सप्त शिवपदस्पर्श : भाग ६ - सारांश... !

Submitted by सेनापती... on 20 December, 2010 - 20:51

सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...
सप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... !

'सप्त शिवपदस्पर्श' हे नाव खरंतरं ह्या ट्रेकवर लिहायला घेतलं तेंव्हा सुचले.

आम्ही ३ जण.. ९ दिवस.. ७ किल्ले..

पुरंदर, वज्रगड, सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड.

प्रत्येक किल्ला 'श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला'. म्हणुन नाव ठेवले 'सप्त शिवपदस्पर्श'. हा ट्रेक माझ्या आत्तापर्यंतच्या डोंगरयात्रेमधला सर्वात आवडता ट्रेक आहे. ह्या ९ दिवसांच्या ट्रेकमध्ये अनेक अनुभव आले. मी खुप काही शिकलोय ह्या ९ दिवसात. खुप काही अनुभवलय. ह्या ट्रेकनंतर मी स्वतःला अधिक ओळखु लागलो. काय करायला हवे ते उमगले मला. आज ते थोडक्यात इकडे मांडायचा हा अल्पसा प्रयत्न.

ही सह्यभ्रमंती २००२ सालची आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वीची. पण आजही तितकीच ताजी आणि टवटवीत आहे. कारण तो प्रत्येक क्षण आम्ही जगलोय. आज ही तो तितकाच ताजा आहे. ह्या लिखाणाच्या निमित्ताने ते क्षण पुन्हा जगायचे होते मला. पहिल्या १-२ वर्षात केलेली भ्रमंती हे नुसतेच डोंगर चढणे होते असे मला ह्या ट्रेकनंतर जाणवू लागले.

आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकर म्हणुन गेले ते पूर्णपणे अनुभवलं ह्या ट्रेकमध्ये. "हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवण आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"

डोंगरात जाताना, किल्ले बघताना तिकडे नेमके कुठला दृष्टीकोन ठेवायचा हे मला ह्या ट्रेकमध्ये समजले. आप्पा म्हणुन गेलेचं आहेत,"गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! धावता पळता त्याला नुसतं शिउन जाणं म्हणजे त्याचाही अपमान, आपलाही. "

९ दिवसात फ़क्त ७ किल्लेच नाही तर त्या आसपासची अनेक गावेसुद्धा पाहिली. निरनिराळ्या स्वभावाची माणसे भेटली, त्यांचे ग्रामजीवन आणि राहणी, त्यांच्या पद्धती अश्या बऱ्याच गोष्टी कळल्या. आम्हाला ह्या ट्रेकमध्ये प्रत्येक ठिकाणी योग्यवेळी हवी तशी मदत मिळत गेली. मग तो सिंहगडच्या पायथ्याचा मामा असो नाहीतर सिंहगड-राजगड मधल्या धारेवर अचानकपणे हाक देणारा शेतकरी असो. विंझर गावाबाहेरच्या शेतामधला रस्ता दाखवणारा मनुष्य असो नाहीतर तोरण्यावरुन कोलंबीला जाताना बसमध्ये भेटलेला मुलगा असो. जणू काही कोणी तरी अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करत आहे असे आम्हाला सारखे वाटत होते. तसे मी, अभिजित आणि हर्षदने एकमेकांना बोलून सुद्धा दाखवले होते.

आम्हाला भेटलेला वाघ्या हा त्यातलाच अजून एक भाग. तिसऱ्या दिवशी राजगडच्या पायथ्याला भेटलेल्या ह्याने आमची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. अनेक ठिकाणी वाट चुकता चुकता त्याने आम्हाला योग्य मार्ग शोधून दिला. अखेर आम्हालाच त्याला सोडून परत यावे लागले. एका प्राण्याच्या बाबतीत इतका हळवं का व्हायच अस म्हणताय... कारण तेच. तो प्रत्येक क्षण आम्ही जगलोय.

ह्या ट्रेकनंतर इतिहास मला अधिकच खुणवू लागला. आधी फ़क्त कादंबरी आणि वरचेवर वाचन असणारा मी आता इतिहासाच्या खोलात शिरलो. छत्रपति शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास आता अधिक जोमाने अभ्यासू लागलो. आजच्या आणि येणाऱ्या काळातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शिवचरित्रामध्ये आहे ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. त्या सप्तपदांनी मी पावन झालो हे नक्की.

त्या दिवसापासून सुरु झालेली माझी वाटचाल अजून सुरूच आहे. ती कधी संपणार नाही...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच रोहन तुझी हि भटकंती खुप खुप आवडली.भन्नाट आहे हे सगळे...
जसजस आपण या गड-किल्ल्यांच्या जवळ जातो.तस आपण त्यात हरवुन जातो.या मातीत ती जादु आहे.अन या मातीतील माणसांबद्दल काय बोलायच .डोंगरात आढळणार्‍या करवंदासाऱखी आहेत.त्यांच्याकडे मनाची श्रीमंती खुप असते.तुझा अनुभव वाचुन खर म्हणजे आम्ही पावन झालो.
जबरी गड्या....................
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल.

हे भारावले पण खरेच या परिसरात अनुभवायला येते. मला तर त्या परिसरात त्या काळातले सगळे दिसायला लागते. महाराष्ट्रातले ग्रामीण जनजीवन अजून फारसे बदललेले नाही.

पुन्हा एकदा सुंदर लिखाण Happy

त्या दिवसापासून सुरु झालेली माझी वाटचाल अजून सुरूच आहे. ती कधी संपणार नाही...>>>यापुढील तुझ्या भटकंतीसाठी मनापासुन शुभेच्छा!!!!

रोहन .. feel so proud of you.. तुझ्यासारखे लोकं असेपर्यन्त इतिहासाला विस्मरणाच्या पडद्याआड झाकले जाण्याची मुळीच भीती नाही. तुमच्यामुळेच इतिहास वारंवार वाचला जातो,आठवला जातो . इतिहासाच्या आठवणींबरोबर तुला आलेले जीवनातले इतर अनुभवही भारावून टाकणारे आहेत..

रोहन..तु म्हणतोस ते शब्दशः खरे आहे..
हेच झपाटलेपण भटकण्यास भाग पाडते आहे.

लेका आता तुझ्या बरोबर एक जम्बो ट्रेक करायला हवा.

मायबोलीकरांनो.. मनापासून दाद दिल्याबद्दल मनापासून आभार... Happy

पुढील भटकंती लेख आता पुढील वर्षी... म्हणजे अवघ्या ९ दिवसांनी हो... Happy

तुमच्या लिखाणात कुठेहि क्रुत्रीमपणा आढळत नाही. हे नुसतेच प्रवासवर्णन असते तर रटाळ वाटले असते, पण ते खुमासदार पद्धतीने लिहिल्यामुळे वाचताना एक वेगळाच आनंद देऊन गेले. एक भाग वाचुन झाला की, दुसर्‍या भाग वाचण्याचि आतुरता वाढते.

इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. त्या सप्तपदांनी मी पावन झालो हे नक्की. >>>>> अग्दी अग्दी खरी गोष्ट ....

फारच अप्रतिम लेखमाला - तुम्हा सर्वांना सलाम.......