशाला इतकं जिवावर उदार होऊन चढायला हवं होतं? गर्दी आहे – होतातच या गोष्टी – आपली काळजी आपणच घेता यायला हवी होती त्याला! तू काय करणार?

असं स्वतःला समजावून, कॉफी पिऊन, पुढली ट्रेन पकडून कॉलेजला गेलो. सबमिशन्स झाली, प्रेझेंटेशन झालं, एक कँपस इन्टरव्ह्यूसुद्धा झाला. आणि चांगलाही झाला! आधी मनाशी म्हणत होतो, की कर्तव्य करतोय. आईने बाबांच्या मागे इतके कष्ट करून वाढवलं आपल्याला – आता आपण चांगलं पास होणं, चांगला जॉब घेऊन मार्गी लागणं हे तिच्यासाठी तरी करायलाच हवं, नाही का? आत्ता ते बाकीचे विचार करणं बरोबर नाही. व्हायचं ते होवून गेलं. हे आणि असंच बरंच काही. एकेक कामं हातावेगळी करत मग हळूहळू गुंततही गेलो त्यात. इन्टरव्ह्यू झाल्यावर अम्या आणि दिलीपबरोबर हॉटेलमधे खातपीत टाईमपास केला, दुसर्‍या दिवशी पिक्चरला जायचं ठरवलं, रिझल्टनंतर सेलिब्रेट कसं करायचं त्यावर गहन चर्चा केली, कुठल्या कंपन्या सद्ध्या हायर करतायत, कुणाची कुठे ओळख आहे, याचा अंदाज घेऊन झाला – हे सगळं करत असताना, आई, सकाळच्या प्रसंगाची मला आठवणसुद्धा नव्हती!!

स्टेशनवर आलो. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली पाहिली, आणि मग मात्र एकदम सगळा दिवस अंगावर आला माझ्या. हातपायच हलेनात. दोन-तीन ट्रेन अशाच गेल्या. पुढची पकडली कशीबशी. आता मी एकटा होतो. कुठे तोंड लपवायला जागाच उरली नाही असं वाटलं. डोकं भणाणून गेलं. मी असं कसं वागू शकतो? एक प्रेझेंटेशन आणि एक चालताबोलता माणूस – यात माझा प्रेफरन्स हा होता? इतक्या वेळात काही पश्चात्ताप, तो माणूस कोण असेल, त्याच्या घरच्यांचं काय होईल, आपण शोधावं का, त्यांना काही मदत करता आली तर पहावं का – असलं काहीसुद्धा माझ्या मनाला शिवलंसुद्धा नाही? आणि शोधता आलं नसतंही कदाचित – पण निदान तशी इच्छा व्हावी की नाही? नाही झाली. दिवसभरात नाही झाली. जशी एक क्षणसुद्धा बॅग सोडायची इच्छा नव्हती झाली, तशीच.

मी असा आहे? इतका स्वार्थी, इतका नीच आहे? माझ्या हातून एक जिताजागता माणूस मेल्यावरही मी ते विसरून खाऊपिऊ शकतो? माझ्या भविष्याचे – भविष्याचे सोड, सिनेमाचे प्लॅन आखू शकतो? मी कुणी पाहिलं नाही म्हणून हायसं वाटून घेऊ शकतो? याची टोचणी लागायलाही मला एक अक्खा दिवस जावा लागला? त्याच्या मागोमाग उडी नाही मारावीशी वाटली? मी माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी तुझा मुलगा म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी जगायच्या लायकीचा आहे का?

नाही, प्लीज उत्तर देऊ नकोस. तुझ्या उत्तराला घाबरलो म्हणून काल रात्री हे काही बोललो नाही. तू किंवा अभिने जर मला समजावायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता. तुला झाला प्रकार अक्षम्यच वाटलाय असंच उत्तर मी गृहित धरतोय. मी नाही तरी कोणीतरी तितकं सेन्सेटिव्ह आहे – हा दिलासा राहू दे मला.

