उंबरातले किडे मकोडे - फोटोसहित

Submitted by दिनेश. on 24 February, 2011 - 07:00

मी यापुर्वी अनेकवेळा उंबराच्या झाडाबद्दल लिहिले होते. ते इथे एकत्र करतो. पण मी यापूर्वी
इतके सविस्तर लिहिले नव्हते. कारण हे सर्व अद्भूत तर आहेच शिवाय आपल्या कल्पनेपेक्षाही
क्लिष्ट आहे. पण ते सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.

खरे तर उंबर ज्या कूळात येतो, ते सगळेच कूळ आपल्या परिचयाचे. वड, पिंपळ, रबर ही
सगळी याच कूळातली मंडळी. रबराचेही मूळ स्थान भारतच आहे.
वड, पिंपळ काय किंवा उंबर काय, या सर्व झाडांना आपण पवित्र मानतो. बहुतेक गावात एक
पूर्ण वाढलेले वडाचे नाहीतर पिंपळाचे झाड असतेच. गोव्याला तर बसथांब्यांची नावे, वडाकडे,
पिंपळाकडे अशी आहेत.

उंबराचेही झाडही आपण पवित्र मानतो. महाराष्ट्रातील बहुतेक एस टी स्टॅंड वर, खास करुन जिथे
त्यांचे वर्कशॉप असते तिथे, श्री दतगुरुंचे देऊळ असतेच. आणि त्या परिसरात एखादे उंबराचे
झाड असतेच. उंबराचे झाड कुणी मुद्दाम लावलेय असे दिसत नाही (इतरत्र उगवलेले आणलेले
असते.) आणि उंबर वा औदुंबर आणि श्री दत्तगुरु यांचे नाते एवढे अतूट मानतात, कि आपोआप
उगवलेल्या या झाडावर कधी कुर्‍हाड चालवली जात नाही.

उंबराचे लाकूड मजबूत असते. ते लवकर कूजत नाही. पुर्वी घराच्या दारात आवर्जून उंबराची फळी
ठोकली जात असे. म्हणून तर त्याला उंबरठा म्हणायचे.
उंबराच्या पूर्ण वाढलेल्या झाडाच्या मूळाशी पाण्याचा वाहता झरा असतो, असे आढळल्यामूळे, नवीन
विहिर खोदताना, हा निकष लावला जातो.उंबराची फांदी तोडल्यास, त्यातून बराच वेळ पाणी
येत राहते.

डॉ. राणी बंग यांच्या "गोईण" पुस्तकात असा उल्लेख आहे कि, आदीवासी लोकात, लेकीसाठी
सासर बघताना, त्या घराच्या आसपास उंबराचे झाड असल्याची खातरजमा केली जाते. हेतू
सरळ असतो, जर सासुने उपाशी तापाशी ठेवले तर लेक, उंबराची फळे खाऊन तग धरु शकेल.
उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी उंबर खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा संकेत आहे.
गडकिल्ले भटकताना, कुठेही उंबराचे झाड दिसले, तर आवर्जून ती फळे खाण्याचा सल्ला मी देत
असतो. अशी फळे खाल्य्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही, असा अनुभव आहे.

इतक्या परिचयाच्या उंबराबाबत, एक गूढ मात्र आपल्या मनात कायम असते. आणि ते गूढ
असते, उंबराच्या फूलाबद्दल.

आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांनी गायलेल्या, एका गाण्यात अशा काहिशा ओळी आहेत,

माझेच मी म्हणू कि, हे भाग्य या घराचे
दिसले मला कधीचे, हे फूल उंबराचे

खुप दिवसांनी भेटलेल्या व्यक्तीसाठी, किंवा क्वचितच भेटणार्‍या व्यक्तीसाठी हे रुपक वापरतात.
उंबराच्या फूलाबद्दल गावगप्पाच अधिक. कुणी म्हणते कि ते बैलगाडीच्या चाकाएवढे मोठे असते
तर कुणी म्हणते कि त्याच्या एका पाकळीत बसून माणूस नदी पार करु शकतो. शिवाय फक्त
भाग्यवान माणसांनाच ते दिसते, अशी मेख आहेच.

गदिमांनी मात्र, अचूक सत्य त्यांच्या एका चित्रपटगीतात लिहिले आहे.

