मराठी : लेखन घडते कसे?

Submitted by कुमार१ on 26 February, 2024 - 22:20

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ (https://www.maayboli.com/node/83383) या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन. यासाठी ‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :

ज्या व्यक्तीने आतापर्यंत किमान एक लेखन (गद्य/पद्य) कुठल्याही सार्वजनिक माध्यमात केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती”.

या उपक्रमाद्वारे इच्छुक लेखक आपले मनोगत इथे व्यक्त करतील. ते कशा प्रकारे व्यक्त करायचे याची पूर्ण मुभा लेखकांना आहेच. तरीसुद्धा उपक्रमात एक सुसूत्रता असावी म्हणून काही मार्गदर्शक प्रश्न खाली देत आहे. ते योग्य वाटल्यास त्या प्रश्नांचा जरूर आधार घ्यावा. आजच्या दिनाचे औचित्य लक्षात घेऊन फक्त मराठी भाषेतील लेखनासंबंधीच लिहावे.

प्रश्न

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.

२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही

३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी

४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.

५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?

६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.

निव्वळ लेखन या कलेमध्ये लेखक त्याच्या वाचकांसाठी व्यक्ती म्हणून अदृश्य असतो; तो त्याच्या शब्दांमार्फतच वाचकांपुढे येतो. सध्याच्या युगात ‘निव्वळ लेखन’ या कलेपुढे दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत निव्वळ लेखन ही कला भविष्यात किती काळ स्वीकारली जाईल, यासंबंधी तुमचे विचार जरूर लिहा.

वरील मनोगताची सुरुवात माझ्यापासून करत नाही. ते मी चर्चा समारोपाच्या वेळेस लिहीन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !

टीप : जे लेखक प्रतिसादात वरील प्रश्नांचा वापर करणार असतील त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक लिहून थेट उत्तर लिहावे ही विनंती. संपूर्ण प्रश्न उतरवून घेण्याची गरज नाही.

अग्रिम धन्यवाद !
*************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल्या लेखनासाठी उपयुक्त ठरू शकेल असं जे काही वाचण्यात, ऐकण्यात किंवा बघण्यात येईल त्याच्याही नोंदी इथे करून ठेवतो.

युट्युबवर वसंत वसंत लिमये या लेखकांची मुलाखत पाहिली ( https://www.youtube.com/watch?v=VhKPAzwSRjM). त्यांच्या एका कादंबरी लेखनाच्या काळातील त्यांनी सांगितलेला हा किस्सा.

कादंबरीचा घटनाकाळ 1990 च्या दशकातील होता. त्यांच्या कादंबरीतील एक व्यक्ती 19 91 साली संध्याकाळच्या वेळेस डोंबिवली लोकलने प्रवास करणारी होती. हा तपशील लिहिताना त्यांना हेही महत्त्वाचे वाटले की, त्या काळी संध्याकाळच्या विशिष्ट वेळेतील डोंबिवली लोकल अमुक ठिकाणाहून किती वाजता निघते, याचा शोध घ्यावा.

आता इतके जुने वेळापत्रक तर गुगलवर नाही. मग त्यांनी रेल्वेतील लोकांच्या ओळखी काढत त्या काळचे छापील वेळापत्रक मिळवले आणि त्या लोकलची बरोबर वेळ त्यातून शोधून मग ती कादंबरीत लिहीली. या सगळ्या प्रकारात घरच्यांनी त्यांना वेड्यात काढले. परंतु त्यांनी त्यांच्या या शोधाचे समर्थन असे दिले :
कादंबरीचा एखादा वाचक जर खरोखरच 1991 साली त्या लोकलने प्रवास करत असेल, तर ती अचूक वेळ कादंबरीत दिसल्यानंतर त्याला लेखक एकदम विश्वासार्ह वाटतो आणि तो त्या पुढचे सगळे पुस्तक अगदी मन लावून वाचतो !

वास्तवातले तपशील काल्पनिक लेखनात सुद्धा शक्य तितके अचूक असावेत हा त्यांचा आग्रह आवडला.

चांगल्या लेखनासाठी उपयुक्त ठरू शकेल असं जे काही वाचण्यात, ऐकण्यात किंवा बघण्यात येईल त्याच्याही नोंदी इथे करून ठेवतो.>>>>>>> खूप छान कल्पना/ उपक्रम. धन्यवाद.

कादंबरीचा एखादा वाचक जर खरोखरच 1991 साली त्या लोकलने प्रवास करत असेल, तर ती अचूक वेळ कादंबरीत दिसल्यानंतर त्याला लेखक एकदम विश्वासार्ह वाटतो >>>> पटलं.

चांगल्या लेखनासाठी उपयुक्त ठरू शकेल असं जे काही वाचण्यात, ऐकण्यात किंवा बघण्यात येईल त्याच्याही नोंदी इथे करून ठेवतो.>>> चांगली कल्पना. धन्यवाद!!

... त्या लोकलची बरोबर वेळ शोधून मग कादंबरीत लिहीली.... ब्राव्हो !

कादंबरी असो किंवा इतर लेखन, संदर्भ विश्वसनीय असावे आणि ते पुनःपुन्हा तपासावे. (स्वतः लिहिण्यात बऱ्याच चुका केल्यानंतर आलेली अक्कल Happy )

BTW,

कॉलेजवयीन असतांना सिडनी शेल्डनच्या कादंबऱ्या वाचणे 'इन' होते. त्याचे स्थळ-काळ वर्णन फार मोहक आणि विस्तृत असे. पुढे प्रत्यक्ष ऍमस्टरडॅम, व्हिएन्ना, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, बर्लिन वगैरे शहरातून फिरतांना त्या कादंबऱ्यांतील गल्ल्या-रस्ते-चर्चेस-इमारती-ऑपेरा अगदी टेलिफोनचे मॉडेल्स, कार-रेल्वे आणि विमानांच्या सीट्स सर्व वर्णने किती योग्य आणि चपखल होती हे पदोपदी जाणवले. उत्तम रिसर्च !