मी अशी आत्महत्या करणं तुमचा विचार करता बरोबर आहे का? कदाचित नाही. ’तरी तुला अभि आहे’ असलं काहीतरी मी बोलणार नाही. पण अशी कल्पना कर की काल त्या माणसाच्या जागी फूटबोर्डवरून माझा पाय निसटला असता, तर हे चूक की बरोबर हा प्रश्न आला असता का?

हे असेच उलट सुलट विचार करत होतो रात्रभर. आणि जाणवलं की हा गिल्ट घेऊन जगणं आपल्याला अशक्य आहे. यानंतर जगलो तर वेडा तरी होईन, किंवा त्याहून भयंकर म्हणजे जगण्याच्या नावाखाली आणखी निर्ढावत जाईन. यापुढे चांगला वागेन वगैरेला काही अर्थ नसतो गं. आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.

तुझ्या दुःखावर हे पत्र म्हणजे उत्तर नाही, हे मला कळतंय, आणि त्यासाठी फक्त क्षमा मागू शकतो. पण माझ्या प्रश्नांना दुसरं उत्तर सुचत नाही मला.

- अनिरुद्ध
१२ जानेवारी २००९

गुलमोहर: 

निशब्द .. ! स्वाती तू खुपच effective लिहीतेस ..

क्या बात है!
नायक आवडला मला.

वाह वाह काय लेखन शैली आहे ... एकदा वाचायला लागले कि शेवट पर्यन्त जायलच हवे एकादमात. मस्त....

स्वाती, बहोत खूब!
***** यानंतर जगलो तर वेडा तरी होईन, किंवा त्याहून भयंकर म्हणजे जगण्याच्या नावाखाली आणखी निर्ढावत जाईन. यापुढे चांगला वागेन वगैरेला काही अर्थ नसतो गं. आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.
......
इतकं म्हणजे इतकं नेमकं.... की आता काय सांगू? तितकं नेमकं नाही ना सांगत येतय...
(लिही गं... इतका वेळ नको ना घेऊस मधे)

खूपच सही ! दाद ला अनुमोदन . लिहित रहा दिवाळी अंकात लिहिल्यानंतर बरेच दिवसांनी आली ही कथा. पुढच्या लिखाणाची वाट पाहतोय आम्ही मायबोलीकर Happy

***************
गोड बोलायला
तिळगूळ कशाला ?

सही... खास स्वाती स्टाईल कथा आहे. Happy वाचताना उगाचच दोन तासांपूर्वीच पाहिलेली टिव्हीवरची बातमी आठवत राहिली...हडसन नदीत बुडत असलेल्या प्लेनच्या पायलटने स्वत: बाहेर पडण्यापूर्वी अख्ख्या प्लेनच्या दोन फेर्‍या पूर्ण केल्या; कोणतेही अडकलेले प्रवासी राहिले नाहीत ना हे पहायला! जिवाचीही किंमत कशी बदलते ना?

लेखन शैली जबरदस्त आहे.......पुढच्या कथेचि वाट पाह्ते आहे,.....

सुरेखच! अजून कथा, कविता येऊदेत!

अप्रतिम Happy
.
पकाक पॅक पॅक पॅक पॅक

बापरे! अगदी विचार करायला लावणारी. खरच असं झालं तर एखादी व्यक्ति काय निर्णय घेईल. आवडली.

काय लिहिलं आहेस! सुन्न व्हायला होतं काही क्षण वाचून!

*मग तीच लेट होणारी लोकं ट्रेनमधून उड्या मारून कोंडाळं करून त्याचं ते छिन्नविच्छिन्न शरीर बघत उभी राहिली

*आपल्यामुळे झालं, हे आपण सोडून कोणालाही माहीत नाही – याचा रिलीफ!

*मग सुचलं हळहळणं वगैरे

*स्वतःला सांगितलं, तू बॅग सोडणारच होतास – नव्हे, जवळपास सोडलीच होतीस.. पण तीच अडकली होती.

*त्या माणसाने तरी – म्हणजे गेला हे वाईट झालं – पण कशाला इतकं जिवावर उदार होऊन चढायला हवं होतं

*एक प्रेझेंटेशन आणि एक चालताबोलता माणूस – यात माझा प्रेफरन्स हा होता?

