लेख-४: . माझी मुशाफिरी!.....आनंद पिकवणारा देश !
नजर जाईल तेथवर रंगवलेलं हिरवंगार निसर्गचित्र. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे पार लांबवरच्या डोंगराकडे धावताहेत. सिलिगुडी - भूतान रस्त्यावरून बुलेटी पळवत आम्ही जयगावला आलो. जयगाव हे भूतानच्या सीमेवरील भारतातलं शेवटचं गाव. सीमेपलीकडे भुतानचं फुनसोलिंग. अगदी खुर्द-बुद्रुक सारखे ही दोन्ही गावं आंतरराष्ट्रीय घरोबा राखत एकदुसऱ्याचा शेजार एन्जॉय करताहेत. जयगावच्या शेवटच्या गल्लीला लागून असलेली कमान ओलांडली आणि भूतानमध्ये प्रवेश केला. ही कमान म्हणजेच बॉर्डर. अंगावर रोमांच उभं राहीलं. आयुष्यात पहिल्यांदाच मोटारसायकल वरून देशाबाहेर पडलोय. भूतानच्या थंडगार हवेने हे रोमांच अधिकच गहिरं केलंय.