बरे शेल्डन, लुडलूम वगैरे काही फार उच्च दर्जाचे लेखन समजले जात नाही Happy

सर्वांना धन्यवाद ! आपापले वाचलेले अनुभव असेच लिहित रहा.
शेल्डन, लुडलूम >> छान !
....
• माझ्या तारुण्यात माझे एक नातेवाईक झाशीच्या राणीवर कादंबरी लिहीत होते तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष झाशीला जाऊन काही दिवस मुक्काम केल्याचे मला आठवते.
.. ..
•‘एका कोळीयाने’ लिहीताना पु ल देशपांडे यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल पूर्वी लिहीले आहे (https://www.maayboli.com/node/73602).
..
• इटालिय कादंबरीकार Umberto Eco हे सुद्धा त्यांच्या लेखनासाठी अनेक वर्ष अनेक प्रकारचे कष्ट घेत. ‘द नेम ऑफ द रोज’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी त्या कादंबरीतल्या सगळ्या संन्याशांची रेखाचित्रे काढली होती, तर ‘द आयलंड ऑफ द डे बिफोर’ या कादंबरीसाठी त्यांनी जुन्या काळातल्या जहाजांच्या रचनेचा तीन वर्ष अभ्यास केला होता.

Having felt guilty that the barriers of race and caste had prevented his mingling with the Burmese, he thought he could expiate some of his guilt by immersing himself in the life of the poor and outcast people of Europe. Donning ragged clothes, he went into the East End of London to live in cheap lodging houses among labourers and beggars; he spent a period in the slums of Paris and worked as a dishwasher in French hotels and restaurants; he tramped the roads of England with professional vagrants and joined the people of the London slums in their annual exodus to work in the Kentish hopfields.
Those experiences gave Orwell the material for Down and Out in Paris and London, in which actual incidents are rearranged into something like fiction

जॉर्ज ऑर्वेल

दुसर्‍या कोणी हेच त्याच्यावर बेकारीमुळे अशी वेळ ओढवली आणि त्याला गरीब लोकांत, श्रमिकांत राहावं लागलं असंही लिहिलं आहे. पण मी त्याचं जे चरित्र वाचलं, त्यात वरच्या परि च्छेदातल्यासारखं लिहिलं आहे. त्याने ब्रह्मदेशातली ब्रिटिश सरकारची नोकरी सोडली, विपन्नावस्थेत तो आपल्या कुटुंबाकडे गेला नाही, त्यांची मदत घेतली नाही, हे तर खरेच.

मृत्युंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांनी कर्णाची संदर्भभूमी असलेल्या उत्तर भारत परिसरातील भागात प्रवास केला होता. कादंबरीच्या शेवटी त्यातील महत्वाच्या जागांचे फोटो देखील दिले आहेत.

१. जॉर्ज ऑरवेल >>> जबरीच. एक कडक सलाम !
२. मृत्युंजय>>> छान.
…..
वरील चर्चेदरम्यान काल युट्युबवर ‘सापळा’ हा मराठी चित्रपट पाहिला.
त्यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत एक रहस्यकथाकार व दिग्दर्शक आहे ( मराठीतील हिचकॉक ! ). त्याची लेखनप्रक्रिया चित्रपटात छान मांडली आहे. त्याच्या घरातल्या भिंतीवर अनेक प्रकारचे चाकू, तलवारी व कुऱ्हाड लावलेली आहे तर टेबलवर दोन पिस्तुले ठेवलेली आहेत. यावर कडी म्हणजे तो तब्बल 80 हजार रुपये खर्चून पोलिसी बेड्याही मागवतो. ही सर्व हत्यारे सतत त्याच्या नजरेसमोर आहेत आणि त्यातूनच त्याला रहस्यपट लिहीण्याची प्रेरणा मिळते. चित्रपटाच्या अखेरीस त्याच्या तोंडचे वाक्यही असेच आहे,
रहस्यकथा मी अभ्यास करून लिहितो”.

जरी हे काल्पनिक असले तरी वरील चर्चेशी सुसंगत आहे.

बरेचदा एखाद्या विशिष्ठ पेशाची भूमिका करण्यासाठी नायक/नायिका त्या पेशातील लोकांसोबत राहून त्यांचे काम पाहतात, शिकून घेतात. "ऐरणीच्या देवा" गाण्यासाठी, व्यवस्थित भाता ओढता यावा यासाठी जयश्री गडकर लोहाराकडे शिकायला जात अस कुठतरी वाचलं होत. विषयांतराबद्दल क्षमस्व

इसवी सन पूर्वकाळापासून ते आजपर्यंतच्या मराठी भाषेच्या बदलत्या रूपांविषयीचा एक सुरेख गद्यपद्य कार्यक्रम (भाग १ ) इथे
https://www.youtube.com/watch?v=FOUYpM6dmCA

डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आणि त्यांना काही गायकांची साथ.
त्यामध्ये गाथा सप्तशती आणि ‘चामुंडराये करवियले’ इथपासून ते सध्याच्या आधुनिक काळातील मंगला गोडबोले यांचा ‘भाषा सॅलड’ हा सुरेख वेचा वाचून दाखवलेला आहे.

इतक्या दीर्घ कालखंडात मराठी भाषा काल, आशय आणि लेखकांच्या स्वभावानुसार कशी बदलत गेली याचे सुरेख विवेचन. मराठीचे गद्य-पद्य -गद्य असे कालानुरूप झालेले संक्रमण उल्लेखनीय.

Pages