*तू किंवा अभिने जर मला समजावायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता.

स्साला .... मानवी मनोव्यापाराची इतकी गुंतागुंत इतकी नीट कशी लिहीता येते ?

स्वाती... सही... खूपच touching आहे.. !!
लिहीत रहा कथा regularly..!

छान जमलीये नी विचार करायला लावणारी आहे.

उद्विग्न करणारी आहे.. पण तरीही आत्महत्या हे प्रायश्चित्त होऊच शकत नाही..

खुपच छान्...मन सुन्न करणारी....
सुरुवातीपसुन असं एक फिलींग कि आपण नायक आहे...पण त्याचा विचार पहाता, आपण असा विचार करु शकु का असा पडलेला यक्षप्रश्न....???रोज होणारे अपघात पाहून आपण ही हळह़ळतो, पण त्यासाठी जेव्हा आपणच(प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष )जबाबदार असतो तेव्हा????खरंच वेड लागायची पाळी येइल...:अरेरे:
दाद , वैभव जी ना सहमत...

छान आहे कथा, विचार करयला लावणारी. कुठल्या तरि हिंन्दी सिनेमाची आठवण झाली, त्यात गुन्हेगाराला, त्याने ज्याचा खून केलेला असतो त्याच्या घरी राहन्याची शिक्षा देतात, त्याला प्रत्येक क्षण केलेल्या गुन्ह्याची अठवण येत राहते.

अग्निपंख

सुन्न झालं वाचून , फारच परिणामकारक लिहिल्ये.

सुधीर

मस्त... सुरेख लिहिलंय..

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

बधिर झालंय मन आणि डोकं ! दोन्ही!
दाद, वैभव म्हणाले तसं.. इतकं नेमकं कसं काय.. सलाम!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

कुपच सुरेख जमलिये कथा! वरच्या सगळ्यांनाच अनुमोदन.

सुन्न केलंस !!!

<<<<आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.>>>>> खुप पटलं गं.
खरच असं वाटतं गं आपल्याकडुन झालेल्या चुकांबद्दल ... सगळे म्हणतात, तु खुप विचार करते.. पण वाईट वाटुन घेणं, हे चुकीचं असतं? त्या चुका झाल्याच नाही असं मानायचं?
------------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

सुन्न झालं वाचून..... कथा आवडली
पुढच्या कथेची वाट पहाते आहे..

स्वाती, कथा लिहिली छान पण वास्तवीकतेच्या फार दूर जाणारी वाटली. खरीखुरी जरी असली तरी अनिरुद्ध समंजस नाही वाटला. घरी आई आणि अभि असताना त्यांचे आपल्यानंतर काय होईल हा विचार केला नाही आणि वर आफताब म्हणतो तसे आत्महत्या हे प्रायश्चित नाही होऊ शकत.

सुन्न !!!
.
.
काय गोड गुरुची शाळा | सुटला जनक जननीचा लळा ||
- श्री साई सच्चरित
-------
बेदी, चंद्रा, प्रसन्ना व वेंकट चौकडीतील चंद्रशेखर यांचे आडनाव "भागवत" होते पण त्यांचा जन्म म्हैसूरचा म्हणून बी.एस. चंद्रशेखर असे नाव लावत.
------

कथा छानच आहे Happy
...... पण शेवट पटला नाही Sad
आफताब, बी ला अनुमोदन.

प्रायश्चित घ्यायचंच असेल तर ते योग्य असलं पाहीजे.
माझ्यामुळे तु मेलास म्हणुन मी मरतो, हे काही पटत नाही. एक घरटं उद्ध्वस्त करणार्‍याला दुसरं घर उद्ध्वस्त कसं करवतं??
प्रायश्चितच घ्यायचं आहे ना, मग ज्यांना त्रास होतोय त्यांच्यासाठी काहीतरी करा. तुमचं पुर्ण आयुष्य त्यांच्यासाठी वाहुन घ्या.

कुष्ठरोग्यांना मरताना पाहुन डॉ. आमट्यांनी आत्महत्या केली असती तर आनंदाश्रम उभा राहीला असता का?
**************
आयसीसीच्या नानाची टांग

Pages