उंबरातले किडेमकोडे, उंबरि करती लिला
जग हे बंदीशाला, जो आला तो रमला.

आणि त्याबाबतच आपण जरा विस्ताराने बोलू या.

माणसाशी असते का ते माहीत नाही, पण उंबराच्या झाडाची अनेकजणांशी घट्ट मैत्री असते. त्यापैकी
काही मित्र तर उंबरासाठी अक्षरश: प्राण पणाला लावतात. काही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधतात
तर काही निव्वळ स्वार्थ साधतात.

काही किटकांना अंडी घालण्यासाठी एक खास अवयव असतो. त्याला ओव्हिपोझिटर असा शब्द आहे.
या अवयवाच्या मदतीने ते किटक पानांवर अंडी न घालता, थेट पानाच्या आत घालतात. (उंबराशिवाय
तूम्ही अशा गाठी, तमालपत्राच्या पानावर देखील बघितल्या असतील) असे अंडे घातल्यावर, उंबराचे झाड
पानांवर एक गाठ निर्माण करते. या गाठीत एक पोकळी निर्माण होते आणि त्यात त्या किटकाची पूर्ण
वाढ होते. या गाठी अलगद फ़ोडल्यास, त्यात एक जिवंत किडा दिसतो. हिरवट पिवळ्या रंगाचा हा किडा
पूर्ण वाढ झालेला असेल तर थोड्याच वेळात उडूनही जातो. छोटा असला तरी नजरेला सहज दिसू शकतो
तो. उंबराच्या काही झाडांवर या गाठी कमी दिसतात, तर काहिंवर या गाठी भरपूर दिसतात. असे
आदरातिथ्य करण्यात झाडाचा काही फायदा होतो का ते माहीत नाही. (हा फोटो जागू कडून साभार. मी मुद्दाम तिला या गाठी फोडून बघायला सांगितल्या होत्या. जर गाठी खालून उघडलेल्या नसतील, तर त्यात जिवंत किडा असतोच.)

umbarachya gathi.JPG

मी वर लिहिलेच आहे, कि उंबराच्या झाडाची लागवड केली जात नाही. पण ते बियांपासूनही सहज
उगवत नाही. तूम्ही निरिक्षण केले असेल, तर सहज जाणवेल कि मोठ्या वाढलेल्या झाडाखाली,
त्याची रोपे उगवलीत असेल उंबर (आणि वड, पिंपळ ) यांच्या बाबतीत होत नाही. पण काहिश्या
अवघड जागी मात्र याची रोपे दिसतात. दूसर्‍या झाडावर, देवळाच्या कळसावर, इमारतीच्या भिंतीतल्या
भेगांत, ड्रेनेज पाईप्सच्या बेचक्यात हि झाडे, उगवलेली असतात. तिथे ती कशी जातात ?

हे काम या झाडांचे काही मित्र करतात. हि फळ पिकली कि आकर्षक रंगाची होतात. खास करुन
लाल पिवळ्या रंगाची. या रंगाचे पक्ष्यांना आकर्षण असतेच. शिवाय आणखी एक उपाय म्हणून
या फळांना एक गोडूस वास पण येतो. त्याने वटवाघळे, माकडे येतात.

कावळे, धनेश (हॉर्नबील) आणि वटवाघळे आपल्या पोटातील उब या फळांतील बियाना देतात. अशी उब
मिळाल्यावरच त्या बियांवरचे कठीण आवरण जाते आणि त्या रुजू शकतात. या मंडळींची विष्ठा जिथे
जिथे पडू शकते, तिथे तिथे या उंबराची (आणि वडा पिंपळाची) रोपे उगवू शकतात.
यामधे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जातो. पक्ष्यांना गोड खाऊ मिळतो आणि झाडाचा बीजप्रसार
होतो.

पण मूळात बिया निर्माण होण्यासाठी परागीभवनाचे काम कोण करते ? तर हे काम केले जाते, उंबरासाठी
प्राण पणाला लावणार्‍या एका खास किटकांतर्फे. या किटकांच्या अनेक प्रजाती आहेत, आणि त्या वास्प
म्हणजेच गांधीलमाशीच्या कूळातल्या आहेत.

उंबराच्या झाडावर अचानक छोटी छोटी फळेच दिसू लागतात. खरे तर त्यांना तांत्रिकदृष्ट्या ना फळे म्हणता
येत ना फूले. जरी ती फळासारखी दिसत असली तरी त्यांना सायकोनिया, असा शब्द वापरतात.
त्या फूलांच्या आता, सूक्ष्म रुपात नर आणि मादी फूले असतात.

उंबराच्या झाडावर अशी फळे तयार झाली, कि त्या झाडापासून एक रासायनिक संदेश पाठवला जातो. त्या
संदेशाने त्या झाडाकडे काहि खास किटक आकर्षित होतात. त्या सर्व माद्याच असतात. (का ते पुढे
लिहितोच आहे) या माद्या उंबराला देठासमोर जे छिद्र असते त्यातून आत शिरतात.

हे आत शिरणे इतके सोपे नसते. या प्रयत्नात त्यांचे इवलेसे पंख आणि स्पर्शिका तूटून पडतात. पण
तरी त्या आत शिरतातच. आत शिरल्या शिरल्या आपल्याकडच्या परागकणांचा साठा त्या आतल्या
मादीफूलांपैकी काही फ़ूलांवर रिता करतात. या काळात आतली नरफूले सुप्तावस्थेत असतात.

आता त्या आतच आपल्या खास अवयवाने अंडी घालतात. हि अंडी अर्थातच किंचीत छिद्र पाडून घातली
जातात. आणि इथेच मादीचे जीवनकार्य संपते. पंख नाही, स्पर्शिका (अँटेना) नाही, परागीभवन करुन झाले, अंडी घातली. निसर्ग अशा अवस्थेत तिला जिवंत कसा राहू देईल ?

आपण वर बघितलेच आहे कि अशी जखम झाल्यावर, उंबराचे झाड त्याभोवती एक कवच
तयार करते. त्या कवचाच्या आत या अंड्यांचे फलन होते. (उंबर खाल्यावर त्यात काही पोकळ
बिया, तूमच्या दाताखाली येतात, ते हे कवच असते.)

हा फलनाचा कालावधी, तीन ते वीस आठवड्यांचा असू शकतो. उंबराच्या जातीवर ते अवलंबून असते.
या काळात, ते झाड त्यांची आपल्यापरीने काळजी घेते. म्हणजे या सायकोनामाचा रंग बदलत नाही
कि त्यापासून कुठलाही गंध सोडला जात नाही, कि जेणेकरुन फळांचे चाहते तिथे येतील.
यथावकाश ती अंडी फलून त्यातून नर व मादी किटक बाहेर येतात. काही जातीत नर आधी जन्माला
येतात. नर आणि मादी यांचे तिथेच मिलन होते. ज्या जातीत नर आधी जन्माला येतात, त्यांचे
मिलन सुप्तावस्थेतील माद्यांशी होते.

मग नरांचे आणखी एक काम सुरु होते ते म्हणजे, त्या फ़ळाला बाहेर जाण्यासाठी छिद्र पाडणे.
या कामासाठी त्यांच्याकडे मजबूत जबडे असतात. पण या छिद्रातून नर मात्र बाहेर पडू शकत नाहीत.
त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू होतो. आणि तसाही बाहेरच्या जगात त्यांचा निभाव लागणे अशक्य असते.
कारण त्यांना ना पंख असतात ना डोळे. मिलन आणि ही वाट खोदण्याची दोनच जीवितकार्ये आटपून
तो इवलासा जीव मरुन जातो.

या वरच्या फोटो तूम्हाला नीट दिसेल, कि केवळ पिवळ्या व लाल फळांनाच बाजूने छिद्र आहे. म्हणजे त्यातले किटक उडून गेले आहेत.

आता माद्या बाहेर जाण्यासाठी तयार असतात, आतली नरफूलेही आता विकसित झालेली असतात.
माद्यांकडे परागकणांचा ठेवा देऊन, झाड त्यांना निरोप देते. माद्या दुसर्‍या झाडाच्या शोधात बाहेर
पडतात.
हे सर्व कार्य पार पाडल्यानंतरच, फळ पिकायची प्रक्रिया सुरु होते. फळाचा रंग बदलतो आणि त्याला
सुगंध सुटतो.

या फायकस कुळांची फळे हा निसर्गचक्रातला एक महत्वाचा घटक आहे. वर्षभर कुठल्या ना कुठल्या
झाडाला फळे येतच असतात. असे झाले नसते तर तो इवलासा जीव एखादे वर्षभर कसा तग
धरेल. (मी इवलासा म्हणतोय ना तो जीव, साध्या सुईच्या छिद्रापेक्षाही लहान असतो.)

आणि हि अशी मैत्री आजकालची नव्हे तर किमान ७ कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. ज्या काळात
सर्व खंड एकत्र होते, त्याकाळातली अंजीराची फळेच नव्हेत तर असे किटकही अश्मीभूत झालेले
सापडलेले आहेत.

इतकी गुंतागुंतीची व्यवस्था लक्षात घेता, हे झाड आणि हे किटक, एकमेकांशिवाय जगूच शकणार
नाहीत हे तर उघड आहे. पण मला नेहमी आश्चर्य वाटत आलेय, कि हि व्यवस्था नेमक्या कश्या
पायर्‍यांनी निर्माण झाली असावी ? यात कुठेही जराही ढिलेपणा नाही.

नर आणि मादी फूले विकसित होण्याचा कालावधी वेगळा असल्याने, स्वपरागीकरण होणार नाही.
मादी ज्या छिद्रातून आत येते, तो एकदिशा मार्ग असतो. तिला त्यातून बाहेर जाता येणार नसतेच.
शिवाय तिचे पंखच छाटून टाकल्याने, तिला डांबून ठेवण्याची व्य्वस्थाही झालेली असते. नराची
केवळ दोनच कार्ये. त्याशिवाय त्याला काही करताच येणार नाही. तो फळाचे बाकी काही नुकसानही
करु शकत नाही. अंड्यातील जीवाला आणि मादिलाही, अन्नाची जी गरज असते ती, त्या फ़ळातील
साठ्याच्या मानाने नगण्य असते.

खरेच हि व्यवस्था पहिल्यांदा समजल्यावर मी जो अवाक झालो होतो, तोच भाव आजही कायम आहे.

गुलमोहर: 

दिनेशदा.. मस्त माहितीपुर्ण लेख.. आता फोटोंची वाट बघू...

मागे 'तोरणा ते राजगड' ट्रेकला असताना तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती फळे चाखून पाहिली होती.. विशेष चव काही लागली नाही.. पण खाताना आतला पांढरासा भाग काढून खायचे असे आमच्याबरोबर असणार्‍या ताकवाल्याने सांगितले होते.. याबद्दल अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.. Happy

यो. तो पांढरा भाग म्हणजे मेलेले नर किटक. ते फुंकर मारून पण जातात. उंबर उकलून, फुंकर मारुन खायचे, म्हणजे पोकळ कोष, मेलेले किटक उडून जातात.

फोटो म्हणजे त्या किटकांचे नाहीत रे. नुसते फळांचे आहेत !

माहितीपूर्ण लेख (नेहमीप्रमाणेच). Happy
यातील काहिच माहिती नव्हते Sad

धन्यवाद दिनेशदा...खुपच छान आणी बरीच माहित नसलेली माहीती...

अशी फळे खाल्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही, असा अनुभव आहे>>>>>> आता लक्षात येतेय लहानपणी मे महीन्यात गावाला घरच्या उंबराची फळे खायचा का आग्रह व्हायचा..

अजुनही गावाला विहिर खणण्याच्या जागेसाठी पाणकाढ्ये लोक पहील्यांदा जागेतील उंबराच्या झाडाचा शोध गेतात. माझी आज्जी तर म्हणायची की जागेत उंबराचे झाड असेल तर त्या खाली हमखास पाणी लागणारच..

फोटोंची वाट बघतोय....

एभाप्र - जर फायकस कुळांमध्ये याच प्रकारे परागिकरण होत असेल तर अंजिरामध्ये कसे काय किडे सापडत नाहीत ? का सापडतात पण आपण अंजिरे गोड म्हणून खाताना त्याकडे........

मनोज जंगली अंजिरात असेच होते. मुद्दाम जोपासलेल्या अंजिरात परागीभवनच होत नाही. त्यात मोकळी जागाच नसते. त्याची लागवड पण कलमानेच होते, बियांनी नाही.

खरच किती अतर्क्य आहे हे. हे असंच व्हायला हवं हे कस आणि कोणी ठरवलं. या झाडांना आणि त्या विशिष्ठ कीटकांना एकत्र येण्याची बुध्दी कशी झाली? सायकोनामाला बरोबर ठराविक ठिकाणी एक छिद्र कसे निर्माण झाले? अगम्य आहे. माहितीबद्दल खुप आभार.

पण त्या मूळ मादीचे काय होते? फळाबाहेर पडतात त्या नविन माद्या ना?

मामी, ते लिहायचे राहिलेच. पंख नाहीत, स्पर्शिका नाही, परागीभवन करुन झालं,अंडी देऊन झाली. मग निसर्ग त्या मादीला का जिवंत ठेवेल ?

मला पण न सुटलेले कोडे. कुणी, कुणासाठी बदल घडवून आणले ? पण झाड आधी निर्माण झाले असावे आणि त्यांने किटकांना बदलण्यासाठी भाग पाडले असावे असे मला वाटते. एकेक बदल घडायला कित्येक पिढ्या खर्च झाल्या असतील.

खुप विस्मयजनक माहिती, दिनेशदा! किती वेगळीच पद्धत आहे परागीभवनाची उंबरामधे!!! तुम्ही खरंच मायबोलीवरचे डिस्कव्हरी चॅनेल आहात... Happy

वा दिनेशदा, खूपच अभ्यासपूर्ण माहिती.निसर्गाच्या गूढ,अद्भूत किंवा अनाकलनीय अशा गोष्टी जाणून घेता आल्या की काही वेगळेच समाधान मिळते.धार्मिकतेच्याही पलीकडे जाऊन उंबराचे निसर्ग साखळीत केवढे महत्व आहे! सानीला माझे पूर्ण अनुमोदन! तुमच्या कडून अशीच नाविन्यपूर्ण माहिती मिळत रहावी ही सदिच्छा.

एकदा उंबर खाल्ल्याने पोट दुखी झालेली गावी असताना. त्यानंतर मला तर कधीही उंबरात किडे असल्याने खायची भिती वाटायची. त्या भयात मी अंजीर कधीही खाल्ले नाही/खात नाही.
अंजीरमध्ये पण किडे असतात. मी आधी फोडून तेच शोधायचे मग खायचे टाळायचे.

मस्त माहीती. Happy
अंजिर मी पण उघडून नीट बघते आणि मग खाते पण कधी अजुन किडे दिसले नाहीयेत. बहुतेक सगळी कलमी अंजिरच विकायला येत असावेत.
उंबर कधी खाल्लं नाहीये. किडे असतात ते लहानपणी कुणीतरी सांगितल्यामुळे खायची हिंमत झालीच नाही!

दिनेशदा, उत्तम लेख!
पॉलिनेटींग वास्प आणि फायकसची 'फुले' हे कॉइव्होल्युशनचे उदाहरण आहे.

अति उत्तम ,माहितीपूर्ण लेख्.हाही माझ्या आवडत्या दहात..
'उंबरठ्या चं मूळ ही समजलं..
वाचताना वासलेला 'आ' अजून मिटता येत नाहीये Happy Happy

आभार नाही रे मानत. पण असे प्रतिसाद बघितल्यावर आणखी लिहायचा हुरुप येतो हे मात्र नक्की.

मध्य पूर्वेत आणि युरपमधे काहि जंगली अंजिराच्या जाति आढळतात (आदम इव्ह ने त्याचीच तर पाने वापरली होती) पण आपल्याकडे जी अंजिरे मिळतात ती कलमीच असतात, त्यामुळे ती शाकाहारी असतात.

अप्रतिम माहिती दिनेशदा...

तोरणा-राजगड भटकंतीदरम्यान सापडलेल हे उंबर...

>> उंबर कधी खाल्लं नाहीये. किडे असतात ते लहानपणी कुणीतरी सांगितल्यामुळे खायची हिंमत झालीच नाही!
>>

मी तर कधी उचलूनही पाहिला नाही आजपर्यंत. आमच्या गावी परसदारी कुंपणाजवळ खुप मोठे झाड आहे. पण तिथे पिकलेली फळे इतकी पडलेली असतात की झाडाजवळ कोणी जातच नाही.

व्वा.. दिनेशदा... इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार. खरच कॉम्प्लिकेटेड आणि विस्मयजनक आहे. Happy हे असं वाचलं की निसर्गासमोर नतमस्तक व्हायला होतं. धन्यवाद. Happy

Pages